Wednesday, January 12, 2022

पुलंची मजेशीर पत्रे - ८

नोव्हेंबर १९४३ मध्ये पुलंचे पार्लेकर मित्र श्री. माधव खरे विवाहबद्ध झाले. त्यांना पुलंनी लिहिलेलं 'उपदेशपर' पत्र असं :
 
लग्न करणाऱ्या माणसाला आणि नोकरी शोधायला निघालेल्या माणसाला वाटेल त्याकडून उपदेश ऐकून घ्यावा लागतो.

१) मुख्य म्हणजे हाफीस सुटल्यावर तडक घरी येत जा.
२) बायकोला केवळ खूष करण्यासाठी म्हणून काही जिन्नस विकत आणायचा हा परिपाठ ठेवू नकोस. आज तू कौतुकाने बायकोच्या डोक्यावर गजरा चढवशील; पण चार दिवसांनी गजऱ्यासह ती तुझ्या डोक्यावर बसेल. (पुरे बुवा !)
३) महिन्यातून एकदोनदा रागवायची सवय ठेव. डोके दुखण्याची सवय कर पत्नी गाणारी असल्यास ती आपोआप होईल.
४) कॉलेजमधून प्रथम नाव काढून टाक
5) मित्रांना नेहमी जेवायला बोलवीत जा
6) ६) एक दत्ताची तसबीर आण. नट्यांचे विवस्त्र फोटो अलूरकरांना बहाल कर आणि ते अल्बम मला दे
7) ७) टिळक मंदिराच्या सामान्य सभासदत्वाचा राजीनामा दे. ह्या सात 'श्लील' आज्ञा आहेत. इतर तोंडी सांगेन. ह्या सप्तपदीच्या वेळी पावला पावलाला मनात म्हण, देव तुम्हा उभयतांचे कल्याण करो हा आशीर्वाद
आर्या : माधव नमाधव' कसा हे कूट सोडवा गाजी
प्रेमें सर्वासंगे दोघेहि सदैव गोड वागा जी ॥

(सध्या कुशलवोपाख्यानाचा अभ्यास चालू आहे- तेव्हा क्षमस्व)

*तळटीप (ही पत्राचा भाग नाही) : माधव खरे यांच्या पत्नी 'नर्मदा' , 'नमा' हे माहेरचं लाडकं नाव आणि न- माधव , नमा-धव ही पुलंची कोटी.


संदर्भ: अमृतसिद्धी

0 प्रतिक्रिया: