Wednesday, November 20, 2019

माझ्या आठवणीतले पु.ल.

पु.लं. बद्दल काही लिहायचं, म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. श्री रामा ला ते जमलं कारण ते एक अवतार होते, पण आमच्या सारख्याला ते कसं जमायचं, कारण आमचा अवतार पाहाल, तर अगदीच अवतार आहे. तरी देखील, पु.लं नी जे काही दिलं आहे, माझ्या आणि माझ्या सारख्या अनेकांच्या 'आयुष्यात' जे सुख आणि आनंदाचे क्षण दिले आहेत, त्या प्रती क्रुतज्ञता म्हणून हा सगळा खटाटोप. (इथे मुद्दामहून 'जीवनात' हा शब्द टाळला आहे, कारण सखाराम गटणे मध्ये पु. लं.नीच, त्यांना जीवन वगैरे शब्दांची भीती वाटते असे म्हटलं आहे) तसं पाहायला गेलं तर, पु.लं. नी जो काही आनंद दिला आहे, त्याला शब्दात मांडणं कठीण आहे. तरी सुद्धा, अनेक वर्षं मनात दाटून राहिलेल्या भावना व्यक्त कराव्यात असं सारखं वाटत होतं, आणि व्यक्त होत राहणे हा तर आपला स्थायी भाव आहे, म्हणून केलेला हा एक छोटासा प्रयत्न. एवढं असूनही, लेख चांगला असेलच याची शास्वती नाही, तरी सगळ्यांनी हा लेख गोड मानून घ्यावा ही विनंती.

तर...

पु.लं ची आणि माझी पहिली ओळख, दूरदर्शन वरील त्यांच्या 'निवडक पु.लं' या मालिकेतून झाली. मला पहिल्या पासूनच वाचनाची आवड होती, शाळेत सुद्धा, भाषा व इतिहास हे गद्य विषय माझ्या खास आवडीचे. कॉलेजमध्ये आल्यानंतर, माझे अभ्यासक्रमाच्या बाहेरचे वाचन वाढले. कॉनव्हेंट मध्ये शिक्षण झाल्याने, सुरवातीला इंग्रजी पुस्तके वाचण्याकडे माझा कल होता, मग एके दिवशी बाबांनी सल्ला दिला, "इंग्रजी बरोबरच मराठी साहित्य सुद्धा वाचत जा". मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात त्यांचे आजीवन सभासदत्व होते, मग मी माझा मोर्चा तिकडे वळवला. मराठी साहित्याबद्दल फारशी माहिती नसल्याने, काय वाचावे, कोणत्या लेखकाचे पुस्तक घ्यावे हा एक प्रश्नच होता. परंतु, पु.लं. ची थोडीफार तोंड ओळख झाली असल्याने त्यांच्या पासूनच सुरुवात करावी असं ठरवलं. आणि मग सुरू झाला एक अतिशय आनंदाचा आणि सुखाचा प्रवास...
खोगीरभरती, ह'फ'सवणूक, नसती उठाठेव, व्यक्ती आणि वल्ली, अघळपघळ, उरलंसुरलं, खिल्ली, अशा अनेक पुस्तकांनी मनमुराद हसवलं. 'निवडक पु.ल.' पाहिले असल्याचा एक फायदा असा झाला, की मी ती सगळी पुस्तकं पु.लं. च्या आवाजात वाचू शकलो, म्हणजे, मनातल्या मनात वाचताना सुद्धा मला पु.लं. च आपल्याला वाचून दाखवताहेत असे वाटायचे. त्यांच्या त्या खास जागा, विशिष्ट पद्धतीने उच्चार करण्याची लकब, त्यांचे एकूणच अभिवाचन, अगदी सगळं सगळं मी अनुभवत होतो. त्यामुळे त्या वाचनाचा आनंद द्विगुणित झाला. त्यांचं निरीक्षण ईतके सूक्ष्म व विलक्षण असायचं आणि तितकंच लिखाण सजीव, की त्यांच्या पुस्तकातील अनेक प्रसंग, व्यक्तीरेखा, या खर्याखुर्या व जीवंत वाटायच्या, त्यातील अनेक प्रसंग आपण देखील अनुभवले आहेत व त्यातील अनेक व्यक्तीरेखा या आपल्या आयुष्यात सुद्धा आहेत असेच वाटायचं. किंबहुना ते बर्याचदा तसंच असायचं.

त्यांचा नामु परीट असो किंवा पेस्तनकाका, सखाराम गटणे असो किंवा भय्या नागपूरकर, सगळे आपले आपलेसे आणि ओळखीचे वाटायचे. हसवता हसवता मध्येच एकदम, चितळे मास्तर, अंतू बर्वा, हरी तात्या ही मंडळी अचानक काळजाला हात घालुन जायची आणि डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या व्हायचा. या मंडळींना देखील आपण कुणा ना कुणात, कुठे ना कुठे पाहिलेले असायचे. एसटी चा प्रवास करताना आपण देखील सुबक ठेंगणी पाहिलेली आहे, ईतकी चूकीची माहिती ईतक्या आत्मविश्वासाने सांगणारे मास्तर सुद्धा भेटले आहेत, झंप्या दामले असो वा मधु मलुश्टे, ऑरडरली साहेब असो वा पुढारी, उस्मान शेठ असो किंवा बगु नाना, ही मंडळी आपल्याला देखील ठाऊक आहेत. "कैसा पान लगाऊ साहेब" असं आपल्या पानवाल्याने विचारलं, तर त्याला सुद्धा "तूच का तो ब्रूटस" असं कित्येकदा आपल्याला देखील म्हणावसं वाटलंय, बाबांची पोष्टातील कामं करायला पोष्टात गेलो की आख्खं पोष्टीक जीवन डोळ्यासमोर ऊभं राहिलंय. आज देखील, कुणीही वीट आला असं म्हटलं, तर एका हातातील बाजारातील वीट आणि दुसऱ्या हातातील स्वतःच्या भट्टीतील वीट आठवते. आजकाल फेसबुक चा जमाना आहे म्हणून बरंय, नाहीतर घरी बोलावून कुणी फोटो दाखवायला बसवलं असतं, तर मात्र माझी आणि माझ्या शत्रुपक्षाची चांगलीच जुंपली असती. कुणाच्या घरी बोलणारा पोपट किंवा शेकहँड वगैरे करणारा कुत्रा दिसला, की पाळीव प्राणी आठवतं आणि ती वँक वँक करणारी सिंडरेला नामक चेटकी आठवल्या खेरीज राहत नाही. "महाराषट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्त पणाची भावना अधिक बळावली आहे" हे पु.लं. च वाक्य प्रत्येक मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरकराने खरं केलंय.

बटाट्याची चाळ आणि असामी असामी वाचल्यावर तर पु.लं बद्दल प्रेम अधिक की आदर असा प्रश्न पडतो. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दैनंदिन व्यवहारात, धकाधकीत इतकी गंमत दडली आहे, हे केवळ पु.लं. नीच जाणून दिलं. आपल्या मध्यम वर्गीय माणसाच्या अडीअडचणींंने भरलेल्या आयुष्याकडे, विनोद बुद्धीने पाहायला आणि त्यातील गंमती हुडकायला, पु.लं. नीच शिकवलं, आणि माझ्या मते हे त्यांनी आपल्याला दिलेलं सर्वात मोठं देणं आहे. चाळीतंच लहानाचा मोठा झाल्यामुळे, माझ्या सारखे अनेकजण, बटाट्याची चाळ अक्षरशः जगले आहेत. आमच्या चाळीत, सोकाजीनाना त्रिलोकेकर पासून ते समेळ काकांपर्यंत आणि अण्णा पावशे पासून ते बाबा बर्वयांपर्यंत सगळे नमुने आम्ही जवळून पाहिले आहेत. "त्या तिथे वसत असे चाळ बटाट्याची" यातील कळवळा आम्ही समजू शकतो. काळ बदलला तरी आजच्या काळातले आप्पा भिंगारडे, नानू सरंजामे, वगैरे मंडळी हापिसात भेटतातच. आपल्या घरी देखील आपला शंकर्या अथवा शरयू आपण किती फॉग आहोत अथवा टॉप्स आहोत ह्याची जाणीव करून देत असतात. जुन्या आणि नव्या पिढीतील चढाओढ अजूनही चालूच असते. "अंग किती गोरं आहे नाही" असं म्हटल्यावर आजदेखील आपली सौ डोळे वटारून "गोरं!!!" असाच प्रतिसाद देते. आता मुलांच्या शाळेत जाण्याचा योग आला की ओठांना ओठ न लावू देता (म्हणजे स्वतःचे) बोलणारी हेडमास्तरीण बाई भेटली की आपली ही अवस्था धोंडू भिकाजी जोशींच्या सारखीच होते. त्यामुळे मला असं वाटतं, की पु.ल. हे कालातीत साहित्यिक आहेत, त्यांचं साहित्य हे पिढ्यानपिढ्या साठी आहे आणि प्रत्येक पिढीला ते आपलं वाटतं, त्यांच्या आयुष्याशी सुद्धा ते समरस आहे, म्हणून तर बिगरी ते मँट्रीक हे प्रत्येकाला त्याच्या शाळेत घेऊन जातं, दामले गुरुजी, ड्रॉईंग चे मास्तर, संस्कृत चे गुरुजी, ईतिहास मधील वंशावळ्या, भूगोलातील वारे, भूमिती साठी वापरली जाणारी कंपास पेटी, करकटक वगैरेशी भेट घडवते.

हा "हसवण्याचा धंदा आपुला" करत असतानाच पु.लं. नी; आपुलकी, मैत्र, गणगोत सारख्या पुस्तकातून; बाल गंधर्व, वसंतराव देशपांडे, वसंत सबनीस, शरद तळवलकर, केसरबाई केरकर, खानोलकर ऊर्फ आरतीप्रभू,शाहू महाराज, वूडहाऊस, चिंतामणराव कोल्हटकर, बेगम अख्तर तसंच रावसाहेब सारख्या थोरामोठ्यांचे, जवळून दर्शन घडवले. जावे त्यांच्या देशा, पूर्वरंग सारख्या प्रवासवर्णनातून आपल्याला विविध देश फिरवले, तेथील संस्कृतीचे दर्शन घडवले. आयुष्याकडे, जगाकडे पाहण्याचा, माणसाकडे पाहण्याचा एक नवा द्रूष्टीकोण दिला.

असो, सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे, पु.लं. नी जो आनंद दिलाय तो शब्दात सांगणं कठीण आहे, त्यांच्या बद्दल कितीही लिहीलं तरी कमीच आहे. तेव्हा माझा हा लेख आटोपता घेतो आणि आपल्या सर्वांना अतोनात आनंद देणाऱ्या या आनंद यात्रीला शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल अभिनंदन करतो व असेच आम्हाला पिढ्यानपिढ्या हसवत आल्याबद्दल आभार मानतो.

हिमांशू हाते
https://www.facebook.com/himanshu.hate.9

0 प्रतिक्रिया: