Wednesday, November 21, 2012

धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही - पु.ल.

भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्रमातच वावरत होते असे मला वाटते. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या देशातील हिंदूंना आणि मुसलमानांना वावडे. बरे, ज्या ख्रिस्ती लोकांशी संबंध आला, ते पाद्री धर्मप्रसारक. शाळा-कॉलेजे त्यांनीच चालवली. त्यांच्याही डोळ्यांना झापडे बांधलेली. शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमाइतकाच वैचारिक श्रमाचा तिटकारा.

बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.

 न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. आमचे देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करू या म्हणत बसले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात जातिभेद नष्ट झाल्याच्या भ्रमातच आपण सारे जण वावरत होतो. जातीय संघटनांच्या शक्तीची जाणीव, मते पदरात पाडून घ्यायला स्वातंत्र्यानंतर जेव्हा व्हायला लागली तेव्हा सेक्युलर भारताचा जयजयकार करणाऱ्या नेत्यांची गाळण उडाली. लाखातला एखादा अपवाद वगळला तर उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यत सारे काही जात, धर्म, पंथ यांच्या दुराभिमानाला जागवतच चालत असत. मग निवडणूक-प्रचाराचे नारळ तुळजाभवानीपुढे फुटतात, दर्ग्यावर चादर चढते, देवळावर कळस चढतात. तान्ही पोरे दुधावाचून तडफडत असली तरी दगडी पुतळ्यावर शेकडो दुधाच्या घागरी उपड्या होतात. आपल्या देशात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान, ख्रिश्चन, बुध्द, जैन, शीख- सगळ्यांची अस्मिता जात आणि पंथाधिष्ठितच आहे. एखाद्या राजकीय किंवा भाषिक चळवळीच्या प्रसंगी किंवा चीन-पाकिस्तानसारख्या युध्दाच्या प्रसंगी माणसे एकत्र आल्यासारखी वाटतात; पण लगेच पुन्हा आपापल्या जातीच्या कळपात जातात. मुसलमानांतले शिया आणि सुनी, आगाखानी, कटियारी, मोमीन, खोजे, बोहरी वगैरे लोकही एकमेकांपासून विधर्मीयांइतकेच दूर आहेत. केरळातले सिरीयन ख्रिस्ती आणि मंगळूरचे कॅथॉलिक किंवा महाराष्ट्रातले प्रोटेस्टंट किंवा मेथॉडिक यांच्यात वैमनस्याच्या भिंती उभ्या आहेत. गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव आहेत. आहिंसा परमो धर्म मानणाऱ्या श्वेतांबर आणि दिगंबर पंथांच्या जैनांच्या देवाच्या अलीकडील घटना तुम्हाला ठाऊक असतीलच.
 मनुष्यस्वभावात हा जा नावाचा व्हायरस इतका घट्टपणे कसा रोवून घेऊन बसतो हे एक विलक्षण कोडे आहे.

  आर्थिक अभ्युदयाबरोबर जातीच्या प्रश्नांची तीव्रता कमी होईल असे वाटले होते. कामगार-चळवळीला जोर आल्यावर सारे कामगार यापुढे ‘कामगार’ हीच जात मानतील, असाही विश्वास होता. पण तेही खरे ठरले नाही. त्या चळवळीच्या नेत्यांचे पितळ कामगार-चळवळीच्या प्रारंभीच्या काळात सूत-गिरण्यांतल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या कामगारांना दूर ठेवण्यापासूनच उघडे पडले होते. खुद्द कम्युनिस्ट देशांतही पुन्हा एकदा राष्ट्रवादाने जोर धरल्यासारखे दिसते. रशियन कामगार आणि चिनी कामगार आता एकमेकांचे वैरी झालेले दिसताहेत. ज्या चीनमध्ये माओचे रेड बुक म्हणजे रोज सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ होता आणि ‘माओच्छिष्ठम् जगत् सर्वम्’ अशी परिस्थिती होती, तिथे इतिहासातून माओचे नाव पुसून टाकायचा चंग बांधलेला दिसतो आहे. अरब राष्ट्रांकडे पहावे तर अंधश्रद्धा, रूढी, धर्म-दुराभिमान ही मध्ययुगीन भुते थैमान घालताना दिसताहेत. खोमिनीच्या राज्यात बायका पुन्हा एकदा घरातल्या अंधारात कोठड्यात गेल्या. ही भुते उतरवण्याऐवजी त्यांचे सामर्थ्य वाढीला लावण्यात येत असलेले दिसत आहे.

 आपल्या देशात पुरोगामी विचारांचा झेंडा मिरवणाऱ्या साम्यवाद्यांनी तर बुद्धिप्रामाण्य वाढीला लावण्यासाठी किंवा एकूणच समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडसी पाऊल टाकलेले नाही. कम्युनिस्ट युनियनचे सभासद असलेले मुंबईतले गिरणी-कामगार एकीकडून क्रांतीचा जयजयकार करतात आणि दुसरीकडून देवीला कोंबडा मारून नवस फेडतात. आपल्या देशात एकाच काळात आदिमानव-युगापासून apple-युगापर्यत सारे काही एकदम नांदत असते. त्या वेळी तुम्ही कशालाही भारतीय संस्कृती म्हणू शकता! फक्त ही वास्तवापासून अधिक दूर असेल तितकी अधिक भारतीय. जयप्रकाशजींचे नवनिर्माण-आंदोलन प्रचंड जोराने करणाऱ्या गुजरातेत राखीव जागाविरोधी आंदोलनही तितक्याच तीव्रतेने होऊन हजारो दलिनांना उध्द्वस्त करण्यात येते. मराठवाड्याची अस्मिता विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या बाबतीत इतकी जागी होती, की शेकडो दलितांना आपल्या झोपड्या भस्मसात होताना पाहाव्या लागतात. कसले प्रबोधन, कसले फुले आणि कसले काय?

 एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.

 आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.

 विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील. मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील. धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.

 पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे.

 संजय गांधीला बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो.
 त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही. अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात.

 कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे. पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे. माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही. ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो अाहे. वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते. ‘Justice is Simply the interest of the Stronger’.

 मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’ ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते.


(’एक शुन्य मी’ या पुस्तकातुन)

Thursday, November 8, 2012

भारतीय अशी रंगभूमी आहे काय?

पु.ल. देशपांडे यांनी वेळोवेळी केलेल्या विविध विषयांवरील भाषणांचं संकलन ' पाचामुखी ' या नावाने आज  ' परचुरे प्रकाशन ' तर्फे प्रकाशित होत आहे. याच पुस्तकातील भारतीय रंगभूमीवर भाष्य करणारा पुलंचा लेख... 
' भारतीय रंगभूमी ' नावाचं काही वैशिष्ट्यपूर्ण रसायन आहे का ? किंवा ' भारतीय रंगभूमी ' म्हणून एखादी रंगभूमी निर्माण करता येईल काय ? याचा शोध गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चालू आहे. तीन वर्षांपूर्वी संगीत नाटक अकादमीनी दिल्लीत ' लोककला-लोकनाट्य किंवा पारंपरिक नाट्य यांचा आजच्या आधुनिक रंगभूमीशी काय संबंध आहे ?' याविषयी एक परिसंवाद आयोजित केला होता. काही वर्षांपूर्वी रंगभूमीविषयी बोलताना ब्रेख्त , इब्सेन , आयनेस्को या पाश्चात्त्यांची नावं घेऊन बोलायचं , असं जवळजवळ ठरून गेलं होतं , परंतु या परिसंवादात कुठल्याही युरोपीय नाटककाराचा उल्लेख झाला नाही. मी हे राष्ट्रीय अहंकारानी बोलत नाही. या परिसंवादात भाग घेतलेला प्रत्येक जण तोंडाला रंग लावून नाटकात काम करणारा होता. या परिसंवादातून असं एक लक्षात आलं की , लोककला किंवा पारंपरिक नाट्य , ज्याला आपण folk form म्हणतो , त्यातली पुष्कळशी शक्ती आपण दुर्लक्षितच केलेली आहे. हे सर्व फॉर्म्स आहेत तरी काय , याचा विचार करण्यासाठी अलीकडेच बंगळुरूला नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला होता.

बंगळुरूच्या भारतीय नाट्य संघानी संगीत नाटक अकादमीच्या सहकार्यानी हा महोत्सव साजरा केला. या महोत्सवात अव्यावसायिकांचे आणि व्यावसायिकांचे परिसंवादही झाले. कानडी रंगभूमीवरच्या बऱ्याचशा नाटक कंपन्या तालुक्याच्या गावाला , खेडोपाडी प्रयोग करणाऱ्या आहेत. ही माणसं शहरात जाऊन चर्चेत भाग घ्यायला बुजतात , पण या परिसंवादात आधीच ' तुमचे प्रश्न मोकळेपणाने , निःसंकोचपणे मांडा ' असा दिलासा दिल्यामुळे प्रत्येक जण आवेशाने आणि पोटतिडकीने बोलत होता.

मास्टर हिरण्णा यांच्या ' लंचावतार ' या फार्सचा प्रयोग पाहिला. हे तमाशासारखं नाटक. आपल्याकडच्या ' विच्छे ' सारखंच याचं थोडंफार स्वरूप. तत्कालीन दिवसांत घडलेल्या राजकीय घटनांवर रोज संध्याकाळी मार्मिक उपहासात्मक भाष्य , असं त्याचं स्वरूप. हे नाटक बंद पाडण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले , पण ते चालूच राहिलं. त्या नाटकामुळे या प्रकाराकडे शहरातल्या नाट्यरसिकांचं लक्ष वेधलं गेलं. याच काळात गिरीश कर्नाड आपली चांगली नोकरी सोडून ' यक्षगान ' चा अभ्यास करू लागले. ज्या खेड्यात या नाट्यविषयाचा उगम आहे , तिथे राहून , अभ्यास करून पुढे त्यांनी ' हयवदन ' लिहिलं. त्यांनी ' यक्षगान ' चं जे कानडीकरण केलं , त्यातली ताकद मराठी रूपांतरात आली नाही. ती केवळ कोरडी नक्कल होती. या सुमारास आपल्याकडच्या अनेक लेखकांचं लक्ष या folk forms कडे गेलं. याच सुमारास महाराष्ट्रात बादल सरकार आलं होतं. त्यांना मी बरेच तमाशे वगैरे दाखवले. लोकनाट्याचा हा प्रकार पाहून एखाद्या मराठी माणसानं हिरिरीनी तमाशाचा पुरस्कार करावा तसं ते म्हणाले , ' नवी नाटकं लिहिण्यासाठी मला तमाशातल्या शक्तीचा निश्चितपणे खूप उपयोग होईल! ' आंध्रमधल्या लोकांचं ' विथीनाटकम् ' म्हणजे street plays आहेत. यांत इतकी शक्ती आहे की , रंगपीठाचा अभाव असतानाही या नाटकाचा प्रयोग फार सुंदर होतो. उत्तर प्रदेशातल्या ' रामलीले ' चा तर प्रेक्षकांवर इतका प्रभाव पडतो आणि प्रेक्षक त्या प्रयोगाशी इतके समरस होऊन जातात की ; राम , लक्ष्मण आणि सीता वनवासाला जाण्याच्या प्रसंगाच्या वेळी सारे जण शरयू नदीच्या तीरापर्यंत त्यांना पोहोचवायला जातात. ' छाऊ ' हा कलाप्रकार पाहताना तर मी त्यातल्या एका कलावंताच्या आंगिक अभिनयातल्या कौशल्यानी भारावून गेलो. प्रयोग संपल्यानंतर त्याला मी भेटलो तेव्हा कळलं की , दिवसभर सायकलरिक्षा चालवणारा हा माणूस रात्री ह्या नाटकात काम करतो! तेव्हा साहजिकच मी त्याला विचारलं , ' दिवसभर सायकलरिक्षा चालवून दमूनभागून आल्यानंतर या प्रयोगात काम करायला उत्साह कसा राहतो ?' तेव्हा तो म्हणाला , ' यहाँसे शक्ती मिलती है! '

बदलत्या परिस्थितीमध्ये एका विशिष्ट परंपरेत चालत आलेले हे जे सर्व folk forms आहेत , हे कसे टिकणार आहेत ? त्यांचं नुसतं पुनरुज्जीवन करून भारतीय रंगभूमी निर्माण होणार आहे का ? त्यातून नेमका असा कुठला धागा आहे की ज्या धाग्याचा रंग आपल्याला सगळीकडे सापडतो , म्हणून त्याला भारतीय रंगभूमी म्हणावं ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ' भारतीय रंगभूमी ' असा शब्द वापरताना माझ्या मनात अनेक शंका येतात. मात्र हे सगळं पाहताना मला कुठेतरी मांडणीतलं साधर्म्य आढळतं. त्यातला आशयाचा भाग बाजूला ठेवून अभिव्यक्तीच्या बाबतीत तर मी सांगू शकेन की , सबंध भारतभर जे बरेचसे नाट्यप्रकार आहेत , त्यांच्यामध्ये विलक्षण साधर्म्य आहे. हे साधर्म्य कुठपर्यंत आहे , तर काश्मिरातल्या श्रीनगरच्या लोकांचं लोकनाट्य मी एकदा पाहिलं. पाहतो , तर त्यातल्या सूत्रधाराचा वेष आपल्या कोकणातल्या दशावतारातल्या खेळीयातल्या सूत्रधारासारखाच! संस्कृत नाटकातला सूत्रधार अनेक तऱ्हांची कामं करणारा असतो. सगळीकडे हा असलाच प्रकार दिसला. हा सूत्रधार आपलं स्वतःचं सूत्रधाराचं काम करताकरता नाटकातलं पात्र बनून बोलतो. दक्षिणेकडे आणि ओरिसा वगैरे भागांत खूपच विविधता दिसून येते. आपल्याकडे त्या मानाने विविधता कमीच! अभिनय किंवा नाटक किती तऱ्हांनी लोकांपर्यंत पोहोचवता येतं , त्याच्यासाठी कायकाय माध्यमं वापरायची ; अशा अनेक बाबतींत त्या भागातल्या लोकांनी खूपच प्रगती केलेली आहे. कधी शब्दांतून , कधी गीतांतून , कधी शब्द आणि गीत यांच्या एकत्रीकरणातून , तर कधी अभिनय आणि नृत्य यांच्या एकत्रीकरणातून नाट्य आकाराला येतं ; तर कधी मूकनाट्य हा रूपबंध स्वीकारून एकीकडे स्वगत आणि दुसरीकडे मूकाभिनय साकारला जातो. काही ठिकाणी नाटकातला अभिनय आणि नृत्यातला अभिनय यांच्या सीमारेषेवरील अभिनय सादर केला जातो ; तर काही ठिकाणी संपूर्णपणे नाटकातला अभिनय किंवा संपूर्णपणे नृत्यातला अभिनयही सादर केला जातो. या भागांत सादरीकरणाचे इतके विविध प्रकार सापडतात की , ह्या प्रकारांकडे दुर्लक्ष करणं पाप ठरेल. हे एवढं मोठं धन आहे ; आणि आत्तापर्यंत आपलं लक्ष त्यातल्या सामर्थ्याकडे गेलं नव्हतं! आपण आत्तापर्यंत जे बघत होतो , ते कौतुकानी आणि patronization च्या दृष्टीनी. पूर्वी जर कधी यातल्या कलावंतांना भेटलो , तर आम्ही त्यांचं नुसतं कौतुक करत असू. आता , ' हे असं केलंत , ते कसं केलंत , ते पुन्हा करून दाखवा आम्हांला ' असं सांगतो. आत्ता नाट्यक्षेत्रात सुदैवानी चांगलं वातावरण निर्माण झालं आहे.

साध्या अभिनयाकडून नृत्यातल्या अभिनयाकडे जाणारा आणि ज्याच्यामध्ये अभिनयाची अगदी परमावधी गाठली आहे असा folk form म्हणजे ' कथाकली '. या कथाकलीचं असामान्य दर्शन आम्हांला बंगळुरूमध्ये घडलं. गायन आणि अभिनय यांचा सांधा तिथे साधला गेला. त्या कलावंतांचं शिक्षण परंपरेनी चाललेलं होतं. पण ज्यांनी सगळ्या जगातील रंगभूमी पाहून येऊन तिचा अभ्यास केलेला आहे असे लोक त्या शिक्षणामध्ये आल्यावर त्यांनी कथाकलीतील सौंदर्य आणखी वाढवलं. कथाकली हा नृत्यनाट्यप्रकार तसा मल्याळम गीतांचा. पण सध्या कथाकलीचा एक नवा प्रयोग चालला आहे. कथाकलीसाठी हिंदी भाषेत गीतरचना केल्या जात आहेत. हिंदी चिजांना आणि हिंदी गीतांना कर्नाटकी संगीताची जोड दिली , तर अगदी काहीतरीच वाटेल , असं आपल्याला वाटतं. हे अगदी चूक आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की , तंजावरच्या राजांनी लिहिलेल्या मराठी गाण्यांना कर्नाटकी चाली होत्या. या गाण्यांमध्ये हे संगीत अभिनयाशी इतकं एकरूप झालेलं आहे की , त्यातल्या सुरावटींच्या , त्यातल्या लयकारींच्या आणि संगीताच्या अनुरोधाने गेल्याबरोबर त्या अभिनयाला फार उत्तम साथ मिळते. त्या गीतांपैकी ऐंशी टक्के गीतं संस्कृतच आहेत. रंगभूमीवरील नाट्यसंगीताचं - ते कसं आदर्श असावं याचं उदाहरण मला त्या कथाकलीच्या गायनात सापडलं. त्या गायकाचं नाव हैदरअली - त्याचे संस्कृत उच्चार अगदी शुद्ध आणि सुरेल आहेत. त्यामुळे कथाकलीमध्ये गायनाला किती महत्त्व आहे , हे मला कळलं.

या सगळ्या folk forms मधून , त्यांच्यातल्या सामर्थ्यातून , त्यांच्या वैशिष्ट्यांमधून आधुनिक रंगभूमीला पुष्कळ देणगी मिळेल. कारण त्यांचे विषय जरी रामायण-महाभारत आदी ग्रंथांतले असले , तरी तो form च इतका तेजस्वी आहे की , वाटेल तो आधुनिक विषय त्याच्यात येणं फारसं कठीण आहे , असं मला वाटत नाही. अर्थात form कुठला स्वीकारावा , हे पुष्कळ वेळा तो विषयच लेखकाला आतून सांगत असतो. मला असं वाटतं की , तुमच्या मनात जर उर्मी आली , तर या देशात पन्नास-साठ असे चांगले forms आहेत की , जे आपल्याकडे आणता येतील. त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. या प्रयत्नांतून जी रंगभूमी निर्माण होईल , तिला खऱ्या अर्थानी ' भारतीय रंगभूमी ' म्हणता येईल!
-- पु.ल. देशपांडे


रविवार ४ नोव्हेंबर २०१२
महाराष्ट्र टाईम्स

एक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून

प्रिय पु.ल.,
द्वारा देवबाप्पा

१२ जूनचा तो अशुभ दिवस. दुपारी एक बावीसला आपली प्राणज्योत मालवली. उभा महाराष्ट्र पोरका झाला.
८ नोव्हेंबर १९७९ रोजी आपला साठावा वाढदिवस होता. या शुभदिनी 'रुपाली' ला स्नेहजत्रेचे रूप आले होते.

'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे' या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे आपण उदंड धन जमा केले व जे लोक तळमळीने व स्वच्छ हातानी चांगली कामे करतात अशांना आपण मुक्त हस्ताने देणग्या दिल्या.

दानात समाधान मानणाऱ्या आपल्या लोभस व्यक्तीमत्वाबद्दल काय लिहिणार ?

१३ जून २००० पासून वर्तमानपत्रांनी आपली स्तुती केली. ' माणसातला साहित्यिक ', 'साहित्यीकातला माणूस', 'असा शब्दगंधर्व न होणे' ,' पुरुषोत्तमाय नम:' असे अनेक कार्यक्रम आकाशवाणीने प्रसारित केले.
आपल्या भाषणाच्या,एकपात्री- बहुरूपी प्रयोगांच्या ध्वनिफिती तसेच पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर विक्री होऊन रसिकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला.

एकदा इंदूर येथील एका भाषणातून आपण विनयाने म्हणाला होता , " आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी निघाली कि माझे अंत:करण भरून येते. असे वाटते, आमच्यानंतर आमची पुस्तके दुरदुरच्या गावी शेकडो मैल मिरवायची गोष्ट सोडा, पण कोणी वाचनालयातून घरापर्यंत तरी नेईल का ? " आपल्या विनयशील भाषणाची आठवण दूर ठेवून आपणास वरील घटना कळवली आहे.

आपण प्रकृतीच्या कारणास्तव " मालतीमाधव" मध्ये राहायला आलात. परंतु आपल्याच शब्दात सांगायचे झाल्यास १२ जून ला आपण ' देवबाप्पा' कडे कुणालाही न सांगता निघून गेलात. आपण ' गणगोत' मध्ये 'रावसाहेब' या व्यक्तिचित्रणाचा समारोप करताना लिहिले," देवाने आमची लहानशी जीवने समृद्ध करायला दिलेल्या ह्या मोलाच्या देणग्या न मागता दिल्या होत्या,त्या न सांगता परत नेल्या."

आता 'मुक्तांगण','रुपाली' येथे नेमाने भरत असलेल्या बैठकी, मैफिली होणे नाही, मैफिलचा बादशाहाच निघून गेला आहे. आपल्या आधीच मैफिलीचा चांद रसिकाग्रणी रामुभैया, सिद्धहस्त कवी ग.दि. मा.,गानसम्राट वसंतराव देशपांडे , कुमार गंधर्व असे कितीतरी दिग्गज मैफिल सोडून गेले आहेत.
आपली बालमैत्रीण जोस्त्ना भोळे आपली वाट पाहत आहे. ती म्हणते आहे, ' परतुनी ये घरा.... ! '

आपले नम्र,
रसिक चाहते.
प्रणव उंडे
https://www.facebook.com/pranavaunde

Tuesday, November 6, 2012

परफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..

जगभरातील मराठी माणसांचे लाडके पु. ल. देशपांडे ऊर्फ भाईंची ८ नोव्हेंबर रोजी जयंती. त्यानिमित्त येत्या गुरुवारी परचुरे प्रकाशनतर्फे ‘पाचामुखी..’ हे पुलंचे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. यात आहेत पुलंची काही गाजलेली भाषणे आणि त्यांच्या मुलाखती. त्यातील नामवंत समीक्षक प्रा. स. शि. भावे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश..
भावे : या पु. ल., नमस्कार!
पु. ल. : नमस्कार!

भावे : लेखन, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, प्रयोगनिर्मिती अशा पंचशरांनी आणि गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही अंगांनी मराठी मनाला विंधणारा असा हा पुरुषोत्तम ऊर्फ पी.एल., ऊर्फ पु.ल., ऊर्फ भाई, ऊर्फ डॉ. पु. ल. देशपांडे, ऊर्फ पी. एल. साहेब आज इथे आलेले आहेत. तर श्रोते मंडळी, आपल्या सर्वाच्या साक्षीने, आपल्या सर्वाच्या उपस्थितीत त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. हे काम आवडतं आहे आणि अवघडही! आवडतं अशासाठी की, पु. लं.शी गप्पा मारणं हा कोणत्याही वेळी प्रसन्न करणारा अनुभव असतो. अवघड अशासाठी की, पु.लं.चा कलाविष्कार आणि आत्माविष्कार लोकांना इतका माहीत झालेला आहे की, नवं काय विचारावं असा प्रश्न कोणालाही पडावा. तुमच्या अफाट कर्तृत्वाच्या एकेका अंगावर एकेक संवाद व्हायला हवा आहे. असो. तर या उदंड कालविश्वाच्या पसाऱ्यात आता एक पहिला प्रश्न :
 इतकी र्वष इतक्या निर्मितीत तुम्ही रमलात. यातली कोणती कला तुम्हाला सर्वात आवडते?

पु. ल. : हा तसा फार कठीण प्रश्न आहे आणि तुम्ही अगोदर केलेल्या स्तुतीमुळे मी अशा चमत्कारिक रीतीने संकोचून गेलो आहे की, आता त्या सबंध गुणवर्णनाला मी योग्य वाटावं ही एक नवी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. तरीसुद्धा सांगतो. या ज्या निरनिराळ्या कला आहेत, त्या कलांत मला सर्वात कुठली आवडत असेल, तर.. आपलं मन जर एक खोली आहे असं मानलं, तर जास्तीत जास्त जागा कोणी व्यापली असेल म्हणाल, तर ती संगीतानी! संगीत हे माझं पहिलं प्रेम आहे. फर्स्ट लव्ह आहे. पण..

भावे : पण असं दिसतं की, लेखनामध्ये, तुमच्या इतर बहुरंगी प्रयोगांमध्ये संगीताला तसं दुय्यम स्थान राहिलं आहे.

पु. ल. : नाही, दुय्यम स्थान राहिलेलं नाही. संगीताच्या क्षेत्रात निर्मिती करणारा एक मनुष्य म्हणून माझी योग्यता काय आहे, हे मला कदाचित लवकर कळलं असलं पाहिजे. असं काहीतरी झालं असणार. म्हणजे हा एक प्रकारचा डिफिडन्स म्हणायचा किंवा स्वत:चं एक योग्य मूल्यमापन म्हणा. काहीही म्हणा! या संगीताच्या क्षेत्रात वावरताना मी त्याचा अभ्यासही केलेला आहे. किंबहुना थोडीफार निर्मितीही केलेली आहे आणि ‘लोकप्रियता’ हा जर निकष असेल, तर ती निश्चित यशस्वी झालेली आहे, असंही म्हणायला हरकत नाही; पण हे सगळं करताना ‘आपण जिथे पोचायला पाहिजे तिथे पोचू शकत नाही’ याची जाणीव देणारे फार मोठे संस्कार माझ्यावर झाले.

भावे : कुणामुळे?

पु.ल. : मी फार अप्रतिम अशी गाणी ऐकली, अप्रतिम असं वाजवणं ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर साहजिकच असं वाटायचं की, इथे कुठे आपल्याला पोचता येईल? म्हणजे असं आहे की, एव्हरेस्ट चढून गेलेल्या माणसाकडे पाहिल्यानंतर आपण कुठपर्यंत चढू शकू याचा आपल्याला एक अंदाज येतो. मी हजारो वेळा म्हटलं आहे की, मी जेव्हा बालगंधर्वासारखा कलावंत ऐकला, जेव्हा कुमार ऐकले, मल्लिकार्जुन मन्सूरांसारखा तपस्वी कलावंत ऐकला, बेगम अख्तर ऐकल्या, माझ्याबरोबरच वाढलेले वसंतराव देशपांडे ऐकले; तेव्हा वाटलं की, तिथे पोचण्याइतकं सामर्थ्य परमेश्वरानं माझ्या पंखांत दिलेलं नाही. हे माझ्या लक्षात आलं आणि माझी उडी जिथपर्यंत जाईल, तिथपर्यंत जे काही करायचं ते मी केलं. अर्थात, Not failure but low aim is crime असं काही लोक म्हणत असतील, परंतु मला असं काही वाटत नाही.  Whether my aim low or high is for somebody else to decide. मला तर ते ’६ वगैरे वाटलं नाही. माझी ताकद इतकीच आहे, असं वाटलं.


भावे : हे मला चांगलं वाटलं. कारण इतकी वर्ष तुम्ही आमच्या डोळ्यांसमोर लेखकाप्रमाणेच एक परफॉर्मर म्हणूनही आहात.

पु.ल. : परफॉर्मर हीच माझी भूमिका आहे. म्हणजे ‘परफॉर्मर’हा फार मोठा शब्द आहे. तमाशा परिषदेमध्ये मी अध्यक्ष म्हणून भाषण केल्यानंतर जी बाई आभाराला उभी राहिली, ती म्हणाली, ‘यांनी भाषण वगैरे केलं, ठीक झालं. पण इथे, या बोर्डावर लावणी म्हटल्याशिवाय काही खरं नाही. कारण पु. ल. देशपांडे हे कोणी विद्वान वगैरे असतील, आम्हाला नाही माहिती. ते खरे आमच्यासारखे तमासगीरच आहेत!’ तमाशा इज अ शो आणि तो मी खूप लहानपणापासून करत आलो आहे.

भावे : यातून मला एक वेगळा प्रश्न सुचतो. तो थोडा समीक्षकासारखा वाटेल. तुमचा समीक्षकांवर जरा राग आहे, म्हणून जरा संकोचाने विचारतो. ते असं की, तुमच्या सगळ्या परफॉर्मन्समध्ये क्वचित दिसणारी अशी लवचीकतेची जाणीव मला दिसते. ती संगीतामुळे आली असेल; पण तुमचं भाषण पाहा, तुमचं लेखन पाहा, त्याच्यामध्ये अनियंत्रितता आणि लयबद्धता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असतात.

पु.ल. : तुम्ही आत्ता जे विधान केलंत ना, असं यापूर्वी पाच-सहा लोकांनी म्हटलं आहे. एका गृहस्थांनी सांगितलं, ‘तुमचं भाषण ऐकताना, तुमचं वाक्य ऐकताना आम्ही मुक्तच्छंदातली वाक्यं ऐकतो आहोत, असं वाटतं.’ मीसुद्धा विचार करायला लागलो. मग एकदा मला एकाएकी साक्षात्कार झाला की, लहानपणी माझा खरा आदर्श कीर्तनकार होता!

भावे : बरं!

पु.ल. : लहानपणी मी कीर्तनं फार ऐकली. पार्ल्याला खूप कीर्तनं होत असत आणि कीर्तनं ऐकायला मी मुंबईतही जात असे. कीर्तन ऐकायला मला भारी आवडायचं आणि म्हणून माझ्यामध्ये तो एक कीर्तनकार राहिलेला आहे. म्हणजे माझ्या लिखाणातला दोष कोणता? आत्ता मी जेव्हा माझी पुस्तकं वाचतो, तेव्हा त्यात पाल्हाळ आहे असं जाणवतं, पण जे पाल्हाळ आहे, ते कीर्तनकारी पाल्हाळ आहे. विषयाला सोडून जातोय असं दाखवीपर्यंत पुन्हा एकदम मूळ पदाकडे जायचं. कथा आणायची असते, पण सांगताना मात्र अशा रीतीने सांगायचं की, गद्य आणि पद्य यांच्या सीमारेषेवरचं गद्य असलं पाहिजे. अशा रीतीने सांगितलं की, ते जास्त चांगलं होतं, व्यवस्थित होतं. हे मी मुद्दाम करतोय असं नाही. हा संस्कार झाल्यामुळे मी ते करायला लागलो.

भावे : मराठीत असे छान बोलते लेखक कोण आहेत, असं तुम्हाला वाटतं?

पु.ल. : पुष्कळ आहेत. म्हणजे लिखित मराठी हे मला कधी आवडलंच नाही. कारण मी साध्या संस्कृतीत वाढलेला मनुष्य आहे. कुठल्याही तऱ्हेची कृत्रिमता आली की ती मला नकोशी वाटते.

भावे : एक गंभीर शब्द वापरू का? तुम्ही लोकपरंपरेतले आहात का?

पु.ल. : लोकपरंपरेतला म्हणा. त्यामुळे बोलत्या भाषेत लिहिणारे लेखक मला जवळचे वाटतात. त्यांच्यामध्ये.. चटकन आठवलं म्हणून सांगतो, व्यंकटेश माडगूळकर! व्यंकटेशचं पुस्तक घेतल्यानंतर प्रत्येक पानातून तो ही गोष्ट मला सांगतो आहे, असं वाटतं. तसेच आपल्यातले एक मोठे लेखक की यांच्यामुळे मी अगदी हैराण होऊन जातो. ते म्हणजे माटे- श्री. म. माटे! माटय़ांचं वाङ्मय वाचायला लागलं की माटे माझ्या कानात गोष्ट सांगताहेत, हे माझं फीलिंग कधीही सुटलेलं नाही. ‘मास्तराचं त्यातल्या त्यात चांगलं डगडगीत होतं!’ अशी त्यांची वाक्यं ऐकली, वाचली की इतकं बरं वाटतं! माटय़ांचा आणि माझा परिचय होता. मी त्यांचा विद्यार्थी नव्हतो. ‘जे  बोलणं होतं तेच कागदावर उतरवलं जायचं!’ असं ते म्हणायचे. विवेकानंदांनीही एकदा म्हटलं आहे, ‘लेखी निराळी का करता? मनामध्ये बोललेलं हाताच्या वाटे शाईतून उतरत असताना तुम्हाला त्याची निराळी भाषा करायची काय गरज आहे?’ विवेकानंदांचं बंगाली काय सुंदर आहे, म्हणून सांगू! मी वाचलंय, म्हणून तुम्हाला सांगतो आहे. त्यांच्या भाषांतरात त्यातला एक शतांशसुद्धा नाही. ती ताकद आणि तो खळखळाट-  अशी ती बोली भाषा त्यांच्या लिखाणात आहे.

भावे : हे तुम्ही फार चांगलं सांगितलंत. आत्ता तुम्ही पाल्हाळ हा जो तुमचा दोष सांगितलात तो दोष वाटत नाही. कंटाळा आला, तर पाल्हाळाचा दोष! आणि असं की, अमुक एका व्यवसायाच्या चाकोरीत तुम्ही बांधून घेतलेलं नाही आणि मग पहिलं प्रमोशन, दुसरं प्रमोशन, मग बढती असं कुठेच नाही. तसा हौशीपणा तुमच्यात पहिल्यापासून आहे का?

पु. ल. : रेडिओची नोकरी सोडल्यापासून  मी नोकरी वगैरे केलीच नाही. त्याच्यापूर्वी थोडय़ा-थोडय़ा केल्या होत्या; प्राध्यापकाची वगैरे. मला तर असं वाटतं की, माझ्या सगळ्या जीवनाचं जर काही सार काढायचं असेल तर एकाच गोष्टीचं काढलं पाहिजे की, मी अतिशय हौशी मनुष्य आहे. प्रत्येक गोष्टीत मी हौशी आहे. आय एम अँटी रुटीन. मला "सर्वे जन्तु रुटिना" असं मर्ढेकरांनी म्हंटले असेल तर त्यातला मी मात्र जंतू होऊ शकलो नाही. ह्याचं कारण म्हणजे मी माझ्या आयुष्याकडे मागे बघताना मला नेहमी असं वाटतं की इंग्रजीत सांगतो म्हणून रागवू नका. माय लाईफ हॅज बीन लॉंग हॉलिडे. माझं आयुष्य ही एक सुट्टीच आहे. आणि तसंच मला जगता आलं की जसं रविवारी माणसं जगतात ना तसं मी सातही वारी माझं आयुष्य जगत आलेलो आहे.

भावे :
तुम्हाला तुमचे टीकाकार ‘मध्यमवर्गीय’ मानतात.

पु. ल. : मी आहेच मध्यमवर्गीय. माणसाचं वर्गीकरण करायचं असेल तर त्या वर्गीकरणात मी मध्यमवर्गीय! माझ्या नसानसांत कारकुनाचंच रक्त आहे.

भावे : तुम्ही कधी कारकुनी केली आहे का?

पु. ल. : केली. ती ऑफिसला काळिमा लागावा इतकी वाईट केली. मला आमचे हेड क्लार्क सांगायचे, ‘तू कुठेतरी नाटकात जा, नाचकाम कर, तिकडे विनोदी काम कर. यू विल ड्रॉ क्राऊड्स अ‍ॅण्ड वेल्थ टूगेदर.’ पण मध्यमवर्गीय म्हणजे काय, ते मला कळत नाही. मला जी मूल्यं आवडतात त्यांना वर्गाचं कुठलं लेबल मी लावूच शकत नाही. मी कसं लावू? मला तुम्ही सांगा, मी देवळात जात नाही. तशा अर्थाने मी नास्तिक आहे. माझा नमस्कार स्वीकारण्याचं कुठल्या देवाच्या नशिबात नाही; परंतु एखादं सुंदर भजन असेल तर ते मला आकर्षित करतं, जवळ ओढतं, हे मी नाकारू कशाला? मी लहानपणी मध्यमवर्गीय कुटुंबात झालेल्या समारंभांत भाग घेतला आहे. एक उदाहरण सांगतो. माझ्या बहिणीची मंगळागौर झाली. त्या देवीची पूजा करणं चांगलं की वाईट ते माहीत नाही. मी त्या वादात शिरू इच्छित नाही. त्या वेळचा घरातला जो हास्यकल्लोळ होता, जे वातावरण होतं, जॉय होता, आनंद होता तो नव्हताच, असं म्हणू का मी? त्याने मला आनंद दिलाच नाही, असं म्हणू का?

भावे : हा बेहिशेबीपणा आणखी एका वैशिष्टय़ात दिसतो. असं बाहेर आलं आहे की, तुम्ही लाखा-लाखांनी देणग्या दिल्या आहेत. हा काही मध्यमवर्गीयपणा नाही. त्या लाखाच्या देणग्या जाऊ देत, पण तुमच्या दोन देणग्या माझ्या मनात घर करून राहिल्या आहेत. एक ‘मुक्तांगण’साठी दिलेली देणगी आणि दुसरी फर्गसन कॉलेजच्या साहित्य सहकारच्या आठवणीत माधव आचवलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘किमया’साठी दिलेली देणगी! मला ती कलात्मक निर्मितीच वाटते. तुम्ही त्याच्याविषयी थोडं सांगा.

पु. ल. : त्याच्याविषयी बोलायला मला फार संकोच वाटतो. त्याच्यामागचा खरा हेतू काय, तो सांगतो तुम्हाला. समाज गंभीरपणे कुठल्या तरी कार्याला लागला आहे, हे दृश्य माझ्या डोळ्यांपुढे येऊच शकत नाही. माझ्या डोळ्यांपुढे रांगेत जाणारी माणसं येत नाहीत. माझ्या डोळ्यांपुढे येतात ती जत्रेत हिंडणारी माणसं, आनंदात असणारी माणसं! ती माझी सुंदर समाज पाहण्याची कल्पना आहे आणि म्हणून मला नेहमी वाटतं की, शंभर मुलं हसताना बघायला मिळाली पाहिजेत. चार तरुण जमलेले असतील तर त्यातल्या एकानं काही चित्रं काढलेलं असावं. बाकीचे तरुण ते पाहत असावेत. एक तरुण गात असला तर बाकीच्या तरुणांनी त्याचं गाणं ऐकावं. कविता वाचत असताना एक तरुण आणि एक तरुणी यांनी एकत्रितपणे जोरजोरात हसावं; हे  वातावरण पाहिजे. ‘मुक्तांगण’मध्ये ते वातावरण व्हावं म्हणून मी तिकडे पैसे दिले. बाबा आमटय़ांच्या इथे जे अंध-अपंग आहेत, त्यांना तिथे आनंदाचा प्रत्यय यावा म्हणून तिथे पैसे दिले. ‘किमया’च्या मागेसुद्धा माझी हीच कल्पना आहे की, मुलांनी इकडे जा, तिकडे हिंड असं करण्यापेक्षा त्यांना एकत्र बसण्याकरिता जागा करून देऊ आणि ‘साहित्य सहकार’ ही जी फर्गसन कॉलेजमधली संस्था आहे, त्यात मीही असल्यामुळे माझ्यावर शिक्षकांचा नसेल इतका संस्कार त्या ‘साहित्य सहकार’चा आहे. त्या काळात, हल्लीच्या काळाप्रमाणे अमुक ‘चळवळ’ असे शब्द वापरात नव्हते. त्यामुळे ‘साहित्यप्रकार चळवळ’ असं काही नव्हतं. ‘साहित्य सहकार’ म्हणजे काय की, समान आवड असलेली आम्ही मुलं आणि मुली एकत्र जमत होतो. जोगांसारखे एक आदर्श गुरू आमच्याबरोबर बसलेले आहेत की, ज्यांचा गुरू म्हणून धाक वाटला नाही; परंतु त्यांच्याबद्दल एकप्रकारचा आदर वाटे.

भावे : हा जो तुमचा सगळा हौशीपणा आहे, तुम्ही जी प्रोफेशनलशिप नाकारलीत यामध्ये सुनीताबाईंची भूमिका काय होती? मी प्रश्न गंभीरपणे विचारला आहे.

पु. ल. : मी तुम्हाला गंभीरपणेच उत्तर देतो. मी तुम्हाला एक सांगतो, ज्या वेळेला मी- ‘मी’ असं म्हणून काही बोलतो ना, ते ‘आम्ही’ असंच समजा.

भावे : मी असं विचारतो की, तुम्ही हौसेनं जो बहुरूपीपणाचा मुखवटा चढविला आहे, त्यातले रंग आम्हाला संगा ना!

पु. ल. : मी सांगू का, मुखवटा काढून टाकता येतो, पण मला वाटतं, मला तो जन्मजात चिकटला आहे. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या म्हणा किंवा अष्टपैलू म्हणा, काहीही म्हणा! तुमची माझ्याबद्दलची जी भावना असेल त्याप्रमाणे शब्द येईल. हे ज्यांना चांगलं वाटत नाही, ते म्हणतील याला जमत नाही.

भावे : काही काहीजण म्हणतात, जे जे विनोदी असतं ते ते थिल्लर असतं. ते श्रेष्ठ होणं शक्य नाही. तुमच्या लेखनात तर मला असं दिसतंय की, त्यात मूलभूत जीवनाची जाणीव आहे..

पु. ल. : माझं लेखन विनोदी आहे की नाही, यावरून मला श्रेष्ठत्व मिळेल किंवा नाही, असं मला वाटत नाही. एखाद्या माणसाला सभोवतालच्या जीवनाविषयी किती प्रेम असतं, त्या बाबतीत त्याची इन्टेन्सिटी किती, हे महत्त्वाचं! मी नेहमी म्हणतो की, विनोदी लेखक विसंगती दाखवतो, याचं कारण त्याला सुसंगतीची ओढ असते. ती लयबद्धता असते. ताल चुकला, तर मनुष्य हास्यास्पद होतो. विनोदातसुद्धा एक लयबद्धता असतेच. उलट नाटकाच्या संवादांत ती विलक्षण आहे. तिथे तुमचं भांडण सारखं काळाशीच चाललेलं असतं.

भावे : तुम्ही कविता करीत नसलात, तरीही आत्ता तुम्ही कविताच केलीत. मी असं म्हणेन, तुम्ही या सर्व प्रकारची निरनिराळी भव्य शिखरं काबीज केली आहेत, पण आत्ता असं एखादं शिखर राहिलंय का की, जे काबीज करावं अशी ओढ तुमच्या मनाला लागली आहे?


पु. ल. :
मी शिखरं काबीज केली आहेत की नाही, मला माहीत नाही. मी शिखरं हा शब्द वापरत नाही, पण चांगल्या ठिकाणी जाऊन पोहोचलो आहे, एवढं मीसुद्धा सांगतो. मोठा विनय दाखविण्याचं काही कारणच नाही; पण काही काही खंती मनात असतातच. तिथे पोहोचायला पाहिजे आपण. तुम्ही एक पाहिलंय का? रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं आहे, ‘माझी अवस्था द्रौपदीसारखी आहे. मला पाच नवरे आहेत, पण तरीही कर्ण दिसला की प्रेम निर्माण होतं!’ तसा या सगळ्या कलांचा मला मोह आहे, पण माझी भूमिका अशी आहे की, मी उद्या कोणाचं गाणं ऐकलं, गाणं अप्रतिम झालं, तर ‘मला त्याच्यासारखं गाता यायला हवं होतं,’ असं वाटण्याऐवजी ‘त्याचं गाणं मला ऐकायला मिळालं,’ या आनंदातच मी असतो. हे मला कळतं, यात अहंकार असेल, पण मी या आनंदात असतो की, कुमार गंधर्व ऐकू शकण्याची क्षमता माझ्यात आहे. लिखाणाचं क्षेत्र असं आहे की, मला वाटतं, मी विनोदी क्षेत्रामध्ये मोठय़ा सहजतेनं वावरतो. संगीत करताना माझ्या मनामध्ये बुकबुक असते; अभिनय करतानाही थोडी असेल, पण लिहायला बसल्यानंतर बुकबुक वगैरे काही नसते.

रविवार ४ नोव्हेंबर २०१२
लोकसत्ता

ही मुलाखत इथे ऐका.