Tuesday, April 21, 2020

पु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री ?

पुलस्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतून माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली


असं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे त्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष यंदा सुरू होत आहे. ८ नोव्हेंबर १९१९ साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य, त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलिकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज आणि माणुसकी कायमच दिसून आली.

'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व' असं लांबलचक बिरुद पुलंना अनेक वर्षांपासून चिकटलेलं होतं. किंवा असं म्हणणं जास्त योग्य होईल की मराठी भाषिकांनीच उत्स्फूर्तपणे त्यांना ही पदवी दिलेली होती. अर्थात जनतेने दिलेल्या या अनौपचारिक पदवीचं मोल सरकारी सन्मानांपेक्षा जास्त मोठं होतं. म्हणूनच तर ना. सी. फडके यांनीही पुलंना लिहिलेल्या पत्रात "सर्वांत अधिक लोकप्रिय साहित्यिक या किताबावर गेली कित्येक वर्ष तुम्ही अविवाद्य हक्क गाजवीत आला आहात" असं लिहून एकप्रकारे त्यांचा गौरवच केला होता. निरनिराळ्या वयोगटातील, व्यवसायातील, ग्रामीण, शहरी, देश, विदेश अशा सगळ्या ठिकाणी पुलंची लोकप्रियता व्यापून राहिली आहे. म्हणूनच तर पुलंना दररोज येणाऱ्या सरासरी २५ पत्रांमध्ये नुकतीच शाळेत अक्षर ओळख झालेल्या छोट्या मुलांपासून ते बालगंधर्वांचा काळ बघितलेल्या वृद्धांपर्यंत, प्लंबर किंवा पोस्टमनपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकांनी त्यांना पत्र पाठवली होती. यातल्याच एका पत्रात एका छोट्याने 'पुल आजोबा, हत्तीला शेपूट लावण्यात माझा पहिला नंबर आला!' असं सांगून पुलंबरोबर आजोबा नातवाचं नातं जोडलं होतं.

व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णनं, गद्य आणि पद्य विडंबन, ललित निबंध, बालवाङमय, भाषांतरीत साहित्य, वैचारिक वाङमय, नाटकं, एकांकिका, वक्तृत्व, संगीत, अभिवाचन, अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, सांस्कृतिक कार्य यांच्याबरोबरीने सामाजिक जाणीवेतून झालेलं दातृत्वाचं मुक्तांगण हे सगळे गुण फक्त एकाच व्यक्तीमध्ये ठासून भरलेले होते ते म्हणजे पु. ल. देशपांडे.

जगभरच्या अनेक देशांत
देशस्थ होऊन फिरले
पण मनातील मराठीपणा
कधी मावळला नाही -
दुनियेच्या बाजारपेठेत
मनमुराद वावरले
पण काळजातील बुद्ध
कधी काळजाला नाही


पुलंच असं वर्णन केलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी. पुलंसारखं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व फक्त एकाच लेखात बसवणं शक्य नाही. म्हणूनच पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या लेखनाचे विविध पैलू आपण यानंतरच्या भागांमधून बघणार आहोत. आपल्या ओळखीच्या पुलंची आणखी ओळख होईल. ज्यांना पुलं माहिती नाहीत त्यांनाही जाणून घेता येईल. पुलंच्या अनेक अनोळखी पैलूंची नव्याने ओळख होईल, प्रेम असेल ते आणखी डोळस होईल.

-आराधना जोशी
yashara@rediffmail.com

0 प्रतिक्रिया: