Friday, June 13, 2008

...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही

३ जुलै १९८७ ला अमेरिकेत न्यू जर्सीला झालेल्या बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात पुलंनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातील अंश...

एका दूरच्या देशात आपण सगळेजण मराठी माणसं म्हणून एकत्र जमलोय. तसं पाहिलं तर या समुदायामध्ये ज्ञानविज्ञानाच्या शाखेमध्ये फार मोठी मान्यता मिळविलेले, तज्ज्ञता मिळवलेले डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, कारखानदार आहेत, विद्वान आहेत, विदुषी आहेत, तंत्रज्ञ आहेत, तंत्रज्ञा आहेत; पण आपल्या निराळेपणाची आणि श्रेष्ठतेची ही सगळी महावस्त्रं बाजूला ठेवून ‘मराठी एवढ्या एकाच भावनेने आपण इथे एकत्र आलेले आहोत. आपण मराठी भाषिक आहोत एवढा एकच धागा आपल्याला एकत्र यायला पुरेसा आहे, याची आपल्याला खात्री आहे. अमेरिकेसारखा हा महाप्रचंड, महाबलाढ्य, महाश्रीमंत देश. ज्या भारतीय वातावरणात लहानपणापासून आपण वाढलो त्याच्यापेक्षा अगदी निराळे वातावरण असलेला हा देश. … पण आपण कुठल्यातरी समान धाग्याने एकमेकांशी बांधले गेलेले आहोत, या आनंद देणाऱ्या अनुभूतीची माणसाला जी निसर्गदत्त ओढ असते ती या असल्या संमेलनाच्या मुळाशी असते. … अहो, तुकारामासारख्या संतानंसुद्धा म्हटलंय की, ' माझिया जातीचा मज मिळो कोणी ' . इथे ' जातीचा ' याचा अर्थ माझ्यासारखी ज्याला विठ्ठलाची ओढ आहे, देवाची ओढ आहे. अशा प्रकारचा कोणीतरी मला मिळो. तुकारामाच्याच उक्तीप्रमाणे बोलायचं तर ' माझिया भाषेचा मज मिळो कोणी ' या भावनेनं आपण इथे एकत्र आलेले आहोत. आणि इतक्या संख्येनं इथे एकत्र जमलेले आहोत की , मला तर असं वाटतं, कोणीतरी तिथून ' न्यू जर्सीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ', असं म्हणेल की काय!

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की, साँग हॅज द लाँगेस्ट लाइफ. गाणं हे चिरंतन असतं. या मराठी मुलांच्या ओठांवर, मनामध्ये तुम्ही मराठी गाणी दिलंय. अशी पाचपन्नास गाणी दिलीत, तर मराठी संस्कृतीची चिंता करण्याचं तुम्हाला काहीही कारण उरणार नाही. हे गाणं या बालकांबरोबर त्यांच्या वयाच्या ऐंशीव्या-नव्वदाव्या वर्षापर्यंत जाईल, कदाचित शंभराव्या वर्षापर्यंतसुद्धा जाईल. जोपर्यंत एक मराठी गाणं तुमच्या ओठांवर आहे, तोपर्यंत तुम्ही अमेरिकेत राहा, नाहीतर टिंबक्टूत राहा, कुठंही राहा, तुम्ही मराठीच आहात. त्यात काही चिंता बाळगण्याचं कारण नाही.

परदेशात आपल्या भाषेचा शब्द कानांवर पडणं मुश्कील. म्हणूनच तर तो ' परदेश ' होतो ना ! मला खात्री आहे की, इथे अगदी अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना कानांवर बालकवींची कविता वगैरे जाऊ दे, पण ' च्यायला ' अशी शिवी जरी ऐकू आली, तर ती ओवीसारखी वाटेल आपल्याला त्यावेळी. मला तर वाटतं की प्रत्येक शब्द हा आठवणींच्या पेटीच्या किल्ली सारखा असतो. मनचक्षूंच्यापुढे एकदम एखादे स्मृतिचित्र उभी करण्याची शब्दांची ताकद ही विलक्षण असते. शब्दांचा खरा अर्थ हा शब्दकोशात सापडत नाही. तिथे प्रतिशब्द सापडतात. शब्दांचा अर्थ जीवनामध्ये आपल्याला सापडत असतो.

