Thursday, December 16, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - ३

५ ऑगस्ट १९७८ रोजी 'भारतीय जीवन विमा निगम'च्या सोलापूरच्या नव्या शाखेचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटन समारंभाची जाहिरात ऐतिहासिक मराठी भाषेत आणि खलित्याच्या रूपात केलेली होती.

सकल गुणालंकारमंडित राजमान्य राजेश्री श्रीयुत विमेदार स्वामी यांचे हुजुरास विनंती अर्ज ऐसाजे.

स्वामींचे उदार आश्रयेंकरून सोलापूर शहरी आमचा भला उत्कर्ष जाहला असोन सांप्रत काळी सुभे साताऱ्यामधील बिनीचा सन्मान शहर सोलापूर शाखेस लाभला हे स्वामीस विदीत आहेच...

अशा सुरवातीची आणि वळणाची ही जाहिरात संस्थेचे जनसंपर्काधिकारी श्री. रा. म. शिरोडकर यांनी पुलंना पाठवली. ह्या जाहिरातीची नोंद घेणारं आणि कोपरखळ्या देणारं पत्र 'अगस्त सव्वीस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ख्रिस्तमास' या दिवशी पुलंनी पाठवलं. त्यातला काही भाग असा :

श्री मृत्युंजया विमाभवानी प्रसन्न

सकलगुणालंकारमंडित मानवयोगक्षेमचिंतानिवारक विमाप्रवर्तक राजमान्य राजेश्री रा.म. शिरोडकर यांचे चरणी माजी विमाधारक आणि सांप्रत विमाधारणकालातीत सेवक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचे विनम्र प्रणिपात... भारतदेशाचे भूतपूर्व अर्थमंत्री विद्वद्वर आणि परमश्रद्धेय माननीय सकलगुणालंकारमंडित श्रीयुत चिन्तामण द्वारकानाथ देशमुख महोदयांच्या कर्तृत्वेकरोन स्वदेशी भारतीय विमा निगमाची प्राणप्रतिष्ठा जाहली त्या उपरान्त प्रस्तुत निगमाने अकल्पित रीतीने कुटुंबप्रमुखाचे प्राणोत्क्रमण जाहल्यावर ओढवणाऱ्या संकटातून अवलंबितांना आधार देण्याचे आणि विशेषेकरोन निगमाच्या कारभाराची धुरा वाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगक्षेमाचा भार वाहण्याचे जे कार्य चालवले आहे ते लोकविश्रुतच आहे. त्या जनसेवेचे कवतिक करण्याचा अधिकार प्रस्तुत पत्रलेखकाचा नसोन संबंधित क्षेत्रस्थ मातबरांचा आहे. सेवकाची मर्यादा सेवक जाणतो.

याच पत्रात 'मरोनी विमा पालिसीने तरावे' किंवा, 'विमाधारकें नित्य हप्ते भरावे,' 'देहे त्यागिता द्रव्यरूपे उरावे' - अशी 'आधुनिक संतवचनं 'ही दिलेली आहेत.

सोनल पवार 
संदर्भ : अमृतसिद्धी

0 प्रतिक्रिया: