Friday, July 29, 2022

वसंता माझ्या अंतरंगात शिरलेला माणूस - पु.ल. देशपांडे

१६.८.८३
१, रूपाली, पुणे ४

दिनेश,
तुझं पत्र आल्यानंतर तुला एखादं मजेदार पत्र पाठवावं अस म्हणत होतो. गेल्या महिन्यापासून सुचेता आणि सुधीर लोकरे आमच्या शेजारीच राहायला आले आहेत. त्यांच्या चिनूमुळे तू दोन वर्षाचा होतास त्यावेळच्या 'आशीर्वाद'मधल्या तुझ्या सर्व कार्यक्रमांची पुनरावृत्ती सुरू झाली आहे. (माझ्या पोटावर बसून गुद्दे मारण्यापासून ते 'कोकिळा दिशत का नाही? नुशती कशाला ओललते?' असल्या अनेक प्रश्‍नापर्यंत.) चिनूच्या गमतीजमती तुला लिहिणार होतो. पण दैवम्‌ अन्यत्र चिंतयेत्‌ म्हणतात त्याप्रमाणे ३० जुलैला वसंतराव देशपांड्यांना खूप जोराचा हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचं एकदम प्राणोत्क्रमण झालं. मधुमेह, ब्लड प्रेशर, स्पॉण्डिलायटिस, किडनी स्टोन यांच्याशी त्याचा झगडा चालू होता. पण हृदयविकाराचा इतका जोरदार आघात होऊन वसंतराव असे एकदम जातील अशी कल्पना नव्हती.

आदल्या दिवशी आम्ही दोघे त्याच्या घरी गप्पा मारीत बसलो होतो. रविवारी २४ तारखेला भाई केवळ वसंताला भेटायला म्हणून पुण्याला आले होते. त्यावेळीही आम्ही मजेत बोलत होतो. त्याला श्वास घेताना धाप लागत होती. पण आजाराचे स्वरूप त्याही वेळी इतकं गंभीर वाटलं नाही. ३० जुलैला पुणे विद्यापीठात भीमसेनची संध्याकाळची मैफिल होती. यमन संपवून ७।। च्या सुमारास भीमसेननी मारवा सुरू केला. तेवढ्यात एका गृहस्थांनी मला अर्जट टेलिफोन आलाय, हा निरोप सांगून बैठकीतून उठवून बाहेर नेले. टेलिफोनवरून वसंत देशपांडे वारल्याची बातमी आली होती. ती ऐकत असताना हॉलमधून भीमसेनचा मारवा ऐकू येत होता. मारवा हा वसंताच्या मालकीचा राग! त्याच्या निधनाच्या बातमीला त्याच मारव्याचे पार्श्वसंगीत असावे हा योगायोगही किती विचित्र, वसंता गेल्यावर लगेच बापूने आमच्या घरी फोन केला. त्यावेळी सुनीता वसंताकडे जायला निघाली होती. आम्ही रोज त्याच्याशी तास दीड तास गप्पागोष्टी करून येत होतो. त्या दिवशी संध्याकाळी चिनू वगैरे घरी आले म्हणून सुनीता भीमसेनच्या गाण्याला आली नाही. मुलं घरी गेल्यावर ती वसंताकडे जायला निघाली आणि बापूचा फोन आला. तिने लगेच युनिव्हर्सिटीत फोन करून मला निरोप पाठवला. मी आणि पाटणकर लगेच निघालो. मैफिलही थांबवली. सगळ्यांना धक्काच बसला.

आम्ही दोघेही जोडीनेच वाढलो. त्याचं गाणं तर मोठं होतंच, पण त्याची नुसती भेट होणे हादेखील किती आनंददायक अनुभव असे हे  तुला ठाऊकच आहे. त्याने सांगितलेल्या गोष्टी, त्याचा नकला, नाना विषयांतली माहिती, ती सांगण्याची त्याची खास पद्धत हे आठवताना हसू कोसळायचं, आता हसू येतं पण त्यापासून लगेच अश्रूही उभे राहतात. मला तर खचल्यासारखंच वाटत आहे. आता पुन्हा गाण्याची किंवा गप्पागोष्टींची तशी मैफिल जमणार नाही. त्याच्या निधनाने हजारो माणसे हळहळली. 'कट्यार' किंवा टीव्ही, रेडिओवरील नाट्यसंगीत यामुळे सामान्य श्रोत्यांपर्यंत तो जाऊन पोहोचला होता, पण तो खरा अभिजात संगीतातला श्रेष्ठ कलावंत. साधेपणाने राहिला, आपल्या ज्ञानाचा दिमाख न मिरवता ते ऐश्वर्य गाण्यातून दाखवले. ते पाहण्याची नजर असणारे थोडेच असतात.

भरत नाट्यमंदिरात शोकसभा झाली. भीमसेन, हिराबाई, ज्योत्स्नाबाई, सुरेश खरे (नाटककार), चित्तरंजन कोल्हटकर, त्याचा शिष्य पद्माकर कुलकर्णी, विश्‍वास मेहेंदळे आणि मी त्याप्रसंगी बोललो. वाय. डी. जोशी अध्यक्ष होते. प्रचंड गर्दी होती. अत्यंत गंभीरपणानं सभा पार पडली. पुष्कळदा शोकसभेत एखादा वक्ता वाहवत जातो तस॑ झालं नाही. शेवटी वसंताची 'आज मैं लडूंगी सैंया' ही भैरवी लावल्यावर लोकांना हुंदके आवरेनासे झाले. वर्तमानपत्रांनीही अग्रलेख लिहून त्याला श्रद्धांजली वाहिली. अजूनही लेख येत आहेत. वसंता यापुढे “आहेस का...' म्हणत त्या, त्या दिवशीचा त्याचा जो गंमत करायचा मूड असेल त्यासकट उभा राहिलेला दिसणार नाही, हा विचार सहन होत नाही. आपल्या अंतरंगातलाच एक भाग गळून पडल्यासारखे झाले आहे. त्यामुळे कशातही लक्ष लागत नाही. क्षणोक्षणी त्याची आठवण येते. एखादा माणूस आपल्या अंतरंगात किती शिरला आहे याची जाणीव त्याच्या हयातीत येत नसते.

गेले तीन दिवस (१३,१४,१५ ऑगस्ट) इथे किशोरीची आणि मन्सुरांची गाणी केली. तशी सकाळ, संध्याकाळ, रात्र तीन गाणी झाली. मी १३, १४ च्या मैफिलीला गेलो होतो. १५ ला गेलो नाही. १४ च्या बैठकीत किशोरी मारवा गायली. चांगला गायली. पण श्रोत्यांतला प्रत्येक जण इंटरवलमध्ये वसंताच्या मारव्याची आठवण काढीत होता. त्या जागी ३-४ महिन्यांपूर्वी झाकिर हुसेनच्या तबल्याच्या साथीत वसंताचं गाणं किती अप्रतिम झाले होते ते तुला मी पाठवलेल्या टेपवरून कळलंच असेल. त्याची शास्त्रीय संगीतातली ती शेवटली मैफिल. माझं हे पत्र तुला मिळण्यापूर्वी वसंताच्या निधनाची बातमी तुला कळली असेल. यापूर्वी तुला पत्र पाठवायचं म्हणत होतो, पण सुन्न होऊन गेलो होतो. सध्या सगळीकडेच निरुत्साही वातावरण आहे. अतिवृष्टी- महापूर- काय विचारू नकोस. माईआत्ते तुला स्वतंत्रपणे पत्र पाठवीत आहे.

तुझा
भाई

0 प्रतिक्रिया: