Thursday, April 6, 2023

दर्शनमात्रे - सुनीता देशपांडे

आता बाबाही थकले, आम्हीही थकलो. पण एक काळ असा होता की त्या वेळी आनंदवनात वर्षातून निदान एक तरी फेरी होतच असे. प्रत्येक वेळी आम्हांला काहीतरी नवं दाखवायची योजना बाबांच्या मनात असे आणि त्या उत्साहातच 'आनंदवन - कुटुंबियांकडून स्वागत होई. हा भाग्यलाभ आमच्या भाळी लिहिला गेल्याचा पोटभर आनंद घेऊनच आम्ही परत कधी यायचं तो बेत ठरवून आनंदवनाचा निरोप घेत असू. परतताना 'कन्या सासुरासी जाये, मागे परतुनी पाहे' अशी अवस्था होत नसली तरच नवल.

या वेळी बाबांनी ठरवलं होतं, आम्हांला ताडोबाला नेऊन वाघ दाखवायचा सर्व पूर्वतयारी झाली होती. आवश्यक ते निरोप त्या-त्या ठिकाणी गेले होते. बाबांकडे त्या काळी ड्रायव्हरची सीट डावीकडे असलेली एक जुनी जीपगाडी होती. उन्हापावसासाठी वर ताडपत्रीवजा कव्हर असलेली. बाबा स्वतः उत्तम मेकॅनिक, ड्रायव्हर, सर्व काही. त्या काळी ड्रायव्हिंग तेच करत. आमचा प्रवास त्या जीपमधून सुरू झाला. बाबांच्या शेजारी साधनाताई आणि पलीकडे मी मागे भाई, विकास आणि प्रकाश हे बाबांचे दोघे मुलगे आणि त्या दोघांचा जोडीदार आनंदवनातला तरुण कार्यकर्ता शहा. असे चौघे. गाडीत प्यायचं पाणी आणि वाटेत हवं तर खायला म्हणून टोपलीभर उकडलेली रताळी साधनाताईंनी घेतली होती. बाकी जेवणखाण काहीही सोबत नव्हतं; पण बाबा आणि ताई असताना काहीतरी व्यवस्था नक्कीच केलेली असणार ही मनोमन खात्री असल्यानं मीही निश्चित होते. त्यामुळं एकही प्रश्न न विचारताच हा प्रवास सुरू झाला होता. बाबांचा उत्साह तर अवर्णनीय होता. वेगवेगळ्या अनेक विषयांवर ते बोलत होते ताडोबाच्या दिशेनं धावणाऱ्या त्या आमच्या प्रवासपट्ट्याला बाबांच्या अनुभवाच्या उन्हापावसाचे काठ लाभत होते.

जंगलाची ओळख करून घ्यायची तर प्रथम भेट रात्रीच्या वेळीच व्हायला हवी. म्हणून त्या दृष्टीनेच आम्ही निघालो होतो. ताडोबाच्या अभयारण्यात रात्री गाडी शिरली तेव्हा चांगला काळोख पडला होता. भरपूर भुका लागल्या होत्या. तिथल्या प्रथम वर्गाच्या अतिथिगृहात खोल्या राखून ठेवायची बाबांनी व्यवस्था केली होती; म्हणून गाडी प्रथम तिकडेच नेली. तर तिथं सगळी सामसूम दिसली. कुणालाही काही पत्ता नाही, पर्वाही नाही म्हणताच बाबांचा पारा चढायला सुरुवात झाली. अफगणिस्तानचा राजा की कुणीसा बडा सरकारी पाहुणा पुढल्या पंधरवड्यात येणार म्हणून त्याच्यासाठी आणि त्याच्या लवाजम्यासाठी तिथली सगळी सरकारी अतिथिगृहं साफसफाई, रंगरंगोटी, मोडतोड दुरुस्ती वगैरे पूर्वतयारीच्या दृष्टीनं अचानक बंद करण्यात आली होती.

तळहातावर भाकरी घेऊन खाताखाता त्यातलाच घास कुष्ठरोग्यांनाही भरवत त्यांची सेवा करणारा हा बाबा, पाहुण्यांना सायीचे घट्ट दही देता आलं नाही तर अत्यंत अस्वस्थ होतो. मनासारखा पाहुणचार करायला न जमणं हा त्यांना एकदम विदर्भ प्रांताचाच अपमान वाटायला लागतो. ती नामुष्की सहन करण्याची ताकद, इतक्या पारंब्यांनिशी धरणीवर भक्कम उभ्या असलेल्या या 'वटवृक्षात ' नाही.

आम्ही त्या अभयारण्यातल्या झाडावर बांधलेल्या एखाद्या मचाणावर रात्रीचा मुक्काम करायचं ठरवलं. निराशा सर्वाचीच झाली होती. पण या प्रवासाला सुरुवात केल्या क्षणापासून आम्हां साऱ्याजणांचा जो एकच एकसंध गट होता, त्याचे आता दोन गट झाले. साधनाताई, ती तीन मुलं आणि आम्ही दोघं याचा एक गट आणि बाबांचा एकट्याचा दुसरा गट. तिकडे एवढ्यातेवढ्यान अंगार धगधगत होता. कारणाशिवायच बाबा मुलांवर आणि ताईंवर डाफरत होते. त्यांना थंड करण्याचे आणि खुलवण्याचे आम्हां सर्वाचे अयशस्वी प्रयत्न चालूच होते..

प्रथम वर्गाच्या सरकारी अतिथिगृहातला त्या रात्रीचा 'डिनर दुसऱ्या दिवशीचा 'ब्रेक फास्ट आणि 'लंच सर्व काही आम्हांला त्या उकडलेल्या रताळ्यांच्या टोपलीत सापडलं आणि आरामगृहातल्या गादयागिरद्या त्या लाकडी मचाणावर..

मनात आणलं तर किती गप्प बसता येतं ते अरण्याकडून शिकावं, त्या नीरव शांततेचा भंग करण्याचं धाडस म्हणा किंवा उद्धटपणा म्हणा, आम्हां कुणातच नव्हता. अगदी जरूरच पडली तर एकमेकांशी कानगोष्टी बाबांचा वेध घेत होतो. रात्रीच्या फेरफटक्यासाठी बाहेर पडणाऱ्या वन्य चाहूल घ्यायला बाबा पंचप्राण कानात गोळा करून बसले होते. त्या प्राण्यांच्या पदरवांवरून, एकमेकांना घातलेल्या सादाप्रतिसादांवरून, कोण, कुठल्या दिशेनं कशासाठी निघाला असेल ह्याचा ते अंदाज घेत होते. वाघाचा मागोवा लागताच ताडोबाचा तो औरस रहिवासी आम्हांला दाखविण्यासाठी ते जीपमधून अरण्यदर्शनाला निघणार होते. करत आम्ही पशूंची

पण कुठल्या मुहुर्तावर हा ताडोबाचा बेत केला कोण जाणे, असं वाटावं अशीच काहीशी ग्रहदशा होती. ती रात्र वाघोबांच्या पंचांगातली 'निर्जळी एकादशीची असावी. ताडोबाच्या जंगलातले सारे वाघ ध्यानस्थ होऊन बसले होते आ आपल्या तपाचरणानं बाबा आमटे नामक नरसिंहाला अधिकाधिक त्रस्त करत होते. शेवटी बाबांनी मनाशी काहीतरी निश्चय केला आणि आम्हांला पुन्हा गाडीत घालून ते अरण्यदर्शनाला निघाले. प्रखर दिवे असलेल्या त्या जीपगाडीतून ती. अख्खी रात्र आणि पहाट, आणि मग दिवसाउजेडी सकाळी-दुपारी पायीपायीदेखील त्या जंगलात सगळीकडे आम्ही बाबांबरोबर खूप चकरा मारल्या. लहानमोठ्या अनेक रानवाटा पालथ्या घातल्या. एखादया वळणावर समोर एकदम शेकडो पणत्या पेटलेल्या दिसल्या की हरणांचा तो कळप जास्तीत जास्त जवळून पाहता यावा म्हणून बाबा गाडीच्या दिव्यांची सावध उघडझाप करत, आवाज न येईल अशी हळूहळू जीप पुढं पुढं नेत आम्हांला त्या वनवाशांशी ओळखी करून देत होते. त्या बावीसतेवीस तासांत आम्ही एकटे-दुकटे आणि कळपांनी किंवा छोट्याछोट्या गटानं फिरणारे अनेक प्राणी पाहिले; पण बाबांनी योजिलेलं व्याघ्रदर्शन काही घडलं नाही. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीची आमची शेवटली शोधयात्रा करत हळूहळू जीप जात असताना तर मला एक नवलच पहायला मिळालं. आमच्या मार्गापलीकडेच थोड्याशा मोकळ्या जागेत एक मोर आणि एक हरणाचं पाडस मिळून मजेत खेळताना दिसलं. आम्ही जागच्या जागी गाड थांबवली. पण आमची चाहूल लागताच ते दोघे पळून आडोशाला गेले. आम्ह पुढं निघून गेलो; आणि त्या सफरीमधल्या अशा अनेक लहानमोठ्या तृप्त क्षणांची बेरीज करत असताना बाबांच्या दिशेनं नजर गेली की मला धडकी भरत होती शेवटी अंधार पडू लागला आणि ताडोबाच्या जंगलातून आनंदवनाच्या दिशेन परतीचा प्रवास सुरू झाला.

शौक म्हणून शिकार करणं हे मला अत्यंत असंस्कृत मनाचं लक्षण वाटतं. पण या शौकासाठी आपल्या देशात तर बडेबडे लोक सोयीचं असेल तर अभयारण्याच्या दिशेनंही जातात; आणि अभयारण्यात जनावरं मारणं हा गुन्हा नोंदवला जाईल आणि न जाणो उद्या प्रकरण अंगावर शेकेल म्हणून त्या अरण्याच्या सीमेवर बाहेर बकऱ्या वगैरे प्राणी बांधून ठेवतात. ते प्राणी भुकेनं ओरडायला लागले की अभयारण्यातल्या वाघाबिघांनी त्या दिशेनं भक्ष्यासाठी । जंगलाची सीमा ओलांडून बाहेर यावं म्हणजे तो वाघ टिपून आयती शिकार 'साधता येते. भारतात वाघाची शिकार करण्याची कधी स्वत:ची, तर कधी पाहुण्यांची हौस भागवणाऱ्या अनेक राजकारण्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनो, अशा रीतीनं अभयारण्यातल्या आपल्या वाघांची संख्यादेखील खूप कमी केली आहे, असं मी ऐकलं होतं. ताडोबा सोडून बाहेर पडताना उगाच शंका चाटुन गेली; चोवीस तासांत इतका आटापिटा करूनही इथं एकही वाघ दिसला नाही; म्हणजे इथले सगळे वाघ असेच या लोकांनी संपवले की काय?

परतीचा तो प्रवास सुरू झाला तेव्हा पोटात भूक, डोळ्यांवर झोप, आणि डोक्यात अशा अनेक शंका होत्या. बाबा मात्र फारच अस्वस्थ होते. ताडोबा म्हणजे वाघांचा राजा. साक्षात वाघ! बाबांची आणि त्याची जुनी दोस्ती. या आपल्या मित्रानं आपल्याला असा दगा दयावा? हे दुःख, चीड असह्य होती. आम्हांला हे सगळं कळत होतं; पण 'अपराध बाबांनी केलेलाच नाही त्याबद्दल ते असा त्रागा करून घेत असलेले पाहून आम्ही सगळेच भांबावून गेलो. काल ताडोबाच्या दर्शनाला निघतानाचा बाबांचा उत्साह आणि आज तिथून परततानाचा हा मूड याचं काहीही नातं नव्हतं. बाबांना खुलवण्यासाठी आम्ही सगळेच आपापल्या परीनं त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होतो.

मी पाहुणी म्हणून असेल, बाबा माझ्यावर उखडत नव्हते, पण प्रतिसादही देत नव्हते. साधनाताई किंवा मुलांपैकी कुणी काही बोलायचा प्रयत्न केला की बाबा त्यांना एकदम फटकारू लागले, तेव्हा भाईनं ताबा घेतला आणि तो त्यांच्याशी संवाद साधू लागला. "जाऊ दे हो बाबा. ही जनावरंदेखील आपल्या राज्यात अशीच वागणार" इथून सुरुवात करून मग आमच्याऐवजी कुणी मंत्रीबिंत्री आला असता ताडोबाला तर काय घडलं असतं याचं वर्णन करायला भाईनं सुरुवात केली. मग गाणी, नकला, विनोदी किस्से, कायकाय तो करत राहिला. आम्ही सगळे सुखावून हसत होतो; पण तरीही बेताबेतानं. बाबाही मधूनच काही बोलून आपण ऐकत आहोत हे दाखवत पाहुण्यांचा आब राखत होते. पण हे काही खरं नव्हे अशी जाणीव सर्वानाच होती. ताण फारसा सैलावत नव्हता.

कालपासून या गाडीनं केलेल्या प्रवासात प्रत्येकाच्या बसायच्या जागा ठरूनच गेल्या होत्या. पुढच्या बाजूला मधे ताई, डावीकडे ड्रायव्हर, बाबा, उजवीकडे मी माझ्या ताब्यात बाबानी एक भलामोठा टॉर्च दिला होता. कुणा परदेशी 'आनंदवनाच्या मित्रानं बाबांना तो भेट दिलेला होता. गाडीच्या बॅटरीवर पेटवायचा. खूप शक्तिमान, दूरवर तेजस्वी प्रकाश पाडणारा. साधारणतः वाघाची उंची लक्षात घेऊन जनावरांच्या डोळ्यांत प्रकाशझोत गेला पाहिजे असा कोन साधून तो टॉर्च मांडीवर घेऊन बसण्याची आणि त्या दिशेनं जनावर दिसतं का पहाण्याची कामगिरी बाबांनी माझ्यावर सोपवली होती आणि काल रात्री मी ती व्यवस्थित पारही पाडली होती. आता त्या प्रकाशाच्या टप्प्यात वाघच आला नाही तर कोण काय करणार? आजही मागच्या बाजूला चाललेल्या भाईच्या कार्यक्रमाला दाद देत असतानाही मी माझं काम विसरले नव्हते.

परतीची वाट बाबांनी वेगळी निवडली होती. ताडोबाची हद्द संपली तेव्हा आमची गाडी एका अगदी चिंचोळ्या पाणंदीतून चालली होती. बैलगाड्यांसाठीची ती रानातली वाट असावी. दोन्ही बाजूंना बोरूची गर्द रानं होती. बोरूच्या काटेरी फांदया गाडीला मधूनमधून घासत होत्या. कपडे फाटू नयेत, हातापायांवर ओरखडे येऊ नयेत, म्हणून कडेला बसलेल्यांनी सावधगिरी घ्यायला हवी होती. माझ्या मागेच बसलेल्या भाईनं आपले पाय गाडीबाहेर काढले होते, ते मी त्याला 'काटे लागून पँट फाटेल' म्हणून आत घ्यायला सांगितले. 'पायाला ओरखडा येईल त्याची काळजी नाही, पँट फाटेल तिची काळजी' असा त्यावर त्यानं शेरा मारून सर्वांना हसवलं आणि पाय आत घेतले. आम्ही सगळे गप्प होतो. बाबांच्या मौनासारख्याच घट्ट काळोखातून जीप चालली होती. अचानक या वाहनाचा अडथळा मध्येच आल्यानं बावरून जागच्या जागी थबकलेला एक वाघ प्रकाशझोतात आला. मी दबलेल्या स्वरात एकदम म्हटलं वाघ!

क्षणात बाबांनी तिथंच गाडी थांबवली. पुढं मी आणि मागं भाई गाडीच्या उजव्या अंगाला होतो. आम्हांपासून तर तो वाघ फार तर हातभर अंतरावर असेल. जरा पुढं वाकले असते तर त्याच्या गळ्याला किंवा कपाळाला स्पर्श करता आला असता, इतकं जवळ उभं असलेलं ते अगदी तरुण, उंचपुरं भरलेल सुंदर उमदं जनावर दिसताच तो वाघ आहे, पुढच्या क्षणी एकच पाऊल पुढे टाकून आमच्यापैकी दोघातिघांना तो सहज ओढत कुठंही घेऊन जाऊ शकेन इतका दांडगा आहे, वगैरे कोणताही विचार किंवा कसल्याही भीतीचा लवलेशही आमच्यापैकी कुणाच्याही मनात उमटला नाही. त्याची उंची सर्वसाधारण वाघांपेक्षा थोडी अधिक होती; त्यामुळे प्रकाशाचे किरण सरळ रेषेत त्याच्या डोळ्यात घुसलेच नव्हते. तसे ते घुसावे आणि दिपून जनावर आंधळं व्हावं याची काळजी घेऊनच त्या टॉर्चचा कोन साधला होता. अशा वेळी डोळे बारीक केल्यानं कपाळाला आठ्या पडलेला वाघ पहायला मिळतो. पण इथं प्रत्यक्ष किरणांचा झोत त्यान्या गळ्यावर, छाताडावर पडला होता आणि त्याच्या त्या उत्फुल्ल - हसा तेजस्वी डोळ्यांतल त्याच्या उमदया काळजाचं ओलसर प्रतिबिंब आम्ही भरल्या डोळ्यांनी पहात होतों, जन्मजन्मांतरीचा जिवलग इतक्या प्रदीर्घ ताटातुटीनंतर अचानक कडकडून मिठीत घेता यावा अशा भरल्या आनंदात आम्ही तिथून निघालो ते थेट आनंदवनात येऊन पोचेपर्यंत मग कुणी कुणाशी फारसं बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतंच. ताडोबा सोडताना पोटात ओरडणारे ते कावळे कुठे उडून गेले ? थकव्याचं तृप्तीत रूपांतर होताना कोणती प्रक्रिया होते? त्या स्थित्यंतराला किती वेळ लागत असतो? गेले अखंड चोवीस तास आमच्यापासून सतत दूर दूर जात असलेले बाबा नेमक्या कोणत्या क्षणार्धात आमच्याशी पुन्हा एकजीव होऊन गेले? ही अशी कोणती जादू कुणी केली? आणि या सगळ्या घटनेमागचं प्रयोजन कोणतं? अलगअलग सातजणांचं आमचं ते कुटुंब एका धूलिकणाइतकं क्षुल्लक होऊन त्या वाघाच्या पावलाशी असलेल्या मातीत मिसळायला इतकं आसुसलं ते का? ही ओढ कसली ? आजच्या या क्षणी पडणारे हे असले प्रश्नदेखील त्यावेळी मूक झाले होते.

जिम कॉर्बेट हा माझा एक आवडता लेखक त्याच्याच जातीच्या इतरही विश्वमित्रांच्या साहित्यातून माझी खूप वाघांशी ओळख आहे. प्रत्यक्षातदेखील मी बंदिस्तच नव्हे, तर मुक्ता वाघही पाहिले आहेत. बाबांनी तर आयुष्यात कित्येक वाघ पाहिले, मारले आणि खेळवलेही. पण सर्वार्थानं इतकं सुंदर जनावर वाघांच्या जातीत जन्माला येऊन जगाच्या पाठीवर नांदू शकतं असं कुणी सांगितलं असतं तर त्या क्षणापर्यंत आमच्यापैकी कुणालाही ते खोटंच वाटलं असतं. आपल्या जाणिवेच्या कक्षेबाहेरचा विश्वाचा पसारा, स्वतःच्या सामर्थ्याची झलक ही अशी मधूनच कधी तरी दाखवतो. अशा वेळी एक दैवदुर्लभ साक्षात्कार घडल्याचा अलौकिक अनुभव लाभतो. माझ्या बाबतीत तो वाघ आज असंख्य अज्ञात विश्वबांधवांचं एक प्रतीक होऊन बसला आहे. दर भाऊबीजेला तरी त्याला आठवणीनं मनातल्या मनात ओवाळाव वाटतं. लीन होऊन त्याच्या हाती राखी बांधावी वाटते' आपलं माहेर खऱ्या अर्थानं श्रीमंत असल्याचाच हा साक्षात्कार. हसतहसत सारा निसर्गच आपल्या आनंदात सहभागी झाल्याचा साक्षात्कार !

('हंस', दिवाळी १९९१ )

हा लेख उपलब्ध करून देण्यासाठी श्री आमोद घांग्रेकर ह्यांचे मनापासून आभार. 

0 प्रतिक्रिया: