Thursday, June 25, 2015

मनोहारी आठवण

मोठ्या टीपॉयवर ‘पुलं’चा प्रसन्न फोटो होता, त्याच्या एका बाजूला रवींद्रनाथ टागोर अन्‌ दुसऱ्या बाजूला चार्ली चॅप्लिनचा फोटो होता...

फ्लॅटच्या दारावरील ‘पु. ल. देशपांडे’ ही वळणदार आणि रंगीत अक्षरं पाहूनच मन रोमांचित झालं अन्‌ बेल वाजवली. दार उघडायला साक्षात सुनीताबाई! तोच करारी चेहरा, डोळ्यांवर चष्मा, रुपेरी केस, फिकट रंगाची साडी, चेहऱ्यावर अत्यंत शांत भाव! माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडं पाहून विचारलं, ‘कोण हवंय आपल्याला?’

‘‘मी साताऱ्याहून आलो आहे. हे पुलंचंच घर ना! मी पुलंच्या फोटोंचं दर्शन घ्यायला आलो आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे ना! दुपारच्या वेळी त्रास दिल्याबद्दल क्षमस्व,’’ एका दमात मी संपूर्ण स्पष्टीकरण दिलं. फ्लॅटचं दार उघडून ‘या’ असं म्हणत हॉलमध्ये बसण्याची त्यांनी खूण केली आणि हळूहळू आतील खोलीच्या दिशेनं गेल्या. हॉलमध्ये मोठ्या टीपॉयवर ‘पुलं’चा प्रसन्न फोटो ठेवलेला होता. फोटोला हार घातलेला होता आणि थोडी फुलं फोटोपुढे ठेवलेली होती. भिंतीवर एका बाजूला गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा फोटो, तर दुसऱ्या बाजूला चार्ली चॅप्लिनचा फोटो होता. ‘पुलं’च्या फोटोसमोर दोन क्षण डोळे मिटून शांत बसलो. नेमकं त्या वेळी शेजारच्या फ्लॅटमधून कुमार गंधर्वांचं गाणं ऐकू आलं. खरंच गाणं चालू होतं की तसा भास झाला हे मला कळलं नाही; परंतु तो क्षण पकडून ठेवावासा वाटला. अर्थात, तसा तो क्षण कायमस्वरूपी मनात जपला गेलाच. तोपर्यंत हातात पाण्याचा तांब्या-भांडं आणि एका डिशमध्ये फळं घेऊन सुनीताबाई हॉलमध्ये आल्या. शांतपणे खुर्चीत बसत, ‘काय करता आपण?’ विचारलं. यावर भाबडेपणानं, ‘पुलंची पुस्तकं वाचतो’ या माझ्या उत्तरावर मंद हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘शक्‍यतो सकाळी किंवा संध्याकाळी येत जा. अलीकडे माझी तब्येत ठीक नसते.’’ त्यानंतर बहुतेक प्रत्येक वर्षी ‘पुलं’च्या जन्मदिनी आणि स्मृतिदिनी भांडारकर रस्त्यावरील ‘मालती-माधव’ या इमारतीमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये जाण्याचा योग आला. ‘पुलं’च्या जाण्यानंतर सुनीताबाई मनानं खचल्या होत्या. मात्र, त्यांनी स्वतःचं लेखन आणि ‘पुलं’च्या अप्रकाशित लेखांचं प्रकाशन करण्याचं काम सुरू ठेवलं होतं. पुलंवरं लोकांनी अमाप प्रेम केलं. सुनीताबाई देखील सिद्धहस्त लेखिका, अभिनेत्री, संवेदनशील व्यक्ती. याहीपेक्षा त्यांची अधिक ओळख म्हणजे ‘पुलंची पत्नी’! अर्थात, सुनीताबाईंनीदेखील त्यांची ही ओळख मनापासून निभावली. ‘पुलं’मधील कलाकाराला पूर्णपणे मोकळीक देऊन त्यातील ‘व्यवहार’ पाहण्याचं किचकट आणि अवघड काम त्यांनी केलं. परंतु, हे करताना स्वतःच्या विचारांतील आणि वागण्या-बोलण्यातील स्पष्टपणादेखील ठाम ठेवला. त्यांच्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकातील ‘पुलं’च्या स्वभावाचं थोडं स्पष्ट शब्दांत त्यांनी केलेलं विश्‍लेषण वाचून मी थोडंसं चिडूनच पत्र लिहिलं होतं. एका सामान्य आणि अनोळखी वाचकाचं पत्र म्हणून त्या त्याकडं दुर्लक्ष करू शकल्या असत्या; परंतु सविस्तर आणि मुद्देसूद उत्तर पाठवून त्यांनी सुखद धक्का दिला होता. शिवाय, वाचन कायम सुरू ठेवण्याचा सल्लादेखील दिला होता.

३ जुलै हा सुनीताबाईंचा जन्मदिन. उत्तम लेखिका म्हणून त्यांची ओळख कायम स्मरणात राहीलच; पण त्याचबरोबर ‘पुलं’सारख्या प्रतिभावान लेखकाला अप्रत्यक्षपणे प्रेरणा देणारी सहचरिणी म्हणून देखील त्यांची आठवण कायम राहील. स्वतः ‘पुलं’देखील विनोदानं म्हणायचे, ‘आमच्या घरात मी ‘देशपांडे’, तर ही ‘उपदेशपांडे’!’ या जगाचा निरोप घेतानादेखील सुनीताबाई मनाला चटका लावून गेल्या. त्या दुर्दैवी दिवशी आकाशवाणीवरील सकाळच्या बातम्यांत त्यांच्या निधनाची बातमी सांगितली गेली आणि वैकुंठ येथे साडेआठ वाजता अंत्यसंस्कार असल्याचं कळलं. अनेकजण वैकुंठकडे धावले; परंतु अगदी काही मिनिटं उशीर झाल्यानं माझ्याप्रमाणेच अनेकांना त्यांचं अंतिम दर्शन झालं नाही. आयुष्यभर वेळेचा काटेकोरपणा पाळलेल्या सुनीताबाईंनी जातानादेखील वेळ काटेकोरपणे पाळली होती. वैकुंठभूमीतील त्या अग्नीतून धुरांचे लोट हवेत विरत होते. त्यातील एका उंच जाणाऱ्या नादबद्ध लकेरीकडे पाहत उपस्थितांपैकी एक ज्येष्ठ नातेवाईक महिला म्हणाल्या, ‘‘पोहोचली सुनीता भाईंकडे!’’ सर्वांचेच डोळे पाणावले.

आजही भांडारकर रस्त्यावरून जाताना ‘मालती-माधव’ इमारतीवर लावलेल्या नीलफलकाकडं पाहून जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होतात.या दांपत्यानं आपल्याला ‘मनोहरी’ आठवणी दिल्या, त्या कायम तशाच राहतील.

डॉ. वीरेंद्र ताटके
बुधवार, १० जून २०१५
सकाळ (मुक्तपीठ)

Monday, June 15, 2015

पु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी


पूज्य पु. ल. देशपांडे ह्यांचे मला आलेले पत्र आणि आमच्या दोन संस्मरणीय भेटी :

११ जून १९८२ रोजी, मी सकाळी डेक्कन क्वीनने मुंबईस निघालो होतो ! पुणे स्टेशनवर अगदी सकाळी सकाळी फलाटावर गाणं ऐकू येत होतं, "भेटी लागी जीवा", संत श्रेष्ठ तुकारामांचा हा अभंग, श्रीनिवास खळे - आण्णांचे संगीत आणि स्वरसम्राज्ञी तीर्थस्वरूप लतादीदींचा मधाळ आवाज ! मी भारावल्या अवस्थेत गाणं ऐकता ऐकता गुणगुणत होतो. पुणे स्टेशन मागे पडलं. माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने मला बोलतं केलं. "काहो, तुम्ही गुणगुणताहात, एव्हढं आवडतं कां हे गाणं ? चाल, शब्द कां स्वर ?"

मी उत्तरलो, "तिन्ही गोष्टी अप्रतिम आहेत. विशेष म्हणजे लतादीदींच्या स्वरांचा मी वेडा आहे".

दादर येईपर्यंत ते मला दिदिंविषयी विचारात होते, अन मी बोलत होतो. दादर जवळ आले, तसे ते म्हणाले, " हे माझे कार्ड, मी माधव कानिटकर, प्रपंच, बुवाचा संपादक, मला दोन-चार दिवसात, लताबाईंवर लेख लिहून द्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मी छापतो. तुमची भाषा सुंदर आहे."

झालं, ह्या गोष्टीला आठएक दिवस लोटले. अन मी नोकरी करत होतो, त्या गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये एक दिवशी एक युवक मला भेटायला आला. तो म्हणाला, "मी केदार कानिटकर, बाबांनी लेख मागितला आहे. मी केदारला म्हणालो, "अरे अजून मी लिहिला नाही ". दोन दिवसांनी केदार कानिटकर पुन्हा मला भेटला, म्हणाला, "बाबांनी तुम्हांला संध्याकाळी घरी बोलावलंय". मी पुण्याच्या टिळक रोडवरील माधवराव कानिटकर ह्यांचे घरी गेलो खरा, ते म्हणाले, "अहो, लेख का ना लिहिला, लवकर लिहा, मी छापतो तुमचा लेख"! मी लेख लिहून, कानिटकर साहेबांना नेऊन दिला. सप्टेंबर १९८२ च्या विशेषांकामध्ये तो लेख प्रसिद्ध झाला. त्याकाळी विशेषांकामध्ये लेखक- कवींच्या नावाबरोबरच त्यांचा पत्तासुद्धा छापला जात असे !

रसिकहो, २ नोव्हेंबर १९८२ रोजी मला एक पत्र आलं, "१०१ रुपाली, शिवाजीनगर, पुणे ५", ह्या पत्त्यावरील पांढ-या स्वच्छ पोस्ट कार्डावर, शाई पेनने लिहिलेले ते पत्र होतं, आदरणीय "पु. ल. देशपांडे" ह्यांचे ! त्यांनी पत्रात लिहिले आहे :

" प्रिय उपेंद्र चिंचोरे, नमस्कार,
लताबाईंवर कितीही लिहिले तरी कमीच आहे,
पण आपल्या लेखातील भाव मला खूप आवडला,
त्याला आवर्जून दाद देण्यासाठी हे पत्र,
आपला,
पु. ल."

पु.लंचे पत्र पाहून अन् वाचून मी आनंदाने नाचू लागलो, ज्याला त्याला ते पत्र दाखवू लागलो !

बरोब्बर सहा दिवसांनी म्हणजे ८ नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस होता. रुपाली ह्या त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी मी ८ नोव्हेंबर ८२ रोजी समक्ष गेलो. मोठ्या श्रद्धेने, मनोभावे मी पु.लंना नमस्कार केला. ती माझी त्यांच्याशी झालेली पहिली भेट होय !

पुण्यातील भांडारकर रोडवरील, वंदनीय पु. लंच्या "मालती माधव" ह्या निवासस्थानीही जायची सुसंधी मला लाभली होती !

पूज्य शांताबाई शेळके पुण्याच्या के. ई.एम. रुग्णालयात तीनशे पंधरा क्रमांकाच्या खोलीत औषधोपचार घेत असतांना, एके दिवशी, अचानक पु. ल. आणि सुनीतावहिनी भेटायला आले आणि मग काय विचारता ? हास्य कल्लोळ, आणि हास्य कल्लोळच !

शांताबाई म्हणाल्या, "भाई हे चिरंजीव चिंचोरे".....
त्यावर पु. ल. पटकन म्हणाले, "हो, लताबाईंविषयी संग्रह करणारे, लेख लिहिणारे,"

मी लगोलग त्यांचे चरणस्पर्श दर्शन घेतले. मी धन्य धन्य झालो. रसिकांनो, अश्या नामवंतांच्या सहवासाने म्या पामराच्या जीवनाचे खरोखर सोनं झालं . तुम्हीच सांगा, ह्या पेक्षा वेगळे सोने ते कोणतं ?

पुढे शांताबाई ब-या होऊन, दवाखान्यातून घरी गेल्या, आणि एक दिवशी पु.लंना देवाज्ञा झाल्याची कुवार्ता कानावर पडली, हाय, बालगंधर्वमध्ये झालेल्या शोकसभेला, स्वतःची तब्येत बरी नसतांना, शांताबाईंनी, पु. लंच्या शोकसभेला जाण्याचा हट्ट धरला. मी त्यांना घेऊन बालगंधर्वमध्ये गेलो. शांताबाई भरभरून बोलल्या. पु.लंच्या अनेक जुन्या आठवणी सांगितल्या.

मी माझ्या शालेय जीवनापासूनच पु.लंचा रसिक वाचक झालो. असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, खिल्ली, तुका म्हणे आता, अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, ती फुलराणी, वटवट वटवट, आम्ही लटिके ना बोलू, वयं मोठं खोटं, पुढारी पाहिजे, अपूर्वाई, पूर्वरंग, गोळाबेरीज, हसवणूक, कोट्याधीश पूल. गणगोत, गुण गाईन आवडी, खोगीर- भरती, लेकुर उदंड झाली, वा-यावरची वरात, अशी अनेक पुस्तके एकरूप होऊन वाचली.

आजही ब-याचवेळा पुलंचं कुठलंही पुस्तक हातात घ्या आणि वाचायला सुरवात केल्यावर पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो.

मला आठवतंय, माझ्या कॉलेजच्या जीवनात मी "अंमलदार"मध्ये भूमिका केली होती.

गुळाचा गणपती, दुधभात, देवबाप्पा, देव पावला, हे पु. लंच्या सुंदर संगीतानी सजलेले चित्रपट आजही मनाच्या गाभा-यात जसेच्या तसे ठाकले आहेत !

निर्माते-दिग्दर्शक राम गबाले आणि माझी गप्पांची मैफल अनेकवेळा राम गबाले ह्यांच्या निवासस्थानी रंगायची, पुलंच्या आठवणी हमखास त्यात असायच्या. रसिक वाचकांनो माझ्या जीवनातील ते खरोखरच मंतरलेले दिवस होते ! पु.लंची पुण्याच्या शनिवार वाड्यावर झालेली भाषणेही आवडीने ऐकली होती.

त्याकाळी पुणे आकाशवाणी केंद्रावरून पु.लंची प्रसारित झालेली भाषणेही ऐकण्याची संधी आम्ही चुकवायचो नाही. पु.लंच्या "नारायण"चे पारायण कितीवेळा करतो, त्याला गणतीच नाही.

आज बारा जून, पु. लंची पुण्यतिथी, वंदनीय पु. ल.आपल्यामुळेच आमचे भावविश्व खुलले, फुलले ! आपल्या चिरतरुण पवित्र स्मृतीला भावपूर्ण वंदन,

लेखक : उपेंद्र चिंचोरे

Friday, June 12, 2015

साहित्यातील हृदयस्थ पु.ल. देशपांडे - आरती नाफडे

१२ जून २००० ला, ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची प्राणज्योत मालवली. मराठी साहित्याला अजरामर करणारा एक लेखक अनंताच्या प्रवासाला निघाला. लोकांमध्ये, समाजात कायम रमणारा नाटककार, संगीतकार, कलाकार परलोकात निवासासाठी निघून गेला. पण, तमाम मराठी मनांवर राज्य करणारा हृदयस्थ- हृदयात स्थित असलेला- लोकांच्या मनातील जागा कशी बरं मोकळी करू शकेल? साहित्यातील मंतरलेले आपले जग म्हणजे पु. ल.! त्यांच्या साहित्यिक प्रवासातील प्रवासी म्हणजे त्यांचे अनंत वाचक, चाहते, आप्त-मित्रमंडळी होत.

त्यांच्या साहित्यिक प्रवासात अनेक थांबे आहेत. जसे साहित्यिक पुल, विनोदकार पुल, सिनेमा-नाटकातले पुल, संगीतातले पुल... हे महत्त्वाचे थांबे आहेत. प्रत्येक थांब्याजवळ रेंगाळत राहावं एवढं विस्तीर्ण ज्ञान आहे, अनुभव आहे. जीवनाबद्दलची आस्था, जवळीक, आत्मियता हृदयाला स्पर्श करणारी आहे. म्हणून पुल-साहित्यातील वाचकाचा प्रवास सुखकारक व आल्हाददायक आहे.

आपल्या नातवानं लेखक व्हावं, असं पुलंच्या आजोबांना कायम वाटत असे, तर त्यांनी गायक व्हावं, असं त्यांच्या वडिलांना वाटे. पण, पुल मार्मिकपणे सांगतात- ‘‘मी दोघांनाही खूष केलं किंवा कुणालाच नाखुष केलं नाही.’’

आपल्या शाळेच्या वर्गासाठी, भावंडांसाठी छोटी नाटुकली लिहून देणं, सेवादलाच्या कलापथकासाठी छोटे कार्यक्रम लिहून देणं, येथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. १९४३ साली ‘अण्णा वडगावकर’ हे त्यांचं पहिलं व्यक्तिचित्र अभिरुची या मासिकात प्रसिद्ध झालं. ‘धनुर्धारी’ मासिकात कॉलेजविश्‍वाबद्दलचा एक मिस्कील लेख टोपण नावाने लिहिला असता, तुम्ही ‘विनोदी लेखनाकडे जास्त लक्ष द्या,’ असा सल्ला संपादकांनी पुलंना दिला होता. २६ जानेवारी १९५७ ला ‘तुझे आहे तुजपाशी’ या त्यांच्या सामाजिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि त्यांच्यातला दमदार लेखक जनमानसात दृढ झाला. पुढे त्याच वर्षी २५ एप्रिलला ‘सारं कसं शांत शांत’, ‘सदू आणि दादू’, ‘मोठे मासे छोटे मासे’ या तीन एकांकिका लोकांची भरघोस दाद घेऊन गेल्या व पु. ल. देशपांडे नावाला मराठी साहित्यात वजन प्राप्त झालं व ते वाढतच गेलं. पुलंच्या साहित्यात भाषेची जादू आहे. ‘‘भाषा हा मानवनिर्मित चमत्कार मला सर्वांत आवडतो,’’ असं ते ‘वंगचित्रे’मध्ये म्हणतात. बोलीभाषेवर पुलंचं फार प्रेम. त्यामुळे त्या भाषेचा सहजपणा, प्रवाहीपणा नैसर्गिकपणे त्यांच्या साहित्यात येतो. पुलंचे अनेक भाषांवर प्रभुत्व व अचाट शब्दसंग्रह त्यांच्या साहित्याचे वैभव वाढवतात. आपण पुलंचे साहित्य वाचायला सुरुवात केल्यावर मन आतल्या आत हसायला लागते. गालातल्या गालात हसत आपण एक एक पान उलटत असतो. मनाची मरगळ गळून पडते. मन हलकंफुलकं होत जातं व एका स्वच्छ, सुंदर प्रसंगाचे आपण साक्षीदार होतो. ‘वाचाल तर वाचाल’ ही साहित्यसंस्कृती प्रचीतीस येते.

पुलंच्या साहित्यातला संचार त्यांच्या विनोदी लेखात, ललित लेखनात, बालनाट्य, एकांकिका, विडंबन, व्यक्तिचित्र, प्रवासवर्णन... अशा अनेक प्रकारांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. पुलंना आवडलेले पाश्‍चात्त्य साहित्य अनुवादित करून त्यांनी मराठी वाचकांना सादर केलेले आहे. पुल मानवी मनाचे जाणकार, तज्ज्ञ, चिकित्सक होते, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. कारण त्यांची सर्व व्यक्तिचित्रे आजही लोकप्रियतेच्या उच्चांकावर आहेत.

‘गणगोत’, ‘मैत्र’, ‘गुण गाईन आवडी’ ही पुस्तके वास्तवातल्या व्यक्तींवर आधारित; तर ‘व्यक्ती आणि वल्ली’ काल्पनिक व्यक्तिमत्त्वावर आधारित आहेत. पुलंची काल्पनिक व्यक्तिचित्रे समाजजीवनात पार मिसळून गेलेली. म्हणूनच लग्नकार्यातल्या हरकाम्यात आपण ‘नारायण’ शोधतो. पुस्तकातील किड्याला ‘सखाराम गटणे’ म्हणतो. टपरीवर लाल चहाचा कप समोर आला तर ‘अन्तू बर्वा’च्या वेशात चहावाल्यावर खेकसतो. पुलंची अतिशय मार्मिक व्यक्तिचित्रं, त्या व्यक्तीच्या दर्शनीय रंगरूपापासून वर्णन करीत त्याच्या अंतरंगाच्या गाभ्यापर्यंत वाचकाला घेऊन पोहोचायचं, हे असामान्य कर्तृत्व पुलंच्या लेखणीचं.

पुलंच्या साहित्यप्रकारात जीवनदृष्टी देणारी प्रवासवर्णने मार्गदर्शक आहेत. ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ं, ‘जावे त्यांच्या देशा.’ पुलंमुळे खूप दूरचे देश मराठी माणसाशी जवळीक साधून गेले. त्यांच्यातला निरीक्षक वाचकांना अंतर्मुख करत गेला. आपला समाज, देश याकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन त्याला प्राप्त झाला. पुलंचे हे सामाजिक ऋण सहज फिटणारे नाही.

पुलंचे ललित साहित्यलेखन सामान्य ज्ञान आणि निरीक्षण यांनी परिपूर्ण आहेत. त्यांचे काही खास लेख ‘माझे खाद्यजीवन’, ‘पाळीव प्राणी’, ‘चाळीशी.’ पाळीव प्राण्यांविषयी, रेल्वे व पोस्टाच्या कारभाराविषयी लिहिताना तपशिलांचे बारकावे. मानवी संबंध व व्यवहार, शाब्दिक कोट्या, उपहास या सर्व विषयांचे संमेलन त्यांच्या साहित्यात वाचायला मिळते. शब्दांची आकर्षक मांडणी हे साहित्याचे मर्म आहे, हे पुल-साहित्य पुन:पुन्हा वाचावयास घेताना वाचकांना जाणवते.

पुलंचं साहित्य रंजकतेकडून वैचारिकतेकडे झुकू लागतं व म्हणूनच मानवी मनात घर करून राहतं. वाचकाच्या मनापर्यंत पोहोचणार सहज, प्रांजळ व प्रभावी वाङ्‌मय त्यांच्या साहित्यक्षेत्रातल्या कौशल्याची यशोगाथा आहे.

त्यांच्या जीवनप्रवासात जे काही उत्कट-भव्य त्यांना दिसलं- जाणवलं, ते सर्व त्यांनी आपल्या मराठी माणसापर्यंत आणून सोडलं. वाचकाच्या मनाच्या कक्षा जाणीवपूर्वक रुंदाव्यात, याकडे त्यांचा कल होता. त्यासाठी ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींची व्यक्तिचित्रं समाजासमोर आणली. देशातील कलाकारांना त्यांच्या कलेसोबत लोकांसमोर आणलं. इंग्रजी रंगभूमीवरची उत्तम नाटकं मराठी भाषेमध्ये आणली. मराठी साहित्याला आपल्या वाणीने व लेखणीने समृद्ध केले व मराठी माणसासाठी अजरामर साहित्य निर्माण करून भलंमोठं संचित समाजासाठी मागे ठेवून ते गेले.

मराठी वाचकाला तर वर्षामागून वर्ष पुरेल इतकं साहित्य आणि ते प्रसवणारी प्रतिभा कायम त्याच्या मनात घर करून राहील. त्यांचे हृदयस्थ लेखक हृदयात स्थिर होतील- कधीही न जाण्यासाठी. कारण, प्रत्येक वर्षीची १२ जून तारीख आली की, पुलंचं सर्व उपलब्ध प्रकाशित साहित्य, पुलंचे चित्रपट, भाषणाच्या ध्वनिफिती, त्यांना मिळालेले सन्मान, पुलंच्या प्रतिष्ठानाने दिलेल्या सामाजिक देणग्या- सर्व हृदयस्थ गोष्टी पुन्हा एकदा नव्याने ओठांवर येणार व लेखणीतून बाहेर पडणार...

- आरती नाफडे
तरुण भारत
१२ जून २०१५