Tuesday, April 30, 2019

मारवा आजही स्मरणात आहे! - सुनंदा धर्माधिकारी

''रायकरवाडी' या नाटकाच्या प्रयोगावेळी बासरीवादकामुळे प्रयोग खोळंबलेला पाहून 'त्यांनी' बासरीवर वाजवलेला तो मारवा आजही अगदी तसाच माझ्या स्मरणात आहे. मी तो प्रयोग विसरू शकलेले नाही. मी ते स्वर विसरू शकलेले नाही आणि ती व्यक्ती मी विसरू शकत नाही. त्या व्यक्तीचं नाव होतं पु. ल. देशपांडे. म्हणजे आमचा पीएल!' पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांचा दीर्घ सहवास लाभलेल्या जुन्या पिढीतील अभिनेत्री सुनंदा धर्माधिकारी यांनी भाईंच्या आठवणींना दिलेला उजाळा...
साधारण १९५७ची गोष्ट. नाट्यदिग्दर्शक, लेखक बाबा डी. के. यांच्या 'रायकरवाडी' या नाटकाचा इंदूरमधील प्रयोग. माझी नाटकातली प्रमुख भूमिका. नवखी असल्याने मी प्रचंड गोंधळलेली, घाबरलेली. प्रेक्षक, प्रमुख पाहुणे आसनस्थ झाले. पडद्यामागे गोंधळ आणि पडद्यासमोर प्रचंड गर्दी. नाटक सुरू होण्यास होणारा विलंब; कारण बासरीवादकाचा पत्ता नाही आणि नाटकाची सुरुवातच बासरीच्या स्वरांनी. सारे खोळंबलेले. अशा वेळी एक माणूस पडद्यामागे आला आणि बाबांना विचारू लागला, 'काय झालं?' कारण समजल्यावर म्हणाला, 'एवढंच ना? मला फक्त बासरी आणून दे, मी वाजवतो.' त्यांनी बासरीवर वाजवलेला तो 'मारवा' आजही माझ्या स्मरणात अगदी तसाच आहे. मी तो प्रयोग विसरू शकलेले नाही. मी ते स्वर विसरू शकलेले नाही आणि ती व्यक्ती मी विसरू शकत नाही. त्या व्यक्तीचं नाव होतं पु. ल. देशपांडे. म्हणजे आमचा पीएल.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि मनस्वी कलाकार असलेल्या पु. ल. देशपांडे यांची आणि माझी पहिली भेट ही अशी झाली. माझा जन्म मध्य प्रदेशमधील उज्जैनचा. कलेच्या वातावरणातच मी लहानाची मोठी झाले. गणेशोत्सवात होणाऱ्या नाटकांतून छोट्यामोठ्या भूमिका केल्या. नाटकवेड रक्तात भिनलं. त्या काळी लवकर लग्न होत. माझंही लग्न लवकर झालं आणि मी इंदूरला आले. आपण पुन्हा नाटक करावं अशी ऊर्मी पहिल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर दाटून येऊ लागली. त्याचवेळी माझी भेट सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, लेखक बाबा डी. के. यांच्याशी झाली. त्यांच्यामुळे १९५६मध्ये मी 'नाट्यभारती'शी जोडले गेले. १९५७मध्ये 'लिटिल थिएटर्स' या संस्थेची स्थापना आम्ही केली आणि वर्षाला सहा दर्जेदार नाटकांची निर्मिती करायचं ठरवलं. संस्थेच्या पहिल्याच वर्षी यूजीओनिल या सुप्रसिद्ध इंग्रजी नाटककाराच्या 'बीयाँड द होरायजन' या नाटकाचा मराठीत अनुवाद करून बाबांनी लिहिलेलं 'रायकरवाडी' हे नाटक आम्ही बसवलं. त्याच्या पहिल्याच प्रयोगाला वर सांगितल्याप्रमाणे माझी आणि पीएलची भेट झाली. पुढे ती होत गेली आणि मला माझा नाट्यगुरू मिळाला. अतिशयोक्ती वाटू शकतं; मात्र खरं सांगते, मला माझा देव मिळाला!

आज भाईंना आठवताना किती भेटी स्मरतात. ते अतिशय साधे-सरळ-सहज आणि विनोदी होते. कोणी कामात हयगय केलेली त्यांना अजिबात खपायची नाही. या माणसाचं कलेवर केवळ प्रेम होतं असं नाही, तर त्यांची कलाविष्कारावर निष्ठा होती. जे करायचं ते उत्तमच, असा आग्रह होता. 'लिटिल थिएटर्स'च्या एका कार्यक्रमात बाबांनी भाईंना अध्यक्ष म्हणून बोलावलं होतं. आम्ही सगळेच नवोदित आणि अव्यवसायी असल्यानं, संवाद पाठांतरात गडबड व्हायची. ते कधीतरी भाईंच्या लक्षात आलं असेल. कार्यक्रमात बाबा म्हणाले, 'मी आता विनंती करतो, की पु. ल. देशपांडे यांनी दोन शब्दांत मार्गदर्शन करावं.' भाई बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, 'दोनच शब्द सांगतो, पाठ करा!' अशा असंख्य आठवणी आहेत.

बाबा डी. के. यांनी लिहिलेलं 'कारकून' नाटक त्या काळी खूप गाजलं होतं. त्या नाटकात माझी खूप छोटी भूमिका होती. माझ्या वाट्याला केवळ बारा वाक्यं होती. पडद्यामागे मी खूप काम करायचे. अगदी पडेल ते. एका प्रयोगाला भाई आले होते. त्यांनी माझी धावपळ पाहिली आणि ते सर्वांना म्हणाले, 'अरे, या पोरीची काय कमाल आहे रे! ही काय काय करते!' त्यांची ही शाबासकीची थाप मला खूप बळ देऊन गेली. आज मागे वळून पाहताना जाणवतं, मी भाईंमुळे केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर माणूस म्हणूनही समृद्ध झाले. त्यांच्यामुळे माझी वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, मो. ग. रांगणेकर, भीमसेन जोशी, रामूभय्या दाते या दिग्गजांशी ओळख झाली. पुढे या सगळ्यांशी अतूट स्नेह निर्माण झाला. इंदूर, उज्जैन, देवासमध्ये मी यांच्या कितीतरी मैफली ऐकल्या आहेत.

पुढे माझं काम बघून रांगणेकरांनी एकदा विचारलं, 'मी 'नाट्यनिकेतन' ही संस्था सुरू करतोय. तू आमच्याकडे काम करशील का? तुला मुंबईत यावं लागेल.' हा माझ्यापुढे खूप मोठा पेच होता; कारण मुंबईत आमचं कोणीच नव्हतं. माझे यजमान गोविंद धर्माधिकारी इंदूरला रेल्वेत नोकरीला होते. संसाराचा व्याप वाढला होता. मी तीन मुलींची आई झाले होते. अखेर विचाराअंती नम्रपणे नकार दिला. त्यानंतर एकदा घडलेला प्रसंग. शिवाजी मंदिरामध्ये आमचा 'फुलाला सुगंध मातीचा' या नाटकाचा दुपारी प्रयोग होता आणि त्यानंतर लगेचच पुलंचं 'वाऱ्यावरची वरात' होतं. नाट्यगृहाच्या जिन्यात आमची भेट झाली. मला म्हणाले, 'एक लक्षात ठेव. रांगणेकरांकडे एकदा काम केलेला मनुष्य नंतर कधी मागे वळून पाहत नाही. उदाहरणार्थ, पु. ल. देशपांडे, प्रभाकर पणशीकर आणि आता सुमन धर्माधिकारी.' ही माझ्यासाठी खूप मोठी दाद होती.

त्यानंतर खरंच तसं झालं. मी सुमारे पाच-सहा नाट्यसंस्थांसाठी काम करू लागले. 'प्रीती परी तुजवरती'सारखी नाटकं खूप गाजली. अभिनेत्री म्हणून मला नाव मिळू लागलं. या प्रवासात मी भाईंचा वाढदिवस कधीच चुकवला नाही. प्रत्येक वाढदिवसाला त्यांच्या घरी जाऊन नमस्कार करायचे आणि फूल द्यायचे. भाईंचं 'तुज आहे तुजपाशी' हे नाटक मी हिंदीत केलं. त्याचं लेखन राहुल बारपुते यांनी केलं होतं. त्यावरही भाई खूष होते. १९७२मध्ये मी 'घार हिंडते आकाशी' या रंगनाथ कुलकर्णी लिखित नाटकाचे एकपात्री प्रयोग सुरू केले. तेव्हाची एक आठवण आहे. भाईंना फोन केला आणि सांगितलं, 'मी एकपात्री प्रयोग करते आहे. तुमचे आशीर्वाद हवे आहे.' मला म्हणाले, 'आता हे खूळ कुठून आलं तुझ्या डोक्यात. तू आताच्या आता माझ्या घरी ये.' तेव्हा ते मुंबईला 'मॉडेल हाउस'मध्ये राहायचे. आम्हीदेखील मुंबईत राहू लागलो होतो. मी तडक त्यांच्या घरी गेले. ते म्हणाले, 'मला पूर्ण नाटक म्हणून दाखव.' मी पूर्ण नाटक म्हणून दाखवलं. त्या नाटकाच्या दुसऱ्या अंकात एक गाणं आहे. तेही मी गुणगुणलं. आजही ते आठवताना भरून येतं, की माझं गाणं ऐकताना भाईंच्या दोन्ही डोळ्यांत अश्रू होते. माझ्या साठ वर्षांच्या नाटकाच्या कारकीर्दीतील हा अमूल्य ठेवा आहे. संपूर्ण नाटक ऐकल्यावर मला विचारलं, 'या गाण्याला चाल कोणी लावली?' 'मीच,' असं सांगितल्यावर तर त्यांना खूप आनंद झाला. पुढे 'घार हिंडते आकाशी'चे हजारो प्रयोग झाले. प्रेक्षकांनी ते नाटक उचलून धरलं.

भाईंकडे मी कधीही हक्काने जाऊ शकत होते. दर वेळी काहीतरी खाद्यपदार्थ करून मी घेऊन जायचे. भाई, सुनीताबाई अगदी आनंदाने त्याचा आस्वाद घ्यायचे. अनेकदा सुनीताबाई गमतीने विचारायच्या, 'मी घेतलं तर चालेल ना?' सुनीताबाईंचा आणि माझा स्नेह शब्दांत सांगता येणार नाही. भाईंच्या शेवटच्या क्षणी मी रुग्णालयात त्यांच्या भेटीला गेले होते. ते आय.सी.यू.मध्ये असल्यानं बाहेरून भेटले. मी म्हणाले, 'माझ्या देवा माझ्याकडे लक्ष ठेवा.' भाई सर्वांना सोडून निघून गेले, त्यानंतर काही दिवसांनी आम्ही 'अंमलदार'चा प्रयोग केला. त्याची रॉयल्टी द्यायला मी भाईंच्या घरी गेले. सुनीताबाईंनी दार उघडलं आणि त्या म्हणाल्या, 'सुमन आज तुझा भाई नाही गं तुझ्या स्वागताला...' यानंतर किती तरी वेळ त्या मला मिठीत घेऊन रडत होत्या. मी त्यांना जे सांगितलं, तेच आजही सांगते, 'भाई तुम्ही कुठे गेला नाहीत. इथेच तर आहात.'

(शब्दांकन : मयूर भावे)
महाराष्ट्र टाइम्स
Feb 10, 2019

1 प्रतिक्रिया:

Mukund said...

फोटो शब्दा पेक्षाही बोलका !!!