Tuesday, November 13, 2018

प्रिय पु.ल. यांस

प्रिय पु.ल.

आज ८ नोव्हेंबर , तुमचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होईल. तुमची वाढदिवसाची व्याख्या आणि “घोडा किती वर्षाचा झाला तरी झोपतो कसा बघा गाढव??” हा प्रश्न आम्हास चांगलाच ठाऊक आहे. वर्षानुवर्ष आम्ही तुमचं ऐकत आलोय,वाचत आलोय , आज आमच थोडं !!! विश्वास आहे कि तुम्ही ऐकाल.

लिहता वाचता येऊ लागल्यानंतर,शाळेत असताना ,अभ्यासाबाहेरही पुस्तके असतात ,ती बरच काही शिकवतात हे आम्हाला समजले तुमच्याकडूनच. पुस्तकं वाचणे, निखळ हसणे आणि आपल्याला सुद्धा असे लिहता आले पाहिजे हे वाटून, लिहण्याची इच्छा निर्माण केली ती तुम्हीच !!! आणि एकदा ती सवय लागली ती कायमचीच.

तुमची पुस्तके वाचताना ‘ अरे हे तर किती साध-सरळ simple आहे, मला का नाही अस सुचत?? हे सारखं वाटायचं, अजूनही ते वाटणं आहेच. लोकांना हसवणे हे विदुषक बनून वाकुल्या दाखवून किवा गुदगुल्या करण्याइतकं सोप्प नाही हे तेव्हाच समजलं. एखाद्या विषयाचं इतकं खोलवर ज्ञान एखाद्याला कसं असू शकतं , माणसाचा व्यवसाय, राहणीमान , देश, गावं , यानुसार त्याच्या सवयी , बोलण्याची पद्धत याचं निरीक्षण करून ते शब्दात उतरवणं (ते देखील भन्नाट उपमा देत) यामुळेच आम्हाला वेड लागलं , हो अक्षरशः महाराष्ट्र वेडा झाला.

आपल्या ओळखीचा एखादा माणूस, काही वर्ष भेट नाही झाली तर अनेकदा तो आठवणीतून निघून जातो, समोर आला तर ओळखायलाही होत नाही, पण कधी न पाहिलेली, जिवंत नसलेली, तुमची पुस्तकातली पात्र लोकांना आज इतक्या वर्षानंतरही त्यांच्या खाण्यापिण्याच्या , बोलण्याच्या सवयी सकट लक्षात आहेत. कस काय हो पु.ल. ??

सखाराम गटणे – नाव जरी घेतलं तरी आम्ही आमचे सगळे प्रोब्लेम विसरून, फिदीफिदी हसू लागतो, त्याची बोलण्याची पद्धत कशी असेल ? कोणी नाटकं इतकं सिरीयसली घेतं का, म्हणून त्याची नक्कलसुद्धा करु लागतो. आम्हाला अमुक तमुक पुस्तके त्याचे लेखक आठवणार नाही पण “केतकी पिवळी पडली” चे लेखक सं. त. कुडचेडकर आहेत हे इतक्या वर्षानंतरही लक्षात आहे.

आज नंदा प्रधान वाचायला घेतला कि, इतकं विचित्र, वेडवाकड आयुष्य असूनही हा नंदा असा शांत कसा? काय अजब रसायन असेल हा प्राणी? हे प्रश्न विचार करायला लावतात. इंदू वेलणकरने नंदाला लिहलेलं पत्र वाचून तुमच्या डोळ्यात पाणी येत पु.ल. आणि आमच्या अंगावर काटा !!. नंदाची कथा वाचून जाणवलं कि “पु.ल.” हा प्रकार काहीतरी वेगळा आहे. केवळ हसवणे, विनोद करणे, काहीतरी उपमा देऊन लोकांची वाहवा मिळवणे हे तर समुद्राच्या वर येणाऱ्या लाटांचे फेस आहेत, त्या समुद्रात खोलवर दडलेली जगण्याची शिकवणी या नंदाने बाहेर काढली.

पु.लं तुम्ही आम्हाला हसवले,अगदी मनसोक्त,निखळपणे, त्यासाठी कोण व्यक्ती समाजाची चेष्टा करावी नाही लागली तुम्हाला. आजकाल कित्येक YouTube channels आलेत, standup कॉमेडी करणारे,रियालिटी शो मध्ये perform करणारे आणि त्यांच्या jokes वर टाळ्या पिटणारे परीक्षक, हे तुम्ही कधी पाहिलच नाही. त्यांची कला, मेहनत, हे सर्व वाईट व व्यर्थ असे अजिबात नाही पण आमच्यासाठी तुम्हीच पहिले standup comedian.

“comedian” – हसवणूक करणारा, हा शब्द तुमच्यासाठी वापरताना जरा keyboard अडखळतो (laptop वर लिहतो ना आजकाल सो…). पु.ल. म्हणजे ते विनोदी लेखक ना ? ते सिंहगड रोड च garden त्याच नाव त्यावरून ठेवलं right ?? बास इतकीच काही लोकांना तुमची ओळख असते.

समजायला जड वाटणारी नाटके, संस्कृत श्लोक,लांबलचक शब्द आणि किचकट संदर्भ यात अडकलेली मराठी तुम्ही अलगद आमच्या समोर आणून ठेवली. अगदी आमची रोजची बोलीभाषा आम्हाला इंटरेस्टिंग करून दाखवली. आमचे बोट पकडून पोस्ट ऑफिस,मुंबई,पुणे,नागपूर फिरवले. वर्हाडी बोली चा ठसका दाखवला. चायनिस, इटालियन डिश सोडून आपल्या मातीत इतक्या सगळ्या पदार्थांची आम्हाला नव्याने ओळख करून दिलीत. पानवाला, पेपरवाला, इस्त्रीवाला,धोबी,मास्तर,कट्ट्यावर रमणारे ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या गमज्या, रेल्वेच्या प्रवासातील गमतीशीर लोक, महाराष्ट्राची लाडकी लालपरी,तिने प्रवास करायची मजा, कोकणच्या लोकांच्या सवयी,त्या वाड्या,पारावरच्या चर्चा,चाळीमधली भांडकुदळ, भन्नाट वल्ली माणसं हे सगळं सगळं आम्हाला घरबसल्या समजलं, तुमच्यामुळेच.

रोज धावपळ करणे,कमवणे,नोकरी करणे,मरून जाणे या पलीकडे पाहायला लावले तुम्हीच. छंद असणे किती महत्वाचे असते, कलेविण जीवन व्यर्थ हे समजवणारे तुम्हीच !! प्रत्येक वेळेस वाचला तरी चितळे मास्तरांच्या कथेच्या शेवटी हसता हसता डोळ्यात पाणी येतेच हो. कुठून शिकलात हि जादू ??? “एक शून्य मी” मधला नायक हा सर्वसामान्य ,मध्यमवर्गीय माणूस होता. कुटुंबासाठी झटणारा, काटकसर करणारा , थोडक्यात समाधान मानणारा होता. पण तरी दुःखी नाही, निराश नाही, त्रासलेला नाही. आयुष्य जगणारा, कोणत्याही प्रसंगी, कश्याही परिस्थितीत हसण्याचे कारण शोधणारा तो साधा माणूस , त्याला तुम्ही hero बनवलात. म्हणून तुम्ही ग्रेट आहात. कधी कधी वाटते कि एक नाही चांगले १०-१२ पु.ल. असणार, एक लिहणारा, एक अभिनय करणारा , संगीत देणारा, कविता करणारा, चित्रपट निर्मिती करणारा, दिग्दर्शन करणारा, रेडियो वर एक, दूरदर्शन साठी एक, आणि हे सगळं झाल्यावर समाजकार्यासाठी एक !!! इतक करूनही कधी जमिनीवरचा पाय कधी थोडाही हवेत नाही?? कमाल आहे !!!

पुस्तकात आहेत तसे आपुलकी दाखवणारे लोक भेटत नाही आता,घराची दारे बंद झाली,अंगावर खेकसणारे दुकानदार गेले, कपडे वेळेवर न देणारे धोबी गेले, चाळीहि गेल्या आणि त्यातले वल्लीपण गेले, पट्टीच्या धाकावर शिकवणारे मास्तर गेले (गोड इंग्लिश बोलणाऱ्या miss असतात म्हणे), सायकली गेल्या,पारावरचे कट्टे गेले,लग्नातले नारायण गेले आणि event manager आले, म्हणूनच कदाचित आम्ही हे सगळं अजूनही तुमच्या पुस्तकात शोधत असतो आणि ते कधीच हरवून नाही देणार.

आज इतकी वर्ष झाली, काळ बदलला, माणस, भाषा बदलली, तार- टेलिफोन जाऊन स्मार्ट फोन आले, पुस्तक जाऊन किंडल आले, सिरी, अलेक्सा, या artificial intelligence न वेड लावलं, फेसबुक, युट्यूब, नेटफ्लिक्स ने जगभरातले विडीयो दिसू लागले, पण तरी तुम्ही काही स्मरणातून जात नाही. तुमची पात्र, व्यक्तिचित्र आहे तशी लोकांना आवडतात म्हणूनच तुम्ही अजरामर आहात. पुढचं काही माहित नाही (मराठी आडनाव लावणारी , इंग्लिश medium वाली “mamma बघ ती cat. इट्स cute ना??” असं मराठी बोलणारी पिढी कितपत मराठी जगवेल जरा शंका आहेच तरीही)

आता तुम्ही म्हणाल “कसलं रे, मी काही ग्रेट नाही. माझा काही पुतळा वगेरे कधी बनलाच तर त्याखाली लिहा ‘या माणसाने आम्हाला हसवले बस्स !!” वाक्यात आम्ही थोडा बदल मात्र करू – “ या माणसाने आम्हाला हसायला शिकवले आणि जगायलाही..!” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही आमच्या मातीत जन्म घेतलात याबद्दल कायम ऋणी,

तुमचे सर्व मराठी चाहते !!

अभिषेक काळे

Friday, November 9, 2018

पु. ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)

"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ नोव्हेंबरपासून त्यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे. त्यानिमित्तानं पुलंच्या आठवणी जागवत आहेत त्यांचे मेहुणे - सुनीताबाई देशपांडे यांचे धाकट बंधू - सर्वोत्तम ठाकूर. पुलंचा तब्बल 50 वर्षांचा सहवास ठाकूर यांना लाभला. या काळातल्या काही निवडक आठवणींना त्यांनी दिलेला हा उजाळा...

पुलंची आणि माझी पहिली भेट झाली ती त्यांच्या लग्नातच. त्यांच्या लग्नाचाही वेगळाच किस्सा आहे. पुढं पुलंची सहधर्मचारिणी झालेली सुनीता ठाकूर अर्थात सुनीताबाई ही माझी थोरली बहीण. आम्ही तिला माई म्हणत असू. - माईशी पुलंचं लग्न ठरलं त्या वेळी नाटकांत नुकतच काम करायला लागले होते. एवढे प्रसिद्धीला आलेले नव्हते. लेखक म्हणूनही त्यांचा तेवढा नावलौकिक त्या वेळी झालेला नव्हता. पुलं आणि माई यांनी लग्न अगदी साधेपणानं केलं. समारंभ करायचा नाही, असं त्यांचं आणि माईचं ठरलंच होतं. कोणताही आहेर त्यांनी घेतला नाही. नोंदणी पद्धतीनं हे लग्न झालं. त्या वेळी पुलं आमच्या कोकणातल्या - रत्नागिरीतल्या - घरी पहिल्यांदाच आले होते. ता. 13 जून ही लग्नाची तारीख ठरली होती. वडील काही कामानिमित्त आदल्या दिवशी कचेरीत गेले होते. त्या वेळी त्यांनी त्यांच्या मित्रांना "तुम्ही उद्या येणार आहात ना रजिस्टरवर सह्या करायला?' असं विचारलं. तेव्हा ते मित्र म्हणाले ः ""उद्याची कशाला वाट बघायची? आत्ताच येतो!'' मग ही मित्रमंडळी घरी आली.

वडील म्हणाले ः ""लग्नसमारंभ आजच उरकून घेऊ या.'' पुलंना या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. अत्यंत साध्या म्हणजे घरच्याच कपड्यांत पुलं आणि माई यांचं लग्न, ठरलेल्या तारखेच्या आदल्या दिवशी - म्हणजे 13 जूनऐवजी 12 जूनलाच - झालं. मी 12 जूनला कामानिमित्त बाहेर गेलो होतो; त्यामुळे लग्नाला उपस्थित नव्हतो. त्या दिवशी संध्याकाळी मी घरी आलो तर तोपर्यंत पुलं आणि माई यांचं लग्न लागूनही गेलं होतं! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वडिलांनी आमच्या घरातल्या हॉलमध्ये गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. 25-30 लोकांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. "पुलंना या कार्यक्रमात गायला लावायचं,' असं वडिलांनी ठरवलं होतं. मात्र, पुलंना याची पूर्वकल्पना त्यांनी दिलेली नव्हती. मैफल जमली तेव्हा पुलंनी वडिलांना विचारलं ""गाणं कोण गाणार आहे?'' तेव्हा वडील म्हणाले ः ""तुम्हीच...!'' स्वतःच्या लग्नात स्वतःच गाणं म्हणणारे पुलं हे बहुदा पहिलेच असावेत! पुलंनी एक पैसा वा वस्तू आहेर म्हणून आमच्याकडून घेतली नाही. रजिस्टरचा सरकारी कागद त्या वेळी माईनं स्वतःच आठ आण्यांना आणला होता. केवळ आठ आण्यांच्या खर्चात पुलं-माई यांचं लग्न पार पडलं. पुलं आणि माई लग्नानंतर मुंबईला निघाले तेव्हा आम्ही आमच्याजवळचा ग्रामोफोन त्यांना भेट दिला होता.

***

आम्ही सगळे नंतर पुलंना भाई म्हणू लागलो. एकदा सहज मी त्यांना म्हटलं ः ""भाई, तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला पाहिजे.'' त्यावर भाई लगेच म्हणाले ः ""अरे, मी नाही रे... माझ्यापेक्षा कुसुमाग्रज मोठे साहित्यिक आहेत. ज्ञानपीठाचे मानकरी ते व्हायला हवेत.'' त्या काळी भाईंच्या व्यक्तिमत्त्वानं आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेलं होतं. स्वतः उत्तम साहित्यिक असूनही भाईंनी दुसऱ्या साहित्यिकासाठी हे कौतुकोद्गार काढले होते. एखादा साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाचं कौतुक अपवादानंच करताना आढळतो; पण भाईंचा स्वभाव तसा नव्हता. ""कुसुमाग्रज माझ्यापेक्षा ग्रेट आहेत,'' असं भाई म्हणाले. तो प्रामाणिकपणा भाईंकडं होता. चांगल्याला चांगलं म्हणणं आणि स्वतः ग्रेट असूनही त्याचा मोठेपणा न मिरवता इतर जण आपल्यापेक्षाही मोठे आहेत, हे ओळखून त्यांचा आदर-सन्मान करणं हे भाईंच्या स्वभावाचं वेगळेपण होतं.

***

-मला तब्बल 50 वर्षं त्यांचा सहवास लाभला. या प्रदीर्घ सहवासात मला त्यांची काही वैशिष्ट्यं जाणवली, ती अशी ः वेळेबाबत काटेकोरपणा, खाण्याविषयीच्या विशिष्ट आवडी-निवडी नसणं, कुणाबद्दलही वाईट न बोलणं, कुणाचाही द्वेष न करणं...
कार्यक्रम कुठलाही असो, तो ठरलेल्या वेळेवरच सुरू होईल याची दक्षता ते अगदी काटेकोरपणे घेत असत. "आज जेवायला हेच पाहिजे अन्‌ असंच पाहिजे', असा त्यांचा हट्ट कधीच नसायचा. अमुकतमुक पदार्थाविषयी ते आग्रही नसायचे. जे काही ताटात वाढलं जायचं त्याचा ते आनंदानं स्वाद घेत जेवायचे. मासे ही त्यांची विशेष आवड होती. कुणाविषयीही ते कधी वाईट बोलले आहेत वा त्यांनी कुणाचा द्वेष केला आहे, असं मला त्यांच्या प्रदीर्घ सहवासात कधीच आढळून आलं नाही. पुलंना एखाद्या व्यक्तीमध्ये काही वेगळेपणा (स्पार्क) दिसला की त्या व्यक्तीला पुढं आणल्याशिवाय ते राहत नसत. भाईंनी असं अनेकांचं जीवन घडवलं आहे. पुढच्या काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं "वस्त्रहरण' हे गंगाराम गवाणकर लिखित नाटक सुरवातीला चालत नव्हतं. त्यामुळं "शेवटचा एक प्रयोग करून थांबायचं', असं त्या मंडळींनी ठरवलं होतं. भाईंनी तो प्रयोग पाहिला आणि त्यांना ते नाटक अतिशय आवडलं. त्या नाटकासंबंधी त्यांनी पत्र लिहिलं. त्यानंतर "वस्त्रहरण' लोकांना एवढं आवडलं, की त्याचे प्रयोगांवर प्रयोग होत राहिले आणि त्या नाटकानं लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.
***

भाईंना वेगवेगळ्या क्षेत्रांतले अनेक लोक भेटायला येत असत. ते कुणालाही कधीही भेटायला तयार असायचे. भेटायला येणाऱ्या व्यक्तीनं आधी वेळ घेऊन भेटायला यावं, एवढीच त्यांची माफक अपेक्षा असायची. त्यातही विचार त्या व्यक्तीच्याच हिताचा असायचा व तो असा की त्या व्यक्तीला आपल्याला पुरेपूर वेळ देता यावा. समजा, एखादी व्यक्ती वेळ न ठरवता भेटायला आली आणि त्याच वेळी आणखी कुणीतरी आधीच भेटायला आलेलं असेल तर नंतर आलेल्या त्या व्यक्तीलाही वेळ देता येत नसे आणि समोर आधीच बसलेल्या व्यक्तीशीही बोलणं नीट होत नसे. हा घोळ-घोटाळा टाळण्यासाठी "आधी वेळ घेऊन' येण्याची अपेक्षा ते बाळगायचे आणि त्याबाबतीत आग्रहीसुद्धा असायचे.
***

पुलंचं राजकारणाशी सूत कधीच जमलं नाही. पुलं नेहमीच राजकारणापासून लांब राहिले. कोणत्याही गोष्टीसाठी राजकारण्यांची मदत घेणं त्यांनी टाळलं. याबाबत एक विशेष आठवण सांगावीशी वाटते. नरसिंह राव हे पंतप्रधान असतानाची गोष्ट. तेव्हा ते पुण्यात येणार होते. "पुण्याच्या दौऱ्यात भाईंना भेटावं' असं राव यांना सुचवण्यात आलं होतं. त्यामुळे राव यांच्या सोबत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पाच-सहा अन्य मंत्री भाईंना भेटायला घरी येणार होते. अनेक कलाकार स्वतः पंतप्रधानांची भेट घेतात; पण इथं पंतप्रधानच भाईंकडं येणार होते. त्या वेळी निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या. या भेटीत आपल्यासोबत फोटो काढले जाऊन त्यांचा वापर निवडणुकांसाठी केला जाऊ शकतो, हे भाईंच्या लक्षात आलं. मग भाईंनी राव यांना पत्र लिहिलं ः "तुम्ही मला भेटायला येणार असल्याचं समजलं. मात्र, त्याच वेळी माझी मुंबईतल्या "नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस ' इथं महत्त्वाची मीटिंग आहे. ती मीटिंग रद्द होऊ शकत नाही; त्यामुळे आपली भेट होऊ शकणार नाही.' पंतप्रधान आपल्याला भेटायला आल्यास त्या भेटीचा फायदा आपल्यालाही होऊ शकतो, असा विचार भाईंनी कधीच केला नाही.
***

क्षुल्लक गोष्टींतूनही भाईंना वेगळं काहीतरी सुचायचं. एकदा ते एसटीतून प्रवास करत होते. त्या एसटीला एक म्हैस आडवी आली. या साध्याशाच प्रसंगावर त्यांनी "म्हैस' नावाची एक खुमासदार विनोदी कथा लिहिली आणि ती कमालीची लोकप्रिय झाली. पुलंची बुद्धिमत्ता विलक्षणच होती. एरवी, वयानं आणि कर्तृत्वानं मोठ्या माणसांवर व्यक्तिचित्रं लिहिली जातात; पण भाईंनी त्या वेळी दोन-तीन वर्षांच्या असलेल्या माझ्या मुलाचं - दिनेशचं - व्यक्तिचित्र लिहिलं होतं!
माझं आणि भाईंचं फार जवळचं नातं होतं. मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात शिकायला होतो आणि कॉलेजच्याच होस्टेलवर राहत होतो, तेव्हाची आठवण सांगतो. तेव्हा भाई चित्रपटात काम करत असत. पुण्याला गुप्ते यांच्या आउटहाऊसमध्ये दोन खोल्या होत्या, त्यातल्या वरच्या एका खोलीत पुलं भाड्यानं राहत असत. पुढं त्यांना काही दिवसांनी पुण्यातच नवीन फ्लॅट मिळाला. ते होस्टेलवर आले आणि मला म्हणाले ः ""मला आता चांगली जागा राहण्यासाठी मिळाली आहे, तेव्हा तू आमच्याकडंच राहायला चल.'' मी होस्टेल सोडून त्यांच्या घरी राहायला गेलो. त्या वेळी मला साहजिकच खूप बरं वाटलं. पुढच्या काळात आमचाही पुण्यात चार खोल्यांचा फ्लॅट झाला; पण आम्ही तिथं कधीच उतरायचो नाही. कारण, "पुण्याला गेलो की भाईंकडंच मुक्कामी उतरायचं', हे ठरून गेलेलं होतं. पुढं मी कामानिमित्त काही वर्षांसाठी अमेरिकेत स्थायिक झालो. एकदा भाई अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. मला भेटायला येण्यासाठी त्यांना दोन-तीन हजार मैलांचा प्रवास करावा लागणार होता. केवळ मला भेटण्यासाठी म्हणून ते तेवढा प्रदीर्घ प्रवास करून आमच्या अमेरिकेतल्या घरी येऊन गेले. त्यांच्यात आणि माझ्यात असं स्नेहाचं आणि आपुलकीचं नातं होतं.

पुढं मी अमेरिकेची नोकरी सोडून पुन्हा भारतात आलो. तेव्हा भाई ज्या इमारतीत राहायचे, त्याच इमारतीत राहायला गेलो. अमेरिकेची नोकरी सोडून आलो, याचं दुःख मला तेव्हा झालं नाही. कारण, आता भाईंच्या सहवासात राहायला मिळणार होतं, भाईंचा सहवास मिळणार होता आणि या बाबीचा आनंद त्याहूनही अधिक होता.
***

भाईंची सामाजिक बांधिलकीची जाणीव तीव्र होती आणि सक्रिय होती. त्या वेळी अपघातग्रस्तांसाठी "लीला मुळगांवकर रक्तपेढी' चालवली जात असे. त्या रक्तपेढीला 40 हजार रुपयांची गरज होती. भाईंकडं त्या वेळी पैसे नव्हते; मग त्यांनी ते 40 हजार रुपये आपल्या नाट्यप्रयोगांतून उभे करून दिले. अशा समाजकल्याणाच्या कामासाठी भाईंनी सन 1964-65 च्या दरम्यान "पु. ल. देशपांडे फाउंडेशन'ची स्थापना केली. त्या काळी नाटकाच्या तिकिटाचा सगळ्यात जास्त दर होता सात रुपये. त्या वेळी ते सात रुपयेही फार वाटायचे. कारण, सात रुपयांमध्ये महिन्याची खानावळ होत असे. परिणामी, भाईंवर तेव्ही टीका झाली होती. नाटकांमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती, कलाकार रात्र रात्र जागून लोकांचं मनोरंजन करत असते; मग तिनं का बरं हलाखीत राहावं, असं भाईंचं म्हणणं होतं. नाटकात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सुधारावी, तसंच तिला नीटनेटकं जीवन जगता यावं यासाठी भाईंनी नाटकाच्या तिकिटांचे दर जास्त ठेवले होते. भाईंनी जेवढे पैसे कमावले, त्यातला बहुतांश वाटा हा जगालाच परत दिला. भाईंनी अनेक चांगल्या, तसंच लोककल्याणाच्या कामांसाठी देणगी दिली; पण त्याविषयीची प्रसिद्धी कुठं कधी केली नाही. एका माणसानं भाईंचं नाटकातलं काम पाहून त्यांना रोलेक्‍स घड्याळ भेट दिलं होतं. ते ऑटोमॅटिक घड्याळ होतं. रोलेक्‍ससारखी महागडी घड्याळं घालून मिरवणारी मंडळी आज आपण अनेकदा पाहतो. मात्र, भाईंनी ते घड्याळ कधीच वापरलं नाही. इतके ते साधे होते. "प्रामाणिक राहा आणि स्वतःच्या गरजांपेक्षा समाजातल्या गरजवंतांच्या गरजांकडं लक्ष द्या,' ही महत्त्वाची शिकवणूक मला भाईंकडून मिळाली. तिचं पालन करण्याचा मी प्रयत्न करतो.
***

भाईंची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची स्मरणशक्ती. ती कमालीची होती. "नाच रे मोरा', "इंद्रायणी काठी' अशा अनेक गाण्यांना भाईंनी संगीत दिलं. ती गाणी खूप लोकप्रियही झाली. "इंद्रायणी काठी देवाची आळंदी' हा अभंग गाऊन पंडित भीमसेन जोशी त्यांच्या बहुतेक मैफलींची सांगता करत असत. "गुळाचा गणपती' या चित्रपटातलं "ही कुणी छेडिली तार?' हे गाण भाईंचं खूप आवडतं गाणं होतं. कलाकाराची गाण्याची मैफल संपल्यावर गाणं कसं, किती उत्तम झालं, त्यात काय काय आवडलं याविषयी भाई कौतुक करायचे. गाण्यात काय कमी होतं आणि काय चुकलं यावर ते कधीच बोलायचे नाहीत. त्या गाण्यातल्या चांगल्या बाजूविषयीच ते बोलायचे. हा त्याचा स्वभाव होता. कलाकाराच्या कमकुवत गुणांवर भाष्य करण्यापेक्षा त्याच्या चांगल्या गुणांवर भाष्य करून त्याला उत्तेजन देणं अधिक महत्त्वाचं, असं भाईंचं मत होतं. भाईंनी अशा प्रकारे अनेकानेक नवकलाकारांना प्रोत्साहित केलं आणि त्यांना पुढं आणण्यात पुढाकार घेतला.
***

"ऑल इंडिया टेलिव्हिजन'चे भाई हे प्रमुख होते; पण त्यांना कधीच कोणत्याही पदाचा मोह आणि अहंकार नव्हता. मिळणाऱ्या पदापेक्षा आपलं लेखन आणि अभिनय, नाटकांचे प्रयोग यातच त्यांनी धन्यता मानली. याबाबत कविवर्य विंदा करंदीकरांची भाईंविषयीची एक आठवण आहे. विंदांना पारितोषिक मिळालं होतं आणि त्या पारितोषिकाची रक्कम त्यांनी दान केली होती. त्या वेळी विंदांची मुलाखत घेतली गेली. "तुम्ही पुलंसारखं दान केलंत...' असं त्या मुलाखतकारानं त्या मुलाखतीदरम्यान म्हटलं. त्या वेळी विंदा त्याला म्हणाले ः ""माझी तुलना पुलंसोबत होऊ शकत नाही. मला पुरस्कार मिळाला होता, ते माझे स्वतःचे पैसे नव्हते. पुलंनी स्वतः त्रास घेऊन दुसऱ्यांना देण्यासाठी पैसे मिळवले. हे असं करणं खूप वरच्या "लेव्हल'चं आहे. मी ती "लेव्हल' गाठू शकत नाही.''
***

भाई शेवटच्या काळात आजारी होते. त्यांना अनेक शारीरिक व्याधींचा त्रास व्हायचा; पण त्यांनी आपल्या आजारपणाचा बाऊ कधीच केला नाही. त्यांना चालायला त्रास होत असे, बोलताही येत नसे. अतिशय सावकाश बोलावं लागत असे. असं असतानाही ते शेवटपर्यंत आनंदी राहिले. शेवटी शेवटी शारीरिक त्रास वाढल्यामुळं भाईंनी लोकांना भेटणं फारच कमी केलं होतं. लोकही समजून घेत त्यांना. तरीदेखील कुणी भेटायला आलं तर, भाई त्यांच्याशी बोलले नाहीत, असं कधीच झालं नाही. कुणाशीही बोलताना "मी फार मोठी व्यक्ती आहे,' असा त्यांचा आविर्भाव कधीच नसे. अगदी सर्वसामान्यांप्रमाणे ते त्या व्यक्तीशी संवाद साधत असत. शेवटच्या आजारपणातही त्यांची स्मरणशक्ती जशी तल्लख होती, तशीच त्यांची विनोदबुद्धीही तेवढीच जागृत होती. एकदा दिनेश घरी लॅपटॉप घेऊन आला. कॉम्प्युटरला मराठीत संगणक म्हणतात. "लॅपटॉपला मराठीत काय म्हणणार,' असं आमचं संभाषण सुरू होतं, तेव्हा पुलं पटकन म्हणाले ः "अंगणक!' कारण, लॅपटॉप आपण आपल्याबरोबर कुठंही घेऊन जाऊ शकतो ना...!
***

लग्नानंतर पत्नीचं नाव बदलायची प्रथा आपल्याकडं प्रचलित आहे. अलीकडं ती काहीशी कमी झाली असली तरी 50-60 वर्षांपूर्वीची स्थिती वेगळी होती. माझ्या बायकोचं नाव सुशीला होतं. तिचं नाव बदलायला नको, असं माझं मत होतं. मात्र, माझ्या मोठ्या वहिनीचंही नाव सुशीलाच होतं. त्यामुळं "एका घरात दोन सुशीला कशा चालणार?' असा प्रश्न निर्माण झाला.
मग "तुझ्या बायकोचं नाव अंजली ठेवावं,' असं भाईंनी सुचवलं. ते मला आवडलं आणि सुशीलाची अंजली झाली. ही पुलंनी मला दिलेली भेट आहे, असं मी मानतो.


सर्वोत्तम ठाकूर
रविवार, ४ नोव्हेंबर २०१८
(शब्दांकन : उत्कर्षा पाटील)
सकाळ


अमृतानंदाचा वारकरी - जयंत साळगावकर

पुलंचे सुहृद ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेला लेख पु.ल. प्रेम ब्लॉगसाठी पाठवल्याबद्दल श्री. अक्षय देसाई ह्यांचे खुप आभार.


पु. लं.ची एक खासियत अशी की, ते सर्वाना आपले आणि जवळचे वाटतात. माणूस नुसता गुणी असून चालत नाही
                         
येत्या ८ नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’.. साहित्यिक, नाटककार, चित्रपटकार, दिग्दर्शक, संगीतकार, बहुरूपी नट, वक्ते अशा नाना रूपांत आलम दुनियेस ज्ञात असलेल्या पु. ल. देशपांडे नामक खेळियाचं जन्मशताब्दी वर्ष सुरूहोत आहे. त्यानिमित्ताने पुलंचे सुहृद ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेला लेख आम्ही पुन:प्रसिद्ध करीत आहोत.

पंचवीसेक वर्ष झाली असतील. कुमार गंधर्वाचा ‘मला उमजलेले बालगंधर्व’ हा कार्यक्रम रवींद्र नाटय़मंदिरात होता. त्याची तिकिटे मी खूप आधीच काढून ठेवली होती. पण ऐनवेळी काही कारणामुळे मला त्या कार्यक्रमाला जाता आले नाही. मुलांना पाठविले. कार्यक्रम संपवून मुले घरी आली. त्यावेळी दहा-बारा वर्षांच्या असलेल्या मोठय़ा मुलाचे डोळे आनंदाने चमकत होते. तो आनंदातिशयाने मला सांगू लागला.. ‘‘आज मी पु. लं.ना हात लावला.’’ मला अर्थबोध झाला नाही. तेव्हा त्याने स्पष्टीकरण केले. त्या कार्यक्रमात पु. लं. पहिल्या रांगेत बसले होते आणि मुले दुसऱ्या रांगेत! मध्येच केव्हातरी त्याने पु. लं.ना हात लावला होता आणि आपण एव्हरेस्टच जिंकले अशा थाटात तो ते मला सांगत होता. पु. लं.च्या आणि माझ्या ऋणानुबंधांची त्याला कल्पना नव्हती. पण शाळेत आणि इतरत्र पु. लं.बद्दल बरंच काही ऐकलेलं. हा नावाचा पुरुषोत्तम खरोखरीच ‘पुरुषोत्तम’ आहे हे त्याला समजले असणार आणि त्यामुळे आपण प्रत्यक्ष पु. लं.ना हात लावला ही फार मोठी बहादुरी झाली, अशा आनंदाने चिरंजीव वावरत होते.

त्यानंतर आठवडय़ानंतर पु. लं.च्या एकपात्री ‘बटाटय़ाच्या चाळी’चा प्रयोग होता. त्या कार्यक्रमाची तिकिटे मी काढली आणि मोठय़ा मुलाला बरोबर घेऊन गेलो. मध्यंतरात पु. लं.ना भेटण्यासाठी रंगपटात जाऊ लागलो तर सुनीताबाईंनी अडवले. म्हणाल्या, ‘‘मध्यंतरात भाई कोणाला भेटत नाहीत.’’ पण बाईंचा रोष पत्करून मी आत गेलो आणि पु. लं.ना भेटलो. ते माझ्याशी अतिशय मोकळेपणाने आणि प्रेमाने बोलले. मी त्यांना ‘मला उमजलेले बालगंधर्व’ या कार्यक्रमात तुम्हाला हात लावल्याबद्दल मुलाला कसा ब्रह्मानंद झाला ते सांगितलं. पु. लं. हसले आणि त्यांनी मुलाचा गालगुच्चा घेतला. त्या क्षणी आमच्या चिरंजीवांना अस्मान ठेंगणे झाले.

पु. लं.चा निरोप घेऊन मी निघालो तेव्हा तो म्हणाला, ‘‘एवढय़ा मोठय़ा माणसाशी तुमची ओळख आहे?’’ त्यावेळी पिताजींबद्दल त्याच्या डोळ्यात जो आदराचा भाव चमकून गेला, तसा तो त्यानंतर कधीच दिसला नाही.

आपला माणूस!


जवळपास महाराष्ट्रातल्या गेल्या तीन पिढय़ा पु. लं.बद्दल हा असा आदर आणि सन्मान मनात बाळगून आहेत. पु. लं.ची एक खासियत अशी की, ते सर्वाना आपले आणि जवळचे वाटतात. माणूस नुसता गुणी असून चालत नाही, तो चारचौघांशी मिळून-मिसळून वागणारा, इतरांच्या मनात स्वत:विषयी आपुलकी निर्माण करणारा असा असावा लागतो. तात्यासाहेब शिरवाडकरांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले त्या दिवशी गोदावरीला पूर यावा तसा आनंदाचा महापूर नाशिककरांच्या उत्साहाला आला होता. नाशकातील दुकानात एक पेढय़ाचा तुकडा किंवा फुलवाल्याकडे एक फुलाची पाकळी शिल्लक राहिली नव्हती. तात्यासाहेबांच्या अंगणात जी चाहत्यांची दाटी झाली होती त्यात काही अंगठेबहाद्दरही होते. त्यांनी तात्यासाहेबांचे लेखन वाचलेही नसेल; त्यांना फक्त आपले तात्या मोठय़ा गौरवाला पात्र झाले एवढेच समजत होते आणि त्यामुळे ‘तात्यांचा गौरव तो आपला गौरव’ अशीच प्रत्येकाची भावना होती. पु. लं.च्या बाबतीतही त्यांच्या चाहत्यांची दृष्टी अशीच आहे. पु. लं. कोणाही परिचित व्यक्तीशी बोलताना त्याची इतक्या आपुलकीने आणि जवळिकीने चौकशी करतात, की हा एवढा मोठा माणूस आपला आहे, आपल्या जवळचा आहे, या भावनेने समोरचा माणूस सुखावतो. पु. लं. आपलेच आहेत असे वाटणाऱ्यांपैकी मी एक.

आजकाल बसच्या रांगेत अर्धा तास कुणी जवळजवळ उभे राहिले तरी तेवढय़ा बळावर आपली दाट मैत्री असल्याचा उल्लेख करण्याचा शिरस्ता आहे. इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये तीन तास शेजारी बसले की झालेच ‘परममित्र!’ मैत्रीच्या नात्याचे इतके ‘लोकशाहीकरण’ झालेल्या आजकालच्या दिवसांत मी पु. लं.ना मित्र म्हणताना कचरेन. कारण माझे आणि त्यांचे व्यक्तिगत संबंध या असल्या मैत्रीच्या खूप पलीकडचे आहेत. महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा मला नेहमीच एक आधार वाटत आलेला आहे. अडचणीच्या वेळी त्यांनी मला धीर दिला आहे, आधार दिला आहे. त्यांनी सहज म्हणून उच्चारलेल्या शुभेच्छा माझ्याबाबतीत वरदान ठरल्या आहेत.

पु. लं.चा आणि माझा तसा परिचय १९५२-५३ चा. ‘लोकसत्ता’कार ह. रा. महाजनींबरोबर मी पुण्याला गेलो होतो. तिथे महाजनींबरोबर डेक्कन जिमखान्यावर फिरत असताना आठ-दहा तरुणांचा घोळका समोरून आला. त्यातल्या चष्मा लावलेल्या, पांढरा शर्ट काळ्या पॅन्टमध्ये खोचलेल्या एका तरुणाने महाजनींची काहीतरी फिरकी घेतली. महाजनी रस्त्यावरच संतापले. थोडे पुढे गेल्यावर मी महाजनींना विचारले. ‘‘कोण होता तो?’’ महाजनी म्हणाले, ‘‘पु. ल. देशपांडे.’’ हे नाव मी ऐकून होतो, लिखाण थोडेफार वाचले होते, पण प्रत्यक्ष दृष्टिभेट झाली तेव्हा मी ‘लोकसत्ता’त राशिभविष्य लिहीत होतो. पु. लं. म्हणाले, ‘‘म्हापणकरासारखे लिहू नकोस, साळगावकरासारखे लिही.’’ म्हणजे नक्कल करू नका. स्वत:चा वेगळा ठसा ठेवा, असे त्यांना सांगायचे होते.

पुढे पु. लं. मुंबईत वरळीला ‘आशीर्वाद’मध्ये राहू लागले. कारणपरत्वे त्यांच्या घरी माझे येणे-जाणे वाढू लागले. दि. वि. गोखले यांनी लिहिलेल्या आणि मी प्रकाशित केलेल्या ‘माओचे लष्करी आव्हान’च्या माहितीपूर्ण आणि वजनदार पुस्तकाला पु. लं.नी फार सुंदर प्रस्तावना लिहिली.

पु. लं.ना ‘सुपारी’

‘कालनिर्णय’ सुरू झाल्यानंतर त्यात पु. लं.नी लिहावे असे वाटले. त्या काळात दिनदर्शिकेत लेख लिहिणे ही नवीच गोष्ट होती. पु. लं.ना समक्ष भेटूनच लेख लिहिण्याची विनंती करावी म्हणून मी त्यांना पुण्याला फोन लावला आणि भेटायला येत असल्याचे सांगितले. पु. लं. म्हणाले, ‘‘मी पुढल्या आठवडय़ात मुंबईत येतो आहे, तेव्हा भेटू.’’ त्यावर ‘‘मला तुम्हाला पुण्यातच भेटावयाचे आहे. एक सुपारी द्यायची आहे..’’ असे मी सांगितले.

‘‘मुंबईवाल्याची सुपारी म्हणजे मला धास्ती वाटते,’’ असे पु. लं. म्हणाले. तेव्हा मी ‘‘मग सुपारीऐवजी नारळ घेऊन येतो,’’ असे उत्तर देऊन खरोखरीच नारळ, केळी, हार असे सर्व साहित्य घेऊन पु. लं.च्या पुण्याच्या घरी गेलो. त्यांना लेख लिहिण्याबद्दल विनंती केली. पु. लं.नी विषयाची चर्चा केली आणि लिहिण्याचे मान्य केले. त्यावर सुनीताबाई मला म्हणाला, ‘‘हा ‘होय’ म्हणाला असला तरी जमेलच असे गृहीत धरून चालू नका. त्याच्यामागे व्याप खूप आहेत.’’ लेख मिळणार नाही अशा समजुतीने मी परत आलो. पण आठ दिवसांत पु. लं.चा उत्तम लेख घेऊन मधू गानू मुंबईला आले आणि त्यानंतर गेली कित्येक वर्षे पु. लं. नियमितपणे ‘कालनिर्णय’मध्ये लिहीत आले.

घरगुती पु. लं.

पु. लं. एन. सी. पी. ए.त आले आणि आमच्या गाठीभेटी वारंवार होऊ लागल्या. पु. लं. संगीतात किंवा साहित्यात रस घेताना जसे आनंदित होतात तसा भोजनाचा आस्वादही चोखंदळपणे घेतात. उत्तम जेवणाची त्यांना आवड आहे. आमच्या घरी ते जेवायला असले की सगळ्या घरातच आनंदाचे गुलाबपाणी शिंपडलेले असते. माझी बायको स्वत: मन लावून स्वयंपाक करते. पु. लं.चे बोलणे ऐकण्यासाठी मुले, सुना सगळेच उत्सुक असतात आणि नातवंडे भाईकाकांना ‘गोष्ट सांगा..’ असा आग्रह करतात. माझ्या बायकोच्या पाककौशल्याची स्तुती करणारे एक पत्र पु. लं.नी पाठवले ते पत्र आमच्या सौं.च्या दृष्टीने विजयपत्रच झाले. ते पत्र आल्यापासून ‘आमटीत मीठ कमी पडले’ किंवा ‘एखादा पदार्थ बिघडला’ असे म्हणण्याची सोय उरलेली नाही. ‘पु. ल. देशपांडे यांनी माझ्या स्वयंपाकाची स्तुती केली आहे. त्यांच्या शिफारशीपुढे तुमच्या मताची काय किंमत?’ अशा विजयी दृष्टीने आमचे कुटुंब आमच्याकडे पाहते. कोणी पाहुणा आला तर त्या पत्राची झेरॉक्स प्रत त्याला आवर्जून दाखविली जाते. पु. लं.कडून मिळणारी शाबासकी हे ईहलोकीचे एक वरदानच आहे.

पुलंचा वरदहस्त

मच्छिंद्र कांबळींच्या ‘वस्त्रहरण’ नाटकाला पु. लं.च्या प्रशंसेचा लाभ झाला आणि ते नाटक सबंध महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. बाबा आमटेंच्या कार्याकडे महाराष्ट्राचे लक्ष प्रथम वेधले गेले ते पु. लं.च्यामुळे. अनेक दलित साहित्यिकांना, किंबहुना एकूणच दलित साहित्याला प्रारंभीच्या काळात पु. लं.नी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन दिले. पु. लं.कडून शाबासकी मिळावी, त्यांनी आपले कौतुक करावे असे प्रत्येक लेखकाला, कलावंताला मनापासून वाटत असते. आणि अगदी नवोदित लेखकाशीसुद्धा पु. लं. इतके आस्थेने आणि आपुलकीने बोलतात, की त्यांचा हुरूप निश्चितपणे वाढतो.

पंधरा-वीस वर्षांपूर्वी जयवंत दळवींनी पु. लं.ना. ‘पुलस्वामी’ आणि सुनीताबाईंना ‘पुलस्वामिनी’ अशी बिरुदे बहाल केली. वेगवेगळे पीठाधीश, शंकराचार्य अशांचा उल्लेख नावाने न करता ‘श्रीचरण’ म्हणून करण्याची प्रथा आहे. पु. लं.ना फोन केल्यावर मी ‘श्रीचरणांचा विजय असो..’ असे गमतीने म्हणतो. पु. लं. केव्हातरी ‘वत्सा, तुजप्रद कल्याण असो..’ असा जुन्या नाटकातल्या ऋषीमुनींसारखा आशीर्वाद देतात. मन नाराज असते तेव्हा किंवा समोरच्या अडचणी पार करताना हैराण झालो असताना पु. लं.ची पुस्तके वाचणे हा एक ‘अक्सीर इलाज आहे असा माझा प्रदीर्घकाळचा अनुभव आहे. माझ्यापुरते म्हणाल तर ‘खोगीरभरती’ हे माझ्या अधिक आवडीचे पुस्तक.

एक वेगळे रूप

खरे म्हणजे धर्मशास्त्र आणि ज्योतिष हे माझ्या व्यासंगाचे आणि आवडीचे विषय. पु. लं. तसे रूढ अर्थाने धार्मिक नाहीत आणि ज्योतिषावर त्यांचा विश्वास नाही. तरीही त्यांच्या माझ्यातला जिव्हाळा वाढत गेला हे खरे आहे. आम्ही तासन् तास बोलत बसलो तरी त्यात ज्योतिषाविषयी एक अवाक्षर येत नाही. एकदाच मला पु. लं.नी एका विदुषीच्या विषयात विचारले होते, ‘तिच्या कुंडलीत बाराही घरांत शनीच आहे का हो?’ भविष्याची आणि भविष्य सांगणाऱ्यांची पु. लं.एवढी चेष्टा कोणीच केली नसेल. असे असले तरी पु. लं.ना ज्योतिषाची प्राथमिक माहिती तर आहेच, पण काही बारकावेही माहीत आहेत, हे त्यांच्या लिखाणातून समजून येते. पु. लं. धार्मिक नसले तरी काही विशिष्ट धार्मिक परंपरांचा त्यांना आदर आहे. ते श्रीलंकेत गेले असताना तिथल्या बुद्ध मंदिरात गेले. ‘कोलंबोतल्या बुद्ध मंदिरातली ती प्रचंड मूर्ती पाहून मस्तक नमते. तिथे मुंडी दाबायला पुजारी, बडवा कोणी लागत नाही,’ असा शालजोडीतला टोला त्यांनी दिला आहे. त्या बुद्ध मंदिरात मूर्तीच्या पायाशी पु. लं.ना साल नावाचे एक सुवासिक फूल दिसले. पुढे चार महिने पु. लं.ना तो वास प्रत्येक बुद्ध मंदिर पाहताना येत होता. पु. लं.ची प्रवासवर्णने वाचताना शब्दाशब्दातून त्यांची रसिकता व्यक्त होत असते आणि आपण त्यांच्यासोबत त्या, त्या देशात हिंडत आहोत असे वाटत राहते.

पु. लं. रूढ अर्थाने धर्मपंडित नाहीत, पण ‘जाखाईजोखाईतून ज्ञानेश्वरांसारख्यांनी अडाणी जनतेला हितोपदेशाकडे नेण्याचे कार्य जसे केले, तसे कार्य करणाऱ्या बंडखोर संतांची परंपरा निर्माण झाल्याखेरीज धर्माचे खरे स्वरूप सामान्यांना कळत नाही,’ असे धर्मविचाराचे सार सांगणारे वाक्य ते सहज लिहून जातात. पु. लं. हे गणेशाचे भक्त नसले तरी इंडोनेशियाच्या प्रवासवर्णनात ‘श्रीगजाननाची मूर्ती मला अतिशय आवडते. किंबहुना गणपतीवर लहानपणापासून मी अतिशय प्रसन्न आहे. आमच्यासारख्या स्थूलप्रकृती बैठय़ा माणसाची ही एकमेव इष्टदेवता. शिवाय लेखनकामासाठी हा आम्हाला जोडणारा दुवा आहेच..’ असे मिश्कील गणेशवर्णन आहे. पु. लं.च्या लिखाणात आढळणारा एक विशेष असा की, आपल्या जगभरच्या प्रवासातून त्यांनी उघडय़ा डोळ्यांनी सगळ्या गोष्टी नीट निरखल्या आहेत. ठिकठिकाणचे लोक जगतात कसे? वागतात कसे? त्याबरोबरच त्यांचे समाजजीवन कसे आहे? ते लक्षपूर्वक टिपले आहे. त्यामुळे विविध आचार-धर्माच्या चालीरीतींतील साम्य आणि विरोध ते सहज जाता जाता सांगून जातात. सांगताना त्यांच्या खास शैलीतली फटकेबाजी असतेच.

पूर्वी एन. सी. पी. ए.च्या गेस्ट हाऊसमध्ये जेवणाची सोय नव्हती. एके दिवशी पु. लं.चा मर्ढेकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम होता. दुपारचे जेवण आमच्या घरून गेले. ऐनवेळी कोणी पाहुणा आला तर गैरसोय नको म्हणून जेवण थोडे अधिक पाठविले होते. डबा पाहिल्यावर पु. लं. लगेच म्हणाले, ‘‘इतके जेवल्यावर मर्ढेकर कुठले? नुसता ढेकरच!’’

हजरजबाबी पुलं

पं. भीमसेन जोशी हे सवाई गंधर्वाचे शिष्य! पंडितजी नेहमी देशविदेशात विमानाने फिरतात म्हणून पु. ल. त्यांना ‘हवाई गंधर्व’ म्हणत. मुंबईचे एक धनाढय़ गृहस्थ देणगी दिल्यावर आपल्या नावाचा फार आग्रह धरतात. पु. लं.चे म्हणणे : त्यांनी लग्न करतानाही बायकोला ‘माझे नाव लावशील तरच माळ घालतो’ असे सांगितले असणार.

पु. लं.च्या निरीक्षणशक्तीची झलक त्यांच्या व्यक्तिचित्रणांत हमखास आढळते. ‘अहो, कसला गांधी? जगभर गेला, पण रत्नागिरीस फारसा आला नाही. पक्का तो! त्यास नेमके ठाऊक.. इथे त्याच्या पंच्याचं कौतुक नाही नि दांडीचंही नाही. आम्ही सगळेच पंचेवाले आणि त्याच्याहीपेक्षा उघडे! सुताबितात तथ्य नाही हो! आमचा शंभूभट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला. ब्रिटिश सरकार सोडा, पण रत्नागिरीचा गिलिगन कलेक्टरदेखील घाबरला नाही. तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं. इथे निम्मं कोकण उपाशी. नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक. आम्हास कसले?’ यात रत्नागिरीच्या माणसाच्या स्वभावाचीच नव्हे, तर भाषेचीही वैशिष्टय़े पुरेपूर उतरली आहेत. पुलं महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या बोलीभाषा सहजपणे त्या- त्या ढंगात बोलू शकतात. पु. लं. आणि ग. दि. माडगूळकर एकमेकांशी या रत्नांग्रीच्या खास मराठीत बोलत असत. या बोलीभाषांच्या ज्ञानाचा त्यांनी ‘ती फुलराणी’च्या प्रारंभीच्या प्रवेशात फार उत्तम उपयोग करून घेतला आहे. विनोदी लेखक, नाटककार, प्रसिद्धी न करता लाखो रुपयांच्या देणग्या देणारा दाता, श्रेष्ठ वक्ता, संगीतकार, नट, दिग्दर्शक इत्यादी विविध गुणांनी पु. लं. महाराष्ट्रात अजोड लोकप्रियता गाठीशी बांधून असले तरी बालपणी झालेल्या ऋग्वेदींच्या संस्कारांमुळे असेल कदाचित, पण मनाने पु. लं. तत्त्वचिंतक आहेत. त्यांचे ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक घ्या, ‘बटाटय़ाच्या चाळी’तील स्वगत पाहा किंवा कोणताही विनोदी लेख घ्या; मार्मिक आणि प्रसन्न विनोदात वाचकाला हसून ठेवीत असतानाच ते त्याला चटकन् अंतर्मुख करतात. माणसांच्या सहवासाची मनस्वी आवड असलेल्या या सरस्वती पुत्रोत्तमाला वारकऱ्यांच्या दिंडीशी आपल्या जीवनवारीचे नाते जोडावेसे वाटते. हे नाते सांगताना ते म्हणतात, ‘पंढरीच्या वारीला जाणाऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा जोडीच्या वारकऱ्यांच्या सहवासाचा मोह अधिक असतो. म्हणून तर खरे वारकरी एकमेकांना उरापोटी भेटत शेकडो मैलांची वाट तुडवीत जातात. नुसत्या विठ्ठलाचे दर्शन मोटारीतून जाऊन-येऊन मिळते.. पण मग ती वारी नव्हे. मी पूर्वेची वारी केली. ती जीवनाच्या वाटा निरनिराळ्या नादात चालणाऱ्या देशोदेशींच्या अनोळखी वारकऱ्यांना भेटावे म्हणून. आणि आनंद हाच, की माझिया जातीचे मला खूप खूप लोक भेटले.’

असे आनंद देणारे आणि घेणारे जीवनयात्री त्यांना नेहमीच भेटत राहोत. त्यांच्या संगती वाटचाल करण्याचे बळ आणि अनुकूलता त्यांना निरंतर लाभो, एवढीच प्रार्थना. 

-- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर