Thursday, December 31, 2020

एक कलाकर एक संध्याकाळ - पु. ल. देशपांडे (चतुरंग प्रतिष्ठान)

"चतुरंग प्रतिष्ठान" या नामांकित संस्थेने पुलंच्या मुलाखतीचे दोन वेळा कार्यक्रम केले. "एक कलाकर एक संध्याकाळ"च्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाच्यावेळी रवींद्र नाट्यमंदिर येथे जानेवारी १९८७ मधे रंगलेल्या मुलाखतीतला हा काही भाग. हे रेकॉर्डिंग बरेच जुने आहे त्यामुळे थोडे लक्षपूर्वक ऐकावे लागते. ही मुलाखत "चतुरंग प्रतिष्ठान"चे आणि श्री आशुतोष ठाकूर ह्यांचे आभार मानून, चतुरंगचे श्री. निमकर यांच्या परवानगीने रसिकांसाठी उपलब्ध करत आहोत.



अश्या पुलंच्या अनेक अप्रतिम व्हिडियोज साठी आपल्या युट्युब चॅनल सबस्क्राईब करा. - > https://www.youtube.com/channel/UCpUM2b3QjXXWgmgt-Dqa-dQ


Tuesday, December 29, 2020

हिशेबी माणूस

अरसिकाला कविस्य निवेदन करण्याचा प्रसंग माझ्या कपाळी लिहू नकोस असं कोण्या संस्कृत कवीनें परमेश्र्वराला त्रिवार बजावून ठेवले आहे. पण प्रत्येक गोष्ट जेथल्या तेथें ठेवण्याचे वेड असलेल्या माणसाकडून आपल्या व्यवस्थितपणाची निवेदने ऐकण्यापेक्षा ते काम किती तरी सुसह्य म्हणावे लागेल.

फार दिवसांपूर्वीची आठवण आहे. एका मित्राबरोबर त्याच्या एका वृद्ध नातलगांच्या घरी गेलो होतो. माझं काहीच काम नव्हतं. माझ्या मित्राला कांही निरोप वगैरे सांगायचा होता. दारांत शिरतांनाच फाटकावर बोर्ड होता – ‘आत येणाऱ्याने फाटक लावून घेण्यास विसरूं नये.’ मनांत विचार आला आत येणाऱ्याने जर विसरूं नये तर बाहेर जाणाऱ्याने विसरले तर चालेल काय? मी न विसरता बागेचे फाटक लावून घेतले. आतल्या बाजूने बोर्ड होता ‘बाहेर जाणाऱ्याने फाटक लावून घेण्यास विसरूं नये.’ ‘मनुष्यस्वभावाचा काय सूक्ष्म अभ्यास आहे.’ मी मनात म्हणालो, दाराशी आलो. वर्दी देण्याच्या घंटीखालीच एक चिठ्ठी चिकटविलेली होती. ‘घंटी एकदाच वाजवावी.’ माझ्या मित्राने घंटी एकदाच वाजविली. काही वेळाने दार उघडले गेले आणि एका नोकराने दार उघडले. मी ‘पायपुसण्यावर येथे प्रथम उजवा व नंतर डावा पाय पुसावा’ अशी कुठे पाटी आहे की काय हे पहात पाय पुसले. वास्तविक पाय पुसून जायची मला मुळीच सवय नाही; परंतु मला कुठेही टापटीपीचा वास आला की मी आपला त्या घरांत शिरतांना पायपुसण्याला पाय पुसून टाकतो.

त्या बंगल्यांत शिरतांनाच ह्या बेहद्द व्यवस्थितपणाचा मला चांगला अंदाज आला होता. कारण बागेतल्या प्रत्येक कोपऱ्यांत ‘फुलांना हात लावूं नये’ ही पाटी होती. मालकांच्या नांवाची पितळी पाटी चकचकीत पुसली होती आणि ‘आहेत नाहीत’ पैकी ‘आहेत’ हे ठळक दिसत होते. त्या अक्षरांवरचे ढांपण अर्धवट सरकलेल्या अवस्थेत नव्हते. फाटकापासून बंगल्यांत शिरेपर्यंत तीन ठिकाणी ‘येथे घाण करू नये’च्या पाट्या होत्या. त्यानंतर मी त्या दिवाणखान्यांत शिरतां शिरतां आणखी कांही अंदाज केले. उदाहरणार्थ, दिवाणखान्यातल्या पुस्तकांच्या कपाटावर ‘ही पुस्तके वाचावयास मागू नये’ ही पाटी आहे की नाही हे पाहिले. ती होती. दाराखिडक्यांना डांस शिरूं नयेत म्हणून जाळ्या मारलेल्या होत्या. भिंतीवरच्या फोटोवर ते केव्हां व कुठे काढले गेले ह्यांच्या तारखा होत्या. आणि वर्तमानपत्रावर मालकाचे नांव लिहून ठिकठिकाणी तांबड्या पेन्सिलीने खुणा केल्या होत्या. वास्तविक ह्या गोष्टींचा मला अंदाज असता तर मी त्या दिशेला फिरकलोही नसतो. पण बाहेर मित्र भेटला, त्याला चहा प्यायला चलण्याचा आग्रह केला आणि त्याने जरा ह्या म्हाताऱ्याला एक निरोप सांगून लगेच सटकू असे म्हटले म्हणून त्याच्या बरोबर त्या नीटनेटक्या बंगल्यांत शिरलो – मालक येईपर्यंत त्याच्या चेहऱ्याचा अंदाज करीत बसलो.

बहुधा असली माणसें काटकोळी असतात- गाल खप्पड हे हवेतच. त्याशिवाय स्वभावाच्या खडुसपणाला धार येत नाही. कपाळ हे आठ्यांसाठी घडवलेले इंद्रिय आहे हा तसल्या मंडळींचा ठाम विश्र्वास असतो. हसणे ही क्रिया ह्या जगात का घडावी याची तिथं विवंचना असते. बहुधा जुना शर्ट त्याची कॉलर कापून आणि लांब हाताचे अर्धे हात करून घरांत घालण्यासाठी म्हणून वापरण्याची प्रवृत्ती असते. वयपरत्वे ह्यांत फरक पडतो, परंतु साठीच्या पुढला प्रकार असला आणि विधुरावस्था असली तर पायांत खडावा घालण्याची विशेष प्रवृत्ति असते. मी अशा प्रकारच्या ह्या मनुष्यविशेषाची कुंडली मनाशी मांडीत असतां दारांत काही तरी खुडबुडले आणि एक साठीच्या घरांतले वृद्ध गृहस्थ आंत आले, माझ्या मित्राने तोंडांतून तीनचार शब्द सांडण्याचा एक दुबळा प्रयत्न केला. ‘कुणीही यायला माझी हरकत नाही. पण आधी कळवलेले असावे, मी एकच कप चहा करायला सांगितला आहे-’

‘छे छे... आपण चहाची तकलीफ कशाला घेता? नाही तरी मी चहा घेत नाही’ मी उगीचच प्रकरण सांवरून घेतले.
‘प्रश्न तुमच्या चहाचा नाही. ह्याने माझी चार वाजताची अपॉइंटमेण्ट घेतली होती. तसा तो पांच मिनिटे उशीरा आला आणि बरोबर मला न सांगता तुम्हाला घेऊन आला.’

‘आपलं काय बोलणं व्हायचं असेल तर ते होऊं दे. मी बाहेर जातो.’

‘प्रश्न तुमच्या बाहेर जाण्याचा नाही आहे.’

प्रश्न मी चहा पिण्याचाही नव्हता – बाहेर जाण्याचाही नव्हता – कसलाच नव्हता. प्रश्न होता एकच-म्हणजे आपण अत्यन्त हिशेबी आहो-व्यवस्थित आहो, त्या हिशेबीपणापुढे, व्यवस्थितपणापुढे जगांतल्या कुठल्याही गोष्टीची मला पर्वा नाही हे ठसवण्याचा. पुढली पंधरा वीस मिनिटें ही माझ्या आयुष्यांतली एकाद्याचा गळा दाबून तिथल्या तिथे मुडदा पाडून टाकण्याची अनिवार इच्छा दाबून टाकण्याच्या प्रयत्नांची शिकस्त करण्यांत गेली. तो म्हातारा ‘माझं असं आहे’ ‘मी म्हणजे असा’ ‘मीं एकदां असं म्हटलं कीं असं झालंच पाहिजे’ ‘मी-मी-मी-मी’ करीत नुसता छळत होता. ‘मला गैरहिशेबी कारभार अजिबात आवडत नाही.’ ‘तुम्ही मला विचारा कीं एकोणीसशें तेवीस साली मी अकरा वाजतां काय करीत होतो, मी दोन मिनिटाच्या आंत सांगू शकतो...’ तिथे ह्या माणसाची पाठ मला कशी सडकवता येईल याचा विचार होता माझ्या मनांत. मी तो एका केविलवाण्या स्मिताखाली दडपून गप्प बसलो.
‘गप्प बसूं नका... विचारा...’ तो कडाडला. ‘हो हो,’ मी आपलं काही तरी बोलायचं म्हणून बोललो.
‘हो हो नकोय मला. मला प्रश्न हवाय.’

मी नाइलाजाने त्याला प्रश्न विचारला. म्हातारा एकदम एका कपाटापाशी गेला. त्यांतून त्याने एक डायरी काढली. टेबलावर ओला स्पंज होता. त्याने डायरीची पानें उलटली आणि वाचून दाखवले- ‘हं... अकरा जून एकोणीसशे तेवीस. आदल्या दिवशी म्हणजे दहा तारखेला विट्याहून अष्ट्याला बदली झाल्याचा हुकूम आला होता. सबरजिस्ट्रार होतो आम्ही तेव्हां... अकरा वाजतां बैलगाडीवाल्यापाशी विट्याहून अष्ट्याला सामान नेण्याचे दर ठरवीत होतो. काय?’

मी मनांत म्हणत होतो त्या बैलगाडीला ह्यालाच जोडण्याची परमेश्र्वराने योजना केली असती तर काय बिघडले असतें!

बऱ्याच लोकांची हिशेबीपणाची, म्हणजे पैशाचा हिशेबीपणा, अशी कल्पना असते. पैशाचा हिशेबीपणा हा हिशेबी स्वभावांतला एक अत्यंत गौण तपशील आहे. चिक्कू स्वभावाच्या माणसाची चेष्टा तरी करता येते. ही माणसे आपला हिशेबीपणा लपवण्याची पराकाष्ठा करतात. आमचा एक रुपये-आणे-पै न्याहाळीत बसणारा मित्र आम्हांला आज कित्येक वर्षे हॉटेलांत नेऊन मनसोक्त खायला घालणार आहे. आम्ही जवळ जवळ रोज त्याची ह्या विषयावरून चेष्टा करतो. पण तो ज्या दिवशी आम्हांला ही पार्टी देईल त्याच दिवशी आमचा आनंद नष्ट होणार आहे. आम्हांला त्याचा चिक्कूपणा उघड करण्यांत जो आनंद आहे तो त्याला पैसे खर्च करायला लावण्यांत नाही. आमचा चिक्कू मित्र पैशांत हिशेबी पण गाण्याच्या बैठकीला गेला तर पहाटे सहापर्यंत हलणार नाही. रात्री अपरात्री भटकायला हजर. त्याच्या बंगल्यांत फाटकच नाही.

हिशेबी म्हणून ज्याला मी म्हणतो तो हा नमुना नव्हे. या हिशेबी लोकांचा खाक्याच निराळा. पुस्तक विकत घेतल्यावर त्याला कव्हर घालून, विकत घेतल्याची तारीख लिहून ‘पुस्तके मागूं नयेत’च्या कपाटांत ठेवणारी ही माणसं. आपल्या वाण्याची, दूधवाल्याची, घरवाल्याची बिलं बरोबर एक तारखेला पोहोचतात या अहंकारात असणारी ही माणसं. सकाळी पांच वाजतां उठून रात्री नवाच्या ठोक्याला झोपणारी ही माणसं आणि ज्यांच्या बोलण्यांत सदैव पोवाडेवाल्यांच्या ‘जी जी र जी जी’ सारखी ‘मी मी रे मी मी’ ची झील धरलेली असते. असली ही हिशेबी माणसं- जे घड्याळाचे गुलाम आहे – ज्यांच्या जेवणाशी भुकेचा संबंध नसतो आणि पिण्याशी तहानेचा संबंध नसतो- जे सकाळी दहा ही जेवणाची वेळ समजतात आणि कुठल्याशा आहारशास्त्राच्या चोपड्यांच्या आधाराने जे नाकांतून पाणी पितात – ज्यांच्या बगीच्यातल्या फुलांनी कुटुंबांतल्या लेकीसुनांच्या वेण्या सजत नाहीत – जे गुलाबाचा गुलकंद करतात, दारींचा मोगरा माळ्याला विकतात, ते हे महाभाग. नियमितपणा म्हणजे सर्व काही असे समजतात आणि प्रत्येक गोष्टीची आपल्या डायरीत नोंद करतात. त्यांनी लाथेने बिछाना उलगडून त्याच्यावर अंग टाकण्याची मजा अनुभवली नाही. पहांटे फिरायला जाऊन उषेची स्वप्नं न्याहाळली नाहीत – जे नदीच्या घाटावर पोहायला गेले परंतु पाण्यात घागर बुडवून कसल्यातरी गोड विचारांत भरल्या घागरीचा भार विसरलेल्या जलवाहिनीच्या दर्शनाने क्षणभर घाटावर रेंगाळले नाहीत ते हे लोक. कारण त्यांनी ‘आठ ते आठ पंधरा – नदीवर स्नान’ हा फक्त हिशेब मांडलेला आहे. ही माणसं नियमितपणाने सर्व काही करतात. गाण्याला जातात. बहुधा संध्याकाळी गाणं असलं तर – आणि घरी आल्यावर वहीत मांडून ठेवतात - आज भीमपलास, पूरिया आणि यमन ऐकला. गवयाचे नांव अमुक अमुक. गायनाचे स्थळ अमुक अमुक. झोपण्यापूर्वी तीस मिनिटे वाचनही करतात. आणि साहित्याच्या आनंदात डुंबण्याऐवजी वहीत लिहितात, ‘आजचे वाचन पाने पन्नास’.

असली माणसें आपल्या पत्नीशी प्रेमालाप कसा करीत असतील हे जाणून घेण्याची मला उगीचच उत्कंठा आहे. बहुधा ते बायकोला सांगत असतील, ‘आजची वांग्याची भाजी तू सहा जूनला केलेल्या भाजीहून अर्धा चमचा मिठाने आळणी झाली होती. कोशिंबीर चांगली होती; त्यात दह्याचे प्रमाण उत्तम होते. आज संध्याकाळी तुम्ही नेसलं होतं ते नऊ एप्रिलला घेतलेलं पातळ तुम्हांला आता नेसला आहात त्या पातळाहून अधिक बरं दिसतं’ जाऊ दे. हा संवाद लांबवण्यांत अर्थ नाही. कारण रसिकतेची कमाल मर्यादा गाठणे एकवेळ शक्य आहे परंतु हिशेबीपणाचा ताळा लावणे अत्यंत अवघड! असल्या माणसांना मी भयंकर भितो. माझी सगळी शक्ती इथं जणू काय नष्ट होते – कधी वाटतं ह्या माणसांचा सणसणीत अपमान करावा पण जमत नाही. कदाचित् परमेश्वराने हा नमुना करतांना काय हिशेब करून ही मनुष्यरूपधारी यंत्रे घडवली ह्याच्या विचारानेच मी हतबुद्ध होत असेन. असल्या लोकांच्यावर कसला तरी सूड काढायचा विचार येतो.

त्या मित्राबरोबर ज्याच्याकडे गेलो होतो त्या म्हाताऱ्याला मी तसा सोडला नाही. त्याने तर माझा फारच अपमान केला होता. माझे नांव विचारण्यापूर्वी मी किती वाजतां उठतो? हा अत्यंत खाजगी प्रश्न विचारला होता. माझ्या बुशकोटांतून डोकावलेली सिगारेटची डबी पाहून ‘धूम्रपान आणि कॅन्सर’ ह्या विषयावर कुठल्या तरी मासिकांत आलेली दोन पानं माझ्याकडून वाचून घेतली होती. आणि दाढी करण्याचे एक पाते मला किती दाढ्यांपर्यंत टिकते हा प्रश्न करून त्याचं उत्तर न देता आल्याबद्दल माझीच खरडपट्टी काढली होती. त्याच्यावर सूड़ म्हणून मी जातांना त्याच्या बागेतला नळ सोडला. त्याची ‘आहेत’ ची पाटी ‘नाहीत’ केली आणि बाहेरचे फाटक उघडे टाकून रस्त्यावरची दोन बेवारशी गुरे ‘हैक हैक’ करून त्याच्या बागेत सोडली. ह्यापेक्षा मी त्याच्यावर अधिक सूड काय घेऊ शकणार होतो? तेवढ्यावरच मी खूष होतो. परंतु दोन दिवसाच्या आंतच माझ्या नांवावर एक पत्र आले. त्यांत माझ्या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करून आपल्या फाटकाचा दरवाजा मला कायमचा बंद असल्याचे कळवले होते. मात्र त्या खाजगी पत्राच्या वरच्या कोपऱ्यांत ‘जावक क्रमांक दोनशे बत्तीस’ हे लिहायला तो हिशेबी थेरडा विसरला नव्हता.

लेखक – श्री. पु. ल. देशपांडे
(आकाशवाणी, पुणे केंद्राच्या सहकार्याने)
(अंक – वसंत - १९६०)

Wednesday, November 11, 2020

पुलंवर आपलं इतकं प्रेम का?

पु.लंची आठवण काढायला काही खास दिवस यायची गरज नसते. ती रोज कुठल्यातरी प्रसंगात येतच राहाते. पण आज ८ नोव्हेंबर, पुलंची १०१ वी जयंती. त्या निमित्ताने त्यांच्याबद्दल लिहिण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही.

“महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व” ही ओळ जर माझ्या लेखात आली नाही तर कदाचित तुम्हाला पटणारच नाही की हा लेख पु.लंवर आहे. हे वाक्य फक्त पु.लं साठी राखीव आहे. त्यांच्यानंतर महाराष्ट्रात एकही इतकं लाडकं व्यक्तिमत्व झालेलं नाही आणि होणारही नाही.
पु.लंची ओळख झाली ती शाळेत असताना, ती सुद्धा कॅसेटच्या स्वरूपात “आसा मी असामी” ऐकताना. ८ वी -९ वीत असताना शाळेतल्या काही मैत्रिणींबरोबर क्राफ्टचा एक प्रोजेक्ट करताना ही कॅसेट पहिल्यांदा ऐकली. आता लगेच पु.लंची ओळख ८ वी-९ वीत झाली?? असा प्रश्न विचारु नका. मी इंग्लिश मिडियममध्ये एज्युकेशन टेक केलं आहे. त्यामुळे आमची अवस्था साधारण गुप्तेकाकांच्या निमासारखी!! त्यामुळे ‘डॅडी जर्मनीला फ्लाय करून गेले, दोन किंवा तीन मंथ्सनी येणार आहेत’ ही वाक्य आम्हाला नवीन नव्हती. ‘असा मी आसामी’ पुस्तकाच्या रूपात हातात यायला डिग्री उजाडावी लागली. त्यानंतर आजपर्यंत त्याची इतकी पारायणं झाली आहेत की त्याच्या ऐवजी दासबोध किंवा विष्णुसहसत्रनाम वाचलं असतं तर समर्थ किंवा विष्णू प्रसन्न झाले असते. ते प्रसन्न होवो किंवा न होवो आम्ही मात्र प्रसन्न झालो ते पु.लं मुळे.

कुठे कुठे पु.ल आठवतात म्हणून सांगू..

मुलं निरागसपणे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्या निरागसतेचं कौतुक करायचं नंतर सुचतं, आधी ‘शंकर आपल्या निरागसता का काय म्हणतात त्याने काळजाला कधी हात घालेल सांगता येत नाही’ हे तरी आठवतं किंवा ‘हल्लीची पिढी बरीच चौकस आहे बरं का गणपुले!!’ म्हणणारे आणि महाराष्ट्रात बावीस वडगावं आहेत ही माहिती असणारे पार्ल्याचे आजोबा आठवतात. व्होटिंगच्या काळात ऑफिसमध्ये शिरताना आमचा ऑफिसबॉय विचारायचा ‘मॅडम मत दिलं का? किंवा ‘मॅडम तुमच्याकडे कोण येणार’, ‘नमो”च येणार’. त्याला उत्तर द्यायच्या आधी ‘अणुयुद्ध टाळण्याचा एकमेव मार्ग ठाऊक असलेला बेनसन जानसनमधला दत्तोबा कदम आठवतो. फॅमिली डॉक्टर म्हंटलं की कुशाभाऊंचे ‘फॅमिली ऑफ माय डॉक्टर’ दिसतात. ऑफिसमध्ये ऑफिसच्या प्रिंटरवर जेव्हा लोक आपल्या प्रवासाच्या तिकीटांची किंवा वैयक्तिक प्रिंटआऊट काढताना दिसायचे तेव्हा माझा धोंडो भिकाजी व्हायचा; कारकुनी इमान जळायला लागायचं. भाजी आणायला गेल्यावर चवळीची जुडी आणि सुरणाची टोपली दिसली की अप्पा भिंगार्डे आणि गुरुदेवांच्या दर्शनाला आलेल्या पारशिणीची आठवण येते. कोणी लंडनला निघालं की आपोआप ‘तेवढा कोहिनूर हिरा बघून या हो’ म्हणणारे अंतु बर्वा आठवतात. कॉलेजच्या रस्त्यावरून जाताना ‘शिजन’ कसा आहे हे बघायला आलेला एखादा नाथा कामत शोधावासा वाटतो.

पु.लंची व्यक्तिचित्र अंगात किती भिनलेली आहेत ह्याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा आला. मी सकाळी नवऱ्याशी पेस्ट कंट्रोल करायला हवा, फ्रीजचं सर्विसिंग करून घ्यायला हवं अश्या काही प्रापंचिक विवंचनांवर चर्चा करत होते. तितक्यात धाकटे चिरंजीव, वय वर्ष १०, झोपेतून उठून आले. माझ्या बाजूला बसून त्याने चिंताग्रस्त चेहरा केला आणि म्हणाला ‘आई, आज एक मोठ्ठा प्रॉब्लेम होऊ शकतो’ मला वाटलं बहुतेक काही तरी सबमीट किंवा कंप्लीट करायचं राहिलं शाळेचं. मी विचारलं ‘काय?’ तो म्हणाला ‘आज रात्री जर RCBहरली तर Mumbai Indians पॉईंट्स टेबलमध्ये वर जाईल’ मी दोन मिनिटं त्याच्याकडे पाहिलं आणि मग मला हसूच फुटलं. मी हळूच त्याच्या केसांतून हात फिरवला आणि म्हंटलं ‘बाबा रे, तुझं जग निराळं आणि माझं जग निराळं!!’

एकदा गणपतीच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या सोसायटीने एका स्पर्धेत भाग घेतला होता. दोन नृत्यांच्यामधे सूत्रसंचालन करणारी मुलगी प्रेक्षकांना काही प्रश्न विचारत होती. त्यात तिने एक प्रश्न विचारला ‘जशी हिंदूंची “गीता”, मुसलमान बांधवांचं “कुराण” तसं पारसी बांधवांचं काय?’ पूर्ण ऑडिटोरियम शांत झालं आणि मी जोरात ओरडले “झेंद अवेस्था”. माझ्या मागच्या पुढच्या रांगेतले सगळे माझ्याकडे कौतुकाने बघत होते. साधारणपणे यूपीएससी किंवा एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांनाच ह्या प्रश्नाचं उतर माहित असू शकतं. मला ते उत्तर माहीत होतं ह्यामागे माझा अभ्यास किंवा सामान्य ज्ञान वगैरे काहीही नव्हतं. ती केवळ आणि केवळ “थ्रीटी नारीएलवाला”ची कृपा होती दुसरं काही ही नाही.

बटाट्याच्या चाळीत आणि आमच्या बिल्डिंगमध्ये नाही म्हणायला एक साम्य आहे; आमच्याही बिल्डिंगच्या गच्चीला कुलूप असतं!! आचार्यांना ‘तू काय धंदा करतो रे बोर्वे?’ विचारणारा बटाट्याच्या चाळीतला फर्टाडो हा खरंतर एक आदर्श माणूस आहे असं मला नेहमी वाटतं. ‘वर्क इज वर्शिप’ हा त्याचा जगण्याचा कानमंत्र आहे. तो संडेला चर्चला जाऊन टाईम वेस्ट करत नाही. त्या वेळेचा उपयोग तो गळे आणि खिसे कापण्यासाठी करतो. वादावादी करायला ही त्याला फुरसत नसते ‘मी टेरेस वगैरे काय वरी करत नाय, उगीच झगडी कशाला करता रे? तू तुझा धंदा कर मी माझा धंदा करतो’ असं म्हणत तो आपलं काम इमानदारीत करा हे सांगून जातो.

महाराष्ट्रात अनेक मोठे लेखक लेखिका होऊन गेल्या, मग पुलंवर आपलं इतकं प्रेम का? ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पुलंनी मध्यमवर्गीयांना, सामान्य माणसांना त्यांच्या सामान्य असण्यात एक असमान्य धाडस आहे हे जाणवून दिलं. त्यांनी बदलावं असा नियमही घातला नाही आणि बदलावं लागलंच तर त्यात काही चूक आहे असा निष्कर्षही काढला नाही. शाळेत प्रत्येक स्पर्धेत आपण भाग घेत नव्हतो. काही स्पर्धांमध्ये घेतला तर काहींमध्ये फक्त प्रेक्षक होऊन त्यांचा आस्वाद घेतला किंवा मागे बसून टवाळक्या आणि भाग घेणाऱ्यांवर टीका केल्या. त्यात ही वेगळाच आनंद होता हे त्या वयातही कळलं होतं पण पुढे जाऊन त्याचा विसर पडला आणि प्रत्येकच स्पर्धेत धावत राहिलो. आजच्या स्पर्धात्मक युगात आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन जाणवतं की प्रत्येक स्पर्धेत आपण भाग घेतलाच पाहिजे असं नाही किंवा भाग घेतलाच तर त्यात पहिल्या काही क्रमांकांमद्धे आपला नंबर यायलाच पाहिजे असं ही नाही कारण धोंडो भिकाजी जोशी सांगून गेले आहेत...
‘कुणीही मान मोडून काम न करता आमची बेनसन जानसन कंपनी कशी टिकली हे एक कोडं आहे. म्हणूनच हे जग टिकायला कुणीही खास काही करण्याची आवश्यकता आहे असा मला वाटत नाही. ह्या जगात येताना जसा गुपचुप आलो तसा जातानादेखील आपल्या हातून त्या जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक आसामी आहे’

©गौरी नवरे
८ नोव्हेंबर २०२०

Tuesday, November 10, 2020

पुलंचा विनोद : आता होणे नाही?

पु. ल. देशपांडे उर्फ पुलं : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असं कुठल्याही मराठी माणसानं अभिमानानं सांगावं असा लेखक व गुणग्राही कलावंत!   भाईंना जाऊन आतापावेतो दोन दशके झाली असली तरी त्यांच्या लिखाणातून ते घराघरात सामावलेले आहेत. गतवर्षी  त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली.  त्यांच्या नाटकांचे, व्यक्ती-वल्लींचे आणि इतर लिखाणाचे अनेक कार्यक्रम जगभर झाले.  खऱ्या अर्थाने 'झाले बहु होतील बहु पर या सम हा' असं हे बहुविध आणि बहुपेडी व्यक्तिमत्व होतं.  पुलंसारखं असं नानाविध क्षेत्रात लीलया वावरणारं आणि आनंदाची लयलूट करणारं व्यक्तिमत्व परत होणं अशक्य आहे. पण त्यांच्या विनोदाचं काय? त्यांच्या पूर्वीही अनेक विनोदी लेखक होऊन गेले आणि पुलंच्या पश्चातही अनेकजण चांगलं विनोदी लिखाण करत आहेत.  पण मला वाटत पुलंच्या विनोदाची सर कुठल्याच लेखनाला आलेली नाही, किंबहुना ती येणं शक्य नाही.  म्हणूनच पुलंसारखाच  त्यांचा विनोदही एकमेकाद्वितीय आहे.


इतकी वर्ष झाली तरी पुलंचा विनोद आपल्याला अजूनही हसवतो, रिझवतो, हसता हसता डोळ्यात पाणी आणतो!  त्यांनी लिहिलेली पात्र खरीखुरी, जिवंत वाटतात.  पुराव्याने शाबित करिन म्हणणाऱ्या हरितात्यांचा भास कुणाच्यात होतो, कुणाच्या तरी छापील वागण्यातून / बोलण्यातून एखादा सखाराम गटणे डोकावतो.  “समस्त रत्नाग्रीच्या गाई तूर्तास गाभण का रे झम्प्या?” असं म्हणत टोमणे मारणारा पण फणसासारखा आतून गोड असणारा कोकणातला अंतु बरवा सारखा कोणी भेटतो आणि पुलंनी वापरलेली प्रतीकं, उपमा किती चपखल आहेत हे पदोपदी जाणवत राहत.  त्यांच्या प्रत्येक विनोदाला एक करूण, हळवी किनार आहे.  ती डोळ्याचे काठ नक्की ओले करते,  ह्रदयात एक प्रकारची "फील गुड" भावना निर्माण करते.  कदाचित यामुळंच पुलंचा विनोद अजूनही हवाहवासा वाटतो. 


त्यांच्या विनोदाची शैली मिश्किल आहे, कुणालाही न दुखावणारी आहे. तो विनोद खऱ्या अर्थाने निर्मळ आहे. पुलंनी कधीच कुणाला दुखावणारा किंवा कमरेखालचा विनोद केला नाही - त्याची त्यांना गरजच पडली नाही. सहकुटुंब सहपरिवार दिलखुलास हसता येईल आणि हसता हसता अंतर्मुख करून जाईल असा विनोद हे त्यांचं वैशिष्ट्य. अर्थात त्यांच्या विषयाला काही मर्यादा आल्या हे निश्चित.  काही झालं तरी तो मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाजाशी निगडीत राहिला. त्यांनी पाहिलेलं, जगलेलं चाळीतले आयुष्य, आणि काळाच्या ओघात झालेले बदल न रुचल्यानं एक प्रकारचं स्मरणरंजन करणारा झाला. त्यामुळं पुलंच्या विनोदावर/लिखाणावर तो स्मरणरंजनात रमणारा विनोद आहे असा एक आरोप होतो.  काही प्रमाणात तो खरा असेलही.  पण मला वाटतं तो फक्त तेवढ्यापुरता सीमित राहिलेला नाही. त्यांच्या विनोदाची वीण ही पक्की आहे. कधीकधी विनोद सांगताना त्यातून अचानक एखाद वैश्विक सत्य अलगदपणे सामोरं येतं.  उदा. शेवटी काय घड्याळाचे पट्टे नी तबकड्या बदलतात.. सुखाने टळलेली दुपार पहायला तबकडी आणि पट्ट्या कुठल्या का असेना” किंवा “शेवटी तुम्ही आम्ही काय, पत्रातल्या पत्त्याचे धनी.. मजकूराचा मालक मात्र निराळाच असतो!!”


तो विनोद पूर्णपणे कालसापेक्ष नाही, स्थळसापेक्ष नाही हे खरंय.  आता चाळी नामशेष झाल्या, ओनरशिपचे ब्लॉक्स आले, माणसामाणसातला आपुलकीचा ओलावा काही प्रमाणात कमी झाला, जीवन अधिक वेगवान झाले.  त्यामुळे असो किंवा विनोदाचे काही संदर्भ जुने झाल्यानं (उदा. लुगडी नेसून शाळेत जाणारी गोदाक्का आता नाही!) असो, पुलंचे काही विनोद आता फारसे समजत वा रुचत नाहीत. असं जरी असलं तरी त्या विनोदाचा दर्जा मात्र नक्कीच उच्च प्रतीचा आहे आणि तो मात्र अजिबात बदललेला नाही.  या उलट आजकाल करमणुकीच्या क्षेत्रात पाहिलं तर विनोदाचा दर्जा फारच ढासळलेला दिसतो. अनेकदा ज्याला 'स्लॅपस्टिक कॉमेडी' म्हणतात तिकडेच तो झुकताना आढळतो. त्या पार्श्वभूमीवर पुल लिखित 'ती फुलराणी', 'असा मी असामी' ह्यातील विनोद अजूनही ताजातवाना वाटतो.  "तुम्हाला पुणेकर, मुंबईकर का नागपूरकर व्हायचंय?" हा लेख असो किंवा पुलंचं 'माझा शत्रुपक्ष' असो हे विनोद कधीच जुना झालाय असं वाटत नाही. त्यांनी सूक्ष्म निरीक्षणशक्तीतून निवडलेली माणसांची वैशिष्ट्य अजूनही काही बाबतीत तंतोतंत खरी असल्याचं जाणवतं! त्यांचं पौष्टिक खाद्यजीवन वाचताना अजूनही जिभेला पाणी सुटत नाही असा रसिक न सापडणं विरळच !  एवढंच कशाला, आता परदेश प्रवासाची नवलाई कमी झाली असली तरीही त्यांची अपूर्वाई/पूर्वरंग वाचताना विनोदाची झालर लोभस आणि सुखदायी वाटते.


शाब्दिक कोट्यात तर पुलंचा हात धरणारा कोणी नाही! त्यांच्या अनेक कोट्या अजूनही वापरल्या जातात!  अगदी पुलंची सुनीताबाईंना उद्देशून केलेली "मी देशपांडे व ही उपदेशपांडे" ही कोटी असो वा उपहासाने म्हणलेले "आपल्या मदरटँग मध्ये आपले थॉट्स जेवढे क्लिअरली एक्सप्रेस करता येतात ना तेवढे दुसऱ्या भाषेत येत नाहीत" वाक्य असो, आपल्याला हमखास हसवतेच!  उगाच नाही  त्यांना कोट्याधीश पुलं म्हणत ! 


त्यांच्या पूर्वीच्या लेखकांच्या  लेखनात ज्यांच्यावर विनोद व्हायचा/केला जायचा त्यांना कुठंतरी शालजोडीतले मारता मारता त्यांची कुठंतरी खलनायक/खलनायिका अशी प्रतिमा तयार होत असे, पण पुलंच्या विनोदाचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे त्या विनोदात खलनायकच नाही. त्यामुळे त्यांचा विनोद अजिबात बुळबुळीत होत नाही.  उलट तो कितीही टोकदार झाला तरीही तो दुखावत नाही. साध्या शब्दातून हसवत, कोटी करत, उणिवांकडे बोट दाखवत आपल्याही नकळत, हळूच डोळ्यातून पाणी काढण्याचं कसब फक्त पुलंच्याच विनोदात आहे.


दुःखी असताना पु.ल. वाचले तर त्या दुःखाची तीव्रता कमी होते आणि आनंदात वाचले तर तो आनंद दुप्पट होतो असा माझाच अनुभव आहे. आणखी किती लेखकांच्या लेखनाबद्दल असं खात्रीनं म्हणता येईल?  पुलंची भाषा अलंकारिक नाही पण त्यांचा विनोद कळायला, त्याचा आस्वाद घ्यायला मराठी भाषेची बलस्थान माहिती हवीत हे मात्र नक्की. पुलांसारखा विनोद परत होणार नाही असं जेंव्हा मी म्हणतो त्यामागे हे पण एक कारण आहे. मराठी भाषा झपाट्याने बदलत चालली आहे. भाषेविषयी आपुलकी, आत्मीयता हळूहळू कमी होते आहे. साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यापेक्षा चित्रपटातील झगमगीकडे समाजाचे, विशेषतः युवापिढीचे लक्ष आहे. त्या आकर्षणापोटी चांगल्या, दर्जेदार विनोदी साहित्याच्या निर्मितीची गती कमी झाली आहे. या पूर्वी म्हटल्याप्रमाणे ते वेगळे दृश्य माध्यम असल्याने तेथील विनोदही शारीरिक व प्रासंगिकतेकडे झुकणारे आहेत. असले विनोद काही वेळा क्षणभर हसवतातही,  पण पुलंच्या कुठल्याच विनोदासारखे लक्षात राहात नाहीत असा माझा अनुभव आहे. म्हणूनच तसा विनोद परत होणार नाही असं मला वाटतं.  


मंगेश पाडगांवकरांनी पुलंबद्दल लिहिलंय ते परत एकदा उद्धृत करावंसं वाटतं : 


पुलस्पर्श होताच दुःखे पळाली,

नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,

निराशेतून माणसे मुक्त झाली,

जगू लागली, हास्यगंगेत न्हाली


अशी आनंदयात्रा, हास्यगंगा तयार करणारा, निराशेतून बाहेर काढणारा  विनोद परत होणार नाही असं म्हणणं खरं तर एका अर्थानं त्यांच्या लिखाणाचं, विनोदाचं कौतुक करणारं, अभिमानास्पद  आहे आणि त्याच वेळी असे दर्जेदार विनोदी लिखाण करणारे आणखी मराठी लेखक अजून मिळाले हे शल्य असणारही आहे. पण ज्यांच्या नावातच दुसऱ्याला "पुलकित" करण्याचं सामर्थ्य आहे असे लेखक नेहमी जन्माला येतात थोडेच?


~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

लेखक:    सागर साबडे
“मला काय वाटतं....” लेखन स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त लेख.

पुलकित आठवणींचे आजोळ

महाराष्ट्राचे लाडके दैवत, पु. ल. देशपांडे.. उत्तम, दर्जेदार विनोदाचे संस्कार ज्यांनी उभ्या महाराष्ट्रावर केले, उत्कृष्ठ वक्ते, ललितलेखन, प्रवास वर्णन ह्या द्वारे मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे, जाणकार संगीतकार, नाटककार, चित्रपट क्षेत्रात ही ज्यांनी आपला ठसा उमटवला असे हरहुन्नरी कलाकार, असे अनेक पैलू असलेले बहुरंगी बहुढंगी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या प्रतिभेचे वर्णन करण्याइतकी प्रतिभा आणि शब्द ह्या दोहोंची माझ्याकडे कमतरता आहे... पुल असे अवलिया आहेत की त्यांच्या हयातीत माणसं त्यांच्याकडे आपोआप आकर्षित व्ह्यायचीच आणि त्यांच्या सहवासाने प्रसन्न चित्त. तसचं आता ही त्यांच्या साहित्य रुपी ठेव्याने ते अजरामर आहेत... त्यांच्या साहित्यातील काहीही वाचायला घ्या... तुमचं मन आनंदी, प्रसन्न झालच पाहिजे...
(पुलंच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे , मी रेखाटलेले हे रेखाचित्र)

पुलं ना मी प्रत्यक्ष पाहिले नव्हते.. पण माझे आजोबा,आजी,आई, मावश्या ह्यांनी पाहिलं होते... पार्ल्यातील , अजमल रोड वरील पुलंचे त्र्यंबक सदन हे घर आणि माझे आजोळ जवळ जवळ. पुलंचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ आणि माझ्या आजोबांचा श्री. पु. करकरे ह्यांचा जन्म २० मे १९२०... पुलंची आई आणि माझ्या आजोबांची आई म्हणजे माझी पणजी (इंदिरा करकरे) ह्या छान मैत्रिणी... दोन्ही कुटुंबात जिव्हाळ्याचे संबंध, त्यामुळे माझ्या आजोबांच्या तसचं माझ्या आईच्या तोंडून ही पुलंच्या अनेक आठवणी मी ऐकल्या आहेत... पुलं पार्ल्यात कायम वास्तव्याला नसले तरीही ते , सुनीता बाई अधून मधून पार्ल्यात यायचे.. माझी आई, मावश्या लहान असताना त्यांच्या घरी कधीतरी जात...आई सांगते, तिच्या लहानपणी टेप रेकॉर्डर नवीन होता, पुलंच्या घरी तो होता, मग पुलं, सुनीता बाई, कधीतरी, तिला, माझ्या मावश्या, तसचं इतर आजूबाजूच्या लहान मुलांना त्यांच्या घरी बोलावून त्यांच्या आवाजात गाणी, गोष्टी रेकॉर्ड करून घेत, आपलाच आवाज टेप रेकॉर्डर वर ऐकताना ह्या सर्व लहान मुलांना भारी मौज वाटे...१९६१/६२, साली जेव्हा, पुलं, गदिमा, वसंत कानिटकर, वसंत सबनीस यां सारखी दिग्गज मंडळी सैनिकांचे मनोरंजन करणाऱ्या कार्यक्रमासाठी लडाख ला निघाली तेव्हा त्यांना विमानतळावर निरोप द्यायला पुलंच्या घरच्या मंडळींबरोबर माझी आई, मावश्या हि गेल्या होत्या.

ह्या आणि अशा अनेक छोट्या मोठ्या आठवणीत माझ्या आजोबांनी आम्हाला सांगितलेली एक पुलंची हृद्य आठवण माझ्या मनाला भावते.

१९६० साली माझी पणजी, आजारी होती, तिचे हे शेवटचे दिवस हे तिने जाणले होते, तेव्हा पुलं आले की त्यांना मला भेटायचंय अशी इच्छा तिने पुलंच्या आईपाशी व्यक्त केली होती, पुलं त्या दरम्यान जेव्हा पार्ल्याला आले तेव्हा आवर्जून माझ्या आजोबांच्या घरी पणजी ला भेटायला आले... पणजी ला त्यांना बघून खूप बरं वाटलं आणि तिने त्यांना छोटीशी भेट म्हणून रुमाल दिले.. पुढे काही दिवसांनी माझ्या पणजीचे निधन झाले... ही बातमी जेव्हा पुलं ना समजली तेव्हा पुलंनी माझ्या आजोबांना एक सांत्वन पर पत्र लिहिलं, त्यात पुलं म्हणतात,"मावशींच्या निधनाची बातमी ऐकून फार वाईट वाटलं , तुझी आई अन् माझी आई अतिशय चांगल्या मैत्रिणी, त्यांनी जणू स्वतःचे मरण आधीच जाणले होते... मी त्यांना भेटायला आलो होतो तेव्हा त्यांनी मला रुमाल भेट दिले, जणू भविष्यात घडणाऱ्या ह्या दुःखद प्रसंगाने डोळ्यात येणारे अश्रू पुसायलाच म्हणून हे रुमाल दिले.." पुलंचे हे भावपूर्ण पत्र माझ्या आजोबांनी जपून ठेवलं होतं.. मी ही माझ्या लहानपणी ते पाहिलं होतं.

पुलंना प्रत्यक्ष पहायचं भाग्य मला लाभलं नसलं तरी पुलं चे ,गोल जिना असलेले जुने घर, मला आठवतंय. उंच, शिडशिडीत बांध्याच्या पुलंच्या आई,(ज्यांना मीराच्या आई असं संबोधलं जायचं) पुलंसारखे दिसणारे त्यांचे भाऊ उमाकांत आणि धाकटे बंधू अन् अभिनेते रमाकांत देशपांडे ह्यांना मी पाहिले आहे. आता माझं आजोळ तिथे नाही तसचं पुलंचे ते जुनं घर ही नाही (त्र्यंबक सदन आहे पण नव्या इमारती स्वरूपात), पण त्या भागात गेले की अजूनही नॉस्टॅल्जिक वाटतं... पुलंच्या ह्या प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष आठवणीने मन पुलकित होते आणि पुलं आणखी जवळचे वाटतात.


डॉ स्वाती भाटवडेकर
८/११/२०२०

Saturday, October 24, 2020

या 'पुरुषोत्तमाने' आम्हाला हसवले.

मी ज्या कुटुंबात जन्माला आलो ते घर वाचन - साहित्य - नाटक संगीत - आध्यात्म या साऱ्याचे संस्कार आणि आवड जोपासणारे होते. माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची पूजाअर्चा नेहमीच साग्रसंगीत चालत असे. उपास , व्रतवैकल्य आमच्या घरात नेहमीच यथासांग पार पाडली जायची. दोन खणांचे घर असूनही घरात प्रसन्न , शांत , आनंदी वातावरण नांदत असे. माझ्या वडिलांना आध्यात्मिक साहित्य वाचनाची खूप आवड होती. पुढे यामध्ये मराठी , इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य , चरित्र , आत्मचरित्र , कथा , कादंबऱ्या यांची भर पडत गेली. पण लहानपणी मला मात्र इंद्रजाल कॉमिक्स वाचायला खूप आवडायचं. वडिलांनी माझ्या या वाचनाला कधीच हरकत घेतली नाही. उलट दर महिन्याला मला ते आणून द्यायचे. त्यावेळी वडिलांच्या कपाटात पाच सहाशे पुस्तकांचा संग्रह होता. (जो पुढे दिड हजारावर गेला) हळुहळु मलाच या कॉमिक्स वाचनाचा कंटाळा येऊ लागला आणि मी वडिलांकडे कुतूहलाने वाचायला एखाद्या पुस्तकाची मागणी केली. त्यावेळी त्यांनी माझ्या हातात पाहिलं पुस्तक ठेवलं ते म्हणजे पुलं चं "व्यक्ती आणि वल्ली". मी सहज पुस्तक उघडलं आणि पहिली व्यक्तिरेखा वाचायला घेतली. ....अचानक आईने मोठ्याने मारलेली हाक ऐकू आली. म्हट्लं "काय ग ! कशाला ओरडतेयस?". तर म्हणाली , "काय वाचतोयस एव्हढं ? दोन अडीच तास झाले. जेवायचं नाहीय का ?"
पुलं च्या साहित्याचा माझ्यावर झालेला हा पहिला परिणाम. आणि पुढे हा परिणाम वाढतच गेला. वडिलांचा व्यासंगही वाढतच होता. पुस्तकाचं कपाट आता अपुरं पडत होतं त्यामुळे कपाटावर पुस्तकं ठेवावी लागत होती. अनेक लेखकांची पुस्तकं संग्रहात सामील होऊ लागली होती. त्यामुळे जे आवडेल ते पुस्तक वाचायला घ्यायचं. साहित्याची मेजवानीच म्हणा ना . आणि बरं का ! हे वाचनवेड एकदा लागलं ना की आपण सगळ्यांपासून अलिप्त होऊन एका वेगळ्याच दुनियेत रंगून जातो. अनेक उत्तमोत्तम पुस्तकं वाचायला मिळाली , परंतु पुलं च्या साहित्यातून जे मिळालं त्याचं गारूड अगदी आजही तसच आहे. त्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. 

वाचनाची आवड नसलेल्या एखाद्याला किंवा वाचनाची सुरवात करणाऱ्या कुणाला जर वाचनाकडे वळावं असं वाटतं , तर त्याने श्रीगणेशा पुलं च्या साहित्याने करावा असं माझं ठाम वैयक्तिक मत आहे. आता का ? म्हणाल , तर जसं एखाद्याला संगीत शिकण्याची इच्छा असेल आणि त्याला एकदम शास्त्रीय संगीतातील राग , आरोह अवरोह , मात्रा , ताना , पलटे याबद्दल सांगायला सुरवात केली तर तो धास्ती घेऊन , हे काही आपल्याला जमणारं नाही असं वाटून संगीतापासूनच दुरावला जाईल. याउलट त्याने जर सुंदर सोपी बालगीतं , भावगीतं , भक्तीगीतं आधी ऐकायला आणि म्हणायला सुरवात केली तर त्याचा विचार सकारात्मक होऊन "अरे हे आपल्याला जमू शकतं" या भावनेतून तो संगीताकडे ओढला जाईल. तसच साहित्याचं आहे. कुणी जर सुरवातीलाच एकदम थोरामोठ्यांची चरित्र , न पेलणाऱ्या जड भाषेत लिहिलेली पुस्तकं , तत्वज्ञान सांगणारी पुस्तकं वाचायला घेतली तर संभ्रमित होऊन आणि कंटाळून तो साहित्यापासून आणि पर्यायाने वाचन संस्कृती पासूनच दूर जाईल.

आता पुलं च्या साहित्यापासून सुरवात का करावी तर त्यामध्ये हास्यानंद तर आहेच पण त्याबरोबरच एक निरागस सौंदर्य आहे. सोपी भाषा आहे. हेवेदावे , इर्षा , चढाओढ त्यामध्ये कुठेच नाहीत. छान , निखळ आणि आपले वाटणारे , आपल्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठे जाणवणारे सुंदर अनुभव व्यक्तिरुप घेऊन आपल्यासमोर येतात. वाचताना मध्येच उत्स्फूर्तपणे खळखळून हसवतात आणि जेव्हा जेव्हा ते मनात उभे राहतात तेव्हाही हास्याचा तोच अनुभव देऊन जातात. आपण अगदी कोणत्याही मनस्थितीत असलो तरीही. पुलंच्या साहित्यात निर्मळ विनोद भेटतो. तो कुणालाही बोचत नाही अथवा ओरबाडतही नाही. खुदकन मात्र हसवतो. वाचकांना आपल्या साहित्यातून ते असा आनंद देऊन जातात कारण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन तसाच असतो. मग ते शास्त्रीय संगीत असो , लावणी असो किंवा लोकसंगीत असो , खाद्य वर्णन असो किंवा प्रवास वर्णन असो. त्यांच्या लंडन प्रवासात एकदा सायंकाळी ते फिरायला बाहेर पडलेले असताना त्यांनी पाहिलं की जागोजागी प्रणयाच्या बहराने लंडन फुलले होते. त्या प्रेमी युगुलांना बाहेरच्या जगाची शुद्ध नव्हती. ते आपल्या जगात धुंद होते. अशा प्रकारचं ते वर्णन आहे. त्या जागी आपण काय म्हट्लं असतं "शी ! लाज नाही , काही नाही. काय हे रस्त्यात". कोणत्याही गोष्टीकडे पहाताना सौंदर्य दृष्टी जागी ठेवली की असे विचार मनात येत नाहीत. आपला प्रॉब्लेम काय असतो कुणास ठाऊक. म्हणजे मनातून ते आवडलेलं असतं पण आपण असं काही करु शकत नाही याचं वैषम्य वाटत असतं की उगीच आणलेला सोवळेपणाचा आव असतो की दिसलेल्या कोणत्याही गोष्टीवर मतप्रदर्शन केलंच पाहिजे या भूमिकेतून बोलत असतो हे आपल्यालाच कळत नसतं. पुलंच्या या सौंदर्य दृष्टीतूनच तुझे आहे तुजपाशी नाटकातलं काकाजी हे पात्र साकार झालं असावं. आचार्य आणि काकाजी ही दोन टोकाची पात्र या नाटकात पुलंनी आपल्या शब्द श्रीमंतीने अप्रतिम रंगवलीयत. 

पुलं च्या प्रवास वर्णनातही माहिती देण्याचा अट्टाहास आणि कोरडेपणा जाणवत नाही तर आपला हात हातात घेऊन हसत खेळत स्वतःबरोबर ते आपल्याला अलवार सफर घडवून आणतात. पुलं चं साहित्य आपल्या मनाला भावतं याचं दुसरं एक कारण म्हणजे सोपी , सुंदर आपलीशी वाटणारी भाषा. उगाच जडबंबाळ शब्दांचा अजिबात न केलेला वापर आणि वाचकांना लिखाणातून काहीतरी शिकवत राहण्याचा न दिसणारा दृष्टिकोन. त्यांच्या वाऱ्यावरची वरात या नाटकातील सुरवातीच्या स्वगतामध्ये ते म्हणतात "आमचा हा कार्यक्रम मजेचा आहे , म्हणजे हसून सोडून देण्याचा आहे. त्यामध्ये साहित्यिक मूल्य वगैरे शोधण्याचा कृपया प्रयत्न करू नका." इतका छान , सुंदर आणि स्वच्छ दृष्टिकोन घेऊन हा लेखक आपल्यापुढे येतो , आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व बनून जातो.

एखाद्या कलाकृतीचं , नव्या कलाकारांचं कौतुक करताना हातचं राखून न ठेवता करणं , मनापासून दाद देत त्यांचा उत्साह वाढवणं हे त्यांनी आयुष्यभर केलं. आपल्या क्षेत्रात महान कामगिरी केलेल्या अनेक व्यक्तीच्या सत्कार प्रसंगी त्यांनी केलेली भाषणं ही अगदी आजही मनसोक्त आनंद देऊन जातात , कारण ती कौतुक आणि मिश्किल कोट्यानी सजलेली असतात. स्वतःवर विनोद करताना आपली प्रतिष्ठा त्यांच्या कुठेही आड येतं नाही , आणि स्वतःला विदूषक म्हणवून घेताना त्यांना जराही कमीपणा वाटत नाही.

आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी अगदी सोप्या शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचविणारा हा लेखक एकाचवेळी आपल्याला पोट धरून हसवतोही आणि हसवता हसवता हळूच डोळ्यांना पाणावतोही.

टेलिव्हिजन वरील एका विनोदी कार्यक्रमात एका गुंड झालेल्या पात्राच्या तोंडी पुलं बद्दल नेमकं वर्णन आलं होतं. तो म्हणतो "या महाराष्ट्रात एक फार मोठा भाई होऊन गेला. त्यांच्या विनोदाची दहशत आज तो अनंतात विलीन होऊन वीस वर्ष लोटली तरी तशीच कायम आहे. अजूनही ती दहशत कुणी मिटवू शकलेला नाही." त्याचं साहित्य वाचताना आजही वाचक मनमुराद हसतात , कारण त्यामध्ये कधीही न संपणारा जिवंत ताजेपणा आहे. आणि त्या दरवळत रहाणाऱ्या लिखाणातून पुलं आजही आपल्या मनात जिवंत आहेत आणि पुढची कित्येक वर्ष ते तसेच रहाणार आहेत.
लेखक , नाटककार , कथाकार , पटकथाकार , दिग्दर्शक , संगीतकार , अभिनेता , ओजस्वी वक्ता , गायक , संगीतप्रेमी , संवादिनी वादक , सामाजिक बांधिलकी जपणारी व्यक्ती , या सगळ्यात मनापासून रमणारा , आस्वाद घेणारा एक रसिक आणि प्रत्येक मराठी माणसाला आपलं वाटणारं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व ,
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु.ल. उर्फ आपले भाई.

- प्रसाद कुळकर्णी

Wednesday, October 7, 2020

पु.लं कडे नोकरी

आजोबांना जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तेव्हा मी तेरा-चौदा वर्षाचा होतो. हॉस्पिटलमध्ये आजोबांना भेटायला आई घेऊन गेली, तेव्हा तिने मला शेजारची रूपाली बिल्डिंग दाखवली.

म्हणाली"हे बघ, इथे पु.ल.देशपांडे राहतात."

नशीब ही असं होतं की आजोबांच्या खोली मधून पु . लं. चा फ्लॅट दिसायचा. रूममध्ये आजोबांची तब्येतीची काळजी करता करता सारखं लक्ष खिडकीतून पलीकडे जायचं. पु.ल. दिसतील का असं सारखं वाटायचं. आपण कधी तिथे जाऊ आणि पु लं. शी गप्पा मारू असा विचार सारखा यायचा .

नंतर काही वर्षांनी एकदा धीर करून रुपाली मध्ये गेलोच. पु . लं च्या घराची बेल वाजवली, दार उघडण्याची वाट बघताना हृदयात इतकं धडधडत होतं, अजून आठवतं. सुनीताबाईंनी दरवाजा उघडला.

"काय हवंय "असं विचारलं.

"पु. ल. आहेत का? त्यांना भेटायचं होतं. "

"नाही भाई बाहेर गेला आहे."

"बर."

मी घरी परत.

असं दोन-तीनदा झालं.

आणि मग कोणे एके दिवशी, मी त्यांच्या घराची बेल वाजवली आणि चक्क पुलंनी दार उघडलं.

"काय रे काय हवे आहे?."

"काही नाही. तुम्हाला भेटायचं होतं. येऊ का आत?"

"हो, ये की ,मी रिकामाच आहे."

इतक्या सहजपणे म्हणाले, की मला खरच वाटेना. माझ्या एक्साइटमेंट चा तो परमोच्च बिंदू होता. आत गेल्यावर असा उजवीकडे हॉल होता. तिथे दोन सोफे होते. काळ्या रंगाचे. समोरासमोर.

मला म्हणाले ,"बस. बोल काय काम आहे तुझं."

पाच सेकंद मला काही बोलताच आलं नाही. मनात ठरवून ठेवलेली,रचून ठेवलेली ,सगळी वाक्यं गायब झाली होती.

मी एकदम म्हणालो, "पु. ल. , मला तुमच्याकडे नोकरी करायची आहे."

हे वाक्य माझ्या तोंडून येताच पु. ल. इतके खळखळून हसले.

एकदम म्हणाले, "सुनिता, अगं बघ हा काय म्हणतोय."

मग सुनीताबाई आतून आल्या.

"अगं हा बघ, हा स्वप्नील कुंभोजकर. आपल्याकडे याला नोकरी करायची आहे."

त्यांना पण हसू आलं आणि त्या पु लं शेजारी सोफ्यावर बसल्या. मी सतरा अठरा वर्षाचा मुलगा त्यांना काय म्हणतोय हे लक्षात आल्यावर त्या दोघांनाही कमालीची उत्सुकता आणि गंमत वाटत होती.

“अरे तुझं नाव काय? काय शिकतोस ? नोकरी कशाला करायची आहे?”

मला ही जरा धीर आला.

मी म्हणलं कसली ही नोकरी द्या. मी कार चालवू शकतो, तुमची 118 NE मला अतिशय आवडते. प्रेमाने चालवेन. बँकेत चेक भरेन, घरी भाजी आणून देईन, दुकानातून किराणामाल आणून देईन, तुमची पत्रं sort करेन, आलेल्या पाहुण्यांना पाणी देईन, वहिनींना घरकामात मदत करेन, काहीही सांगा. जास्ती जास्त तुमच्या बरोबर राहता येईल, तुमचा सहवास लाभेल, असं काहीही काम सांगा . पगार नाही दिलात तरी चालेल.

हे ऐकल्यावर त्या दोघांची हसून हसून पुरेवाट झाली.

मग त्यांनी माझी रीतसर मुलाखत घेतली (job interview !!).

"घरी कोण कोण असतं? काय करतात आई वडील ?"

"आई LIC मध्ये आहे आणि वडील बँकेत काम करतात."

"तरीच. म्हणून हे सगळं सुचतंय. अभ्यास वगैरे करतोस का?"

"आता तुम्ही मला आई बाबां-सारखेच प्रश्न विचारताय."

त्यावर आम्ही तिघेही खळखळून हसलो. मग त्यांनी मला extra curricular activities बद्दल विचारलं. मी धाड धाड धाड सगळं सांगून टाकलं. तुमची सगळी पुस्तकं वाचली आहेत. शास्त्रीय संगीत ऐकतो. बालगंधर्व आवडतात. वसंतराव देशपांडे जीव की प्राण आहेत. मल्लिकार्जुन मन्सूर यांचं खूप गाणं ऐकलंय. वगैरे वगैरे.

अचानक पु. ल. जुन्या नाटकांबद्दल बोलायला लागले.

बालगंधर्व, खाडिलकर यांची नाटकं याबद्दल भरभरून बोलले. मग म्हणाले हे सगळं तुला माहिती आहे का. म्हणलं खरं सांगू का,एवढ माहिती नाहीये पण तुमच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर मी धन्य झालो आहे.

मग सुनीताबाईंनी एकदम विचारलं " किती वेळा बेल वाजून गेलास परत?"

आता मी हसलो आणि हाताने"चार" असा आकडा दाखवला.

"आज तुझं नशीब उत्तम आहे. माझ्या ऐवजी भाई ने दरवाजा उघडला."

"लिम्का पिशील का?"

त्या दिवशी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा soft drink प्यायलो. कारण एकच. अजून थोडा वेळ तिथे घालवता येईल आणि त्या दोघांची भरपूर गप्पा मारता येतील !!

मग मी माझं सगळं ज्ञान-अज्ञान त्यांच्यासमोर मोकळं करून टाकलं. जवळपास तास-दीड तास आम्ही गप्पा मारत होतो.

मी भाईंना कुमार गंधर्व यांची मैफिल आपण दोघांनीच कशी ऐकली होती त्याची पण आठवण करून दिली.

माझं सगळं बोलणं ऐकून, खरंतर बडबड ऐकून, या दोघांची चांगलीच करमणूक होत होती.

मग वहिनी म्हणाल्या "घरचे थांबलेत का जेवायला?"

" वाहिनी, कळलं मला, आता मी निघतो."

आणि मग माझ्या आयुष्यातला अतिशय सुंदर, दीड तास, त्या आठवणी बरोबर घेऊन हवेत तरंगत मी घरी गेलो.

घरच्यांनी कोपरापासून नमस्कार केला मला.

माझ्यासाठी तो दिवस अतिशय अविस्मरणीय ठरला. जोशी हॉस्पिटल मध्ये मनात ठेवलेली इच्छा इतक्या सुंदर रित्या पूर्ण होईल असं कधी वाटलं नव्हतं. पु. ल .आणि सुनीतावाहिनी यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा, टिंगल टवाळी, गंमत जंमत - आयुष्याचं सोनं झालं माझ्या.

त्यांच्याच एका लेखात John Carlisle बद्दल त्यांनी लिहिलं होतं, तसा साधा मोठा सोफा, त्यावर मी बसलोय, समोर साक्षात पु. ल . आणि सुनीता वहिनी दोघेही बसले आहेत, आणि माझ्याशी गप्पा मारत आहेत, हे चित्र मी कधीच विसरू शकणार नाही.

दोघेही इतके मोठे, इतके बिझी, परंतु माझ्यासारख्या, अतिसामान्य तरुण मुलाबरोबर इतक्या खेळीमेळीने मनमोकळेपणे गप्पा मारत होते, जणू काही त्यांची आणि माझी खूप जुनी ओळख आहे, दोस्ती आहे. मी माझा अज्ञाना चाshow करणारा अति उत्साही मुलगा, आणि ते दोघेही इतके प्रतिभावान , इतके मोठे, पण त्यांनी मला हे जाणवून सुद्धा दिलं नाही, आणि नोकरीही दिली नाही !!

पण माझ्यासाठी एक सुंदर आनंदाचा ठेवा मागे ठेवून गेले.

- स्वप्नील कुंभोजकर

Sunday, August 30, 2020

साधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...

पु. ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वानं ‘गुण गाईन आवडी’ या पुस्तकात अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांविषयी लिहिलं आहे. त्या पुस्तकातच ‘बाबा आमटे : एक विज्ञानयोगी’ या १९६८ सालच्या मे महिन्यात लिहिलेल्या लेखाचाही समावेश आहे. बाबा आणि साधनाताई ही दोन नावं एकमेकांपासून वेगळी करता येण्यासारखी नाहीत. ‘पुलं’नी या लेखात साधनाताईंचे गुणही गायिले आहेत. पाच मे हा साधनाताईंचा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्या प्रेरणादायी लेखातील साधनाताईंविषयीचा काही भाग प्रसिद्ध करत आहोत.........


तुकोबा म्हणाले, ‘आम्ही बिघडलों तुम्ही बिघडा ना-’ मुरलीधरपंत आमटे बिघडले. सारी सुखे सोडली आणि वनवासाला निघाले. आजतागायत त्या वनवासाची धुंदी उतरत नाही. झपाटल्यासारखा वावरतो आहे. उपेक्षितांच्या जीवनात अपेक्षा निर्माण करतो आहे.

आणि भाग्य असे, की ह्या भणंगावर भाळलेली एक गौरीही त्याच्या जोडीने जीवनातल्या साऱ्या ज्वालांना फुले मानीत चालते आहे. बाबा, साधनाबाई, त्यांची मुले, सारी जणे टुमदार बंगला, टुमदार गाडी, टुमदार बगीचा असल्या चौकटीत काय मजेत बसली असती. ते सोडून अभाग्याचे अश्रू पुसणे हा आमटे घराण्याचा एकमेव कुळाचार असल्यासारखे हे सारे कुटुंब राबते आहे. बाबांच्या निर्भयपणाचे आता चोहीकडे कौतुक आहे; पण आपल्या तान्ह्या पोरांना घेऊन गावाबाहेर त्यक्त, बहिष्कृत अशा अवस्थेत, दोनदोनशे-चारचारशे महारोग्यांच्या संगतीत राहणाऱ्या साधनाताईंपेक्षा दक्षप्रजापतीचा महाल सोडून स्मशानवासी, नररुंडधारी, बंभोलानाथाशी संसार करणारी गौरी आणखी काय निराळी होती? मला ह्या जोडप्यात शिवपार्वतीचे दर्शन झाले आहे. मुरलीधर आमटे नावाचा सर्वसंगपरित्यागी, साहसी, कलाप्रिय, बुद्धिमान तरुण आणि ज्या घुले घराण्यात चांगले आठ महामहोपाध्याय झाले, अशा व्युत्पन्न कुळातली आणि जिला रेशमाशिवाय दुसऱ्या सुताची वसने लेऊ दिली नाहीत असल्या धनत्तर वडिलांची इंदू घुले नामक कन्यका ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे मिळून ‘बाबा आमटे’ नावाचे अद्वैत वावरते.

भारतीय संस्कृतीत आम्ही शिवपार्वती, सीताराम, राधाकृष्ण, विठ्ठलरखमाई असे प्रकृतिपुरुषांचे संपूर्ण मीलन झालेले व्यक्तिमत्त्व आदर्श मानीत असतो. पूर्णत्वाची आमची कल्पना अर्धनारीनटेश्वराची आहे. पुरुषाच्या पराक्रमाला स्त्रीची करुणा लाभली नाही, तर त्या पराक्रमाचे क्रौर्यात रूपांतर होते. वादळवाऱ्यातून, आगवणव्यातून बाबांच्या जोडीने चाललेली त्यांची पत्नी खऱ्या अर्थाने त्यांची सहधर्मचारिणी आहे. त्यांचा भयंकर वनवास हा आनंदवनवास झाला त्याचे कारण त्या वनवासातला त्यांचा आश्रम हा सर्वश्रेष्ठ असा गृहस्थाश्रम आहे आणि म्हणूनच बाबा आमट्यांची क्रांती आग लावा, जाळा, तोडा-फोडा, पेटवा, घेराव, बंद ही भाषा बोलत कैदाशिणीसारखी येत नाही.

इथे अग्नी अन्न शिजवतो, बसेस जाळत नाही. जखमा केल्या जात नाहीत, बऱ्या केल्या जातात. हातांना मुठी उगारणेही शिकवले जात नाही, भिकेसाठी पसरणेही नाही. गृहस्थधर्मात ते बसत नाही. इथे बोटे गळून पडलेले हातदेखील शेते पिकवतात. इथे आस्वादाला प्रतिबंध नाही, अनावश्यक संग्रहाला आहे. इथे त्यागाची आणि भोगाची आत्यंतिक भाषा नाही. जीवनाचे पात्र कळकू नये म्हणून अनावश्यक भोगांच्या त्यागाची त्या पात्राला कल्हई लावावी लागते. आनंदयज्ञाचा संकल्प सोडून शुचिर्भूत होऊन राहिलेले हे जोडपे आहे. दाम्पत्याशिवाय यज्ञ होऊच शकत नाही. इंदूताईंचे सासरचे नाव ‘साधना’ असे बाबांनी ठेवले, तरी त्यांना ते स्वतः आणि इतर सर्व जण इंदूताईच म्हणतात.

हातभर दाढी वाढवून उघड्याबंब देहाने वावरणाऱ्या ह्या पहाडाएवढ्या भणंगाशी लग्न करताना आपण हातात हिरव्या चुड्याच्या जोडीला दारिद्र्याचा वसा घेत आहोत, हे त्या जाणत होत्या. एका झंझावाताशी संसार करायला चंदनी गाभाऱ्यात जपलेली ज्योत निघाली होती. अशीतशी असती, तर केव्हाच विझली असती. अनेक वर्षांपूर्वी अशीच एक विदर्भकन्या कृष्ण नावाच्या गवळ्याबरोबर राजमंदिर सोडून पळाली होती!

ह्या विज्ञानवादी माणसाला निराशा ठाऊक नाही. मात्र विज्ञानाला जशी तडजोड मंजूर नसते, तशी बाबांनाही नसते. शिखरे धुंडाळण्याच्या वेडाने पछाडलेल्या क्यूरी पतिपत्नींसारखे, एडिसनसारखे हे जोडपे आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘दारू प्यालो, तेव्हा घड्यांनी! प्रेमविवाह केला, त्यासाठी गुंडांच्या सुऱ्याचे वार छातीवर घेतले. नवरदेव पलिस्तरे मारून वेदीवर बसले होते. लग्नापूर्वी सुऱ्यांच्या वारामुळे रक्त ओकीत होते.’ डॉक्टर म्हणाले, ‘तुम्ही फारसे जगण्याची आशा नाही.’ तरीही लग्न करायचे दोघांनीही ठरवले. आणि एका पत्रात बाबांनी तिला लिहिले – ‘असे जगू आपण की एक एक क्षण म्हणजे एक एक दिवस ठरावा आणि एक एक दिवस म्हणजे एक एक आयुष्य व्हावे.’

या लग्नाने बाबांच्या अस्वस्थ भ्रमंतीला संरक्षक कुंपणाचे एक क्षितिज घातले. एक वादळ हळूहळू माणसाळले जाऊ लागले. प्रळयंकर महादेवाचा रुद्रावतार संपला. शिवपार्वतीने संसाराचा सारीपाट मांडला. आता जीवनातल्या साऱ्या प्रयोगांना गृहस्थी संस्कारांचे स्वरूप लाभले. म्हणून धाडस संपले नाही. ते संपणार नाही.

‘पुलं’च्या या लेखाचा शेवटही मनाला हात घालणारा आहे.....
............

बाबांच्या आणि ताईंच्या सहवासातले ते सात दिवस आठवले की भगवद्गीतेतल्या संजयाच्या शेवटच्या आनंदोद्गारांची आठवण होते :

तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः।
विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनःपुनः।।

आनंदवन सोडून जीप वर्ध्याच्या दिशेला लागली होती. समोरच दोन पळस डोक्यावर आगीच्या पताका घेऊन फुलले होते. ज्वालांचा आणि फुलांचा काय मनोहर संयोग होता!
‘पळसाची जोडी काय सुंदर फुलली आहे!’ कुणीसे म्हणाले.

‘बाबा आणि ताईसारखी!’ मी मनाशी म्हणालो.

- पु. ल. देशपांडे
.....
(पु. ल. देशपांडे यांच्या ‘गुण गाईन आवडी’ या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा काही अंश आहे. हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=4701421677406893535&title=Sadhanatai%20Amte&SectionId=1002&SectionName=Be%20Positive

Saturday, July 25, 2020

‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव

यंदा पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यासंबंधी बरेच लेखन प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळतो आहे. त्यातून मला हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. एकंदरीत पुलंसंबंधित लेखन वाचताना मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे बरीचशी चर्चा ही पुलंच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकांबद्दल असते. त्यातही त्यांचे विनोदी लेखन, व्यक्तीचित्रण आणि शाब्दिक कोट्या हे बहुचर्चित विषय आहेत. या पार्श्वभूमीवर पुलंच्या वैचारिक लेखनाकडे वाचकांचे लक्ष वळवावे या हेतूने हा लेख लिहीत आहे. ‘एक शून्य मी’ हे पुलंचे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले आहे (सन २००१). हे पुस्तक माझ्या संग्रही असून ते माझे अत्यंत लाडके पुस्तक आहे. हा पुलंच्या नियतकालिकांतून पूर्वी प्रसिद्ध झालेल्या वैचारिक लेखांचा संग्रह आहे. त्याचा अल्पपरिचय करून देण्यासाठी हा लेख.

    
(चित्रसौजन्य : अक्षरधारा)

या संग्रहात एकून २० लेख संकलित केलेले आहेत. त्यातून पुलंनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा धांडोळा घेतला आहे. त्या सर्व लेखांचा आढावा घेण्याचा माझा इरादा नाही. त्यापैकी मला खूप भावलेल्या ४ लेखांचा परिचय या लेखात करून देतो. एक वाचक म्हणून मला त्यांत काय आवडले ते सांगतो. त्या लेखांची शीर्षके अशी आहेत:

१. मराठी दृष्टीकोनातून मराठी माणूस
२. छान पिकत जाणारे म्हातारपण
३. धर्म, अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही
४. एक शून्य मी

• मराठी दृष्टीकोनातून मराठी माणूस
हा लेख मुळात १९६२मध्ये ‘अमृत’ मासिकात प्रसिद्ध झालेला आहे. हा लेख ‘मराठीपणा’चे जे काही खास गुणधर्म आहेत त्यांच्यावर नेमके बोट ठेवतो. महाराष्ट्रात मराठीत बोलणे हे कमीपणाचे आणि इंग्रजीत बोलणे हे प्रतिष्ठेचे हा समज तेव्हाही दिसून येई. त्या अनुषंगाने लेखात एक प्रसंग दिला आहे. पुलंची एक मराठी आडनावाची विद्यार्थिनी सारखे इंग्रजी बोले. तिचे वडील मराठी व आई पंजाबी होती. पण तिला या दोन्ही भाषा येत नव्हत्या. त्यावर पुलंनी तिला एकदा त्याचे कारण विचारले. त्यावर ती, “शीः ! मराठी की गडीनोकरांची भाषा आहे”, असे उत्तरते. त्यावर पुलं तिला “मग तुझ्या आईने गड्यानोकराशी का लग्न केले?” असे विचारून निरुत्तर करतात. महाराष्ट्रातील उच्चभ्रू समाजात मराठी बोलण्याची लाज हा बराच जुना विषय असल्याचे यातून जाणवते.

मराठी माणसाचे काही ठाम गैरसमज, कुरकुरायचे नेहमीचे विषय, व्यवहारातील वागणूक, सांस्कृतिक आवडी आणि काही आवडीचे सिद्धांत या सर्वांचा सुरेख परामर्श या लेखात घेतला आहे. १९६०च्या दशकात साधारण मराठी माणसाचे चित्र म्हणजे कारकुनीत खूष आणि व्यापार-उद्योगात मागे असे होते. ही पार्श्वभूमी पुलंसारख्या लेखकाला अगदी पोषक ठरली. मराठी दुकानदार हे या भूतलावरचे एक अजब रसायन असल्याचे त्यांनी अतिशय रंजकपणे वर्णन केले आहे.
“मराठी माणसाला हसण्याचे वावडे नाही. पण याला अपवाद म्हणजे मराठी दुकानदार आणि मराठी सर्कारी हापिसर !” हे वाक्य त्यांचे निरीक्षण किती मार्मिक होते याची साक्ष आहे. आजही ही परिस्थिती बदलली आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल !
मराठींच्या काव्यशास्त्रविनोद आणि संगीतावरील प्रेमाचे पुलंनी दिलखुलास कौतुक केले आहे. तसेच मराठी माणसाच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे त्यांनी आदराने वर्णन केले आहे. ते लिहिताना त्यांच्यासमोर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा ताजा इतिहास होता. त्याचाही त्यांनी अभिमानाने व कौतुकाने उल्लेख केला आहे.

• छान पिकत जाणारे म्हातारपण
हा १९९२मध्ये ‘शतायुषी’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख आहे. सर्वसाधारणपणे ‘म्हातारपण’ म्हटले की डोळ्यांसमोर एक प्रकारचे सुकलेपण आणि असहायता डोळ्यांसमोर येते. परंतु सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास म्हाताऱ्याना कसे छानपैकी ‘पिकत’ जाता येते, याचे खास पुलं-शैलीतील वर्णन यात वाचायला मिळते. म्हाताऱ्या माणसाला आपण पिकले पान म्हणतो. पण झाडावरचे पिकले पान आणि म्हातारपण यातील फरक पुलंनी फार छान स्पष्ट केला आहे. झाडाच्या पानाला भावना, स्वार्थ, सुखदुःख, अहंकार आणि वासना असे काहीही नसते. पण म्हाताऱ्याना मात्र या सर्व गोष्टींपासून मुक्त होणे जाम जमत नाही.

माणूस जसा मोठा होत जातो तसे त्याच्याकडील अनुभवांची शिदोरी वाढत जाते. त्याचबरोबर आपल्या जगण्यात आणि भवतालात बरेच बदल होत जातात. जीवनशैली झपाट्याने बदलत जाते. तरीही आपल्या तारुण्यात आपण जे काही अनुभवले तेच योग्य होते असा सूर बहुतेक म्हातारे काढतात. त्यातूनच “आमच्या वेळी....” या पालुपदाचा जन्म होतो आणि मग ते घरातील इतरांना छळू लागते ! त्याच्या जोडीला भर पडते ती “हल्लीची पिढी बिघडली” या रेकॉर्डची. सतत असे सूर काढणाऱ्यांना आपणच बाप म्हणून वाढवलेली ही पिढी आहे याचा विसर पडतो, याची जाणीव लेखक करून देतो.
काळाबरोबर बदलणे आणि नव्याला आपलेसे करणे हा म्हातारपण सुसह्य होण्याचा मूलमंत्र आहे, हे या लेखातून छान सांगितले आहे. म्हाताऱ्या मंडळींचे खरे काम म्हणजे घराला आनंद पुरवणे. ज्या कुटुंबांत वृद्ध हे काम करतात ते आपले वार्धक्य आनंदाने साजरे करतात, हा लेखातील संदेश तर लाजवाब आहे. एका आजोबांचे प्रसंगचित्र मुळातून वाचण्यासारखे आहे. तसेच आपली शारीरिक वा कौटुंबिक दुख्खे चव्हाट्यावर आणून स्वतःविषयी सहानुभूती मिळवू नये, असेही सुचवले आहे. आजीआजोबा होण्याच्या मार्गावर असलेल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असा हा लेख आहे.


• धर्म, अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही
हा लेख ‘बुलेटीन’ या नियतकालिकात १९८९मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. लेखाच्या शीर्षकातले पहिले दोन शब्द हे भयंकर नाजूक आहेत हे आपण जाणतो. या विषयांवर लिहायचे म्हणजे तारेवरची कसरत असते. अर्थातच पुलंनी ती लीलया पेलली आहे. लेखात सुरवातीस भारतीय समाज हा जात, धर्म वा पंथ यांच्या विळख्यात किती घट्ट अडकला आहे याची खंत व्यक्त केली आहे. आपल्याला वैचारिक श्रमांचा तिटकारा तर आहेच आणि त्याच्या जोडीला निखळ वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभावही आपल्यात दिसतो. आपण सदैव वास्तव नाकारत जगतो आणि सारा हवाला देवावर नाहीतर दैवावर टाकून मोकळे होतो. तथाकथित पुरोगाम्यांनी बुद्धीप्रामाण्य वाढीस लावण्यासाठी किंवा समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडशी पाउल टाकलेले नाही, हे ते परखडपणे नोंदवतात.

लेखातील एका परिच्छेदात पुलंनी बाबासाहेब आंबेडकरांबद्ल अतिशय आदराने लिहीले आहे. समाजातील विखारी जातीयतेने अस्वस्थ झाल्याने पुलंनी आंबेडकरांचे लेखन आणि त्यांचे खैरमोडे यांनी लिहिलेले चरित्र आवर्जून वाचले. त्या चरित्रातील बाबासाहेबांच्या “मला मायभूमी कुठे आहे?” या वाक्याने आपण अंतर्बाह्य हादरून गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या लेखाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यात पुलंनी त्यांची देवधर्माबद्दलची भूमिका सुस्पष्ट केली आहे. ती त्यांच्याच शब्दात देतो:

.....“ एक तर धर्म, ईश्वर, पूजा-अर्चा ह्यांत मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही.”....

एका परिच्छेदात त्यांनी संत आणि शास्त्रज्ञ यांची तुलना केली आहे. भारतात संतांची संख्या भरपूर आहे. पण, त्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ अधिक संख्येने जन्मायला हवे होते असे ठामपणे लिहिले आहे. यासंदर्भातले त्यांचे पुढचे वाक्य बहुचर्चित असल्याने ते नोंदवतो:

“ मला कुठल्याही संतापेक्षा अ‍ॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो”...

समाजात मुरलेल्या अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यावर त्यांनी कोरडे ओढले आहेत. तसेच काही अंधश्रद्धाना शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात असल्याची खंत व्यक्त केली आहे. या सगळ्यावर चिंतन केल्यावर त्यांना प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटल्याचे दिसते. या लेखाला त्यांच्या आत्मचरित्राचा स्पर्श झालेला आहे असे म्हणायला हरकत नाही. वैयक्तिक जीवनात ते खूप आनंदी व समाधानी होते. पण आजूबाजूस दृष्टीस पडणारे दुखः, दैन्य आणि विसंगती पाहून त्यांना स्वतःचे जगणेच सामाजिकदृष्ट्या असंबद्ध वाटत असल्याचे नमूद करून ते हा लेख संपवतात.

• एक शून्य मी
हा लेख ‘मटा’ च्या दिवाळी अंकात १९७४मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. पुस्तकाची तब्बल १४ पाने व्यापून राहिलेला हा लेख त्याचा कळसाध्याय म्हणायला हरकत नाही. किंबहुना त्यामुळेच त्याचे शीर्षक पुस्तकाला दिले गेले असावे. इथल्या सर्व लेखांपैकी मला तो जास्त प्रभावी आणि अंतर्मुख करणारा वाटतो. तेव्हा यावर थोडे विस्ताराने लिहितो.
लेखाच्या शीर्षकावरून पुलंना काय म्हणायचे असावे याचा अंदाज सुजाण वाचकाला येतो. मानवी जीवनातली निरर्थकता ही या लेखाची मध्यवर्ती कल्पना आहे. लेखाची सुरवातच मोठी आकर्षक व मार्मिक आहे. जेव्हा आपली एखाद्या परीचिताची कुठेही भेट होते तेव्हा आपसूक विचारला जाणारा प्रश्न असतो, “काय चाललंय सध्या?”. तसा हा प्रश्नच बर्ऱ्यापैकी निरर्थक आणि बरेचदा त्याला मिळणारे उत्तर देखील ! हा संवाद खास त्यांच्याच शब्दात देतो:

...’ सध्या मलादेखील “काय चाललंय तुमचं सध्या ?” असे कुणी विचारले, तर ‘श्वासोच्छवास’ याहून अधिक समर्पक उत्तरच सुचत नाही.’....

हे वाचून क्षणभर आपण स्मितहास्य करतो पण दुसऱ्याच क्षणी सुन्न होतो. हे प्रश्नोत्तर आपल्याला खूप काळ विचार करायला आणि कठोर आत्मपरीक्षण करायला लावते.

पुलंचे सारे आयुष्य संगीत, साहित्य आणि नाटकांना वाहिलेले होते. त्यातून मिळणाऱ्या आनंदात ते रममाण होत असत. पण समाजात आजूबाजूला नजर टाकता जे काही दिसे त्याने ते खूप अस्वस्थ होत. त्यांना सारेच कसे अपरिचित नि अनोळखी भासत होते. शहरी जीवनातली सामाजिक विषमता त्यांना बोचत असे. पुणे ते मुंबई हा नियमित प्रवास डेक्कन क्वीनने करताना आलेले अनुभव त्यांनी विषादाने लिहीले आहेत. कल्याण ते मुंबई या टप्प्यात ट्रेनच्या डब्यातले आणि बाहेर दिसणारे वातावरण किती विरोधाभासी असते ते त्यांनी छान रंगवले आहे. किंबहुना ते एका मध्यमवर्गीयाचे मुक्त चिंतन आहे. या ट्रेनच्या डब्यात जी सूट-बूट आणि चेहऱ्यावर श्रीमंतीची सूज असलेली संस्कृती आहे त्यात तर आपण मोडत नाहीच. त्याचबरोबर खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या लोकलच्या त्या जीवघेण्या गर्दीत जमा होण्याचीही आपली ताकद नाही, याची ते कबुली देतात.

हा लेख लिहिताना त्यांनी महानगरी समाजातल्या विविध आर्थिक स्तरांना समोर ठेवले आहे. उच्चभ्रू, मध्यमवर्ग आणि दरिद्री लोक या प्रत्येकाचे विश्व किती भिन्न आणि एकमेकापासून अलिप्त आहे हे त्यांना प्रकर्षाने जाणवते. यातील एका वर्गाचे सारे सुख कुठलेही प्रश्न न पडण्यात आहे तर विचार करणाऱ्या माणसाकडे प्रश्नचिन्हांखेरीज काहीच नाही, हा विरोधाभास ते नोंदवतात. एकीकडे त्यांना मुंबईच्या एका प्रतिष्ठित देवळातली दर मंगळवारची वाढती रांग दिसते तर दुसरीकडे एका हॉटेलच्या बाहेर रोज मध्यरात्री तिथले उरलेले अन्न मिळवण्यासाठी लागलेली भुकेलेल्ल्यांची रांग. मग या दोन रांगापैकी काय खरे, काय खोटे हे प्रश्न त्यांना छळतात.

आर्थिक व सामाजिक विषमतेनंतर त्यांनी वैचारिक विषमतेचाही आढावा घेतला आहे. समाजातील विविध स्तरांत असलेली वैचारिक दरीही त्यांना खोल वाटते. ज्या माणसांच्या धर्माच्या कल्पनेशी आपले कुठेच नाते जमत नसेल तर ते आपले धर्मबांधव कसे? आणि ज्यांच्याशी आपले कुठलेच वैचारिक साम्य नाही, ते केवळ एकाच देशात राहतात म्हणून देशबांधव तरी कसे?” हे प्रश्न ते वाचकांसमोर ठेवतात.
आजही हे दोन प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतात आणि आपण अस्वस्थ होतो. लेखातली पाच पाने देव, कर्मकांड, नवस, अंधश्रद्धा आणि ढोंगबाजी यांना वाहिली आहेत. ती मुळातूनच वाचण्यात मजा आहे. ती वाचल्यानंतर पुलं हे ‘विचारांती नास्तिक’ झालेले गृहस्थ आहेत याची खात्री होते.

एकंदरीत गरीबी-श्रीमंतीतला विसंवाद त्यांना खूपच खटकत असल्याचे दिसते. या संदर्भातला एक प्रसंग मननीय आहे. तो या लेखाचा कळसबिंदू म्हणायला हरकत नाही. पुलं एका किराणा दुकानात गेलेत. तिथे गोड्या तेलासाठी मोठी रांग होती. आता त्या रांगेतल्या एका फाटक्या कपड्यातील मुलीचा नंबर लागतो. ती दुकानादारापुढे छोटी मातीची पणती ठेऊन दहा पैशांचे तेल मागते. त्यावर तो म्हणतो की दिवाळी अजून लांब आहे तरी पणती कशाला आणलीय? त्यावर ती धिटाईने सांगते की तिला ‘खायालाच’ १० पैशांचे तेल हवे आहे. त्यावर तो नकार देतो. मग पुलं मध्यस्थीने त्याला विचारतात की कमीतकमी किती पैशांचे तेल तो देऊ शकेल. त्यावर तो १५ पैसे म्हणतो. मग ते वरील ५ पैशांची सोय करतात आणि त्या मुलीला अर्धी पणतीभर तेल मिळते. याचा खोल परिणाम स्वतःवर कसा झाला ते त्यांनी विषादाने लिहीले आहे. या घटनेनंतर एखाद्या दिवाळीत पणत्यांची आरास पहिली, की ती १० पैसेवाली मुलगी त्यांना प्रकर्षाने आठवते. जणू तिचा प्रचंड आक्रोश त्यांना ऐकू येतो आणि ते हतबुद्ध होतात.

अशा असंख्य अनुभवांतून जाताना त्यांना अनेक प्रश्न मनाशी पडले होते, अस्वस्थता आली होती. शेवटी ते जगणे म्हणजे तरी काय या मूलभूत प्रश्नापाशी येऊन ठेपतात. असा मूलगामी विचार करता करता ते एकदा प्रश्नचिन्हाकडेच ( म्हणजे ?) निरखून पाहतात आणि त्यांना उत्तर मिळते ! या चिन्हाच्या आकड्याखालीच असलेले ‘टिंब’ म्हणजेच ‘शून्य’ हेच कुठल्याही प्रश्नाचे उत्तर असते असे सांगून ते या सुंदर लेखाची सांगता करतात.

तर असा हा ‘शून्याचा’ लेख. यात पुलंनी स्वतःला शून्य संबोधणे हा त्यांचा विनय आहे. मात्र हा लेख (आणि एकूणच हे पुस्तक) वाचताना आपल्याला त्या शून्याचा अर्थपूर्ण प्रवास घडतो, हे नक्की.

पुलंच्या निधनानंतर प्रकाशित झालेले हे पुस्तक मी आवडीने विकत घेऊन संग्रही ठेवले आहे. दर सहा महिन्यांतून मी त्यातला एखादा लेख पुनःपुन्हा वाचतो आणि तृप्त होतो. हे वाचन माझ्यासाठी एखाद्या ‘बूस्टर’ सारखे असते. त्यातल्या भाषेची खुमारी, लेखनातील सहजता, दंभावर प्रहार आणि वाचकाला अंतर्मुख करण्याची क्षमता हे सर्व काही लाजवाब आहे. तुमच्यातील काहींनी हे पुस्तक वाचले असेलच. तेव्हा तुमचेही प्रतिसाद जाणून घेण्यास उत्सुक !
************************************************************
• टीप: हा मर्यादित पुस्तक परिचय करून देताना या लेखात जे काही विचार आणि मते लिहीली आहेत ती सर्वस्वी पु ल देशपांडे यांची आहेत याची नोंद घ्यावी.
• पुस्तक संदर्भ : एक शून्य मी , मौज प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २००६. साभार !

-कुमार
मुळ स्रोत-- https://www.maayboli.com/node/69050

Monday, June 29, 2020

काही अंश मिळावा

मी ऑफिसमध्ये होते त्या वर्षी बारा जूनला. अचानक घरून फोन आला. आईचा होता. अतिशय हळव्या आवाजात आई म्हणाली "तुला एक वाईट बातमी द्यायची आहे. पु ल देशपांडे गेले"

मला दोन मिनिट कळलेच नाही. मी काहीतरी बोलून फोन ठेवला आणि वॉशरूम मध्ये जाऊन अक्षरशः घरचं माणूस जावे कुणी तशी रडले. बाहेर आले तर माझी टीम माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. त्यात एक दोघी मुली मराठीही होत्या. बाकीच्यांना फारसे कळले नाही आणि मी कुणाला समजावून सांगण्याच्या मनस्थितीतही नव्हते. काही सांगायला गेले नाही कारण सांगितले असते तर पहिला प्रश्न मला हा विचारला असता की कोण होते ते तुझे? इतके रडू येण्यासारखे?

आजही या प्रश्नाचे उत्तर नाही माझ्याकडे. मला याचे उत्तर मिळले नाही तर फरकही पडणार नाही खरेतर. ज्या घरात पुरणपोळी होती नाही ते घर मराठी नव्हे या त्यांच्याच वाक्याप्रमाणे ज्या घरात पु ल माहित नाहीत ते घर मराठी नव्हे.

त्यांच्यावर बरच काही लिहिले गेले आहे. त्यांचे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्यांचे दातृत्व, त्यांची तत्त्वनिष्ठा असे सगळेच. त्यांचे किस्से, कोट्या, निर्विष विनोद यावर बऱ्याच जणांनी बोलून लिहून झाले आहे. तरीही नवीन काही ऐकले त्यांच्याबद्दल की कान टवकारतात, चेहऱ्यावर छानसे हसू येते. आपल्याही नकळत त्या विनोदाला दाद जाते. हे असे सुचते तरी कसे याचा विस्मय वाटतोच.

त्यांच्या लिखाणाचे भाषांतर करणे निव्वळ अशक्य आहे. भाषेपेक्षाही तो निरागस, निर्विष हेतू दुसऱ्या भाषेत तसाच्या तसा मांडणे प्रचंड अवघड आहे. आयुष्याकडे रसिकतेने बघताना त्यात असलेल्या उणिवांची टपली मारल्यासारखी चेष्टा करत राहणे हे फार अवघड आहे. कुठलीही पातळी न सोडता हे करणे तर फारच कठीण आहे.

आज चाळी, वाडे कालबाह्य झाले. आपले पाहता पाहता दुसऱ्याचेही आयुष्य थोडेसे सुकर करणारी माणसे तर झपाट्याने आटली. बटाट्याची चाळ वाचताना आजच्या पिढीला त्यातले संदर्भ लागणे कदाचित सोपे असणार नाही पण माणसाची प्रवृत्ती बदलत नाही हे लक्षात आले की तो काळ ती माणसे समजून घेता यावीत. असा मी असा मी मधल्या धोंडो भिकाजी जोशांना प्रश्न पडतो की मुलाला ताप असला की ओल्या पंचाने देवाला प्रदक्षिणा घालणारे वडील आणि आपल्या मुलांना व्हिटॅमिनयुक्त आहार मिळतोय का नाही यावर लक्ष ठेवणारे आपण यातले कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ? बापाचे मुलांवरचे प्रेम असणारच ना कितीही पिढीत बदलली किंवा जमाना बदलला तरी. तो संदर्भ कसा चुकेल? तसेच काहीसे आहे हे.

मी पहिल्यांदा लंडनला गेले होते तेव्हा मी पुलंच्या अपूर्वाईतले लंडन शोधत होते.किती ठिकाणी जाताना बघताना त्यांनी त्या त्या ठिकाणावर लिहिलेले आठवत होते. इंग्लंडमध्ये कावळा दिसल्यावर तो क्रो क्रो करेल का हेच वाक्य मला पहिले आठवले. बेक्ड बीन्स ऑन पोटॅटो खाताना ब्रिटिशाला अंडे, बटाटा आणि मांस यापलीकडे खाता येत नाही तेच डोक्यात आले. पॅरिसच्या बाबतीतही तेच झाले. आयफेलवरती गेल्यावर वरून दिसणारे पॅरिस बघताना लख लख दिव्यांनी उजळलेले शहर आठवले.

काय नाते असेल या माणसाशी आपले? नारायण ऐकताना हळूच शेवटी डोळे पुसतो आपण. म्हैस ऐकताना सचित्र ऐकतो. त्यांनी निव्वळ आवाज आणि शब्दातून उभी केलेली म्हशीची कथा इतकी तगडी आहे की मास्तर कसे असतील, "रक्त !!!" असे म्हणताना ते काय चेहरा करून कसे म्हणाले असतील हे अचूक डोळ्यापुढे उभे राहते. त्या चेहऱ्याची जागा कोण कसा घेऊ शकेल? अचूक शैली, बोलीभाषा, हे सगळे ऐकणारा आणि ते तसेच्या तसे शब्दात उतरवणारा हा माणूस काय विलक्षण प्रतिभावंत असू शकतो याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. जबरदस्त निरीक्षण हा एक गुण झाला पण ते निरीक्षण तसेच्या तसे अचूक वाचणाऱ्याच्या डोळ्यापुढे उभे करणे याला सरस्वतीचा वरदहस्तच हवा.

मला त्यांच्या लिखाणातले सगळ्यात जास्त काय आवडते हे सांगणे अशक्य आहे. शब्द आणि शाब्दिक कोट्या हा एक भाग झाला. जगाच्या चांगुलपणावर असणारा विश्वास भावतो की वाईट अनुभव येऊनही त्या अनुभवातले शहाणपण मांडण्याची अलिप्तता भावते हा आणखी मोठा प्रश्न. त्यांचे सुसंस्कारित मन तर ठायी ठायी दिसते. सामाजिक बांधिलकी दिसते आणि त्याचबरोबर त्या समाजातल्या अनेक दोषांवर हसत हसत केलेली टिप्पणीही दिसते. सदैव जागरूक असलेला लेखक दिसतो. सहज शब्दकळा दिसते. नाना क्षेत्रांमधली मुशाफिरी दिसते. नव्याचा स्वीकार करतानाही जुन्याशी नाळ जोडून ठेवलेली दिसते. आणि हे सगळे एकाच माणसात दिसते. आपण वाचावे, बघावे आणि ऐकावे डोळ्यातले पाणी पुसावे.

आयुष्य जर रिवाइंड करता आले तर मी त्यांना भेटेन नक्की. त्यांची पुस्तके वाचून पिंड घडला. त्यांची थोरवी कळण्याइतकी अक्कलही नव्हती तेव्हा आणि फारच मोठ्या प्रमाणात आपल्याच दुनियेतले मश्गुल असणेही होते. कमला नेहरू पार्कावरून ये जा करताना त्यांचे घर मागच्याच गल्लीत आहे हे माहित असूनही पावले तेव्हा वळली नाहीत. आता वळतात अधूनमधून. त्यांच्या घराकडे बाहेरूनच नजर टाकून समाधान होत नाही पण तेव्हढ्यावरच समाधान मानणेही आले. त्यांनी वर्णन केलेला तो जोशी हॉस्पिटलच्या आवारातील आंबा एकदा मी प्रत्यक्ष जाऊन बघून आले. पण त्याचे त्यांनी केले वर्णन मनात ठेवूनच. एका अर्थी आमची तुमची नजर घडवली या माणसाने. जगाकडे निरागस नजरेने बघणेही चांगले असते यावरचा विश्वास फुलपाखराच्या सोनेरी वर्खासारखा जपला. हसत हसत दुःखाला टोलवायची कला शिकवली.

मला नोकरी लागल्यावर मी विकत घेतलेले पहिले पुस्तक हसवणूक होते. माझे खाद्यजीवन, बिगरी ते मॅट्रिक वगैरे वाचून मी एकटीच खो खो हसले होते. त्यांची पुस्तके मी कुणालाही वाचायला देत नाही. कारण ती गेली की परत येत नाहीत. तुम्ही म्हणाल जाऊ दे की चार लोकांना अजून ते कळले तर बिघडले कुठे? मुद्दा बरोबर आहे पण न देण्याचा हेतू मात्र स्वार्थी आहे. त्या पुस्तकांनी अनेक भल्याबुऱ्या प्रसंगात माझी सोबत केलेली आहे. ती माझी जिवाभावाची पुस्तके आहेत. अनेक प्रसंग, घटना त्या पुस्तकांनी सुसह्य केलेल्या आहेत. मला त्यांचा कुठला लेख, कुठले पुस्तक कधी वाचायची हुक्की येईल हे मलाही सांगता येत नाही आणि अशा वेळी ते पुस्तक हाती लागले नाही की वाचणाऱ्याची काय चिडचिड होऊ शकते हे वेगळे सांगणे नलगे.

आज त्यांना न भेटण्याचे दुःख खरेतर उणावले आहे थोडेसे. त्यांना प्रत्यक्ष भेटले नाहीतरी ते भेटतात. त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या शब्दातून. एखाद्या दिवशी अपयशी वाटून डोळे भरून येत असताना प्रत्येक चिंधीने मला काही दिले यासारख्या अप्रतिम लेखातून ते प्रत्येक अनुभव भरभरून जगायला सांगतात. इतिहासाच्या अदृश्य मनगट्या घालणारे हरितात्या भेटतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना अंगावर आपसूक काटा फुलतो. श्रोते हो सुजन हो रसिक हो वाचताना त्यांच्या व्यासंगी बुद्धिमत्तेने थक्क व्हायला होते. आपल्या आसपास भलेबुरे जे काही सुरु असताना मनात जागा असणारा हा माणूस कुठल्याही कसल्याही परिस्थितीत आपल्या ओठावरचे हसू मावळू देत नाही.

मग आपल्या मनाला आपण सांगतो. इतके सगळे दिलेत देशपांडे गुरुजी तुम्ही. पण एक अंश तुमचा असाही मिळावा ज्यामुळे कृतज्ञतेने तुमच्या देण्याचा स्वीकार करताना आपणच आपल्याला म्हणावे

अरे असे जगता आले पाहिजे. सुखाची स्मृती ठेवून, दुःखाला समोर बघत सस्मित चेहऱ्याने आसपासच्या किमान चार माणसांच्या आयुष्यातले किमान चार क्षण तरी उजळता आले पाहिजेत. त्या तेजाचा एक कण तेव्हढ्यासाठी हवा.

समाजातल्या दुःखाने नुसतेच आतडे पिळवटून ओरडण्यापेक्षा आतड्याची माया जागी ठेवून मुक्याने जितकी जमेल तितकी सहज मदत करता आली पाहिजे. तो एक अंश हवा.

गुरुजी तुमच्या आयुष्यातला एक अंश मिळावा. असे स्वतःच्या तत्त्वांवर ठाम राहून जगता येते हे कळण्यासाठी.

एक अंश मिळावा बस . . . बाकी आयुष्य चालूच आहे.

तुम्हाला देवत्व दिलेले तुम्हाला आवडणार नाही आणि तुमच्या तत्त्वांच्या ते विरुद्धही असेल. पण आज तुमच्या निष्पाप, निरागस विनोदाची खरंच गरज आहे हो. एकीकडे असेही वाटते की तुम्ही आज नाही ते एका दृष्टीने बरच आहे म्हणा. तुम्हाला आज जे काही आसपास चालू आहे ते बघवलेच नसते. तरीही जेव्हा एखाद्या दिवशी केशर मडगावकर (उच्चारी अडगावकर), मधू मलुष्टे, कुमार गिरीश असा एखादा नमुना आसपास दिसतो तेव्हा मी खूप हसते. कारण तुम्ही मिस्कील चेहऱ्याने शेजारी उभे राहून हसत हसत ‘काय मी सांगतो ते पटतंय की नाही’ असे विचारत असता.

तुमच्याच भाषेत सांगायचे तर आमची चिमुकली संसारगाड्याखाली दबलेली आयुष्ये हसती रहावी, त्यांना नीट आकार यावा, ती उजळावीत म्हणून देवाने तुम्हाला देणगी म्हणून आमच्यासाठी पाठवले आणि आजच्या दिवशी आम्हाला न विचारताच परत नेले.

©प्राजक्ता काणेगावकर

Friday, June 26, 2020

बटाट्याच्या चाळीतला लॉकडाऊन - कुमार जावडेकर

बटाट्याच्या चाळीतल्या 'लॉकडाउन'ची सुरुवातच गच्चीचं कुलूप उघडण्यानं झाली!

चापशीनं पुढाकार घेऊन मेंढेपाटलांची परवानगी आणली; पण नेमका किल्ली हरवून बसला! वास्तविक ते कुलूप, कडी आणि दार इतके मोडकळीला आलेले होते की ते उघडण्यासाठी टाचणी, पिना, हातोडी, लाथ असं काहीही चाललं असतं. त्यानं आपल्या कानावरच्या बॉलपेनानं त्या कुलुपाची कळ फिरवली आणि चाळकऱ्यांची कळी खुलली.

चाळकऱ्यांचं 'लॉकडाउन' यामुळे होऊ लागलेल्या 'अप-डाउन'मधून मार्गी (?) लागलं. 'निदान गच्चीतली हवा आणि ऊन तरी खायला मिळतील,' अशा समजातून ते मेंढेपाटलांना दुवा देऊ लागले. (अनेक जण भाडं देत नव्हतेच त्यामुळे मेंढेपाटलांना चाळीकडून जी काही नवीन प्राप्ती झाली ती इतकीच.)

'गच्चीत सुरक्षित अंतर ठेवून धान्य-विक्री करता येईल' असा चापशीचा अंतस्थ हेतू होता. तो जाणल्यामुळे किंवा गच्चीमुक्तीच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान न लाभल्यामुळे आचार्य बाबा बर्वे मात्र हिरमुसले. त्यातच चापशीच्या कुलूप उघडण्याचा सोहळा पोंबुर्पेकरानं त्याच्या 'चाळभैरव' या (अ-)नियतकालिकाच्या 'फेसबुक' पानावर 'लाइव्ह' दाखवला!

नागूतात्या आढ्यांचा प्रत्येक गोष्टीलाच विरोध. 'खोलीबाहेरच पडता कामा नये' असं त्यांचं म्हणणं होतं.

'सगळेच लोक जर एकदम गच्चीत जायला लागले तर त्यांच्यांत अंतर राहणार कसं?' असा प्रश्न जोगदंडांनी एकदा जिना चढताना विचारला. त्यावर 'आपण प्रत्येक खोलीसाठी वेळ ठरवली पाहिजे' असं कोचरेकर मास्तरांनी वरच्या दारातून सुचवलं. अर्थात, त्याची अंमलबजावणीही त्यांच्यावरच आली.

दुसऱ्या दिवशी जिन्याखालच्या भिंतीवर एक वेळापत्रक चिकटवलेलं चाळकऱ्यांना दिसलं. सोबत गच्चीचा आराखडा आणि त्यावर आखलेले एक-दिशा मार्ग! 'सुरक्षित अंतर ठेवून वीस मंडळी एका वेळी गच्चीत मावू शकतात. चापशीच्या दुकानाच्या वेळेत ही संख्या दहावर येईल' अशा सूचनेसकट.

वेळापत्रकाची फक्त झलक -

५.५५ ते ६.०० - जिना चढण्याची वेळ.

६.०० ते ६.३० - बर्वे (पहिला क्रमांक मिळाला म्हणून बाबा खूष!), सोमण, पावशे, गुप्ते.

६.३० ते ६.३५ - जिना उतरण्याची वेळ.

६.३५ ते ६.४० - पुढील मंडळींच्या जिना चढण्याची वेळ.

.... अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या चाळकऱ्यांसाठी स्वतंत्र वेळा होत्या.

काही दिवसांतच 'नळ आणि इतर विधींचा वेळापत्रक?' अशी तळटीप त्यात सामील झाली. मालवणीत 'चे' चा 'चा' होतो हे काहींना माहिती होतं. मग त्यावर 'जनोबा तुझो आणि नळाचो काय संबंध?' अशी अजून एक टिप्पणी आली. हळू हळू या भित्तीपत्रकाशेजारी 'चाळभैरव', कविता (नाही निर्मळ हात? - करोना करेल घात!), 'आज रात्री नऊ वाजता टाळ्या' (त्यात नागूतात्यांची 'मग शिट्ट्याही का नाहीत?' ही भर) इत्यादी बातम्याही चिकटू लागल्या.

मंगेशराव, वरदाबाई आणि काशिनाथ नाडकर्ण्याचा मुलगा यांची वेळ एकच होती. त्यांनी गच्चीत पेटीवादन, तबलावादन आणि गायन दोन-दोन मीटरचं अंतर ठेवून सुरू केल्यावर आणि त्याला नाट्यभैरव कुशाभाऊंच्या स्वगतांची जोड मिळाल्यावर चाळकऱ्यांनी आपल्या खोलीतच आपल्याला 'विलग' केलं!

चाळीच्या (विशेषतः जिन्याच्या) दीर्घारोग्यासाठी बाबलीबाईंनी मात्र स्वतःच गच्चीप्रयाण करणं टाळलं.

नागूतात्या मोदी-ट्रंप यांच्या निवेदनांपासून बटाट्याच्या चाळीतल्या या संवेदनांचं धावतं वर्णन आपल्या खोलीच्या दारात उभं राहून, जो कोणी जिन्यात दिसेल त्याच्याशी करत होते. प्रत्येक संभाषणाचा शेवट मात्र 'मी हे आधीच ओळखलं होतं' हा असायचा.

एकदा ते दारात दिसले नाहीत तर चाळकऱ्यांनाही चुकल्यासारखं वाटलं.

... त्यांना करोनाची बाधा होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं!

बटाट्याची चाळ अजूनही आत्मनिर्भरपणे का उभी आहे हे तेव्हा जगाला कळलं. त्या बाजूच्या खोल्यांचं विलगीकरण झालं. कुणी त्यांच्यासाठी नाश्ता पाठवला तर कुणी जेवण. डॉ. (कंपाउंडर) हातवळणे, चवाथे नर्सबाई, समेळकाका (न्यू गजकर्ण फार्मसी) यांनी त्यांच्या औषधोपचारांची जबाबदारी घेतली. दोन आठवडे, रोज, अण्णा पावशे त्यांची कुंडली मांडत होते आणि आचार्य बाबा बर्वे एका वेळच्या उपोषणावर होते.

अखेर नागूतात्या बरे झाले. ते पुनः दारात आल्यावर अख्ख्या चाळीनं टाळ्या वाजवल्या.

'मी हे आधीच ओळखलं होतं' एवढंच ते म्हणाले...

- कुमार जावडेकर

आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांनी पु. ल. स्मृतिदिनानिमित्त (१२ जून २०२०) आयोजित केलेल्या 'पुलोत्सव - करोनावरची वरात' या स्पर्धेत निवडली गेलेली कथा.
मुळ स्रोत - https://www.misalpav.com/node/47003

Wednesday, June 24, 2020

आनंदपुरुषोत्तमाचे टपाल तिकीट - सतीश पाकणीकर

पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर पूर्वी व्हरायटी स्टोअर्स नावाचे एक स्टोअर होते. शाळेतून येताना बऱ्याच वेळा त्या दुकानाच्या बाहेर उभा राहून, भल्यामोठ्या काचेतून आतील रॅक्सवर ओळीने मांडून ठेवलेल्या अनेक वस्तू मी पाहत बसे. त्यावर पाडलेल्या प्रकाशामुळे त्या वस्तूंचा चकचकीतपणा अजुनच खुलून दिसे. त्यात अगदी काचेच्या जवळ काही अल्बम ठेवलेले असत. पोस्टाची तिकीटे गोळा करणाऱ्यांसाठी ते अल्बम म्हणजे चैनीचा भाग असे. त्रिकोणी, चौकोनी, आयताकार, षटकोनी तिकिटे चिकटविण्यासाठी त्या आकाराच्या ठिपक्यांच्या ओळी असलेली ती पाने पाहिली की आमची तिकीटांची साधी वही एकदम केविलवाणी वाटू लागे. पैसे साठवून कधीतरी तो अल्बम घ्यायचाच हा विचार करीत तेथून पाऊले हलवावी लागत. वर्गातल्या काही मित्रांना काड्यापेटीचे छाप जमवण्याचा छंद असे. पण पोस्टाची तिकीटे गोळा करून त्यांचा संग्रह करणारे जरा उच्च श्रेणीतले समजले जात. कारण ज्यांच्या घरी पत्र-व्यवहार जास्त होत असे त्यांच्याकडे जास्त तिकीटे गोळा होत. त्यातही ज्यांचे नातेवाईक परदेशात असत त्या मुलांचा भाव जास्त असे. कारण त्यांच्या संग्रहात विदेशी तिकिटेही असत. मग त्यांची देवाण-घेवाण होत असे. एखादे दुर्मिळ तिकीट मिळाले की खूप आनंद होत असे. ते मित्रांना कधी दाखवू असे होऊन जात असे. बरीच वर्षे हा छंद टिकला. मग कॉलेज शिक्षण व व्यवसाय यात तो छंद एकदम मागे पडून गेला. विस्मरणात गेला.

त्या छंदाची आठवण उफाळून यावी अशी एक घटना घडली. २००२ सालचा मार्च महिना असेल. मला एक फोन आला. पलीकडची व्यक्ति बोलली- “ मी पी.एम.जी. अनिल जोशी बोलतोय. माझं तुमच्याकडे एक तातडीचं काम आहे. कधी भेटू शकतो आपण?” मला अनिल जोशी हे नाव कळले होते. पण पी.एम.जी. म्हणजे काय हे कळले नव्हते. अज्ञान प्रकट करायला लागणार होते. तसे मी ते केले. त्यावर ते म्हणाले – “ मी अनिल जोशी, ‘पोस्ट मास्टर जनरल’, पुणे, म्हणून नुकताच रुजू झालोय. कधी भेटू या?” मग मला वाटले की त्यांच्याकडून राँग नंबर लागलाय. मी तसे म्हटल्यावर ते घाईने म्हणाले- “ नाही हो. मी भेटल्यावर तुम्हाला सांगतो. फोनवर सर्व सांगता येणार नाही. पण काम महत्वाचे आहे आणि तातडीचंही!” वेळ ठरली संध्याकाळी साडेचारची. ठिकाण लॉ कॉलेज रोडला फिल्म इंन्स्टिट्यूटच्या बाहेर.

मी पाच मिनिटे आधीच जाऊन पोहोचलो. बरोबर साडेचारला एक पांढरी ॲम्बॅसिडर गाडी तेथे येऊन पोहोचली. मी अंदाजाने ओळखले. त्यांनीही मला गाडीत बसण्याची खूण केली. मी गाडीत बसल्यावर अनिल जोशी यांनी सांगायला सुरुवात केली. “ मी रुजू व्हायच्या आधी काही दिवस येथे उत्तर हिंदुस्थानी बाई ‘पीएमजी’ होत्या. त्यांच्या काळात पु.ल.देशपांडे यांच्यावर टपाल तिकीट काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यांना पु लं विषयी फारशी माहिती नव्हती. त्यांनी परस्पर त्यांच्या एका कनिष्ठ सहकाऱ्याला पु लं च्या घरी त्यांचे फोटो आणायला पिटाळले. तो तेथे गेला व त्याने सुनीताबाईंना फोटो हवे आहेत असे सांगितले. कामाचे स्वरूप लक्षात घेऊन सुनीताबाईंनी त्याला चार-पाच दिवसांनी या असे सांगितले. सुनीताबाईंनी मुंबईहून फोटो मागवले. त्या फोटोग्राफरने दोनच फोटो पाठवले होते. एक पु. ल. व विजया मेहता असा. व दुसरा पु. ल. सिगारेट ओढत आहेत असा. ते फोटो घेऊन तो माणूस ऑफिसवर पोहोचला. ते फोटो मग दिल्लीस पाठवले गेले. पण असे फोटो तिकिटासाठी चालणार नव्हते. त्यामुळे ते रिजेक्ट झाले. तेथून तशी सूचना आली. त्यानुसार परत एकदा तीच व्यक्ती सुनीताबाईंच्यासमोर पोहोचली. त्याने सरळ सुनीताबाईंना सांगितले की “तुम्ही दिलेले फोटो रिजेक्ट झालेत नवीन फोटो द्या.” त्या व्यक्तीचे असे बोलणे ऐकून सुनीताबाई वैतागल्याच. त्या म्हणाल्या – “ माझ्याकडे फोटो नाहीत. तुम्ही पुलं वर तिकीट काढूच नका. नाहीतरी तुम्ही माझ्या नवऱ्याचे तिकीट प्रसिद्ध करणार आणि त्याच्या चेहऱ्यावर परत शिक्का मारणार. त्यापेक्षा तुम्ही तिकीटच काढू नका ना!” असे म्हणून त्यांनी त्याची बोळवण केली. त्यामुळे तो प्रस्ताव मागे पडला. मी चार्ज घेतल्यावर आधीचे सर्व प्रकल्प बघताना माझ्या ही गोष्ट लक्षात आली. इतक्या महत्वाच्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग केवळ माहिती करून न घेतल्याने घडला आहे हे जाणवून मी आता त्याला प्रथम प्राधान्य दिलेले आहे. एक मराठी म्हणून मला अभिमानाने सांगता येईल की माझ्या कारकीर्दीत मी पुलं वर तिकीट काढू शकलो. मी नुकतेच एका पुस्तकात तुम्ही काढलेले पुलं चे फोटो पाहिले. मग नाव सर्च करून तुमचा नंबर मिळवला व फोन केला.”

आता माझ्या मनात विचार आला की – ‘यांना आपण फोटो दिले की काम झालं असतं. त्यासाठी इथे असं बोलावण्याचं काय प्रयोजन?’ त्यांनी बहुतेक माझा विचार ओळखला असावा कारण ते लगेचच म्हणाले – “ आपण आत्ता येथूनच सुनीताबाईंना भेटायला जाऊ. मी तुमच्याकडून फोटो घेणार आहे हे त्यांना सांगीन. पण त्यांची त्या आधी समजूत काढावी लागेल. म्हणून तुम्ही बरोबर चला.”

रागावलेल्या सुनीताबाईंच्या समोर आणि तेही त्यांना आधी फोन न करता जाणे हे धाडस होते. पण मी आधीही बऱ्याच वेळी त्यांना फोन न करता गेलो असल्याने व त्यांनी मला सहन केलेलं असल्याने मी होकार दिला.

आम्ही त्यांच्याच गाडीतून पाच मिनिटात ‘मालती-माधव’ येथील त्यांच्या घरी पोहोचलो. बेल वाजवल्यावर सुनीताबाईंनीच दरवाजा उघडला. त्यांच्या नेहमीच्या आवाजात म्हणाल्या- “ हं, काऽऽय हो?” मी त्यांना अनिल जोशी यांची ओळख करून दिली. सुनीताबाईंच्या लगेच सगळं लक्षात आलं. त्या म्हणाल्या – “काऽऽय हो तुमची माणसं? कसं बोलायचं असतं याचं त्यांना काही शिक्षण दिलेलं नसतं का?” अनिल जोशी यांनी लगेच त्यांची माफी मागितली. अर्थात सुनीताबाईही लगेचच निवळल्या. त्यांचं नेहमीचं मंद हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आलं. त्या परत म्हणाल्या – “ आता मी काय करू तुमच्यासाठी?”

ही संधी साधत अनिल जोशी यांनी सुनीताबाईंना ‘फिलाटेली’ विषयी इथ्यंभूत माहिती द्यायला सुरुवात केली. “ जगभरात लहान–थोर असे करोडो लोक पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद जोपासतात. त्यातून आपल्याला जगभराचा चित्रमय इतिहास पाहायला मिळतो. प्राणि, फळे-फुले, शास्त्र, कला, उद्योग याबरोबरच जगभरातील महान व्यक्ती, इतिहासकार, कलाकार, शास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ यांचे स्मरण आपल्याला पोस्टाच्या तिकिटांवर झालेले दिसते. अशी प्रसिद्ध झालेली तिकीटे जमवण्याच्या छंदास ‘फिलाटेली’ असे म्हटले जाते. फिलाटेलीस्ट हा फक्त तिकीटे जमवतो असे नाही तर त्या तिकीटांच्या व त्या अनुषंगाने छापल्या जाणाऱ्या एरोग्राम, पोस्ट कार्ड, पत्रके, नोंदणीकृत लिफाफा, मुद्रित लिफाफा, प्रथम दिवस आवरण या सर्वांच्या छपाई, संरचना यामध्येही त्याला रस असतो व या सर्वांचा संग्रहही तो करीत असतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट एकदा म्हणाले होते की- “ माझा तिकीट संग्रह ही अशी एक जागा आहे की जेथे सर्व देश गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात.” हा असा छंद आहे की ज्यामुळे लोकांच्या मनात शांती आणि प्रेम याचा संदेश आपोआप पसरला जातो.” असे सांगत त्यांनी पुलंवरील स्मरणार्थ तिकिटाचे आपल्याला कसे महत्व आहे हेही पटवले.

त्यांच्या या सविस्तर कथनाने सुनीताबाईंच्या मनातील आधीच्या भावना नाहीश्या झाल्या. त्या उठल्या व त्यांनी पुलंवरील ‘चित्रमय स्वगत’ हा ग्रंथ जोशी यांना दाखवत म्हणाल्या – “ याचा काही उपयोग होईल का पहा. यात भाईचे शेकडो फोटो आहेत.” जोशी यांनी तो ग्रंथ चाळला. व म्हणाले- “ मी जाता जाता डेक्कन जिमखान्यावरून हा ग्रंथ घेईन.” अचानकपणे सुनीताबाई माझ्याकडे हात करीत म्हणाल्या- “ अहो, ह्यांनी काढले आहेत की खूप फोटो भाईंचे. यांच्याकडून घेता येतील तुम्हाला.” जोशी म्हणाले – “ हो मला माहित आहे. त्यांना मी सांगणारच आहे.” चहापान झाले आणि आम्ही तेथून आनंदात निघालो. मलाही हुश्श झाले होते.

जोशी यांनी केलेले वर्णन ऐकल्यामुळे मी त्यांना म्हणालो- “ मी तुम्हाला काही फोटोंच्या प्रिंट्स करून देतोच पण त्या बरोबर स्टॅम्प, फर्स्ट डे कव्हर व कॅन्सलेशन स्टॅम्पचे डिझाईनही करून पाठवतो. त्याची निवड झाल्यास उत्तमच नाहीतर मला मी काही काम केल्याचे समाधानही मिळेल.” आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पुढच्याच आठवड्यात अनिल जोशी यांना मी त्यांच्या मुख्य पोस्ट ऑफिसमधील कार्यालयात सर्व साहित्य नेऊन दिले. त्यांनी ‘चित्रमय स्वगत’ व मी दिलेले सर्व साहित्य दिल्लीस पाठवून दिले.

जवळजवळ दीड महिन्याने मला अनिल जोशी यांचा फोन आला. तारीख होती ६ मे २००२. त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले- “ पाकणीकर, तुमचा फोटो पुलंच्या तिकीटासाठी निवडला गेला आहे. त्या तिकीटाचं डिझाईन आजच मला दिल्लीहून आलं आहे. पण तुम्ही आत्ताच ही बातमी कोणाला सांगू नका. पुढच्या महिन्यात १६ जूनला पुण्यातच त्याचं प्रकाशन माहिती आणि नभोवाणी मंत्री श्री. प्रमोद महाजन यांच्या हस्ते होणार आहे. निमंत्रण मी देईनच तुम्हाला.” त्या फोन नंतर काहीच वेळात त्यांनी मला त्यांना आलेली मेल फॉरवर्ड केली. झाले ते सर्व स्वप्नवतच घडले होते.

१६ जून २००२. आपल्या लाडक्या व्यक्तीमत्वाच्या सन्मानार्थ निघणाऱ्या पोस्टाच्या तिकिटाचा कार्यक्रम ‘याचि देही याचि डोळा’ पाहता यावा यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात रसिकांनी तुफान गर्दी केली होती. प्रमुख पाहुणे होते आदरणीय पं. भीमसेन जोशी. “बहुविध गुण असणाऱ्या ऋषीतुल्य पु.ल.देशपांडे यांच्या सन्मानार्थ त्यांचे टपाल तिकीट काढून कळत न कळत मी पुलंना आपली गुरूदक्षिणा अर्पण केली आहे. ते आम्हाला पुण्यात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात रेडिओ पत्रकारिता हा विषय शिकवण्यास येत असत. हे ऋण फेडण्याची संधी योगायोगाने मी या खात्याचा मंत्री असताना मिळाली हे मी माझं भाग्य समजतो.” अशा भावपूर्ण उदगारांसह प्रमोद महाजन यांनी ते तिकीट, प्रथमदिवस आवरण व कॅन्सलेशन स्टॅम्प या सर्वांचे प्रकाशन केले. तर भीमसेनजी म्हणाले – “ गाणे, साहित्य आणि कलांवरील प्रेमामुळे पु.ल.देशपांडे कायम अमरच आहेत.”

पुलंची बहुविविधता दाखवण्यासाठी या तिकीटावर त्यांच्या प्रकाशचित्रासह, मागे ‘जोहार मायबाप’ मधील त्यांनी साकारलेला चोखा मेळा, लेखणी, पुस्तक, रंगमंच, चित्रफित व त्यांची स्वाक्षरी अशी चित्र विराजमान आहेत. प्रथम दिवस आवरणावर त्यांच्या ‘बटाट्याची चाळ’ मधील सहा प्रतिमा तर कॅन्सलेशनच्या खास शिक्क्यात तानपुरा व लेखणी एकाकार झाले आहेत.

कार्यक्रम संपन्न झाला. पण तो पाहण्यास सुनीताबाई मात्र येऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे काही मोजक्याच व्यक्तींसह श्री. प्रमोद महाजन ‘मालती-माधव’ वर पोहोचले. अनिल जोशी यांनी मलाही येण्याचे आमंत्रण दिले. आम्ही सर्व पोहोचलो. तिकीट व त्याबरोबरचे सर्व साहित्य पाहून सुनीताबाईंना किती आनंद झाला आहे हे त्यांच्या डोळ्यात जमलेले आनंदाश्रूच सांगत होते. श्री. अनिल जोशी यांनी पुढे येत श्री. प्रमोद महाजन यांच्या हस्ते मला भारतीय टपाल खात्यातर्फे तिकीट, प्रथमदिवस आवरणावर चिकटवलेले तिकीट, त्यावर उमटवलेला कॅन्सलेशन स्टॅम्प व या तिकीटाची विवरणिका (ब्रोशर) असा एक सुंदर अल्बम भेट म्हणून दिला.

कविवर्य कुसुमाग्रज पुलं विषयी यथार्थपणे म्हणतात- “ आपापले कार्यक्षेत्र व्यापून टाकणारे प्रतिभावंत असतात, पण त्यातला एखादाच आपल्या समाजाच्या समग्र संस्कृतीलाच व्यापून उरतो. पी.एल. हे असे विरळा प्रतिभावंत आहेत. मराठी संस्कृतीच्या वेगवेगळ्या अंगात जे जे सत्वशील, सुंदर, उदात्त, उन्नत, नवनिर्मितीशील, सुरेल, नाट्यपूर्ण व मूल्ययुक्त आहे ते ते पी.एल. च्या व्यक्तिमत्वात आणि कलानिर्मितीत व्यक्त झाले आहे.”

व्हरायटी स्टोअर्सच्या त्या काचेमागील ते तिकीटांचे अल्बम तेव्हा माझ्या नशिबात नव्हते. पण मराठी सारस्वताचा मुकुटमणी असलेल्या, मला वेगवेगळ्या संगीत मैफलींना आमंत्रण देऊन संपन्न करणाऱ्या, माझ्या सुरुवातीच्या काळात माझं मनोमन कौतुक केलेल्या, एन.सी.पी.ए. च्या संगीत विभागासाठी माझी प्रकाशचित्र विकत घेणाऱ्या त्या आनंदपुरुषोत्तमाच्या सन्मान तिकीटावर मी टिपलेलं त्यांचं प्रकाशचित्र निवडलं जावं व त्यांच्या ऋणातून काही अंशानं का होईना उतराई व्हावं हे त्या नियतीच्याच मनात होतं नां? आणि आदरणीय सुनीताबाई, पं. भीमसेनजी व श्री. प्रमोद महाजन यांच्या स्वाक्षऱ्यांसह अमूल्य झालेला तो खास असा तिकीट अल्बम माझ्या संग्रही कायम राहावा हे ही त्या नशिबानेच ठरवले असणार नां ?

- सतीश पाकणीकर
http://www.sateeshpaknikar.com/

Monday, June 15, 2020

तरुणाईचे लाडके पु.ल.

पुलंना जाऊन (१२ जून रोजी ) आता वीस वर्ष लोटलीत. परंतु त्यांचं मराठी जनमानसावरील अधिराज्य अजूनही कायम आहे. तरुणाईच्या मनांवरही ते तितकंच गडद, गहिरं आहे. याचाच हा वानवळा..
                     
जीवनात एक वेळ अशी येते की जिथे आपल्याला आपली वाट गवसते किंवा चुकते. मला माझी वाट २००० साली गवसली. महाराष्ट्र त्यावेळी एका मोठय़ा धक्क्य़ातून सावरत होता. पु. ल. देशपांडे निवर्तले होते. दुसऱ्या दिवशी सगळ्या मराठी वर्तमानपत्रांतून पुलं गेल्याची बातमी छापून आली होती. जवळजवळ अख्खा पेपर ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे’ या नावाशी संबंधित लेखांनी भरलेला पाहिला. तत्पूर्वी पु. ल. देशपांडे नावाचे एक थोर साहित्यिक आपल्या महाराष्ट्रात आहेत, एवढंच जुजबी ज्ञान माझ्या बालमेंदूत शिक्षण खात्यानं घुसवलेलं. त्यामुळे प्रत्यक्षात पु. ल. देशपांडे ही काय चीज आहे मला माहीत नव्हतं. मग मी ‘पुलं कोण होते’ याचा शोध घेण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. कॅसेट हाऊसमधून पुलंच्या ‘रावसाहेब’, ‘नारायण’ व ‘सखाराम गटणे’ या कथाकथनाची कॅसेट आणली आणि प्लेयरवर लावली.

‘एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही..’ हे पुलंचं पहिलं वाक्य कानावर पडलं आणि माझी त्यांच्याशी त्याच दिवशी वेव्हलेंग्थ जुळली. त्यानंतर पुलंच्या विचाराशिवाय एकही दिवस गेला नाही. पुलंच्या ऑडियो क्लिप्स ऐकून आणि त्यांची पुस्तकं वाचून झालेलं तृप्तीचं समाधान अतुलनीय आहे. एखादा विचार व्यक्त करत असताना योग्य शब्द निवडण्याचं कसब पुलंना सहजी अवगत होतं. शाळकरी मुलापासून ते नव्वदीत पोचलेल्या वृद्धांपर्यंत वाचकांची मोठी रेंज लाभणं- यातून पुलंच्या साहित्याचा समाजावरील गहिरा प्रभाव दिसून येतो. पुलंच्या समकालीन किंवा सद्य:कालीन अन्य कुणा लेखकाला हे भाग्य लाभलेलं दिसत नाही. पुलंनी दैनंदिन जीवनातील घडामोडींचं सूक्ष्म निरीक्षण करून त्याला अनुपमेय शब्दरूप दिलं आणि समाजाला जीवनाकडे सौंदर्यदृष्टीने पाहण्याची दृष्टी दिली. ती देताना त्यांची भाषा कुठेही प्रचारकी नव्हती. आजची पिढी पुलंची वाक्यं एखाद्या संदर्भात वापरते त्यावरून खात्रीनं वाटतं, की पुलं हेच मराठी साहित्यातील सर्वात जास्त लोकप्रिय लेखक आहेत. उदाहरणादाखल सांगायचं तर पुलंची जन्मशताब्दी साजरी झाली त्यानिमित्ताने ‘मालती-माधव’मधल्या पुलंच्या घरी त्यांचा सहवास लाभलेले कित्येक स्नेहीसोबती जमले होते. या कार्यक्रमाला पुलंवरच्या प्रेमापोटी आम्ही तरुणांनी बनवलेल्या ‘आम्ही असू ‘पुलं’कित’ या ग्रुपच्या सदस्यांना ठाकूर दाम्पत्याने मोठय़ा आपुलकीनं बोलावलं होतं. मुंबई, पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर ते पार बेळगावहून मंडळी जमली होती ती केवळ पुलंवरील प्रेमामुळेच. वाटावं- हे एकच कुटुंब आहे! डॉ. जब्बार पटेल, बाबासाहेब पुरंदरे, जयंत नारळीकर, श्रीकांत मोघे, अरुणा ढेरे, माधव वझे, सुधीर गाडगीळ यांसारखी कलाक्षेत्रातील मंडळी त्या दिवशी जमली होती. त्यांच्यासमवेत वयाचा, ज्ञानाचा, कर्तृत्वाचा कसलाही भेद न बाळगता आम्हा मुलांना ‘मालती-माधव‘मध्ये काही तास घालवता आले ही कदाचित आमची पूर्वजन्मीची पुण्याईच! दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात एकमेकांशी बोलताना आम्हा मुलांच्या तोंडी फक्त पुलंचीच वाक्यं होती. जसं की आमच्यातला मृणाल ‘सर, हे पेढे!’ म्हणत गटण्याच्या भूमिकेत शिरून सर्वाना पेढे वाटत होता. मी बाबासाहेब पुरंदरे, जब्बार पटेल, माधव वझे यांच्याशी बोलताना एकच वाक्य म्हणायचो- ‘आपल्याशी एकदा (पुलं) या विषयावर बोलायचंय!’ डोंबिवलीहून आलेल्या आनंद मोरेंची ओळख करून दिली तर ते एकदम ‘म्हैस’मधल्या बाबासाहेब मोरे या पुढाऱ्याच्या भूमिकेत शिरून म्हणाले, ‘(मंत्रालयात) मालती-माधवमध्ये मीटिंग आहे..’ दुपारी जेवताना आम्ही एकमेकांना ‘अरे, घ्या.. घ्या, लाजताय काय च्यायला स्वत:च्या घरी असल्यासारखे!’ अशी टपली मारत होतो. पुलंच्या लोकप्रियतेचा मला आलेला एक अनुभव सांगतो. २०१५ साली मी मित्रांसमवेत तोरणा किल्ल्यावर अभ्यासासाठी गेलो होतो. चालून थकल्यामुळे दुपारच्या वेळी गडावर सावलीत निवांत झोपलो होतो. अचानक दुरून बारीक आवाजात ‘गोदाक्का, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ बघू?’ हे चितळे मास्तरांचं वाक्य कानावर पडलं. कुठल्याशा कॉलेजात शिकणारी मुलं सुट्टीत गडावर फिरायला आली होती. त्यातल्याच एकाच्या खिशातून ‘चितळे मास्तर’ ऐकू येत होते. गड चढताना कष्ट जाणवू नयेत म्हणून त्याने मोबाइलवर चितळे मास्तरांची क्लिप लावलेली आणि बाकीचे मन लावून ते ऐकत ऐकत गड चढत होते. वयोगट साधारणत: २०-२१ वर्षे. असं काही अनुभवलं की वाटतं, जगात आपल्यासारखे ‘पुलंयेडे’ बरेच आहेत.

मला वाटतं, पुलंना केवळ ‘विनोदी लेखक’ म्हणून जी ओळख मिळाली ती जरा अन्यायकारकच आहे. खरे पुलं त्यांच्या भाषणांतून आणि वैचारिक लेखांतून समजतात. पुलंच्या एकूण साहित्यसंपदेपैकी विनोदी साहित्याचं प्रमाण हे वैचारिक साहित्यापेक्षा कमीच असावं. पुलंची गोळी कडू नसे. त्यामुळं ती घेणाऱ्याचं तोंड कधीही कडवट झालं नाही. परिणाम मात्र योग्य तो व्हायचाच. पुलं वाचताना आपण उगाच काहीतरी गहन वाचतोय असं निदान मला तरी कधी वाटलं नाही. हो, अंतर्मुख जरूर झालो. अगदी पुलंचं विनोदी साहित्यही वाचूनही. पुलं वाचताना नेहमी मला संवादाचा भास होतो. माझं आपलं असं कुणीतरी माझ्याशी गप्पा मारतंय असं वाटत राहतं. ‘हा माणूस आपला आहे’ असं वाटणं ही भावना वाचकाचं लेखकाशी अदृश्य नातं जोडते. यामुळंच पुलं प्रत्येक पिढीशी आपलं नातं जोडून आहेत.

पुलं एक कमाल आस्वादक होते. जीवनाचा आनंद त्यांनी स्वत: तर घेतलाच आणि तो इतरांनाही वाटला. समाजातलं उत्तम ते- ते पाहावं, आस्वादावं आणि आयुष्य आनंदानं जगावं ही मूलभूत शिकवण पुलंनी आपल्याला दिली. पुलंमुळे मी पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे यांचं गाणं ऐकणं शिकलो. चार्ली चॅप्लिन समजला. व्यक्त होणं शिकलो. उत्तम मैत्र जोडणं शिकलो. कला, साहित्य, संगीत, नाटक यांत मनापासून काम करणाऱ्या मंडळींशी गट्टी जमवून आपली सांस्कृतिक भूक भागवणं शिकलो. रवींद्रनाथ टागोर समजावेत म्हणून वयाच्या पन्नाशीत पुलं शांतिनिकेतनमध्ये बंगाली भाषा शिकायला गेले होते, ही गोष्ट खूप काही सांगून जाते. त्यांनी रवींद्रनाथांचं भाषांतरित साहित्य वाचलं असतं तरी चाललं असतं, पण पुलंनी ते टाळलं. जीवनाचा सर्वार्थाने आनंद घेणं ते हेच.

मी मुद्दाम कुणाला ‘पुलं’ ऐकवण्यापेक्षा माझ्यासाठी त्यांची ऑडियो क्लीप लावतो. तो आवाज ज्या- ज्या माणसांच्या कानांवर पडेल, त्यांतून ज्याला जे भावेल तो पुलंचा झाला असं साधं-सरळ समीकरण आहे. समाधानाची बाब ही, की पुलंच्या लिखाणाला काळाचं बंधन नसल्यामुळे ज्याला मराठी भाषेचा सेन्स आहे अशा प्रत्येकाला पुलं भावतात. त्यामुळं ‘आजच्या पिढीला पुलं समजायला हवेत’, ‘इतरभाषिकांना पुलं समजायला हवेत’ वगैरे कल्पना वांझोटय़ा आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. अभिजात गोष्टी शाश्वतच असतात. कदाचित दृश्य किंवा वस्तूरूपात त्यांचं अस्तित्व नष्ट होईलही; परंतु परिणामस्वरूपात त्या काळावर मात करतात. पुलंचं कलेतलं योगदान शाश्वत आहे. ते बरोब्बर जिथं पोचायचं तिथं पोचणारं आणि चिरंतन टिकणारं आहे. त्यासाठी आपण वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज नाही.

अमोल लोखंडे
amolslokhande1984@gmail.com
लोकसत्ता
१२ जून २०२०

Thursday, June 11, 2020

‘मन’ : पु.ल. नावाचं - प्रवीण दवणे

एखाद्या जिवलग मित्राची ओळख नेमकी केव्हा झाली, हे जर पन्नास वर्षांनंतर कुणी विचारले, तर ज्याप्रमाणे आपण एका मजेशीर अडचणीत सापडतो, त्याप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके भाई म्हणजे पुलं यांच्याशी माझी वाङ्मयीन मैत्री केव्हा झाली, हे आज मला सांगणे अवघड जाते. माझ्या शालेय वयात पाठ्यपुस्तके ही केवळ पाठीवर न्यायची नव्हती, तर ती वर्षानुवर्षे जपावीत अशी होती आणि भाषेचे शिक्षकसुद्धा अनुक्रमणिकेच्या पाट्या टाकणारे नव्हते. आपल्याला केवळ मराठी शिकवायला नेमलेले नसून, मुलांना भाषेची गोडी लावण्यासाठी आपली नियुक्ती आहे, असे मानणारे होते. याचा परिणाम असा झाला की, आम्ही मुले वाचू लागलो. मराठीच्या तासाची वाट पाहू लागलो. त्या वाटेवरच प्रसन्न भाषेचे एक व्यक्तिमत्त्व माझ्या विद्यार्थिआयुष्यात आले आणि अर्थातच ते व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे!’

गंमत म्हणजे आजच्याप्रमाणे लेखकांचे किंवा कवींचे फोटो धडे किंवा कवितांवर नसत, तर त्यांची रेखाचित्रे असत आणि ती पाहून आम्ही ‘लेखक दिसतो तरी कसा?’ या उत्सुकतेची तहान भागवत असू. अशा क्षणी पु. ल. देशपांडे यांचे रेखाचित्र मी पाहिले आणि त्याही वयात मनाची मिस्कीलता जपणारे त्यांचे टपोरे डोळे, गंभीरतेचा खूप प्रयत्न करूनही, सज्जातून डोकावणार्‍या दोन उनाड मुलांसारखे डोकावणारे ते दोन दात, माझ्या वय वर्षे दहा या मनावर बिंबले गेले. आणि एकतर आवडलेला धडा पुन:पुन्हा वाचावा तसा इतर लेखकांच्या रेखाचित्राहूनही अधिक वेध घेतलेला हा चेहरा, यामुळे दुसरे कुणी म्हणायच्या आतच पु. ल. हे माझे लाडके व्यक्तिमत्त्व झाले. नेमका कुठला धडा होता ते आज आठवत नाही, पण पुढील वाचनाची गोडी लागावी असे काहीतरी त्यात होते. मात्र ‘इयत्ता’ पुढे सरकल्यानंतर साधारणत: आठवी-नववीच्या वयात मी माझ्या जगण्याचेच एक अंग असावे इतक्या सहजपणे पुस्तके वाचू लागलो. याच वाचनयात्रेत ‘अपूर्वाई’ हे प्रवासवर्णन माझ्या हाती आले. जग पाहण्याच्या माझ्या उत्सुकतेची मी उघडलेली ती पहिली खिडकी होती. एकाच वेळी प्रवासाचे वाचन आणि वाचनाचा प्रवास सुरू होता. खरेतर या आधी वाचलेली प्रवासवर्णनेही एकप्रकारची देश कसा बघावा याची गाईडस् होती. परंतु, पु. ल. देशपांडे यांच्या अपूर्वाईने एक वेगळेच गारूड माझ्या मनावर केले. ते नुसते वर्णन नव्हते. प्रवासात घडणार्‍या अनेक फजिती, गडबड-गोंधळ, त्यातून उडणारी भंबेरी, स्वत:चीच घेतलेली फिरकी, यामुळे पुस्तक वाचताना मी खो खो हसत असे. हा अनुभव मला फक्त चिं. वि. जोशी यांच्या ‘चिमणरावचे चर्‍हाट’ वाचताना आला होता. इतकं निर्मळ, नितळ असं लेखन माझ्या आयुष्यात पु. लं.च्या लेखनाच्या रूपाने आले होते आणि मग काय, एकच उद्योग सुरू झाला. शाळा सुटल्यावर वाचनालयात जावे आणि पुलंचं पुस्तक तेथून घेऊन यावे आणि पहाटेपर्यंत जितके जमेल तितके वाचावे, हसावे, असा दिनक्रमच सुरू झाला. ‘पूर्वरंग’, ‘जा जरा पूर्वेकडे’ अशी प्रवासवर्णने, जगण्याचा प्रवासही प्रवासातल्या जगण्याने आनंददायी करता येतो, हे सांगून गेली.

भारावून जाऊन मी पुलंना एक पत्र लिहिले. तोपर्यंत पुलंना खाजगी नात्यात ‘भाई’ म्हणतात, हे मला कळले होते. मी आपलं वांग्याच्या झाडाने वडाच्या झाडाशी मैत्री करावी, त्याप्रमाणे त्यांना लिहिले- ती. भाईस, सा. न. वि. वि. आणि पुढे त्यांची पुस्तके मला किती आवडतात ते थोडक्यात लिहिले. पंधरा-वीस दिवस गेले असतील, मी आपला उत्सुकतेनी पुलंचं दोन ओळींचं तरी उत्तर येईल म्हणून चातकासारखी वाट पाहात राहिलो. माझ्यासारख्या बारा-तेरा वर्षांच्या मुलाला पुलं कसले उत्तर देतात या कल्पनेने, अर्थातच त्यांना मी पत्र पाठवले हेही मी विसरून गेलो आणि ते विसरल्यामुळेच की काय, एका संध्याकाळी शाळेतून मी घरी परतताच, हाती नजराणा द्यावा त्याप्रमाणे माझ्या आईनेच मला एक पत्र ‘नजर’ केले. आतापर्यंत जो वाक्प्रचार मी मराठीच्या उत्तरपत्रिकेत एका गुणासाठी उपयोगात आणला होता तो वाक्प्रचार मी साक्षात जगत होतो. अर्थात ‘आनंद गगनात मावेनासा होणे’ हा तो वाक्प्रचार होता. अवघ्या मराठी मनाला भुरळ पाडणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अक्षरश: माझ्यासमोर होते. त्या पत्राच्या तीन-चार ओळीतसुद्धा भाईंनी माझी एक चूक जिव्हाळ्यानी काढली होती. भाईंनी लिहिले होते, चि. प्रवीण, अनेक आशीर्वाद. तू मला ‘ती.’ केल्यामुळे मी तुला ‘चि.’ करणे ओघानेच आले. माणसाने विनम्र असलेच पाहिजे; पण प्रवीणमधला ‘वी’ हा दीर्घच असला पाहिजे. तुझ्या पत्राला उत्तर देण्यास विलंब झाला, कारण काही महिने मी बंगालच्या दौर्‍यावर होतो. आणि पत्राच्या शेवटी ‘तुझा भाई’ असे मायेने लिहून स्वाक्षरी केली होती. पुलंच्या या पत्रामुळे मी चांगलाच धीटावलो आणि अधूनमधून पत्रं पाठवीत राहिलो.

का कोण जाणे, पुलंच्या केवळ लेखनामुळेच मला त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटली नाही, तर त्यांची पत्रे, त्यांची भाषणे, दूरदर्शनवरील त्यांच्या मुलाखती, कथाकथने हे सारेच मायेने ओतप्रोत आहे, हे मला जाणवले. पुलंना भरपूर ऐकण्याचा एक वेगळाच योग तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामुळे आम्हा भाग्यवंतांना लाभला. आपण ओळखलेच असेल, आणिबाणीचे काळेकुट्ट पर्व देशात सुरू झाले आणि मेणाहून मऊ असलेले पुलं वज्राहून कठीण कसे आहेत, याचे प्रत्यक्ष दर्शन महाराष्ट्राला घडले.

मला आठवतं, त्याच वेळी यशवंतराव चव्हाण आणि पु. ल. देशपांडे यांच्यातही शाब्दिक चकमक रंगली होती. यशवंतरावांची आणि पुलंची मैत्री होती व नाते जिव्हाळ्याचे होते; तरीही आपली मते परखडपणे मांडताना ही मैत्री आड आली नाही. त्याच वेळी दुर्गाबाई भागवत कराडच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या. दुर्गाबाई आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील वैचारिक मतभेद, ही जशी माझ्यासारख्या तरुण वाचकांना पर्वणी होती, तशीच त्याच संमेलनात पु. ल. देशपांडे यांनी केलेले भाषण हेसुद्धा माझ्यासाठी शब्दांची आणि विचारांची दिवाळी होती! इचलकरंजी येथील पुलंचे अध्यक्षीय भाषण म्हणजे प्रसन्न आणि खुमासदार शब्दांत किती ‘गंभीर’ बोलता येते, याचा नमुना होता. पुलंवरचे माझे प्रेम असे वेगवेगळ्या प्रकारे अधिक अधिक दृढ होत गेले. एक वेडच लागले म्हणा ना, जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे पुलंना पाहावे, त्यांना ऐकावे, त्यांना वाचावे, असे झपाटलेपण माझ्याच नव्हे, तर माझ्या पिढीतील असंख्य तरुणांमध्ये दाटून येत गेले. दरम्यान एक विद्यार्थी म्हणून मी पुलंना पत्र पाठवीत गेलो आणि मला त्यांची उत्तरेही येत गेली. इतकी लोकप्रियता आणि वेळेची व्यग्रता असूनही पुलं माझ्यासारख्या विद्यार्थ्याला उत्तर देत होते, याचे आजही मला नवल वाटते. त्याच दरम्यान एक अगदी दुर्मिळ आनंदयोग योगायोनानेच माझ्या वाट्याला आला तो म्हणजे, परमपूज्य बाबा आमटे यांच्या आनंदवनात जाण्याचा. कोण असावे तेथे? तर साक्षात पु. ल. देशपांडे! प्राचार्य राम शेवाळकर आणि पु. ल. देशपांडे दैवतासारखे समोर आहेत आणि आनंदवनाच्या गाभार्‍यात, स्वागताला बाबा आमटे आहेत. तीन दिवस त्यांच्यासह मी होतो. बालतरूची पालखी घेऊन त्याचे भोई कोण? तर पुलं आणि राम शेवाळकर. आनंदवनाच्या कार्याबद्दल भाईंनी काढलेले उद्गार आजही कानात गुंजत आहेत. भाई म्हणाले होते- ‘‘उद्ध्वस्त माती आणि उद्ध्वस्त माणूस यांचे नाते जोडण्याचे काम बाबांनी केले.’’ पुलंच्या वक्तृत्वाचा एक निराळाच नमुना मी थक्क होऊन अनुभवत होतो. त्यात पुलंना वाटणारी सामाजिक कार्याची तळमळ, परमपूज्य बाबांबद्दल वाटणारी श्रद्धा, उपेक्षितांबद्दल वाटणारी आस्था, या सगळ्याचा माझ्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला की, त्यांच्या अवघ्या लेखनाकडे बघण्याची माझी दृष्टीच बदलून गेली. लोक म्हणतात तसे पुलं हे केवळ विनोदी लेखक नाहीत, तर विलक्षण करुणा असलेले हे एक सहृदय व्यक्तिमत्त्व आहे, या दृष्टीने मी त्यांचे लेखन वाचू लागलो. पुन्हा एकदा त्यांचे आधीचे लेखन वाचताना मला जाणवले, सर्कशीतल्या सर्वांना हसवणार्‍या विदुषकाच्या डोळ्यांतही अश्रू दिसावा, त्याप्रमाणे हे लेखन कारुण्याने मनाला अंतर्मुख करणारे आहे.

पुलंची व्यक्तिचित्रे, वार्‍यावरची वरात आणि बटाट्याची चाळ यासारखे स्वत:शी व समाजाशी केलेले मुक्तचिंतन मी पुन्हा नव्याने वाचले. एकीकडे त्यांच्या सभांच्या लोकप्रियतेमुळे आणि पुस्तकाच्या प्रचंड खपामुळे, त्यांना लेखकच न मानणारा साहित्यातला न्यूनगंडाने पछाडलेला साहित्यिकांचा आणि समीक्षकांचा एक वर्ग मी बघत होतो आणि दुसरीकडे समाजाला जीवनावर भरभरून प्रेम करायला लावणारा, सांस्कृतिक मूल्ये मानणारा, केवळ स्वत:च्याच साहित्यावर प्रेम न करता अगदी नव्या लेखकांनाही भरभरून दाद देणारा खराखुरा माणूस मी पाहात होतो.
माझे वयच असे होते की, नवे काही चांगले ऐकले की मन तुडुंब भरून यायचे. कधी कुणी टीका केली की मतेही बदलत जायची. श्रद्धांच्या मोडतोडीचा हा काळ नव्या लेखकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ असतो. पुलं, दुर्गाबाई भागवत, गंगाधर गाडगीळ, चिं. त्र्यं. खानोलकर, जयवंत दळवी ही माझी तेव्हा साहित्यातील दैवते होती. त्यांच्यामध्येही मतभेद होतेच, पण कुठेही कडवटपणा नव्हता. म्हणूनच परस्परांतील मतभेदांचा परिणाम त्यांच्याबद्दलच्या वाटणार्‍या ओढीतच झाला. कुसुमाग्रज, बोरकर ही जशी कवितेतील दैवते त्याचप्रमाणे पुलं, गाडगीळ, खांडेकर ही गद्य लेखनातील दैवतेच ठरली. ही मंडळी केवळ उत्तम लेखकच होती असे नाही, तर त्यांच्या लेखनातून समाज सुसंस्कृत करण्याचे एक वेगळेच सामर्थ्य होते.

कामवलेल्या, रियाझी गळ्याच्या गवयाचे साधे गुणगुणणेही संमोहक वाटते. पुलंचे अगदी साधे बोलणेही तसे वाटायचे. काय त्या स्वरात जादू होती ते पुलच जाणे! कारण ‘देव जाणे’ म्हणण्याची पंचाईत; कारण रूढ अर्थाने ते देवभोळे नव्हते, पण देवत्व मात्र मानणारे होते. देवमाणूस जाणणारे होते. पंढरपुरीचा विठोबा पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू येत; कारण त्याच्या पायांवर ज्ञानेश्‍वर, तुकारामांनी माथा टेकला आहे, त्यांचे स्पर्श तेथे रेंगाळलेत, हा भाव त्यांच्या मनात दाटून येई. पुलं समजून घेताना त्यांचं हे हळवेपण समजून घ्यायला हवं.

अध्यापनाच्या आरंभीच्या काळात मी जरा जास्तच प्रयोगशील होतो. त्या जरा ‘जास्तीच्या’ उत्साहात मी केलेले प्रयोग कसे होते, याचा एक नमुना मला इथे सांगायचा आहे. वर्गात पुलंचा ‘अंतुबर्वा’ शिकवल्यानंतर पुलभक्तीची एक वेडी लाट वर्गात उसळली. अर्थात ही किमया पुलंच्या लेखणीची होती. त्या भरात मी विद्यार्थ्यांना पुलंच्या घराचा पत्ता देऊन म्हटले, त्यांना पत्र लिहा. त्यांच्या लेखनाने तुम्हाला दिलेला आनंद त्यांना कळवा. त्या काळात विद्यार्थी जरा विशेषच आज्ञाधारक होते. दोन वर्गांतील जवळजवळ दीड- दोनशे विद्यार्थ्यांनी भरभरून पत्रं लिहिली. पंधरा-वीस जेमतेम गेले असतील. दहा-पंधरा मुला-मुलींचा घोळका रोज ‘स्टाफरूम’मध्ये जमू लागला. माझी लोकप्रियता अचानक वाढल्याचे सावट स्टाफरूममध्ये पसरले. पण, ती किमया पुलंची होती. मुलांच्या हाती पत्रं होती आणि ती पुलंची त्यांना आलेली उत्तरे होती. हा सोहळा पाच-सात दिवस सुरू होता. पुलंनी सर्व मुलांना वेगवेगळी उत्तरे- त्यांच्या पत्रातील मजकुराचा सूर धरून लिहिली होती. (आजही ती आता पन्नाशीची झालेली मुले भेटतात-त्या पत्रांजलीने गहिवरतात.) गंमत म्हणजे रवींद्र नाट्यमंदिरातील त्यांच्या षष्ट्यब्दीला ‘चतुरंग- मुंबई’ या संस्थेने त्यांची थेट मुलाखत आयोजित केली होती. मी त्यातील एक मुलाखतकार होतो. पुलंच्या पत्रव्यवहारातील तत्परतेबद्दलचा प्रश्‍न विचारताना मी जाहीरपणे हा दीडशे पत्रांच्या प्रयोगाचा किस्सा सांगितला, तेव्हा पुल मिस्कीलपणे डोळे वटारून म्हणाले, ‘‘बरा सापडलास! तो अघोरी प्रयोग माझ्यावर करणारा तूच का तो!’’ नाट्यगृह हास्यरसात कल्लोळत राहिले. आता या गोड माणसाशी प्रत्यक्षही छान सूर जुळले होते; तरीही मी आदराने भान व मर्यादेचे अंतर राखून होतो. त्यात सुनीताबाईंचा सर्वश्रुत धाक- याचे एक कारण होतेच.

तरीही तो न जुमानता एकदा मी जरा ‘अधिकपणा’ केलाच. निमित्तही मजेशीर होतं. आळंदीला माउलीचं दर्शन घेऊन मी न माझे प्राध्यापक मित्र प्रा. दत्तात्रेय चितळे व मेव्हणे प्रशांत देशमुख पुण्यातून फिरत होतो. अचानक ते म्हणाले, ‘‘सर, अंतिम वाटावी अशी माझी एक इच्छा आहे.’’ मी थोडा चपापलोच. एवढा उत्साही माणूस एकाएकी असं का बरं म्हणतो आहे? बरं, आमचा दिवसही तसा छान गेला होता. मी फक्त प्रश्‍नार्थक पाहिले. ते म्हणाले, ‘‘एकदा- फक्त एकदा- पुलंना पाहायचंय. दुरून का होईना, बस्स् एकदा योग आणाच.’’ चितळेसरांचं पुलप्रेम मनापासून होतं, हे मला माहीत होतं. आता त्यांच्या स्वरातील ‘पुल’कित भाव मला स्पर्शून गेला होता. पंधरा-वीस पावलं जेमतेम मी चाललो. विचार करीत नि एकदम रस्त्यालगतच्या फुलवाल्याकडून पुष्पगुच्छ घेतला नि रिक्षाला हात केला. चितळेसरांना तर काय घडतंय हेच कळेना. रिक्षाचालकाला मी फर्मावले- ‘‘कमला नेहरू पार्क, रूपाली.’’ चितळेसर तर केवळ नि:शब्द होते. अवाक् व्हायला काही क्षण होते. काही मिनिटांत आम्ही एका दरवाजासमोर उभे होतो. पाटी होती. पु. ल. देशपांडे. स्वाक्षरी शैलीतील ती पाटी. बेल दाबली. अपेक्षेप्रमाणे सुनीताबाईंनीच दरवाजा उघडला. माझी धडधड वाढली. इतर दोघांचे काय झाले मला कळले नाही. मी नाव सांगताच सुनीताबाईंनी हसल्यासारखे केले.

‘‘फोन करून यायला हवे होते.’’
‘‘फोन नंबर नव्हता.’’
‘‘त्यासाठी आपल्याकडे डिरेक्टरीची सोय असते.’’
‘‘सुचलं नाही.’’
‘‘मग निदान वन् नाइन् सेव्हन्ला विचारून फोन नंबर घ्यायला हवा होता.’’
‘‘फक्त पाचच मिनिटं.’’
‘‘जो लेखक आवडतो- त्याच्या आरोग्यासाठीच त्यांना आरामाची गरज ओळखून मी म्हणतेय.’’
सगळी झाडमपट्टी सोसल्यावर एकदम चित्र पालटले. समोर खुर्चीत चक्क पुल! डोळ्यात तेच उत्साही बुद्धिमान मूल! चेहर्‍यावर केवढं निर्मळ हासू!

चॅर्ली चॅपलीनला पाहिल्यावर पुलंना जो अपरिमित व अवाक् करणारा आनंद झाला होता- प्रा. चितळे यांच्या चेहर्‍यावर तोच भाव होता. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते नि त्यांनी पुलंचे पाय धरून चक्क साष्टांग नमस्कार घातला. शब्दातीत असं ते भक्तिचित्र मी जन्मात विसरणार नाही. पार्किन्सनने कंप पावणारे हात- त्यांनाही दाटून आलेले- असे पुल मला म्हणाले, ‘‘प्रवीण, अरे हा इतका वाकलाय की त्याच्या वाकण्यापुढे मला वाकावं लागतंय.’’ आणि त्या भावकल्लोळातही हास्यकल्लोळ झाला. संध्याछाया नुसत्याच ‘भिववू’ लागण्याच्याच नव्हे, तर- ओढू लागण्याच्या वाटेवरही ‘पुल नावाचं एक मन’ केवढं प्रसन्न होतं. खरंच, पुलंच्या माणूसपणाची थोरवी मराठी मन निरंतर गातच राहीन.
मी एवढंच म्हणेन-
पुल असताना मी जन्माला आलो, त्यांना पाहता आलं, त्यांच्याशी बोलता आलं, त्यांचा हात पाठीवरून फिरला. माझ्यासारख्या मराठी भाषेच्या एका रसिकाला दुसरं अजून काय हवं असतं…!
प्रवीण दवणे
https://tarunbharat.org/?p=69307