Thursday, March 28, 2013

पुलंची विनोदबुद्धी - डॉ. शरद सालफळे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ पुल देशपांडे हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र सारस्वताला परमेश्‍वराने दिलेले वरदान आहे. पुल देशपांडे हे साहित्याच्या सर्वच क्षेत्रांत वावरलेत. विपुल लेखन केले. नाटके लिहिलीत. एकपात्री प्रयोग केलेत. चित्रपटांची निर्मिती केली. भावगीतांना व गाण्यांना सुंदर चाली लावल्यात. पुल सुंदर अभिनय करीत, सुरेल पेटी वाजवीत. या सार्‍या गुणांवरही ताण म्हणजे पुल एक उत्तम रसिक होते. चांगल्या गाण्याला, चांगल्या संगीताला, चांगल्या लिहिण्याला आणि चांगल्या बोलण्याला पुल मनमोकळी दाद देत. असल्या बहुशृत कलाकारास महाराष्ट्र कधी विसरूच शकणार नाही. सार्‍या महाराष्ट्राला आणि बृहन्महाराष्ट्राला पुल कायमचे स्मरणात रहातील, ते त्यांच्या विनोदबुद्धीमुळे. पुलंना विनोदाची निसर्गदत्त देणगी होती. पुल शाब्दिक कोट्या करीत, त्यावर सारा रसिकवर्ग खळाळून हसायचा.
 पुलंचे समाजमनाचे व समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे कमालीचे सूक्ष्मतम निरीक्षण असायचे. त्यांना भेटलेल्या व्यक्तींचे, त्यांच्या स्वभावाचे, गुणदोषांचे निरीक्षण करायचे. त्याला विनोदाची मखर देऊन त्या व्यक्तीविषयीचे अभ्यासपूर्ण लेखन करायचे. त्यातूनच त्यांचे विनोदी लेखन झाले. पुलंचे लिखाण केवळ विनोदासाठी विनोद असे नसून, ते आपल्या लेखनातून समाजातील दोषांना उघडे करून दाखवीत. व्यक्तींचे स्वभाव त्यांच्या गुणदोषांसह वाचकांसमोर येत. त्यांच्या स्वभावाला पुल विनोदाचे पांघरूण घालीत, पण दोष मात्र उघडे पाडीत.
 पुलंच्या लिखाणातून जीवनाचे सुंदर दर्शन होते. वाचताना आपल्या लक्षात येते की, या गोष्टी, या घटना प्रत्यही आपल्या सभोवती घडत असतात. आपल्या लक्षात कशा येत नाहीत? साधी ‘म्हैस’ घ्या. बसने झालेल्या अपघातात म्हैस जखमी होते. इतरांना वैताग येतो, पण पुलंना त्यात ‘सुबक ठेंगणी’ दिसते. इंप्रेशन मारणार्‍या हिरोची पुढे पुढे करण्याची वृत्ती दिसते. पंचनामा करणारा शिपाई दिसतो.

 पुल आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण रसिकतेने जगले. छोट्या छोट्या व्यक्तींमध्ये त्यांना लिहिण्यासारखं सापडायचं. लेट झालेल्या गाडीने आपण वैतागतो. पुल तोच वेळ प्लॅटफॉर्मवरील विविध व्यक्ती, त्यांचे खाणेपिणे, इतरांवर खेकसून बोलणे इत्यादींचा अभ्यास करून त्याची नोंद करतात.

 पानवाल्याच्या पानाबरोबरच पुलंना त्याच्या लादीचं आणि स्मरणशक्तीचं कौतुक आहे. रावसाहेबांची शिवराळ भाषा व त्यामागची कळकळ केवळ पुलंनाच कळली. नामू परिटाचा शर्ट हा आपलाच आहे, हे कळल्यावर संतापून न जाता नामूही त्यात जास्त खुलून दिसतो, असे सांगून पुल आपली खेळकर वृत्ती दाखवितात. पाळीव प्राण्यांपैकी एकालाही न दुखविता त्या प्राण्यांच्या मालकाची अशी खिल्ली उडविली आहे की, ते प्राणीही खुष व्हावेत.

 आवाजाच्या दुनियेचा पुलंनी घेतलेला कानोसा मजेदारच आहे. दररोज दारावर वस्तीतून हिंडणारे विक्रेते यांचा पुलंचा अभ्यास कमालीचा आहे. शेंगावाला, भाजीवाला, कुल्फीवाला, कल्हईवाला या सर्वांच्या आवाजाचे पृथ:करण करून त्यांच्या पोटापाण्याला तेच आवाज कसे पोषक असतात, ते पुलंनी सप्रमाण दाखविले आहे.

 प्राण्यांच्या ध्वनिविश्‍वातली व्यंजनं शोधण्याचे महाकठीण काम पुलंनी केलं आहे. पुलंना बहुधा तमाम प्राणिमात्रांची भाषा समजत असावी. कुत्र्यांच्या सभेतलं भाषण माणसांना समजावं, असं त्यांनी भाषांतरित केलेलं आहे.

 स्वत:ला लेखक-कवी म्हणविणार्‍या तथाकथित साहित्यिकांची पुलंनी मस्त खिल्ली उडविली आहे. या सार्‍यांचीच नोंद मराठी वाङ्‌मयाच्या गाळीव इतिहासात आली आहे. चोरलेल्या कवितांचे व लेखांचे साहित्यिकाच्या परिचयासह या इतिहासात उल्लेख आहेत.

 पुलंच्या विनोदास कधी चावटपणा चाटून जातो, तर कधी ते वाचकांना वात्रट वाटतात. प्रसंगी त्या विनोदास कारुण्याची किनार असते. समाजातील विषमता, विसंगती त्यांच्या लेखनातून डोकावते. उपरोधाने लिहिलेले मान्यवरांवरील लेख त्यांना त्यांना कळले तर पुल त्यांना मानधन द्यायला तयार असायचे. गरिबीची आणि गरिबाची पुलंनी कधी खिल्ली उडविली नाही, पण अंधश्रद्धा आणि ढोंगीपणावर त्यांनी विनोदाचे आसूड उगारले. उगाच मोठेपणा मिरविणार्‍या उच्चभ्रू समाजातल्या बायांना आणि श्रीमंतीची ऐट दाखविणार्‍या स्त्रियांना त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीने बोचकारले आहे. ज्ञानेश्‍वरीचा उपयोग ती डोक्यावर घेऊन सरळ चालण्याच्या व्यायामप्रकारात मोडतो म्हणणार्‍या बाया किंवा अध्यात्मावरील भाषणे हे फॅशन शोचे एक माध्यम मानणार्‍या बाया पुलंना भेटल्या. ‘तुझे आहे तुजपाशी’ मधल्या अतिविशाल महिलांचं मंडळ आचार्यांना असल्याच संदर्भात भेटायला येतं. आचार्यांचा क्रोध आणि विशाल महिलांचे निर्विकार पण व्यवहारी बोलणे यांचा संवाद रंजक वाटतो.
 पुलंचे विडंबनकाव्य अत्र्यांच्या ‘झेंडूची फुले’ वर मात करते. मनाच्या श्‍लोकांची पुलंनी केलेली मनमानी मौजेची आहे. मुंबईकर जेव्हा ट्राम व बसने जायचे त्यावेळी बटाट्याच्या चाळीतले द्वारकानाथ गुप्ते म्हणतात, ‘मना सज्जना ट्राम पंथेची जावे

| तरी वाचतो एक आणा स्वभावे॥ बशीला कशाला उगा दोन आणे| उशिरा सदाचे हफीसांत जाणे॥ पुलंच्या कविताही मिस्कील. त्यात अगम्य दुर्बोध असे काहीच नसे. वाचताना खुदकन हसू यावे अशा वात्रटिका त्यांनी लिहिल्यात. ‘हसविण्याचा माझा धंदा’ मध्ये ते लिहितात-‘गाळणे घेऊन गाळतो घाम चाळणे घेऊन चालतो दाम. चालीबाहेर दुकान माझे | विकतो तेथे हसणे ताजे| खुदकन् हसूचे पैसे आठ | खो खो खो चे पैसे साठ| हसविण्याचा करतो धंदा| कुणी निंदा कुणी वंदा॥

पुलंच्या विनोदावर खळाळून हसणारा मराठी वाचक श्रोता किंवा प्रेक्षक हा बहुशृत असला की, त्याला त्यांच्या विनोदाचे मर्म कळायचे. संदर्भ माहीत असलेत की विनोदाची खुमारी वाढते. दुसर्‍या बाजीरावाबद्दल गाळीव इतिहासात पुल लिहितात, दुसरे बाजीराव हे दानशूर होते. कुठल्याही कलावंतास ते १०० रुपये देत त्यावरून त्यांना दोन शून्य बाजीराव म्हणत. एक शून्य बाजीराव हे त्या काळात गाजलेले नाटक. त्याचा संदर्भ घेऊन ही शाब्दिक कोटी पुलंनी केली.

 पुल हे दानशूर लक्षाधीश होते, पण शाब्दिक कोट्यधीश होते. त्यांच्या कोट्या पराकोटीच्या असत. मर्ढेकरांचं काव्यवाचन करायला सुनीताबाई व पुल सातार्‍याला गेलेत. यजमानांनी खूप खाण्याचा आग्रह केला तेव्हा पुल म्हणाले, ‘अहो श्रोत्यांना मर्ढेकर ऐकवायचे आहेत ढेकर नव्हेत.’ जुन्या काळातल्या अभिनेत्री दुर्गाबाई खोटे यांचा संमेलनात परिचय करून देताना पुल म्हणाले, ‘याचे एक आडनाव सोडले तर बाकीचे यांचे सारे खरेच आहे.’ सौ. सुनीताबाई पुलंना सारखा औषधाचा व खाण्यापिण्याचा सल्ला देत तेव्हा पुल त्यांना जाहीरपणे ‘उपदेश पांडे’ म्हणायचे.

 पुल देशपांडे यांच्या विनोदी लेखनाने मराठी साहित्यात विनोदाचा व हास्याचा प्रचंड धबधबा आणि दबदबाही निर्माण केला आहे. त्यातले केवळ तुषारही आपल्या अंगावर उडालेत तरी आनंद होतो. जे त्या धबधब्याखाली ओलचिंब होतात किंवा झाले ते धन्य होत.
 सर्व प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे माणसाला हसता येते. पुलंनी याबद्दल ब्रह्मदेवाचे आभार मानले आहेत. पुलंनी माणसाला हसायला शिकविले यासाठीच पुलंनी एवढ्या लेखन प्रपंचाचा अट्टहास केला. आपल्या अवतीभवती एवढे सौंदर्य असते, आनंद देणारी निसर्गाची किमयागारे असतात, पण आपण इतके करंटे की आपणास त्यांची ओळख नसते. पुलंनी अवतीभवतीचा सारा आनंद माणसास दाखवून ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ हे खरे करून दाखविले. पुलंची विनोदबुद्धी शाब्दिक कोट्या करविते. प्रसंगोपात घडलेल्या विनोदाचं दर्शन घडविते. व्यक्तीमधल्या स्वभावविशेषाने घडणारे विनोदाचे साक्षात्कार दाखविते. अवतीभवतीच्या सार्‍या घटनांचे आपणही साक्षीदार असतो, पण त्यातल्या विसंगती नजरेला आणून देतात ते पुल. त्यातून आनंद घ्यायला शिकवितात ते पुल. ते म्हणतात, दुसर्‍याला हसू नका दुसर्‍याला सोबत घेऊन हसा. सर्वांनी एकत्रपणे हसण्यासाठीच विनोदाची निर्मिती असते.

 पुलंचे विनोद निर्मळ असत. त्यात अश्‍लीलता नसायची. कधी त्याला सेन्सॉरची कात्री लावावी लागत नसे. शाळकरी मुलांनाही समजेल असे पुलंचे साधे लेखन असायचे. अशा मराठी जगतास सार्‍या चिंतांसह, सार्‍या अडचणींसह हसायला शिकविणारा हा पुरुषोत्तम मराठी सारस्वताचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलवतो, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

-- डॉ. शरद सालफळे
 ६/१२/२०१२ , तरुण भारत

Thursday, March 21, 2013

'पुल'कित

काही व्यक्तिमत्वे असे काही दैवी देणे घेऊन आलेले असतात की त्यांच्या प्रतिभेसाठी आकाशाचा फलकही अपुरा पडतो. आपल्या कलेतून वर्तमान आणि भविष्यातील अगणित पिढ्यांचे सामान्य जगणे उजळवून टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते. अशा लोकांची निर्मिती पाहून, तिचा आस्वाद घेऊन तृप्ती तर होतेच पण त्या प्रतिभेचे विशुध्द तेज अनुभवून आपले स्वतःचे जीवनही एक आनंदयात्रा बनून जाते. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अशा असामान्य दैवी प्रतिभावंतांच्या यादीत पु.ल. देशपांडे हे नाव येणारी कित्येक वर्षे तळपत राहील. चौथी - पाचवीत असेन. बाबांनी पॅनॅसॉनिकचा नवा करकरीत डेक घेतला होता. त्यावेळच्या ऐपतीप्रमाणे जरा अंगाबाहेरचाच खर्च होता पण ती सिल्वर कलरची सिस्टम आणि तिचे ते मोठाले स्पीकर पाहून वरकरणी रागावलेली आईही मनातून आनंदी झालेली दिसत होती. नव्या डेकचे उद्घाटन करण्यासाठी पु.लं.ची म्हैस, अंतू बरवा आणि पानवाला ही अतिशय गाजलेली कथाकथन कॅसेट आणली होती. पुढचे कित्येक महिने आम्ही ती कॅसेट अक्षरश: झिजवली. त्यातल्या ओळीन ओळी मला पाठ झाल्या होत्या.

लवकरच वाचनही सुरु झाले आणि पु.लं. ची पुस्तके जगण्याचा अविभाज्य घटक बनली. त्या कथाकथनाने निर्माण झालेला त्यांचा पगडा एवढा जबरदस्त होता की मी अजूनही पु.ल. वाचताना त्यांच्या त्या सानुनासिक आवाजात ते स्वतः वाचून दाखवतायत असंच वाटत रहातं. वय वाढत गेले, पु.लं. व्यतिरिक्त अनेक लेखकांच्या लिखाणाची ओळखही झाली. पण त्यांचे अग्रस्थान कायम राहिले. त्यांचे आणि त्यांच्याविषयीचे जसेजसे वाचत गेलो तसेतसे त्या व्यक्तिमत्वाचा उत्तुंगपणाही नजरेत भरत गेला. आज थोडी समज आल्यावर जाणवते ते हे की पु.ल.नी आपल्या लिखाणातून जी इतर लेखकांची, कलांची, कलासाधकांची ओळख करून दिली ती जास्त प्रभावशाली होती. व्यासंग म्हणजे काय याचे ते लिखाण एक मार्गदर्शकच होते. चाप्लीनचे चित्रपट पाहून मी एरवीही हसलो असतो पण त्या विनोदामागील कारुण्य आणि अधिष्ठान समजण्याची गरज पु.लं. नी निर्माण केली.

आईला आणि मला त्यांना भेटायची प्रचंड इच्छा होती पण त्यावेळी त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. पूर्व परवानगीशिवाय भेटणे अशक्य होते. तसे केल्यास सुनिताबाईंकडून कशी 'बिनपाण्याने' व्हायची शक्यता असते तेही बऱ्याच जणांकडून सोदाहरण कळलेले होते. त्यामुळे त्यांची भेट व्हायची शक्यताच नव्हती. त्यांच्या घराचा पत्ता पाठ होता. पुण्यात गेल्यावर त्या इमारतीवरून बऱ्याच वेळा गेलो होतो, काही फुटांवरच आत आपले दैवत राहते आणि भेट शक्य नाही या भावनेने हताशही झालो होतो.

आई थोडेफार लेखन करीत असे. तिच्या एका कथासंग्रहाला बरेच पुरस्कार मिळाले. एके दिवशी सुनिताबाईंचे 'इन्लॅण्ड लेटर' आले. त्यात त्यानी आईचे पुस्तक दोघानाही आवडल्याचे लिहिले होते. एका विशेष कथेविषयी मौलिक रसग्रहण केले होते आणि सोने पे सुहागा म्हणतात तसे खुद्द पु.ल. नी पार्किंसंस असूनही थरथरत्या हातांनी चार आशीर्वादपर वाक्ये लिहिली होती. अनेक पुस्तकांवर पाहिलेली ती विशिष्ट वळणाची सही प्रत्यक्षात पाहताना आम्हाला लॉटरी लागल्याचा आनंद झाला होता. पत्राच्या शेवटी सुनीताबाईंनी घरी भेटण्याचे आमंत्रण दिले होते. फोन नंबर दिला होता आणि सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत कधीही या, पु.ल. फ्रेश असतात, काही बोलणे होईल असेही सांगितले होते. आई दुसऱ्याच दिवशी गेली असती पण माझी इंजिनियरिंगची फायनल चालू होती. हा कपिलाषष्ठीचा योग मी सोडणार नव्हतो. त्यामुळे नाईलाजाने आईला पंधरा दिवसांनंतरची वेळ फोन करून मागून घ्यावी लागली. पंधरा दिवस आम्ही नुसते सळसळत होतो. दोन आठवड्यानी आम्ही पुण्याला निघालो. काशीयात्रेला जाताना लोक पूर्वी भेटायला यायचे तशा आईच्या मैत्रिणी तिला 'घालवायला' आल्या होत्या.

साडे नऊच्या सुमारास आम्ही त्यांच्या घरापुढे होतो. मी चाचपडत बेल दाबली. दोन मिनिटांनी दार उघडले. एखादा नोकर/कामवाली बाई दार उघडेल, आपल्याला काही वेळ बाहेरच्या खोलीत बसवून ठेवतील आणि नंतर पु.ल. आले तर बाहेर येतील असं काही मला वाटलं होतं. दार उघडताच माझी शुध्द हरपली. खुद्द पु.ल. नी दार उघडलं होतं. आधीच धास्तावलेले आम्ही क्षणभर बधीर झालो. काय करावे काही सुचेना. पॉझ बटन दाबल्यासारखी स्थिती होती. ते आम्हाला आमचे नाव विचारत होते (खात्रीसाठी) आणि आम्ही दोघं गोठून गेलो होतो. त्याक्षणी माझी कुठली अंत:प्रेरणा जागृत होती माहित नाही पण पुढच्या आयुष्यात स्वतःचा अभिमान वाटत राहील अशी एकच गोष्ट माझ्या हातून घडली. त्यांच्या पायावर मी झोकून दिलं. डोळ्यातून पाण्याच्या धारा आपसूक वाहू लागल्या. इतक्यात मागून सुनिताबाई आल्या. त्यानी आम्हाला उठतं केलं. आत गेलो. काही काळ केवळ त्या दोघांकडे विशेषत: पु.लं. कडे अनिमिष बघण्यात गेला. शेवटी पु.लं. नीच विचारले ' अरे काही बोलणार आहात की नुसतेच बघून परत जाणार आहात?'. आम्हाला हसू फुटलं. अडखळत - घुटमळत बोलणं सुरू झालं.

किती क्षीण झाले होते ते. पुस्तकांच्या वेष्टनावर दिसणाऱ्या सतेज चेहऱ्याचा मागमूस नव्हता. केस विरळ होते, पांढरी दाढी चेहरा व्यापून होती. दोनच गोष्टी आमच्या ओळखीच्या होत्या त्या म्हणजे त्यांचे स्वत:शीच खुशीत हसणारे डोळे आणि आमच्या काळजात घर करून बसलेला तो खणखणीत आवाज. काळाच्या तडाख्यातून त्या कशा वाचल्या होत्या कोण जाणे.

सुदैवाने त्या दिवशी त्यांची तब्येत बरीच चांगली होती. आम्हाला वीसेक मिनिटांची वेळ दिली होती पण सुनिताबाईच इतक्या बोलू लागल्या की दोन तास आम्ही तिथे होतो. आयुष्य ओवाळून टाकले तरीही परत मिळणार नाहीत असे ते दोन तास होते. आईला त्यांनी 'पोहे करूया का ग? भाई सकाळपासून कर म्हणतोय, मी तुम्ही आल्यावर करू म्हणत होते. चल आत तुला घर दाखवते ' असं म्हटले. आईला चक्कर यायचीच बाकी होती. ज्यांना भेटायची ती गेली २५ वर्षे स्वप्न पाहत होती त्यांना त्यांच्याच घरात स्वत:च्या हातचे खाऊ घालायचे? जणू काही सुनिताबाईंचा विचार बदलेल तर काय करा अशा भीतीने ती त्यांच्यापुढे स्वयंपाकघरात धावली. त्यापुढची १५-२० मिनिटे माझ्या सुखाची परमावधी कारण पु.ल. आणि मी दिवाणखान्यात दोघेच. मी भीतभीत वुडहाउसचा विषय काढला. त्यांची कळी खुलली. वुडहाउसच्या जीवनाविषयी त्यांनी खूप आठवणी सांगितल्या. शेवटी म्हणाले 'त्याला मी भेटू/बघू शकलो नाही हे मला फार शल्य आहे. खरेतर जेव्हा जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा तेव्हा थोडा प्रयत्न केला असता तर नक्कीच भेट झाली असती पण काय झाले कोणास ठाऊक! विल पॉवर कमी पडली ' . मी भक्तिभावाने एक एक शब्द, एक एक हालचाल मनात साठवत होतो.
कौतुक करत त्यानी पोहे खाल्ले, आईच्या लिखाणाची पुन्हा तारीफ केली. आई अल्लड नववधूप्रमाणे लाजून/भावनातिरेकाने लाल झाली होती. जाण्याची वेळ आली. पुन्हा एकदा निस्सीम भक्तीने दोघांच्या पाया पडलो. डोळे भरून पु.लं. ना पाहिले, त्यांच्या घराकडे बघितले आणि कष्टाने पाय बाहेर ओढला.

आज विचार करताना तो दिवस दाखवल्याबद्दल जग:नियन्त्याचे आभार मानण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले, आनंद यादवांसारखा हिरा काळ्या मातीतून वर काढला, मुक्तांगणला संजीवनी देऊन हजारो व्यसनाधीन लोकांना माणसात आणण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला त्या तेज:पुंज स्रोताची काही किरणे आमच्याही आयुष्यांवर पडावी आणि आमचे सामान्य जीवन आयुष्यभरासाठी 'पुल'कित व्हावे ही त्या ईश्वराचीच योजना असणार, दुसरे काय?

अजूनही पु.लं. ची पारायणे चालूच आहेत. काही ओळी वाचताच हसण्याचा उमाळा येतो. डोळ्यातून पाणीही सांडते पण ते फक्त लिखाणातील विनोदामुळे आलेले असते असे आता वाटत नाही. त्या दोन -एक तासात मिळालेल्या दैवी अनुभूतीच्या - असीम कृपेच्या आठवणी त्या अश्रूत मिसळतात आणि त्या अश्रूंना माझ्यालेखी तीर्थाचे महात्म्य प्राप्त होते.

-- अमेय पंडित
मुळ स्त्रोत  - https://www.facebook.com/groups/marathisahityasamooh/permalink/350889888350577/

हा अप्रतिम लेख पु.ल.प्रेम ब्लॉगसाठी सुचवल्याबद्दल श्री. हर्षल भावे आणि लेखक श्री. अमेय पंडित ह्यांचे अत्यंत आभारी आहोत.