Tuesday, June 28, 2022

संवेदनशील आणि कर्तबगार सुनीताबाई - गोविंद तळवलकर

सुनीताबाई देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व करारी आणि संवेदनशीलही. आथिर्क व्यवहार असोत, मुदिते तपासणे असो वा कुणासाठी मदतीचा हात पुढे करणे असो, त्यात त्यांचा काटेकोरपणा दिसून येई आणि संवेदनशीलताही..

प्रथम पु. ल. आणि आता सुनीताबाई. दोघांच्या निधनामुळे जवळपास ४० वर्षांचा संबंध संपुष्टात आला आणि त्याचबरोबर या काळातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. तसे पाहिले तर दोघांचीही व्यक्तित्व स्वतंत्र होती, पण दोघेही परस्परांवर किती अवलंबून होते, हे सतत जाणवत होते.
           
काही वेळा कृतक रागाने सुनीताबाई म्हणत, भाईमुळे आपल्याला आपले काही करता वा लिहिता-वाचता येत नाही; पण त्या पु.लं.शी इतक्या समरस झालेल्या होत्या की, त्यांच्या नंतरच्या काळात त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्या, त्यांच्या संबंधीचा आथिर्क व्यवहार इत्यादी कामात सुनीताबाई बराच काळ व्यग्र राहिल्या. नाहीतरी पु. ल. असतानाही लिखाण तयार झाल्यावर त्याच्या शुद्धलेखनाची तपासणी, प्रती तयार करणे आणि प्रकाशकाकडे हस्तलिखित देऊन मुदिते आली की, ती अनेकवार तपासणे ही जबाबदारी सुनीताबाईच आवडीने पार पाडीत असत.

मुदितांबाबत त्या नेहमीच कटाक्ष बाळगीत. यामुळेच कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' या संग्रहाच्या आवृत्तीत चुका आढळल्यावर त्यांनी दुरुस्त्या करून तात्यासाहेबांकडे पाठवल्या. इतके करूनही नव्या आवृत्तीत चुका राहिल्याच.

वेळ मिळाल्यावर त्यांनी पु.लं.च्या नंतर काही लिखाण केले, पण त्यातलेही काही दोघांच्या सहजीवनासंबंधी बरेच होते. पु.ल. व सुनीताबाई यांच्या स्वभावातही अंतर होते. पु.लं.ना सहसा कोणाला दुखवायचे नसे. यामुळे काही वेळा गोंधळ होई आणि तो निस्तरण्याचे काम सुनीताबाईंवर पडे आणि वाईटपणाच्या त्या धनी होत. पु.ल. यांच्या लिखाणावर सर्व संस्कार करण्याप्रमाणेच नाटकांच्या व एकपात्री प्रयोगांची सर्व व्यवस्था सुनीताबाई सांभाळत होत्या. काटेकोरपणा आणि व्यवस्थितपणा हा त्यांच्यापाशी जन्मजातच होता. यामुळे भाषणाचा कार्यक्रम ठरवण्यास कोणी आल्यास त्याची पूर्वपरीक्षा होत असे. पण यामुळे कार्यक्रमात कसलाही व्यत्यय येत नसे. याच त्यांच्या वृत्तीमुळे पु. ल. देशपांडे फौंडेशनतफेर् देणग्या देण्यासाठी निवड करण्यात त्यांचा बराच वेळ जाई.

आता तो काळ संपला...

'पु.ल.' फौंडेशनच्या संबंधातील प्राप्तिकराच्या संबंधात सुनीताबाईंना काही प्रश्न होते. कोणत्या रीतीने कायदा मोडला जाता कामा नये, पण नोकरशहांमुळे नियमांचा भलताच अर्थ लावला जाऊ नये, असे त्यांना वाटू लागले. मग पालखीवालांचा सल्ला घेण्याचे ठरले. पु.ल. व सुनीताबाईंनी हा विषय माझ्याकडे काढला, तेव्हा पालखीवालांशी माझे स्नेहाचे संबंध असल्यामुळे मी भेट ठरवली. आम्ही तिघे गेलो. प्रश्न काय आहे, हे सुनीताबाईंनी स्पष्ट केले व शंका सांगितल्या. पालखीवाला जेव्हा कोणतीही गोष्ट कमालीच्या एकाग्रतेने ऐकत व विचार करत तेव्हा वातानुकूलित दालनातही त्यांच्या कपाळावर घाम जमत असे. तसे झाले आणि सात-आठ मिनिटांत त्यांनी सुनीताबाईंचा विचार पूर्णत: बरोबर ठरवला. ते त्यांना म्हणाले की, तुम्ही चांगल्या वकील झाल्या असता.

पु. ल. व सुनीताबाई काही ध्येयवादामुळे भाऊसाहेब हिरे यांच्या मालेगावमधील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते आणि त्या आश्रमाचे व्यवस्थापन सुनीताबाई सांभाळत. एकदा महाराष्ट्रातील काही प्रमुख गांधीवादी तिथे राहायला आले असता, आयत्या वेळी त्यापैकी काहींनी गाईचे दूध व त्या दुधाचेच दही हवे, अशी मागणी केली. आयत्या वेळी हे जमणे शक्य नव्हते. तेव्हा सुनीताबाईंनी त्यांना नुसते गाईचे दूध नाही, असे सांगितले नाही, तर तुमचा जर इतका कडक नियम आहे तर गाईचे दूध मिळू शकते की नाही, याची आधी चौकशी करायची होती. तुमचे नियम इतरांना त्रासदायक होऊ शकतात, याचा विचार करायला हवा होता, असे खडसावले.

याच सुनीताबाई मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, कवी बोरकर, कुमार गंधर्व इत्यादींचा अतिशय आपुलकीने पाहुणचार करताना मी पाहिले आहे. मन्सूर यांचे सोवळेओवळे असे. तेही त्या कटाक्षाने सांभाळत. काव्यात रमणाऱ्या सुनीताबाई सुग्रण होत्या. त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला आणि ते दोघेही आमच्या घरी येत तेव्हा सौ. शकुंतलाच्या पदार्थांचे कौतुक करून आस्वाद घेत. मित्रपरिवारातील कोणी आजारी पडल्यास नुसती चौकशी करून न थांबता शक्य ती मदत करण्यास सुनीताबाई चुकत नसत. भाषाशास्त्रज्ञ डॉ. कालेलकर यांच्या अखेरच्या आजारात सुनीताबाईच सर्व पाहत होत्या.

अरुण लिमये हे कॅन्सरने आजारी झाले तेव्हा प्रथम अमेरिकेतून औषध आणण्याची कल्पना सुनीताबाईंची व कुमुद मेहता यांची. त्या काळात परकी चलनावर बरीच नियंत्रणे होती आणि सरकारी परवाना लागत असे. त्या दोघी माझ्याकडे आल्या आणि आम्ही तिघांनी बरीच खटपट करून औषध आणण्यात यश मिळवले. नंतर लिमये यांना उपचारासाठी परदेशी पाठवण्याच्या कामी सुनीताबाई व कुमुद मेहता यांचा पुढाकार होता.

पु. ल. यांचे एकपात्री प्रयोग व पुस्तकांची विक्रमी विक्री हे पर्व सुरू होण्यापूवीर् पु.ल. दिल्लीत आकाशवाणी खात्यातफेर् नुकत्याच सुरू झालेल्या टीव्ही विभागात काम करत होते. त्या काळात राजधानीत मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा संकल्प सुटला; पण संकल्प व सिद्धी यात पैसा या परमेश्वराची इच्छा उभी असते. संकल्प करणाऱ्यांनी याचा विचार केला नव्हता. हे पाहून पु. ल. व सुनीताबाई यांनी एक कार्यक्रम केला आणि प्राथमिक खर्चाची सोय करून दिली.

काव्य, ललित साहित्य यांची उत्तम जाण असलेल्या सुनीताबाईंना खगोलशास्त्राचे आकर्षण होते. यासंबंधी त्यांनी काही वाचन केले होते. या आवडीमुळे त्यांनी नारळीकरांच्या संस्थेला मदत केली. कवितेच्या आवडीतूनच पु. ल. व सुनीताबाई यांनी काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. प्रवासातही कवितांची उजळणी होत असे. यामुळे त्यांच्याबरोबरचा प्रवास आनंददायक होत असे.

चाळीसएक वर्षांच्या सहवासात आमचे अनेक सुखसंवाद झाले आणि काही वेळा वादही झाले; पण वाद मित्रत्वाचे व निकोप वृत्तीचे होते. तो काळ आता संपला.

गोविंद तळवलकर
अमेरिका
महाराष्ट्र टाईम्स 
१०-११-२००९

Sunday, June 26, 2022

फ्रेंच माणूस पदार्थ आधी डोळ्यांनी खातो.. - अपूर्वाई

फ्रेंच माणूस पदार्थ आधी डोळ्यांनी खातो आणि मग जिभेने ! काही मोठ्या होटेलांतून तर 'ट्राउट' सारखे मासे आधी आपल्याला जिवंत आणून दाखविले जातात, मग आपल्या पसंतीला उतरल्यानंतर परमेश्वराचा तो प्रथमवतार अन्नब्रम्ह होऊन येतो.आणि मग तो वेटर असा काही तलवारीच्या पात्यासारखा लपकत ती बशी आपल्यापुढे ठेवतो की, निम्मी भूक तिथेच भागावी. तशात तुमच्या बरोबर तुमची 'ही' असावी. (लग्नाची की बिनलग्नाची हा बुरसट प्रश्न इथे संभवत नाही.) मग तिच्यापुढे त्या माशाची बशी आणून तो प्रथम नुसतीच दाखवील. खमंग लोण्यात नहालेला त्या बशीतला काळसर रंगाचा तो अख्खा मासा, त्यावर पिवळ्या लिंबाच्या चकत्या, चिरलेली हिरवीगार पार्स्ली.

ही सारी सजावट पाहून 'ती' प्रसन झालेली दिसली की तिने मनात दिलेले धन्यवाद अत्यंत नम्रतेने स्वीकारून ती बशी तो तिच्या पुढ्यातून उचलून शेजारच्या टेबलावर ठेवील. मग काटा आणि सुरी यांचा त्या बशीत चाललेला नाच आपण पाहतो न पाहतो तोच क्षणार्धात त्या माशाच्या पोटातील काटा त्याने बाहेर काढलेला दिसेल. धुतल्यासारखा स्वच्छ आणि पुन्हा कुठेही न मोडता. इथे तुमचे आश्चर्य शिगेला पोचलेले असेल; आणि 'हि'च्यापुढे पूर्ववत माशाची बशी ठेवून दुसऱ्या एखाद्या रिकाम्या बशीतून तो काटा घेऊन तो वेटर तसाच लपकत निघून जाईल. तिच्यापुढे ठेवलेला आता तो बिनकाट्याचा मासा आणि तुमच्या पुढ्यातला तो काट्यासकटचा मासा यांत सकृद्दर्शनी तरी काहीच फरक नाही, हे लक्षात येताच आपण पूर्ण थिजून जातो. काटा काढावा तर हा असा!

दिडमूढ होऊन पुढ्यातल्या बश्यांकडे आपण काही वेळ नुसतेच पाहत बसतो. विशेषतः केवळ कर्तव्यबुद्धीने स्वागतापुरते तोळाभर स्मित करणाऱ्या, प्रत्यक्ष खाद्यपदार्थापेक्षा त्यांच्या उपकरणांनाच अधिक महत्त्व देणाऱ्या, टेबल मॅनर्समधे तुमची जराशी चूक झाली तरी ती कटाक्षाने तुमच्या नजरेला आणून देणाऱ्या आणि जेवण संपताच तुम्ही कधी उठता याची वाट पाहणाऱ्या इंग्लिश वेटर्सच्या देशातून तुम्ही फ्रेंच वेटर्सच्या देशात आला असाल, तर त्यांच्या तत्परतेने, वाकवाकून केलेल्या स्वागताने, अधिक स्वादिष्ट आणि सुंदर फ्रेंच जेवणाच्या दर्शनाने आणि त्याहून म्हणजे त्या वेटर्सच्या साऱ्या नृत्यमय हालचालींनी तुम्ही असे काही विरघळून जाता की, मग जेवताना भूक नाहीशी होते आणि उरतो फक्त आस्वाद !

- पु.ल. देशपांडे
(अपूर्वाई)

पूर्ण मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Saturday, June 18, 2022

माझे वडील माझे चांगले मित्र म्हणूनच मला आठवतात.

वडील माणसांविषयी लहानांना सर्वात अधिक प्रेम वाटते ते त्यांना ह्या वडिलांनी दिलेल्या आनंददायक आठवणींमुळे. मुलांच्या नैसर्गिक आवडीची जोपासना करणाऱ्या बापाविषयी मनात विलक्षण प्रेम असते. अशा वडिलांची आठवण वृद्धापकाळीदेखील डोळ्यांत पाणी आणते.

मी ह्या बाबतीत स्वत:ला खरोखरीच भाग्यवान समजतो. लहानपणापासून मला संगीताची वाचनाची आणि नाटकाची आवड होती. परीक्षा तोंडावर आली असतानादेखील मी शाळकरी वयात गाण्याच्या बैठकींना जात असे. वडिलांना चोरून जावे लागले नाही. चांगले गाणे ऐकून मी अधिक आनंदित होऊन येईन याची वडिलांना खात्री होती. रात्री बुवा काय गायले ते येऊन मी वडिलांना सांगत असे. त्यावर आमचे बोलणे व्हायचे. गावात मंजीखां, मास्टर कृष्णराव, संवा्ईगंधर्व, वझेबुवा ह्यांच्यासारख्यांचे गाणे असताना रात्री मन अभ्यासाच्या पुस्तकात रमणार नाही आणि न रमलेल्या मनाने अभ्यास होत नसतो, हे त्यांना पक्के ठाऊक होते. मला पोहायला शिकायचेय म्हटल्यावर त्यांनी मला स्वत: विहिरीत ढकलून मागून उडी मारली होती. अशा डायरेक्ट मेथडने मी पोहायला शिकलो. मला माझे वडील आठवतात ते जीवनात चांगले साहित्य, संगीत, नाट्य अशा गोष्टींची गोडी लावणारे मित्र म्हणून, आमचे साधे, बेताच्या कारकुनी उत्पन्नात जगणारे कुटुंब. पण रोज संध्याकाळी मित्रमंडळींचा गपांचा अड्डा जमावा तसा आम्हा भावंडांचा, आईवडील, मामा, आजोबा, आजी यांचा अड्डा जमायचा. गाणे-बजावणे व्हायचे, चर्चा व्हायच्या, 'कविता-कथांचे वाचन व्हायचे. वडील मंडळींचा धाकदपटशा, मुलांची मारहाण वगैरे प्रकार मला आठवतच नाहीत.

माझे आजोबादेखील माझ्या पेटीतल्या सर्व सुरांशी फटकून असणाऱ्या स्वत:च्या स्वतंत्र सुरात तुकोबाचा अभंग किंवा पंतांच्या आर्या ऐकवत. मामा मा. दीनानाथ आपलाच शागीर्द आहे अशा थाटात 'परवशंतापाश दैवें', चंद्रिका ही जणूं' वगैरे ठेवून देत. ह्या वातावरणात पैशाच्या श्रोमंतीतून मिळणाऱ्या गोष्टींची आम्हां मुलांना कधी आठवणच झाली नाही. मी आयुष्यातली पहिली चप्पल मॅट्रिकच्या वर्गात गेल्यावर घेतली होती आणि चामड्याची पहिली बुटाची जोडी वयाच्या चाळिशीला आल्यावर, विलायतेला जायला निघालो तेव्हा विकत घेतली होती. त्या जोडीला अजूनही नवा जोडीदार भेटलेला नाही. माझ्या वर्गात तर चप्पल घालून शाळेत येणारी मुले पायाच्या बोटांवर मोजण्याइतकीच होती. अनवाणीपणाचे दुःखच नव्हते. आम्हाला आनंद पुरवण्याचे काम घरातल्या म्हाताऱ्या मंडळींचे होते. आणि ज्या ज्या कुटुंबातली वृद्ध माणसे हे काम करतात ते आपले वार्धक्य आनंदाने साजरे करत असतात. मला पी. वाय. सी. जिमखान्याच्या दगडी कुंपणापाशी भरदुपारी छत्री घेऊन नातवाची क्रिकेट मॅच पाहायला उभे असलेले आजोबा त्या खेळापेक्षाही अधिक प्रेक्षणीय वाटतात.

पु. ल. देशपांडे
(छान पिकत जाणारे म्हातारपण - एक शुन्य मी)

संपूर्ण पुस्तक खालील लिंकवर मिळेल 


Tuesday, June 14, 2022

पु॰ ल॰ — दोन अपरिचित आठवणी - प्रकाश चांदे

भविष्यावर प्रत्येकाचा आपल्याला आलेल्या अनुभवानुसार विश्वास असतो॰ आता इतक्या वर्षांनंतर मात्र या बाबतीत बहुतेक लोक टोकाची भूमिका घेतात असे वाटते॰ ते शास्त्र नसून Behavirol Science आहे असे वाटते॰ काही ठोकताळे बांधता येतात; पण गणित अथवा अन्य शास्त्रांप्रमाणे सूत्रांत बांधणारे शास्त्र नाही असे वाटते॰

या बाबतीत प्रसिद्ध लेखक बाळ सामंत यांनी त्यांच्या ‘ मैफल ‘ या पुस्तकात दिलेली आठवण उद्बोधक आहे॰ १९४८-४९ च्या सुमारास गिरगावात केनेडी ब्रिजजवळ चित्रकार दीनानाथ दलाल यांचा स्टुडिओ होता॰ दलाल हे नामवंत चित्रकार, पुस्तकांची वेष्टणे रेखाटण्यात वाकबगार आणि ‘ दीपावली ‘ या मासिकाचे संपादक॰ त्यामुळे त्यांच्याकडे जो वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांचा राबता असायचा त्यांत साहित्यिकही असायचे॰ त्यांच्याकडे जमणार्‍यांत केशवराव भोळे, अनंत काणेकर यांच्यासारख्या ज्येष्ठांपासून पंचविशीतील बाळ सामंत,पु॰ ल॰ देशपांडे यांच्यापर्यंत सर्वजण असायचे॰ एक दिवस एक चेहेर्‍यावरून भविष्य सांगणारा कानडी ज्योतिषी तेथे आला॰ त्याला कन्नड आणि मोडके तोडके इंग्लिश या भाषा येत होत्या॰ भविष्य म्हटल्यावर कितीही त्यावर विश्वास न ठेवणारा असला तरी तो स्वत:चे वा अन्य माणसाचे भविष्य जाणून घेण्यास उत्सुक असतोच॰ थोड्यावेळाने पी॰ एल॰ तेथे आले॰ ते समाजवादी॰ भविष्य वगैरे गोष्टींची चेष्टा करणारे॰ त्यांनी चेहर्‍यावर कुचेष्टेचे भाव आणून काही शेरेबाजी केली॰ ती कानडी माणसाला अर्थातच कळली नाही॰ शिवाय त्याला पी॰ एल॰ कोण होते हेही ठाऊक नव्हते॰ अर्थात त्यावेळेस पी॰ एल॰, लाडके व्यक्तीमत्व तर सोडाच नामवंतही झालेले नव्हते॰ पण हे अवमानकारक काहीतरी बोलले हे त्या ज्योतिषाने ओळखले॰ त्याने पी॰ एल॰च्या चेहर्‍याकडे बघितले आणि शांतपणे सांगितले की या माणसाचे लग्न झाल्यावर यांची पत्नी २१ दिवसाच्या आत निधन पावली आहे॰ पी॰ एल॰ हादरले ! कारण गोष्ट खरी होती॰ हे पुस्तक 1984 – 85 च्या सुमारास प्रकाशित झाले आहे॰

नंतर २००० साली मी हैदराबादला गेलो होतो, तेव्हा नेहरूंचे अभ्यासक डॉ॰ न॰ गो॰ राजूरकर यांच्याकडे गेलो होतो॰ त्यांना राज्यशास्त्राबरोबर ज्या अन्य विषयांत रूची होती त्यात ज्योतिष हा विषय होता॰ त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे॰ त्यांनी मला जर असे काही ज्योतिषाचे खरे अनुभव आले असतील तर सांगण्याची विनंती केली॰ मी हा प्रसंग सांगितला॰ तो त्यांना ठाऊक नव्हता॰ ते म्हणाले की मी या विषयावरच्या व्याख्यानात या गोष्टीचा उल्लेख करेन, पण त्यांना त्याचा पुरावा हवा होता॰ मी या पुस्तकाचे नाव सांगितले॰ ते पुस्तक त्यांना हैदराबादच्या ग्रंथालयात काही मिळाले नाही॰ इकडे मलाही हे पुस्तक मिळेना॰ २००४ च्या डिसेंबरमध्ये म्याजेस्टिक प्रकाशनाच्या अशोक कोठावळे यांच्या मुलीचे लग्न होते॰ त्या लग्नाला बाळ सामंत आले होते॰ त्यावेळेस ते ८२ वर्षांचे होते॰ त्यांना मी भेटलो; आणि या पुस्तकाबद्दल सांगून याची एक प्रत मला विकत हवी आहे, असे सांगितले॰ त्यावेळेस त्यांना स्मृतीभ्रंश झालेला होता॰ त्यांना आपण असे पुस्तक लिहिले आहे हेच आठवेना; त्यामुळे तो प्रसंग आठवणे तर शक्यच नव्हते॰ पण ते म्हणाले की घरी बघतो, आणि प्रत असली तर तुला पाठवतो॰ मी माझे कार्ड त्यांना दिले; आणि पुस्तक व्ही॰ पी॰ ने पाठवावयास सुचवले॰ ती प्रत काही मला आली नाही॰ मात्र, एक दोन महिन्यांनी मी पुण्याला डे॰ जिमखान्यावर सकाळी एका मित्राची वाट बघत होतो॰ तेथेच ‘ उत्कर्ष प्रकाशन ‘ चे ऑफिस आणि दुकान होते॰ त्यांनीच हे पुस्तक प्रकाशित केले आहे॰ त्यांना सहज विचारले तर नुकतीच नवीन आवृत्ती प्रकाशित झालेली होती, त्यामुळे ते पुस्तक मिळाले॰ ते मी विकत घेऊन ताबडतोब समोरं असलेल्या मुख्य पो॰ ऑ॰ मधून न॰ गो॰ रा॰ ना बुक पोस्ट केले॰

पण या पी॰एल॰ च्या प्रसंगाला आणखी एक उपकथानक आहे॰ विनोदी लेखक रमेश मंत्री यानी त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग ‘प्रारंभ‘ या नावाने लिहिला आहे॰ ( नंतर त्यांना अर्धांग वायुचा झटका आल्याने उरलेले दोन भाग त्यांना लिहिताच आले नाहीत ! काय दुर्दैव ना ? ) त्यात एक प्रसंग असा आहे॰ रमेश मंत्री उपवधू झाले आणि त्यांना लग्नासाठी मुली सांगून येऊ लागल्या॰ त्यांना एक अत्यंत सुंदर आणि पदवीधर ( १९५०च्या दशकात पदवीधर मुली अपवादानेच असायच्या॰ ) मुलगी सांगून आली॰ मात्र, मुलीच्या भावाने आणि वडिलांनी मंत्रींची पत्रिका मागितली॰ कारण तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न एका लेखकाशी झाले होते; आणि ती ३ आठवड्यांत निवर्तली होती॰ मंत्रींचे आई – वडील लहानपणीच गेल्यामुळे त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या नातेवाईकांकडे झाले; त्यामुळे पत्रिका वगैरे कुठून असणार ? त्यामुळे मंत्रीनी पत्रिकेबाबत असमर्थता दर्शवताच ते कुटुंबीय back out झाले॰ ‘ प्रारंभ ‘ हे पुस्तक १९९३ साली प्रकाशित झाले; आणि मी त्याच वेळी वाचले होते॰ त्यावेळी तो लेखक कोण हे कुतूहल होते; पण मी त्याचा पाठपुरावा केला नव्हता॰ मात्र, ३-४ वर्षांनी हे पुस्तक मी परत वाचले; आणि मला चटकन सुचले की तो लेखक म्हणजे पी॰ एल॰ ! या बाबतीतले आपले गुरु म्हणजे रवींद्र पिंगे॰ मी त्यांना फोन केला॰ ते पण चक्रावले; पण म्हणाले की तो पी॰ एल॰ नाही॰ मी त्यांना ‘ प्रारंभ ‘ आणि ‘ मैफल ‘ मधली ती पृष्ठे परत वाचण्यास सुचवले; आणि काय आश्चर्य ? दोन तीन दिवसांनी मला पिंगे ‘ आयडियल ‘ मध्ये भेटले तेव्हा म्हणाले की तुझा तर्क अचूक आहे॰ तो पी॰ एल॰च आहे॰

यात रमेश मंत्रींचा मोठेपणा दिसला, तो मला आवडला॰ दुसरा कोणी असता तर ‘ यामुळे पु॰ लंचा साडू होण्याचा माझा योग हुकला ‘,असे लिहून मोकळा झाला असता॰ ( लेखक आनंद यादवना लहानपणी कोल्हापूर जवळच्या एका खेडेगावात एक मंत्री म्हणून मारकुटे मास्तर होते असे त्यांनी ‘ झोंबी ‘ या त्यांच्या आत्मकथनात लिहिले आहे॰ त्यावर रमेश मंत्रींनी ‘ हे मारकुटे मंत्री मास्तर म्हणजे माझे काका ‘ असे कबूल केले आहे ! )॰

मात्र, याच रमेश मंत्रींनी पी॰ एल॰ बाबतची आणखी एक आठवण सांगितली आहे; ती पी॰ एल॰ आणि सुनीताबाईंचा मोठेपणा सांगणारी आहे॰ मात्र ही आठवण बर्‍याच जणांना ठाऊक नाही॰ मंत्री आणि पी॰ एल॰ एकाच वर्षी एम॰ ए॰ चा अभ्यास करत होते॰ मंत्रींची परिस्थिती खूपच हलाखीची होती॰ कधी कधी त्यांना जेवणाही मिळत नसे॰ एक दिवस पी॰ एल॰ म्हणाले, ‘ रमेश, तू उद्या सकाळपासून माझ्याकडे दिवसभर अभ्यासाला आणि जेवायला ये॰ ‘ मंत्रींना दुहेरी आनंद झाला॰ कारण पी॰ एल॰ बुद्धिमान, तो फायदा; आणि दुपारचे जेवण सुटले ! त्याप्रमाणे ते सकाळी अभ्यासाला गेले॰ तो जोरात चालू झाला॰ सुनीताबाई घरात नव्हत्या॰ बाराचा सुमार आला तरी सुनिताबाईंचा पत्ता नाही॰ जेवणाकडे लक्ष ठेवत अभ्यास चालू ठेवला॰ अखेरीस दोन वाजायला आले, तरी सुनीताबाई आल्या नव्हत्या; तेव्हा मंत्रींच्या लक्षात आले की आज काही आपणास येथे जेवायला मिळणार नाही॰ ते चिडले; पण तो राग न दाखवता ते त्यांच्या खोलीवर निघून गेले॰ नंतर काही दिवस गेले; आणि हे पतीपत्नी मंत्रींना भेटले॰ तेव्हा पी॰ एल॰ म्हणाले की, अरे रमेश, त्या दिवशी तुला जेवायला बोलावले, पण तुला जेवायला न घालता उपाशीच परत पाठवले; म्हणून तू माझ्यावर रागावला असशील॰ पण अरे काय करणार ? सुनीता सकाळपासून रेशनच्या रांगेत उभी होती; पण त्या दिवशी चार वाजले तरी रेशनवर धान्य आलेच नव्हते॰ मग ती तशीच परतली॰ रेशनवर धान्य मिळाले नाही, म्हणून आम्हीही उपाशीच राहिलो; कारण काळ्या बाजारातून धान्य घ्यायचे नाही, अशी एक देशभक्त, सच्चा समाजवादी म्हणून आम्ही शपथ घेतली आहे ना ?

78 लाख रुपये वाटणार्‍या पी॰ एल॰पेक्षा हे पी॰ एल॰ मला मोठे वाटतात !

प्रकाश चांदे
मूळ स्रोत -> https://maitri2012.wordpress.com/2013/08/16/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a5%b0-%e0%a4%b2%e0%a5%b0-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80/

Monday, June 13, 2022

टोचावं लागतं... - जयंत विद्वांस

तसं मला अगदी माणूस गेला तरी रडू वगैरे येत नाही पण पुस्तक वाचताना, सिनेमा बघताना कधीही येतं. 'आनंद', 'श्यामची आई', 'दो बिघा जमीन' बघताना आवंढा येतोच, डोळेही पाणावतात. 'शोले', 'मेरा नाम जोकर' बघताना आता फार तर आवंढा येतो पण रडू नाही येत कारण तो अनंतवेळा बघून झालाय. यातलं कुणी आपल्या नात्यागोत्याचं अजिबात नाही. कुणी दिग्गज माणूस गेला की लोक रडतात. कॅमेरासमोर रडणारे खरे कुठले आणि खोटे कुठले कळणं अवघड. आधी या प्रकाराची मी चेष्टा करायचो. खरंतर उमाळा आतून आला की त्याचा खरेखोटेपणा तपासू नये पण एकूणच शो करण्याची प्रवृत्ती बळावल्यामुळे असं ग्लिसरीन रडणं पुढे आलं असावं.

२ जून ८८ ला राजकपूर गेला तेंव्हाची गोष्ट. नुकताच सुधारण्याकरता मला बदलापूरला पाठवण्यात आलं होतं. धनाचा मामा समोरच रहायचा. आरके गेल्याच्या बातम्या चालू होत्या. तेंव्हा भंकस ब्रेकिंग न्यूजचा प्रकार नव्हता. त्याची एकेक गाणी दाखवत होते. आम्ही सगळे चिडीचूप गाणी बघत बसलो होतो. शेवटचं गाणं ६७ च्या 'दिवाना' मधलं 'हम तो जाते अपने गांव' लागलं. सायराबानूसमोर गाणं म्हणणारा, फक्त दिसायला भाबडा असणारा राज कपूर गात होता. आधीच मुकेशचा आवाज म्हणजे डोळ्यात पाणी यायची ग्यारंटी. आमचा बाळूमामा तो पर्यंत निःशब्द सगळं बघत होता पण ते शेवटचं 'हुई हो भूल कोई तो, उसे दिल से भुला देना, कोई दीवाना था, बातों पे उसकी ध्यान क्या देना' ऐकलं आणि तो हमसाहमशी रडू लागला. श्वास कोंडतो की काय आता याचा अशी भीती वाटायला लागली सगळ्यांना. पण त्या ओळी, मुकेशचा करुण आवाज, ती चाल आणि ती बातमी याचा एकत्रित परिणाम असेल पण त्याला अश्रू आवरेनात. मलाही रडू आलं. त्यावेळी समजलं मला, कलाकार आपल्याला इतकं देत असतो की ती कृतज्ञता अशी व्यक्त होते. घरातलं माणूस गेल्यासारखं रडू यायला तेवढं आत टोचावं लागतं काहीतरी.

पुलं. त्यांची पुस्तकं वाचताना अनंत आवंढे आलेत, दरदरून हसू पण आलंय. अजूनही त्यांच्या आवाजात अंतूबर्वा, हरितात्या, चितळे मास्तर, नारायण ऐकले की काही वाक्यांना श्वास घुसमटतो. काय जादू होती या माणसात कळत नाही. हा माणूस अजिबात बनेल नव्हता, त्यांना कुठलाही विषय वर्ज्य नव्हता, लाचार नव्हता, यशासाठी तडजोडी करणारा नव्हता, 'गुळाचा गणपती' फुकट करून घेतला म्हणून रडगाणं गाणारा नव्हता, अडचणी सांगून पैसे गोळा करणारा नव्हता. माणसांचा, सुरांचा, मांगल्याचा लोभी होता. दाद देणारा होता, विनोदाचे अत्तरसडे टाकणारा होता. प्रतिभा असली तरी आनंद देण्याची वृत्ती हवी. ज्या क्षेत्रात ते गेले तिथे ठसा उमटवून मग पुढे गेले. आत्मा जसा शरीर बदलतो तसे ते नवी वस्त्र घालताना मागच्या यशाचा अहंकार तिथेच टाकून पुढे आले. पुलंच्या वक्तव्यात कुठेही हे मी केलं हा प्रकार नाही. जे चांगलं दिसलं ते उचलून धरायचं याला मोठं मन लागतं. समाजानी दिलेलं समाजाला परत देण्याची संतवृत्ती असलेला माणूस. पै पैचा, खोट्या मानापमानाचा निरर्थक हिशोब ठेवणारे आपण, अशी माणसं पाहिली की लाज वाटून जाते.
पुलं गेले तेंव्हा कामावर होतो. जेवायला घरी आलो तेंव्हा अंत्ययात्रा दाखवत होते टीव्हीला. बायको शेजारीच बसली होती. अचानक हुंदका फुटला, हमसाहमशी रडू आलं. तिला काहीच कळेना. मला बाळूमामा आठवला. म्हटलं ना टोचावं लागतं आत कुठेतरी. ज्यानी आमचं आयुष्य समृद्ध केलं तो निर्विष विनोद त्या दिवशी नवीन क्षेत्रात मुशाफिरी करायला निघून गेला. जगरहाटी चालूच राहील. इथे अनंत आले नी गेले, कुणी हिशोब ठेवलाय. पण जोवर माणसं आहेत, त्यांना भावना आहेत, त्यांना हसू येतंय तोवर अत्रे, चिंवी जोशी, गडकरी, पुलं, वुडहाऊस, ट्वेन कुठे ना कुठे जन्मत रहातील. आत्मे तेच, शरीरं वेगळी फक्त.

नात्यातली, जीवाभावाची सोडली तर गेली म्हणून रडू येईल अशी माणसंही आता मोजकी राहिलीयेत. आपल्यासाठी कुणी रडेल न रडेल पण अशा राहिलेल्या मोजक्या माणसांसाठी रडू आलं की कृतज्ञता पोचली म्हणायचं.


जयंत विद्वांस
१२ ०६ १७

Thursday, June 9, 2022

एक आनंदाचा ठेवा - मिलिंद जोशी

प्रिय पु. ल.,

कित्येक वर्षापूर्वीचा पुण्यामधला एक उन्हाळा आठवतो... बजाज स्कूटर्स मध्ये ट्रेनिंग साठी तीन महिने होतो... कंपनीत संप झाल्यामुळे ट्रेनिंग खंडित... पुण्यात मी उपरा, नवीन आणि एकटा! एका रविवारी नगरपालिका वाचनालयात म. टा. मध्ये तुमचा 'जनता शिशु वर्गात आम्ही' हा लेख उभ्या उभ्या (मनात हसून हसून लोळत) वाचला, आणि डोक्यात किडा आला...त्या वयात किडे डोक्यातच थांबत नसत...फोन नंबर शोधण अगदीच सोप होत... फिरवण सुद्धा कठीण नव्हत... सुनिता बाईंनी उचलला, “तो घरी नाही, पण दोन दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा, मी सांगते भाईला लेख तुम्हाला खूप आवडला” वगैरे...

दोन दिवसांनी मी पुन्हा खरच फोन केला (संप संपला नव्हता)... या वेळी तुम्ही स्वतःच उचललात, आणि 'हो, आहे ना घरी; आत्ता लगेच येऊ शकाल का, जरूर' एवढ्या भरघोस आमंत्रणावर पुढच्या अर्ध्या तासात मी पोचलो सुद्धा! सुरुवातीला थोडी औपचारिक ओळख वगैरे करून घेतल्यावर पाच मिनिटातच, तुम्ही मी गेली कित्येक वर्ष तुमचा शेजारी असल्यासारख्या सहजपणे गप्पा मारायला सुरुवात केलीत. मी मात्र माझ्या तब्बल वीसेक वर्ष वयाच्या परिपक्वतेचा आब राखून अस्सल टीकाकाराच्या थाटात, तुमची मुलाखत घ्यायला आल्यासारखा प्रश्न विचारत होतो. '"अडला हरी" (माझा अत्यंत आवडता लेख/कथा) शिवाय तुम्ही कथालेखन अस केलच नाही, नाही?' 'नाही, काय आहे, लेखक म्हणून मला तो प्रकार फार appeal झालाच नाही कधी. गंगाधर गाडगीळाना छान जमत ते'... "काय वाट्टेल ते होईल" मधल्या 'बहात्तर रोगांवर अक्सीर इलाज - लसणीच तिखट' ची आठवण निघाली... त्यावरून, जौर्जिअन लोकांच्या पाककृती, मेक्सिकन लोकांच तिखट खाण, हालापिन्या (jalapeno) नावाच्या महाजालीम मिरच्या, अमेरिकेतल्या चीनी जेवणाची गम्मत अश्या असंख्य गोष्टी जादूगाराच्या पोतडी मधून बाहेर येताना बघून माझे विस्फारलेले डोळे अजून आठवतात... तरीही माझ्यातला टीकाकार मागे हटत नव्हता... '"सोन्या बागलाणकर" सारख्या लेखनामध्ये वूडहाउसचा एकंदर प्रभाव जाणवतो, नाही? तुम्हाला वूस्टर किंवा एम्सवर्थ सारखे मानसपुत्र नाही करावेसे वाटले?' 'नाही, आपल्याकडे सुद्धा चिं. वि. नी केले, पण त्याला एक नेट लागतो... वूडहाउस प्रचंड ताकदीचा लेखक होता...' मग, वूडहाउस वर एक प्रदीर्घ टिप्पणी, त्याच्या कवितांचा उल्लेख, 'सुनिता, तू ऐकलयस’ (ह्यातला लेकी बोले सुने लागे भाग मला तेव्हाही कळला होता) अस म्हणून त्याची एक छोटी limerick म्हणून दाखवण...

सुनीताबाई फोन सांभाळत थोड्या थोड्या गप्पांमध्ये ही सामील होत होत्या...'कविता आवडतात का नाही?' मी नुकतच बापटांच 'मानसी' वाचल होत, त्यातल्या कवितांचा उल्लेख केल्यावर 'वा, छानच; पण ग्रेस वाचलंय का... "चंद्र माधवीचे प्रदेश"?' वरच्या माझ्या प्रामाणिक आणि बावळट 'प्रयत्न केला, पण ते चंद्राइतक्याच उंचीवरून डोक्यावरून गेले’ ह्या उत्तरावर तुमच हास्य... मग मात्र माझ्यातला अधाशी चाहता त्या स्वैर गप्पांमध्ये वाहून गेला होता, इथून पुढे मी बहुतांश श्रोत्याचच काम केल. काय नव्हत त्या गप्पांमध्ये... इतर अनेक लेखक-कवींचे उल्लेख, 'गुळाचा गणपती', सत्यजित रेंचे सिनेमे, टागोरांच्या कविता, रवींद्र संगीताच्या काही ओळी (त्या काळी मला बंगाली येत नसे, त्यामुळे नुसत्याच भक्तीभावांनी ऐकल्या होत्या)... अलिबाबाची गुहा समोर उघडलेली होती... आणि लुटून न्यायला मी एकटा, फक्त दोन डोळे आणि दोन कान घेऊन...आठवणीच्या पोतडीत भरभरून घेतलं. कसा कुणास ठाऊक पण विषय भारतीय समाजातल्या चाली-रिती, लग्न जुळवण, हुंडा वगैरे वर येउन पोचला… हुंडा मागण्याची आणि घेण्याची किळसवाणी पद्धत, त्याबद्दलचे अनेक विनोदी किस्से... माझी थट्टा 'इथे हो हो म्हणतोय, लग्नात भक्कम हुंडा वसूल करेल बघ!' (त्या विचाराचाही प्रश्नच नव्हता हो) गप्पा रंगतच जात होत्या... घड्याळाकडे माझ लक्ष नसण साहजिकच होत, पण तुम्ही - दोघांनीही - ते लक्षात न घेता केलेल्या आदरातिथ्याची कमाल वाटते... भेटायला आलेल्या एका जोडप्याला 'हा माझा तरुण मित्र मिलिंद' (कान धन्य!) अशी ओळखही करून दिल्याची आठवण हा आयुष्यभराचा ठेवा आहे.

लाज, संकोच वगैरे गोष्टींशी ज्या वयात तोंडओळख ही नसते, त्याच धिटाईनी आणि हावरटपणानी मी दोन-अडीच तास गप्पा मारत बसलो होतो... बाहेर काळोख दिसायला लागल्यावर तृप्ततेनी ओथंबून (खर तर नाही) मी जायला निघालो... वाकून नमस्कार केला... मनापासून... रस्त्यात, परतताना, या सगळ्या अद्भुत भेटीबद्दल स्वतःला चिमटे काढ काढून खात्री करून घेतली की आपण स्वप्नात नाही...तुमचे आभार मानणार पत्र लिहायचं असा निश्चय केला... प्रत्यक्षात आणायला थोडा उशीर झाला...

तुमची पुस्तकं, ध्वनी-फिती, चित्र-फिती असा हिमालयाएवढा सार्वजनिक खजिना तुम्ही मराठी समाजासाठी ठेवून गेलातच, पण माझ्यासाठी खास ह्या भेटीचे हे सुवर्णक्षण हा बापटांच्या भाषेत 'केवळ माझा सह्यकडा'! तुमच्या सार्वजनिक दर्शनानी मी अजूनही चार-चौघात सुद्धा पोट धरधरून हसतो... आणि नंतर कित्येकदा एकटा असताना ह्या अनमोल भेटीतल्या तुमच्या निरपेक्ष प्रेमाच्या आठवणींनी गहिवरतो... आजच्या दिवशी ती आठवण अटळच!

मिलिंद जोशी

Saturday, June 4, 2022

इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्णमहोत्सवी साहित्य सम्मेलनात केलेले अध्यक्षीय भाषण

पुलंनी इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्णमहोत्सवी साहित्य संमेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणातला काही भाग, पूर्ण भाषण 'मित्रहो' पुस्तकात वाचता येईल .

साहित्यप्रेमी बंधू आणि भगिनींनो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ह्या सुवर्णमहोत्सवाच्या प्रसंगी मला आपण अध्यक्षाच्या जागी आणून बसवल्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. मराठी साहित्याच्या प्रांतात गेली तीस-एक वर्षे मी जी काही 'चावटी” केली,त्याबद्दल अतिशय प्रेमाने मला हा मान दिलात याची मला कृतज्ञ जाणीव आहे. तसा मी भाग्यवान माणूस आहे. लेखक म्हणून माझ्या उत्साहाचा भंग व्हावा असं माझ्याबाबतीत वाचकांनी काही केलेलं नाही. समीक्षकांनीदेखील, लिहितोय बिचारा तर लिहू दे, म्हणून सोडून दिलं आहे. बरं, मी तसा बंडखोर लेखक वगैरे नाही. बंड वगैरे मला जमणाऱ्या गोष्टी नाहीत. महात्मा गांधींच्या चळवळीतदेखील, पोलिसांचा लाठीहल्ला सुरू झाला की, माझं धावण्याच्या शर्यतीतलं कसब पाहून माझं मलाच आश्चर्य वाटायचं! मी त्या कलेचा अभ्यास वाढवला नाही, त्यामुळे भारत एका मराठी मिल्खासिंगला मुकला असं माझं नम्र मत आहे.

मी एक ज्याला मध्यमवर्गीय म्हणतात असा माणूस आहे. तरीही जीवनाच्या वाळवंटातला 'प्रवासी कमनशिबी मी” असं म्हणण्यासारखे क्षण माझ्या वाट्याला फार कमी आले. जे आले ते मी माझ्या लिखाणातून सांगितले आणि वाचकांनी 'ते वाचून आम्ही पोट धरधरून हसलो.' हे आम्हाला ऐकविले! आयुष्यातले काही संकल्प सिद्धीला गेले नाहीत याचं मला दुःख आहे. उदाहरणार्थ, गीतारहस्य, ज्ञानेश्वरी, दास कापितालचे मराठी भाषांतर, आणि भारतीय दंडविधान असले ग्रंथ संपूर्ण वाचायचे संकल्प अजूनही सिद्धीला गेलेले नाहीत! मला काहीही पाहण्याचा कंटाळा नाही. वाचण्याचा तर मुळीच नाही. गप्पा मारण्यात माझ्या आयुष्याचा सर्वांत अधिक काळ गेला आहे. आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मी हे बोलणं वरं दिसणार नाही, पण मला तसा बराचसा लिहिण्याचाच आळस आहे! अलीकडे तर मी प्रस्तावनालेखक म्हणूनच अधिक प्रसिद्ध आहे! माझी लेखक म्हणून भूमिका अगदी साधी आहे. आयुष्यात मला चांगल्या साहित्यातून, जीवनातून जे जे चटका लावून गेलं - ज्या आनंदाचे क्षण मी भोगले, जी सुसंगती किंवा विसंगती जाणवली, ते मी माझ्या स्वभावधर्माला स्मरून सांगितलं! कथा, कादंबरी, कविता ह्या मातबर साहित्यप्रकारांत माझ्या खात्यावर एकाही महान निर्मितीची नोंद नाही. 'नाटक? हा मी विशुद्ध साहित्यप्रकार मानत नाही. मी जी काही नाटकं लिहिली, ती रंगमंचावरून करण्यासाठी लिहिली. नुसतं कथा-कादंबरी-कविता यासारखं एकांतात वाचण्यासाठी नाटक ही कल्पना मला रुचत नाही. नाटकाचं पुस्तक वाचायचा मला कंटाळा आहे. नाटकाच्या यशात नट-नटींचा आणि इतर अनेकांचा वाटा असतो. अपयशाचा स्वामी फक्त नाटककार! यामुळे फार तर चार विनोदी पुस्तके, काही प्रवासवर्णने, काही व्यक्तिचित्रे, एवढीच माझी साहित्यनिर्मिती ! माझ्यापासून कुठला कालखंड सुरू झाला नाही की संपला नाही!

