Friday, June 29, 2007

मी एक नापास आजोबा - पु. ल.

सध्या तुम्ही काय करता? या प्रश्नाचं दोन नातवांशी खेळत असतो याच्या इतकं सत्याच्या जवळ जाणारं उत्तर माझ्यापाशी नाही. नातवंडांची तल्लफ कशी येते हे आजोबा-आजीच जाणतात. नातवंड हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे. गुढघ्यांच्या संधिवातावर अचपळ नातवामागून धावणं हा रामबाण उपाय आहे. आणि एरवी खांदेदुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच उचलतांना जरासुद्धा तक्रार करीत नाहीत. 

उत्तम बुद्धिमत्तेचा सगळयात चांगला प्रत्यय चांगल्या बालबुद्धीतून कसा येतो हे दुसऱ्या बालपणाची पहिल्या बालपणाशी दोस्ती जमल्या शिवाय कळत नाही. माझ्या बुद्धिमत्तेविषयी बाळगोपाळांना शंका असण्याचा माझा अनुभव जुना आहे. कठीण प्रश्न भाईकाकांना न विचारता माईआत्तेला विचारायला हवेत हा निर्णय वीस-एक वर्षांपूर्वी दिनेश, शुभा वगैरे त्या काळात के. जी. वयात असलेल्या माझ्या बालमित्रांनी घेतला होता. माझ्या व्यक्तिमत्वातच, फक्त बाळगोपाळांना दिसणारा अज्ञानप्रादर्शक गुण असावा, नाही तर इतक्या अडीच वर्षांच्या चिन्मयलाही आमच्या घरातलं सर्वात वरिष्ठ अपील कोर्ट शोधायला माझ्या लिहिण्याच्या खोलीत न येता स्वयंपाक घराच्या दिशेनी जाणं आवश्यक आहे हे कसं उमगतं?

सध्या, म्हणजे काय? या प्रश्नाच्या माऱ्याला तोंड द्यावं लागत आहे. बरं, नुसत्या उत्तरांनी भागत नाही, मला दाखव असा हुकूम सुटतो. "आकाश म्हंजे काय?" पासून ते "आंगन म्हंजे काय?" इथपर्यंत हा प्रश्न जमीन अस्मान आणि त्यातल्या अनेक सजीव-निर्जिव वस्तूंना लटकून येत असतो. 

"आंगन म्हणजे काय?" या प्रश्नाने तर माझी विकेटच उडवली होती. सहकारी गृहनिर्माण संस्कृतीत 'आंगण' केंव्हाच गायब झालेलं आहे. घरापुढली म्युनिसिपालटीनी सक्तीने रस्त्यापासून बारापंधरा फूट सोडायला लावलेली जमिनीची रिकामी पट्टी म्हणजे आंगण नव्हे. तिथे पारिजात असावा लागतो. जमीन शेणाने सारवलेली असावी लागते, कुंपणाच्या एका कोपऱ्यांत डेरेदार आंब्याचा वृक्ष असावा लागतो, तुळशीवृंदावनही असावे लागते. रात्रीची जेवणे झाल्यावर एखाद्या आरामखुर्चीवर आजोबा आणि सारवलेल्या जमिनीवर किंवा फारतर दोन चटया टाकून त्यावर इतर कुटुंबीय मंडळींनी बसायचं असतं अशा अनेक घटकांची पूर्तता होते तेव्हा त्या मोकळया जमिनीचं आंगण होतं. कुंपणावरच्या जाईजुईच्या सायंकालीन सुगंधांनी आमोद सुनास जाहल्याचा अमृतानुभव देणारं असं ते स्थान चिनूच्या "आंगन म्हणजे काय?" या प्रश्नाचं उत्तर देतांना तो अडीच वर्षाचा आहे हे विसरुन मी माझ्या बाळपणात शिरलो. माझ्या डोळयांपुढे आमच्या जोगेश्वरीतल्या घरापुढलं आंगण उभं राहिलं. त्याला त्यातलं किती कळत होतं मला ठऊक नाही. पण विलक्षण कुतूहलाने भरलेले दोन कमालीचे उत्सुक डोळे या आजोबाला काय झालं या भावनेने माझ्याकडे पाहाताहेत आणि माझी आंगणाची गोष्ट ऐकताहेत एवढंच मला आठवतं चिनूचं ते ऐकणं पाहण्याच्या लोभाने मी मनाला येतील त्या गोष्टी त्याला सांगत असतो. मात्र त्यात असंख्य भानगडी असतात. एखाद्या हत्तीच्या चित्रावरुन हत्तीची गोष्ट सांगून झाली की "ही आता वाघोबाची गोट्ट कल" अशी फर्माईश होते. एकेकाळी पौराणिक पटकथेत झकास लावणीची "स्युचेशन" टाकण्याची सुचना ऐकण्याचा पूर्वानुभव असल्यामुळे मी त्या हत्तीच्या कथेत वाघाची एन्ट्री घडवून आणतो. हत्तीच्या गोष्टीत वाघ चपलख बसल्याच्या आनंदात असतांना धाकटया बंधूंचा शिट्टी फुंकल्या सारखा आवाज येतो, 

"दाखव". 

"काय दाखव?" मी. 

"व्हाग!" चि. अश्विन. 

हत्तीच्या चित्रात मी केवळ या बाबालोकाग्रहास्तव वाघाला घुसवलेला असतो. प्रत्यक्ष चित्रात तो नसतो. पण हत्तीला पाहून डोंगरामागे वाघ कसा पळाला याची गोष्ट रचावी लागते. सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या निर्मितिक्षम प्रतिभेची सकाळ-संध्याकाळ अशी तोंडी परीक्षा चालू असते. पहिली गोष्ट चालू असतांना "दुशली शांग" अशी फर्माईश झाली की पहिल्या गोष्टीत आपण नापास झालो हे शहाण्या आजोबांनी ओळखावे, आणि निमूटपणाने दुसऱ्या गोष्टीकडे वळावे. या सगळया गोष्टींना कसलंही कुंपण नसल्यामुळे इकडल्या गोष्टीतला राजा तिकडल्या गोष्टीतल्या भोपळयांतून टुणूक टुणूक जाणाऱ्या म्हातारीला जाम लावून पाव देतो. वाघाचा "हॅपी बड्डे" होतो आणि "इंजिनदादा इंजिनदादा काय करतो?" या गाण्यातल्या इंजिनाला रुळावरुन उचलून आकाशात नेणारी स्चकृत कडवीही तयार होतात. 

आज या वयातही सहजपणाने जुळलेलं एखाद्या कवितेतलं यमक पाहून एखाद्या शाळकरी मुलासारखा मला अचंबा वाटतो. शब्दांच्या नादानी कविता नाचायला लागली की आनंद कसा दुथडी भरुन वाहतो याचं दर्शन शब्दांच्या खुळखुळ्यांशी खेळणाऱ्या पोरांच्या चेहऱ्यावर होते. पण नातवंडाबरोबर आजोबांनाही तो खेळ साधला तर हरवलेलं बालपण पुन्हा गवसतं. हल्ली हा खेळ मला रोज खेळावा लागतो. एकदा या चिनू आशूला घेऊन 'चक्कड माडायला' निघालो होतो. 'बाबा ब्लॅकशिप' पासून 'शपनात दिशला लानीचा बाग' पर्यंत गाण्याचा हलकल्लोळ चालला होता. शेवटी हा तार सप्तकातला कार्यक्रम आवरायला मी म्हणालो, 'आता गाणी पुरे गोष्टी सांगा' गोष्टीत किंचाळायला कमी वाव असतो.

"कुनाची गोट्ट?" 

"राजाची गोष्ट सांग... आशू, चिनू दादा गोष्ट सांगतोय गप्प बसून ऐकायची. हं, सांग चिनोबा..." 

"काय?" 

"गोष्ट!" "कशली? राजाची." मग चिनूनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. 

"एक होता लाजा." त्यानंतर डोळे तिरके करुन गहन विचारात पडल्याचा अभिनय, आणि मग दुसरं वाक्य आलं, 'तो शकाली फुलाकले गेला.' 

"कोणाकडे?" शिकारीबिकारीला जाणाऱ्या राजांच्या गोष्टी मी त्याला सांगितल्या होत्या. पण फुलाकडे जाणारा राजा बहुदा शांतिनिकेतनातला जुना छात्र असावा. 

"फु... ला... क... ले... " चिनू मला हे आवाज चढवून समजावून सांगतांना माझ्या प्राचीन शाळा मास्तरांच्या आवाजातली 'ब्रह्मदेवानी अक्कल वाटतांना चाळण घेऊन गेला होतास काय पुर्ष्या ऽ ऽ ' ही ऋचा पार्श्वसंगीतासारखी ऐकू आली. "बरं, फुलाकडे... मग?" "मग फुलाला म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला?" 

क्षणभर माझ्या डोळयांवर आणि कानांवर माझा विश्वास बसेना. हे एवढंसं गोरंपान ध्यान उकाराचे उच्चार करतांना लालचुटुक ओठांचे मजेदार चंबू करीत म्हणत होतं 'लाजा फुलाकले गेला आनि म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला?' एका निरागस मनाच्या वेलीवर कवितेची पहिली कळी उमलतांना मी पाहतोय असं मला वाटलं. 

"मग फुल काय म्हणालं?" एवढे चार शब्द माझ्या दाटलेल्या गळ्यातून बाहेर पडतांना माझी मुष्किल अवस्था झाली होती. 

"कोनाला?" 

"अरे राजाला. राजानी फुलाला विचारलं ना, फुला रे फुला तुला वास कोणी दिला? मग फुल काय म्हणालं?" 

"तू शांग..." 

मी काय सांगणार कपाळ! फुला रे फुला तुला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागणारी बालकवी, आरती प्रभू किंवा पोरांच्या मनात नांदणारी गाणी लिहिणाऱ्या विंदा करंदीकर, पाडगावकरांना लाभलेल्या प्रतिभेची वाटणी चालू असतांना देवा पुढे चाळण नेण्याची दुर्बुद्धी मला नक्की झालेली असावी. 'फुला रे फुला तुला वास कोणी दिला?' या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला सापडलेलं नाही. सुदैवाने परीक्षक हा प्रश्न विचारल्याचं विसरुन गेले असले तरी त्या परीक्षेत मी नापास झाल्याची भावना मला विसरता येत नाही. नुसती गोळया-जर्दाळूंची लाच देऊन आजोबा होता येत नाही. त्याला फुलाला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तरही ठाऊक असावं लागतं आणि तेही यमकाशी नातं जुळवून आलेलं. 

(अपूर्ण)

Friday, June 8, 2007

काही सहित्यिक भोग क्रमांक एक

स्थळ - पुणे शहरातील एक बस-स्टॉप
पात्रे - ‘खडूस’ ह्या शब्दाखेरीज दुसरा कुठला शब्द सुचु नये असे सत्तरीतले एक गृहस्थ. 

मी त्यांच्या बाजूस जाऊन रांग लावतो. आश्चर्य म्हणजे रांग नाही. आम्ही दोघेच. काही वेळ ते गॄहस्थ आम्हाला खालपासून वरपर्यंत न्याहाळतात. आम्ही समोरच्या करंडे टेलर्सचे मि. करांडे एका लठ्ठ गॄहस्थाच्या पोटाचे माप घेत असल्याचे सुखद दृष्य पाहण्याचा बहाणा करतो. इतक्यात कानावर आवाज :


बाजी गणेश जोशी. दशभुजा गणपतीचे देऊळ कुठे आहे?
मी. काही कल्पना नाही बुवा.
बा.ग.जो. पुण्यातच राहता ना? (त्यावरून ते पुण्यात राहतात हे लक्षात आले.)
मी. हो.
बा.ग.जो. किती वर्षे?
मी. बरीच.
बा.ग.जो. व्यवसाय?
मी. पुस्तकं वगैरे लिहितो.
बा.ग.जो. म्हणजे साहित्यिक! आणि तरी तुम्हाला साधा दशभुजा गणपती ठाऊक नाही.
मी. आपण कुठल्या गावचे?
बा.ग.जो. मी कशाला कुठल्या गावाहून येतोय. इथच जगलो इथंच मरणार.
मी. (कधी? हा प्रश्न गाळून) इथेच मरणार कशावरून. 
बा.ग.जो. दशभुजा गणपती ठौक नाही ते सरळ सांगा. माझ्या मरणाची कशाला काळजी करताय? मी मेल्यावर काही तुम्हाला खांद्याला बोलावणार नाही. 
मी. खांद्याची आमंत्रणं मृतांच्या सहीनं कधी जाऊ लागली? 
बा.ग.जो. हे पहा! तुम्ही साहित्यिक आसल्याने भाषाप्रभुत्त्व हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे मानू नका. मीही पुण्याचाच आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पुण्यात राहून साहित्यिक म्हणवणाऱ्या माणसाला दशभुजा गणपतीचे मंदिर ठाऊक नाही ती तुमची समाजाविषयीची आस्था. उद्या शनवारवाडा कुठे असतो विचाराल. परवा पर्वतीचा पत्ता पुसाल. 
मी. तुम्हाला तरी ठाऊक आहे का दशभुजा गणपती? 
बा.ग.जो. हो आहे मग. 
मी. मग कशाला विचारताय? 
बा.ग.जो. तुम्हाला माहित आहे का नाही हे पडताळायला. 
मी. पण माझा दशभुजा गणपतीशी काय संबंध? 
बा.ग.जो. सांगतो. ‘पुणे शहरातील ढासळती धर्मव्यवस्था’ ह्या विषयावर लेखनमाला लिहितोय मी. इथं सकाळी सात पसून उभा आहे. बेचाळीस लोकांत फक्त एक दशभुजा गणपती ठाऊक असणारा निघाला. ते पण त्याचे दुकान आहे मंदिरासमोर म्हणून. आत कधी दर्शनाला गेला नाही म्हणे. 
मी. म्हणजे दशभुजा गणपती पत्त्यापुरता. 
बा.ग.जो. अहो हीच तर आपली ट्रॅजेडी. देव फक्त पुत्त्यापुरता. एकदा आम्ही विचारलं ‘डॉ. मंजुळाबाई सपाते प्रसूतिगृह ’ कुठे आहे? तर तो गृहस्थ म्हणाला, ‘सोमण मारुतिच्या देवळापुढे’. अरे काही सारासारविवेकबुद्धी? निदान प्रसूतिसाठी तरी मारुती वापरू नका. 
मी. खरं आहे. 
बा.ग.जो. साहित्यिक म्हणून देवळात जाणं तुम्ही आपलं कर्तव्य मानत नाही तर! 
मी. (देवावर भार घालून) मानतो तर! 
बा.ग.जो. मग जाता का? 
मी. दशभुजाला नाही जात. 
बा.ग.जो. आय एम नाट पर्टिक्युलर अबाऊट धिस गणपती ऍट ऑल. (रिटायर म्हातारा भडकला की पुण्याच्या इंग्रजीत फुटतो). एनी टेम्पल फॉर द्याट म्याटर. रोज जाता? 
मी. (देवा क्षमा कर. खोटं बोलू नये ह्या गांधीवचनाला मी शाळेत कंपासपेटीत लपवलेलं. ती कंपासपेटी नववीच्या घटक चाचणीत हरवली.) हो म्हणजे रोज म्हणायला हरकत नाही. 
बा.ग.जो. मला होय किंवा नाहीचा रकाना भरायचाय. 
मी. हो! (फर्गिव मी ओह लॉर्ड! पण तसं हे खोटं नाही हा. रोज रात्री गुडकुले विठूबाच्या देवळात काणे भटजी, दाजीबा टेलर, सोपानराव न्हावी सॉरी हेयरड्रेसर... म्याट्रिक केलेला न्हावी ना म्हणून... आणि मी वरच्या नगारखान्यात रमी खेळतो. एक पैसा शंभर प्वाईंट. मागल्या आषाढी कार्तिकीला गल्ला जास्त जमला नाही म्हणून जिंकाणारा काणे भटजी प्वाईंट वाढवा म्हणाला. आम्ही ऎकत नाही.) 
बा.ग.जो. सरळ हो सांगा ना. 
मी. हो. आता धर्मावर श्रद्धा नाही ठेवायची ती काय म्युनिसिपाल्टी, जिल्हाबोर्डवाले अन महाराष्ट्र महामंडळ परिवहनाच्या एस.टीं.वर ठेवायची? 
बा.ग.जो. वाक्याशेवटी प्रशन्चिन्ह नको. पूर्णविराम द्या हो. 
मी. (मुकाट्याने) हो. 
बा.ग.जो. आता सांगा धर्मावर तुमची श्रद्धा आहे? 
मी. यथेच्छ आहे. धर्म नसता तर दसरा दिवाळी नारळी पौर्णिमा नसत्या, पुरणपोळी, लाडू नसते. इतकच काय सत्यनारायण नसता तर शेराला सव्वाशेर चाचपत तुपाचा शीरा खायला मिळाला नसता. 
बा.ग.जो. तो शीरा नसतो. प्रसाद असतो. 
मी. सत्यानारायणाला खारीक वाटता येणारा नाहीत. प्रसाद म्हणूनसुद्धा. माफ करा पण तुम्ही छुपे कम्युनिस्ट दिसता. (माझं आपलं काहितरीच) 
बा.ग.जो. मी कम्युनिस्ट! दशभुजा गणपती तुम्हाला ठाऊक नसताना मी कम्युनिस्ट! 
मी. असं तर मग सांगा झोपाळू नरसोबाचं देऊळ कुठे आहे सांगाल (२ कोटी देवात आज मी एक जन्मला) 
बा.ग.जो. झोपाळू नरसोबा! प्रथमच ऎकतोय! 
मी. जाऊ द्या मी नास्तिकांशी बोलत नसतो. सत्यनारायणाला खारका वाटायला निघालेत (माझाच डाव उलटून). उद्या गोकुळाष्टमीला केक वाटाल. 
बा.ग.जो. हे तुम्ही कुणाला सांगाताहात. 
मी. तुमच्या शिवाय दुसरं कोण आहे इकडे? सॉरी, दुसरं कुणी नाही. पूर्णविराम.
बा.ग.जो. आपला कहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही कुठे राहता? 
मी. (इथे खरी कसोटी आहे. डीटेलवार पत्ते सांगण्यात आपल्यासारखा हातखंडा कुणाचा नाही) तुम्हाल झोपाळू नरसोबा ठाऊक नाही. रेडेकर तालीम टाऊक असेल... 
बा.ग.जो. ती कुठेशी आली? 
मी. रविवारात. घाणेकरांच्या कोळशाच्या वखारीला लागून.
बा.ग.जो. काढीन शोधून. घाणेकर तालीम. 
मी. घाणेकर तालीम नाही. वखार. त्यालालागून रेडेकर तालीम. रस्ते पाड्यावरनं खाली या सरळ (येथे हवा तसा अर्थ घ्यावा). त्यांना विचारा पापडवाले बेंद्रे कुठे राहतात ते. बेंद्रांच्या वाड्यावरनं गल्ली जाते. तिच्या टोकाला माशेलकर खाणावळ. तिथे वडे चांगले मिळतात. एका वड्याचे ६ पैशे. त्यांना विचारा संपतराव लॉंंड्री. ५ पैशे एका विजारीचे. पुणं भरपूर महाग झालंय हो. 
बा.ग.जो. जरा सावकाश सांगा हो. मी लिहून घेतोय. आता कुठे कापडवाल्या बेंद्रांकडे आलोय. 
मी. कापडवाल्या बेंद्रे नाही. पापडवाले बेंद्रे. तिथे सोवळ्यातले पापड मिळतात. ४ पैशे एक डझन. आमच्या सौ जास्त चांगले पापड बनवतात पण. बेंद्रांना विचारा माशेलकर खाणावळ व पुढे संपतराव लौंड्री. ते भोरफ्यांचा वाडा दाखवतील. 
बा.ग.जो. अहो अहो जरा सावकाश सांगा. माझं लिहून झालं नाहीये. 
मी. सावकाश कसं सांगू? बस आली म्हणजे. 
बा.ग.जो. ती कशी येणार? 
मी. म्हणजे? 
बा.ग.जो. हा स्टॉप क्यान्सल झालाय. 
मी. काय म्हणता. 
बा.ग.जो. हो मग. पंधरा दिवासांपासून हा वनवे झालाय. म्हशींना ही ह्या बाजूने प्रवेश बंद मग बस कशी येईल. 
मी. मग मघापसून का नाही सांगितलंत. 
बा.ग.जो. अरे व्वा! मग तुम्ही थांबला असतात का? आणि काय हो साहित्यिक असून तुम्हाला गावातले वनवे माहित नाहीत? कमाल आहे! नाव काय तुमचं? 
मी. (स्वतःचे नवे बारसे साजरे करत) गोविंद गोपाळ दहिभाते. 
बा.ग.जो. आजच हे नाव ऐकतोय. 
मी. मी पण! (बा.ग.जो. शुद्धीवर आहेत की बेशुद्ध पडले हे मागे ना पहाता मी सटकतो. काही भोग दैवावर टाकून सुटतच नाही हो.)

- पु. ल. देशपांडे 
अघळपघळ