विश्रांतीच्या वेळी करमणुकीसाठी ओव्या,भुजंगप्रयात,वसंततिलका वैगेरे छंदात आख्याने वैगेरे पडल्या पडल्या लिहून काढीत. विश्रांती झाली की पुन्हा सकाळच्या यमकांच्या जुड्या उलगडून आर्या पु-या करीत. संध्याकाळी पुराण सांगून झाले की जरा फिरून येत. तिथेही करमणूक म्हणून श्लोक वैगेरे रचित. पुढेपुढे दुकानदारांशी वैगेरेसुद्धा ते आर्येतच बोलत. क्वचित प्रसंगी दुस-याने उच्चारलेल्या शब्दांचा अर्थ समजण्यात घोटाळा होई. भाजीवालीला टोपलीत काय आहे हे विचारल्यावर ती "भोपळा" म्हणाली आणि पंतांना वाटले, "भो पळा" असे ती फणका-याने म्हणाली,म्हणून पळू लागले.शेवटी घरी आल्यावर भोपळ्याची फोड चुकली हे त्यांच्या ध्यानी आले.एकशेआठ रामायणे,अनेक महाभारते,भागवताचा दशमस्कंध शिवाय शंभरसव्वाशे फुटकळ आख्याने,इतके रचावयाला गेला बाजार शब्दांच्या सहस्त्र कोटी जुड्या बांधाव्या लागल्यामुळे त्यांच्या कानी शब्द आला की त्याचे यमक उभे राही. "कसे काय पंत "? म्हटले की "बरे आहे" म्हणण्याऐवेजी संत,खंत,दंत,हंत असे काहीतरी सुरू व्हावयाचे.मग पोरीबाळी "पंतकाका, आम्हाला गाणे, आम्हाला गाणे" करून मागे लागत. त्यांच्यासाठी येताजाता,झोपाळ्यावर वगैरे म्हणावयाला गाणी करून देत. झोपण्यापूर्वी एक हजारबाराशे आर्या करून झोपत.
आजही बारामतीस, त्यांच्या लक्षावधी आर्यांपैकी एकीचाही कोणाला फारसा पत्ता नसला तरी त्यांचे राहते घर दाखवितात.मात्र "बारामती कशाबद्दल प्रसिद्ध आहे ?" ह्या प्रश्नाचे उत्तर "सहकारी साखर कारखान्यांबद्दल" असे लिहिले तरच मार्क मिळतात, हे लक्षात ठेवावे.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment