Friday, March 25, 2011

उत्स्फ़ूर्तता पुलंची - सुधीर गाडगीळ

नमस्कार,

’बोलणं’ नेमकं, नेटकं, समोरच्याला सहजतेनं समजेल असं असणं ही सध्याच्या मार्केटिंगच्या जगात अत्यावश्यक बाब ठरू पाहतीय. शब्द निवडीतली स्वाभाविकता, शब्द मांडणीतील अनौपचारिकता, विचारांची स्पष्टता आणि क्वचित प्रसंगी उत्स्फ़ूर्तता हे सूत्र सांभाळलं, तर कुठल्याही वयोगटातल्या, कुठल्याही स्वभवधर्माच्या माणसांशी तुमचे संवादाचे सूर सहज जमतात. ’पुलं’नाही अनौपचारिक बोलीत बोलण्याची भट्टी झक्क जमली होती.

"तुम्हाला सांगतो..."म्हणत ते क्षणात समोरच्यांच्या हृदयात शिरत. अंगभूत उत्स्फ़ूर्तता, बारीक निरिक्षणशक्ती आणि मूळात माणसांची आवड आणि त्यांच्या आनंदात आनंद मानण्याची उपजत वृत्ती यामुळे शब्दांच्या खेळाचे ते अनभिषिक्त सम्राट राह्यले. आपण मंडळी अनेकदा त्यांच्य उत्स्फ़ूर्त उद्गारांनी खदखदलेले आहात. मला ’पुलं’ समवेत प्रावास करण्याचाही योग आला आणि साध्या साध्या गोष्टीतही त्यांनी केलेल्या शेरबाजीमध्ये डोकावणा-या ’खट्याळ-मिष्किल’ पुलंचे दर्शन घडले.


मॊरिशसहून परतत होतो. एअरपोर्टच्या ड्यूटी-फ़्री शॉपमध्ये पुल-सुनीताबाईंसमवेत मीही रेंगाळलो होतो. समोरच्या शो-केसमध्ये एक पैशांचं सुंदर लेदर पाकीट लटकवलेलं होतं. पुलंना ते पाकीट फ़ार आवडलं. त्यानी सेल्समनला विचारलं, "केवढ्याला?"
सेल्समननं जी किंमत सांगितली, ती ऎकताक्षणी पुलं क्षणात उद्गारले,
"अरे, मग पाकीटात काय ठेवू?"

-सुधीर गाडगीळ
मुळ स्त्रोत --> http://sudhirgadgil.blogspot.com/2010/11/blog-post_25.html

Wednesday, March 16, 2011

पु.ल. एक आठवण - धनंजय इंगळे

फावल्या वेळात पुलं वाचत बसणं, हा माझा आवडता छंद आहे. मनाच्या आनंदी अवस्थेत पुलं वाचले तर आनंद शतगुणित होतो व दु:खी अवस्थेत वाचले, तर दु:खाची तीव्रता खूप कमी होते, असा माझा कित्येक वर्षांचा अनुभव आहे.
सतत गाण्याच्या मैफिलींचा आनंद घेणारा श्रोता कधी स्वत: गाऊन बघण्याचं धाडस करतो, तेव्हा आपण गवय्ये आहोत अशी फुशारकी त्याला अजिबात मारायची नसते. पण तरीही, एखाद्या वेळी त्याला राहावत नाही. आज पुलंबद्दल लिहिताना माझं असंच काहीसं झालंय..

पुलंच्या बाबतीत लिहिताना प्रश्न असा पडतो की, त्यांच्यावर लिहायचं ते कोणत्या बाबतीत?
सामाजिक बांधीलकीची जाण ठेवून लिहिणारा लेखक, स्वत:चं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर लक्षावधी रुपयांचं दान निरनिराळ्या संस्थांना देणारा दाता, उत्तम नाटककार, संगीतकार, शास्त्रीय संगीताचा उत्तम जाणकार आणि गायकसुद्धा, अप्रतिम हार्मोनियम वादक, की सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक..

कठीण आहे! एवढासा माणसाचा मेंदू. त्यात इतक्या सर्व गोष्टी ठासून भरलेल्या बघितल्या, की आश्चर्य वाटतं. जाऊ दे म्हणा.. आपण आपला त्यांच्या कलाकृतींचा आनंद घेत राहायचा. बाकीच्याशी आपल्याला काय देणं-घेणं?
पुलंची मला सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती. आपल्या दैनंदिन व्यवहारात आढळून येणार्‍या विसंगती अचूक टिपण्याची व ती कोणाला न दुखवता नेमकेपणाने लोकांसमोर मांडण्याची त्यांची ताकद, ही एक फार मोठी दैवी देणगी आहे. आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ही या दैवदत्त शक्तीची काही उदाहरणं. वरील सर्व लेखक श्रेष्ठ खरेच, पण या सर्वाहूनही पुलंचा विनोद काही वेगळाच आहे. त्यांचं लिखाण वाचताना नेहमी ‘अरेच्या, हे तर अगदी आपल्या मनातलंच लिहिलंय..’ असंच वाटत राहातं, यातच त्यांचं यश दडलं आहे.
काहींच्या विनोदाने लोक कधीतरी दुखावले गेलेही असतील कदाचित. पण पुलंचा विनोद निर्मळ असतो. तो गुदगुल्या केल्यासारखा खळखळून हसवतो, त्याचबरोबर अंतर्मुखही करतो. म्हणजे एखाद्याची दाढी करताना, गुळगुळीत तर झाली पाहिजे, पण जखमही व्हायला नको.. असं!
त्यांचं कुठलंही पुस्तक हातात घ्या, निखळ आनंदाचा ठेवा असतो. याचं एक कारण असंही देता येईल, की त्यांनी जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं. कुठल्याही गोष्टीची चांगलीच बाजू वाचकांसमोर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.‘‘आयुष्यात वेळोवेळी इतके दु:खाचे, अपमानाचे प्रसंग सर्वावर येत असताना, माझ्या लिखाणातून आणखी दु:ख वाचकांसमोर ठेवण्यापेक्षा त्यांना दोन घटका आनंद देता आल्यास ते मला अधिक आवडेल..’’ असं ते म्हणत. किंबहुना माझा स्वत:चा दृष्टिकोनसुध्दा असाच असल्यामुळे असेल कदाचित, मला त्यांचं लिखाण प्रचंड आवडतं.

सिद्धहस्त लेखक म्हटलं, की प्रथम आठवतात, ते पुलंच! त्यांची प्रवासवर्णनं (जावे त्यांच्या देशा, अपूर्वाई, पूर्वरंग) वाचताना याचा पदोपदी प्रत्यय येतो. प्रवासवर्णनच कशाला, त्यांचं ललित लेखन, व्यक्तिचित्रण, काहीही घ्या, फॅण्टास्टिक.!! स्वत: रंगभूमीचे कलावंत आणि नाटकाचे दर्दी असल्याकारणाने, त्यांना परदेशात गेले तरीसुद्धा नाटकांचे थिएटर प्रथम दिसे. त्यांचा एक मित्र खवचटपणे त्यांना म्हणालादेखील, ‘‘कुत्रा कुठेही गेला, तरी त्याला जसा ‘खांब’ दिसतो, तसं तुला थिएटर दिसतं..’’ सांगायचं तात्पर्य, त्यांना नाटक रंगभूमी यांची प्रचंड आवड होती. त्यांच्या प्रवासवर्णनातसुद्धा याचंच वर्णन भरपूर असतं.

कुठलाही लेख, कथा इ. लिहिताना त्याची सुरुवात व विशेषत: शेवट, हे आकर्षक असणं जरुरी असतं. तरच ते मनाची पकड घेऊ शकतात. याबाबतीत पुलंना पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत. त्यांचं कुठलंही लिखाण बघा, माझं म्हणणं तुम्हाला पटेल. उदा. व्यक्ती आणि वल्लीमधील ‘चितळे मास्तर’, ‘बापू काणे’ इत्यादी. विशेषत: ‘चितळे मास्तर’चा शेवट तर नकळत डोळ्यांच्या कडा भिजवून जातो. अल्टिमेट!

