Tuesday, March 14, 2023

यक्षाचं तळं

प्रत्येक सुखाला, दुःखाला संदर्भ असतात. या धामापूरच्या तलावालाही माझ्या जीवनात, स्मृतीत संदर्भ आहेत. प्रत्यक्षात मी त्या तलावाच्या पोटात गेले तर मृत्युनंतर तरंगत वर येणाऱ्या माझ्या ऐहिक मेंदूबरोबर ते संदर्भ नाहीसे होतील की त्या जलाशयाच्या गर्भाशयात पुनर्जन्मासाठी, पुनर्निर्मितीसाठी, दुगदुगत राहतील? तिथे त्यांना पोसणारी नाळ कोणती? 

असंख्य दुःखतांनी सासुरवाशिणींनी, चोचीतच दुखावलेल्या राजबंशी पाखरांनी शेवटच्या क्षणी विहिरीचा आसरा घेतला आहे. ज्या पाण्याची त्यांना अखेरीला ओढ लागली. त्याच्या पृष्ठभागापर्यंतचा त्या जीवांचा प्रवास गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने, गतीने झाला, हे मान्य आहे. पण त्या पृष्ठभागाला त्यांचा स्पर्श झाल्या क्षणापासून प्राण जाईपर्यंत क्षणापर्यंत त्या पाण्याच्या पोटात काय घडले? सोबत आणलेले ते सगळे दुःख, तो जिवंतपणा तो लाख मोलाचा प्राप्त ती ताटातुटीची हुरहूर, क्वचित त्या हतबल क्षणींचा पश्चाताप सगळे सगळे संचित त्या पाण्याच्या पोटात जपून ठेवायला त्याच्या स्वाधीन केले गेले असणार. अशी किती जणांची, युगानुयुगांची या तलावाच्या पाण्याला पहिला मानवी स्पर्श झाला तेव्हापासूनची किती संचिते इथे गोळा झाली असणार! ती वाचायला मला प्रत्यक्षच तिथे जायला हवे? एक्स-रे रेसारखा एखादा नवा किरण ती टिपून उजेडात आणू शकणार नाही का? त्या पाण्यातले सनातन दगड, सूर्यकिरण, मासे, इतर जलचर, तिथे वाढणाऱ्या वनस्पत्ती, काठावरच्या झाडांची पाळेमुळे, पण्याचा तळाचा भूभाग, यांना कुणाला या साऱ्याची पुसटशी तरी कल्पना असेल का? हा धामापुरचा तलाव म्हटला की त्याच्या अंतरंगात शिरून तिथल्या कविता वाचाव्या.

अशीच जबरदस्त ओढ मला लागते खरी. या तलावाच्या तिन्ही बाजूंना झाडाझुडपांनी भरलेल्या टेकड्या पुरातन काळापासून तशाच आहेत. चवथ्या बाजुच्या टेकडीवर ही भगवती केव्हा वस्तीला आली मला माहीत नाही. पण कोणे एके काळी ज्या कुणी या टेकडीवर हे भगवतीचे देऊळ बांधले, त्यानेच बहुधा त्या टेकडीवरून तलावाच्या काठापर्यंतच नव्हे तर पाण्यातही अगदी आतपर्यंत बऱ्याच पायऱ्याही बांधून काढल्या आहेत. एके काळी म्हणे गावातल्या जनसामान्यांपैकी कुणाकडे लग्नकार्य असले आणि दागदागिने कमी पडत असले तर हाच तलाव गरजू गावकऱ्यांना सोन्यारुप्याचे, हिऱ्यामोत्यांचे दागिने पुरवत असे. आपल्याला हवे ते दागिने कळ्या फुलांचे करायचे आणि ती परडी संध्याकाळी तळ्याकाळी पायरीवर येऊन ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी खऱ्या दागिन्यांनी भरलेली ती परडी घेऊन जायची आणि कार्यसिध्दीनंतर ते दागिने तलावाला परत करायचे. गावावर अशी माया करणारा, पाखर घालणारा हा तलाव. काम झाल्यावरही दागिने परत न करण्याची दुर्बुध्दी झालेल्या कुण्या गावकऱ्याला ज्या दिवशी धामापुराने सामावून घेतले त्या दिवशी त्या तलावाच्या मनाता केवढा हलकल्लोळ उडाला असेल! मायेचे मोल न उमजणाऱ्या लेकरांना तो अजूनही पाणी देतो; पण केवळ कर्तव्यबुध्दीने.
      
आणि त्या टेकड्या? भोवतालच्या जीवसृष्टीतले किती जन्म आणि किती मरणे त्यांनी तटस्थतेने पाहिली असतील!  इथले हे प्रचंड दगड युगानुयुगे कुणाची वाट पाहत इथे उभे असतील? शांत, थंड, पण शक्तीशाली दगड! या दगडदगडांतही किती जाती, पोटजाती आहेत! कलावंताच्या अपयशाने अशा दगडांच्या काळजाच्या ठिकऱ्या उडतात. पण यशाने मात्र त्यांची छाती फुगत नाही, उलट एक सात्विक, नम्र भाव त्यांच्या रोमारोमांतून प्रगट होतो.

ऐकून तिच्या पाठिवरून हात फिरवायला आणि आडोसा करायला धावून आलेले ढग नक्की निळेसावळेच ; असणार. माझा हा तलावही एरवी सदैव मला निळासावळाच दिसतो. माझा तलाव, या पुरातनाच्या संदर्भात मी कोण, कुठली, आणि कितपत ? हे सगळे प्रश्न | खरेच आहेत. पण त्याचबरोबर त्या तलावाशी माझे काहीतरी नाते आहे, हेही एक शाश्वत सत्य आहे. । त्याशिवाय का ही भरती ओहटीसारखी ओढ चालू राहील.

आज या सुंदर काळ्याभोर रात्री काळी वस्त्रे लेऊन आणि काळी घागर घेऊन मी गुपचूप तुझ्यापाशी आले आहे. मला आज तुझ्या पोटात शिरून तिथले वैभव एकदा डोळे भरून पहायचे आहे. तुझ्या काठाशी पायरीवर बसून तुझ्यापाशी आले आहे. मला आज तुझ्या पोटात शिरुन तिथले वैभव एकदा डोळे भरून पहायचे आहे. तुझ्या काठाशी पायरीवर बसून तुझ्या त्वचेला मी आजवर अनेकदा स्पर्श केला. पण या क्षणी तुझ्या पोटात शिरताच लक्षात आले ते सुर्यप्रकाशात दिसणारे छोट्या छोट्या माशांचे विभ्रम तो पावलांना आणि हातांच्या बोटांना जाणवणारा गारवा, हे सगळे तुझे वरवरचे रुप आहे. हा आतला ओलावा या जिवंत ऊर्मी, या आजीच्या आई- आप्पांच्या स्पर्शासारख्या रेशमी आहेत. उन्हात उडणारी पाखरे आपल्या पंखांनी निळ्या हवेचा वारा घेतात ना तशी माझ्या हातांनी मी हे तुझ्या पण्याचे काळे झुळझुळीत रेशमी शेले पांघरत आत आत शिरते आहे. द्रौपदीनेही एकटेपणाच्या त्या अंतिम क्षणी असेच कृष्णाच्या मायेचे अनंत रेशमी शेले पांघरले नव्हते का? मीही आता तशीच निर्धास्तपणे कुठल्याही यमाच्या राजदरबारात जाऊ शर्केन.

आजवरची सगळी धावपळ कधीच मागे पडली आहे. तुझ्या अंतरंगातल्या या प्रवासाचा मार्ग आखीव नाही. त्यामुळे किती मोकळे वाटते आहे! निवृत्त होऊन या जगात स्थिर होण्यापेक्षा मृत्युच्या दिशेने नेणारी का होईना पण गती किती सुंदर, विलोभनीय असते! जिवंत पाण्याने भरलेला हा आसमंत. खऱ्याखुऱ्या शांतीचा साक्षात्कार आज प्रथम होतो आहे. श्वासाचीही हालचाल. नसलेली, केवळ जाणिवेतली शांती. तुझे सगळे वैभव पाहायला पाहुणीसारखी आज कसल्या तरी अनाकलनीय ओढीने ही माहेशवाशीण तुझ्या राज्यात प्रवशे करतेय.

तुझ्या आसऱ्याला आलेल्या साऱ्या दुःखितांना तू तुझ्या लौकिकाला साजेसाच निरोप दिला असशील. सतीला शृंगारतात तसे दागदागिने घालून, शेवाळी शालू नेसवून, ओटी भरून, जलचरांची सोबत देऊन किंवा कसाही, पण तुझ्या परिने भरभरून. पण मी त्या अर्थी दुःखजडीत होऊन इथे आलेली नाही. तशी मी संपन्न आहे. मला काही म्हणता काही कमी नाही हे तूही जाणतोसच ना ? पण माझ्या भाळी सुखाची व्याख्या लिहिताना नियतीने एक वेगळीच अदृश्य शाई वापरली आहे. ती व्याख्या, ते सुख तुलादेखील वाचताही येणार नाही आणि पुसताही येणार नाही. म्हणून सांगते, इथून परतताना मी मोकळ्या हातीच माघारी येणार आहे. माझी ही भरली घागरही मी तिथेच ठेवून येणार आहे.

तुझ्याकंडे यायला निघाले तेव्हा मी पाण्याला म्हणून इथे आले खरी, पण आता ती तहानही निवाली आहे. परतीच्या प्रवासात शिदोरी म्हणून मला एकच निश्वास सोबतीला हवा आहे. हा तुझा, माझा आणि आपल्या जातीच्या साऱ्यांचा अटळ एकटेपणा आहे ना, त्याच्या वेणा आतून जेव्हा जेव्हा टाहो फोडू लागतील. त्या त्या क्षणापुरती तरी तुझी ही मौनाचीच भाषा माझ्या ओठी नांदेल, असा आशीर्वाद मला देशील का?

सुनीता देशपांडे 
साभार : सोयरे सकळ
लोकसत्ता २०११

हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

0 प्रतिक्रिया: