Tuesday, April 30, 2019

मारवा आजही स्मरणात आहे! - सुनंदा धर्माधिकारी

''रायकरवाडी' या नाटकाच्या प्रयोगावेळी बासरीवादकामुळे प्रयोग खोळंबलेला पाहून 'त्यांनी' बासरीवर वाजवलेला तो मारवा आजही अगदी तसाच माझ्या स्मरणात आहे. मी तो प्रयोग विसरू शकलेले नाही. मी ते स्वर विसरू शकलेले नाही आणि ती व्यक्ती मी विसरू शकत नाही. त्या व्यक्तीचं नाव होतं पु. ल. देशपांडे. म्हणजे आमचा पीएल!' पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांचा दीर्घ सहवास लाभलेल्या जुन्या पिढीतील अभिनेत्री सुनंदा धर्माधिकारी यांनी भाईंच्या आठवणींना दिलेला उजाळा...
साधारण १९५७ची गोष्ट. नाट्यदिग्दर्शक, लेखक बाबा डी. के. यांच्या 'रायकरवाडी' या नाटकाचा इंदूरमधील प्रयोग. माझी नाटकातली प्रमुख भूमिका. नवखी असल्याने मी प्रचंड गोंधळलेली, घाबरलेली. प्रेक्षक, प्रमुख पाहुणे आसनस्थ झाले. पडद्यामागे गोंधळ आणि पडद्यासमोर प्रचंड गर्दी. नाटक सुरू होण्यास होणारा विलंब; कारण बासरीवादकाचा पत्ता नाही आणि नाटकाची सुरुवातच बासरीच्या स्वरांनी. सारे खोळंबलेले. अशा वेळी एक माणूस पडद्यामागे आला आणि बाबांना विचारू लागला, 'काय झालं?' कारण समजल्यावर म्हणाला, 'एवढंच ना? मला फक्त बासरी आणून दे, मी वाजवतो.' त्यांनी बासरीवर वाजवलेला तो 'मारवा' आजही माझ्या स्मरणात अगदी तसाच आहे. मी तो प्रयोग विसरू शकलेले नाही. मी ते स्वर विसरू शकलेले नाही आणि ती व्यक्ती मी विसरू शकत नाही. त्या व्यक्तीचं नाव होतं पु. ल. देशपांडे. म्हणजे आमचा पीएल.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि मनस्वी कलाकार असलेल्या पु. ल. देशपांडे यांची आणि माझी पहिली भेट ही अशी झाली. माझा जन्म मध्य प्रदेशमधील उज्जैनचा. कलेच्या वातावरणातच मी लहानाची मोठी झाले. गणेशोत्सवात होणाऱ्या नाटकांतून छोट्यामोठ्या भूमिका केल्या. नाटकवेड रक्तात भिनलं. त्या काळी लवकर लग्न होत. माझंही लग्न लवकर झालं आणि मी इंदूरला आले. आपण पुन्हा नाटक करावं अशी ऊर्मी पहिल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर दाटून येऊ लागली. त्याचवेळी माझी भेट सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, लेखक बाबा डी. के. यांच्याशी झाली. त्यांच्यामुळे १९५६मध्ये मी 'नाट्यभारती'शी जोडले गेले. १९५७मध्ये 'लिटिल थिएटर्स' या संस्थेची स्थापना आम्ही केली आणि वर्षाला सहा दर्जेदार नाटकांची निर्मिती करायचं ठरवलं. संस्थेच्या पहिल्याच वर्षी यूजीओनिल या सुप्रसिद्ध इंग्रजी नाटककाराच्या 'बीयाँड द होरायजन' या नाटकाचा मराठीत अनुवाद करून बाबांनी लिहिलेलं 'रायकरवाडी' हे नाटक आम्ही बसवलं. त्याच्या पहिल्याच प्रयोगाला वर सांगितल्याप्रमाणे माझी आणि पीएलची भेट झाली. पुढे ती होत गेली आणि मला माझा नाट्यगुरू मिळाला. अतिशयोक्ती वाटू शकतं; मात्र खरं सांगते, मला माझा देव मिळाला!

आज भाईंना आठवताना किती भेटी स्मरतात. ते अतिशय साधे-सरळ-सहज आणि विनोदी होते. कोणी कामात हयगय केलेली त्यांना अजिबात खपायची नाही. या माणसाचं कलेवर केवळ प्रेम होतं असं नाही, तर त्यांची कलाविष्कारावर निष्ठा होती. जे करायचं ते उत्तमच, असा आग्रह होता. 'लिटिल थिएटर्स'च्या एका कार्यक्रमात बाबांनी भाईंना अध्यक्ष म्हणून बोलावलं होतं. आम्ही सगळेच नवोदित आणि अव्यवसायी असल्यानं, संवाद पाठांतरात गडबड व्हायची. ते कधीतरी भाईंच्या लक्षात आलं असेल. कार्यक्रमात बाबा म्हणाले, 'मी आता विनंती करतो, की पु. ल. देशपांडे यांनी दोन शब्दांत मार्गदर्शन करावं.' भाई बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, 'दोनच शब्द सांगतो, पाठ करा!' अशा असंख्य आठवणी आहेत.

बाबा डी. के. यांनी लिहिलेलं 'कारकून' नाटक त्या काळी खूप गाजलं होतं. त्या नाटकात माझी खूप छोटी भूमिका होती. माझ्या वाट्याला केवळ बारा वाक्यं होती. पडद्यामागे मी खूप काम करायचे. अगदी पडेल ते. एका प्रयोगाला भाई आले होते. त्यांनी माझी धावपळ पाहिली आणि ते सर्वांना म्हणाले, 'अरे, या पोरीची काय कमाल आहे रे! ही काय काय करते!' त्यांची ही शाबासकीची थाप मला खूप बळ देऊन गेली. आज मागे वळून पाहताना जाणवतं, मी भाईंमुळे केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर माणूस म्हणूनही समृद्ध झाले. त्यांच्यामुळे माझी वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, मो. ग. रांगणेकर, भीमसेन जोशी, रामूभय्या दाते या दिग्गजांशी ओळख झाली. पुढे या सगळ्यांशी अतूट स्नेह निर्माण झाला. इंदूर, उज्जैन, देवासमध्ये मी यांच्या कितीतरी मैफली ऐकल्या आहेत.

पुढे माझं काम बघून रांगणेकरांनी एकदा विचारलं, 'मी 'नाट्यनिकेतन' ही संस्था सुरू करतोय. तू आमच्याकडे काम करशील का? तुला मुंबईत यावं लागेल.' हा माझ्यापुढे खूप मोठा पेच होता; कारण मुंबईत आमचं कोणीच नव्हतं. माझे यजमान गोविंद धर्माधिकारी इंदूरला रेल्वेत नोकरीला होते. संसाराचा व्याप वाढला होता. मी तीन मुलींची आई झाले होते. अखेर विचाराअंती नम्रपणे नकार दिला. त्यानंतर एकदा घडलेला प्रसंग. शिवाजी मंदिरामध्ये आमचा 'फुलाला सुगंध मातीचा' या नाटकाचा दुपारी प्रयोग होता आणि त्यानंतर लगेचच पुलंचं 'वाऱ्यावरची वरात' होतं. नाट्यगृहाच्या जिन्यात आमची भेट झाली. मला म्हणाले, 'एक लक्षात ठेव. रांगणेकरांकडे एकदा काम केलेला मनुष्य नंतर कधी मागे वळून पाहत नाही. उदाहरणार्थ, पु. ल. देशपांडे, प्रभाकर पणशीकर आणि आता सुमन धर्माधिकारी.' ही माझ्यासाठी खूप मोठी दाद होती.

त्यानंतर खरंच तसं झालं. मी सुमारे पाच-सहा नाट्यसंस्थांसाठी काम करू लागले. 'प्रीती परी तुजवरती'सारखी नाटकं खूप गाजली. अभिनेत्री म्हणून मला नाव मिळू लागलं. या प्रवासात मी भाईंचा वाढदिवस कधीच चुकवला नाही. प्रत्येक वाढदिवसाला त्यांच्या घरी जाऊन नमस्कार करायचे आणि फूल द्यायचे. भाईंचं 'तुज आहे तुजपाशी' हे नाटक मी हिंदीत केलं. त्याचं लेखन राहुल बारपुते यांनी केलं होतं. त्यावरही भाई खूष होते. १९७२मध्ये मी 'घार हिंडते आकाशी' या रंगनाथ कुलकर्णी लिखित नाटकाचे एकपात्री प्रयोग सुरू केले. तेव्हाची एक आठवण आहे. भाईंना फोन केला आणि सांगितलं, 'मी एकपात्री प्रयोग करते आहे. तुमचे आशीर्वाद हवे आहे.' मला म्हणाले, 'आता हे खूळ कुठून आलं तुझ्या डोक्यात. तू आताच्या आता माझ्या घरी ये.' तेव्हा ते मुंबईला 'मॉडेल हाउस'मध्ये राहायचे. आम्हीदेखील मुंबईत राहू लागलो होतो. मी तडक त्यांच्या घरी गेले. ते म्हणाले, 'मला पूर्ण नाटक म्हणून दाखव.' मी पूर्ण नाटक म्हणून दाखवलं. त्या नाटकाच्या दुसऱ्या अंकात एक गाणं आहे. तेही मी गुणगुणलं. आजही ते आठवताना भरून येतं, की माझं गाणं ऐकताना भाईंच्या दोन्ही डोळ्यांत अश्रू होते. माझ्या साठ वर्षांच्या नाटकाच्या कारकीर्दीतील हा अमूल्य ठेवा आहे. संपूर्ण नाटक ऐकल्यावर मला विचारलं, 'या गाण्याला चाल कोणी लावली?' 'मीच,' असं सांगितल्यावर तर त्यांना खूप आनंद झाला. पुढे 'घार हिंडते आकाशी'चे हजारो प्रयोग झाले. प्रेक्षकांनी ते नाटक उचलून धरलं.

भाईंकडे मी कधीही हक्काने जाऊ शकत होते. दर वेळी काहीतरी खाद्यपदार्थ करून मी घेऊन जायचे. भाई, सुनीताबाई अगदी आनंदाने त्याचा आस्वाद घ्यायचे. अनेकदा सुनीताबाई गमतीने विचारायच्या, 'मी घेतलं तर चालेल ना?' सुनीताबाईंचा आणि माझा स्नेह शब्दांत सांगता येणार नाही. भाईंच्या शेवटच्या क्षणी मी रुग्णालयात त्यांच्या भेटीला गेले होते. ते आय.सी.यू.मध्ये असल्यानं बाहेरून भेटले. मी म्हणाले, 'माझ्या देवा माझ्याकडे लक्ष ठेवा.' भाई सर्वांना सोडून निघून गेले, त्यानंतर काही दिवसांनी आम्ही 'अंमलदार'चा प्रयोग केला. त्याची रॉयल्टी द्यायला मी भाईंच्या घरी गेले. सुनीताबाईंनी दार उघडलं आणि त्या म्हणाल्या, 'सुमन आज तुझा भाई नाही गं तुझ्या स्वागताला...' यानंतर किती तरी वेळ त्या मला मिठीत घेऊन रडत होत्या. मी त्यांना जे सांगितलं, तेच आजही सांगते, 'भाई तुम्ही कुठे गेला नाहीत. इथेच तर आहात.'

(शब्दांकन : मयूर भावे)
महाराष्ट्र टाइम्स
Feb 10, 2019

Monday, April 22, 2019

'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे - स्पृहा जोशी

'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' हे वाक्य इतक्यांदा वाचून ऐकून खरंतर इतकं गुळगुळीत झालंय, पण या वर्णनामागचा माणूस इतका सदाबहार आहे, हवाहवासा आहे की त्याची जादू काही केल्या कमीच होत नाही. पु. ल. देशपांडे हे नाव आपल्या सगळ्यांसाठी आपल्या घरातलं आहे, मनातलं आहे. प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्यावर त्याचा हक्क आहे असं वाटतं. आणि 'पु.ल.' या एका शब्दाच्या उच्चाराने ओठांवर एक हलकं हसू येतच येत.                       
पुलंचं इतकं साहित्य आत्तापर्यंत वाचलंय, त्यांच्या ध्वनि-चित्रफिती ऐकल्यात, मनसोक्त हसलेय. पण 'पुलं'वरचं चरित्रात्मक पुस्तक कधी हाताला लागलं नव्हतं. ते सापडलं - मंगला गोडबोले यांनी लिहिलेलं - 'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे - हे पुस्तक माझ्यासारख्या प्रत्येक पुलवेड्या माणसाला खूप आवडणार आहे. कारण वेगवेगळ्या अंगांनी यात 'पुलं' भेटतात. सुनीताबाई भेटतात. पुलंचा प्रचंड अभ्यास, कलाकार म्हणून त्यांनी पाहिलेलं समृद्ध अनुभवांचं विश्व, त्यांच्यातला विलक्षण प्रतिभेचा, असामान्य स्मरणशक्तीचा लेखक आणि हे सगळं करत असताना जीव जडावा असा खराखुरा, प्रेमळ, हसरा, निगर्वी, संवेदनशील माणूस. पानापानांतून आपल्याला हा थोर असूनही आपल्यातला वाटणारा माणूस भेटत राहतो. आणि कळतनकळत आपण भावुक होत राहतो. डोळे टिपत राहतो.

मंगलाताई नेहमी मस्तच लिहितात. त्यांची नर्मविनोदी खुसखुशीत शैली नेहमी प्रत्येक लिखाणात ताजीतवानी वाटत राहते. तसंच हे पुस्तक वाचतानाही होतं. मुख्य म्हणजे फक्त घटनांची जंत्री देऊन त्या थांबत नाहीत. त्या प्रत्येक बाबतीत लेखिका म्हणून त्यांचा स्वतःचा take सांगतात. पुलंवर केल्या गेलेल्या साहित्यिक आरोपांचं सप्रमाण खंडन करतात. आणि पुलंसोबतच त्यांच्या आयुष्यातलं सुनीताबाईंचं महत्त्वसुद्धा ठळकपणे अधोरेखित करतात. 'पुलं'बद्दल ज्यांना नव्याने समजून घ्यायचंय किंवा त्यांच्याबद्दलचे काही संदर्भ तपासायचेत तर ते सगळे या एकाच पुस्तकात नक्की सापडतील. आणि 'पुलं' हे ज्यांचे ज्यांचे 'प्रेयस' आहेत, त्या त्या सगळ्यांना तर ही वाचन सफर नक्की आवडणार आहे. या पुस्तकातल्या शेवटच्या पॅरेग्राफवर मी थबकले, आणि तो पुन्हा पुन्हा वाचला. -
'भय इथले संपत नाही..' ही कवी ग्रेस यांची कविता अनेकांना माहित आहे. त्या अर्थानं नसलं, तरी आज आपल्यालाही पुष्कळ प्रकारच्या भयानं ग्रासलं आहे. भाषेची तरलता, सुरांची निरागसता, माणसामाणसांमधला मनमोकळा संवाद, परस्परविश्वास हरवत चाललेले जाणवताहेत. अशा वेळी पुलंनी मागे ठेवलेले काही गहिरे सूर, काही उत्कट संवाद, चिमटीत अलवारपणे पकडलेले काही हळवे क्षण आणि दिलखुलास हास्याची अधूनमधून केलेली पखरण आठवावी आणि 'हे सरता संपत नाही.. चांदणे तुझ्या स्मरणाचे' असं म्हणून जमेल तेव्हा पुलंना ऐकत-बघत-वाचत राहावं, एवढंच आपल्याला शक्य आहे. आयुष्याच्या एरवीच्या रखरखाटात असं एखादं हक्काचं चांदणं आपल्या जवळ असावं, हेच केवढं तरी नाही का?"

१२ जून २००० रोजी पुलंचं निधन झालं. तेव्हा मी खूप लहान होते. पाचवीत होते. पुलंची अंत्ययात्रा टी.व्ही. वर दाखवत होते. माझी आई घळाघळा रडत होती. मला कळतच नव्हतं, की आपली अजिबात ओळख नसलेल्या एका म्हाताऱ्या माणसासाठी, ते गेले तर आई का रडतेय? मी आईला विचारलंसुद्धा... तर ती एवढंच म्हणू शकली, 'पुलं गेले आपले... तुला आता नाही कळणार बाळा!' कोणीतरी आपलं गेलं, हे आता आपल्याला कधीच पुन्हा बघायला मिळणार नाहीत... एवढंच मला त्या वेळेला कळलं. साधारण सातवीत असताना तिने मला 'व्यक्ती की वल्ली' दिलं. आणि त्या वेळेला ते वाचून आत कुठेतरी कळ जाणवली, की चितळे मास्तर, सखाराम गटणे ची गोष्ट रंगवून रंगवून सांगणारे 'आपले' आजोबा गेले आहेत.

पण एक बरं आहे, या आजोबांनी ४५ पुस्तकं लिहून ठेवलीयेत. बाकी इतर अनुवादित साहित्य, भाषणं वेगळीच ! त्यामुळे 'गोष्ट सांगा' म्हणून त्यांच्याकडे कधीही हट्ट केला, तरी नात्यागोत्याच्या नसलेल्या, कधीच न पाहिलेल्या मी आणि माझ्यासारख्या अगणित नातवंडां-पतवंडांना ते कधीही नाराज करत नाहीत. हे 'मैत्र' आमच्यासाठी लाखमोलाचं आहे.
- स्पृहा जोशी

Friday, April 5, 2019

पुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं!

तब्बल शंभर वर्षांपूर्वी जन्मलेला, अठरा वर्षांपूर्वी कालवश झालेला, मात्र दरम्यान तब्बल सहा दशकांचा काळ मराठी मनाला मनसोक्त रिझवणारा 'पु. ल.' नावाचा अष्टपैलू प्रतिभावान असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमचा व्यापून बसला आहे! अशा या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व (क्रमांक एक ते १० एकटेच असेलेले) आणि अष्टपैलू कलावंत पु. ल. देशपांडे यांचे काल (८ नोव्हेंबर २०१८)पासून जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यानिमित्तानं ज्येष्ठ विनोदी लेखिका मंगला गोडबोले लिखित 'पु. ल. : चांदणे स्मरणाचे' हे चरित्रपर पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
बंगालची समृद्ध संस्कृती, ललितकलांची दीर्घ पार्श्वभूमी, रवींद्रनाथांचा जनमानसावरचा घट्ट पगडा ह्यांचं आकर्षण होतं. तसंच शांतिनिकेतनची निसर्गस्नेही शिक्षणपद्धतीसुद्धा पुलंना मोह घालत होती. 'गप्प बसा' संस्कृतीचा, पुस्तकी पांडित्याचा पुलंचा तिटकारा ठिकठिकाणी व्यक्त झालेला आहे. त्यामुळे शांतिनिकेतनमधलं मुक्तांगण एकदा बघायचंच होतं. शिवाय नकळत्या वयापासून आजोबांकडून टागोरांची महती कानांवर सतत आलेली होती. आजोबांनीही पन्नाशीनंतर बंगाली भाषा शिकण्याचा घाट घालून तिच्यावर उत्तम प्रभुत्व मिळवलेलं होतं. तेव्हा हा ज्येष्ठांचा धडा गिरवायचा होता. वयाच्या पन्नाशीत विद्यार्थिदशा पत्करणं सोपं नव्हतं. पण रवींद्रनाथांसमोर सदैव लीन झालेले आजोबा पक्के स्मरणात असल्यानं पुलंनी हा प्रयोग करून पाहण्याचं ठरवलं. सुनीताबाईंनीही ह्या कल्पनेचं स्वागत केलं. पुलंनी सतत गर्दीनं वेढलेलं राहू नये, एकांतात राहावं, आत्मसंवाद करावा, तो त्यांच्या प्रतिभेला पोषक ठरेल; असं त्यांना मनोमन वाटत होतंच.

आतापर्यंत खरं तर पुलंना प्रवासांचं काहीच नावीन्य राहिलेलं नव्हतं. 'अपूर्वाई', 'पूर्वरंग'च्या संबंधातले दूरदेशीचे प्रवास झाल्यानंतर त्यांच्या पायांवर जसं काही चक्रच पडलं होतं. देशांतर्गत प्रवास म्हणजे कारणपरत्वे दिल्लीच्या वाऱ्या, बहुरूपी खेळ ज्या ज्या गावी असतील, तिथे जाणं-येणं आणि अध्यक्षपदांसाठी, व्याख्यानांसाठी केलेले दौरे, हे अव्याहत सुरू होतंच. याखेरीज व्यक्तिगत हौसेनं केलेली एकदोन परदेशी पर्यटनंसुद्धा खात्यावर होती. पण हे बहुतेक प्रवास हा ना तो गौरव, सन्मान वगैरेंसाठी असत. आता पुलंना गौरवांची तेवढीशी अपूर्वाई उरली नव्हती. मनात एक विचित्रशी कोंडी, खुंटलेपण आलेलं होतं. पुन्हा एकदा एक सर्वसाधारण माणूस होऊन माणसांमध्ये मिसळण्याची ओढ लागली होती. हे कुंठलेपण त्यांनी व्यक्त केलं होतं, ते पत्रकार स्नेही सलील घोष ह्यांच्याजवळ!

ह्याच्या पुष्कळ नंतर म्हणजे ५ एप्रिल १९९०च्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या अंकामध्ये सलील घोष ह्यांनी 'बंगालमध्ये पु.ल.' ह्या नावानं जो लेख लिहिला आहे, त्यात पुलंची १९७०ची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला बंगाली शिकायचंय, तू काही व्यवस्था करू शकतोस का बघ, असं सलीलदांना सांगताना पुल म्हणाले होते, ''सलील, तुला ठाऊक आहे? कलावंताच्या मनात काही वेळा कोंडी निर्माण होते. विचित्र अशी निराशा दाटते. म्हणूनच पाहायचे आहे की, बंगाली भाषेचे, साहित्याचे, लोककलांचे ज्ञान करून घेऊन मला काही स्फूर्ती येते का? काही नवीन, अगदी वेगळी जाणीव निर्माण होते का?''

सलीलदांना ह्यातली बोच अचूक समजली. त्यांनी व त्यांच्या पत्नी शार्लट ह्यांनी पुलंसाठी जानेवारी ते मार्च ह्या कालखंडातली मुख्यत: शांतिनिकेतनची व कलकत्त्याची सफर आखली. हा काळ हा बंगाली समाजातला यात्रा, जत्रा, मेळे, पारंपरिक सांस्कृतिक उत्सव ह्यांच्या धामधुमीचा असतो. सुगीचे दिवस असतात. हवा सुखद असते. एकूण जनमानसात उल्हास असतो. लोकजीवनाशी एकरूप होण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. ह्या दृष्टीनं ह्या जोडप्यानं पुलंची शांतिनिकेतनमध्ये राहण्याची सोय केली. आणि इतक्या प्रौढ वयात, वसतिगृहात राहण्यासारखा अनुभव घ्यायला पुल हौसेनं पुढे सरसावले.

'ह्या सगळ्या झुली उतरवून बंगालीचा स्वाध्याय करायला निघालेला एक बटू म्हणून मला बंगालात जायचे होते. या भूमिकेत मला सर्वांत अडचण होती, ती इतक्या वर्षांच्या संस्कारातून घडलेल्या माझ्याविषयीच्या माझ्या स्वत:च्याच प्रतिमेची. ती मला माझ्या हातांनी फोडायची हेाती.' ('व्यंगचित्रे' : पृष्ठ १५ वरून)

अशा शब्दांमध्ये पुलंनी 'वंगचित्रे'मध्येही आपलं तेव्हाचं हृदगत मांडलं आहे. वास्तविक पुलंचं शांतिनिकेतला जाऊन राहणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. मुलूख परका. भाषा परकी. खाणंपिणं इत्यादी दैनंदिनीच्या गोष्टी परक्या. सत्तरच्या दशकात असल्यानं संपर्कसाधनं, प्रवासाची साधनं संख्येनं कमी आणि जास्त वेळखाऊ. इकडच्या मुंबईपुण्याकडच्या बातम्या कळण्याच्या शक्यता कमी. इथल्या वृत्तपत्रसृष्टीपासून तुटलेपण. ह्यामुळे पुलंना अगदी अप्रिय असणारा एकटेपणा वाट्याला आलेला. शांतिनिकेतनपासून सुमारे मैलभर अंतरावर एक्स्टेन्शन ब्लॉक्स बांधलेले होते. त्यात पुल राहत होते. बोलपूरचा रस्ता जवळ होता. त्यावरून बाजारात, स्टेशनवर जाता येई. पण माणसानं ओढण्याच्या रिक्षा हे एकमेव वाहन सहज मिळे, जे वापरणं पुलंना संकोचाचं वाटे. पुण्या-मुंबईची पत्रं ८-१० दिवस मिळत नसत. सुनीताबाई दरम्यानच्या काळात उरळीकांचनला निसर्गोपचार घ्यायला राहिल्यामुळे त्यांचा संपर्क आणखीच अवघड होई. पुलंचा सगळा दिवस अभ्यासात, वाचनात जाई. पण संध्याकाळी फार एकटेपणा येई. कधी कधी आसपासच्या बंगाली बाबूंचा आळशीपणा, बाबूगिरी बघून चिडचिड होई; तर बंगाली बायकांचं परंपरेखाली पिचलं जाणं त्रासदायक वाटे. बंगालमधली हवा आणि बंगाली माणसांचा स्वभाव 'प्रचंड लहरी' असल्यानं, क्षणाक्षणांत दोघांचे नूर बदलत असल्यानं सुरुवातीला खूपच बिचकायला होई. पावसाची झोंड सुरू झाली, की अनेकदा वीज जाई. त्या अंधाराशी जमवून घेणं अधिकच कष्टप्रद ठरे. तिकडे डास-मच्छर हेही फार असत. वीज गेली की घरातला पंखा बंद, भयंकर उकाडा, डास, बाहेरचा अंधार अशी सार्वत्रिक कोंडी व्हायची. अत्यंत पाणचट दुधाचा मचूळ चहा, आणि मुख्यत्वे भात आणि बटाट्यांचा वापर केलेलं थंडगार जेवण. फळं खाण्याची चाल कमीच. ह्यामुळे तोंडाची चवच गेल्यासारखी वाटे. त्यातल्या त्यात दोन बाबतींमध्ये बंगाल्यांशी गोत्र जुळण्याची शक्यता वाटे. त्यांपैकी पहिली, त्यांचं मत्स्यप्रेम आणि दुसरी, त्यांचा संगीताकडे असणारा कल. अत्यंत रुक्ष वाटणारा बंगाली बाबूही रवींद्रसंगीतानं कसा भारावतो, संवादोत्सुक होतो; हे पाहून पुल मनोमन खूश होतं. तेव्हाच्या शांतिनिकेतन मुक्कामात पुलंचा बऱ्याच बंगाली कुटुंबांशी परिचय झाला. त्यातल्या बहुतेकांना बंगालमधली जात्रागीतं, रवींद्रसंगीत, आधुनिक भावगीतं वगैरे येत असल्याचं पुलंना जाणवलं. काही काळ तिथल्या पारंपरिक ग्रामीण जीवनाचा अनुभव घ्यायला पुल पुरुलिया भागामध्ये तिथल्या आदिवासींची खेडी-पाडे वगैरे बघायला, अनुभवायला गेले होते. तिथल्या सावताळ (इंग्रजीत 'संथाळ') युवतींची अनेक समूहगीतं पुलंना खूप आवडली.

शांतिनिकेतनला गेल्यावर पहिल्या पाच-सहा आठवड्यांमध्ये पुल बंगाली वाचायला शिकले. बंगाली ही पिंडत: संस्कृतप्रचुर भाषा. ६०-७० टक्के तत्सम शब्दांचा भरणा असणारी. बंगालीचं व्याकरण मराठीच्या व्याकरणापेक्षा सोपं. तो-ती-तेचा उपद्रव नसलेलं. त्यामुळेच बंगाली माणूस इंग्रजी बोलतानाही 'ही' आणि 'शी'मध्ये हमखास गोंधळ करणारा. ह्यामुळे आणि पुलंच्या उपजत भाषिक कलामुळे ते सहजपणे बंगाली वाचायला लागले. समोरच्यांचे बंगाली संवाद समजू लागले. रोज सकाळी साडेसहाला उठणं, नंतर ११ वाजेपर्यंत धडे-व्याकरण-गृहपाठ ह्यांच्याशी झटापट करणं आणि नंतर बंगाली साहित्य वाचणं - असा दिनक्रम असे. सुरुवातीला पुलंना एक सर्वसाधारण छापील बंगाली पृष्ठ वाचायला हाताशी शब्दकोश घेऊन १५ ते २० मिनिटं लागत. नंतर हा वेळ कमी कमी होत गेला. बंगाली वर्तमानपत्रं वाचणं दोन महिन्यांमध्ये सर्रास सुरू झालं. त्यामुळे देशभरातल्या, महाराष्ट्रातल्या बातम्या कळू लागल्या. पण बंगाली वर्तमानपत्रांमधल्या दंगली, जाळपोळी, लूटमार, मोर्चे ह्या छापाच्या विध्वंसक बातम्या वाचून उद्वेगही यायला लागला. टागोरांची 'घाटेर कथा' म्हणजे नदी घाटाची कथा ही पुलंनी तिथे संपूर्ण वाचलेली पहिली बंगाली कथा. मग मात्र त्यांना अलीबाबाची गुहाच उघडल्यासारखं झालं. गुरुदेवांच्या कथा, कविता, बालसाहित्य वाचण्याचा सपाटाच त्यांनी सुरू केला.

गुरुदेवांच्या साहित्यातून बंगाली समाज-संस्कृती त्यांना परिचयाची झालीच, पण जास्त प्रभाव पडला, तो त्यांनी नोंदवलेल्या निसर्गाच्या नाना लीलांनी. शैशवातल्या कुतूहलानं तरुपल्लवांना खूप बारकाईनं न्याहाळणारे गुरुदेव पुलंना सर्वांत भावले. मराठीतही वृक्षवल्ली अन् वनचरांना सोयरी मानणारा तुकाराम आहेच. पण गुरुदेवांची दृष्टी आणि भक्ती आणखी व्यापक ठरते, जवळजवळ महाकवी कालिदासाच्या तोडीची ठरते, असं पुलंनी पुढे नोंदवलंही आहे.

शांतिनिकेतनच्या ग्रंथालयात जाण्याचा पुलंचा रोजचा रस्ता हा एका आम्रकुंजातून होता. त्यामुळे ऋतुचक्राची रोजची चाल त्यांना सहज बघायला मिळाली. धोधो... झिमझिम-सर-झड अशा सर्व प्रकारचं धारानृत्य जवळून बघता आलं. त्यामुळे ह्या धारानृत्यावरच्या गुरुदेवांच्या अनेक कविता जास्त भिडल्या. वृक्षराजी, तिच्यावर वेगवेगळ्या वेळी येणारी फुलं, आसऱ्याला येणारा पक्षीगण हे बघायला मिळालं. पानगळ, नंतर आलेला आंब्याच्या मोहोराचा घमघमाट, तपोवनातली बदलती रंगसंगती हेही दिसलं.

७ ऑगस्ट ते १० ऑगस्ट रवींद्रसप्ताह झाला. त्यात एकदा 'What Ravindranath meant to me?' ह्या विषयावर पुलंनी भाषण दिलं. रवींद्रनाथांची पुण्यतिथी झाली, त्या दिवशी वृक्षारोपण महोत्सव झाला. त्यामध्ये त्यांनी पंचमहाभूतांना केलेलं काव्यमय आवाहन ऐकायला मिळालं. कथांचे पाच खंड, नोटेशनसह तीन हजार गीतं ही गुरुदेवांची अफाट साहित्यनिर्मिती बघून ते खरे 'पुरुषावतार' ठरतात, हे जाणवलं. एवढ्या प्रचंड व्यापातून गुरुदेवांनी आप्तांना आणि छात्रांना हजारो पत्रं लिहावीत, ह्यातून त्यांची संवादोत्सुकता जाणवली. हा सगळा व्यासंग अजून वर्ष-दीडवर्षं जारी राहिला, तर आपण बंगालीमध्ये लिहू शकू, इतपत आत्मविश्वासही आला. पण ते व्यवहारात शक्य नव्हतं, म्हणून चांगला बंगाली वाचक होणं इथवरच पुलंनी उद्दिष्ट ठेवलं आणि गाठलंही

शांतिनिकेतनच्या वास्तव्यात मोकळी हवा, (नाइलाजानं) मित आहार, उत्तम वातावरण आणि परिसरात भरपूर चालणं, यामुळे पुलंची प्रकृती उत्तम राहिली. सलील घोष, त्यांचे बंधू शांतीदा आणि वहिनी ह्यांनी ह्या सर्व काळात पुलंची उत्तम बडदास्त ठेवली. याबद्दल पुल नेहमी कृतज्ञ राहिले.

थोडक्यात सांगायचं तर, कुठेही जाऊ तिथे सामावू, ह्या वृत्तीनुसार पुल शांतीनिकेतनातही रमले, वंगरंगात रंगले. त्या अनुभवांविषयीची एक लेखमाला त्यांनी 'वंगचित्रे' ह्या शीर्षकाखाली १९७१च्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या रविवार पुरवणीमध्ये लिहिली. पुढे त्या लेखांच्या संकलनाचं 'वंगचित्रे' हे पुस्तक १९७४ मध्ये प्रसिद्ध झालं. आजवर पुलंचं प्रवासवर्णन आणि शि. द. फडणीस ह्यांची व्यंगचित्रं ह्यांची एक सुखद-आनंददायी सांगड मराठी वाचकांच्या खूप परिचयाची झाली होती. तसा केवळ आणि निखळ आनंदाचा प्रत्यय 'वंगचित्रे'नी दिला नाही. समाजचिंतक पुल, अंतर्मुख पुल, भविष्यातल्या उदासीनं घेरलेले पुल अशी त्यांची काहीशी अपरिचित रूपं 'वंगचित्रे'मधून त्यांच्या वाचकांसमोर आली. त्यात त्यांच्या ह्या प्रवासाच्या शेवटीशेवटी बंगालमध्ये राजकीय अस्वस्थता वाढू लागली. नक्षलवाद डोकं वर करू लागला. १९७१च्या पुलंच्या दुसऱ्या बंगालवारीत तर ह्या राजकीय अशांतीमुळे मुक्काम तीन महिन्यांवरून फक्त महिन्यावर आणावा लागला. काहीशा भ्रमनिरासाच्या अवस्थेत पुलंना बंगाल सोडावा लागला. ह्या सगळ्याची कडवट चव थोडीफार डोकावू लागली. हे सगळं जरी खरं असलं, तरी ह्या मुक्कामात पुलंनी बंगाली भाषा चटकन आणि उत्तम प्रकारे आत्मसात केली. उपजत असणारा भाषेकडचा कल आणि नादलयीची समज त्यांना उपयोगी पडली असणार; पण बंगाली बोलणं, वाचणं आणि जरूर तेव्हा बंगाली लिहिणं त्यांना जमू लागलं. पुलंनी बंगाली स्नेह्यांना लिहिलेली बंगाली भाषेमधली पत्रं उपलब्ध आहेत. बंगालीशी अशी हातमिळवणी करताना पुल रवींद्रनाथांच्या अधिकाधिक जवळ जावेत, हे ओघानं आलंच. आजोबा ऋग्वेदींमुळे त्यांच्या मनावर रवींद्रनाथांचा ठसा होता. टागोरांना गीतांजलीबद्दल नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर ऋग्वेदींनी त्याचं 'अभंगगीतांजली' हे प्रासादिक भाषांतर केलं होतं. टागोर एकदा मुंबईला आले असताना ऋग्वेदींनी आपल्या 'अभंगगीतांजली'ची प्रत त्यांच्या पायांवर ठेवून त्यांना शिरसाष्टांग नमस्कार घातला होता. त्या वेळी हे दोघे साधारण एकाच वयाचे हेाते! पण वंशपरंपरेनं आलेली ही टागोरभक्ती पुलंच्या बंगालीच्या व्यासंगानं अधिक टोकदार झाली. पुढे पुलंनी १९७७च्या 'महाराष्ट्र टाइम्सच्या वार्षिका'मध्ये रवींद्रनाथांवर दीर्घ लेख लिहिला. विलेपार्ले, पुणं, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर अशा चार ठिकाणी रवींद्रनाथांच्या जीवनकार्यावर व्याख्यानं दिली. काही काळानंतर 'रवींद्रनाथ : तीन व्याख्याने' हे त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध झालं. पुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं!

मंगला गोडबोले
अक्षरनामा