मानवी स्वभावाचं अत्यंत बारकाईचं व प्रत्ययकारी चित्रण करावं, तर ते पुलंनीच! ‘दाद’, ‘गणगोत’, ‘गुण गाईन आवडी’, ‘मैत्र’ इत्यादी. त्यांच्या पुस्तकातून त्यांच्या सुहृदांच्या व्यक्तिरेखा त्यांनी रंगवल्यात. त्या वाचताना तासन्तास कसे निघून जातात कळतही नाही. पुलंच्या व्यक्तिरेखांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्या कधीही आततायी, हिंसक होत नाहीत. म्हणून वाचकांच्या डोक्याचं टेन्शन वाढत नाही. म्हणून त्या जास्त इंटरेस्ट घेऊन वाचल्या जातात. निखळ आनंद देणारं हे लिखाण, कितीही वेळा वाचलं तरी कधीही कंटाळा येत नाही. मला स्वत:ला तर ते इतकं आवडतं, की फावल्या वेळात पुलं वाचत बसणं, हा माझा आवडता छंद आहे. मनाच्या आनंदी अवस्थेत पुल वाचले तर आनंद शतगुणित होता, व दु:खी अवस्थेत वाचले, तर दु:खाची तीव्रता खूप कमी होते, असा माझा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. आणि जी कला तुमचं दु:ख, टेन्शन हलकं करते, तीच सर्वश्रेष्ठ असते.. नाही का?

पुलं नुसते साहित्यिकच नव्हते, तर इतरही अनेक कला त्यांच्या अंगी होत्या. ते एक उत्तम वक्ते होते, हार्मोनियम वादक, संगीत दिग्दर्शक होते. नाटकांच्या तर सर्व अंगांत ते पारंगत होते. पटकथा, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य अशी सर्व अंगे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. चित्रपट व्यवसायातदेखील त्यांनी भरपूर नाव कमावलं. ‘गुळाचा गणपती’ हा चित्रपट म्हणजे तर सबकुछ पुलं! ‘अंमलदार’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’ इ. त्यांची नाटकं झकास चालली. ‘बटाटय़ाची चाळ’ ह्या एकपात्री प्रयोगाने पुलंचं नाव सर्वतोमुखी झालं. नंतर आलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’ने तर कहरच केला. त्याचा नुसता प्रयोग जाहीर झाला की एक तासाच्या आत प्लॅनवर बसलेला माणूस गल्ला पेटीत टाकून खिडकी बंद करायचा.
एखादी गोष्ट आवडली, पटली तर स्वत: वाटेल तो त्याग करून ती गोष्ट तनमनधनाने स्वीकारायची, हा पुलंचा खाक्या. त्यापायी (सपत्नीक) प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईकांच्या कॉलेजच्या स्वप्नापायी पुण्याची नोकरी सोडून मालेगावच्या उजाड रानात राहायला गेले. तशीच बेळगावच्या कॉलेजात प्रोफेसरकी केली. इंदौरी, लखनवी, ग्वाल्हेरी वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी रामूभैया दातेंसोबत उत्तरेची सफर करून आले. भूदानाचं कार्य जाणून घेण्यासाठी विनोबांच्या सहवासात कित्येक दिवस पायी फिरले. आनंदवनात तर किती वेळा येऊन गेले असतील, देव जाणे. असंख्य नोकऱ्या केल्या, सोडल्या.. दत्ताने केलेले गुरू आणि पुलंच्या नोकऱ्या, यात फारसा फरक नसावा.

मित्र जमवणं आणि मनमुराद गप्पा मारणं, स्वत: हसणं आणि इतरांनाही खळखळून हसवणं, हा पुलंचा आवडता षौक. उत्स्फूर्त शाब्दिक कोटया कराव्यात तर त्या पुलंनीच. त्यांच्या एकसष्टीनिमित्त त्यांचा सत्कार झाला. त्यासाठी जे हार आणले होते, ते खूप जाड व वजनी होते. ते हार बघून पुलं चटकन उद्गारले, ‘‘बापरे, एवढे मोठे हार घालून घ्यायचे, तर मला उभ्याच्या ऐवजी आडवंच व्हायला हवं..’’ कविवर्य बा. सी. मर्ढेकर हे पुलंचं श्रद्धास्थान! एका गावात मर्ढेकरांच्या कविता वाचनासाठी पुलंना बोलावलं होतं. ते संध्याकाळचे त्या गावात पोहोचले. रात्रीच्या जेवणासाठी कुणा परिचितांच्या घरून जो टिफिन आला, तो आठ ते दहा खणांचा होता. टिफिन बघताक्षणी, आणणाऱ्या माणसाला पुलं म्हणाले, ‘‘अहो, उद्या आपल्याला लोकांना मर्ढेकर ऐकवायचे आहेत, ढेकर नव्हे.. सचिनची बॅटिंग बघताना किंवा पुलंचं लिखाण वाचताना आपल्याला (किमान मला तरी) असं वाटायचं, की हे सारं किती सोप्पं आहे.. आपण हे अगदी सहज करू शकू. पण प्रत्यक्षात बॅट घेऊन मैदानात उतरलं किंवा आता पुलंवर लिहायला बसलो, तेव्हा अर्जुनासारखं ‘सीदन्ती मम गात्राणी..’ झालं. शब्द आठवेचनात! तेव्हा कळतं, की सचिन किंवा पुलंसारखे पैदा होत नसतात. हजारो वर्षांंतनं एखादेच पुलं जन्मतात..

थोर गायक कै. डॉ. वसंतराव देशपांडे आणि पुलं हे अतिशय अंतरंग मित्र. ४०-४५ वर्षांची मैत्री, १९८३ साली वसंतरावांच्या अकाली निधनामुळे तुटली, तेव्हापासून ते थोडे खचल्यासारखे झाले. ‘‘वसंता नसलेल्या जगातही आपल्याला कधीकाळी रहावं लागेल, अशी कल्पनाच कधी मनाला शिवली नाही..’ असं ते म्हणत. म्हणूनच महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारताना त्यांनी, ‘‘विझवून दीप सारे, मी चाललो निजाया..’’ असं म्हटलं, तेव्हा विलक्षण वाईट वाटलं. एक ना एक दिवस सर्वानाच जायचं असतं. पण पुलंनी आपणांस आयुष्यभर जो आनंद भरभरून दिला, त्याबदल्यात त्यांचंचं जाणं फार खटकतं. अनेकांचे गुणविशेष त्यांनी टिपले व सर्वांपर्यंत पोहोचविले. स्वत: घेतलेला आनंद शतपटीने वाढवून पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचविला.
पुलंची वारंवार आठवण येताना वाटतं, की ते स्वत:सुद्धा ईश्वराची एक कलाकृतीच होते. आम्हा सामान्यांच्या आयुष्यात अर्थ व रंग भरण्यासाठी देवानेच त्यांना या पृथ्वीवर पाठवलं होतं. तो पाठवणाराही असा लहरी आहे, की देताना ‘देऊ का?’ असं विचारत नाही आणि परत नेतानाही ‘नेऊ का?’ असं विचारत नाही. देतो आणि नेतो. आपण बघण्याव्यतिरिक्त काय करू शकणार? त्यांची लीला अतक्र्य आहे. त्यांच्या लीलेला आणि त्याहीपेक्षा त्याच्या कलाकृतीस सलाम करणं, एवढंच आपल्या हातात उरतं. नाही का?

धनंजय इंगळे
लोकसत्ता
२८/५/२०१०

मुळ स्त्रोत - http://www.loksatta.com/lokprabha/20100528/pulkit.htm

Thursday, March 10, 2011

(भाई)गीरी

अक्षरांची रत्ने खुलवत राजा होता अवतरलेला
गेली वर्षे सरली वर्षे दरवळ त्याचा पण उरलेला

राजा होता थोडा डांबिस थोडा अल्लड थोडा ग्यानी
ह्या राजाचा रुबाब होता एक मनोहरशी फ़ुलराणी

ह्या राजाची गोष्ट निराळी ह्या कुलुपाला नव्हती किल्ली
ह्या राजा दिसल्या होत्या काही व्यक्ती काही वल्ली

त्या वल्लीची बात निराळी नाथा,नंदा, अंतु बर्वा
ह्यातिल खरा नि खोटा कुठला तुम्हीच वाचा तुम्हीच ठरवा

ह्या राजाची कधी फ़सवणूक कधी उगाची खोगिरभरती
ह्या राजाने चालत न्हेले आम्हा तुम्हा चांळीं वरती

कधी जहाला धोंडो जोशी कधी बबडुचे लाडु वळतो
हया राजाचा थाट हे न्यारा ज्याला जुळतो त्याला कळतो

कधी असामी गुणगुणला तो कधी उगाचच शुन्य जहाला
ह्या राजाचा सुर गवसला ज्याला बस तो धन्य जहाला

-- मकरंद सखाराम सावंत