माझ्या आधीच्या अध्यक्षांची नावे वाचून माझी छातीच दडपली. शेवटी मी हे अध्यक्षपद स्वीकारताना मनात मर्ढेकरांचा मंत्र म्हटला की, 'विदूषका वाली हास्यरस!' पूर्वीच्या महान अध्यक्षांनी दिलेले संदेश मी वाचले. सावरकरांनी तर आपल्या तरुण पिढीने आता लेखणी मोडून टाकावी आणि बंदूक उचलावी, साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक -- असा संदेश दिला होता! आता मला हे थोडंसं एखाद्याच्या लग्नाला जाऊन बोहल्यावर त्याला “आधी विमा उतरवा आणि मग मुंडावळ्या बांधा”. हे सांगितल्यासारखं वाटलं हा माझा दोष असेल! कुणी साहित्यातून लोकजागृती घडवायला सांगितलं, तर कुणी राष्ट्रभक्त व्हा असा संदेश दिला. तसा त्यांना अधिकार होता. पण हेदेखील थोडंसं ललित साहित्याकडे एक विशुद्ध आनंद देणारी, जगताना जीवनातील जाणिवा तजेलदार करायला लावणारी कला आहे असे न पाहता, साहित्य म्हणजे कथा-कवितेची शर्करावगुंठित औषधाची गोळी किंवा फावल्या वेळी घालायची 'शीळ' आहे असे मानण्यामुळे झाले आहे असे माझे नम्र मत आहे. हे सारं सांगणं त्या अध्यक्षांना शोभून दिसलं. पण. आपण माझं साहित्य वाचल्यानंतरही मला अध्यक्ष केलंत, ते मोरोपंतांच्या शब्दांत, कधीतरी 'रखिवडिचा स्वाद का न चाखावा' अशाच उद्देशानं असावं! त्यातून विनोदी लेखक हा रेवड्या उडविणारा अशीही एक कल्पना आहे. पण ती बरोबर नाही. तो रेवड्या करणारा असेल. रेवडीत तीळ आणि गूळ असतो. तैलबुद्धी आणि गोडवा यांचा साक्षात्कार जर विनोदातून झाला नाही, तर ते हास्यं पौराणिक नाटकातल्या राक्षस पार्ट्यांसारखे विकट हास्य होईल. असो! तर संस्कृत नाटकातल्या 'धीरोद्धतां नमयतीव गतिर्धरित्रीम॑', अशा ह्या मोठमोठ्या नायकांचा प्रवेश संपल्यावर ह्या मंचावरचा माझा प्रवेश हा 'तत:प्रविशति विदूषक:' यासारखा आहे! हे माझं मलाच वाटायला लागलं आहे.

इचलकरंजीच्या लोकांनी ह्या संमेलनाच्या कार्याचा भार उचलला, त्यांचेही आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. बाळकृष्णवुवा इचलकरंजीकरांचं गाव म्हणूनही ह्या गावाशी मला माझा ऋणानुबंध वाटतो. काशीची गंगा रामेश्वरी न्यावी, तसं बुवांनी ग्वाल्हेरचं हिंदुस्थानी अभिजात संगीत ह्या महाराष्ट्राला आणून देऊन आमच्यावर अनंत उपकार केळे आहेत. आज महाराष्ट्रात अभिजात संगीताविषयी जे एवढं प्रेम आढळतं, त्या संगीताची जी इमारत इथे फळा आली, त्याचा बाळकृष्णवुवा इचलकरंजीकरांनी रचिला पाया असेच म्हणायला हवे. तेव्हा मी इचलकरंजीला येताना बाळकृष्णबुवांच्या गावाला येतो आहे हीही भावना मनात आहे.

हे पन्नासावं साहित्य संमेलन आहे. पण माझं भाषण हे कृपा करून गेल्या एकोणपन्नास संमेलनांच्या काळातल्या मराठी साहित्याचं समालोचन आहे असं आपण मानू नये. ज्या मराठी ललित साहित्याच्या प्रदेशात मी हिंडलो, जिथे मीही चार रोपटी लावायचा प्रयत्न केला, त्या प्रदेशाचं हे एक प्रवासवर्णन आहे असं आपण फार तर समजा. अगदी लहान वय सोडलं तरी लिहिता वाचता यायला लागल्यापासून गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षं, मी ह्या पुस्तकांच्या दुनियेत हिंडतो आहे. साहित्य-संगीत आणि नाटक ह्या तीन गोष्टींनी माझं जीवन कृतार्थ झालं आहे. मी लिहिलेल्या साहित्यामुळे किंवा मी रचलेल्या संगीतामुळे किंवा नाटकामुळे नव्हे, तर मला ह्या तिन्ही कलांतून जो अनुभव मिळाला -- जी जीवनदृष्टी मिळाली - मनावर चढणारी काजळी जी वेळोवेळी पुसली गेली, त्याचं कारण, माझा ह्या कलांशी जडलेला संग! आणि जे मला लाभलं ते इतरांनाही लाभावं ह्या एका हेतूने मी ही निर्मिती करायला लागलो. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणतात तसं जे मला तिळ तिळ लाभत गेलं ते मी वाटलं! तिळापासून होतं ते तेल. तेलाला स्नेह म्हणतात. ह्या वाटपातून तुमचा-आम्रचा जो स्नेह जडला, ती माझी कमाई! आणि ही केवळ माझीच्‌ कमाई नाही, ह्या जगात कलांच्या रूपाने आनंद देणारे आणि आनंद घेणारे जे जे कोणी आहेत, त्या साऱ्यांची खरी कमाई ही एवढीच आहे.

(अपूर्ण)
पु.ल. देशपांडे
(२६-१२-१९७४)