Friday, April 26, 2024

अभिनय साधना

सोलापूर येथील अभिनय साधना मंदिरातर्फे आयोजित पार्श्वनाथ आळतेकर स्मृतिदिनानिमित्त नोव्हेंबर १९६४ मध्ये पु.ल. देशपांडे यांनी केलेले भाषण.

रसिकहो,

अभिनयसाधना मंदिराने महाराष्ट्रातील एक निष्ठावंत नट पार्श्वनाथ आळतेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाषण करायला मला येथे बोलावून आळतेकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्याची संधी दिली याबद्दल मी मंदिराच्या कार्यकारी मंडळाचे मनःपूर्वक आभार मानतो. आळतेकरांचा आणि माझा अतिशय निकटचा परिचय होता. मराठी रंगभूमीवर मी ज्या काळात नाट्यकलेचे प्राथमिक धडे घेत होतो, त्या काळात मराठी रंगभूमीवर काही नवीन सुधारणा घडवून आणावी म्हणून जी मंडळी धडपडत होती अक्षरशः तनमन आणि धन – स्वतः चे – खर्च करीत होती त्यांत आळतेकरांचं स्थान हे अतिशय मोठं होतं. त्या माणसाच्या रंगभूमीविषयक निष्ठा अलौकिक होत्या. व्यावहारिक अर्थाने हा एक वेडा माणूस होता. नाटक हे त्यांचं वेड होतं. वास्तविक ते स्वतः उत्तम नट होते मोठ्या तोलाचे दिग्दर्शक होते त्यांना – मानमान्यता होती, चित्रपटांतून अमाप पैसा मिळवण्याची संधी होती. परंतु हे सर्व बाजूला सारुन त्यांनी आजन्म नाट्यकलेच्या विद्यार्थ्याची भूमिका पत्करली. आध्यात्मिक भाषा वापरायची तर नाट्यसाधना करणारे ते एक साधक होते. साधकाचा मार्ग हा नेहमीच कष्टाचा असतो. अल्पसंतोषाचे आणि साधनेचे जमत नाही. उपासना ही नेहमी दृढ चालवावी लागते. स्वतःचे आयुष्य ही एक प्रयोगशाळा करावी लागते. ह्या नाट्यकलेच्या संशोधकाने हे व्रत आजन्म पाळले. तुच्छता-निंदा पराजय- उपहास ही दूषण भूषणासारखी अंगाखांद्यावर वागवली. असल्या ह्या थोर मनाच्या कलासाधकाच्या स्मृतीला अत्यंत नम्र अभिवादन करुन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो –

माझ्या भाषणाचा विषय “अभिनयसाधना” असा आहे. डॉ. दिवाडकरांनी मला विषय विचारला आणि मी ‘अभिनयसाधना’ हा विषय सांगितला. पण ज्या क्षणी सांगितला त्या क्षणापासून आतापर्यंत मी विलक्षण अस्वस्थ झालो आहे. जेव्हा मी त्यांना म्हणलं की मी ‘अभिनयसाधना’ ह्या विषयासंबंधी बोलेन, त्यावेळी मी काय भयंकर आपत्ती स्वतःवर ओढवून घेतली आहे याची मला कल्पना नव्हती. अभिनय कसा करावा हे शिकवणं – अभिनय करण्यापेक्षा सहस्रपट कठीण आहे याची मला कल्पना नव्हती. यापूर्वी कधीही मी हे गुह्यतम शास्त्र समजावून सांगण्याचा आव आणला नव्हता. एका गाफील क्षणाला कबूल करुन गेलो आणि आता जंगलात वाट चुकलेल्या मुशाफिरासारखा त्यातून हिंडतो आहे. आजही आपणापुढे तसाच हिंडणार आहे. नाट्यकलेच्या ह्या जंगलात निरनिराळी कातडी पांघरुन मी गेली वीस-पंचवीस वर्षं हिंडतो आहे. त्यामुळे त्यातली चार ओळखीची स्थळ मी आपल्याला दाखवीन यापरते जास्त काही माझ्या हातून होईल असे मला वाटत नाही. हा सगळा कलेचा मामलाच मुळी शोध घेण्याचा आहे.

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकारामबुवांनी आध्यात्मिक अर्थानं म्हटलं. कलात्मक जीवनातदेखील असंख्य आघाड्यांवर हे युद्ध चालू आहे. इथे स्वस्थतेला वाव नाही. त्यातून एखादा गुरु फारतर बोटाला धरुन ह्या जंगलातल्या दोन-चार वाटा दाखविल. पुढला सारा रस्ता आपला आपण शोधून काढायचा आहे. उस्तादजी आपल्या शिष्याला सांगेल, बेटा, हा त्रिताल आहे. ही यमन रागातील ‘येरी आली पियाबिन’ ही चीज आहे. हे ह्या रागाचं स्वरुप आहे. हा त्रितालाचा स्वभाव आहे. ही सम आणि हा काल. थोडी आलापी थोडी तान दाखवेल तिथून पुढे मात्र तो त्रिताल – आणि बोलतान तो यमन – ती येरी आली पियाबिन आणि त्या जाणत्या अजाणत्या श्रोत्यांपुढे बसलेले तुम्ही ! इंग्रजीत एक म्हण आहे की घोड्याला पाण्यापर्यंत तुम्ही नेऊ शकता, पण प्यायला लावू शकत नाही. अभिनयकलेचे तेच आहे नव्हे, कुठल्याही कलेचे तेच आहे. माझ्या ड्रॉइंग मास्तरांनी माझ्यापुढे हात टेकले पण मला कधी एक सरळ ओळ काढता आली नाही. पण पेटीवर मात्र बोटं पडली ती प्रेमात पडल्यासारखीच पडली. रंगांच्या पेटीवर प्रेम जमलं नाही- सुरांच्या पेटीवर जमलं ! आता वर्षावर्षात हात लागत नाही तरी रुसली नाही ती माझ्यावर. आमचा संगीत संसार दृष्ट लागण्यासारखा नसेल झाला, पण धरली संगत सुटली नाही !

कुठलीही कला यायला आधी तिच्या प्रेमात पडावं लागत आणि प्रेमात जस पुस्तक वाचून पडता येत नाही क्रमांक सहा, पोटकलम दोन बरहुकूम काही गालावरचे बदलते भाव आणि डोळ्यांतली सूक्ष्म हालचाल होत नाही त्याचप्रमाणे कलेचे प्रेमदेखील जडणे हा माझ्या दृष्टीने तरी योगायोगाचा भाग आहे. माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही – पण माणूस शिकून फारतर वकील किंवा दिवाडकरांची हरकत नसेल तर मी म्हणेन डॉक्टर होईल. पण मुळातच योग असल्याशिवाय तो खरा कलावंत होणार नाही. अर्थात उपजत ह्याचा अर्थ बालपणीच ते देणे घेऊन येईल असेही नाही. कदाचित राजापूरच्या गंगेसारखा तो झरा एकदम प्रकट होईल. पण तो कुठेतरी गुप्त असावाच लागतो. तेव्हा अभिनयसाधना कधी करावी ह्याचा काही गुरुमंत्र मी सांगणार आहे अशी आधी कृपा करुन कल्पना करुन घेऊ नका. कलेवर मुख्य म्हणजे उपजत प्रेम असावे लागते. (आणि मी ‘प्रेम’ हा शब्द प्रेमाच्या सर्वांत उदात्त अर्थाने वापरतो. खऱ्या प्रेमाविषयी बोलताना खाडिलकरांनी म्हटलं आहे की ‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनीं!’ असं हे लोभरहित निर्मळ – नितांत प्रेम हवं ! प्रेयसीला भेटायचा संकेत ठरला म्हणजे प्रियकर कसा मोहरुन आलेला असतो तशी नाटकाची तारीख ठरली म्हणजे लग्नाची तिथी ठरल्यासारखे जे तहानभूक विसरु शकतात आपली सामाजिक – प्रतिष्ठा, इतर कामधंदा, उशिरा येण्याबद्दल लग्नाच्या बायकोचं बोलणं कानावर घेत नाहीत, अंगात ताप असताना तालमींना उभे राहतात ज्यांना तालमींना आणण्यासाठी दिवाडकरांसारख्या नाट्यवेड्यांना गाड्या घेऊन जावं लागत नाही आज नाही आलो किंवा आले तर चालणार नाही का असला आचरट प्रश्न जे विचारीत नाहीत त्यांनीच ह्या नाटकाच्या क्षेत्रात यावे. हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे ! तुम्हाला अभिनयाची साधना करायची आहे ना ? मग ती समस्तांची लज्जा त्यजुनि केलेल्या भगवच्चिंतनासारखी करता येणार आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि ह्या फंदात पडा ! नाट्यकलेवर आपण प्रेम करतो आहो का उगीच एखाद्या उनाड माणसासारखी तिच्याशी लगट करतो आहो हा प्रश्न स्वतः च्या मनाला विचारा आणि मग तोंडाला रंग लावा. नारायणराव बालगंधर्वांचा एकुलता एक मुलगा वारला त्या दिवशीदेखील त्यांनी नाटक बंद ठेवलं नाही. कलावंताला केवळ आपला विचार करुन नाही भागत. ही आमची वैयक्तिक दुःखं कलावंत म्हणून आमची जी सामाजिक जबाबदारी आहे. त्याच्या आड येऊन नाही चालणार ! इंग्रजीत म्हण आहे – The show must go on !!

नाटकापासून आपल्याला परावृत्त करावं म्हणून नाही मी हे सांगत. नाट्यकलेची कलावंताकडून मागणी किती मोठी आहे हे कळावं म्हणून सांगतो. प्रियकराला भेटायला जाणारी प्रेयसी जशी रात्र असो की दिवस असो की पर्जन्याची वृष्टी असो, की “भीति तयाची मजला नाही प्रियासी रमवाया जाऊ म्हणणारी उत्कंठित प्रेयसी आणि तिसऱ्या घंटेची उत्सुकतेने वाट पाहणारा नट किंवा नटी सारखीच! हे प्रेम केवळ व्यावसायिक नटालाच हवे नि अव्यावसायिक नटाला असण्याची जरुरी नाही हा भ्रम मात्र खोटा आहे. (प्रत्येक नट हा amateur च असावा लागतो. amateur याचा मूळ अर्थ Lover – प्रेमिक – असा आहे. कला ही त्याची प्रेयसी आहे. व्यावसायिक नटाचा संसार ती उभा करीत असेल ही तिच्यावरची स्वतंत्र जोखीम आहे.

नाट्यकलेविषयीचे अव्यभिचारी प्रेम ही नट होण्याला असलेली पहिली अट आहे. ते प्रेम त्या कलेवर हवे स्वतः वर – नव्हे ! एम्. ए. असूनदेखील नाटकात काम करतात किंवा रेडिओवर गातात ह्या वाक्याला कलेच्या क्षेत्रात काही अर्थ नाही ! ‘त्या दृष्टीने बघा म्हणजे झालं’ ही तडजोड कलेला मान्य नाही. कलेक्टरची बायको आहे किंवा मिनिस्टरचा मुलगा आहे म्हणून त्याच्यासाठी त्रितालाच्या मात्रा सोळाऐवजी सतरा-अठरा चालतील हा हिशोब कलेच्या क्षेत्रात मंजूर नाही. कलेक्टरची बायको असो की कमिशनरची सून असो, तालाला चुकली म्हणजे चुकली ! कलावंत म्हणून तिची किंमत शून्य ! अभिनयाच्या क्षेत्रात तेच आहे. थोडक्यात म्हणजे Stanislavesky ने सांगितल्याप्रमाणे Love the art in yourself and not yourself in art For this leads to success in our work!

(भुमिकेशी तादात्म्य वगैरे फार पुढल्या गोष्टी आहेत. प्रथम नाटक करण्याची जी जबाबदारी आपण अंगावर घेतली आहे त्या जबाबदारीशी आपण एकरुप होणार आहोत की नाही ह्याचा विचार आधी करावा आणि मग नाटकात काम करायला उभे राहावे. कलेवरच्या प्रेमापेक्षा हे स्वतःवरचं प्रेम इतकं जबरदस्त असतं की आपलं सौंदर्य बिघडता कामा नये म्हणून दळायला बसलेली सिंधूदेखील मी चांगली जॉर्जेटची साडी नेसून पोज घेऊन दळताना पाहिली आहे आपल्या संगीतविषयक ज्ञानाच्या चुकीच्या कल्पनांनी गाण्याची टाळी घ्यावी म्हणून गाण्यातली भावना न घेता गळ्याची गिरकी फिरवणारे नट मी पाहिले आहेत. आश्विनशेटजीचं काम करायला उभे राहिलेले एक बुवा रेवतीचा हात हातात घ्यायला बिचकले आणि ‘कर हा करी’ हे गाणं तिच्या बोटाच्या नखांना स्पर्श करुन टुणकन् दूर उभे राहून म्हणाले. स्वतःचं चारित्र्य धुतलेल्या तांदळासारखं आहे हे त्यांना त्यावेळी आठवलं !

नाटकाच्या कलेत हा ताप मोठा आहे. अभिनयकला म्हणजे परकाया प्रवेशाची कला. स्वतःचं कलात्मक व्यक्तिमत्त्व नाटककाराने कागदावर उतरवलेल्या पात्रात विसर्जित करायचं आणि लोकांची त्याबद्दल तंतोतंत खात्री पटवून द्यायची हे त्याचं काम आहे. आणि हे विसर्जन करीत असताना स्वतःची शुद्ध मात्र शाबूत ठेवायची ! भूमिकेशी तन्मय होणे याचा अर्थ तन्मय झालो आहोत असे प्रेक्षकांना भासवणे. हुकमी रडणे – हुकमी हसणे हुकमी चिडणे – हुकमी रुसणे आणि ह्या क्रिया चालू असताना ते हुकूम कसे सुटताहेत याची प्रेक्षकाला लवमात्र शंका न येऊ देणे हे ‘ते’ काम आहे. त्यासाठी आवाजाची किंवा एकूणच शरीराची तयारी लागते. पण त्याहूनही मनाची लागते.]

गवई मनसोक्त गाऊ शकतो. त्याचा तो मालक असतो. लय-रागाची बंधने पाळली की पुढे तो स्वतःचा बादशहा, नट मात्र दिल्या रिंगणातच चालला पाहिजे. इथे दुसऱ्या एका व्यक्तिमत्त्वाशी तल्लीन व्हावे लागते – आणि ते होताना केवळ स्वतः तल्लीन होऊन चालत नाही, जोडीचे इतर कलावंतही तल्लीन हवेत. नाटक हे एक वृंदवादन आहे. एक वाद्य बेसूर झाले तरी सगळा ऑर्केस्टा बिघडला. ही तल्लीनता साऱ्या संचाची आहे. माझी वाक्ये म्हणून झाली की आता मी सुखाने मरतो म्हणणाऱ्या बाजीप्रभु देशपांड्यासारखे त्या देखाव्यातून निवृत्त होऊन चालत नाही. तालमीत आणि प्रयोगात हजारदा ऐकलेली वाक्ये त्याच उत्सुकतेने ऐकावी लागतात. सिंधूचे काम करताना बालगंधर्वांनी गणपतराव बोडसांकडून हजारदा ऐकलं असेल की “सिंधू, आजपासून मी दारू सोडली. – ह्या वाक्यावर त्या सिंधूलाही कालच्या प्रयोगात सांगितलं होतंत मला हे, हे दर्शवणारी एवढीशी सुरकुतीसुद्धा चालणार नाही. रोज नव्या उमाळ्याने – “खरं का, अस झाल असेल तर देवच पावला, अमृतेश्वराला लक्ष वाती लावीन.” ही सारी वाक्ये म्हणावी लागतात. आपला तो अनपेक्षित आनंद प्रेक्षकांकडे त्याच उत्कटतेने पोहोचवावा लागतो. प्रेक्षकांच्या अस्तित्वाची उघड दखल न घेता प्रेक्षकांपर्यंत शब्दांच्या हालचालीच्या नव्हे, पुष्कळदा निश्चलपणाने निःस्तब्धपणाने त्या भावना कलात्मक रीतीने संक्रांत करण्याची क्रिया म्हणजे अभिनय । एरवी आपण आयुष्यात अभिनय करतोच की ! तो काही शिकायला जात नाही. पण अभिनय जेव्हा कलात्मक आनंदासाठी करायचा असतो त्यावेळी तो आनंद प्रेक्षकांच्या अंतःकरणात निर्माण करण्याची कला आणि शास्त्र शिकावे लागते. आता मी भाषणासाठी त्या दारातून इथे नुसता आलो. पण स्टेजवर मी ज्यावेळी येतो त्यावेळी entry घ्यावी लागते. मी आलो आहे हे सगळ्यांना कळावं लागतं. माझं पाहणं चालणं – येऊन बसणं आणि बोलणं ह्याला त्या नाटकातले काही संदर्भ असतात. काही नवे संदर्भ तयार होत असतात. भावबंधनातली लतिका ज्यावेळी तो परमेश्वर मला कुठल्या स्वरुपात दर्शन देणार आहे म्हणते त्यानंतर घनश्याम येतो. त्या येण्यामागे एक अखंड साखळी आहे.” राज्यकर्ते ते राज्यकर्ते आणि दास ते दास म्हणणारा कीचक येतो. तो एक उन्मत्त परंपरा सोबत घेऊन येतो. हे नाटकातले येणे आणि जाणेच काय, पण तिथले पडदा वर जाऊन खाली पडेपर्यंत नुसते असणे ह्यालादेखील काही साधना करावी लागते. काही विचार करावा लागतो. रंगभूमीवर निरर्थक असे काही करण्याला वावच नाही. रंगमंचावरची ही पोकळी म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड आहे. प्रत्येक पात्र मग ते लहान असो वा मोठे – ते डिस्टर्ब करून नवी नवी आकर्षणे निर्माण करीत असते. ही आकर्षणे जितकी कलात्मक तितका प्रेक्षक अधिक खेचला जातो. ह्याचा अर्थ रंगभूमीवरच्या प्रत्येक पात्राने सारखे काहीतरी करीतच राहिले पाहिजे असे नव्हे. किंबहुना कित्येकदा काही न करण्यातून फार मोठा अर्थ व्यक्त होतो. नाहीतर काही माणसे अकारण अॅक्टिंग करतात हे आपण पाहिले असेल. वृंदवादनात प्रत्येक वाद्य वाजलेच पाहिजे असे नाही. पण आपली पाळी केव्हा येईल याविषयी सावधान पाहिजे. सगळ्या पात्रांना रंगभूमीवर असे जिवंत ठेवायचे ही तर नाटककाराची फार मोठी किमया आहे. दुसऱ्या पात्रांची आपण योग्य रीतीने दखल घेऊन आणि त्यांना दखल द्यायची तिथे देऊन नाटक फुलवणे हे तर प्रत्येक नटाचे कर्तव्य आहे. संगीत नाटकातदेखील नाटक थांबवून तानांची भेंडोळी सोडणाऱ्या नटाला कोणी मानले नाही. तिथेही संयम हवाच ! दहा-दहा आणि बारा- बारा वन्समोअर घेणे हे काही फारसे शहाणपणाचे लक्षण नाही. प्रेक्षकांना आवडले म्हणून आप्पलपोटेपणाने आपण स्वतःच नाटक खाऊन जाणे हे चांगल्या कलावंताचे लक्षण नव्हे. गाताना दुसरे पात्र समोर असले तर त्याच्या अस्तित्वाची दखल घेऊन नाटकातले गाणे नटवणारे नट हे फार मोठे अभिनयपटूही होते. नारायणरावांची जी गाणी फक्त ते एकटे असताना म्हणायची असत ती ते तज्येतीने गात. एरवी आवश्यक तेवढेच आणि सार्धं गात असत ! म्हणजेच नाटककाराला काय म्हणायचे आहे ते म्हणून दाखवणे एवढेच नटाचे कार्य आहे असा मात्र गैरसमज करुन घेऊ नका. नाटकात काम करण्याच्या तीन महत्त्वाच्या पद्धती सांगितल्या आहेत.

एक: नाटककाराचे म्हणणे सरळ प्रेक्षकाला समजावून सांगणे.

दुसरे आपली वाक्ये झाली की संपले. आपण गाऊन 8 घेतले की झाले. बाकी नाटकात इतर पात्रे आहेत याची दखल न घेणे. एका महान नटाला मी भाऊबंदकीत राघोबादादाचं काम करताना पाहिलयं. रामशास्त्र्यांनी देहान्त प्रायश्चित्त सांगितले त्यावेळी हे नटवर्य आपल्या धोतराची किनार पाहत होते. हे म्हणजे Loving oneself in art पैकी.

तिसरे म्हणजे स्वतः आणि इतर सर्व नट यांनी मिळून उभी करायची ही कला आहे याची जाणीव ठेवून अभिनय करणारे नट !

ह्यांतला पहिला प्रकार आपली भाषणे चोख म्हणून नाटककाराचा मतलब सांगणाऱ्या नटांचा ! आपण असली नाटकं पाहिली असतील. सगळे नट चांगले असे फूटलाइटसमोर येऊन नाटक रांगेत उभे राहून करतात. विशेषतः कव्हरवरच्या scene मध्ये बोलणारे आश्विनशेट, वैशाखशेट वगैरे. आश्विनशेटही सरळ समोर बघतो, वैशाखशेटही बघतो. ते दोघे एकमेकांशी बोलताहेत हे आपण समजायचे ! लोकांना नाटक मास्तरांनी शुद्धलेखन घालावं तसं समजावून देतात. स्पष्ट वाणी ! ढोबळ अभिनय ! अधिक स्पष्ट करताना गोंधळ, स्वगत भाषणदेखील सरळ प्रेक्षकांना उद्देशून बोलायचं नसतं ! वृंदावन जेव्हा म्हणतो की हिच्याकडे पाहिलं म्हणजे पूर्वजन्मावर विश्वास ठेवावासा वाटू लागतो. तो काही तुम्हाला निरोप पोहोचवीत नसतो. ते एक प्रकट चिंतन आहे. ‘स्वगत’ ही एक अभिनयाचा अत्यंत कलात्मक आविष्कार करण्याची संधी असते. ती काही एका माणसाने थिएटरात पिटलेली दवंडी नव्हे ! ‘सृष्टीची उलथापालथ तर झाली नाही ना ? मुंग्यांनी मेरु पर्वत तर गिळला नाही ना ?’ हे काय ‘नाही संभाजी महाराज, सृष्टीचं ठीक आहे. मुंग्या मेरु पर्वतापर्यंत नाही पोहोचल्या’ असं उत्तर तुमच्याकडून यावं म्हणून विचारलेले प्रश्न नाहीत. विचारांच्या गुहेत तुम्हाला नेलेलं असतं. तुम्ही तिथे आला आहात ह्याची दखल त्या गुहेच्या मालकानं घ्यायची नसते. तुम्ही त्याला उघडपणे द्यायची नसते ! स्वगत भाषण म्हणजे वसंत व्याख्यानमालेतलं व्याख्यान नव्हे ! उत्तम स्वगतं ही तर ख्यालासारखी असतात. शेक्सपिअरसारख्या नाटककारांनी स्वगतांतून चमत्कार करुन दाखवले आहेत. गडकऱ्यांची शिवांगी, ‘राया राजसा हट्ट हट्ट तरी किती करायचा !’ ही soliloquy म्हणायला लागली की गद्यातली ठुमरी चालली आहे, असं वाटलं पाहिजे. एखाद्या नर्तिकेसारखी अदाकारी करण्याचं तिथे सामर्थ्य लागतं ! स्वगत हे नाटकाला काव्याच्या जवळ घेऊन जातं ! मध्यंतरी स्वगतं कृत्रिम असतात वगैरे चुकीचे विचार येऊन गेले. कारण पुष्कळ नटांनी स्वगत व्याख्यानासारखी म्हटली. स्वगत म्हणणाराची दृष्टी ही समोरचे दिसून न दिसणाराची असावी लागते. बोलत आहे ते अंतर्मन याची जाणीव करुन द्यावी लागते. त्याला फार मोठं अभिनयाचं सामर्थ्य लागतं ! केवळ स्वगतातच काय पण सगळ्या नाटकातच वाक्यं पिटापर्यंत फेकणारे नट ही चूक करतात. संवाद सगळ्यांना ऐकू गेले पाहिजेत हे खरं. म्हणजे काय रंगभूमीवरुन संवादाचे हाके घालायचे की काय ? समर्थ नट प्रेक्षकांचे कान आपल्यापर्यंत ओढतो त्यांच्या कानठळ्या नाही बसवीत ! पण असे डायरेक्ट – मेथडवाले काही नट असतात.

दुसरा प्रकार आहे तो मात्र रंगभूमीवरच्या गुन्हेगारांचा ! फक्त आपल्यासाठी लोक तिकीट काढून आले आहेत असं समजणाऱ्या नटवर्यांचा ! रंगभूमीवरची मधली जागा अडवून धरणारांचा. ह्यांना प्रिय असते ती एकच गोष्ट म्हणजे ते स्वतः ! दुसऱ्यांचे संवाद ऐकण्याची देखील हे नट तसदी घेत नाहीत. मी ज्यावेळी नट म्हणतो त्यावेळी नटीही अभिप्रेत आहे हे ध्यानात ठेवा. मी मराठी रंगभूमीवर चांगलं नाव मिळवलेले नट पाहिले आहेत. त्यांना देखील नाटक हा एक सांघिक कार्यक्रम आहे याची जाणीवच नसते. प्रेक्षकांचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करुन घेण्याकडे त्यांचा ओढा असतो. ह्या प्रकारात गाणारे नट फार आहेत.. आपल्या क्रिकेटच्या टीममध्ये जसं बोलर म्हणजे वाईट बॅटस्मन असला पाहिजे किंवा चांगला बॅटस्मन असला तर फील्डिंगची जबाबदारी त्याची नाही अशी एक समजूत आहे. त्याचप्रमाणे ह्या गाणाऱ्या नटांची अवस्था असते. बालगंधर्वांसारखे सन्माननीय अपवाद सोडा पण बाकीच्या गाणाऱ्या नटांपैकी पुष्कळांनी अभिनय ह्या गोष्टीशी आपला संबंध न ठेवण्यातच भूषण मानले आणि आजही मानताना दिसतात. ज्याला अभिनयाचं अंग नाही तो कधीही उत्तम नाट्यसंगीत गाऊ शकणार नाही ! नाट्यसंगीत ही काही केवळ गळ्याची करामत दाखवण्याची कला नव्हे ! नारायणराव बालगंधर्वांना तर सगळीच देणगी होती पण बापूराव पेंढारकरांसारखा नट आवाजाची त्या अर्थाने देणगी नसूनही अभिनयामुळे आपले गाणे परिणामकारक करीत असे. मी आजकालचे उदाहरण देतो. चित्रपटसंगीत हा नाट्यमय संगीताचाच प्रकार आहे. लता किंवा आशाच्या फिल्मी गाण्यांत त्या ज्यांना प्लेबॅक देतात त्या नटींपेक्षा जास्त सुरेख वाचिक अभिनय असतो. ह्या मुली नुसत्याच सुरेल नाहीत, तर नाट्याला आवश्यक असलेला अभिनय सुरेल शब्दांतून दाखवण्याचं सामर्थ्य त्यांच्या गळ्यात नव्हे, त्यांच्या अंतःकरणात आहे. मी अंतः करण हा शब्द मुद्दाम वापरतो कारण अभिनयाचा डोक्याइतकाच नव्हे, काहीसा अधिक संबंध अंतःकरणाशी आहे. नाटकातले संवाद भावनेने जाणवून घ्यायचे असतात. तरच त्या संवादांना ओलावा येतो. एखाद्या कोरड्या मनाच्या माणसाचे काम करताना देखील भावनेने ते कोरडेपण दाखवता यावे लागते ! आणि शेवटी नाटक हे प्रेक्षकांसाठी असले तरी प्रेक्षकांच्या अस्तित्वाची दखल घेतल्याचे न दिसता करावे लागते. तिथे दखल घ्यायची असते ती जोडीच्या पात्रांची । कारण नाटक हा त्यातल्या पात्रांच्या सुखदुःखाच्या भावनांचा गोफ विणण्याचा खेळ आहे. म्हणून नाटक हे निवेदन नसून संवादांतून फुललेले एक ‘स्नेहसंमेलन’ आहे ! मूलतः ते निरनिराळ्या पात्रांनी एकत्र येऊन करण्यासाठीच लिहिलेले असते. ते कथन नव्हे तर कथेचे माणसांकरवी केलेले प्रकटन आहे ! इतरांचे अस्तित्व विसरुन सारे काही स्वतःकडेच केंद्रित करुन काम करणारा नट हा माझ्या दृष्टीने नटच नव्हे ! हा रंगभूमीवर शिरलेला दरोडेखोर आहे. तो दुसऱ्यांची सामुदायिक मालकी न मानणारा गुन्हेगार आहे.

तिसरा आणि खरा अभिनयप्रकार म्हणजे नाटक ही संघकला आहे हे मानणारांचा. इथे मला नाटक हा वाङ्मयप्रकार अभिप्रेत आहे. कथाकथन किंवा मी करतो तसला बहुरुपी खेळ हा अभिनयाचा एक निराळा आविष्कार आहे. त्याविषयी मी आता बोलत नाही. पण एकाहून अधिक पात्रे ज्या नाटकात असतात तिथे करायचा अभिनय हा कसा करायचा ?

नाटक हे संवादांतून फुलतं. मला एकदा एका चांगल्या अनुभवी नटाचं पत्र आलं की तुमच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ ह्या नाटकात मला आचार्याची भूमिका करायची आहे, तरी मला ती समजावून द्यावी ! मी त्याला लिहिलं, तुम्ही माझं नाटक एकदा नीट वाचा. दोनदा वाचा. तीनदा वाचा. एक-दोनदा मोठ्याने वाचा. एवढं करुनही जर आचार्य म्हणजे काय कळत नसेल तर भूमिका करु नका ! एखाद्या नवख्या माणसानं हा प्रश्न विचारला असता तर मी समजू शकलो असतो. माणसं साक्षर असतात म्हणजे चांगलं वाचू शकतात असं नाही. हिरवे हिरवे गार गालिचे

हेही वाचन झालं आणि त्यातला नाद ओळखून वाचणं हेही वाचन झालं. पण एकाने अक्षरं वाचली, दुसऱ्याने अर्थ वाचला. तेव्हा मुख्य म्हणजे नाटकात काम करणाऱ्या माणसाला केवळ आपली वाक्यंच नव्हे तर सगळं नाटक अंतर्बाह्य ठाऊक असावं लागतं ] राघोबा काय आहे हे कळल्याशिवाय रामशास्त्र्यांच काम काय करणार ? मग जे डायरेक्टर नटांना वह्यांवर नाटकातली वाक्यं चिकटवून देतात. त्यांची अगदी धन्य वाटते ! मी एका गावात गेलो होतो. ओळख करुन दिली. एका गृहस्थांशी. ते त्या गावातले डायरेक्टर. ते म्हणाले, ‘वा वा, पु. ल. देशपांडे का ? वा ! गेल्या वर्षी आम्ही याचचं नाटक फाडलं होतं !’ नाटक फाडलं ? नाटक पाडलं हे मला कळू शकतं; पण फाडलं ? तर त्यांच्या गावात जत्रेला गावजेवण आणि नाटक घालतात आणि मग मुहूर्ताच्या कॉप्या फाडतात आणि डिंकानं वहीवर चिकटवतात, म्हणजे प्रत्येकाने आपापली वही पाठ करताना टचिंगचा शब्द म्हणायचा ! आता ‘कोठे जाणार’ म्हणण्याऐवजी ‘जाणार कोठे’ म्हटलं की थांबले. कारण वहीत टचिंग ‘जाणार’ हे दिलेलं !
म्हणजे ‘जाणार’ हा परवलीचा शब्द येईपर्यंत हे स्वस्थ ! सगळ्या होतकरू दिग्दर्शकांना माझी हात जोडून विनंती आहे की, नाटकांची पुस्तकं विकत घेण्यात काटकसर नका करू | एकदा नव्हे, चांगलं चार-पाच वेळा सगळ्या नटनटींपुढे ते संपूर्ण नाटक वाचा ! म्हणजे आपण काय करायला निघालो आहोत ते सर्वांना कळेल. संवाद म्हणजे त्यातले केवळ शब्द नव्हेत तर त्यातली विरामचिन्हे देखील ! नाटकातील शब्दांइतकीच स्थब्धता बोलकी असते आणि नटाचं पहिलं काम म्हणजे शब्दांवरची हुकमत आणि त्या शब्दांच्या मांडणीत सम, ताल, काल कुठे आहे ह्याची समजदारी ! अश्वारुढ बहाद्दरासारखं ज्याला शब्दारुढ होता येत नाही, स्वाराचं घोड्यावर असतं तसं शब्दांवर ज्याचं प्रेम नाही त्याने रंगभूमीच्या दिशेने नट म्हणूनच नाही तर प्रेक्षक म्हणूनसुद्धा येऊ नये ! कुस्त्या बघायला जावं !

‘शब्द’ हे नटाचं मुख्य भांडवल होय भांडवल, त्याचा सगळा धंदा त्या भांडवलावर चालतो म्हणूनच हे भांडवल फार जपून, काळजीपूर्वक, त्यातून अर्थाची योग्य प्राप्ती होईल अशा बेतानं वापरावं लागतं ! संवादलेखन हे काव्यलेखनाइतकंच बिकट आहे. एखाद्या पात्राची भाषा खरी आहे की कागदी आहे हे पाच वाक्यांत जोखता येतं आणि कालच्या काय, आजच्या काय आणि उद्याच्या काय, कुठल्याही काळातल्या रंगभूमीवर नट म्हणून वावरायचं असेल तर ज्या भाषेतले आपण नट आहोत त्या भाषेवर मुख्य म्हणजे नितांत प्रेम हवं. भाषेची शुद्धचं काय पण अशुद्ध रूपदेखील पूर्ण परिचयाची हवीत. रंगभूमीवर अशुद्ध बोलायलादेखील वाणी तयार असावी लागते. जिभेवरुन फुटाण्यासारखे शब्द उडावे लागतात – सतारीची मींड घेताना जशी बोटाची हुकमत लागते तशी शब्दांची हुकमत हवी. संवाद सहजतेने आले पाहिजेत हे तर खरंच ! कलेचा श्रेष्ठपणा हा सहजतेतून तर सिद्ध होतोच, पण ही सहजता विलक्षण परिश्रमापोटी येते. अभिनयाचे वाचिक, आंगिक, कायिक वगैरे भेद करतात. मी ह्याच्याशी अजिबात सहमत नाही. आता बोलण्यातला अभिनय करा मग चालण्यातला करा मग पाहण्यातला करा ही शिकवण एकजात चूक आहे. इब्सेनने म्हटले आहे की माझ्या संवादांतला एक शब्द काढा – My drama will bleed. माझं नाटक रक्तबंबाळ होईल. अभिनय असा – निराळा नाही काढता येत. रंगभूमीवर उमटणारा शब्द हा साऱ्या अंगातून इष्ट सहचारी भाव घेऊनच उमटावा लागतो. जे बोलायचे ते नुसतेच बेंबीच्या देठापासून बोलायचे नसते, अंतःकरणापासून बोलायचे असते. वाणीचा शारीरिक दोष सुधारता येईल पण नाटकातले संवाद म्हणायचे म्हणजे काय निर्जीव पोपटपंची करायची आहे ? नाटक घडाघड पाठ हवं पण का ? तर ते शब्द हवे तेव्हा हव्या त्या स्वरांत बुचकळून काढायला हाताशी सज्ज हवेत म्हणून ! संवादाचा कार्यकारणभाव आधी उमगला पाहिजे. मग व्हॉइस कल्चर ! संवादाचा प्राण सापडला पाहिजे. ही पहिली अट.
मागाहून त्याची फेक. त्या वाक्याची चाल, डायरेक्टरनी सांगितलं तसं आम्ही केलं हे कदाचित शिस्तप्रियतेचं सर्टिफिकेट देऊन जाईल, पण कलेच्या प्रांतात नेऊन सोडणार नाही. मी एक वाक्य सांगतो. खाडिलकरांची द्रौपदी म्हणते : जा दुःशासनाला म्हणावं, द्रौपदी स्वतंत्र आहे ! द्रौपदी कुणाची दासी नाही. आता ह्या वाक्यातला प्राण कशात आहे हे ओळखायला- ‘व्हॉइस कल्चर’च्या जोडीला महाभारतात उभं केलेलं इंडियन कल्चर ठाऊक हवं! ही तेजस्विनी ते वाक्य कसं म्हणाली असेल त्याचं चित्र डोळ्यापुढे हवं. भूमिकेशी तादात्म्य म्हणतात ते ह्याला. मग त्यातून ते वाक्य नीट न्याहाळलं पाहिजे ! ह्या इथे जाणवून घेतलं पाहिजे. द्रौपदीचा त्वेष, तिचा अहंकार अत्यंत परिणामकारक रीतीने कसा प्रकट होईल ते शोधलं पाहिजे. म्हणजेच नाटकातले संवाद म्हणणारी व्यक्ती अंतर्बाह्य ओळखण्याचं जे साधन – संवाद – ते संवाद पाठ होऊन नाही उपयोगाचे. ते नटाच्या रक्तात भिनले पाहिजेत. त्यातल्या अर्थाचा प्राण आणि कानामात्रांनी नटलेलं अक्षरांच शरीर पचलं पाहिजे. म्हणजे मग ते वाक्य आवश्यक तोलामोलानं जातं. आता ह्या शब्दांच्या उच्चाराला लागणारी स्वरयंत्राची साधना, शारीरिक आरोग्य वगैरे उत्तम हवं. पण माझ्या दृष्टीने भाषेतल्या शब्दांच्या आत्म्याची आणि शरीराची उत्तम ओळख ही महत्त्वाची.

अभिनयसाधना ही केवळ शारीरिक कसरत नव्हे. नुसते संस्कृत श्लोक स्पष्ट म्हणून वाणी शुद्ध होत असेल, पण शुद्ध, स्पष्ट वगैरे शब्द फसवे आहेत. अभिनय ही काही यांत्रिक क्रिया नाही. ती कला आहे. नुसते स्पष्ट बोलणारे लोक काय कमी आहेत है खणखणीत आवाजाची माणसंही असतात. एखाद्या कल्हईवाल्याचा आवाज खूप खणखणीत असतो म्हणजे काय त्याला वृंदावनाची काम द्यायचं ? त्याउलट आवाजात दोष असून अभिनयातल्या तेजस्वी सत्त्वामुळे केशवराव दात्यांनी रंगभूमीवर अपूर्व करामत केली. बालगंधर्वांची स्त्रीवेषातली ‘नाऽऽय” ही आर्त हाक शेकडो डोळ्यांच्या कडा भिजवून गेली. मिलिट्रीत गेल्यामुळे शिस्त येते. पण ती माणसाचे यंत्र करणारी शिस्त असते. कलेला असल्या यांत्रिक शिक्षणाचं वावडं आहे ! आवाज कशाला ? एखाद्या माणसाची बोटदेखील त्याच्या गळ्यापेक्षा अधिक बोलकी असतात. सारी भरतनाट्यम्ची भाषा नुसत्या बोटांनी बोलते ! [नटाने प्रकृती उत्तम ठेवावी. श्लोकबीक म्हणावे. त्याने काही विवडत नाही. पण नटालाच काय, कुठल्याही कलावंताला मुख्य म्हणजे ह्या जगाकडे नीट पाहता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे आणि जीवनावर उदंड प्रेम करता यायला पाहिजे आणि हे सारं कलेत आणता – आलं पाहिजे. Stanislavesky चं वाक्य आहे “Leam – to see and hear and love life. Learn to bring it into art !

Learn to see and hear ! पाहायला आणि ऐकायला शिका हा साऱ्या कलावंतांना लागू पडणारा उपदेश आहे. नुसते डोळे असले म्हणून दिसत नाही. नुसते कान असले म्हणून ऐकता येत नाही. पाहण्याच्या आणि ऐकण्याच्या मागे काही प्रेरणा लागतात. आपण सगळेच गाणं ऐकायला जातो. निसर्गाच्या नियमाप्रमाणे ध्वनी उमटून कानाच्या पडद्यावर आदळला की सगळ्यांनाच ऐकू येतो. पण जे ऐकायला शिकले आहेत त्यांना मात्र तो निराळा ऐकू येतो. चांगले गवई जेव्हा तंबोरे लावायला लागतात तेव्हा जलशाला जाणं हा एक केवळ उच्च अभिरुचीच्या घाऊक प्रदर्शनाचा भाग म्हणून गर्दी करणारी माणसं असतात ती कुजबुजायला लागतात. कुरकुरायलासुद्धा लागतात. वास्तविक गवई तंबोरा जमवीत असताना गप्पा मारणं हा गाणं चालू असताना गप्पा मारण्याइतका मोठा प्रमाद आहे. ज्यांना तंबोऱ्याच्या किंवा सतारीच्या तारा जुळणं म्हणजे काय आनंद आहे हे कळलंय ते त्या तारा जुळत असताना ऐकतात. अहो, तंबोऱ्याची जोड जुळवणं हे तर प्रणयाराधनासारखं आहे. पहिल्या प्रीतीचे, भीतीचे, काहीसे गमतीचे जे बोल सांगितले आहेत ना तशीच अवस्था असते. स्वर कसे हळूहळू जवळ येत असतात मग दूर जातात – पुन्हा येतात. आले असं वाटतं पण तो भास असतो – आणि असे जवळ येत – दूर जात – लाजत – रुसत शेवटी षड्जाला षड्ज किंवा जोडीला पंचम जेव्हा मिळतो. त्यावेळी स्वरांच्या अलीबाबाची गुहा असते, तिची दारं उघडल्याचा आनंद मिळतो. पण तो कुणाला ? जो ‘ऐकायला’ शिकलाय त्याला ! ज्याला नट व्हायचं आहे त्यानं हे संगीताचंच नव्हे तर गद्यातल्यासुद्धा स्वरांचं सामर्थ्य काय आहे हे ऐकायला शिकलं पाहिजे. शब्द हे भांडवल तसं मोठं स्फोटक आहे ! जरा इकडला स्वर तिकडे झाला की गोंधळ होतो. मी एकदा भावबंधन बघायला गेलो होतो. त्यातली लतिका जराशी लडिकाच होती. कामण्णाचं काम करणाराही जरा चावट होता. कामण्णाचं एक वाक्य आहे ‘ही आली लतिका, आता – डोळे बंद !” त्या पट्ट्याने ‘ही’ शब्द जरा ताणला आणि ‘हीs आली लतिका’ म्हटलं ! तिथून पुढे ती लतिका आली की ‘ही आली’ असंच वाटायला लागलं ! म्हणून शब्दांवर पकड हवी. जी भाषा किंवा बोली आपण वापरणार आहोत ती पक्की ठाऊक पाहिजे. म्हणजेच नाटकात आपल्याला जी भूमिका असेल तिच्या तोंडून ती भाषा कशी उमटेल याचा आपल्याला अंदाज येतो. कित्येक वेळेला नाटककाराने विशेष शैलीदार भाषा वापरलेली असते. जुन्या ऐतिहासिक नाटकांतून अशी भाषा आढळते. असल्या भाषेची आवश्यकता आहे की नाही हा निराळा मुद्दा आहे. परंतु एकदा आपण ते नाटक करायला घेतल्यावर त्या भाषेचा रंग काय आहे तो आपण पारखून घ्यायला हवा. कित्येकदा नाटककार मुद्दाम प्रासयुक्त भाषा वापरून काही परिणाम साधत असतो. उदाहरणार्थ ‘राजसंन्यास’ नाटक घ्या. त्यात असे गद्य आणि काव्य यांच्या सीमारेषेवरचे पुष्कळ संवाद आहेत. रायाजीचं एक वाक्य आहे – आणि बाबांचा पवाडा गाणारा तुळशीदास … आता हे वाक्य मुळातच एखाद्या कवितेसारखं रचलेलं आहे. ती अंतर्गत रचना ओळखूनच ते म्हणायला हवं. इंग्रजीत असल्या संवादांना आणि अभिनयाला ‘स्टायलाइज्ड’ म्हणतात. नक्षीदार वाक्यं नक्षीदार रीतीने मांडताना ती नक्षी कितपत करायची ह्याची खात्री हवी. नक्षीदार वाक्यापेक्षाही अभिनयाला अवघड वाक्यं म्हणजे साधी! संवाद ह्याविषयी आपल्याकडे फार चमत्कारिक समज आहे. टाळीची तान असते तशी काही टाळीची वाक्यं असतात. आणि तसलं वाक्य म्हणताना टाळीसाठी धडपड सुरू होते. लोकांना काही पटलं, रूचलं की लोक टाळी देतात हे खरं आहे. म्हणून ती टाळी लोकांकडून थकलेली बाकी वसूल करणाऱ्या पठाणासारखी वसूल करायची नसते. ते वाक्य काही नाटकातल्या प्रवाहाला सोडून बाजूला नेऊन लोकांवर मुद्दाम टाकायचं नसतं. असली वाक्यं म्हणणारे नट ‘नाटकी’ वाटतात. ज्यावेळी अंगातून संचारून अभिनय येत नाही त्याचवेळी त्याला आपण खोटा ह्या अर्थाने नाटकी म्हणतो. नाटकातलं पात्र असं खोटं असून नाही चालत. जलतरंगातल्या एखाद्या पात्रातलं पाणी कमीजास्त झालं की जसा सूर बिघडतो तशीच ही नेमकेपणा नसणारी पात्रे नाटक बिघडवतात. नेमकेपणा ही एक अभिनयातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. रंगभूमीवर जे बोलायचं, जसं बोलायचं, जिथून बोलायचं – नव्हे जिथे उभं राहायचं नि जिथे बसायचं, उठायचं, चालायचं हे तालमीत निश्चित करावं लागतं. तालमीत ते मी आयत्यावेळी करीन, आयत्यावेळी अमकी action घेईन वगैरे बोलणारी माणसं असतात. मी नेहमीच सांगतो, रंगभूमीवर आयत्यावेळी होणारी एकच गोष्ट म्हणजे फजिती !

आणि म्हणूनच नाटकात बोलण्याची वाक्यंच नव्हे तर रंगभूमीवरची प्रत्येक हालचाल ही विचारपूर्वक ठरवावी लागते. रंगभूमीवर जो देखावा उभा करायचा, ज्या वस्तू मांडायच्या, जे कपडे चढवायचे त्याचीदेखील अत्यंत शिस्तबध्द योजना हवी. अर्थात आजच्या व्याख्यानात मी नाटक कसे बसवावे याचा ‘लेसन’ घेणार नाही आहे. एकतर आपण काही होतकरू नट म्हणून ह्या व्याख्यानाला आला नाहीत. आपण बहुसंख्य श्रोते नाटकाचे प्रेक्षक आहात. त्याच दृष्टीने मी हे विचार सांगतो आहे. तर ही नाटकात बोलण्याची तयारी करायची म्हणजे काय

करायचं ? मी आपल्याला सांगितलं की, केवळ स्वतःचे संवादच नव्हे तर ते नाटक आत्मसात केलं पाहिजे. त्यातून प्रत्येक नाटक ही काही संपूर्णपणे निर्दोष कलाकृती नसते. नाटककाराचे म्हणून काही दोष असतात. ते फार उघड न करता नाटक उभं करायचं आहे. ज्या कारणांसाठी आपण ते नाटक करायला सिध्द झालो ती कलात्मक कारणं आपल्याला पक्की कळली पाहिजेत. म्हणजे काय करायचं ह्याहूनही काय करता कामा नये हे तरी कळेल. एकच प्याला नाटक करायचं आहे असं समजा, मग सिंधूची वेशभूषा- केशभूषा, तिची बोलण्यावागण्यातली मर्यादा हे सारे समजावून घेतलं पाहिजे. ती कशी वागेल, कशी बोलेल, तिच्या हालचाली कशा असतील ह्याचं चित्र मनाच्या डोळ्यांनी पाहता आलं पाहिजे. तरच ते प्रेक्षकांना दाखवता येईल. ‘मी दारू सोडली’ हे सुधाकराचं वाक्य ऐकल्यावर ती आनंदाने उड्या मारील की आनंदाने गुदमरून जाईल हे कळलं पाहिजे. अशा वेळी सिंधू ज्या कुटुंबातली आहे त्या कुटुंबातली सिंधूच्या स्वभावाची बाई कसे वागेल याचे स्पष्ट चित्र अंतःकरणात उमटले नाही तर सिंधूचा अभिनय करणे अशक्य होईल. भूमिकेशी तद्रूपता म्हणतात ती ही ! पुष्कळ वेळा धाय मोकलून रडण्यापेक्षा डोळे नुसते डबडबले तर अधिक परिणाम साधला जातो. अवलोकन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जुन्या काळी पुरुष स्त्रियांच्या भूमिका करीत. त्यामुळे आपला पुरुषीपणा पार लिंपून टाकण्यासाठी त्यांना वाजवीपेक्षा जास्त परिश्रम करावे लागत. बालगंधर्वांसारखा अभिनय एखाद्या स्त्रीने करायची आवश्यकता नाही. परंतु बालगंधर्वांची तन्मयता मात्र काम करणारा पुरुष असो वा स्त्री दोघांनाही तितकीच आवश्यक आहे नाटकातले बोलणे छापील वाक्ये पाठ केल्यासारखे नसावे- सहज वाटावे. पण ह्या सहजते-सहजतेतदेखील खूप फरक असतो. कुणाची सहजता ? कुत्रंही सहज चालतं आणि वाघही सहज चालतो. पण वाघाच्या चालीत एक सहज डौल असतो. एखाद्या फडतूस माणसाची भूमिका करायची असली तर चालीत तो फडतूसपणा आला पाहिजे. बोलण्यात आला पाहिजे, तेच समजा संभाजीमहाराजांचे बेबंदशाहीतले काम असले तर त्या चालण्यात वाघाचा डौल हवा. पण तो डौल कृत्रिम रीतीने आलेला नसावा. कृत्रिम रीतीने वाजवीपेक्षा छाती फुगवून चालले की ते नाटकी वाटते. पण तो डौल अंगात बाणून आल्यासारखा वाटला तर तो कृत्रिम वाटत नाही. उगीच सहज बोलायच म्हणून सृष्टीची उलथापालथ तर झाली नाही ना हे वाक्य ‘ओ’ रूटची बस गेली नाही ना अशा सहजतेने म्हणून चालणार नाही, औरंगजेबाएवढ्या बलाढ्य सम्राटापुढे न वाकणारा संभाजी आपल्याला उभा करायचा आहे याची दखल त्या नाटकातल्या पहिल्या एंट्रीपासून घ्यावी लागते.

थोडक्यात अभिनयसाधना ही एक नित्य चिंतनाची गोष्ट आहे. जगताना डोळे नीट उघडे ठेवण्याची बाब आहे. हा निदिध्यास हवा. उत्सवापुरते नाटक करणारांच्या बाबतीत मला काहीच म्हणायचे नाही. हा केवळ हौसेचा मामला नाही. नाटकाची हौस म्हणजे उगीच मिरवण्याची हौस नव्हे. पाच-सातशे माणसांच्या अमूल्य वेळेशी हा खेळ आहे] मी तिकिटासाठी त्यांनी खर्च केलेल्या पैशाबाबत बोलतच नाही. तो भाग आहेच. परंतु एखाद्या नाटकात एखाद्या नटाची बेजबाबदारी त्या लोकांचा वेळ नासून जाते. इतर सहकाऱ्यांच्या परिश्रमांचा चुथडा करून जाते.

अभिनयात शब्दांच्या म्हणजे मुख्यतः त्यातल्या अर्थाच्या, वाक्याच्या लयीच्या हुकमतीवर माझा सर्वात अधिक कटाक्ष आहे.

पाठांतर म्हणजे पन्नास टक्के यश आहे. हे पाठांतर जाणीवपूर्वक झाले की ऐंशी टक्के यश । उरलेले वीस टक्के आपण इतर गोष्टींना वाटून देऊ. प्रॉम्प्टिंगवर नाटक मारून नेणारे नट हे नाट्यकलेचे सर्वात मोठे शत्रू आहेत. एकतर हे लोक एकजात अप्रामाणिक आहेत. स्वत: खड्ड्यात पडतात आणि दुसऱ्यांनाही खड्यात टाकतात. समोरच्या पात्राकडे ह्यांचं कधीही लक्ष नसतं. डब्यात विदाउट तिकीट शिरलेल्या माणसासारखा चेहरा घेऊन हे स्टेजवर घोळ घालतात. मी अशी नाटकं पाहिली आहेत की जिथे स्टेजवरच्या प्रत्येक खुर्चीच्या किंवा कोचाच्या मागे चोरासारखे प्रॉम्प्टर लपलेले असतात. कव्हरचा पडदा पडला की आला मागे प्रॉम्प्टर ! ही फसवणूक का करायची ? कसेही करून नाटक केलेच पाहिजे हा धोंडा कुणी दिलाय तुमच्या माथी ! असल्या नालायक लोकांनी नाट्यकलेची सेवा करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे नाटकात कधीही काम न करणे !

वाक्य मनात एकदा रुजलं की ते उमटवण्याची क्रिया हा अभिनयाचा प्रेक्षकांना दिसणारा भाग. पण हे वाक्य हा नट समजून म्हणतो आहे की नाही याची कल्पना सामान्य प्रेक्षकालासुध्दा येते. आपण जे काही रंगभूमीवर करीत असतो ते दुहेरी हेतूने करीत असतो. म्हणजे एका पात्रानं दुसऱ्याशी बोलायचं आणि आपण त्याच्याशी काय आणि कसं बोलतो आहोत ते शेवटच्या प्रेक्षकापर्यंत सर्वांच्या ध्यानात आणून द्यायचं आणि हे आपण किती कलात्मक रीतीने कराल त्यावर आपला अभिनयाचा दर्जा ठरेल | पिटातल्या प्रेक्षकाला ऐकू तर गेलं पाहिजे आणि आरडाओरडा तर करता कामा नये अशी ही तारेवरची कसरत आहे. ती करायला मुख्यतः नट संपूर्णपणे Relaxed मनाने अगदी हलक्या फुलासारखा झाला पाहिजे. शरीरातले स्नायून स्नायू सैल हवेत, त्यांच्यावर कसलाही मानसिक ताण नको. मनाला धास्तीचा स्पर्श झाला की आटोपलाच कारभार. ही धास्ती किंवा ज्याला मंचभय म्हणतात ते पूर्वतयारी उत्तम असली की कोणत्याच कार्यात येत नाही. भीतीने पांढराफटफटीत पडलेला चेहरा हा कितीही मेकप थापला तरी लपत नाही. चेहरा लपला तरी ‘सीदन्ति मम गात्राणि’ झालेले असते पण नाटकाच्या तालमी उत्तम झालेल्या असल्या, भाषणं – हालचाली ह्या निश्चित असल्या प्रॉम्प्टर नावाच्या माणसाच्या हातात आपली सूत्रं नसली की असल्या भिण्याचे कारण नसते. नाटकाच्या तालमींत सूत्रधार लागतो. पण एकदा पडदा वर गेला की सारी सूत्रे त्या-त्या नटाच्या हाती येतात. त्या पाण्यात एकदा उडी टाकली की कमरेचा दोर सुटला. मग संथपणाने, शांतपणाने पोहावं पाण्यात जाणूनबुजून खळबळ माजवायची असली तर तशी माजवावी – काठावरच्या लोकांना आपण बुडालो-बुडालो असं दाखवून घाबरवून सोडावं आणि ते भरपूर भ्याले की हळूच डोकं वर काढून त्यांना मजा दाखवावी हा जसा पट्टीच्या पोहणाराचा खेळ असतो तसला खेळ नटाला करायचा असला तर पाण्यात उडी मारणाऱ्या अवगाहनपटूसारखीच अभिनयपटूची तयारी लागते. तेव्हा ‘निश्चळ मन’ ही अभिनयाला अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. मांजर जसं स्वस्थ पडलेले असते दिसला उंदीर की सारी शक्ती एकवटून टुणकन उडी मारतं तसंच अभिनय भ्याल्याचा असो वा शौर्याचा असो, एकप्रकारची सावधानता हवी! मला तर नाटकाची तिसरी घंटा वाजली की त्या जोडीला लग्नासारखं ‘सुमुहूर्त सावधान” म्हणावंसं वाटतं. आता ती मंगलघटका आली, ‘नाट्यकला कविकृष्णा घाला घाली’; अस खाडिलकरांनी म्हटलंय. बोहल्यावर नवऱ्यामुलाचे पाय लटलटायला लागतील म्हणून भटजी म्हणतात ‘सावधान’! तसं रंगमंचावरदेखील पाय लटलटू नयेत अशी इच्छा असली तर मनात म्हणावं सावधान ! आता इतक्या लोकांपुढे आपल्याला नाटक करायचं आहे कसं होतं, काय होतं कोण जाणे ही भीती सगळ्यांनाच असते. ह्याचा विचार जुन्या नाट्यकलाविशारदांनी केला होता. म्हणून ‘नांदी’ आली. नांदीगायन सुरू झालं की समोरचे प्रेक्षक प्रेक्षागारात येईपर्यंत झालेला ताप विसरतात, ते स्वर त्यांची मनं निर्मळ करतात. मग नाटककाराने आणि नटांनी मिळून जो रंग त्यांच्या मनात ओतावा तो तिथे निर्माण होतो. प्रेक्षकांप्रमाणे धूप-पूजा-प्रार्थना-नादी इत्यादी गोष्टी भयशमन करणाऱ्या आहेत, आधुनिक वैद्यकाच्या भाषेत सांगायच्या म्हणजे Tranquilisers आहेत. हे बाह्य उपाय झाले. पण नटाचं मनदेखील शांत हवं ! त्याच्यावर ताण नको. असा ताण असल्यावर मन मोकळं नसतं. मन मोकळं नाही म्हणजे हालचाली मोकळ्या नाहीत, आवाज मोकळा नाही. प्रॉम्प्टरच्या मदतीने काम करणाऱ्या सगळ्या नटांच्या चेहऱ्यावर पाहा कसा एक अपराधीपणाचा सूक्ष्म भाव असतो. कोडग्या मंडळीविषयी मी बोलत नाही. त्यांचं काय सांगावं ! असल्या अवलादी रंगभूमीची विटंबना करतात. सर्व क्षेत्रांत त्या क्षेत्राच्या लौकिकाला बट्टा लावणारी मंडळी आहेतच. पण ज्याला कलावंत म्हणून स्वत:चा दर्जा वाढवायचा आहे, कलेच्या क्षेत्रात आपलंही काही दान अर्पण करायच आहे त्यांच्याविषयीच विचार करायचा ! तर हे असं relaxation हे कष्टसाध्य आहे. ते कष्ट प्रयोग लागण्यापूर्वी झाले पाहिजेत. आणि कलावंत म्हणून जगायच असेल तर सतत पाहिजेत.

आता त्या अभिनयाची बोलण्याचा अभिनय, अंगविक्षेपाचा अभिनय अशी काही वर्गीकरणं केली आहेत. मला स्वतःला ती एका मर्यादित अर्थानेच मान्य आहेत. अभिनयाची अशी ठोकळेबाज विल्हेवारी करता येत नाही. इथे ‘अवलोकन’ हे महत्त्वाचे ! भारतीय नृत्यात अभिनय म्हणजे काही ठराविक संकेताने दाखवण्याच्या खुणा नव्हेत. एकेकाळी नाटकात पात्रनिर्मितीदेखील ठराविक संकेतानेच होत होती. व्हिलन म्हटला की त्याने भुवई उंचावून बोलायचं ! असला अभिनय करणं हे दुय्यम बुध्दिमत्तेचं लक्षण आहे. हा अभिनय नव्हे. हा आपला पूर्वी कोणीतरी करून ठेवलेला मुखवटा वापरण्यापैकी आहे. काही विशिष्ट भावनांचे प्रकटीकरण आपण सामान्यतः एका विशिष्ट तऱ्हेनेच करतो. दु:ख झालं की डोळ्यात अश्रू येतात. तिरस्कार वाटला की नकळत चेहऱ्यावरचं आठ्यांचं जाळं वाढतं. पण हा प्रकार ठोकळेबाज झाला. म्हातारा म्हटला की त्यानं खोकतच यायचं नोकर म्हटला की त्यानं कोचावर फडकं मारीतच यायचं, हे एकान कुणीतरी केलं होतं त्याचं दुय्यम दर्जाच्या लोकांनी फारसा विचार न करता केलेलं अनुकरण आहे. चांगला नट आणि चांगला दिग्दर्शक लेखकाची वाक्यं कशी टाकावी याचा स्वतः विचार करील. रंगभूमीवरचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. तिथे निरर्थक हालचालीला अर्थ नाही. कुणीसं म्हटलं आहे, तुमच्या सेटवरच्या भिंतीवर जर पहिल्या अंकात बंदूक ठेवलेली असली तर ती शेवटच्या अंकापर्यंत एकदा तरी ठोदिशी गोळी झाडणार असेल तर ठेवा ! याचा अर्थच असा की मंचावरची सजीव आणि निर्जीव वस्तू प्रेक्षकाला काहीतरी सांगून जाऊ द्या । शोभेच्या वस्तूदेखील सार्थ शोभा आणू द्यात ! डॉक्टरचं पात्र गळ्यात स्टेथास्कोप घालून आणतात. आणा. पण मग त्या स्टेथास्कोपने कुणाची छाती त्याला तपासू द्या ! हातात काठी घेऊन आलात तर त्या काठीचा एखादा असा सहज चाळा होऊ द्या की त्या काठीला अर्थ आला पाहिजे. व्यक्तिमत्त्वाचा रुबाब वाढायला काठी असली तर ती काठी अशी बाळगा की लोकांनी ‘वा !’ म्हणावं । काठीच काय, पण अंगातला पोशाखसुध्दा साऱ्या वागण्याशी जमला पाहिजे.

माणसाच्या हालचाली ह्या पोशाखानुरूप चालतात. एखाद्या क्रांतिकारक कटाची तयारी करणारा माणूस खांद्यावर सोगाबिगा सोडून बोलायचा नाही. कटाचं टेन्शन त्याच्या वाक्यांत नव्हे तर त्याच्या पोशाखातून दिसलं पाहिजे. हे सारं सूक्ष्म अवलोकनातून येतं. माणसांचे हे लक्षावधी नमुने जाणिवेनं पाहणं हा अभिनयाचा फार मोठा अभ्यास आहे. आणि माझ्या मते अभिनयाचं हे दर्शन त्या नाटककारालाच व्हावं लागतं ! तरच त्याची वाक्यं सोळा आणे खरी वाटतात. बोलण्याचा एकच कायदा तुम्ही काय बोलता आहात ते कळलं पाहिजे. त्या बोलण्याचा साचा तुमच्या निरनिराळ्या भूमिकांत बदलला पाहिजे. तुमच्या लहानसहान हालचालींतून त्या भूमिकेचे सारे संस्कार तंबोऱ्याच्या तारांतून जव्हार येते तसे आले तर त्या भूमिकेला गोलाई येते. नाटकातलं बोलणं म्हणजे व्हॉइस कल्चरचं प्रदर्शन नव्हे ! आवाजाची देणगी नसलेले केशवराव दाते हे आपल्या अभिनयाच्या सर्वांगीण दर्शनातून नटश्रेष्ठ झाले. नाहीतर ठणकावून शुध्दलेखन घालणारे अनेक शाळामास्तर नट झाले असते.

आपण काय परकायाप्रवेश केला आहे हे उत्तम कळलं की अभिनय निराळा राहत नाही. संभाजीमहाराजांचा संताप आणि संभू गड्याचा संताप व्यक्त करण्याच्या पध्दतीत फरक पडेल. बायकांचं लाजणं हे मूलतः एकाच भावनेतून आलं तरी त्याची अभिव्यक्ती असंख्य पदर घेऊन येते. तरी सगळं नीट पाहण्याचं काम आहे. ते कसं करावं याचे धडे तुम्हाला कोणीही देऊ शकणार नाही. ते आतून यावं लागतं. ते आपल्यात आहे की नाही हे ज्याचं त्यानं सारा अहंकार गुंडाळून ठरवावं. आहे असं वाटलं तर नाटकात काम करावं आणि रसिकांना आपण समाधान देऊ शकलो आहोत की नाही याचा स्वतःच्याच मनाशी पडताळा घ्यावा.

असल्या साधकाच्या भूमिकेतून जर आपण ही साधना करीत राहिलो तर ह्या कलेचा आनंद स्वतःला घेता येईल आणि इतरानाही देता येईल. अभिनय करण्याचा आनंद आधी स्वतःला मिळायला हवा. त्या धुंदीची मजा काय आहे ते कळायला हवं. नक्कल पाठ नसेल समोरची पात्रं बेजबाबदार असतील काय करणार, पोटासाठी करावं लागतं वगैरे सबबी असतील तर हा आनंद मिळणारच नाही. आणि स्वतःला मिळाला नाही तर दुसऱ्याला देता येणार नाही.

नाटकाच्या तालमीच्या पहिल्या दिवसापासून त्याच्या पहिल्या प्रयोगापर्यंत त्या नाटकाचा आपल्याला ध्यास लागणार आहे का? ते नाटक आपल्याला मनापासून आवडलं आहे का ? संचात खरे नाट्यप्रेमी लोक आहेत का ? हे आधी नीट स्वत: ला विचारून घ्या आणि मगच ह्या फंदात पडा ! तो तुमचा पोटापाण्याचा धंदा आहे की नाही, नोकरी संभाळून किंवा स्वैपाकपाणी संभाळून तुम्ही नाटकात आला आहात यासारखे मुद्दे कलेच्या क्षेत्रात अप्रस्तुत आहेत. कलेवर प्रेम करायचं हे अवघड काम आहे. ही प्रेयसी मोठी जीवघेणी आहे. कठोर आहे. तिची आराधना आपल्या जीवनाचं सर्वस्व देऊन करावी लागते. जगात जे श्रेष्ठ कलावंत झाले त्यांना सदैव काय टाळ्याच

मिळाल्या ? नाही. निंदा, जनीं त्रास अपमान उपहास सहन करावे लागले तरी त्यांनी आपला व्यवसाय सोडला नाही. चार्ली चॅप्लिनचा Limelight नावाचा एक बोलपट आहे. रंगभूमीवर आयुष्यभर नाचून प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरूचीमुळे आणि वयोमानामुळे दृष्टीआड झालेल्या नटाची ही कथा आहे. आता त्याला कोणी विचारीत नाही तरी रंगभूमीवर जायची त्याची इच्छा मावळली नाही. त्याच्यावर माया करणारी त्याची एक मैत्रीण त्याला विचारते बाबारे, दुसरा व्यवसाय कर. तिथे तुला नाही विचारीत कोणी तर जातोच कशाला मरायला तिथे चॅप्लिननं तिथं उत्तरादाखल – सुंदर वाक्य लिहिलं आहे. I hate the sight of blood, but it is in my veins ! मला रक्ताची घृणा आहे, पण माझ्या नसानसांत रक्तच आहे त्याला काय करू ? नाट्यकलेची आवड तुमच्या रक्तात आहे की नाही ते तुम्हीच तपासून पाहा आणि आता तुटो हे मस्तक फुटो हे शरीर म्हणून मारा उडी ! उडी मारण्याचे नियम डोळे उघडून आत्मसात केले असतील तर डोकं फुटणार नाही – त्या डोक्यावर लोकप्रियतेचा मुकुट चढेल. कदाचित लोकांना नाही तुमचं उडी मारणं पटलं तर काटेरी मुकुट चढेल. दोन्हीही त्याच आनंदानं चढवायची तयारी हवी ! आळतेकरांचं मोठेपण ह्या तयारीत होतं. त्यांनी मागलापुढला विचार न करता ह्या लहरी प्रेयसीच्या, जीवनाचं दान मागणाऱ्या देवतेच्या चरणी आपलं सर्वस्व वाहिलं म्हणून तर आपल्यासारखे कलाप्रेमी त्यांचं कृतज्ञतेनं स्मरण करतात ! (समाज कृतघ्न नसतो क्वचित अनवधानानं अज्ञानानं त्याला मोठेपण – लवकर उमगत नाही पण उमगलं की तो कृतज्ञतेची दोन फुलं असल्या लोकांच्या चरणी आपण होऊन वाहतो. निष्ठेचा सुगंध उशिरा का होईना, पण दरवळल्याशिवाय राहत नाही. कलावंतांना ज्यांनी मनोमन दाद दिलेली असते अशा लोकांची संख्या फार मोठी असते. त्यांच्या आशीर्वादाच्या धीरावरच तो पुढे जातो. आपण निष्ठेने ही साधना केलीत तर एकवेळ कलेचा संपूर्ण वरदहस्त नाही मिळणार, पण निष्ठावंत माणूस म्हणून कलाप्रिय समाज आपलं ऋण निश्चित मान्य करील. कलावंतानं एवढेही यश रग्गड आहे असं मानलं पाहिजे.

पुन्हा एकदा आळतेकरांच्या स्मृतीला मी अत्यंत विनम्र अभिवादन करतो आणि अभिनयसाधना मंदिराचे मनःपूर्वक आभार मानून माझं भाषण संपवतो.

-पु. ल. देशपांडे
मूळ स्रोत - https://rangabhasha.com/?p=3599

Wednesday, April 24, 2024

कावळा

पशुपक्ष्यांत ज्या काळी मन रमायचे त्या वेळी रमले नाही, आणि आता वेळ निघून गेली. माझ्या शहरी जीवनात पहिला पक्षी आला तो कावळा! माझे बालपण शहरात गेल्याचे मला दुःखही नाही, तसेच माझ्या पाचवीला कावळा पुजल्याचेही नाही. "कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा," अशी आम्हांला एक कविता असे. लहान मुलांच्या कवितेलाही त्या काळी कविताच म्हणत, बालगीत नव्हे. कावळा आम्ही रोजच पाहत होतो. पण सफेत बगळा मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच पाहिला. आमच्या बालपणी बगळे फारसे नसावेत. पक्षीसृष्टीचा पहिला प्रतिनिधी म्हणून बालजीवनात कावळा हा अतिसामान्य प्रतीचा पक्षी आल्यामुळे त्या एकूण त्याच काळात वैराग्य उत्पन्न झाले. ह्या पक्षाच्या सर्व लीला मी बारकाईने पाहिल्या आहेत. वास्तविक हा तसा अगदीच गरीब परिस्थितीतला. पण मुंबईच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'साला आखडू' आहे. पूर्वी कडक कॉलर नावाचा, पांढऱ्या- स्वच्छ कापडी बांधणीचा, एक लाकडी गळफास पैरणीला जोडीत. ती कडक कॉलर वापरणारी मुंबईकर मंडळी थेट कावळयासारख्या माना फिरवीत. ते पाहणे खटखटक चाले काळे डगले किंवा सूट आणि कावळे यांचे माझ्या मनात तेव्हापासून समीकरण बसले आहे.


कावळा हा काही पाळीव पक्षी नव्हे. पिंजऱ्यात घातलेला कावळा मी एकदाच पाहिला. लंडनच्या झू मध्ये. अगदी पोपटाच्या ऐटीत हा कावळा बसला होता. आपला हिंदी कावळा. पिंजऱ्याबाहेर नावाची पाटी होती 'इंडियन क्रो' अशी. एखाद्या अस्सल इंग्लिश कंपनीत गोऱ्या साहेबांच्या पंक्तीत एखादा डिसोझा बसतो तसा. लंडनमधले इतर हिंदी साहेब जसे एकमेकांना पाहून न पाहिल्यासारखे करतात, तसेच काहीसे मला पाहून ह्या कावळ्याने केल्याचे मला अंधुक स्मरते. वास्तविक इतर रंगीबेरंगी पक्ष्यांत त्यालाही स्वतंत्र पिंजऱ्याचा मान मिळालेला पाहून मलाही बरे वाटले होते. कारण कावळा हा पाळीव नसल्यामुळे त्याचे माझे काही भांडणच नाही. इतर पक्ष्यांच्या मानाने हा पक्षी कितीतरी समंजस दिसतो. त्या काव काव" ओरडण्याचा 'काव काव" एवढाच अर्थ असतो. माणसाची बोली बोलण्याचा आव नसतो. सहसा पक्ष्यांच्यात न आढळणारा एक चार पावसाळे पाहिल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो. काकाकुव्याच्या चेहऱ्यावर रिटायर व्हायला आलेल्या हायकोर्ट जजाचे गांभीर्य असते. फार वेळ ह्या पक्ष्याकडे पाहत राहिले, की काही वेळाने जस्टिस काकाकुवा एकदम " ज्यूरीतील सभ्य गृहस्य हो, ” अशी सुरवात करील काय, अशी मला नेहमीच धास्ती वाटत आली आहे. चारपाच कावळे तीन तिडयावर रिंगण करून बसले, की म्हाताच्या वकिलांची मुरब्बी टोळी एखाया दिवंगत इंग्रज न्यायाधीशाविषयी एकमेकांना आख्यायिका सांगत बसल्यासारखी वाटते. कावळा मेल्यावर इतर कावळे शोकसभा घेतात, आणि दिवंगत काकासाहेबांनी आपल्या ज्ञातीच्या उन्नतीसाठी फार प्रयत्न केले, ह्या चालीवर गुणवर्णनपर करतात असेही मी ऐकले आहे. कावळ्यांची ही कौतुके मी काही प्रत्यक्ष पाहिलेली नाहीत.

कावळा खिडकीशी बोलू लागला तर पाहणा येतो, असा एक समय आहे. हे खरे असते, तर मुंबईत खोली- दीडखोलीच्या खुराड्यात राहणाऱ्या सगळ्यांनी एव्हाना पिंडाला शिवण्यापुरताही कावळा जिवंत ठेवला नसता. एके काळी तो निरोप वगैरे आणीत असावा. त्याशिवाय त्या " काऊचे सोन्याने मढविन पाऊ" म्हणणारे निघाले नसते. हिंदीतही कागाला संदेसवा देण्यासाठी धाडले आहे. पण आमच्या पाहण्यातले कावळे असले काहीही करताना आढळले नाहीत. त्यामुळे त्याचे आवर्जून कौतुक करावे असे ज्याप्रमाणे काही घडले नाही, त्याचप्रमाणे त्याला नाव ठेवावे असेही त्याने काही केले नाही. क्वचित म्हशीच्या पाठीवरून सहलीला निघालेला कावळा पाहून पक्ष्यांनाही उडण्याचा कंटाळा येतो असा बोध मी घेतला आहे. मात्र पाळीव नसूनही ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा बऱ्याचश्या आहेत असा हा एकच पक्षी. कारण पिंडाला शिवण्याशी त्याचा संबंध येतो. पिंड ठेवले. कावळा शिवला. आणि मंडळी परतली. इतक्या तीन सरळ वाक्यांत ते शेवटले कार्य आटोपलेले क्वचित ऐकायला मिळते.


आमच्या एका मित्राची आजी एकदा - आणि एकदाची वारली. आता तिच्या पिंडाला न शिवण्याचे कावळ्याला काहीच कारण नव्हते. चांगली नव्वद व्याण्णव वर्षे पाहून तिने डोळे मिटले होते. मंडळी बुचकळ्यात पडली. 'तुझ्या मुलाबाळांची काळजी घेऊ," म्हणावे, तर मुलगा म्हणायचा तोच बावीस वर्षे पोष्टातून पेन्शन खाऊन आणखी बावीस वर्षे खाण्याइतका टुणटुणीत. (असो बापडा !) लेकी, सुना, नातू, पणतू सगळे काही 'यथासांग होते. शेवटी कोणीतरी "आजीबाई, एक मोठी बरणी आणि चार कपबश्या आल्या, तरच तुमची शालजोडी देईन हो बोहारणीला," असे हात जोडून म्हटले, आणि पटकन कावळा शिवला. कावळा हा प्राणी कौटुंबिक गोष्टीत इतक्या बारकाईने लक्ष घालीत असेल याची कल्पना नव्हती मला एरवीचा हा अतिपरिचयामुळेअवज्ञेला पोहोचलेला पक्षी त्या विशिष्ट ठिकाणी इंगा दाखवून जातो. स्टैंडवर डझनभर टांगे उभे असल्या वेळी "साहेब, बसा की. आपला टांगा आहे. " म्हणणारा लाचार टांगेवाला, एकटाच असला, आणि डेकन क्विनचा टाइम भरत आलेला असला, म्हणजे जी बेफिकिरी दाखवितो ती, आणि ही जात एकच अडचणीत गाठल्यावर कोण कसा वागेल, सांगता येत नाही. दुपारची रणरणती वेळ, माणसे वैतागलेली, भटजीच्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांची काव काव ऐकू येत असते, अशा वेळी हा कावळा अडून बसतो. इथे त्याचा दोष नाही. एकेकाची वेळ असते.

- पाळीव प्राणी (पु. ल. देशपांडे)
पुस्तक - हसवणूक

संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.

Monday, April 22, 2024

मण्यांची माळ - एक विचारमंथन (तन्वी राऊत)

“आयुष्यात एका आवडत्या लेखिकेला भेटायची संधी तुला देवाने दिली तर तू कुणाला भेटशील?” असा प्रश्न जर मला कुणी विचारला तर सर्वप्रथम सुनीताबाई देशपांडेंचंच नाव माझ्या मनःपटलावर तरळून जाईल यात शंका नाही. त्यांची शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, हाती घेतलेलं काम तडीस नेण्यासाठी त्यात झोकून देण्याची वृत्ती हे गुण तर सर्वश्रुत आहेतच. पण त्यांबरोबरच आजबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे बारकावे टिपण्याची सवय, स्वतःतील गुणदोषांची त्यांना असलेली जाणीव आणि स्वतःतले दोष स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा, स्वतःचं मत व्यक्त करण्याची सडेतोड पद्धत, त्याचबरोबर परिस्थितीकडे पाहण्याचा भावनिक दृष्टिकोन आणि संवेदनशीलता यांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मला भुरळ न पडती तर नवल. ‘आहे मनोहर तरी’ या त्यांच्या आत्मकथनाची पारायणं करुन झाल्यावर माझ्या वाचनात आलेलं मण्यांची माळ हे सुनीताबाईंचं दुसरं पुस्तक.

सुनीताबाईंच्या १३ पूर्वप्रकाशित ललितलेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. हे लेख म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितींचं, आलेल्या अनुभवांचं सुनीताबाईंनी केलेलं विचारमंथनच म्हणावं लागेल. त्याचबरोबर आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर भेटलेल्या व्यक्तींसोबतचे अनुभवही या लेखांमध्ये त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. या लेखांतील त्यांचे विचार मांडण्याची पद्धत ओघवती असल्यामुळे, वाचकाशी लेखिकेने केलेला तो संवादच वाटू लागतो.

‘एक पत्र’ या पहिल्याच लेखात सुनीताबाईंनी पुलंसोबतचं त्यांचं सहजीवन, एकमेकांचे गुणदोष स्वीकारून केलेली आयुष्यभराची सोबत, पुलं गेल्यानंतरचं त्यांचं बदललेलं आयुष्य आणि त्या अनुषंगाने आठवणी, जीवन-मृत्यू, अस्तित्व यांबद्दलचे विचार मांडले आहेत. ‘निमित्त १२ मार्च’ या १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांवरच्या लेखात राजकारणात वाढीस लागलेली स्वार्थी वृत्ती, व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड, त्यांतून निर्माण झालेली धार्मिक तेढ, वैरभावना यांबद्दल वाचताना मन सुन्न होतं. किंबहुना त्या घटनेनंतर ३० वर्षांनंतरची आजची परिस्थिती आणखीच विदारक झाल्याचं जाणवतं. ‘डोडी’, ‘माणसाचा पूर्वज’, ‘आनंदमयी सृष्टीची जीवनासक्ती’ आणि ‘महात्मा थोरो’ या लेखांतून मानव आणि इतर पशूंमधील परस्पर संबंध, त्यांचा एकमेकांवरील विश्वास, निसर्गाला मानवाने आणि इतर पशूंनी दिलेली वागणूक याबद्दलच लिखाणही वाचनीय. या पुस्तकातील सर्वच लेख वाचकाला मानवी मूल्य, स्वभावातील गुणदोष, तसेच माणसाच्या अतिमहत्त्वाकांक्षी वृत्तीचे भविष्य काळात येणाऱ्या पिढीला भोगावे लागणारे परिणाम यांबद्दल विचार करायला भाग पाडतं, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. वाचायलाच हवं असं पुस्तक.

- तन्वी राऊत 
https://www.instagram.com/herbookishworld

सबकुछ पु.ल. - (अनिल हर्डीकर)

मराठीत साहित्यक्षेत्रात विनोदी लेखक म्हणून प्रचंड झालेले पु.लं. देशपांडे आणि विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलेल्या शरद तळवळकर यांची वसंत सबनीस यांच्या साक्षीने घडलेली ही भेट.

पु. ल. देशपांडे यांचे नाव माहीत नाही असे सांगणारा मराठी माणूस मिळणार नाही. 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' असा अत्यंत कमी शब्दांत त्यांचा पूर्ण परिचय केला जातो. पुलंनी जेवढे विपुल लेखन केले त्यापेक्षा काकणभर जास्तच त्यांच्याविषयी कौतुकाने, गौरवाने लिहिलेला मजकूर भरेल इतके त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेम केले. पुलंनी मुख्यत्वे विनोदी लेखन केले असले तरी त्यांच्या गंभीर विषयाला धरून असलेल्या लेखनातही त्यांच्यात असलेला खोडकर स्वभाव डोके काढतो आणि लेखन क्लिष्ट होत नाही.पुलं चांगले वक्ते होते. सामजिक कार्यासाठी त्यांनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या. चित्रपट क्षेत्रात असताना 'सबकुछ पुलं' असा गुळाचा गणपती त्यांनी बनवला. शिक्षक म्हणूनही काही काळ ते महाविद्यालयात, शाळेत रमले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हेसुद्धा त्यांचे विद्यार्थी. ते जिथे गेले तिथे त्यांनी खसखस पिकवली. त्यांना संगीताची चांगली जाण होती, कविता त्यांना प्रिय होती. मात्र हा बहुरूपी कोणत्याही पदाला चिकटून राहिला नाही. आणीबाणीच्या काळात त्यांनी आपले वक्तृत्व किती प्रभावी आहे हे सिद्ध केले, पण तिथे ते रेंगाळले नाहीत. जसे ते इतरत्रही रेंगाळत राहिले नाहीत. ते बाबा आमटे यांच्या आनंदवनात गेले, रवींद्रनाथ टागोर यांच्या शांती निकेतनात राहिले. दूरदर्शनच्या निर्मितीत त्यांचे योगदान होते. त्यांना मिळालेल्या मान-सन्मानाचे मोजमाप करणे कठीण आहे.

आज मी त्यांचे पहिल्या भेटीचे दोन किस्से सांगणार आहे. साल वगैरे नक्की सांगता येणार नाही, पण तो काळ ज्या वेळी मोबाईल सोडा घरोघरी फोनदेखील नव्हते. पुण्यात पुलं राहत होते. काही कामासंदर्भात आपल्या एका मित्राला घेऊन ते त्यांच्या एका मित्राकडे गेले. घरात तो मित्र नव्हता. त्या मित्राची 13/14 वर्षांची मुलगी एकटीच घरात होती. पुलं तिला म्हणाले, "मी येऊन गेलो असे सांग तुझ्या बाबांना.'' ती म्हणाली, "नक्की सांगते.'' पुलं आणि त्यांचा मित्र निघणार इतक्यात ती म्हणाली, "काका चहा घ्या ना. मला येतो चहा करता. तुम्ही चहासुद्धा न घेता येऊन गेलात तर बाबा रागावतील.'' मुलीच्या बोलण्यात आदर होता, आग्रह होता. पुलंनी "राहू दे'' असे म्हणूनही ती ऐकत नाही म्हटल्यावर पुलं म्हणाले, "चहा नको. पण घोट घोट दूध दे गरम करून.''

मुलीने दूध गरम करून दोघांना दिले. पुलंना दूध कितपत गरम असेल याचा अंदाज करता आला नाही. त्यांनी दूध प्यायले आणि त्यांची जीभ भाजली. पुलं त्या मित्राच्या मुलीला एका शब्दाने बोलले नाहीत. मात्र घराबाहेर पडल्यावर सोबत असलेल्या मित्राला म्हणाले, "पहिल्या भेटीत चटका लावून गेली पोर.''

पुलंनी विनोद करण्यासाठी व्यंगाची चेष्टा केली नाही. 'गुण गाईन आवडी' हा एकमेव उद्देश त्यांच्या ठायी होता. माणसातल्या दुर्गुणाकडे कानाडोळा करून त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे कौतुक करण्याचे विलक्षण कसब त्यांच्या ठायी होते.

महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना पुल पुण्यात राहत होते.वसंत सबनीस हा त्यांचा खास जुना मित्र होता. 'अघळपघळ' हे पुलंचे पुस्तक त्यांनी 'वसंता'ला अर्पण केले आहे. वसंत सबनीस कॉलेजच्या हॉस्टेलवर त्यांच्या एका मित्राबरोबर राहत असत. ज्यांचे नाव होते शरद तळवळकर. मराठी चित्रपटसृष्टीत एक बुद्धिमान आणि विनोदी अभिनेता म्हणून ते पुढे नावारूपाला आले, तर एक दिवस 'वसंता'ला भेटायला पुलं हॉस्टेलवर गेले. योगायोगाने वसंतरावांचा रूममेट असलेले शरद तळवळकर रूमवरच होते. साहजिकच वसंतरावांनी पुलंशी आपल्या रूममेटची ओळख करून दिली. म्हणाले, "पुर्ष्या, हा माझा रूममेट शरद तळवळकर आणि शरद हा माझा मित्र पुरुषोत्तम देशपांडे.'' क्षणाचाही विलंब न लावता पुलं वसंत सबनीसांना म्हणाले, "अगदी साधा, सरळ दिसतोय तुझा मित्र.'' पुलंच्या या बोलण्याचा अर्थ वसंत आणि शरद दोघांनाही लागेना. वसंत म्हणाले, "म्हणजे?''

पुलं म्हणाले, "आख्या नावात एकही काना, मात्र, वेलांटी नाही. श र द त ळ व ल क र.''

मराठीत साहित्यक्षेत्रात विनोदी लेखक म्हणून प्रचंड झालेले पुलं देशपांडे आणि विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलेल्या शरद तळवळकर यांची ही अशी भेट वसंत सबनीस हेही एक विनोदी लेखक यांच्या साक्षीने झाली.

- अनिल हर्डीकर
hardikarsutradhar@gmail.com



Friday, April 19, 2024

अशी ही बनवाबनवी आणि पु. ल.

मराठी सिनेसृष्टीची अजरामर कलाकृती म्हणून अशी ही बनवाबनवी चित्रपटाकडे पाहिले जाते. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन कित्येक वर्षे लोटली, तरीही अद्याप प्रेक्षकांवरील चित्रपटाची जादू तीळमात्रही कमी झालेली नाही. या चित्रपटाची गाणी आजही तितक्याच उत्साहात लावली जातात. याशिवाय चित्रपटातील प्रत्येक संवाद हा प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहे. त्यामुळेच की काय कधीही हा चित्रपट टीव्हीवर लागला तरी प्रेक्षकांना तो पाहावासा वाटतो.

चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतकी वर्षे झाली तरी या चित्रपटाचे किस्से अजूनही गाजतात. चित्रपटातील कलाकार कोणत्याही कार्यक्रमांना चित्रपटासंबंधी आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. असाच एक किस्सा चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी शेअर केला होता. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट तयार करत असताना त्यातील एक सीन हा पुलंच्या आयुष्यात घडलेल्या घटनेवर आधारित आहे. याबाबत सचिन यांनी सांगितले की, मी अनेकदा पुलंना भेटायला जायचो. त्यांच्याकडे गेलो की ते माझ्यासमोर त्यांच्या किस्स्यांचा पेटारा उघडायचे. असेच एकदा त्यांनी बालगंधर्व मंदिराचा किस्सा सांगितला. जो चित्रपटात जसाच्या तसा वापरला आहे.

सचिन पिळगांवकर यांनी सांगितले की, पुलंनी त्यांना एक किस्सा सांगितला होता. – त्यावेळी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचं नव्यानेच बांधकाम झालेलं होतं. बालगंधर्व रंगमंदिर स्थापन करण्यात पुलंचा वाटा मोठा होता. त्यावेळी तिथल्या काही प्रमुख लोकांनी पुलं देशपांडेंना ते नवीन बालगंधर्व रंगमंदिर बघण्यासाठी बोलावलं होतं. पु. ल. देशपांडे बालगंधर्व रंगमंदिर बघायला गेले. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुलं देशपांडे कोण आहेत हे माहिती नव्हतं. पुलं देशपांडे माहिती नाही इथपर्यंत ठीक होतं मात्र बालगंधर्व कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं.

पुलं आणि बालगंधर्व अशा दोन्ही नावांबद्दल त्यांना माहिती नव्हतं आणि ओळखीचा तर प्रश्नच नव्हता. मग त्या कर्मचाऱ्याने पुलं देशपांडेंना आणि काही पाहुण्यांना सोबत घेऊन बालगंधर्व रंगमंदिर आतून दाखवण्यास सुरवात केली. आतून बांधलेलं भव्य बालगंधर्व रंगमंदिर बघून सगळे खुश झाले. उत्साहाने सगळे नाट्यगृह बघून आले आणि बालगंधर्वांच्या चित्राजवळ येऊन थांबले. त्या कर्मचाऱ्यांना बालगंधर्व माहित नव्हते. पुलंना ओरिजिनल पुरुषी पोषाखातला फोटो दाखवून तो म्हणाला ” हे बालगंधर्व.” आणि मग शेजारच्या बाईच्या वेषातल्या बालगंधर्वांकडे बघून तो म्हणाला, ” आणि या मिसेस बालगंधर्व.”
सचिन यांनी हा किस्सा ऐकला तेव्हा त्यांच्या अशी ही बनवाबनवीची घोषणा झाली होती. आणि या किस्स्यांमधून त्यांना त्यांच्या चित्रपटातील एक सीन मिळाला होता. चित्रपटातील एका सीनमध्ये सुशांत रे म्हणजे शंतनू म्हणतो कि दादा या मिसेस बालगंधर्व का ? तेव्हा अशोक सराफ म्हणजे धनंजय माने म्हणतो कि हळू बोल कुणी ऐकलं तर मारतील. मग पुढे सांगतात कि स्त्री भूमिका करणारा असा नट दुसरा झाला नाही.

ऑल राउंडर पु. ल. - (नरहर कुरुंदकर)

आमचे मित्र पु. ल. देशपांडे हे मराठी जीवनातील एक दृष्ट लागण्यासारखे व्यक्तिमत्त्व आहे. सिनेमा उद्योगात पु. ल. ज्या वेळी शिरले त्या वेळी क्रमाने 'ऑल राउंडर' होण्याचा त्यांनी प्रयल केला. ते नट होते, दिग्दर्शक होते, पटकथा-लेखक, संवादलेखक, गीतकार, संगीत-दिग्दर्शक अशा नानाविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शेवटी 'गुळाचा गणपती' सारखा एक चित्रपट तर असा आहे की ज्याचे नायक, दिग्दर्शक, पटकथालेखक असे अनेक विभाग एकट्याने सांभाळून पु. लं. नी एकखांबी तंबू तयार केला.

प्रतिभेचा चौरसपणा
नाटकाच्या क्षेत्रात ते पुन्हा नाटककार, नट, कुशल दिग्दर्शक या सर्व भूमिकांतून चमकलेले आहेत. पडदे ओढणारा आणि प्रॉम्प्टरपासून नाटककार आणि प्रमुख नट इथपर्यंत त्यांचा संचार चालतो.

संगीताच्या क्षेत्राशी पु. लं. चा घनिष्ठ संबंध आहे. गायनाचा क्लास कोण्या एकेकाळी त्यांच्या चरितार्थाचा विषय होता, गायनातील नानाविध बारकावे, हरकती त्यांच्या हातात व गळ्यात मुरलेल्या आहेत. संगीताचा विवेचक अभ्यासही त्यांनी बराच केला आहे. यादृष्टीने श्री. मारुलकर यांच्या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना पाहण्याजोगी आहे.

रेडिओ आणि टेलिव्हिजन यांचेही तज्ज्ञ म्हणून पु. लं. कडे पाहिले जाते. ते कलावंत आहेत तसेच हाडाचे रसिक आहेत. केशवराव भोळे, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व यांच्याविषयी त्यांनी लिहिलेले लेख त्यांच्या अस्सल रसिकतेची साक्ष पटवतील. हाडाचा कलावंत आणि तितकाच दिलदार रसिक हा योग फार क्वचित जुळणारा असतो. इतरांच्या क्षेत्रांत पु. लं.चा शिरकाव आहे. तसे त्यांचे स्वतःचे एक खास क्षेत्र आहे. एकपात्री प्रयोग सौ. मुळगावकरही करतात; पण 'बटाट्याची चाळ'ला जे प्रायोगिक आणि कलात्मक यश आले त्याला महाराष्ट्रात तर दुसरी तोड सापडणे कठीण आहे. लक्ष्मी आणि सरस्वती यांचे वाकडे आहे असे म्हणतात. व्यवहारी न होता व्यवहार सांभाळणे, अस्मिता न सोडता धन पायाशी खेचून आणणे आणि जीवनाचा रसिक आस्वाद घेऊन कंटाळण्याचे निमित्त सांगून गर्दीत चालणारे एकपात्री प्रयोग बंद करणे हे भाग्य मराठीत फक्त पु. लं. नाच मिळाले. छापलेल्या कथा केवळ वाचून दाखविण्यासाठी हजार रुपये मागणारे जसे पु.ल.च, तसे चाळीस हजार रुपये रक्तपेढीला देऊन मराठी साहित्यिकांचा साहित्य सेवेवर घडलेल्या दानाचा उच्चांक निर्माण करणारे पुन्हा पु.ल.च !

याखेरीज ते साहित्यिक आहेत नाटके, एकांकिका, विनोदी लेख, व्यक्तिरेखा, प्रवासवर्णने आणि गप्पाशप्पा हा पसारा तर आहेत; बाजूला विविध विषयांवर त्यांचे फुलणारे वक्तृत्त्व आहे. इतिहास-संशोधनापासून सेवादलापर्यंत आणि चित्रकलेपासून रक्तपेढीपर्यंत जागृत नागरिकांची सर्व कर्तव्ये सांभाळणारे, ज्ञानाविषयी आस्था असणारे आणि कलांची आस्था असणारे चौरसपण पु. लं. ना लाभलेले आहे. याबाबत त्यांच्याशी तुलना करता येईल असा दुसरा माणूस सापडणे फार कठीण

पु. लं. भोवतीचे कुंपण
एवढा मोठा चौरसपणा माणसाचा व्याप वाढवतो, आवाका वाढवतो तसाच त्याच्या मर्यादाही निर्माण करतो. पु. लं. ना. आता अशा मर्यादा निश्चित पडलेल्या आहेत. या मर्यादाच्यावर मात करण्याची फार मोठी सुप्त शक्ती त्यांच्याजवळ आहे, हे खरे असले तरी ठिकठिकाणी पडलेल्या मर्यादा ओलांडण्याची जिद्द आणि इच्छा त्यांच्याजवळ किती आहे हाच एक महत्त्वाचा प्रश्न होऊन बसला आहे. नानाविध वाटांनी फुलणारे विस्तृत व्यक्तिमत्त्व हेच आता पु. लं.च्या भोवती कुंपण होऊन बसले आहे. या कुंपणावरून किती वेळा बाहेर उडी घेणे पु. लं. ना जमेल याचे उत्तर त्यांनी स्वतः द्यायचे आहे.

गौरव हाच शत्रू
महाराष्ट्राचे विनोदकार म्हणून सर्वत्र पु. लं. चा गौरव होत असतो. हा गौरवच या माणसाचा शत्रू ठरेल की काय अशी मला भीती आहे. मराठीतील विनोदाची परंपरा प्रामुख्याने बौद्धिक व रूक्ष आहे. न आवडणाऱ्या समाजविघातक घटनेची विविध प्रकारे चेष्टा करणे, टर उडविणे, रूढींना हास्यास्पद करून टाकणे किंवा दाखविणे असे आरंभीच्या मराठी विनोदाचे स्वरूप आहे. विनोद कोटीनिष्ठ असो, प्रसंगनिष्ठ असो की स्वभावनिष्ठ असो हास्यास्पद करून दाखविणे या जिद्दीची मर्यादा विनोदाला पडली आहे. कोल्हटकरांच्या सारख्या विनोदकाराच्या लिखाणात आपण हिंदूसमाजातील रूढींना हसतो. गडकरी आणि चि. वि. जोशी यांचा विनोद पाहत असताना आपण फजित झालेल्या, बावळट ठरलेल्या माणसाला हसत राहतो. कधी कधी एखाद्या कोटीमुळे लक्कन जाणवणाऱ्या विसंगतीकडे पाहून आपण हसतो; पण विनोदाची ही सारी रूपे स्थल-काल-समाजाने बद्ध केलेली आणि बौद्धिक रूपे आहेत. पु. लं.च्या लिखाणातील पुष्कळसा विनोद असाच आहे. चि. वि. जोशी, गडकरी, कोल्हटकर, वि. मा. दि. पटवर्धन यांच्या विनोदाची सर्व सामध्यें पु. लं.च्या ठिकाणी एकत्रित दिसू लागतात. या अर्थाने पाहिले म्हणजे मराठीतील विनोदाच्या मागच्या सर्व परंपरांचा पु. लं.च्या ठिकाणी समुच्चयाने आढळ दिसून येतो, पण असे असूनही चि. वि. जोशी किंवा कोल्हटकर यांच्या विनोदाला जो भरघोसपणा आहे, तसा पु. लं.च्या विनोदाला प्राप्त झालेला दिसून येत नाही. सुटे सुटे हसण्याजोगे प्रसंग एकजीव होऊन त्यातून विनोदाचा एक सलग पट उमलावा लागतो तसा सलगपणा अजून पु. ल.त नाही. त्यांच्या विनोदाचे स्वरूप अजूनही फुटकळ आहे. हा सलगपणा न जाणवण्याचे कारण लेखकाच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अविछिन्न असणारी संगती अजून पु. लं.ना साधलेली नाही; या ठिकाणी आढळेल असे मला वाटते.

पु. ल. हे पु. ल. होण्याचे टाळत आहेत
पण माझी खरी तक्रार ही नाही. पु. ल. देशपांडे यांना चि. वि. जोशी, कोल्हटकर होता आले असते; पण तसे ते झाले नाहीत ही खरोखरी तक्रारच नव्हे. कारण पु. लं. नी कोल्हटकर, चि. वि. जोशी व्हावे अशी आमची इच्छाच नाही. माझी मुख्य तक्रार आपल्या नानाविध घाईगर्दीत पु. ल. हे स्वतः पु. ल.च होण्याचे टाळत आहेत, ही आहे. स्थळकाळाने आणि समाजाने, रूढींनी बंदिस्त केलेला असा माणूस असतोच; पण याच्यापलीकडे माणसाचे माणूसपण दडलेले असते. रूढींनी निर्माण झालेली परिहार्य मानवी दुःखे, वेदना असतातच; पण माणसाच्या माणूसपणामुळेच निर्माण झालेली दुःखे ही अधिक खोल व थक्क करणारी असतात. वेदनेचा हा मूलकंद जसा माणूसपणाच्या गाभ्यापर्यंत जाऊन भिडलेला असतो तिथेच हास्याचाही मूलकंद जाऊन भिडला पाहिजे. भावनेच्या पातळीवर विषण्ण होणे, सुन्न होणे हे जसे माणसांनाच शक्य आहे तसे हसणेही माणसांनाच शक्य आहे. जनावरांच्यासाठी 'Pain' आहे पण 'Sorrow' नाही आणि 'Pleasure' आहे पण 'Laughter' नाही. माणसाच्या माणूसपणाच्या साक्षीदार असणाऱ्या या मूलभूत ठिकाणापर्यंत जेव्हा विनोद जातो त्या वेळी तो वेदनेत, अनुकंपेत भिजून चिंब झालेला असतो. सहानुभूती, हळुवारपणा, दुःख, अनुकंपा, कीव ही ज्या विनोदाचा पाया आहे त्याचे स्वरूप मग केवळ बौद्धिक राहत नाही; ते तर्काची दारे ओलांडून आत्म्याइतके खोल जाते आणि वेदनेच्या दर्शनाप्रमाणेच एकाच वेळी माणसाला उल्हसितही करते आणि गुदमरूनही टाकते. मराठीला अनोखी असणारी विनोदाची ही पातळी पहिल्यांदा पु. लं.नी गाठली. या पातळीवर स्थिर होणे त्यांना जमत नाही; किंबहुना हे करणे त्यांना मनापासून फारसे महत्त्वाचे वाटत नाही, अशी माझी तक्रार आहे. या आपल्या हक्काच्या वैभवासाठी जागेवर पाय रोवून घट्ट उभे राहण्याइतकी पु. ल. स्थिरताच दाखवायला तयार नाहीत. त्यामुळेच त्यांचा चौरसपणा त्यांचा शत्रू होईल की काय, व्यापकपणा कुंपण होईल की काय अशी मला भीती वाटते.

पु. लं. चा मराठीत विनोदकार म्हणून गौरव होत असताना त्या विनोदाचे हे स्वरूप प्रायः कुणी लक्षात घेत नाही. कुठलाही विनोदकार चमकदार बुद्धीचा आणि मिष्किल असतो. तसा बौद्धिक चमकदारपणा व मिष्किलपणा पु. लं.च्या जवळ आहे; पण कोल्हटकरांच्या विनोदाचा रोख अंधःश्रद्धांनी जखडलेल्या समाजाला परंपरांची हास्यास्पदता दाखविण्याकडे होता. एका दृष्टीने त्या विनोदाचे प्रयोजन पुढे नेणे असे होते. पु. लं. चा विनोद यापेक्षा निराळा आहे. पुढे जाता जाता ज्या वेळी माणूस यंत्रच होऊ लागतो, त्याचे जीवन पोकळ होऊ लागते आणि निवडुंगाला कॅक्टस म्हणून कुंडीत जपण्याची व त्या आधारे आपली कलाप्रीती दाखवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा या माणसाला 'थोडे थांब या पळण्याच्या घाईत सर्वस्वी पोकळ यंत्र आणि माणुसकीला पारखा होऊ नको असे सांगावे लागते. पु. लं. च्या विनोदाला हह्यामुळे सनातनीपणाची झाक येते असाही आक्षेप कधी कधी ऐकू येतो; पण पुढे जाणे अगर थांबणे या दोन्हींचाही हेतू माणसाच्या स्वाभाविकपणाला असणारे अडथळे दूर करणे इतकाच आहे हे ध्यानात घेतल्यावर सनातनित्वाचा आक्षेप अनाठायी वाटू लागतो. पण खरे म्हणजे शिष्टाचारांच्या विळख्यात जे गुदमरणे आहे ते आक्रंदन पु. लं. च्या विनोदातून मिष्किलपणे साकार होत असते. याहीपेक्षा खोल जाण्याची शक्ती पु. लं. च्या ठिकाणी आहे. वेदनेच्या तळ्यावर मधूनच लाटा उसळाव्यात तसे त्यांच्या विनोदाचे स्वरूप काही ठिकाणी दिसते.

दुःखाचे चित्रण
असा लेखक दुःखाचे चित्रणही फार सामथ्यान करीत असतो. यापूर्वी मराठीत हा चमत्कार गडकऱ्यांनी करून दाखविला आहे. उत्कट दुःख आणि हास्याचा खळखळाट सारख्याच सामथ्यर्थाने गडकऱ्यांच्या नाटकांतून दिसू लागतो. हा पाहून आपण फार तर असे म्हणू की गडकरी ढसढसा रडवू शकत होते आणि खदखदा हसवू शकत होते. दुःख आणि हसू यांचे प्रांत जीवनात इतके वेगळे नाहीत. ज्या ठिकाणी हसणे आणि रडणे या दोन्ही गोष्टी एकच होऊन जातात तिथे आपण जीवनाच्या आकलनात अधिक खोलवर जाऊन पोचलेलो असतो. कधी यातील हास्याचा पापुद्रा एकदम विरळ होऊन जातो आणि मग दुःखाचा सूक्ष्म पण उत्कट आविष्कार प्रभावीपणे जाणवू लागतो. व्यक्ती आणि वल्लीतील 'अन्तू बर्वा' सारखी व्यक्तिरेखा अशी आहे. या व्यक्तिरेखेचा आस्वाद घेताना आपण हसतो आहोत की विषण्ण होतो आहोत, भाबडे प्रेम पाहताना आपण हळुवार होत आहोत की अन्तू बर्व्याची आविष्कारशैली पाहताना आपण 'सिनिकल' होत आहोत हे कळणेच कठीण होऊन जाते. हसता हसताच एकाक्षणी आपल्याला हे लक्षात येते की, आपण हसत नव्हतोच. आपण हा माणूस पाहून सुत्र होत होतो. अंतूची जीवनगाथा ऐकत असताना कणवेचा एक थेंब डोळ्यांत जमू लागतो आणि आपल्या दारिद्र्यावरचे विदारक भाष्य जेव्हा अंतू सांगू लागतो त्या वेळी हा थेंब वाफ होऊन उडून जातो. 'व्यक्ती आणि वल्ली'तील सर्वच व्यक्तिरेखा वाचताना हा अनुभव येतो असे नाही, पण जे अन्तू बर्व्यात साधले आहे ते. इतरत्र बोटातून निसटून गेले ही जाणीव पु. लं.ना कितीदा असते हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या 'सोत्वन' सारख्या एकांकिकेत विनोदाचा हा पापुद्रा अगदी विरविरीत दिसू लागतो आणि मग सर्व प्रतिष्ठा आणि सुख यांनी घेरलेल्या माणसाचे गुदमरून गेलेले दृष्य त्या ठिकाणी साकार होऊ लागते. 'सांत्वन' मधील चित्रण वेदनेच्या बाजूला थोडे अधिक झुकले आहे असे आपण म्हणू शकू तर 'असा मी असा मी'तील चित्रण उथळ हास्याकडे फारच झुकले वा कलले आहे असे आपण म्हणू, अन्तू बर्वा काही जणांना एकदम स्थूल वाटू शकेल. पु. लं.नी निर्माण केलेल्या कलाकृतींच्या यशापयशाविषयी मतभेद होऊ शकतील; पण या ठिकाणी सहानुभूतीच्या कवडशात थरथरणारा अश्रू हाच विनोद म्हणून उभा करण्याचा एक विलक्षण नाजूक प्रयोग घडतो आहे यावर फारसा मतभेद होणार नाही. अशा विनोदाचे आकलन प्रामुख्याने भावनिक असते व ते एकदम माणुसकीच्या गाभ्याजवळ नेते असा माझा मुद्दा आहे. पु. लं.नी केलेल्या या प्रयोगाकडे त्यांना विनोदकार म्हणताना फारसे लक्ष कधी जातच नाही.

(अपूर्ण)
लेखक - नरहर कुरुंदकर 
पुस्तक -  रंगविमर्श

Saturday, March 23, 2024

असा मी... असा मी (उरलंसुरलं)

पूर्ण नाव : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

पत्ता : पुणे ४ (एवढ्या पत्त्यावर पत्र येतं . सगळा पत्ता दिला तर पाहुणे! पुणेकर सुज्ञास अधिक काय सांगावे?)

शिक्षण : शाळा कॉलेजात गेलो पण ' शिक्षण ' झाले असे ठामपणे म्हणता येणार नाही .

व्यवसाय : सुशिक्षित बेकार

फावल्या वेळचे छंद : मुख्य छंद , झोप काढणे .वेळ उरल्यास अधिक झोप काढणे

महत्वाकांक्षा काय होती : प्रथम , कोहिनुर सिनेमाचा डोअरकीपर ! नंतर फिल्म सेन्सॉर बोर्डाचा सभासद

महत्वाकांक्षा पूर्ण झाली का : छे !

सर्वात आनंदाचा क्षण : पुण्यातील एका दुकानदाराने मला दुकानाची पायरी चढत असताना "या साहेब" म्हटले होते, तो .

सर्वात दुःखाचा क्षण : माझ्या एका कविमित्राने स्वतःच्या कवितांचे बाड पानशेतच्या पुरातूनही सुखरूप राहिल्याचे वृत्त सांगितले तो क्षण .

देव मानता का? : अर्थातच. शंकरराव देव, यशवंत देव, रमेश-सीमा देव आणि इतर अनेक नेहमीचे यशस्वी. देव, सगळ्यांना आपण मानतो. सॉरी सॉरी. तुम्ही तो ऊपरवाला देव म्हणत असाल तर, इतकी भेसळयुक्त धान्य-तेलं-क्षणात होत्याचा नव्हता करणारी इंजेक्षनं, गोळ्या, भयानक मृत्युगोलासारखी रहदारी यांतून अद्याप जगून वाचून राहिलो आहे ते केवळ देवाच्या कृपेशिवाय इतर कशाने ?

आवडता नेता : जवळच्या रस्त्याने इष्टस्थळी योग्य भाड्यात नेणार रिक्षावाला.

आवडता राजकीय पक्ष : लवकरच स्थापन करावा म्हणतो. कसें?

आवडता लेखक: शेक्सपिअर, डॉस्टो (की दोस्तुया) व्हस्की, सार्च, काफ्का आणि 'राकेल संपले आहे' ह्या ज्वालाग्राही संगीत नाटकाचे लेखक रामभाऊ (कुलकर्णी की देशपांडे ते विसरलो.)

आवडते पुस्तक : अंकलिपी , बँकबुक , रेल्वेचे टाईमटेबल , टेलिफोन डिरेक्टरी यासारखी सामाजिक बांधिलकी असलेली पुस्तके .

आवडते नाटक: लवकरच येत आहे. तारखेकडे लक्ष ठेवा.

आवडता चित्रपट: वीररसपूर्ण 'हंटरवाली' आणि भक्तिरसपूर्ण संत यम्० यस्० रंगुअम्मा (मल्याळी किंवा तामीळ असावे.) प्रसिद्ध कुत्रपटातील 'भालू'.

आवडता कलावंत आवडता गायक / गायिका :वर्षानुवर्षे तेच राग आणि त्याच चिजा म्हणणाऱ्या गवयांप्रमाणे गळा काढून तीच मंगळाष्टके म्हणणारे भटजी.

आवडते गाणे : 'रणगगनसदनसमअमरा' आणि 'ललनामना नचअघ- नवलवशंकाअणुहि सहते करा' यांसारखी सुबोध प्रासादिक गाणी आवडतात.

आवडता मित्र / मैत्रीण : म० टा० (पत्र नव्हे मित्र). मैत्रीण? इल्ला.

आवडता पोशाख : बाराबंदी , सुरवार, चिलखत , जिरेटोप , चढाव

आवडता खाद्यपदार्थ : हवा.

आवडता खेळ : जुगार.

आदरणीय प्रतिस्पर्धी : खोमेनी.

देशाची सद्यःस्थिती : अर्थात आशादायक. एकदा एकविसावं शतक सुरू होऊ द्या, (आशादायक की निराशादायक ?) म्हणजे कळेल.

असा मी... असा मी
(संदर्भ : उरलंसुरलं)
पुलंचे हे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Tuesday, March 12, 2024

ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना !

चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांनी लिहिलेली ही कविता. याच कवितेचं नंतर अत्यंत प्रसिद्ध असं गाणंही झालं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेलं हे गीत, आशा भोसले यांनी खरोखरच असं गायलं आहे की ते
स्वरांचे घन येऊन आपल्या मनाला न्हाऊ घालतात प्रत्येक वेळी ऐकताना.

पण मुळात ही कविता आणि ती लिहिण्यामागची पार्श्वभूमी दोन्ही अतिशय उदात्त अशी आहे. एकूणच काव्य, कवी आणि कलाकार या सर्वांसाठीच या कवितेचं स्थान हे पसायदानासारखं आहे. सुनीताबाई देशपांडे यांनीच त्यांच्या 'कवितांजली' ह्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात ही हकिकत सांगितली होती.

आरती प्रभू यांच्या कविता सुरुवातीला 'सत्यकथा' या मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या आणि साहजिकच ते काव्य अत्यंत लोकप्रिय होऊ लागलं. त्यामुळे 'आरती प्रभू' या नावाला खूप प्रसिद्धी आणि वलय प्राप्त झालं. नेमक्या याच
कारणाने चिं. त्र्य खानोलकरांमधला अत्यंत संवेदनशील असा 'आरती प्रभू' हा कवी खूप अस्वस्थ झाला. त्याच मानसिक घालमेलीतून त्यांनी ही कविता लिहिली. प्रत्येक कवीने, कलाकाराने ज्या कवितेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेऊन मगच स्वतःला कलेच्या स्वाधीन करावं.

"ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना" ... प्रसिद्धी, लोकप्रियता यामुळे कदाचित माझ्या मनात अहंकार निर्माण होईल. आणि त्या अहंकाराने माझं मन मलीन होऊन जाईल, काळवंडून जाईल. अशी भीती, अशी अस्वस्थ करणारी शंका 'आरती प्रभूंच्या' मनात डोकावत होती. म्हणून त्यांनी थेट त्या दयाघनालाच साकडं घातलं की हे दयाघना; तू घनांच्या स्वरूपातून ये आणि माझ्या मनावर बरसून जा.

पण हे बरसणं फक्त भिजण्यासाठी नको... तर तू मला, माझ्या अहंकाराने मलीन झालेल्या मनाला 'न्हाऊ' घाल. आई आपल्या बाळाला न्हाऊमाखू घालते; अंगणात खेळताना, बागडताना, धडपडताना त्या बालकाचे मळलेले अंग धुवून पुसून स्वच्छ करते आणि त्याला त्याचं गोंडस, गोजिरं, निरागस रुप पुन्हा मिळवून देते. तसंच तू घनांमधून , जलधारांमधून थेट माझ्या मनात ये; आणि माझ्या मनावरची ही प्रसिद्धी, वलयामुळे साठलेली अहंकाराची पुटं धुवून टाक. मला पुन्हा एकदा शुद्ध, निर्मळ, निरागस रुप हवं आहे.... म्हणून... "ये रे घना, ये रे घना".

"फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू. नको नको म्हणताना, गंध गेला रानावना" ... 'माझ्या कविता', त्यातून व्यक्त होणाऱ्या माझ्या भावना; या अगदी तरल आहेत, नाजूक आहेत. खरंतर त्या भावना इतक्या हळूवार आहेत की
त्यांना फक्त 'अळुमाळू' याच शब्दात व्यक्त करता येईल. हा अळुमाळू शब्द; ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओवीमध्ये वापरला आहे. कारण तो नाजूकपणा फक्त स्पर्शाचा भाव नाही; तर ते शुद्धतेचं, पावित्र्याचंही विशेषण आहे.

म्हणून 'आरती प्रभू' म्हणतात की; माझ्या ह्रदयस्थ भावनांमधून उमललेली ही काव्यपुष्पं; ह्या लोकप्रियता, प्रसिद्धी आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अहंकार आदी ऐहिक वाऱ्याने चुरगळून जातील, विस्कटून जातील. आणि मी त्या
काव्यसुमनांना 'नको नको' म्हणतच होतो. मी स्वतःहून कधीच प्रसिद्धीच्या, लोकप्रियतेच्या वाऱ्यालाही उभा राहिलो नाही. पण ... त्या कवितेतील भावफुलांचा गंध ! तो गंध कसा लपवून ठेवू... ! मी माझी ह्रदयस्थ कविता
कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही याची काळजी घेतली तरीही तो 'गंध' , तो भावगंध सर्वदूर पसरलाच आहे ! मग आता मी काय करू... म्हणूनच ... "ये रे घना, ये रे घना".

"टाकुनिया घरदार, नाचणार नाचणार; नको नको म्हणताना मनमोर भर राना" ... कविता, काव्यउर्मी, काव्योन्मेष, या गोष्टी अशा आहेत की त्यांना कसलंच भान नाही, कसलीच बंधनं नाहीत. स्वयंभू, स्वच्छंदी अशा भावना आहेत या. "नभ मेघांनी आक्रमिले" या अवस्थेत मोर जसे धुंद, मुग्ध होऊन, पिसारा फुलवून नृत्य करणारच. अगदी तसंच एखादी प्रतिभेची श्रावणसर आल्यावर माझ्या मनातले भावमयुर त्यांचा काव्यपिसारा फुलारून नवनिर्मितीच्या रानावनात मुक्त संचार करणारच !

तेव्हा ते माझं काही एक ऐकत नाहीत. आणि मग त्यांच्या या भावमुग्ध अविष्काराने रसिकजनांचं लक्ष आपोआपच वेधून घेतलं जातं. दयाघना... मला भीती वाटते रे... माझ्या या मुक्तमयुरांना कोणी कैदेत तर नाही ठेवणार ना,
काहीतरी व्यावहारिक आमिष दाखवून त्यांचं स्वातंत्र्य हिरावून तर नाही घेणार ना ! म्हणूनच... तू...
"ये रे घना, ये रे घना".

"नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू; बोलावितो सोसाट्याचा वारा मला रसपाना" ... हा कसा पेच निर्माण झाला आहे ! कितीही नको नको म्हटलं तरी तो काव्यगंध रानवाटांनी पसरणारच आहे. शब्दमाधुर्यातून गुंजारव करणारे आर्त सूर एखाद्या वेणूच्या नादलहरींसारखे विहरत, लहरत कानोकानी पोहचणारच आहेत. आणि मग या साऱ्या शब्दलाघवाचा, भावोन्मेषाचा उगम शोधत शोधत तो प्रचंड लोकप्रियतेचा, प्रसिद्धीचा, लोकाभिमुखतेचा वारा ; अनिवार होऊन माझ्या दिशेने येणारच आहे.

त्या सोसाट्याचा वाऱ्यावादळात मी माझी ही काव्यवेल कशी सांभाळू ! त्या सोसाट्याचा वाऱ्याबरोबर जी प्रतिष्ठेची अहंकारमिश्रीत धुळ उडून येईल; ती या डोळ्यांवाटे माझ्या मनापर्यंत पोहचली तर ... काय करू ! माझी फुलं
कोमेजून जातील ना; चुरगळून जातील ना !म्हणूनच... "ये रे घना, ये रे घना; न्हाऊ घाल माझ्या मना"...

मनामध्ये अशी भावकोवळीक असलेला हा 'आर्ततेचा प्रभू' अवघ्या सेहेचाळीस वर्षात स्वतःच त्या दयाघनाला भेटायला निघून गेला. कदाचित स्वतःच्या 'अळुमाळू' भावसुमनांनी त्या प्रतिभेच्या दात्यालाच न्हाऊ घालण्यासाठी
गेला असावा हा 'प्रभू' ... आवाज चांदण्यांचे ... अजूनही ऐकू येतात मात्र इथेच ठेवून गेला... आपल्यासाठी.

रसग्रहण : रोहित कुलकर्णी

Saturday, January 20, 2024

अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना

शांता शेळकेंनी श्री. म. माटेंना एकदा विचारलं होतं 'माणसाचं आयुष्य किती?' माटेंचं उत्तर होतं, "माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं...!"

या अर्थानं‌ अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी ! ही नावंच मुळी मराठी मनांच्या सुगंधी कप्प्यात आदरानं विसावली आहेत. दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात उच्च दर्जाची मुशाफिरी केली व रसिकजनास न्हाऊन काढलं!

एकदा नांदेडच्या नाट्यसंमेलनात आचार्य अत्रे आणि पुलं देशपांडे एकाच व्यासपीठावर ! मराठवाड्यातल्या रस्त्यांची तत्कालीन अवस्था दारूण अशी होती. रस्त्यावरचे खड्डे, प्रचंड धूळ यांमुळे अत्रे वैतागले होते. त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ टीका केली. कोडग्या राजकारण्यांची चामडी सोलणं काय असतं तेच श्रोत्यांनी अत्र्यांच्या वाग्बाण आणि वाक्ताडनातून जाणलं.

अत्रेंनी तोंडसुख घेऊन झालं आणि तत्पश्चात पुलं भाषणासाठी उभे राहिले व ते म्हणाले,
‘‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्या आचार्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजीमहाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्यांच्यातील माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे, असेच वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाड्यात अत्रेसाहेब आपण आहात.’’

टाळ्यांचा कडकडाट ! 

नियमावली किंवा आचारसंहित किंवा सभाशास्त्राचे सर्व नियम मोडून अत्रे उभे राहिले व पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे".अत्र्यांच्या नंतर अवघा महाराष्ट्र निरंतर हसवण्याचे काम पुलंनी चोख केले!

गुणि गुणं वेत्ति, न निर्गुणा
तेथे माझे जुळती
लेखक : अज्ञात
मूळ स्रोत
https://anandghare.wordpress.com/