Monday, October 18, 2010

पु.ल. आंनदाचा निर्मळ झरा - प्रवीण दवणे

प्रिय बालमित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या भाईबद्दल मी नवं काय लिहु? भाई हे आपलं `लाडक दैवत'होतं. कुणीही विद्यार्थी माझ्याकडे आला आणि त्यानं मला विचारलं, `सर, मला वाचनाची आवड निर्माण करायचीय कुठून सुरुवात करु?'

मी त्याना म्हणतो. `अपूर्वाही वाच-' बस्स. पु,लं.चे शब्द म्हणजे निर्मळ निळाईचा गोड झरा. आपले मन त्या झर्‍यात केव्हा भिजून रमून जाईल ते कळत नसे. लाखो मराठी मनाशी मैत्री साधण्यातच कसब पुलंना साधलं कसं? केवळ `प्रतिभा' हे त्याचं उत्तर नाही. प्रतिभा अनेकांना असते. पण पु.लं. आवडलं याच महत्वाच कारण त्यांचा मधाळ स्वभाव.

समाजातल्या कुठल्याही थरातला माणूस असो - पु,लं. त्याच्याशी दोस्ती करायचे. माणसाला `माणूस'च मानायचे. एखाद्या थोर राजकीय पुढार्‍यांशी जसं प्रेमानं वागणे, एखाद्या वसंतरावासारख्या थोर गवयाशी जशी मैत्री, तशीच मैत्री कोपर्‍यावरच्या पानवाल्याशी. ते पहायचे रसिकता, ते पहायचे त्याचं जीवनावरच प्रेम, ते पहायचे त्या व्यक्तीतली निरागसता! शाळकरी मुलगा असो की ऐंशीवर्षाचा ज्येष्ठ नागरिक पु.लं. दोघांशी ही सारख्याच तन्मयतेने बोलायचे, त्यांच्या पत्राला उत्तर द्यायचे.

बालमित्रांनो, यशाच्या अत्युच्च शिखरावरही ही लीनता, हा प्रेमळ स्वभाव हे ही पुलंच्या यशाचं, त्यांच्या लोकप्रियतेच रहस्य आहे. मी माझाच एक अनुभव तुम्हाला सांगितला तर आवडेल ना?

वयाच्या दहाव्या वर्षीय भारावून जाऊन मी पुलं. ना पत्र लिहिल, त्यांचा खुप छान धडा आम्हाला अभ्यासाला होता. कशात तरी पुलंचा पत्ता मला मिळाला. वडिलांच्या मदतीने मी पुलंना पत्र लिहिले. सुरुवात अशी केली- `ती.भाईस'
मला वाटलं, आपण पत्र लिहिलं खरं, पण एवढ्या मोठ्या लेखकाच आपल्याला पत्र कसलं येतय? पंधरावीस दिवस गेले, मी विसरुनही गेलो. पण एका दुपारी पोस्टमनने माझ्या हातात, अक्षरशः आनंदाचा वसंतऋतूच दिला. पुलंच पत्र मला आलं होतं. पुलंनी मला लिहिलेल्या पत्राची सुरुवातच मोठी गमतीदार केली होती त्यानी मला लिहिलं होतं.

चि. प्रवीण,
तू मला ती. केल्यामुळे मी तुला चि. करणे ओघानेच आले. तुझे पत्र आले तेव्हा मी बंगालात होतो. म्हणूनच उत्तर देण्यास विलंब झाला. क्षमस्व!...

सुरुवात वाचून मी आणि मी ज्याला पत्र दाखवी ते सर्व खो खो हसत. उत्तराला उशीर का झाला तेही त्यांनी मला सांगितलं. केवढी नम्रता! केवढा थोरपणा! पुलंच पत्र मला आलं आणि जादूच घडली. अशी जादू कविवर्य बोरकरांच पत्र मला आल तेव्हाही घडली होती. मी पुलंच सगळं साहित्य झपाट्यांन वाचून काढलं. पुढे एक छान योग आला. कविवर्य बा. भ. बोरकरांच्या सत्तराव्या वाढदिवशी त्यांच्याबद्दल अविस्मरणीय भाषण पु.लंनी केलं आणि मनाच्या आल्बममध्ये लाखमोलाची भर पडली. अशाच बालपणीच्या एका पत्रात पुलंनी माझी एक चूक मोठ्या गंमतीनं काढली. प्रवीण हे माझ नाव मी `प्रविण' असं लिहायचो. पुलंनी मला लिहिलं, `प्रवीण मुलानं वृत्तीनं नम्र असावं. पण प्रवीण मधला `वी' दीर्घच असायला हवा,' हे पत्ररुप प्रेम ही अनेकांना लाभलेली पुण्याई आहे.

मित्रांनो, यातून मला काय सांगायचय? लेखनांत, व्याख्यानांत एवढ व्यग्र असूनही माझं वय विद्यार्थीपण हे दुय्यम न मानत वेळ देत होते. असा बहुमूल्य वेळ त्यांनी लाखो लोकांना दिल. त्यामुळे ते खर्‍या अर्थाने जनमानसात स्थानापन्न झाले. पु.लंचं लेखन तुम्ही किती वाचलयं? मुलांनो यावर्षी तुम्ही हाच संकल्प सोडा `संपूर्ण पुलं' मी वाचून काढीन, कारण पुलं वाचण हीच एक आनंदयात्रा आहे. पुलं लेखनातून आवडले याचं आणखी एक कारण त्यांनी स्वतःच स्वतःच्या खूप फिरक्या घेतल्या. `अपूर्वाही' `पूर्वरंग, `जा जरा पूर्वेकडे' अशी किती प्रवासवर्णने! प्रवासात स्वतःची कशी भंबेरी उडत असे, ते त्यांनी खुमासदारपणे रंगवून लिहिलय. एके ठिकाणि ते लिहितात, `मी माझा फोटो असलेली पुस्तक मुद्दामच बरोबर घेतली होती, लेखक असल्याचा पुरावा म्हणून!' इंग्लंडला निघताना सूट शिवणाऱ्या शिंप्यानं त्यांना इतके नाही-नाही ते प्रश विचारले की, सुटाची माप घेऊन झाल्यावर पुलं लिहितात; `एकदाचा मी त्या सूटातुन `सूट' लो!' अशा गंमती!

एरव्ही आपणं अनेक प्रकारची माणसं पाहत असतो आणि विसरुनही जातो. पुलंच मराठी साहित्याला देणं आहे ते व्यक्तिचित्राचं आणि प्रवासवर्णनाचं. पूर्वी काहीनी थोडफार लिहिलं असेल, पण या वाड्‍ःमय प्रकारांना एवढी प्रचंड लोकप्रियता दिली ति आपल्या पुलंनीच! त्यांनी लिहिलेलं`व्यक्ती आणि वल्ली!' या व्यक्तिरेखाच्या पुस्तकाला मराठी मनात चिरंतन स्थान आहे. अन्तू बर्वा, चितळे मास्तर, नारायण, सखाराम, गटणे अशी किती नाव सांगू. हल्ली टी.व्ही.वर अनेक नामवंत नट या व्यक्ती साकार करतात, पण बालमित्रांनो तुम्ही मुलांमध्ये हे पुस्तक वाचायलाच हवं. आपल्या मनात त्या व्यक्ती साकार होतात त्या आणखी अफलातून असतात वाचनाचं हे तर महत्त्व आहे नां. आपण मनाच्या डोळ्यांनी वाचतो; कल्पनेचे, आपल्या विचारांचे रंग मिसळून!

बालमित्रांनो, पु.लं.कडून आपल्याला खरंच खूप शिकण्यासारख आहे. नाविन्याची त्यांना ओढ होती; ते खर्‍या अर्थाने अखंड विद्यार्थी होते. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी ठरविलं बंगाली भाषा शिकायची. ते आणि त्यांच्या पत्नी सुनिताबाई दोघेही कलकत्त्याला रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनात राहिले आणि तिथे राहून ते दोघे बंगाली शिकले. त्यांच्या या अनुभवावरच त्यांचं एक पुस्तक आहे. `रवींद्रनाथ-तीन व्याख्याने!' हे पुस्तक जी दहावीतली मुलं आहेत त्यांनी वाचायला काहीच हरकत नाही; त्यांना ते सहज समजेल.

एकाच आयुष्यात अनेक आयुष्य पुलं जगले. बघा ना ते उत्कृष्ट नट होते-`गुळाचा गणपती' केव्हा केव्हा टिव्हीवर लागतो. बघितला नसेल तर बघा. किती गोड काम केलंय आपल्या भाईंनी! पुलं उत्कृष्ट संगीतकार होते. त्यांचं सर्वात आवडतं गाणं `नाच रे मोरा नाच्‌.' पुलं अप्रतिम हार्मोनियम वादक होते, कथाकथनकार होते, वक्ता होते नाटककार होते, सामाजिक कार्यकर्ते होते, शिक्षक होते, दानशूरदाते होते, कलंदर रसिक होते.

खरचं मुलांनो, आचार्य अत्रे यांच्या नंतर इतके संपन्न, इतके उत्तुंग, इतकए अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्या महाराष्ट्रात झाले नाही. अशा पुलंना आपल्यापैकी अनेकांनी जवळून पाहिलं, ऐकलं, त्यांना त्यांच्या पुस्तकातून आपण भेटलो हे केवढे भाग्य!

एवढं अफाट कर्तृत्व पुलं करु शकले कारण त्यांनी आयुष्यात वेळ फुकट घालवला नाही. प्रत्येक क्षण त्यांनी फुलासारखा वेचला, त्यांच्या सुगंध आपल्याला दिला. पुलंचं साहित्य वाचणं, त्यांच्यासारखं रसिक व्हायच! प्रयत्न करणं, त्यांच्यासारखी नम्रता अंगी बाणवून प्रत्येक क्षणाला उपयोग करणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. तुम्ही कुठल्याही माध्यमात शिकत असा, पण पुलं आणि पुलंबरोबर इतर थोर लेखक तुम्ही वाचायलाच हवे. म्हणजे तुम्ही बुद्धीमान तर व्हालच, पण जीवनाचे रसिक व्हाल! आनंदयात्री व्हाल! तुम्हाला शुभेच्छा!

प्रवीण दवणे
३०३ ब, राजहंस
लुईसवाडी, उमदनगर ठाणे