मराठी माणसाला 'थालीपीठ' म्हणजे काय हे एखाद्या दुसऱ्या माणसाला समजावून सांगायची वेळ आली की तो दुसरा हा दुसराच बनून राहतो. कारण आपल्याला जेव्हा थालीपीठाची आठवण येते, त्यावेळेला ती नुसत्या एका चवदार पदार्थाची नसते.ज्या स्वयंपाकघरात आपण पाटावर बसून ते थालीपीठ खाल्लेलं असतं ते स्वयंपाक घर, थालीपिठा बरोबर त्याच्यावर आईने हलकेच ठेवलेला ताज्या लोण्याचा गोळा, थालीपीठ थापताना आईच्या हातातल्या बांगड्यांचा किणकिणाट, घरभर सुटलेला तो खमंग वास, रंग, रस, गंध,स्पर्श या आठवणींचे असंख्य भोवरे त्या एका शब्दाबरोबर गुंजन करायला लागतात. आणि आपल्याप्रमाणे, ह्या शब्दाच्या उच्चाराने आणखी कुणाला हाच अनुभव येतो हे समजल्यावर तो परका माणूस आपला माणूस होऊन जातो. शेवटी माणूस म्हणजे त्याच्या स्मृतिकोशात साठत गेलेल्या असंख्य संदर्भाचं चालतं बोलतं गाठोडं आहे.

हे जीवन सुंदर व्हावं, आनंददायक व्हावं, हाच हेतू सगळ्या संस्कृतीच्या मुळाशी असतो. गुलाबाचं फूल आणि मोग-याचं फूल ही फुलं भिन्न आहेत, म्हणजे त्या फुलांचं वैर आहे असं नव्हे. त्यातलं फूलपण एकच आहे. ' ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा ' असं चोखोबांनी म्हटलंय. ऊस वाकडा पण रस वाकडा नसतो. गाय काळी म्हणून दूध काळं नसतं. तसं हे फुलातलं फूलपण खरं. तिथे पुष्पसृष्टीचेच कायदे लागू पडतात. प्रत्येक माणसाला, तो कुठलाही असला तरी जीवसृष्टीचेच कायदे लागू पडतात. दाढ ठणकायला लागली की, कानडी मनुष्य ' अय्यय्यो ' म्हणून कानडीत ठणाणा करील. तो कानडीतून असला, इंग्लिशमधून असला किंवा जपानीतून असला, तरी दाढ ठणकण्याची वेदना तीच आहे. त्याच्यामध्ये काही फरक नसतो. एकात्मतेत विविधता आणि विविधतेत एकात्मता - ' युनिटी इन डायव्हर्सिटी ' म्हणतात ती हीच. एकात्मता हे जसं सत्य आहे, त्याचप्रमाणे विविधता हेही सत्य आहे.

कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ' नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली जणु तारकादळे नगरात, परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हा, त्या माजघरातील मंद दिव्याची वात. ' आपल्या माणसांपासून, आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माजघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर्य असूनही जिवाला व्याकूळ करणा-या मंद दिव्याच्या वाती या असणारच. या मेळाव्यात अशा माजघरातल्या मंद दिव्याच्या वातींचं स्मरण न होणारं असं कुणी असेल, असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती, तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी, या भावनेनं तुम्ही असे एकत्र आला नसता. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते. शरीरातून रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणा-या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तोय मन एव मनुष्यः अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.

'पुंडलिक वरदा ' म्हटल्यानंतर तुम्ही आस्तिक असा की नास्तिक असा, ' हारी विठ्ठल ' तोंडातून येणारच तुमच्या. तो प्रतिसाद तुम्हाला कळण्यापूर्वी उमटलेला असतो. अशा नेणिवांतून, आपोआप उमटणा-या प्रतिक्रियांतूनच समाजमानस तयार होत असतं. ' छत्रपती शिवाजी महाराज की ' म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपोआप ' जय ' येत नाही, तो मराठी माणूस आहे असं आपल्याला वाटतच नाही.

खुद्द महाराष्ट्रात आज मराठीपेक्षा इंग्रजी भाषेलाच जास्त मान आहे. इंग्रजाच्या अमदानीमध्ये तिला राजभाषा म्हणून मान मिळत होता. इंग्रजी शिकायची सक्ती होती, आता तशी सक्तीही नाही. पण इंग्रजी भाषेची किल्ली हातात असली की, अभ्युदयाची अनेक दारं उघडली जातात, हे अनेक लोकांनी ओळखलेलं आहे. किंबहुना, पुण्याहून मुंबईला जाताना नव्यानेच कारखानदारीत शिरलेले जोशी-कुलकर्णीसुद्धा एकमेकांशी इंग्रजीत बोलत असतात. आता त्यांचं इंग्रजी ऐकल्यावर इंग्रज हा देश सोडून का गेला, हे आपल्याला कळतं.

अमेरिकेमध्ये आल्यानंतर केवळ डॉलर्सचा संचय हे एकमेव उद्दिष्ट राहू नये, तर नवी निर्मिती करण्याचे जे जे काही प्रकार इथे चाललेले आहेत, चांगले आहेत, सुंदर आहेत, त्याच्यामागे आपली मुलं कशी लागतील, त्याची त्यांना आवड उत्पन्न कशी होईल, याची तळमळ हवी. आजच्या काळामध्ये मी एकच विनंती करणार आहे, इथं तुम्ही जमलेले आहात, फार मोठे तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ आहात, तुम्हाला महाराष्ट्राची सेवाच करायची असेल, तर तुमचा जो विषय आहे, त्याच्यावरचे लेख मराठीत लिहून ते महाराष्ट्रात पाठवा. ही मराठी भाषेची सगळ्यात मोठी सेवा होईल. तळमळ खरीखुरी असेल तर अशक्य काहीही नाही.

मराठी हा आपल्याला प्रेमानं एकत्र जोडणारा धागा आहे, ह्या भावनेनं इतक्या दूर देशात मराठी भाषा ऐकण्या-बोलण्यासाठी इतक्या लोकांनी एकत्र जमावं, ही घटनाच मला आनंददायक वाटते. आपल्या भाषेच्या प्रेमानं एकमेकांच्या जवळ येऊ, एकत्र जेवू, एकत्र गप्पागोष्टी करू, मनाशी दाटून येणाऱ्या कडूगोड आठवणी एकमेकांना सांगू, आपल्या दूर देशातल्या घरच्या आठवणी जागविणारी गाणी गाऊ किंवा ऐकू, या भावनेनं एकत्र जमणारा हा मेळावा पाहिला म्हणजे निराशेने वठत जाणाऱ्या या मनाला आशेची पालवी फुटते.

मित्रहो, हा मेळावा भरवल्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. इतर कोठलाही नसला, तरी वयाच्या वडीलकीच्या अधिकारानं म्हणतो की, असेच एकत्र या. चार मराठी गाणी म्हणा, नाटक करा. कविता वाचा, कथाकथन करा, तात्त्विक मतभेदही असू देत. अस्सल कोल्हापुरी रस्सा करा किंवा चंद्रपुरी वडाभात करा. बहुतेकांच्या घरी मी बार्बेक्यूची शेगडी पाहिलेली आहे. तिच्यावर अमेरिकन गव्हाच्या लोंब्या भाजून का होईना, हुरडा पार्टी करा. असली छोटी छोटी संमेलनं होत राहू दे. अमेरिकेतल्या कुठल्याही गावात तुम्ही असलात तरी त्या वेळेला ते गाव महाराष्ट्रात आलेलं असेल. मनाला अधून मधून खिन्न करणारी तुमची दूरत्वाची भावना त्यातून नाहिशी होईल. मनामध्ये आपलेपण असलं की, सगळीकडे आपली माणसं भेटतात. तेच आपलेपण घेऊन तुम्ही आलात आणि मी सुद्धा आलेलो आहे. तुम्हाला असलं आपलेपण उदंड लाभो, अशा प्रकारची प्रार्थना करतो.”

पु.ल. देशपांडे
महाराष्ट्र टाईम्स
१२ जुन २००८

4 प्रतिक्रिया:

Anagha said...

Marathichi chinta kiti patkan ghalavali!

Unknown said...

sadhya marathi khup dhokyat ahe hindi mule

Anonymous said...

अहाहा ! सुंदर ....

Anonymous said...

अहाहा ! सुंदर ....