Monday, November 18, 2019

गृहिणी-सखी-सचिव

“ काऽऽय हो ? काय म्हणताय ?” असा परिचित आवाज मला माझ्या नव्या लॅंडलाईनच्या रिसीवर मधून ऐकू आला आणि मला एकदम हुश्श झाले. म्हणजे ते दोघेही पुण्यातल्या त्यांच्या घरीच होते. मी पुण्यातच, गावातून कोथरूडला राहायला आलो होतो. माझ्याकडे नुकताच दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दूरध्वनी आला होता. आणि चक्क सुरूही झाला होता. मोबाईलचा जमाना इथे सुरू व्हायचा होता अन लॅंडलाईनला अजून महत्व होते. पहिलाच कॉल कोणाला करायचा तर तो मी १, रूपाली ७७७, शिवाजीनगर, पुणे येथे केला होता. अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व असलेल्या पु लं च्या घरी. त्यांच्या ३३४६२८ या नंबरवर, दिवस होता १४ ऑगस्ट १९९६. पलीकडून सौ. सुनीताबाई देशपांडे बोलत होत्या. त्यांचा नेहमीच बोलताना येणारा “ काऽऽय हो ” चा आवाज मी झोपेतून उठवले तरी त्यावेळीही सहज ओळखू शकलो असतो. मी त्यांना नवीन फोनबद्दल सांगितल्यावर त्या क्षणी त्या म्हणाल्या – “ थांबा हं .... मी तुमचा नवीन नंबर डायरीत नोंद करून ठेवते.” त्यांनी लगेच तशी नोंदही केली आणि मगच रिसीवर भाईंच्याकडे सोपवला.

मी साधारण १० वीत असल्यापासून आठ नोव्हेंबरला न चुकता पु लं च्या घरी त्यांना शुभेच्छा द्यायला जात होतो. नंतर शिक्षण संपवून मी औद्योगिक प्रकाशचित्रणाचा व्यवसाय सुरू केला. आवड म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंतांच्या भावमुद्राही टिपायला सुरुवात केली. माझी ती आवड त्या दोघांच्या नजरेतून सुटती तरच ते नवल. मग मला ते वेगवेगळ्या घरगुती मैफिलींची निमंत्रणे आमच्या वाड्यातील श्री. हर्डीकर यांच्या फोनवर देत असत. कधी त्यांचे फोटोचे काही काम असे. मी ते त्वरेने करीत असे. त्यामुळे वेळोवेळी मला त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळे. कधी माझ्याजवळ कॅमेराही असे. पण बऱ्याच दिवसांच्या परिचयानंतर मला हे उमगले होते की – पु लं ना फोटो काढून घेण्याचे वावडे नव्हते पण सुनीताबाई मात्र फोटो काढून घ्यायला विरोध करीत. त्यातून त्या दोघांचा फोटो काढलेला त्यांना अजिबात खपत नसे. याचं कारण त्या सर्वसाक्षीलाच माहित. पण मी मात्र मनाशी ठरवून टाकलं होतं की ते दोघे असताना, मग ते त्यांच्या घरी असोत की एखाद्या कार्यक्रमात, मी कॅमेरा बॅगमधून बाहेरच काढत नसे. अगदी पु लं च्या जन्मदिनाच्या निमित्तानेही मी तसा फोटो कधी काढला नाही. पण प्रत्त्येक जन्मदिनी येणाऱ्या पाहुण्यांचे अगत्याने स्वागत करणे, त्यांच्या हातावर लगेचच पेढा ठेवणे, कोणी फुले आणली असतील तर तो गुच्छ सोडवून आधी आलेल्या व त्यांनीच सुंदरतेने खोलीत मांडून ठेवलेल्या त्या पुष्परचनांत ती नवी फुले अलगद खोवून ठेवणे, मधेच कोणा महत्वाच्या व्यक्तीचा फोन आला तर तो घेऊन उत्सवमूर्तीला आणून देणे, जमलेल्या गप्पांमध्ये एखाद्या घटनेचा संदर्भ तारीख-वार सांगणे व ही सर्व कामे उत्साही आणि हसतमुख चेहऱ्याने करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते सुनीता पुरुषोत्तम देशपांडे.

माझं भाग्य असं की मी पु. ल. आणि सुनिताबाईंच्या स्नेहशील परिवारातलाच झालो होतो. सुनिताबाई जितक्या स्पष्टवक्त्या, व्यवहारी तेवढ्याच सहृदय, आतिथ्यशील होत्या. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे हे दोन्ही पैलू मी अनुभवले. साधेपणा हा तर एका वेगळ्याच लेखाचा विषय ठरेल. त्याचा एक अनुभव मला आला. दिनांक ८ नोव्हेंबर १९९८. पु ल ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार होते. लेखकाचा वाढदिवस कसा साजरा व्हावा? त्याच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनाने? हे तर उत्तमच. आणि त्या दिवशी तर पु लं च्या पुस्तकाच्या बरोबरच सुनिताबाईंच्या पुस्तकाचेही प्रकाशन होणार होते. पु लं चे ‘आपुलकी’ हे पुस्तक तर सुनिताबाईंचे ‘सोयरे सकळ’. त्यांच्या मालती-माधव या भांडारकर रोडवरील घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये हा छोटेखानी समारंभ होता. त्यावेळी पु. ल. व्हीलरचेअरवर होते. दुसऱ्या कोणी व्यक्ती असत्या तर अशा कार्यक्रमाला उंची असे कपडे आणि झगमगाट नक्कीच दिसला असता. पण इथे तर उत्सवमूर्तींनी अतिशय साधे कपडे घातले होते. पु ल साध्या खादीच्या बंडीत आणि पायांवर शाल पांघरलेले. तर सुनीताबाई जांभळ्या रंगांची फुले असलेली सुती साडी नेसलेल्या. डामडौल नसलेला पण दोन महनीय व्यक्तींचा असा कार्यक्रम.

सुनिताबाईंचे दोघे बंधू व इतर कुटुंबीय, साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत, मधुभाऊ गानू, शांताबाई शेळके, ज्योत्स्नाबाई भोळे, राम गबाले, भक्ती बर्वे अशा काही मंडळींची आवर्जून उपस्थिती आणि या सगळ्यांचे स्वागत करीत होते रामभाऊ कोल्हटकर. सगळेच एकमेकांना परिचित. त्यामुळे गप्पांचा फड जमणे हे आलेच. काही वेळाने सुनिताबाईंनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी दोन्ही पुस्तकांची पार्श्वभूमी कथन केली. पुस्तकांचे प्रकाशन अर्थातच ज्येष्ठ प्रकाशक श्री. पु. भागवत यांच्या हस्ते होणार होते. ‘आपुलकी’ चे प्रकाशन त्यांनी केले. ते पुस्तक पु लं नी ज्येष्ठ लेखक श्री. ना. पेंडसे यांना अर्पण केलेले. मग प्रकाशन झालं ‘सोयरे –सकळ’ चे. श्री पुं नी पुस्तकाचे मुखपृष्ठ जमलेल्या सर्वांना दाखवले. सुनिताबाईंच्या गाजलेल्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकानंतरचे हे दुसरे पुस्तक. त्यांनी ‘सोयरे –सकळ’ ची ती प्रत सुनिताबाईंच्या हातात दिली. याची अर्पणपत्रिका काय असणार? पु लं सकट सर्वांनाच उत्सुकता. त्या उत्सुकतेनी ते सुनिताबाईंकडे पाहत होते. सुनिताबाईंनी पहिले पान उघडले आणि पु लं समोर धरले. त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ‘सोयरे-सकळ’ हे पुस्तक सुनिताबाईंनी साक्षात पु लं नाच अर्पण केले होते. पु लं च्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. सगळं वातावरणाच भावूक होऊन गेलं. त्या वातावरणात बदल घडवला तो ज्येष्ठ कवियत्री शांता शेळके यांनी वाचून दाखवलेल्या एका काव्याने. त्यानंतर परत सगळे एकमेकांशी बोलण्यात रंगले. त्या गप्पांच्या आवाजाने पार्किंग भरून गेले.

सुनिताबाईंनी टाळ्या वाजवत परत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आता त्या काय सांगतात याकडे सगळ्यांचे कान व लक्ष. त्या म्हणाल्या- “ जी गोष्ट आजपर्यंत कधीही घडलेली नाही अशी एक कृती मी आज आत्ता करणार आहे. तुम्ही सर्वजण त्याचे साक्षी असणार आहात. मी भाईला नमस्कार करते.” असे म्हणत त्यांनी पुढच्याच क्षणी पु लं ना वाकून नमस्कार केला. आयुष्यभर पु लं शी बरोबरीच्या नात्यानं वागणाऱ्या सुनिताबाईंच्या या कृतीनं सगळेच अचंबित झाले. वातावरणात एकदम शांतता पसरली. या शांततेचा भंग करीत पुढच्याच क्षणी पु लं नी मला हाक मारली व म्हणाले- “ सतीश, या घटनेचं प्रूफ मला हवयं. हा फोटो मला हवायं.” त्यांच्या या वाक्याने वातावरणातला तो ताण कुठल्याकुठे नाहीसा झाला. मग सुनिताबाईंनी परत एकदा वाकून पु लं ना नमस्कार केला अन तो क्षण मी कॅमेराबद्ध केला. आज त्या आठवणींनीही माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. इतकी मोठी ही माणसं अन किती साधेपणा.

जून १२, २००० ला पु. ल. अनंताच्या प्रवासाला निघून गेले. काही न काही कामानिमित्त माझं मालती-माधव मध्ये जाणं सुरूच राहिलं. भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या भावमुद्रा असलेल्या माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला पु लं नी माझ्या त्या प्रकाशचित्रांवर लिहिलेला अभिप्राय छापायचा होता. अभिप्राय होता – “या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात.” मी सुनिताबाईंना भेटलो. अभिप्राय मराठीत होता. कॅलेंडर इंग्लिश मध्ये. मी मित्राकडून त्याचं भाषांतर करून घेतलेलं. ते वाचल्यावर सुनिताबाई म्हणाल्या – “ हे भाषांतर फारच गद्य वाटतयं. मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला याचं रूपांतर करून देते.” त्यांचा कवितांचा अभ्यास व प्रेम दोन्ही प्रचंड. संध्याकाळी चार वाजता मला त्यांचा फोन आला. म्हणाल्या- “ हं. घ्या लिहून. These excellent photographs create musical melodies in the minds.” ते समर्पक आणि काव्यात्मक रूपांतर ऐकून मी आनंदून गेलो. माझ्या त्या ‘म्युझिकॅलेंडर’ वर अवतरलेला पु लं चा तो अभिप्राय आणि त्याबरोबरच त्यांची स्वाक्षरी यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

सुनिताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास. ‘सोयरे-सकळ’ या पुस्तकानंतर त्यांचे प्रकाशित झालेले पुढचे पुस्तक म्हणजे ‘मण्यांचीमाळ’. ते प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी मी ते डेक्कन जिमखान्यावरून विकत घेतले. वेळ संध्याकाळची. तेथूनच मी त्यांना फोन केला. परत एकदा “ काऽऽय हो ? अशी त्यांची विचारणा. मी नुकतेच घेतलेल्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी हवी आहे असे सांगितले. त्यांनी किती वेळात येऊ शकाल? असे विचारले. मी त्यांना म्हणालो- “ पाचच मिनिटात पोहोचेन. आत्ता डेक्कनवरच आहे.” आणि अक्षरशः पाच मिनिटात मी तेथे पोहोचलो. त्यांनी पुस्तकाचे पहिले पान उघडून सही केली “ सुनीता देशपांडे १५.१०.२००३.” मग इतर काही बोलणे झाले व मी लगेचच निघालो.

पुढच्याच दिवशी त्या छोटेखानी पुस्तकात मी पूर्ण गढून गेलो. एकतर मला त्यांची लेखनशैली अतिशय आवडे. व त्यांनी त्या पुस्तकात निवडलेले बारा लेखही अतिशय सुंदर. त्यातही ‘डोडी’ या त्यांच्या नातवाने पाळलेल्या आणि बराच वेळ त्यांच्याच घरात वास्तव्यास असलेल्या कुत्र्याविषयी लिहिलेला लेख फारच सुंदर. मी ते पुस्तक वाचत असतानाच मला सुनिताबाईंचा फोन आला. त्या म्हणाल्या – “ काल तुम्ही मण्यांचीमाळ या माझ्या पुस्तकावर सही घेऊन गेलात ना?” माझे उत्तर अर्थातच हो असे होते. त्या पुढे म्हणाल्या – “ उद्या तुम्ही ते सही असलेले पुस्तक परत घेऊन या.” मला काही उलगडाच होईना. पण काय बोलणार? मी त्यांच्या त्या म्हणण्याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी पुस्तक घेऊन त्यांच्या घरी हजर. त्यांच्या हातात मी ते पुस्तक दिले. काहीही न बोलता त्यांनी ते पुस्तक पूर्णपणे पान –अन – पान निरखून पाहिले. आणि मग माझ्या हातात परत दिले. आताही मला काही उलगडा होईना. मग त्यांनी कारण सांगितले- “ अहो, आज अजून एक गृहस्थ आले होते सही घ्यायला. त्या पुस्तकातील कागद खराब होता. त्यावर बरचसे काळे ठिपके होते. संपूर्ण पुस्तकभर ते ठिपके होते. आणि मग काही ठिकाणी अक्षरांवर एखादा ठिपका आला तर तो अनुस्वरासारखा दिसत असल्याने मजकुराचा अर्थच बदलत होता. मग मला तुमच्या पुस्तकावर केलेली सही आठवली. म्हणून मी तुम्हाला फोन केला. मी काही कॉपीही मागवून ठेवल्या आहेत.” पण सुदैवाने माझ्याकडची कॉपी स्वच्छ कागदाची होती आणि त्यामुळे सुनिताबाईंचे समाधान झाले होते.

अशी जागरुकता असलेले लेखक-लेखिका किती असतील? कोणी घेईल अशी तसदी? पण अशा व्यक्ती थोड्याच असतात आणि त्यांचा तो स्वभावच त्यांच्याबद्दल चुकीचे समज पसरवण्यास कारण ठरत असेल का?

काही व्यक्तींना एखादे काम कसेही झाले तरी ते फक्त होण्याशी मतलब असतो. काही व्यक्ती याच्यापेक्षा थोड्या पुढे असतात. त्यांना ते काम निगुतीने होण्यात थोडाफार रस असतो. त्यामुळे त्या कामात थोडं इकडं-तिकडं झालं तरी त्या ते चालवून घेतात. पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांना एखादे काम त्याच्या नियोजित पद्धतीनेच झालेले आवडते उलटपक्षी ते तसेच व्हावे असा त्यांचा आग्रह असतो. आणि असं असण्याचा सगळा त्रास त्यांच्या वाटयाला येतोच. अशा व्यक्तींना ‘ए’ टाईप व्यक्ती म्हणतात असं एक डॉक्टर मला सांगत होते. पुस्तकाच्या पानांवर काळे ठिपके दिसल्याने व त्यातला एखादा ठिपका एखाद्या शब्दावर आल्याने अर्थ बदलतो म्हणून स्वतः सही केलेलं पुस्तकच बदलून द्यायला निघालेल्या सुनीताबाई या अशी व्यक्ती होत्या. त्या त्यांच्या सगळ्याच मतांशी अगदी ठाम असत. त्यापासून जरा देखील ढळत नसत. याचा अनुभव मला वेळोवेळी येत गेला होता.

माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला सहर्ष मदत करणाऱ्या सुनिताबाईंचा हा स्वभाव माहित असल्याने पुढच्याच वर्षी मी त्यांच्या घरी पोहोचलो ते ‘आनंदयात्री पु.ल.’ ही नवी थीम घेऊनच. त्यात मी काढलेली पुलंची प्रकाशचित्रे वापरणार होतो. त्याच्या पूर्वीच प्रकाशचित्रकार देवीदास बागूल आणि सुनीताबाई-पु.ल. यांच्यामध्ये फोटोंच्या स्वामित्व हक्कावरून तात्विक वाद बराच तीव्र झाला होता. बागुलांनी काढलेले पुलंचे फोटो पु. ल. सत्कार समितीने विनापरवानगी वापरल्याबद्दल त्यांनी पुलंशी पत्र व्यवहार केला होता. त्यात बागुलांबरोबर अनेक मान्यवरांच्या सह्या होत्या. मी बागुलांच्या स्वामित्वहक्काबाबतच्या भूमिकेशी सहमत होतो. या पत्रयुद्धात बागुलांना पाठिंबा देणारे महारथी हळूहळू मागे हटले आणि मी एकटाच बागुलांबरोबर राहिलो होतो.

पुलंच्या ‘चित्रमय स्वगत’ या पुस्तकासाठी सुनिताबाईंनी मी काढलेले काही फोटो मागितले होते. ते फोटो व त्याची परवानगी मी अतिशय आनंदाने दिली होती. पण मी बागुलांना त्यांच्या स्वामित्वहक्काबाबत दिलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळे थोडा तणावही होताच. तरीही प्रत्यक्ष समोरासमोरच्या भेटीत आदरातिथ्य, माझी विचारपूस करणे हे त्यांच्याकडून चुकले नव्हते. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता मी पुलंचे फोटो कॅलेंडरमध्ये वापरणार होतो. सुनिताबाईंची प्रतिक्रिया यावर कशी असणार याचाच मी विचार करीत होतो. माझे पुलंच्या त्या प्रकाशचित्रांचे एडिटिंगचे काम पूर्ण झाले होते. एकेदिवशी -“संध्याकाळी जरा वेळ ठेऊन घरी येऊ शकाल का?” असे विचारणारा सुनिताबाईंचा फोन आला. त्यावेळी त्यांच्या घरी त्यांचे एक स्नेही व मुंबईतील प्रसिद्ध प्रकाशचित्रकारही येणार आहेत हे त्यांनी मला सांगितले. मला कल्पना आली की ही बैठक नक्कीच ‘फोटोंचा कॉपीराईट’ याविषयी असणार आहे. मी संध्याकाळी ‘मालती-माधव’ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो.

मला कल्पना होती की माझा सुनिताबाईंशी सामना होता आणि त्यांच्या बरोबर एक विख्यात, प्रथितयश व्यक्ती होती. विषय अवघड, संवेदनशील होता. स्वामित्व हक्काचा ! सुनिताबाईंच्या मते, मी काढलेल्या भाईंच्या फोटोंमध्ये माझ्याबरोबरच भाईंचाही कॉपीराईट आहे/होता. चर्चा सुरू झाली. त्या त्यांच्या आग्रहावर ठाम होत्या. मी त्यांना विचारले – “ तुम्ही फोटोग्राफी ही एक कला आहे असे मानता नां ?” त्यांचा अर्थातच होकार आला. मी म्हटले की, मी तुम्हाला चार प्रश्न विचारतो. त्यांच्या उत्तरानंतर मला तुमचे स्वामित्वहक्काविषयीचे मत सांगा. मी साक्षात ‘सरस्वतीपुत्राच्या’ घरीच बसलेलो. त्यामुळे असेल पण मला शब्द सुचत होते, बोलण्याचे धैर्य आले होते. मी प्रसंग उभा करू लागलो.

मी : “ मुंबईची गिरगाव चौपाटी आहे. वेळ संध्याकाळची आहे. निसर्गाची सुंदर प्रकाशयोजना आहे. सूर्यास्त होत आहे. मी हे दृश्य माझ्या कॅमेऱ्यात पकडले. या प्रकाशचित्राचा कॉपीराईट कोणाचा?”

सुनीताबाई : “ प्रकाशचित्रकाराचा म्हणजे तुमचा कारण निसर्गाला कॉपीराईट कुठे आहे?”

मी : या प्रकाशचित्रात काहीतरी कमी आहे असे मला वाटले. विचार करताच लक्षात आले की, यात मानवी अस्तित्व यायला हवे. मी खूप भाग्यवान. मला तेवढ्यात तेथे पु. ल. फिरायला आले आहेत असे दिसले. मी फ्रेम पकडून बसलो. काही क्षणातच माझ्या फ्रेममध्ये भाई आले. सूर्यप्रकाश भाईंच्या पाठीमागून असल्याने ‘सिल्ह्युट’ प्रकारचा उत्तम फोटो मला मिळाला. या प्रकाशचित्राचा कॉपीराईट कोणाचा?”

सुनीताबाई : “ तुमचा आणि भाईंचा.”

मी : “बरं ! आता मी इतका भाग्यवान नाही की, तेथे माझ्यासाठी भाई फिरायला यावेत. पण मला फोटोत मानवी अस्तित्व हवेच होते. तेवढ्यात तेथे एक कचरा गोळा करणारी छोटी मुलगी आली. मला मानवी अस्तित्वाबरोबरच एक हालचालही मिळाली. पुन्हा मला एक उत्तम फोटो मिळाला. या प्रकाशचित्राचा कॉपीराईट कोणाचा?”

सुनीताबाई : “ तुमचा ! कारण ती मुलगी कोणी सेलिब्रिटी नाही. पु. ल. हे सेलिब्रिटी आहेत.”

मी : “ सुनीताबाई, न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी आहे. ती लहान-थोर जाणत नाही. तिच्यापुढे सर्वांना समान न्याय आहे.”

माझा चौथा प्रश्न बाकी होता. समोर बसलेली विख्यात, प्रथितयश व्यक्ती माझ्या धाडसाने चकित झाली होती.

मी : “ मी फिल्मच्या छोट्याशा तुकड्यावर अभिव्यक्त होतो. तुम्ही लेखक लोक बुद्धी, पेन व कागद यांच्या साहाय्याने अभिव्यक्त होता. मी एखाद्याचा फोटो काढला तर त्याला व्यक्तीचित्र म्हणतात , तसेच तुम्ही एखाद्याबद्दल लिहिलेत तर त्यालाही व्यक्तीचित्रच म्हणतात. मग मला आता सांगा की ‘औक्षवंत हो मुली’ या लता मंगेशकर यांच्यावर लिहिलेल्या व्यक्तीचित्रावर भाईंचा व लता मंगेशकर यांचा कॉपीराईट हवा. कारण लता मंगेशकरही सेलिब्रिटी आहेत. मग तशी काही नोंद त्या पुस्तकात आहे का?”

माझ्या या चौथ्या प्रश्नाने त्यांना अंतर्मुख केलं. त्याचं कोणतंच उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. माझ्या युक्तिवादाने मी सुनीताबाईंना माझा मुद्दा पटवून देण्यात यशस्वी झालो होतो. ते ही कोणतीही कटूता न आणता. अर्थात या विषयाला अनेक कायदेशीर पैलू आहेत आणि तो मोठा विषय होऊ शकतो याची मला जाणीव आहे. पण सुनीताबाई आणि माझ्यातला हलकासा असलेला ताणही दूर झाला होता. त्यांनी खिलाडूपणे माझा कॉपीराईट मान्य केला होता. त्यांनी मला परत एकदा कॅलेंडरसाठी प्रचंड मदत केली. त्या नोव्हेंबर महिन्यात भाईंच्या जन्मदिनी ‘ आनंदयात्री पु. ल.’ हे कॅलेंडर प्रकाशित झालं. सुनीताबाई ते सर्वार्थाने निर्दोष कॅलेंडर पाहून हरखून गेल्या.


मी वरचेवर त्यांच्याकडे जात राहिलो. २००० साली माझ्याकडे पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा आला. बदलत्या तंत्रज्ञानाने ही नवी गंगा आणली होती. कधी-कधी या विषयी त्या बोलत–विचारत. एकदा चांगली संधी साधून मी त्यांना विचारले की – “ सुनीताबाई, मला तुमचा फोटोसेशन करायची इच्छा आहे. कधी करू या?” यावर त्यांचे उत्तर होते की- “ मला फ्लॅशचा त्रास होतो.” मी म्हणालो – “ पण मी तर फ्लॅश न वापरता फोटो काढीन.” यावर त्यांची पळवाट होती की - “माझे फोटो चांगले येत नाहीत.” मीही हट्टी मुलासारखा म्हणालो – “ आता डिजिटल कॅमेरा आहे. त्याच्या डिस्प्लेवर लगेचच आपल्याला फोटो बघायला मिळतो. मी तो तुम्हाला दाखवीन. तो जर तुम्हाला आवडला नाही तर आपण डिलीट करून टाकू.” यावर लगेचच त्यांनी उत्तर दिले की – “ मी हल्ली घरी साडी नेसत नाही. गाऊन घालते. म्हणून नको.” यावर मी निरुत्तर झालो. पण मनातला विचार काही लोपला नाही. पुढे काही वर्षे गेली. आणि २००८ च्या जुलै महिन्यात त्यांना जी. ए. कुलकर्णी प्रथम पुरस्कार जाहीर झाला. मला खूप आनंद झाला. आनंद दोन गोष्टींसाठी एक म्हणजे पुरस्कार मिळाल्याचा आणि दुसरं म्हणजे तो घेण्यासाठी का होईना सुनीताबाई सर्वांना सामोरं जाणार म्हणून. मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला. आणि म्हणालो – “ सुनीताबाई, पुरस्कार घेण्यासाठी आता तुम्ही साडी नेसणार असाल नां ? पुरस्काराचा कार्यक्रम झाल्यावर आता आपण फोटोसेशन करू शकतो की.” माझा हट्ट त्यांनी बेसावध क्षणी का होईना मान्य केला.

१० जुलै २००८ रोजी सकाळी मी त्यांच्या घरी पोहोचलो. पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला होता. मंडळी निवांत झाली होती. त्यांचा भाचा डॉ. दिनेश ठाकूर, त्यांची पत्नी सौ. ज्योती, बंधू डॉ. श्रद्धानंद ठाकूर, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे, महेश एलकुंचवार, दिलीप प्रभावळकर, डॉ. शिरीष प्रयाग, बापू कांचन आदी सुहृद गप्पांमध्ये रंगले होते. कोणीतरी त्यांना काही ओळी लिहून पाठवल्या होत्या. त्यात लिहिलं होतं – “ सुनीताबाई, आज तुमच्या सन्मानासाठी आम्हीच आम्हाला मिरवले आहे. कारण तुम्ही आहात हीच आमची श्रीमंती आहे. अशी एखादी व्यक्ती असते, की जी केवळ जीवनमूल्यांच्या आधारानं जगू पाहते. ही गोष्टच आम्हाला धीर देणारी आहे. तुमचं पुस्तक ‘आहे मनोहर तरी..’ वाचलं तेव्हा ही जाणीव आम्हाला पहिल्यांदा झाली. आणि एक व्यक्ती – कणखर, स्वयंसिद्ध व्यक्ती म्हणून कितीतरी बायकांना आणि पुरुषांनाही खूप दिलासा मिळाला.” जणूकाही तेथे आलेल्या प्रत्येकाचे मन हेच तर सांगत होते.

आधीच उत्तम ‘स्कीन कॉम्प्लेक्शन’ असलेल्या सुनीताबाईंच्या चेहऱ्यावरचे हसू जास्तच स्निग्ध झाले होते. मी काही अनौपचारिक असे क्षण कॅमेराबद्ध केले. पूर्वेकडच्या खिडकीतून येणारा प्रकाश हा एकमेव स्त्रोत. उत्सवमूर्तीला काही सूचना करता येतील अशी परिस्थिती नव्हती. त्या जेथे बसल्या होत्या त्याच ठिकाणी मला फोटो घेणे गरजेचे होते. मी कॅमेऱ्यावर टेली लेन्स लावली. त्यांच्या नकळत मी फोटोसेशन सुरूही केला होता. त्यांचे हावभाव, त्यांची नजर, त्यांचे हसू, हळूहळू एक एक फ्रेम ! पंधरा मिनिटात माझं काम झालं होतं. बऱ्याच वर्षांची माझी इच्छा फलद्रूप झाली होती.

मी त्या फोटोंचे एडिटिंग केले. परत एकदा त्यांना फोन केला. माझ्या लॅपटॉपवर मी त्यांना ते एडीट केलेले सर्व फोटो दाखवले. त्यांच्या चेहऱ्यावर परत एकदा हसू पसरले. त्यांच्या नकळत टिपलेल्या त्या भावमुद्रा पाहताना त्यांना परत एकदा त्या आनंदसोहळ्याचा अनुभव आला असेल का? चेहरा तर ते सांगत होता. मला आवडलेली खळाळून हसतानाची त्यांची भावमुद्रा त्यांनाही खूप आवडली. मग त्यांच्या डोळ्यांत पाणी का दाटून आले असेल? काहीच न बोलता त्या उठल्या. वॉकरला धरून हळूहळू चालत आत गेल्या. काही वेळात परत बाहेर आल्या. त्यावेळी त्यांच्या हातात चार कॅसेट्स होत्या. पुलंच्या कॅसेट्सचा संग्रह होता तो. “ तुम्ही खूप छान फोटो काढलेत माझे” असं म्हणत माझ्या जवळ येत त्यांनी तो संग्रह मला दिला. माझ्यासाठी अमूल्य भेट होती ती.

नंतर परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही ! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षानी पुरस्काराच्यावेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या गरजा किती कमी असाव्या याचा तो साक्षात्कार होता. पुलंसारख्या प्रतिभावान, सर्व गुण संपन्न व्यक्तीची पत्नी – गृहिणी, सखी व सचिव अशा रूपांत वावरताना हा साधेपणा जास्तच उजळून आला होता. जणू संत तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटल्याप्रमाणे ‘जोडोनियां धन, उत्तम वेव्हारें, उदास विचारें वेच करी’ हेच साऱ्या आयुष्याचे ब्रीद या साधेपणातून आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या या भूतलावर आल्या असाव्या.


सतीश पाकणीकर
९८२३०३०३२०
https://www.facebook.com/sateesh.paknikar

2 प्रतिक्रिया:

Santosh said...

सुंदर!!! :)

Santosh said...

सुंदर!!!