Monday, March 28, 2022

आयुष्य घडविणारा विनोद - (अथर्व रविंद्र द्रविड)

"मे महिन्याच्या अखेरचे दिवस होते रत्नागिरीहून पहाटे 5 वाजता निघणाऱ्या एसटीतली ही कथा आहे" हे वाक्य त्या वाक्यातील कथा आणि ती कथा सांगणारा माणूस कोण हे जर तुम्हाला माहिती नसेल तर महाराष्ट्रात जन्म घेऊन तुम्ही मोठा गुन्हा केलात असं मला म्हणावं लागेल. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु ल देशपांडे या युगपुरुषाच्या जन्माला आज 100 वर्षे पूर्ण झाली. विनोद म्हणजे नक्की काय वेडीवाकडी थोबाड करून किंवा अंगविक्षेप करून विनोद होत नाही तर विनोद निर्माण होतो तो शब्दांच्या ताकदिने.ह्याच शब्दांच्या ताकदीने हजारोंच्या जनसमुदायाला हसवण्याची ताकद असलेला माणूस म्हणजे पुल. आयुष्यात प्रत्यक्ष त्यांचा विनोदांची मजा घेण्याची संधी मिळाली नाही पण केवळ कॅसेट्स व सीडी च्या माध्यमातून देखील पुलंनी आयुष्यावर पाडलेल्या प्रभावाने मी खरंच आजन्म उपकृत झालोय.

कोणताही प्रवास हा पुलंच्या कॅसेट्स शिवाय पूर्ण होतंच नाही.आपल्या प्रत्येकाचे स्वप्न असते की स्वतःचा एक बंगला किंवा मोठ्या इमारतीत फ्लॅट असावा पण मला विचाराल तर मी देवाला हेच सांगेन की पुढचा जन्म दिलास तर तो बटाट्याच्या चाळीत दे.बटाट्याची चाळ च्या माध्यमातून पुलंनी साक्षात एक कल्पना सृष्टीचं आपल्यापुढे उभी केली. साडेतीन तास एक माणूस जवळपास 50 एक पात्र आपल्यापुढे घेऊन येतो यातूनच त्यांचा अभिनय कौशल्याची ओळख पटून जाते.

बऱ्याचदा स्वतःबद्दल 4 ओळी देखील आपल्याला सांगता येणार नाहीत पण या माणसाने धोंडोपंत भिकाजी जोशी (बेमट्या)ह्या काल्पनिक माणसाचे संपूर्ण आत्मचरित्रच "असा मी असामी" या पुस्तकातून मांडले आहे. असा मी असामी मधील विनोद कधीही आठवले तरी तेवढेच हसू नेहमी येते . सर्वप्रथम हे पुस्तक वाचल्यावर एका लग्नात नवरी मुलगी खरोखरच "समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता आणि बेमटे रावांच नाव घेते माझा नंबर पहिला" असा काही उखाणा घेते की काय असे वाटु लागले

आपल्या लेखनातून पुलंनी आयुष्यातील प्रत्येक पैलूंचे दर्शन घडविले व विनोदाची ताकद काय ह्याचा परिचय करून दिला. 21 तास घडयाळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना 3 तास स्वप्न बघण्याची संधी त्यांच्या नाटकांतून त्यांनी दिली.

आयुष्यात जर कधी एकटे पडलात तर व्यक्ती आणि वल्ली वाचा कारण माणस सोडून जातील पण हरी तात्या,नाथा कामत, अंतू बर्वा,सखाराम गटणे, बबडू ही पुलंची पात्रं कधीही सोडून जाणार नाहीत व आयुष्यात खूप काही शिकवून जातील.

असो अश्या ह्या महामानवाबद्दल मी एवढे बोलणे म्हणजे काजव्याने सूर्याचे वर्णन केल्यासारखे आहे( सखाराम गटणे मधील वाक्य उलटे करून वापरले).

आजच्या काळात बंदूक व पैशाच्या जीवावर अनेक लोक भाई होतात... पण शब्दांच्या ताकदीवर झालेले *भाई* एकच ते म्हणजे *पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे*

- अथर्व रविंद्र द्रविड

0 प्रतिक्रिया: