Monday, October 8, 2007

जपानी खाणावळ

त्या रात्री जपानी खाणावळ म्हणजे काय ते मी प्रथम पाहिले. जपानी भाषेत तसल्या खाणावळींना रियोकान म्हणतात. एका टुमदार लाकडी घरात आम्ही शिरलो. दारातच पाचसहा बायका आमच्या स्वागताला उभ्या होत्या. त्यांनी कमरेत वाकूनवाकून आमचे जपानी स्वागत केले. त्यांच्यापैकी एकीने चटकन पुढे होऊन माझ्या बुटांचे बंद सोडवले आणी सपाता दिल्या. मग दुसरीने त्या लाकडी घरातल्या भुलभुलैयासारख्या ओसऱ्यांमधून एका चौकटीपुढे उभे केले. तिसरीने चौकट सरकवली. आत जपानी दिवाणखाणा होता. सुंदर ततामी पसरलेल्या. मध्यावरच एक काळाभोर लाकडी चौरंग मांडला होता. बसायला भोवताली पातळ उशा होत्या. कोपऱ्यात तोकोनोमा. तिथे सुंदर पुष्परचना. आम्ही चटयांवर मांड्या घालून बसलो. त्या खाणावळीणबाईंनी माझा कोट काढला. इतक्यात बांबूच्या, होडीच्या आकाराच्या छोट्या छोट्या ट्रेजमधून सुगंधीत पाण्याने भिजलेले टुवाल घेऊन एक बाई आली. तिने माझे तोंड पुसण्यापूर्वी मीच चटकन तोंड पुसून टाकले. आणि दिवसभर चालून अंग आंबले होते म्हणून बसल्या बसल्या जरासे हातपाय ताणले. लगेच त्या जपानी दासीने माझे खांदे चेपायला सुरूवात केली. आमचे कुटुंब जरासे चपापले. मीही नाही म्हटले तरी गोरामोराच झालो. (माझ्या अंगभूत वर्णाला जितके गोरेमोरे होता येईल तितकाच!) काय बोलावे ते कळेना.

एकीलाही जपानीखेरीज दुसरी भाषा येत असेल तर शपथ! त्या खाणावळीत उत्तम चिनी जेवण मिळत होते, याची खात्री करूनच तिथे गेलो होतो. पण हे आतिथ्य कसे आवरावे ते कळेना. त्या बाया मधूनच पाय चेपायच्या. सिगरेट काढीपर्यंत काडी पेटवून धरायच्या. द्वारकाधीशाच्या अंतःपुरात सुदामदेवाचे त्या बायांनी कसे हाल केले असतील ह्याची कल्पना आली. तरी सुदामदेव तिथे एकटाच गेला होता. मी ह्या स्त्रिराज्यात सहकुटुंब सापडलो होतो. हळूहळू खाद्यपदार्थ आले. साकेचे पेले भरले. जेवणातल्या तीनचार कोर्सेसनंतर एका परिचारीकेने हळूच समोरची ती चौकटीचौकटीची भिंत सरकवली आणि पुढले दृश्य पाहून माझा घास हातातच राहिला. पुन्हा एकदा सौंदर्याचा अनपेक्षित धक्का देण्याचा जपानी स्वभावाचा प्रत्यय आला. समोर एक चिमुकले दगडी उद्यान होते. त्यातून एक चिमणा झरा खळखळत होता. पलीकडून पुलासारखी गॅलरी गेली होती. बहालावर ओळीने जपानी आकाशकंदिलासारखे दिवे टांगले होते. त्यांच्या मंद प्रकाशात तो झरा चमकत होता. आणि सतारीचा झाला वाजावा तसा स्वर चालला होता. पलिकडून कुठूनतरी सामिसेनवर गीत वाजत होते. (सुदैवाने कोणी गात मात्र नव्हते.) चौरंगावर चिनी सुरस सुरसुधा रांधियली होती. त्या दृश्याला स्वरांची आणि जपानीणबाई बाई लडिवाळपणा करीत होत्या. 

क्योटोतल्या त्या जपानी खाणावळीतली रात्र बोरकरांच्या जपानी रमलाच्या रात्रीची याद `जंबिया मधाचा मारि काळजात!' रियोकान सोडताना त्या दासीने पुन्हा बूटाचे बंद बांधले. आणि सगळ्याजणींचा ताफा रांगेत उभा राहून दहा दहा वेळा वाकून म्हणाला "सायोना~~रा------सायोना~~रा---!" छे! जपानी बायकांचा सायोनारा छातीचे ठोके थांबवतो!

पुर्वरंग
पु.ल. देशपांडे 

हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.

Thursday, October 4, 2007

मलाय भाषा

सात-आठ दिवसांत मी सिंगापुरात रुळु लागलो होतो. मलाय भाषेतल्या काही शब्दांवर तर माझा फारच लोभ जडला. विद्दाधर चेंबुरकर हा पार्लेकर असल्यामुळे त्याच्या अस्सल भाषाप्रभुत्वाविषयी मला शंका नव्हती. परंतु त्याच्या बायकोने टेलिफोनवरुन कुणाला तरी "साला!" म्हणून रिसिव्हर आपटल्यावर मी मात्र जरासा गडबडलो. पण तिच्याही लक्षात माझी अस्वस्थता आली असावी. "मलाय भाषेत ` रॉंग नंबर' असे टेलिफोनवर म्हणायचे असेल तर `साला!' म्हणतात." हे ऎकून त्या भाषेचा यथार्थ शब्दयोजना-सामर्थ्यावर माझे एकदम प्रेम बसले. `ट्रिंग ट्रिंग' ऎसा `खोटा नंबर' फिरल्यावर `हलो हलो' ला `साला' ह्यासारखे समर्पक उत्तरे दुसरे मला तरी सुचत नाही! हे दु:ख टेलिफोनशी घनिष्ठ संबंध असणाऱ्यांनाच कळावे. रात्री बाराएकच्या सुमारास गाढ निद्रेतून जागे करणारी ती क्षुद्र घंटिका! `हॅलो' म्हणून आपण विचारतो आणि पलिकडून कुणीतरी `केम सुखमडल सेठ----' अशी प्रस्तावना करून `न्यूयोर्क कोटन' बद्दल अगम्य भाषेत बोलू लागतो. अशा वेळी `साला!' हा मलाय शब्द काय चपखल बसेल! वा!

जगात असे आंतरराष्ट्रीय सुबक शब्द जमवून भाषा बनवली पाहिजे. होय आणि नाही यांना मात्र मलाय `आडा' आणि `तिडा' तितकेसे चांगले वाटत नाहीत. आणि एकदा मला चहात दुध हवे होते असे कुजबुजल्यावर आमच्या मित्राच्या पत्नीने मोलकरणीला `बाबा लागी सुसू' म्हटल्यावर मी दचकलो! पण मलाय भाषेत दुधाला `सुसू' म्हणतात. `बाबा' म्हणजे आण आणि `लागी' म्हणजे काय कोण जाणे! बाकी ही भाषा फार सोपी आहे. प्रत्ययबित्यय भानगडी कमी! शब्द एकमेकांसमोर ठेवायचे. मलाय भाषेचेचे अधिक सुंदर स्वरुप म्हणजे `बहासा इंडोनेशिया'. संस्कृत शब्दांचा यात खूप भरणा आहे. इंडोनेशिया तर ठायीठायी संस्कृतचे ठसे आहेत. 

मलायात आणि इंडोनेशियात मुख्य धर्म इस्लाम, पण ह्या इंडोनेशियातल्या इस्लामी बंधूंवर प्राचीन भारतीय संस्कृतीचा छाप टिकून आहे. अर्थात काही शब्द भलतेच घोटाळ्यात टाकतात. मलायमध्ये मोठ्या बहिणीला `काका' म्हणतात. पण `काकी' म्हणजे पाय! डुकराला `बाबी' म्हणतात! छातीला `दादा' म्हणतात, पण पाठीला वहिनी म्हणत नाहीत! डोळ्याला `माता' पण `मातामाता' असे दोनदा म्हटले की पोलीस! आजीला `नेने' पण आजोबा लेले नव्हेत! अनेकवचने करणे फार सोपे. तोच शब्द दोनदा उच्चारायचा! `मुका' म्हणजे चेहरा आणि `मुकामुका' म्हणजे चेहरे. चेहरा आणि मुका यांचे अद्वैत मानणारे हे लोक थोरच. पण खरा मुका घेण्याला मात्र `चिओंब' म्हणून चुंबण्याच्या जवळ जातात. छातीला `दादा' म्हणणारे बहाद्दर हदयाला `चिंता' म्हणतात आणि प्रेयसीला चिंतातुर न म्हणता `चिंता मानिस' म्हणतात. `मानीस' म्हणजे गोड! आणि `पडास' म्हणजे तिखट! बाकी मलाय स्त्रिया क्वचीत मानिस चिंता करायला लावतातही. एखाद्या सुस्तनीची दादागिरी कां चालते हे मलायात गेल्यावर अधिक कळते.

- पु.ल. देशपांडे 
पुर्वरंग

Tuesday, September 18, 2007

मायदेश

शिवाजी महाराज आणि लोकमान्य यांच्या स्मरणाने आजही गदगद्णारे लोक आम्ही.मायदेशहून येणाऱ्या पत्रांची आणि वर्तमान पत्रांची वाट बघत इथली मराठी माणसे एकमेकांना धरून आहेत. मी ह्या परदेशच्या प्रवासात एकूण हेच पहात आलो. दूर देशी जावे, अफाट पैसा मिळवावा, त्या त्या देशांच्या संस्कृतीशी समरस व्हावे-- तिथले लोक निशागारात जातात म्हणून आपणही जावे, त्यांनी बॉलडान्स केला कि आपण करावा,त्यांच्या बायकांची वेषभूषा - केशभूषा आपण स्विकारावी, असली स्वत्व सोडायला लावणारी समरसता आपल्या मराठी मंडळींत बरीच कमी- मराठी बायकांना मोकळेपणाने मद्यपान किंवा धूम्रपान करताना मी क्वचितच पाहिले आहे.

साहेबाने आपला आपला क्रॉस जगभर नेला आणि कुठल्याही देशात तो राहिला तरी आपल्या घरात तो क्रॉस लावतो.ख्रिस्ताची तसबीर लावतो. तो फॉरवर्ड! आणि आम्ही आमच्या बजरंगाची किंवा गणरायाची तसबीर लावली तर ते बॅकवर्ड! हे केवळ गुलामीचे पाप.एखादी देवाची तसबीर. एखादे शिवाजी- राणाप्रतापाचे चित्र, एखादे मराठी पुस्तक मायदेशाशी आपले नाते ठेवते. 

परदेशात गेल्यावर आपल्या मायभूमीची नाळ अजिबात कापून टाकायला नको. परदेशची गोष्टच सोडा, पण इथे देखिल काही मराठी आया इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या आपल्या मुलांचे इंग्रजीतून लाड करताना दिसतात तेव्हा मला संताप येतो. त्या घरी पुन्हा जाऊ नये असे वाटते. जगातल्या कुठल्याही इतर देशातल्या माता आपल्या लेकरांचे परक्यांच्या भाषेतून लाड करीत नाहीत. हे म्हणजे स्वतःचे स्तन्य असताना शेजारणीचे उसणे आणून
पाजण्यासारखे आहे.

पु.ल. देशपांडे
-पुर्वरंग

Monday, September 10, 2007

काय वाट्टेल ते होईल – पु. ल. देशपांडे

काय वाट्टेल ते होईल – पु. ल. देशपांडे
अनुवाद वाटतच नाही इतक्या सहजसुंदर भाषेत पु. लं. नी लिहिलेली ही एका अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या जॉर्जियन माणसाची ही आत्मकथा.---


जॉर्जियामधल्या लहानश्या खेड्यातून फक्त पडेल ते काम करण्याची तयारी आणि जगण्याचा उत्साह एवढंच भांडवल घेऊन एका ग्रीक बोटीने जॉर्जी आयव्होनिच अमेरिकेत प्रवेशतो. किनाऱ्यावर पोहचण्याआधीच या माणसाने खाण्यापिण्यात आपल्याजवळ असलेले तुटपुंजे पैसे संपवलेले. बोटीत शिरलेला एक टोप्या विकणारा जॉर्जीची नवीकोरी रशियन फरटोपी घेऊन त्याला बदल्यात एक डॉलर आणि दुसरी ‘अस्सल अमेरिकन’ टोपी देतो. ‘अमेरिकेत गुजराण होण्याइतका पैसा’ असल्याशिवाय अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी नाही. पण नोटांचे एक बंडल भाड्याने देणारा त्यांच्यातलाच एक माणूस जॉर्जी ला भेटतो आणि हे नोटांचे बंडल दाखवून झाल्यावर परतीच्या बोलीवर एक डॉलर भाड्याने घेऊन जॉर्जी अमेरिकेत प्रवेश करतो. अमेरिकेत आल्याआल्या तो आपला पासपोर्ट ‘परदेशी असल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी’ फाडून टाकतो.

जॉर्जीचा अमेरिकेतील मार्ग खडतर आहे. त्याची आपल्या देशात वाखाणली गेलेली कौशल्ये, म्हणजे तलवारींना धार लावणे आणि चाबकाच्या चामडी मुठींवर नक्षीकाम करणे, यांना अमेरिकेत स्थान नाही. मित्र झुराबेगच्या मदतीने त्याला एका उपाहारगृहात बश्या-ग्लासे विसळायची नोकरी मिळते. पण पहिल्याच दिवशी धांदरटपणाने सर्व ग्लास फुटल्याने मालकीण त्याला नोकरीवरून जायला सांगते. ती निघताना त्याला देणार असलेले पाच डॉलरही जॉर्जी बाणेदारपणे नाकारतो. ‘मी काम केलंच नाही तर पैसे कशाला घेऊ’ म्हणून तो परत रिकाम्या पोटी आणि रिकाम्या खिशाने बाहेर पडतो. रात्री बाकावर झोपलेला असताना त्याच्यासमोर बंद पडलेली एका अमेरिकनाची गाडी तो चालू करून देतो आणि हा मनुष्य त्याला त्याच्या गॅरेजात नोकरी देतो.

जॉर्जीच्या या आत्मचरित्रात त्याने अनेक नोकऱ्या धरलेल्या आणि सोडलेल्या दाखवलेल्या आहेत. हा माणूस कोणत्याही अडचणीने आणि अपयशाने खचला नाही. जॉर्जीला गॅरेजात नोकरी देणारा माणूस काही कारणाने त्याच्या गावी निघून गेला. मग जॉर्जीने प्लॅस्टरचे साचे बनवणाऱ्या छोट्या कंपनीत नोकरी धरली. ही नोकरी सुटण्याची कथा मोठी मजेशीर. जॉर्जीच्या शब्दातच सांगायचं झालं तर ‘पेंटरसाहेबांनी मला उंटाचा ठसा करायला सांगितला. हा उंट अगदीच गायीसारखा दिसत होता. हे असलं येडंबिद्रं जनावर बनवायची मला अगदीच शरम वाटायला लागली. म्हणून मी इकडेतिकडे अदलाबदल करून त्याला जरा उंटांत आणायला गेलो. पेंटरसाहेबांनी हे पाहिलं. आपण लंडन, प्यारीस, ड्रेसडेन या गावांतल्या शाळांतून चित्रकलेचं शिक्षण कसं घेतलं हे सांगायला सुरुवात केली. आता जाताजाता माझा प्वाइंट इतकाच होता की या गावांत उंट राहत असल्याचं मी कधी ऐकलं नव्हतं. झालं! आम्हाला तिथूनही नारळ मिळाला.’ पुढे जॉर्जीची एका गोंदाच्या कारखान्यात नोकरी, तिथून इंग्रजी येत नसल्याने त्याला मिळालेला डच्चू, नंतर एका लाँड्रीत मिळालेली,विशेष न आवडणारी पण पोटापुरते देणारी नोकरी अशा अनेक नोकऱ्या धरसोड करून जॉर्जी शहरेही बदलत राहतो.

स्वाभिमानी पण प्रेमळ, क्वचितप्रसंगी बिलंदर पण बहुतेकदा शक्यतो सत्याची कास धरणारा जॉर्जी आयव्होनिच मनाला भिडतो. जॉर्जीला पोट भरण्यासाठी नोकरीची गरज आहे. पण त्यासाठी त्याला दुसऱ्याचे पाय ओढायचे नाहीत.संपावर गेलेल्या कामगारांना ‘काम तुमच्याशिवाय चालू आहे’ हे दाखवून जेरीस आणण्यासाठी जॉर्जीला आणि इतर मोजक्या परदेशी माणसांना मिस्टर ब्लॅक नावाचा कारखानदार जवळजवळ दुप्पट रोजावर ठेवतो. इंग्रजी न कळणाऱ्या जॉर्जीला हे आपल्या रशियन सहकाऱ्यांकडून नंतर कळते.’मी स्वखुशीने नोकरी सोडून जात आहे’ असे पत्र साहेबाकडून मागायला तो साहेबाकडे जातो. साहेब त्याला ‘संपवाले बाहेर गेल्यावर तुला मारतील’ अशी भीती दाखवतो. जॉर्जीचे त्यावर उत्तर ‘एखाद्याची मी बायको चोरली..पैसे, पोरं चोरली तर तो मला रस्त्यात थांबवून जाब विचारेल. पण एखाद्याची चाकरीच चोरली तर हे सगळंच चोरल्यासारखं आहे. तो मला बडवेल नाही तर काय करेल? मर्द असला तर असंच करेल.’

फुले तोडत नसतानाही मित्रांनी फुले तोडली आणि हा फुले हातात घेऊन उभा म्हणून जॉर्जीला शिपाई पकडतो आणि कोर्टात बोलावणं येतं. इतर कामगार मित्र एक दिवसाचा पगार बुडेल म्हणून कोर्टात न जाता दंड पाठवून देण्याचा सल्ला देत असतानाही ‘मी गुन्हा केलेला नसताना केला का म्हणू’ म्हणून जॉर्जी कोर्टात जातो.जज्जाने विचारल्यावर पाठ केलेलं एकमेव इंग्रजी वाक्य पण चुकीचं बोलतो. ‘नाकबूल,युवर ऑनेस्टी!’ म्हणतो. जज्जाने ‘जॉर्जियात असताना कोणाचा खून, चोरी वगैरे केली आहे का?’ ‘खून ना, शेकड्याने केलेत. नंतर मोजणं पण सोडून दिलं’ असं बेधडक उत्तर देतो. आणि जज्ज बुचकळ्यांत पडल्यावर ‘कामच होतं आपलं,साहेब. दिसला जर्मन की घाल गोळी. सैन्यात होतो मी.’ असे सांगतो. जॉर्जी प्रामाणिक आहे.लाच देऊन गोष्टी गुंडाळण्याऐवजी तो पैसे गेले तरी बेहत्तर, पण स्वतःचं निरपराधीत्व पटवून देण्याला जास्त महत्त्व देतो.

मूळ इंग्रजी पुस्तक अद्याप वाचायचा योग आला नाही, पण पु. लं. ची भाषा इतकी खुमासदार आहे की हे अनुवादीत पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतेच. “आनाबाईशी बोलणं म्हणजे भिजल्या स्पंजाशी बोलण्यागत. जरा दाबलं की पाणी!” लग्नाच्या मेजवानीत मुसे(डेझर्ट) आणू म्हटल्यावर “मुसे बिसे ठीक आहे. मी कबाब करीन(मला वाटलं मुसे म्हणजे हरणासारखं काही तरी असेल.)” दोन बुटांना पॉलिशसाठी दोन पोरं बोलावणाऱ्या मिस्टर ब्लॅकला बघून “बरं झालं हा आठ पायाचा कोळी नाही,नाहीतर पायाशी पालिशवाल्या पोरांची पलटणच बसवावी लागली असती” “ल्यूबा तर आपलंच शेपूट आपणच तुडवलेल्या मांजरीसारखी फुसफुसत होती”,जॉनकाकाच्या अंत्यसभेत “लोकांनी त्याच्या गुणाची वर्णनं करणारी भाषणं केली‍. जॉनकाकाला त्याची गरजच नव्हती.त्याने केलेली सत्कृत्यं त्याच्या पेटीभोवती जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर ठळक अक्षरात लिहिलेली होती.त्यांच्या मेणबत्तीच्या प्रकाशात चमकणाऱ्या आसवांच्या हिऱ्यात तोलली जात होती” हे वर्णन, “आम्हाला त्यांच्या विशाल टेबला भोवती बसण्याचा मान मिळाला आहे. हे विशाल टेबल म्हणजे अमेरिका. खूप वर्षं आम्ही त्या विशाल टेबला भोवती गोळा होऊन आमचा जो जो पाहुणचार ते करतायत त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करीत आहो. चांगले पाहुणे म्हणून राहण्याचा आमचा प्रयत्न आहे.” ही चालिकोची आणि इतर परदेशी माणसांची अमेरिकेविषयी कृतज्ञता ही सर्व वाक्ये मनाला भिडून आपल्याच मनातलं काहीतरी आपल्यापुढे आणून जातात.

जॉर्जी अमेरिकन मुलीशी लग्न करायला निघतो तेव्हा त्याच्या इतर मित्रांनी त्याला दिलेले सावधगिरीचे इशारे, “अमेरिकन मुली बोजट(बजेट) बाळगतात. म्हणजे तुला काही खर्च करण्यापूर्वी त्यात मांडून ठेवावं लागतं लग्न झाल्यापासून सहा महिन्यात नुसत्या शरमेनेच खतम होशील! आणि तुझी मर्तिकाची पेटी उचलणाऱ्यांना पण जेवण मिळेल असं समजतोस? छट! फार फार तर एक कप चहा!” आणि यावर जॉनकाकाचे समजूत घालणे “त्यांनी एकमेकांना वचन दिलं आहे. जी काही नुकसानी व्हायची ती झाली आहे.फिकीर करू नकोस, बिजो बेट्या! वीस वर्षं आपली तुपली दोस्ती आहे. इथून तुटणार नाही.” जॉर्जी हा माणसातला आणि माणूसवेडा माणूस आहे. “प्रत्येक कुटुंबात एक आजी हवी.त्याशिवाय घराला शोभा नाही.” हे लग्न ठरल्यानंतर त्याचे आजेसासूबद्दलचे उद्गार अगदी आपल्या संस्कृतीतलेच वाटतात.

पैसे कमावायला जोडधंदा म्हणून कातड्यासाठी सोनेरी कोल्हा कोल्ही पाळणे, ‘खिंकाली’ बनवून विकणे,अधेमधे शोध लावणे, शेती करणे,जॉनकाकाचा सँडविच चा धंदा चालवणे, भंगारवाल्याचं दुकान काढणे असे अनेक उद्योग जॉर्जी करताना दिसतो. हा माणूस हरहुन्नरी आहे. आपल्या धडपड्या आणि स्वतःची पर्वा न करता इतरांना मदत करण्याच्या स्वभावामुळे तो कधीकधी अडचणीत सुद्धा सापडतो. डिट्रॉय शहरात सट्टेबाजारामुळे मंदी आल्यावर स्वतःची नोकरी शाबूत असूनही “इतर पोराबाळांच्या धन्यांच्या नोकऱ्या सुटलेल्या पाहून मला माझी नोकरी टिकवून धरणं पटेना.मीही सोडली.” म्हणून तो भंगाराचे दुकान चालू करतो.त्याची घरमालकीण आनाबाई तिला आणि तिच्या दोन लहान मुलांना सोबत म्हणून जॉर्जीलापण शहर सोडून कॅलिफोर्नियाला यायला विनवते.आनाबाईचे वडील जॉर्जीला विश्रांती देण्यासाठी थोडावेळ ट्रक चालवतात तेही ट्रक गाळात रुतवून जॉर्जीला आणखीच अडचणीत आणतात. रेड इंडियन लोकांकडून ट्रक बाहेर काढून घेण्याच्या प्रयत्नात जॉर्जी असताना ते रेड इंडियन म्हणून त्यांच्याशी आनाबाई आणि कुटुंबीय फटकून वागतात. वाटेत प्रवासखर्चाचे पैसे कमी पडल्यावर सामान विकून सगळे पुढे जाण्याचा सल्ला नाकारून जॉर्जी आणि नादुरुस्त सामानाच्या ट्रकला एकटे सोडून इतर मंडळी पुढे निघतात. इतरांमुळे आलेल्या अडचणींवर मात करत आणि तरीही कोणाविषयी मनात कटुता न ठेवता परत इतरांना मदत करत जॉर्जीची जीवनाची वाटचाल चालू आहे.

‘जॉनकाका’ हेही एक आगळं पात्र. ऐंशी पंचाऐंशी वर्षाच्या आसपास वय असलेला हा रशियन एक कुशल स्वयंपाकी आहे. पण त्याला पैशाची हाव नाही. एक छोटं उपाहारगृह चालवून आणि बऱ्याच गरजू माणसांना फुकटात जेवू घालून आधार देणं ही त्याची हौस.जॉर्जीला ब्लाडिओस्टॉकमध्ये योगायोगानेच भेटलेला हा म्हातारा त्याच्या रुक्ष उमेदवारीत थोडी रंगत आणतो.अमेरिकेतही जॉनकाका आलाय म्हटल्यावर जॉर्जी त्याच्या शहरात जाऊन सर्व हॉटेलं बघून त्याला शोधून काढतो. जॉनकाका जॉर्जीच्या लग्नातही त्याला भरघोस आहेर आणि मदत करतो. चांकोसारखा अर्धवट माणूस जवळ बाळगतो. कारण चांकोला जगानं वेडा ठरवलं, दगडं मारली तरी “जग सर्वांसाठी आहे” या तत्त्वाने जॉनकाका त्याला आपल्या हाताशी घेतो.मरणाच्या काही दिवस आधी जॉनकाका धंदा विकून आलेल्या पैशातून सर्व मित्रांना किंमती भेटवस्तू घेण्याच्या उपद्व्यापात असतो. सँडविचचा धंदा जॉर्जीला सांभाळायला देऊन तो आजारी मित्र बोरीसला पाहायला निघून जातो. धंदा तोट्यात चालत असल्याचं जॉर्जीने कळवल्यावरही “येईल त्या किमतीला विकून टाका. धंदा परत उभा करता येईल पण बोरीससारखा मित्र परत नाही मिळणार” असे कळवून धंद्यावरही पाणी सोडतो.”पेट्रोग्राडला आयुष्य इथल्यासारखं भरभर जात नाही” म्हणून मोठ्या शहरात आचारी बनणं टाळून छोट्याश्या शहरातच आपली खाणावळ चालवतो. जॉर्जीची बायको हेलेना हिला लग्नानंतर निरोप देताना तिच्या कानात “जॉर्जियन माणसाला वाढत असशील तर त्याच्या पानात भरपूर वाढ. तेव्हा कुठे त्याला ते बेताचं वाटेल” असा सल्ला देतो.

हेलेना ,जॉर्जीची बायकोही एका परदेशी माणसाशी लग्न करून संसारात जुळवून घेणारी. त्याच्या मित्रांचा आणि आल्यागेल्यांचा अगत्याने पाहुणचार करणारी. हुशार आणि नवीन चालीरीती शिकण्यासाठी उत्सुक असलेली. आणि विशेष म्हणजे “अमेरिकन मुलीशी लग्न करणं म्हणजे मोठी आफत पत्करणं” हा जॉर्जीच्या मित्रांचा ग्रह आपल्या अगत्यशीलतेने खोटा ठरवणारी. जॉर्जीला तिच्याविषयी वाटणारा अभिमान पुस्तकाच्या पानापानातून जाणवतो.

पुस्तकातले काही प्रसंग मजेशीर आहेत. भटारखान्यातून फुगणाऱ्या पावाच्या कणकेला बसमधल्या बाईने घाबरून रशियन माणसाने बाळगलेला बाँबगोळा समजणे, जॉर्जीने जुन्या बॅटरीतले शीसे वितळवून ते चाकाच्या सांध्यात ओतून दुसऱ्या मोठ्या गाडीचे चाक आपल्या ट्रकाला बसवणे, जमिनीच्या व्यवहारात जॉर्जीला फसवणाऱ्या दलालाला झापून पैसे परत घेण्यासाठी गेलेल्या मित्रांनी दलालाच्या भाषणाने प्रभावित होऊन स्वतःही जमिनीसाठी नाव नोंदवणे,उकाड्यात फक्त अर्ध्या चड्डीवर घड्याळ दुरुस्त करत असलेल्या जॉर्जीने शेजारीणबाई आलेली पाहून मोठ्या घड्याळात लपणे आणि घरातल्या वस्तू तिला कौतुकाने दाखवताना हेलेनने त्याच घड्याळाचे दार उघडून दाखवणे,चांकोने पाव डॉलरच्या सँडविचच्या काही खोक्यात एक एक डॉलर लपवून ठेवून विक्री वाढवणे,’बेथलेम’ चा उच्चार फोनवर नीट न सांगितल्याने हेलेनच्या मैत्रिणीने जवळपासच्या सर्व गावांत जाऊन पाहणे, इलारियनचा नर्व्हस ब्रेक डाउन मारामारी केल्यावर बरा होणे इ.इ.

पुस्तकाविषयी आणखी एक विशेष म्हणजे मूळ पुस्तकातील कोट्यांचे शब्दशः भाषांतर न करता समांतर मराठी शब्दप्रयोगांतून विनोदनिर्मिती. जॉर्जी लहानपणी पाण्यात पाहिलेल्या राक्षसांच्या(?) कवट्यांविषयी सांगत असताना मिस्टर मॉकेट त्याला विचारतात: “मग तुम्ही यावर एखादा प्रबंध नाही लिहिला?” जॉर्जीला “प्रबंध” शब्द न कळून “मी कशाला त्यांना प्रतिबंध करू” असे विचारतो. पुस्तकातली खाद्यपदार्थाची नावे आणि वर्णनेही रुचकर आहेत. ‘(खिमा भरलेल्या करंजीसारखी)खिंकाली’,'अंड्याची कचोरी उर्फ पिरोष्की’,'नऊ थराचा बकरीच्या लोण्याचा स्कापोर्सेला केक’,'लसणाच्या चटणीबरोबर कबाब’,'चाचोबिली(टॉमेटोत शिजवलेले मटन)’,'मर्तिकाचा मसालेदार शिलापुलाव’,'संत्र्याचा रस आणि व्हिस्कीची बनवलेली ‘बायलो”,’अंड्याचं लोणचं’,'अनेस्पेंदाल’,'लिंबाच्या फोडी तोंडात ठेवून भाजलेला कलमाकी मासा’,'गाभोळीचं लोणचं’,'बेशे(उकडलेल्या मुळ्या घालून बनवलेली सागुती)’,'चुचकेला म्हणजेच पाकात घोळवून ओवलेली द्राक्षांची माळ’ या पदार्थांबद्दल कुतूहल चाळवतं. तसेच “नमस्कार! युद्धात शत्रूपुढे तुमचा सदैव विजय असो!” हा एका जॉर्जियनाने दुसऱ्या जॉर्जियनाला केलेला रामरामही मजेशीर वाटतो.

शेती न जमल्याची जॉर्जीची कबुली पण प्रांजळ आहे.”धरती ओळखते” म्हणून मेहनतीला मागेपुढे न पाहता भरपूर खपून स्वतः केलेली टॉमेटोची शेती वादळ आणि दलालांच्या व्यवहारांमुळे तोट्यात जाते तेव्हा असं का याचा विचार करताना जॉर्जी म्हणतो, “स्वतःच्या जमिनीवर आपल्या दोन हातांनी राबणाऱ्याला शेतीवर भाकरी मिळवता येऊ नये?शक्य नाही.तसं असेल तर या जगाची सुरुवातच कशी झाली? दुसरं एखादं कारण असेल.पण कोणतं कारण??” “फक्त हौस आणि दुय्यम धंदा म्हणून सुकलेली फळफळावळ आणि मोरांचं संगोपन एवढंच केलं नव्हतं” या शब्दात त्याचं शेतीच्या प्रयोगांबद्दलचं वर्णनच पुरेसं बोलकं आहे.

या साऱ्या अनुभवांतूनच जॉर्जीला अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर आलेला आणि अनेक वर्षे अमेरिकेत राहून कायम असलेला अनुभव पक्का होत जातो. “अमेरिका हा असा देश आहे जिथे काहीही घडू शकतं.काहीही होईल.काय वाट्टेल ते होईल.”

जॉर्जीचं आत्मचरित्र अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या आणि स्थायिक झालेल्या एका माणसाचा जीवनप्रवास रंगतदारपणे रेखाटतं. पु. लं. च्याच प्रस्तावनेतील शब्दात सांगायचं तर-
“सर्वांनी एकत्र बसून जेवावे, खावे,प्यावे,क्षुद्र भेदाभेद विसरावे,आनंदात राहावे या प्रार्थनेवरच हे पुस्तक संपते. हसतखेळत, खातपीत, माणुसकीचे साधेसुधे नियम पाळीत अवघ्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी इच्छा बाळगणारा जॉर्जी आपणा सर्वच सामान्य माणसांचे विचार बोलतो.दुर्दैवाने आजच्या जगातील असामान्यांना हे सामान्यांचे माणुसकीचे बोल कळत नाहीत. हा जॉर्जी मला आपला वाटला. म्हणून त्याच्या पुस्तकाचे हे मराठी रुपांतर मी केवळ मराठी जाणणाऱ्यांसाठी केले आहे.”
-------------------------------------

Saturday, August 18, 2007

नाथा कामत

प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.

मुळ स्त्रोत -- विकिपीडिया

नाथा कामत हे प्राणिमात्र माझ्या जीवनात का म्हणून आले आहे आणि दातांत काहीतरी अडकावे तसे का अडकून राहिले आहे, माझ्या मनात त्याच्याविषयी निश्र्चितपणाने कोणत्या भावना आहेत, याचा अजून माझा मलाच नीट उलगडा झालेला नाही या जन्मात होणार नाही.

"बाबा रे ! तुझं जग निराळं आणि माझं निराळं!" नाथा कामत कुळकर्ण्याच्या हॉटेलात हातातले भजे दोन्ही बाजूंनी राणीछाप रुपया निरखून पाहावा तसे उलटून पालटून पाहत मला अनेक वेळा हताश होत्साता सांगत होता. त्याच्या ह्या अशा वागण्यातल्या दोन गोष्टी मला आवडत नाहीत. एक म्हणजे खाण्याचा पदार्थ निरखून पाहत खाणे. नाथा कामताला ही फार वाईट खोड आहे. अर्थात आपले सर्व उसासे, निःश्र्वास इ० माझ्यावर सोडण्यासाठी मला तो होऊन हॉटेलात घेऊन जात असल्यामुळे त्याने भजेच काय पण बटाटेपोह्यांतला प्रत्येक पोहा आणि मातीत सोने सापडावे तस्स दुर्मीळ मार्गाने सापडणारा बटाट्याचा एक-सहस्त्रांश तुकडा जरी निरखून पाहिला तरी मला त्याबद्दल तोंड उघडता येत नाही. पण दुसरी न आवडणारी गोष्ट मात्र तापदायक आहे. मला कुणी 'बाबा' शब्दाचे 'हे बाबा'. 'भो बाबा' किंवा 'बाबा रे' हे संबोधन वापरले की चीड येते. 'बाबा रे' ह्या शब्दाने वाक्याची सुरूवात करणारी माणसे ऎकणाराला एकदम खालच्या पातळीवर आणून बसवतात. 'बाबा रे' ह्या शब्दापुढे "वत्सा, तू अजाण आहेस.". "बेटा, दुनिया काय आहे हे तू पहिचानलं नाहीस", "हा भवसागर दुस्तर आहे.", "प्राण्या, रामकथारस पी" अशांसारखी अनेक वाक्ये गुप्तपणाने वावरत असतात.

नाथा कामताच्या वाक्यातला 'बाबा रे' हा एवढा तिरस्कारणीय अतएव त्याज्य जातीचा शब्द सोडला तर `त्याचं जग निराळं आणि माझं जग निराळं' ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. मी राष्ट्रभाषेत `गौ आदमी' किंवा अल्लाघरची गाय होतो. ("शुद्ध बैलोबा आहे" हे माझ्याविषयीचे ज्येष्ठ नातलगांतली चालू मत चिंत्य आहे.) मी अल्लाघरची गाय होतो आणि नाथा कामत हा-- अल्लाघरी असतात की नाही मला ठाऊक नाही, पण--अल्लाघरचा मोर होता. सदैव आपला पिसारा फुलवून नित्यनुतन लांडोरीच्या शोधात. त्यला घडवताना विधात्याने रोमियो, मजनू, फरहाद, हिररांझा ह्या पंजाबी नरमादीपैकी जो कोणी नर असेल तो, सोणीमहीवालमधला वाल किंवा महीवाल आणि क्लिंओपात्रा ते कान्होपात्रा ह्या व अशांसारख्या हजारो सुंदरींवर जीव ओवाळीत राहणे एवढेच कार्य केलेले जे जे म्हणून परदेशी व एतद्देशीय गडी होऊन गेले त्यांचे नकाशे संबंधित अधिका-यांकडून मागवले असतील आणि त्यानंतर नाथा कामत नावाचा पदार्थ तो विधाता करिता होऊन चार महिन्यांच्या शेपशयनी जाता झाला असेल.

कुठल्याही शहरवस्तीतल्या रस्त्यातून नाथा कामताबरोबर चालत जाण्यापेक्षा गोवीच्या वाळवंटातून भर दुपारी अनवाणी धावत जाणे अधिक सुखावह! पातळ, लुगडे किंवा स्कर्ट गुंडाळून द्र्ष्टिपथातून काहीही सरकल्यासारखे झाले की नाथा कामताचे पंचप्राण डोळ्यांत येऊन गोठतात, गळ्यातले आदामचे सफरचंद सुतार लोकांकडे लेव्हल मोजायचे यंत्र असते त्यातल्या बुडबुड्यासारखे खालीवर व्हायला लागते, मानेचा कोन उलटा फिरत तीनशेसाठ अंशांचा प्रवास करून येतो. आणि वस्त्रन्वित वस्तू जरा देखण्यातली निघाली की नाथाच्या बुटाला चाके लावल्यासारखा तो अधांतरी तरंगू लागतो. ह्या तुर्यावस्थेतून सहजभावात यायला काही मिनिटे जावे लागतात. मग आपल्या त्या टायने आवळलेल्या गळ्यातून `गटळळगर्रगम' अशांसारख्या अक्षरांनी वर्णन करता येण्यासारख्या आवाज काढून तो भानावर येतो.

नाथाची आणि माझी मैत्री ही एखाद्याला आपोआप सर्दी व्हावी तशी झाली. त्याच्या आणि माझ्या आवडीनिवडी सारख्या नाहीत. माझे कपडे शिवणारा शिंपी तंबोऱ्याच्या गवसण्या, तबल्याच्या खोळी, उशांचे अभ्रे वगैरे शिवून उरलेल्या वेळात सद्रे, कोट वगैरे माणसे झाकायची कापडे शिवणारा; तर नाथाचा कोट कोटात शिवला जातो, पॅंट भायखळ्याला आणि शर्ट सॅंडहर्स्ट रोडवरच्या स्पेशलिस्टाकडे! त्याला मेट्रोला कुठले पिक्चर आहे, एलिझाबेथ टेलरची सध्या प्रकृती कशी आहे, रिटा हेवर्थ अधिक दाहक की जिना लोलिब्रिजीडा, ब्रिजित बार्दोची मापे, वगैरे गोष्टींचा लळा तर मी गावातल्या गावात व्यंकटेश टॉकिजमध्ये 'भक्त सुदामा' पाहणाऱ्यांपैकी! त्याच्या माझ्या वयांत खूप फरक आहे. तो आणि मी एका कचेरीत नोकरीला नाही तरीदेखील उभ्या गावाला आमच्या मैत्रीची माहिती आहे. गावकरी मंडळीना वास्तविक हे अजब वाटते. नाथा एरवी गावात फारसा मिसळणाऱ्यांतला नाही. तो देहाने पार्ल्यात असला तरी मनाने चौपाटीवर नाहीतर रेक्लेमेशनवर असतो. कारणपरत्वे हिंदू कॉलनीच्या गल्ल्यांत अथवा शिवाजी पार्कवर आढळतो. गिरगाव रस्त्याला खोताची वाडी जिथे 'टांग जराशी' मारते त्या नाक्यावर शनिवारी पाच ते साडेसहा ट्रॅफिक पोलिसाची ड्युटी लावावी तसा उभा असतो.

त्याचा थोरला भाऊ गणपती आणि मी एका वर्गातले. पण नाथा आणि गणपती हे भाऊभाऊ आहेत हे केवळ वडिलांचे नाव आणि आडनाव तेच लावतात म्हणून खरे मानायचे. गणपती मॅट्रिक झाल्यावर महिन्याभरातच पोस्टात चिकटला आणि गेली कित्येक वर्षे लिफाफ्याला स्टांप चिकटून राहावा तसा पोस्टखात्याला चिकटून आहे.

आणि नाथाच्या मात्र शेकडो नोकर्‍या झाल्या. त्याने नोकर्‍या आधिक केल्या की 'प्रेम' हे सांगणे बिकट आहे. `नाथाच्या घरची उलटीच खूण' ही ओळ नाथा कामताच्या घराला सगळ्यांत जास्त लागू पडेल. वडील नाना कामत आणि आई आई कामत ही श्रावणबाळाच्या मातापितरांइतकी सालस. नाना कामत अनेक वर्षापूर्वी अकौटंट जनरलच्या हपिसातून रिटायर होऊन बसले. जवळच्या पुंजीतून आणि अलिबागजवळच्या खेड्यातली आपली वाडवडिलार्जित शेतीवाडी, घरदार विकून पार्ल्याला एक घर बांधले. त्यांच्या घराला कामतवाडी असे म्हणतात. ते एवढेसे घर आणि ती एवढीशी बाग ह्याला कामतवाडी म्हणणे म्हणजे उंदराला ऎरावत किंवा टांग्याच्या घोड्याला हयग्रीव म्हणण्यापैकी आहे. नाना कामत हा देवमाणूस; नाथाची आई म्हणजे तर केवळ माउली. गणपती पोस्टाच्या खांबासारखा निर्विकार. मांडीला तीनतीन वर्षे नवे धोतर न लावणारा. ह्या वयात चष्म्याच्या काडीला सूत गुंडाळणारा. पोरांच्या पाठीत हात वर करुन धपाटेदेखील न मारता येणारा. नंबर दोनचा सदाशिवदेखील तसाच. कुठल्यातरी आगीच्या विमा कंपनीत आहे, पण स्वभावाने जळाहूनही शीतळू! रस्त्यात हे भाऊ एकमेकांना दिसले तर मान उचलून वरदेखील पाहत नाहीत. त्यानंतरच्या भगीनी व्हर्नाक्युलर फाइनलापर्यंत शिकल्या, एके दिवशी बोहल्यावर चढल्या आणि सासरी गेल्या. शेवटला नाथा! हा मात्र अनेक वर्षे मुंजाच राहिला. अनेक पिंपळांवर बसला. पण ह्यालाच पिंपळांनी झपाटले आणि शेवटी एकदा---पण ती कथा पुढे येतेच आहे. "तुम्ही तरी आमच्या नाथाला काही सांगून पाहा--तुमचं त्याचं रहस्य आहे नाही म्हटलं तरी." नाना कामत डोळ्यांत पाणी आणून मला सांगत. आमचे घर टाकून चार घरे पलीकडे नाना कामतांची कामतवाडी.

"मी काय नाथाला सांगणार? तो जे जे काही सांगतो ते तुम्हाला सांगितलं तर पुढल्या महिन्याची पेन्शन आणायला जाणार नाही तुम्ही." हे सगळे मी स्वरात म्हणतो. उघड मात्र "बघू. अहो, लग्न हादेखील योग आहे" वगैरे वाक्ये असतात.

नाथा मात्र मला सारखे काही ना काहीतरी सांगत असतो हे खरे. माझ्या व्यक्तीमत्वात ही काय गोम आहे मला कळत नाही. माझ्यापाशी अनेक लोक आपली अंतःकरणे उघडी करतात. आमच्या गल्लीतले काका राऊत अगदी आतल्या गाठीचे म्हणून प्रसिद्ध आहेत. पण तेदेखील माझ्यापुढे ती गाठ सोडून बसतात. त्यांचा जावई (गुलाबचा नवरा) रामराव म्हात्रे याने खोताच्या वाडीत कुणाला तरी ठेवले आहे ही गोष्ट काका रावताने मला काही कारण नसताना सांगितली होती. वास्तविक काही गरज नव्हती. पण माझ्यापाशी प्रत्येक गोष्ट ही सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये ठेवल्याइतकी सुरक्षित राहते अशी पार्ल्यात (पुर्व बाजू) माझी ख्याती आहे. कदाचित ह्या माझ्या व्यक्तिमत्वाचा गुण म्हणूनच नाथा आपल्या सगळ्या दर्दभऱ्या कहाण्या मला सांगत असावा. त्याच्या वडील भाऊ गणपती मला अरेतुरे करतो म्हणून माझ्यापेक्षा सहासात वर्षांनी लहान असलेला नाथादेखील मला अरेतुरेच करतो.

गोष्ट सूक्ष्म आहे, पण मला जरा बोचते. रस्त्यात चालताना माझ्या खांद्यावर कोणी हात ठेवून चाललेले मला आवडत नाही. म्हणजे माझा खांदा हा शिवाजी किंवा थोरले बाजीराव यांनीच हात ठेवण्याच्या लायकीचा आहे अशासारखा अजिबात गैरसमज नाही माझा. पण एकूणच मला शारीरीक लगट करून दाखवलेली मैत्री आवडत नाही. आणि नाथा तर सारखा माझ्या कोटाच्या बटणाशी, पाठीशी, खांद्याशी चाळा करून बोलतो आणि वर पुन्हा ते `बाबा रे' चे व्रुपद!

नाथा कामत हा स्वतःविषयीच्या हजारो गैरसमजांचा दोन पाय फुटलेला एक होल्डॉल आहे. बायकांनी आपल्याकडे पाहिले रे पाहिले की त्या आश्रमहरिर्णी सारख्या विद्ध होतात असे त्याला इमानाने वाटते. `विद्ध'.`आश्रमहारिणी' वगैरे सगळे शब्द नाथाचे! त्याची शब्दसंपत्ती मात्र बृहस्पतीला त्याच्या आसनावरून खेचून काढील अशी आहे. आम्हीही आयुष्यात `स्त्री' हा पदार्थ पाहिला; पण नाथाने जसा पाहिला ते ज्ञात्याचे पाहणे. "नार्मा शिअररच्या डोळ्यांना हेडी लमारचं नाक लावलं आणि बेटू डेवीसची हनवटी चिकटवली की केशर कोलवाळकर होते", "क्लाडेट कोलबर्टची जिवणी. लिझ टेलरची पापण्या. इनग्रिड बर्गमनचा ओव्हरऑल गेट अप मिळून आणखी कोणाशीशी होते." असे त्याचे सिद्धांत आहेत. त्याचेही एक खास मित्रांचे वर्तुळ आहे. त्याला तो आपली गॅंग म्हणतो. त्या गॅंगमध्ये नाथाला कोणी `किलर' म्हणतात, कोणी `बायालॉजिस्ट' म्हणतात. नाथा अशा वेळी खूष असतो.



"बाबा रे---" नाथा मला सांगत असतो, "दोष माझा नाही. त्या दिवशीचीच गोष्ट घे! वेलकम स्टोअर्समध्ये मी ब्लेड्स आणायला गेलो होतो. शरयू पिना आणायला आली होती."

"कोण शरयू?" माझ्या या अज्ञानजन्य (की जनंक?) प्रश्नानंतर नाथाचे डोळे एकदम ऊर्ध्व लागल्यासारखे वर गेले. माझ्या सदतीस वर्षे पेश्नन भोगलेल्या एका काकांचे डोळे एकदाच असे झालेले मी पाहिले आहेत. त्यानंतर तासाभरातच मंडळींनी टापश्या बांधल्या. नाथाचे ते तसले डोळे पाह्यची मला सवय आहे. कुठली तरी सरला, विमला धरून तो कथेचा पुर्वरंग सुरू करतो आणि माझ्या "कोण सरला?". "कोण विमल?" ह्या न चुकता होणाऱ्या अजाण सवालांनंतर त्याला हटकून ऊर्ध्व लागतो. काही वेळाने डॊळे खाली उतरवून नाथा इहलोकात आला. आणि मेलेल्या उंदराकडे आपण ज्या दृष्टीने पाहतो तसे माझ्याकडे पाहत म्हणाला,

"पार्ल्यात इतकी वर्षे राहून तुला शरयू ठाऊक नाही? हे म्हणजे हॉलिवुडमध्ये राहून ग्रेटा गार्बो कोण हे विचारण्यासारखं आहे."

"नाथा, पार्ल्याला हॉलिवुड म्हणणं म्हणजे...जाऊ दे." खरे म्हणजे मला चटकन उपमा सुचली नाही.

"पण खरंच तुला शरयू ठाऊक नाही--- पार्ल्यात इतकी वर्षे राहून..."

"नाथा, शरयू म्हणजे काय पार्लेश्र्वराचं देऊळ आहे, की नामशेजारी खाणावळ की पार्ल्याच्या प्रत्येक सुपुत्राला ठाऊक! शिवाय तू म्हणतोस ती कुठली शरयू! पार्ल्यात सत्तर एक शरयू असतील."

"होय मित्रा....." हे एक त्याचे संबोधन मला आवडत नाही. पुंडरीकाने त्याचा तो चंद्रापिड का कोण होता त्याच्याशी बोलावे अशा थाटात तो मला--- माझ्या एतदविषयक अज्ञानाची कीव करताना--- `मित्रा' असे म्हणतो. "शरयू खूप आहेत, असतील, होतील---पण आताचा वर्ण्यविषय असलेली शरयू एकमेवाद्वितीयम!" नाथा बोलायला लागला की ऎकत नाही. "आणि ती तुला ठाऊक नाही?"


"नाही!" मी उत्तरलो. तू मुसलमान होतोस का?---ह्या औरंगजेबाच्या प्रश्र्नाला संभाजीने ह्याच धिटाईने उत्तर दिले असेल.

"तुझा दोष नाही, बाबा रे! तुझं जग निराळं आणी माझं निराळं!"

हे वाक्य मी त्यानंतर आणि त्यापुर्वी शरयू, कुमुद, शालीनी, बेबी, कुंदा अशा अनेक संदर्भात स्पष्टीकरणासह ऎकले होते.

"शरयू तुला ठाऊक नाही? सोनारी रोडवरच्या तो लांडगा ठाऊक आहे तुला?"

"लांडगा?" आमच्या पार्ल्यातला डुकरे, गाढवे, पाळीव आणि कुलुंगी कुत्री आणि कुणा अनामिक मारवाड्याच्या भर बाजारात ठाण मांडून ट्राफिक अडकवणाऱ्या आणि काही म्हाताऱ्या डोळ्यांना शेपटीची सोय करणाऱ्या गाई हा प्राणिसंग्रह मला परिचीत आहे. पण हौसेने लांडगा बाळगणारा गाढव पार्ल्यात राहत असेल अशी कल्पना नव्हती.

"कोण लांडगा?" मी पुन्हा विचारले.

"तो---भाईसाहेब प्रधान हे माणसाचं नाव धारण करून सबरजिस्ट्रार नावाचा हुद्दा मिरवणारा जंतू!"

अविवाहीत तरूणींच्या बापांविषयी बोलताना नाथा कामताच्या जिभेवर साक्षात सरस्वती केस मोकळे सोडून, शंकराकडून रुंडमाळा उसन्या आणून गळ्यात घालून नाचते.

"त्या प्रधानांच्या निवडुंगात ही जाई फुलली आहे!" `भांगेत तुळस' ह्या मराठी वाक्र्पचारला एक तेजस्वी भावंड बहाल करीत नाथा कामत म्हणाला. मागे एकदा सरोज केरकर नावाच्या हृद्यदुखीच्या घराण्याच्या संदर्भात "बोंबलांच्या काड्यांच्या जुगड्यात केवडा आला आहे." म्हणाला होता. तिच्या बापाचा उल्लेख हिपॉपॉटेमस याखेरीज केला नाही. "बरं मी काय सांगत होतो---"

"लांडगा!" मी.

"हं. तर लांडग्याची मुलगी शरयू प्रधान!" टायचे गाठ सैल भांगातून करंगळी फिरवीत नाथाने कथा पुढे चालवली. "मी वेलकम स्टोअर्समध्ये ब्लेड्स घेतल्या. शरयूंन घेतल्या डझनभर. वेलकम स्टोअर्सचा शितू सरमळकर ठाऊक आहेच तुला!"

"मालक ना?"

"हो." पुढल्या बशीतले एक भजे चटणीत चिरडून शितू सरमळकराला चिरडल्याच्या थाटात नाथा म्हणाला. "बैल साला! ब्लेड्स हा पुरूषोपयोगी पदार्थ सोडलास तर बाकी सर्व स्त्रियोपयोगी वस्तूंचा व्यापार करणारा हा एक पाजी इसम आहे हे पार्ल्यात तरी कोणाला सांगायला नको! त्याच्या दुकानात गुलाबाच्या ताटव्यासारखं बायकांचं गिऱ्हाईक फुललेलं असतं; पण हा कोरडा ठणठणीत आहे. नाकावर शेंदुर लावतो आणि कमरेखालचा देह साबणचुऱ्याची पिशवी भरल्यासारखा अर्ध्या विजारीत कोंबून बेंबीपर्यंत उघडी पैरण घालतो."

शितू सरमळकराचे हे वर्णन खरे आहे; पण त्याचा संदर्भ कळेना. नाथा तोंडाने थैमान घालीत होता.

"त्या शित्याच्या तोंडात देवानं बुटाची जीभ घातली आहे. चेहरा वीर बभ्रुवाहनासारखा!"

"तो मरू रे! शरयूचं काय झालं सांग."

"सांगतो." चटणीत भिजलेले भजे निरखून पाहत नाथा म्हणाला, "शरयूनं आपल्या छोट्याशा पर्समधून दहाची नोट दिली. आता दहा रुपये सुटे नाहीत हे वाक्य तू शितू सरमळकराच्या जागी असतात आणि तुझ्यापुढं शरयू प्रधानसारखी जाईची कळी पिना घेत उभी असती तर कसं म्हटलं असतंस?"

नाथा कामताशी बोलताना हा एक ताप असतो. अमक्या वेळी तू काय बोलला असतास? तमक्या वेळी तू कसे उत्तर दिले असतेस? मी कसे दिले असेल? ती काय बोलली असेल? ह्याविषयीचे माझे अंदाज तो माझ्या तोंडून वदवून घेतो.

"मी आपलं सरळ म्हटलं असतं : दहा रुपये सुटे नाहीत. पैसे काय पळून जाताहेत तुमचे? आणखी काय देऊ?"

"शाबास! म्हणूनच तू शितू सरमळकर नाहीस आणि तो गेंडा स्त्रियोपयोगी स्टोअर्स चालवतो. त्या राक्षसानं ती दहाची नोट शरयूच्या अंगावर फेकली आणि सर्दी झालेल्या रेड्यासारखा त्याचा तो आवाज--- तसल्या आवाजात
तिला म्हणाला: तीन दमडीच्या वस्तू घेता आणि धाच्या नोटी काय नाचवता? शितू सरमळकर हे वाक्य शरयू प्रधानला म्हणाला--आता बोल!"

मी काय बोलणार? मी आपला सर्दी झालेल्या रेड्याचा आवाज कसा असेल ह्याचे एक ध्वनिचित्र मनाशी ऎकण्याचा प्रयत्न करीत होतो.

"बोल! गप्प का? अशा वेळी तू काय केलं असतंस?" नाथा.

"त्या सरमळकराच्या काउंटरवर मूठ आपटून त्याच्या काउंटरची काच फोडली असती---"

हे वाक्य मी आपले नाथाला बरे वाटावे म्हणून म्हटले. एरवी शितूकाका सरमळकराविषयीचे माझे मत काही इतके वाईट नाही. त्याच्या दुकानात फुलणारा गुलाबांचा ताटवा मीदेखील पाहिला आहे. त्याला त्याचे निम्मे दुकान विस्कटायला लावून शेवटी पाच नया पैशांचीदेखील वस्तू न विकत घेता जाणारी ती गुलाबे त्याचे डोके कसे फिरवीत नाहीत ह्याचेच मला नवल आहे. तीन आण्यांच्या पिनांना दहाची नोट देण्यातली गैरसोय मला पटत होती. पण समोर नाथा फकिराच्या हातातल्या धुपासारखा उसासत होता. माझ्या मुठीने सरमळकराच्या काउंटर फोडण्याच्या कल्पनेने त्याला खूपच समाधान झाले.

"बाबा रे! देअर यु आर! मी माझं अंतःकरण उघडं करून तुला ह्या साऱ्या गोष्टी सांगतो ह्याचं हेच कारण! तुझं माझं जग निराळं असलं तरी तुझी माझी वेव्हलेंग्थ जमते."

"वेव्हलेंग्थ?"

"म्हणजे माझ्या ह्रुदयात लागणारं स्टेशन तुझ्याही ह्रदयात लागू शकतं."
नाथा आता उपमांच्या शोधार्थ रेडिओ-विभागात शिरला होता. लगेच उसळून म्हणाला, "तू काच फोडली असतीस. मी त्याचं तोंड फोडलं!"

"म्हणजे मारामारी? त्या गेंड्याच्या कातडीला मी हात लावीन? मी शरयूच्या देखत बोललो त्याला..शित्या, तोंड संभाळून बोल. कोणाला बोलतो आहेस तू?"

माझी एकशे एक टक्के खात्री आहे की, शितू सरमळकराला नाथा असे काहीही बोलला नाही. एक तर शितू हा रोजच्या जेवणात ऑइलऎवजी 'क्रूड ऑइल' खाणाऱ्यांपैकी! त्याने नाथाच्या टाळक्यात पाच किलोचे वजन मारले असते. पण नाथा हे वाक्य हॉटेलात मात्र एवढ्या जोरात म्हणाला की, पलीकडच्या टेबलावरची माणसे चमकून माझ्याकडे पाहू लागली. त्यांचा उगीचच मीच 'शित्या' आहे असा गैरसमज होऊ नये म्हणून मी चटकन म्हणालो,

"असं म्हणालास तू त्या शित्याला?"

मग ती माणसे पुन्हा निमूटपणे पुढले पदार्थ गिळू लागली.

-(अपूर्ण)
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवरून पुस्तक मिळवा.

Wednesday, August 15, 2007

स्थानबध्द वुडहाऊस

मैत्र
स्थानबध्द वुडहाऊस

16 फेब्रुवारी 1975 . च्या सकाळच्या गाडीने पुण्याहून मुंबईला जायला निघालो होतो. वर्षानुवर्षे वुडहाऊस हा माझा प्रवासातला सोबती आहे . त्याची पुस्तके शिळी व्हायलाच तयार नाहीत . माझ्या प्रवासी बॅगेत इतर कोणतीही पुस्तके असली तरी वुडहाऊस हवाच . तसा घेतला . तेवढ्यात दाराच्या फटीतून ` सकाळ ` सरकला . पहिल्या पानावर वुडहाऊसच्या निधनाची बातमी . एका हातात कधीही न मरणारा वुडहाऊस आणि दुसऱ्या हाता याण्णवाव्या वर्षी वुडहाऊस मरण पावल्याची बातमी सांगणारा ` सकाळ . ' त्या क्षणी मला वुडहाऊसच्या एका उद्गाराची आठवण झाली . लेओनारा ' ही त्याची अत्यंत लाडकी एकुलती एक मुलगी वारल्याची बातमी ऐकल्यावर त्रेस्ष्ट वर्षांचा वुडहाऊस उद्गारला होता ,
"" आय थॉट शी वॉज्् इम्मॉर्टल . "" आपली लाडकी लेओनारा आणि तिचा मृत्यून ह्या दोन घटना , वुडहाऊच्या स्वप्नातही कधी एकत्र आल्या नव्हत्या . ` मला वाटलं होतं की ती अमर आहे ' ह्या एवढ्या उद्गारात जगात अपत्यवियोगाच्या वेदना भोगाव्या लागलेल्या आईबापांच्या मनावर बसणाऱ्या पहिल्या निर्घृण घावाला एखाद्या शोक - सूत्रासारखी वाचा फुटली आहे .वुडहाऊच्या निधनाची वार्ता ऐकल्यावर जगातल्या त्याच्या लक्षावधी वाचकांनीही हेच म्हटले असेल की , ` अरे , आम्हांला लाटलं होतं की तो अमर आहे .! 'वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर लिहिलेल्या त्याच्या कादंबरीतही वाचकाला खळाळून हसवायचे तेच सामर्थ्य होते . वुडहाऊसने लिहीत जायचे आणि वाचकांनी हसत हसत वाचायचे ही थोडीथोडकी नव्हे , सत्तरएक वर्षांची परंपरा होती . त्याच्या लिखानात लेखकाच्या वाढत्या वयाचा जरासाही संशय यावा असी ओळ नव्हती . कुठे थकवा नव्हता . सत्तरएक वर्षापूर्वी मांडलेला दंगा चालू होता . वुडहाऊस नसलेल्या जगातही आपल्याला रहावे लागणार आहे हा विचारच कुणाला शिवत नव्हता . पेल्हम ग्रेनव्हिल वुडहाऊस नावाचा 15 ऑक्टोबर 1881 रोजी जन्माला आलेला हा इंग्रज आपल्या लिखानाचा बाज यत्किंचितही न बदलता रोज आपल्या टेबलापाशी बसून कथा - कादंबऱ्या लिहित होता . पेल्हम ग्रेनव्हिल हे त्याचे नाव जरासे आडवळणीच होते . त्यामुळे त्याचे आडनावच अधिक लोकप्रिय झाले . ` बारशाच्या वेळी बाप्तिस्मा देणाऱ्या पाद््याचा हे असले नाव ठेवण्याबद्दल मी रडून - ओरडून निषेध करतोय हे कोणाच्याच लक्षात आले नाही ,ही त्या नावानर स्वतः वुडहाऊसचीच तक्रार आहे . जवळची माणसे त्याला ` प्लम ' म्हणत .


प्लमच्या कथा - कादंबऱ्यांतील वातावरणाचा बदलत्या समाजपरिस्थितीशी सुतराम संबंध नव्हता . त्याची त्याने दखलही घेतली नाही . आणि नवल असे की , त्याच्या वयाच्या नव्वद - ब्याण्णवाव्या वर्षी लिहिलेल्या पुस्तकाचा खपही दशलक्षांच्या हिशेबात होत होता . त्याच्या लिखाणात आधुनिक पाश्चात्य लोकप्रिय कादंबऱ्यांतून आढळणारी कामक्रीडांची वर्णने नव्हती , खून - दरोडे नव्हते , रक्त फुटेस्तोवरच्या मारामाऱ्या नव्हत्या . होते ते एक जुने इंग्लंड आणि काळाच्या ओघाबरोबर वाहून गेलेला त्या समाजातला एक स्तर . ते इंग्लंडही प्लमनने अनेक वर्षांपूर्वी सोडले होते . अमेरिकेत न्यूयॉर्कजवळ येऊन स्थायिक झाला होता . कुटुंबात तो आणि त्याच्याहून चार वर्षांनी लहान असलेली त्याची प्रेमळ , सुदक्ष सहचारिणी एथेल , काही कुत्री आणि मांजरे . लेखनावर लक्षावधी डॉलर्श मिळत गेल्यामुळे लॉग आयलंडवरच्या रेमसेनबर्ग नावाच्या टुमदार उपनगरात राहायला एक सुंदर बंगली . भोवताली काही एकर बाग . त्यात गर्द वनराई . वनराईतून पळणाऱ्या पायवाटा .


प्लमचे आयुष्य विलक्षण नियमित . सकाळी लवकर उठून बंगल्याच्या पोर्चमध्ये यायचा .बारा नमस्करांसारखा हातपाय ताणण्याचा एक व्यायाम बारा वेळ करायचा . वयाची नव्वद वर्षे उलटली तरी प्लमची ही व्यायामद्वादशी चुकली नाही . घरात जाग आलेली नसायची . मग स्वतःच आपला टोस्ट भाजून घ्यायचा . चहा तयार करायचा . ही न्याहारी शांतपणाने
चालायची . एखादी रहस्यकथा ( बहुधा आगाथा ख्रिस्तीची ) किंवा आवडत्या लेखकाचे पुस्तक वाचत वाचत न्याहारी संपली , इतर आन्हिके उरकली की स्वारी प्रभातफेरीला निघे . सोबत घरातली कुत्री हवीतच . कुत्री आणि मांजरे ही प्लमची परम स्नेहातली मंडळी . एकदा हा सकाळचा फेरफटका झाला , की नवाच्या सुमाराला अभ्यासिकेत शिरायचा . कथा - कादंबऱ्यांचे धागे जुळवायला सुरूवात . त्या निर्मितीतून असंख्य वाचकांना ह्या माणसाने खुदूखुदू ते खोःखो पर्यंत सर्व प्रकारांनी हसवले . नुसते हसवलेच नाही , तर ` पी . जी . वुडहाऊस ' हे व्यसन जडवले . कुणीतरी इंग्रंजीतून पुस्तके वाचणाऱ्यांची ` वुडहाऊस वाचणारे ' आणि `वुडहाऊस न वाचणारे ' अशी विभागणी केली होती . जेम्स अँगेट ह्या प्रसिध्द पण स्तुतीच्याबाबतीत महाकंजूष आणि प्रतिकूल टीकेच्या बाबतीत केवळ आसुरी असणाऱ्या टीकाकाराने `थोडाफार वुडहाऊस आवडणारे असे त्याचे वाचक ह्या जगात संभवतच नाहीत ' असे म्हटलेआहे . वुडहाऊस आवडतो याचा अर्थ तो अथपासून इतीपर्यंत आवडतो . हे आपल्या बालगंर्धवाच्या गाण्यासारखे आहे . ते संपूर्णच आवडायचे असते . ( सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांना वुडहाऊसआवडतो आणि त्याची सगळी पुस्तके त्यांच्या फळीवर आहेत हे मी जेव्हा वाचले त्या वेळी त्यांच्याविषयी मला वाटणारा कोशगत आदर उफाळून आला होता . ) ` व्यसन ' ह्यापलीकडे वुडहाऊसच्या बाबतीत दुसरा शब्द नाही . असल्या व्यसनांनी ज्यांना न बिघडता राहायचे असेल त्यांनी अवश्य तसे राहावे . अमुकच एका तत्त्वज्ञानात किंवा धर्मात मानवतेचे कल्याण आहे असा आग्रह धरण्यांनीही ह्या भानगडीत पडू नये .( ते पडत नसतातच !)त्यांच्या हसण्याच्या इंद्रियावर निसर्गानेच एक न उघडणारे झापड बसवलेले असते . अहंकाराची दुर्गंधी आणि अकारण वेताग घेऊन ही माणसे जगत असतात . त्यांना सतत कोणीतरी खरा - खोटा ` शत्रू ' हवा असतो . असा ` शत्रू ' चा सार्वजनिक बागुलबुवा उभा करण्यात जे यशस्वी होतात तेच ` हुकूमशहा ' होत असतात . आणि ` विनोद ' तर मित्र जोडत असतो .म्हणूनच एकछत्री राजवटीत पहिली हत्या होते ती विनोदाची .वुडहाऊससारख्या माणसाला , नव्हे देवमाणसाला , सत्तीधीशांच्या ह्या वृत्तीचा फार मोठा ताप सोसावा लागला . त्याची अश्राप वृत्ती आणि निर्मळ विनोदबुध्दी हा त्याच्या आयुष्यात शाप ठरावा अशी परिस्थिती होऊन गेली . सुसंस्कृत जगाने लाजेने मान खाली घालावी अशीच ही घटना आहे एक संपूर्ण असत्य , माणसाला तापवलेल्या सळीने दिलेल्या डागासारखे कसे चिकटून राहते आणि राजकीय प्रचार ह्या नावाखाली चालणाऱ्या बौध्दिक व्यभिचाराचे अकारण बळी होऊन कसे जगावे लागते ह्याचे हे एक ह्दयभेदक उदाहरण आहे . पण त्याबरोबरच ह्या साऱ्या मानसिक छळातून , वरवर गमत्या वाटणारा वुडहाऊस आपल्या विनोदी लेखनाशी इमान ठेवून कसा राहिला त्याची हकीगत ह्या माणसापुढे आदराने नत - मस्तक व्हायला लावणारी आहे . पण हसवणाऱ्या माणसाला कोणी आदरणीय वगेरे मानत नसते .


कुठल्याही तत्त्वज्ञानाचा प्रसार किंवा धिक्कार करण्यासाठी वुडहाऊसने लिहिले नाही . जीवनाच्या सखोल तत्त्वज्ञानाची चिंता केली नाही . त्यानेच म्हटले आहे : "" माझ्यापुढे कुठलेही मार्गदर्शन करणारे नियम नाहीत . मी आपला जगत जातो . लिहित असलो म्हणजे उगीचच इकडेतिकडे पाहत बसायला आपल्याला सवड नसते . एकामागून एक पुस्तक लिहिणे हेच माझे
जीवन आहे . "" किती सहजतेने वुडहाऊस हे म्हणून गेला आहे .1902 साली वुडहाऊसने व्यवासायिक लेखनाच्या क्षेत्रात पहिली एट्रू घेतली . आणि 1940 साल उजाडायच्या आधी बारा नाटके , तीस विनोदी एकांकिका , शेकडो भावगीते ,
दोनशे सत्तावन्न कथा आणि बेचाळीस कादंबऱ्या लिहिल्या . ही काही नुसतीच लेखनकामाठी नव्हती . त्यांतली जवळजवळ प्रत्येक कृती यशाची नवी पायरी गाठत गेली होती .कडेखांद्यावरच्या बच्चाला खेळवावे तसे इग्रंजी भाषेला खेळवणाऱ्या वुडहाऊसने स्वतःचे एक विश्व निर्माण केले होते . त्याची भाषा आणि त्याची ती सृष्टी , इतकी त्यांचीस्वतःची आहे की त्याच्या साहित्याचे भाषांतर एखाद्या उत्तम कवितेच्या भाषांतरासारखे अशक्यच आहे . त्याची पात्रे एका विशिष्ट इंग्रजी कालखंडातील आहेत आणि त्या संस्कृतीत इतकी रूजलेली आणि वाढलेली आहेत की त्या जमिनीतून त्यांना अलग करणे चुकीचेच ठरावे . तरीही वुडहाऊच्या विनोदात विश्वात्मकता आहे . पृथ्वीच्या पाठीवरल्या इंग्रजी भाषा समजणाऱ्या संपूर्णपणे निराळ्या संस्कृतीत जगणाऱ्या लोकांना त्याच्या विनोदाने , अफलातून विनोदी उपमांनी , विनोदी प्रसंगांनी डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसवले .
त्याचा बर्टी वूस्टर आणि जीव्हज्् , आपल्या ` स्मिथ ' या नावाने स्पेलिंग कारण नसताना ` पी ' पासून सुरू करून पहिली ` पी ' अनुच्चारित आहे हे बजावणारा आणि सदेव उसने पेसे देण्याऱ्यांच्या शोधात असणारा तो स्मिथ , लॉर्ड एम्सवर्थ आणि त्याचा तो बौण्डिग्ज , कॅसल , युकरिज , मुलिनर , अंकल फ्रेड , गोल्फ कथांतला तो गोल्फमहर्षी ` वृध्द सदस्य ' , ऑण्ट आगाथा -सारख्या अनेक आत्या - मावश्या . . . . ही सारी मंडळी आणि त्यांचा हा निर्माता यांनी इंग्रजी साहित्यात हा गोंधळ मांडिला होता . गोधंळाला अंत नव्हता आणि मृत्यूनेच मालवीपर्यंत ह्या गोंधळ्याच्या हातची मशाल विझली नव्हती . एका समीक्षकाने त्याच्या ह्या निर्मितीपुढे हात टेकताना म्हटले आहे : "" वुडहाऊसची प्रतिभा थकायला तयार नाही . पण समीक्षक मात्र नवीन स्तुतिपर विशेषणे शोधून काढता काढता थकायला लागले आहेत .""


लेखन हा त्याच्या प्रेमाचा विषय होता . लेखन म्हणजे साक्षात टेबलाशी बसून हाताने केलेले लेखन . मजकूर सांगून लेखनिकाकडून लिहून घेणे त्याला जमले नाही . एकदा एथेलने त्याला टेपरेकॉर्डरसारखे यंत्रही आणून देऊन भार हलका करण्याचा प्रयत्न केला होता . वुडहाऊस म्हणतो : "" मी ` थँक्यू जीव्हज्् ' ह्या कादंबरीचा त्या यत्रांवर मजकूर सांगायला लागलो . आणि काही वेळाने तो मजकूर ऐकायला लागल्यावर तो माझा मलाच ऐकवेना . भलताच रटाळ
वाटायला लागला होता . आणि माझा आवाजदेखील एखाद्या पाद्रीबाबासारखा आहे याची मला तोपर्यंत कल्पनाही नव्हती . तो तसला आवाज किंवा ते यंत्र यांपेकी एक कोणीतरी माझी तंगडी खेचत होते . असो , दुसऱ्या दिवशी मी ते भिकार यंत्र विकून टाकले . "" समोर बुध्दिबळाचा पट मांडून आपण आपल्यापाशीच खेळत बसावे तसा त्याचा हा लेखनाचा कार्यक्रम असे . स्वतःच बिकट चाल करायची आणि त्यातून स्वतःच गमतीदार सोडवणूक करायची . ह्या लेखनाच्या छंदाबद्दल त्यानेच म्हटले आहे : "" लेखनाची एक मजास आहे . तुम्ही स्वभावतःच लेखक असलात तर तुम्ही पेशासाठी , कीर्तीसाठी किंवा फार कशाला ,छापून प्रसिध्द व्हावे म्हणून सुध्दा घासूनपुसून लख्ख करायची फार हौस आहे . एकदा कागदावर उतरून काढले , मग ते कितीही ओबडधोबड का असेना , काहीतरी आपल्या पोतडीत जमा झाले असे मला वाटते . ए . ए . मिल्न तर म्हणतो की पुस्तके प्रकाशितदेखील करू नये . ती लिहावीत . त्याची सुंदर अशी एक प्रत छापावी , लेखकाला वाचण्यासाठी . ""` स्वान्तःसुखाय ' म्हणजे तरी दुसरे काय आहे ? साहित्यनिर्मिती ही खरोखरीच क्रिडा असावी . त्या खेळाची मजा वाटायला हवी . वुडहाऊस हा साहित्यातला ` खेळाडू ' होता . त्याचे स्वतःचे मेदान होते . त्याची स्वतःची टीम होती . त्याच्या कथा - कादंबऱ्या म्हणजे ह्या साऱ्या भिंडूच्या जीवनातला खो - खो , आट्यापाट्या , लंगडी , धावाधावी , लपंडाव - नाना तऱ्हा ! आणि वुडहाऊस हा त्या खेळाची हकीगत सांगणारा विनोदी कॉमेंटेटर . ही त्याची दोस्त -मंडळी होती . इथे कोणी खलनायक नाहीत . कुणाच्या मनात पाप नाही . इथली हारजीत खोळातल्यासारखी . इथली फसवाफसवी पत्याच्या डावातल्या फसवाफसवीसारखी . इथले प्रेम , त्या प्रेमाच्या आड येणारी माणसे , त्यातून सूर मारून भोज्या गाठणारे नायक , त्यांना ` जेली 'सारखे थरथरायला लावणाऱ्या त्या आत्याबाई , संकटमुक्तीसाठी साक्षात विष्णूसारखा उभा असलेला तो जीव्हज् . . . हे एक विलक्षण मजेचे नाटक .नाटकच म्हणायला हवे , कारण त्याच्या पात्रांची घालमेल आणि धावपळ ही एखाद्या रंगमंचावर चालल्यासारखीच असते . कादंबरीतील पात्रेदेखील नाटकातल्या पात्रांसारखी सदेव हालती ठेवली पाहिजेत . असे वुडहाऊसचेच मत होते . त्याने त्या पात्रांना सुस्त होऊ दिले नाही .


एक एक प्रसंग म्हणजे एका घसरगुंडीवरून दुसऱ्या घसरगुंडीवर नेण्याचा कार्यक्रम . वुडहाऊस ह्या नाटकाचा निर्माता , सूत्रधार आणि प्रेक्षकही . आपला नायक नव्या घोटाळ्यात सापडला की सर्वात त्यालाच आधी आनंद व्हायचा . मग त्याच्यातला सूत्रधार खुषीत येऊन त्या नायकाच्या फजितीचे गंमतीदार शब्दांत वर्णन करायला टपलेला असायचा . अशी एखादी नेमकी उपमा निघायची की ती सुचल्यावर मला वाटते , वुडहाऊस स्वतःच गुदगुल्या झाल्यासारखा हसत असेल . पानापानातून अशा कितीतरी विनोद उपमा . उत्तम कवितेप्रमाणे अजिबात बदलता येणार नाही अशी अचूक शब्दयोजना . एक मात्र निश्चित की वुडहाऊस हा त्याच्या त्या इंग्रजीतून अनुभवायलला हवा . भाषांतरात त्याच्या शेलीतली लय पकडता येत नाही . तबल्याच्या तुकड्यात ` धा ' म्हणजे तिथे ` धा ' च हला , ` धिन् चालणार नाही . तसेच वुडहाऊसच्या विनोदाचे आहे . त्याचा तो जीव्हज्् हा ` बटलर ' आहे . आता ` बटलर ' ह्या शब्दाचा अर्थ जपानी ` गेशा ' किंवा फार कशाला ` भटजीबुवा ' किंवा ` पिठले ' ह्या शब्दांइतकाच अ - भाषांतरीय !इंग्रजी भाषेला हवे तसे खेळायला लावणाऱ्या वुडहासचे कौतुक पंडित - अंपडित सगळ्यांनाच होते . 1939 साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने वुडहासचला इंग्रजी साहित्याच्या सेवेबद्दल डी . लिट . ची सन्मानीय पदली दिली . त्यापूर्वी मार्क ट्रवेन ह्या विनोदी लेखकालाच काय ती सन्माननीय डॉक्टरेट देण्यात आली होती . आपल्याकडल्या विद्यापिठाने मात्र विनोदी लेखकाला असा गौरवपर डॉक्टरेट देणे ही सामान्यतः एखाद्या याज्ञवल्क्याश्रमाने कुणाला तरी उत्तम तंदुरी चिकन करतो म्हणून ` शाल आणि श्रीफळ ' देण्याइतकीच अशक्य कोटीतली गोष्ट आहे .


1939 साली इंग्लडंमध्ये वुडहाऊसच्या विनोदाचा एलढा मोठा गौरव झाला आणि वर्षे दोन वर्षे लोटली नाहीत तोच युध्दकाळातला राष्ट्रद्रोही म्हणून त्याचा निषेध सुरू झाला . ज्याच्या वाचकांत रूडयार्ड किप््लिंग , आगाथा ख्रिस्ती , जॉर्ज ऑरवेल , माल््कम मगरिज यांच्यासारखे इंग्रजी साहित्यातले श्रेष्ठलेखक होते , हिलेर बेलॉकसारख्या इंग्रजी लेखकाने ज्याचा ` सध्या हयात असलेल्या इंग्रज लेखकांतला निःसंशय सर्वोष्कृट लेखक ' असा बी . बी सी . वरून गौरव केला होता . त्याच वुडहाऊसची त्याच बी . बी . सी वरून , पंचमस्तंभी , देशद्रोही , लॉर्ड हॉहॉ अशी बदनामी सुरू झाली . विशएषतः त्या वेळचे ब्रिटिश प्रचारमंत्री डफ कूपर यांनी तर खाजगी वेर असल्यासारखा वुडहाऊसच्या चारित्र्यहननाचा प्रचार जारी ठेवला . पण बर्लिन रेडिओवरून ध्वनिक्षेपित झालेल्या ज्या भाषणांबद्दल त्याला राष्ट्रद्रोही ठरवण्यात आले होते ती भाषणे काय होती याची चौकशी करायची कुणालाच गरज पडली नव्हती . म्हणजे एकीकडून वुडहाऊस नाझी जर्मनांच्याबंदीखान्यात हाल भोगत होता आणि त्याच्या मायदेशात त्याच्याविरूध्द त्याच्या जर्मनधार्जिणेपणाबद्दल गरळ ओकले जात होते . हा अश्राप माणूस राष्ट्रद्रोह करीलच कसा ? - हा विचारदेखील त्याला दोषी ठरवण्यांच्या क्षणभरही मनात येऊ नये हे चारित्र्यहननाच्या निरर्गल प्रचाराचे यश म्हणायला हवे . पण अशा ह्या भयानक अवस्थेत वुडहाऊसने मात्र मनोधेर्याचा कुठलाही आव न आणता जे लोकविलक्षण मनोधेर्य प्रत्यक्षात आचरून दाखवले ते पाहिल्यावर हा वरपांगी गमत्या वाटणारा माणूस किती उंच आणि किती खोल होता याची साक्ष पटते . निरनिराळ्या तुरूंगांत आणि ` स्थानबध्दांच्या कॅम्पस ' मध्ये नेऊन कोंडलेल्या वुडहाऊसची विनोदबुध्दी त्याला क्षण - भरही सोडून गेली नाही . तो आपल्या स्थानबध्दतेतल्या अनुभवांची विनोदी डायरी चालू होती . भयानक थंडीत , साठीच्या घरात आलेल्या वुडहाऊसला फरशीवर झोपावे लागत होते . संडास साफ करायला भाग पाडले जात होते , आणि ` विनोदी लेखन ' ही एवढीच आपल्याला जमणीरी गोष्ट असे मानणारा प्लम वाचकांना हसवणारी पानांमागून पाने लिहून काढीत होता . आम्ही ` स्वधर्मा ' च्या लफ्फेबाज गोष्टी करतो ; वुडहाऊस पाळत होता . विनोदी लेखन हा दुसऱ्या स्वभावधर्म होता .


दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी वुडहाऊस फ्रानसमधल्या पारी प्लाजनजीक सुद्रतीरीवरच्या ल तुके नावाच्या छोट्याशा गावात राहत होता . 1940 च्या मे महिन्यात नाझी जर्मनांनी ल तुकेचा ताबा घेतला . त्या गावात चितके इंग्रज होते . त्यांना स्वतःच्याच घरात स्थानबध्द करून ठेवण्यात आले . आठवड्यातून एकदा जर्मन कमांडंटच्या ठाण्यावर जाऊन हजेरी द्यावी लागत असे . अशी परिस्थिती असूनही त्याच्याविरूध्द अपप्रचार करण्यांनी , वुडहाऊसला ठोकून दिला होता . नाझी सेनिक बळजबरीने लोकांच्या घरात शिरून त्यांच्या बाथरूमध्ये आंघोळी करीत , अन्न फस्त करीत , ह्या गोष्टींचा विपर्यास , नाझी सेनिकांना आपल्या बाथ - रूममध्ये स्नानाची सोच करून देऊन वुडहाऊस त्यांना पार्टीलाही बोलवीत असे , असाही केला जात होता . वुडहाऊस म्हणतो "" ह्या हरामखोरांना मी , आपली गलिच्छ शरीरे धुवायला माझ्या बाथरूममध्ये या असे अनमंत्रण देईन काय ? मी त्यांना दम देऊनदेखील पाहिले . कसला दम आणि कसले काय ! पुन्हा आले ते आणखी सेनिक जमवून घेऊन घुसले . "" फ्रेचांनी शरणागती लिहून दिली होती . बाहेरच्या जगातल्या बातम्या ऐकण्यावर बंदी . इंग्रजी वर्तमान - पत्रे येऊ देत नसत . फॅसिस्ट राजवटीत बातम्यांचा ब्लॅकआऊट हे एक प्रभावी तंत्र असते . आणि गोबेल्ससारख्या अपप्रचारांच्या उस्तादांचा उस्ताद असल्यावर त्याच्या प्रचारात काय सांगितले जात होते आणि काय लपवले जात होते याची कल्पनाही करणे अशक्य .


वुडहाऊसनित्याप्रमाणे त्या जर्मन कमांडरच्या कचेरीत वीस जुलेला हजेरी लावायला गेला . पण वातावरण निराळे वाटले . ल तुकेमधल्या परकीय रहिवाशांपेकी साऱ्या पुरूष - मंडळींना स्थानबध्द करण्याचा हुकूम आला होता . ` गरजेपुरत्या ज्या वस्तू असतील त्या बँगेत भरा आणि ताबडतोब ठाण्यावर हजर व्हा ' असा हुकूम होता . तिथून त्यांना नांच्याकॉन्सेन्ट्रेशन कॅम्पात नेण्यात येणार होते . वुडहाऊसच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे , "" स्थान - बध्दचेटा पूर्वानुभव नसल्यामुळे बॅगेत कायकाय भरता येते याची कल्पना नव्हती . त्यामुळे पाईप , तंबाखू , पेन्सिल , वह्या , बूट , दाढीचे सामान , थंडीसाठी म्हणून स्वेटर्स , टेनिसनच्या कवितांचा संग्रह , सम्रग शेक्सपिअरचा खंड आणि अर्धा पौंड चहाची पत्ती - एवढे सामान भरले . तेवढ्यात एथेलने त्या बॅगेत एक कोल्ड मटनचॉप आणि चॉकलेटचा एक लहानसा स्लॅब कोंबला . रत्तलभर लोणी , घ्या म्हणत होती . पण उन्हात लोणी वितळायला लागायची लहानशी भीती होती . तेव्हा तो बेत रद्द केला . "" एथेलचा निरोप घेऊन वुडहाऊसने घर सोडले . इथून त्याची वर्षभर चांगली परवड झाली . साठ वर्षेपुढल्या युध्दबंद्यांना केदेत ठेवायचे नाही ह्या नियमाप्रमाणे तो सुटला . ह्या स्थानबध्दतेतल्या अनुभवावर एका अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनीने त्याला भाषणे द्यायला लावली . ते हे ` बर्लिन ब्रॉडकास्टस . 'जर्मनांनी लुच्चेगिरीने त्याचा दुरूपयोग केला . आणि इंग्रज आपली सारी विनोदबुध्दी गहाण टाकून भडकले . वास्तविक भडकायला हवे होते जर्मनांनी . पण युध्दकाळात बर्लिन रेडिओवरून वुडहाऊस बोललाच कसा ? बस ! हे एक कारण घेऊन तो काय बोलला हे ध्यानात न घेता त्याच्यावर
चिखलफेकीचा सरकारी प्रचार सुरू झाला . त्याला फॅसिस्टांचा बगलबच्चा ठरवण्यात आले . युध्द संपले . जर्मन हरले . सगळ्यांची डोकी जरा थंड झाली . आणि एकोणीसशे चौपन साली वुडहाऊसने ती भाषणे प्रसिध्द करायला आपला मित्र टाऊनएंड ह्याला परवानगी दिली . ह्या मित्राला वुडहाऊसने आयुष्यभर अतिशय मजेदार पत्रे लिहिली आहेत . टाऊनएंड हा स्वतः चांगला लेखक . त्याने ती सारी पत्रे जपून ठेवून प्रसिध्द केली . सीअन ओकेसी नावाच्या लेखकाने वुडहाऊसला इंग्रजी साहित्यातील ` परफॉर्मिंग फ्ली ' - म्हणजे ` खेळ करून दाखव - # णारी माशी ' - थोडक्यात म्हणजे ` तमासगीर ' म्हटले होते . ह्या पत्रसंग्रहाचे नाव तेच ठेवले आहे . आपण ` तमासगीर ' आहोत हे वुडहाऊसने स्वतःच मान्य केले आणि न जाणो जे दूषण म्हणून दिले असेल ते भूषण म्हणून वापरले . ह्या हसवणाऱ्या माणसाला दुसऱ्या कुठल्याही सन्मामाची अपेक्षा नव्हती . यथेच्छ चिखलफेक झाली होती . पण प्लमच्या कादंबऱ्या प्रसिध्द
होतच होत्या . बर्टी वूस्टर घोळ करीत होता . त्याचा तो प्रज्ञामूर्ती ( आणि स्थितप्रज्ञही ) जीव्हज् शांतपणे मालकांना त्यातून सोडवून तितक्याच शांतपणे नामानिराळा राहत होता . लोक वाचत होते . हसत होते .


युध्द संपून पाचसात वर्षे झाल्यानंतरही त्याच्या पुस्तकावर तोंडभर तारीफ असलेल्या समीक्षेत वुडहाऊसच्या विनोदाला तोड नाही अशी शिफारस होत होती . पण लगेच ` दुसऱ्या महायुध्दात नाझींनी त्याला पकडून अपर सायलेशियन तुरूंगातून ब्रिटिशांनी जर्मनांना शरण जावे म्हणून केलेल्या प्रचाराचे दुःस्वप्नासारखे दिवस आणि त्या दुःस्वप्नांसारख्याच आठवणी आता संपल्या आहेत ' हे शेपूट होतेच .`असत्यमेव जयते ' चे फार नमुनेदार उदाहरण आहे . प्लमने ही समीक्षा वाचली. त्यावरची त्याची प्रतिक्रिया त्याच्या विनोदीवृत्तीला साजेशीच आहे . "" बारा वर्षांपूर्वी मी जेव्हा साठ वर्षांचा चिमखडा होतो त्या वेळी ह्या उल्लेखाने जखम झाली असती . आता सत्तरी ओलांडल्यावर असल्या घावाच्या जखमा होत नाहीत . आता ह्या घड्याळाची टिकटिक केव्हा बंद पडेल ते सांगता येत नाही . अशा वेळी कशाचीही खंत बाळगणे येडपटपणाचे वाटते . ` माझ्याविषयी लोक वर्तमानपत्रातून काही का लिहिनात . जोपर्यंत माझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक करीत नाहीत तोपर्यंत मला त्याचे काही वाटत नाही ' - असे कोणातरी म्हणाला होता . माझी अवस्था त्या माणसासारखी आहे . तात्पर्य , माझ्याविषयीचा हा गेरसमज लोकांच्या गप्पांच्या अड्ड्यांअड्ड्यांतून चालणार असेल तर ` बर्लिन ब्रॉडकास्ट्स ' प्रसिध्द झाले म्हणूनही काही बिघडणार ही . "" आणि गमतीची गोष्ट अशी , हे बर्लिन - ब्रॉडकास्ट म्हणजे ज्या जर्मानांनीप्लमला स्थान - बध्दतेते टाकले होते त्यांची यथास्थित टिंगल आहे . उपहास आणि उपरोधाचा ती भाषणे म्हणजे एक आदर्श आहे . जर्मनांना त्यातली खोचण्याइतकी विनोदबुध्दी नव्हती हे वुडहाऊसचे भाग्य . नाहीतर त्यांनी त्याला केव्हाच फासावर लटकावला असता . पण आश्चर्य वाटते ते इंग्रजांची विनोदबुध्दी नष्ट झाल्याचे . हिटरलने तेवढ्यापुरता तरी इंग्रजांवर विजय मिळवला होता , म्हणायला हवे . त्यांचा एक विनोदी लेखक शत्रूच्या मुलखात राहून शत्रूची यथेच्छ चेषटा करीत होता आणि केवळ शत्रूच्या रेडिओवरून ती भाषणे झाली ह्यावरून तो शत्रुपक्षाचा प्रचार ठरवण्यात आलसा होता . वुडहाऊसच्या ह्या इंग्रजी भाषणांचे भाषांतर करणे खरे म्हणजे अशक्य आहे . पण त्यातूनही , ह्या असल्या अवस्थेत त्याने टिकवून धरलेल्या विनोदबुध्दीचे दर्शन घडते ते अपूर्व आहे . त्या भाषणांची सुरूवातच किती मजेदार आहे . "" माझ्या ह्या छोटेखानी भाषणात श्रोत्यांना थोडाफार भोटमपणा दिसेल . काहीसा पाल्हाळही लावल्यासारखं वाटेल - पण ती बाब बर्टी वूस्टरच्या भाषेत सांगायची म्हणजे` ताबडतोब स्पष्टीकरण देता येण्यासारखी ' आहे . मी नुकताच जर्मनांच्या मुलकी तुंरूगा - # तल्या बंदिस्त कोठड्यांतला एकूणपन्नास आठवड्यांचा मुक्काम आटपून बाहेरच्या मोकळ्या जगात आलो आहे . त्यामुळं अजनही डोक्याचा तोल पूर्णपणाने सावरलेला नाही .ह्याच माझ्या डोक्याची कधीही तोल न जाऊ देण्याचा गुणाबद्दल सगळीकडे एकमुखाने तारीफ व्हायची . "" इथून पुढच्या पाच भाषणांत प्लमने तुंरूगवासातल्या हालअपेष्टांना विनोदाच्या रंगांतून रंगवून काढले आहे . जर्मन कमांडंटच्या ठाण्यापासून त्याचे घर तीन किलोमीटर दूर होते . बॅग गोळा करायला जर्मन अधिकाऱ्यांनी त्याला पाच मिनिटांचा अवधी देऊन लष्करी मोटारीतून घरापर्यंत नेले . वुडहाऊस म्हणतो , "" मोटारीतून नेल्यामुळं मला वाटलं जर्मन मंडळी तशी आपल्यावर खूष असतील . घरी पोचल्यावर थंड पाण्यानं झक्क शॉवरबाथ घ्यावा , पाईप पेटवून बॅगेत भरायच्या व्सतूंचं चिंतन वगेरे करावं असा विचार होता . पण माझ्याबरोबर आलेल्या जर्मन सेनिकाने ` लवकर आटपा ' असं गुरकावल्याबरोबर माझ्या उत्साहावर एकदम पाणी पडलं . त्याच्या मते पाच मिनिटं खूप झाली . असं होतं . शेवटी मिनिटांवर तह झाला . . . माझ्या भावी चरित्रकारांनी हे नमूद करावं . यापुढील काही दिवस स्थानबध्देत काढावे लागणार म्हटल्याक्षणी माझ्या मनात पहिला विचार आला , तो आता कंबर कसून एकदा समग्र शेक्सपिअर वाचून काढावा हा ! गेली चाळीस वर्षे मी समग्र शेक्सपिअर वाचायचा संकल्प सोडतो आहे . तीन वर्षांपूर्वी मी त्या उद्देशाने ऑक्सफोर्ड आवृत्तीदेखील विकत घेतली होती . पण हॅम्लेट आणि मॅक्बेथ पचवून हेन्री द एट्थ भाग एक , दोन व तीनमधलं पुरण पोटात भरणार इतक्यात आगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथेतल्या कशाकडे तरी लक्ष जायचं आणि ढेपाळायला व्हायचं . ही स्थानबध्दता काही वर्षासाठी होती की आठवड्यांसाठी याचा काहीच पत्त नव्हता . पण एकूण परिस्थिती मात्र ` समग्र शेक्सपिअर ' कडेच बोट दाथवत होती . म्हणून बॅगेत घुसला . "" ह्या गडबडीत वुडहाऊस एकच गोष्ट बॅगेतभरायला विसरला होता . त्याचा पासपोर्ट . बॅग भरून झाल्यावर प्लमला पुन्हा एकदा त्या जर्मन कमांडरपुढे उभे केले . ( ह्या कमांडरचा एक डोळा काच बसविलेला होता . त्या डोळ्याची वुडहाऊसला भारी भीती वाटायची , असे त्याने आपल्या डायरीत लिहिले आहे . ) तिथे भरपूर वेळ ताटकळल्यावर वुडहाऊसची यात्रा सुरू झाली . "" ह्या स्थानब्धतेतल्या प्रवासात एक मोठी उणीव असते . आपल्याला कुठे नेण्यात येतआहे , हे काहीच कळत नाही . म्हणजे आपण शेजारच्या गावात आलो की अर्धा युरोप पालथा घातला याचा थांगपत्ता लागत नाही . आम्हांला लील नावाच्या शहरातल्या लूस नावाच्या उपनगराकडं नेलं होतं . सत्तर मेलांचं अंतर . पण वाटेत स्थानबध्दांतले इतर ` संस्थापक सदस्य ' उचलायचे असल्यामुळं एवढं अंतर काटायला सात तास लागले . "" त्या बसमध्ये ल तुके गावातील जे इतर इंग्रज पकडून कोंबले होते ते सारे त्याच्या परिचयाचे होते . "" पुढं काय वाढून ठेवलं आहे हे कोणालाच ठाऊक नव्हतं . स्थानबध्दतेचा आमचा सगळ्यांचा हा अनुभव . पण प्रत्येक जण आपापलं डोकं चालवून अंदाज लढवीत होता .आमचा आल््जी म्हणजे मनुष्रूपी सूर्यकिरणच ! निराशेचा अंधकार वगेरे त्याला नामंजूर . आम्हां सगळ्यांची सोय उन्हाळ्याच्या सुटीत राहण्यासाठी बडे लोक एखाद्या उपवनात प्रासादतुल्य बंगले बांधतात , तसल्या बंगल्या - प्रासादांत होणार , असा त्याचा होरा होता . ` बंगला ? मी . ' ` बरोबर , बंगला . ' आल््जी ` म्हणजे पुढल्या पोर्चमध्ये पिवळ्या फुलांच्या वेलीबिली चढवलेल्या असतात तसल्या . . . ' ` वेलीचं नक्की नाही . असतीलही किंवा नसतीलही . पण प्रासादतुल्य बंगल्यात होणार हे नक्की . मग आपल्याला पॅरोलवर सोडतील . दिवसभर रानावनातून भटकून यायची परवानगी मिळेल . मला वाटतं , गळ टाकून मासे धरायलाही देतील . 'घटकाभर बसमधलं वातावरण प्रफुल्लित झालं . मासेमारीची फारशी हौस नसणारे म्हणाले , ` आम्ही आपले उन्हातून हिंडून येत जाऊ . ' काही वेळाने लक्षात आलं की आल््जीला स्थानबध्दतेतील ओ की ठो ठाऊक नव्हतं . बंगल्यातच ठेवायचं तर आमचे बंगले काय वार्ट होते ? उगीच आमच्या स्वतःच्या बंगल्यातून लोकांच्या बंगल्यात एकदम जथाबंद उचलून नेऊन मुक्कामाला ठेवायची काय गरज होती ? त्यानंतर मात्र आम्ही नक्कीच गारठत चाललो . आशावादाची जागा अस्वस्थतेंन घेतली आणि लीली गावाला वळण घेऊन बस उभी राहिली तेव्हा आमच्या उत्साहाच्या पाऱ्यानं शून्याखालचा नवा नीचांक गाठला होता . ती इमारत म्हणजे स्थानिक तुरूंग किंवा विभागीय कारागृह अशाखेरीज इतर कसलीही असणार नाही हे उघड होतं . एका फ्रेंच स्थानिक शिपायानं दरवाजे उघडले आणि आम्ही आत घरंगळलो . "" आता ह्या भाषणाता कसला देशद्रोह आला ? पण ब्रिटिश प्रचारमंत्र्यांना तो दिसला . बर्लिन रेडिओवरले दहादहा मिनिटांचे असे हे पाच टॉक््स . म्हणजे एकूण पन्नास मिनिटे . माणसाला स्थानबध्द करून त्याचे स्वातंत्र्य हिरावून घ्याल ; पण त्या हालांचीही थटटा करण्याची त्याची ताकद कशी हिरावून घेणार ? वुडहाऊसने तुरूंगवासाचे जे वर्णन केले आहे त्यातला उपरोध तर विलक्षण आहे . वुडहाऊस म्हणतो , "" ज्यांनी अजूनही तुरूंगवासाची पहिली शिक्षा भोगली नाही , त्यांना हितासाठी एक गोष्ट सांगायला हवी . मुख्य म्हणजे , असल्या संस्थेत प्रवेश मिळवणं अवघड नाही . एखाद्या मोठया हॉटेलात खोली राखून ठेवण्यासारखंच असतं . फरक एवढाच की दारातल्या स्वागतकक्षात फुलझाडं वगेरे नसतात . स्वत : ची बॅग स्वतःलाच उचलावी लागते -आणि नोकराला टिप देण्याची भानगड नाही .लहानपणापासून निष्पाप आयुष्य काढल्यामुळें , तुरूंगाची आतली बाजू फक्तसिनेमातच काय ती पाहिलेली . तेवढयात माझी नजर स्वागतकक्षात बसलेल्या एका अधिकाऱ्याच्या नजरेला भिडली आणि मला पश्चात्ताप झाला . आयुष्यात कधीतरी असा एखादा क्षण येतो , की ज्या वेळी एखाद्या अनोळखी माणसाच्या चेहऱ्याकडे आपली नजर वळते आणि आपल्याला वाटतं , ` वा - ! - दोस्त भेटला . ' हा क्षण त्यातला नव्हता . ` सेतानाचे बेट ' सारख्या सिनेमातला वाटावा असा तो इसम माझ्याकडे पाहून मिशीला पीळभरत होता . पण लेखकाची जात इतक्या आशा सोडत नसते . मनात उगीचच एक पुसट असा विचार डोकावत होता . आम्हांला पाहुचारासाठी बोलावणारा आमचा हा यजमान माझं नाव ऐकल्याबरोबर एकदम ` उई उई मॉसिये वोदहाऊस ! . . एंब्रेसाजे - मॉय -मेर्त्र ' - असं कोहातरी ओरडत उठून उभा राहील . रात्री झोपायला हवा तर माझा पलंग घ्या म्हणेल . वर , काय सांगू बेह , तुमचा मी भयंकर चाहता आहे . . . आमच्या पोरीसाठी स्वाक्षरी देता का ? . . असं काहीतरी म्हणेल . पण तसलं काही झालं नाही . त्यानं पुन्हा एकदा मिशी पिळली . एका भक्कम खतावणीत माझं नाव लिहिलं . ` विडहॉर्स ' . आणि ` गुन्हा ' ह्या सदरात ` इंग्लिश ' असं नोंदवलं . बाजूला हाजिर असलेल्या शिपुर्डयाना ` ह्याला कोठडीत नेऊन टाका ' असा हुकूम दिला . ती कोठडी मी , आल्जीज बारचा आल्जी ( बंगल्यात ठेवतील म्हणणारा . ) आणि आमच्या गावातला सालस आणि लोकप्रिय पियानो टयूनर विल्यम कार्मेल ह्या तिघांना मिळून तिघांना कोंबायचे . कोठडीचे क्षेत्रफळ बारा गुणिले आठ फूट . सिनेमातल्या कोठडयांना असतात तसले गजबीज नव्हते . एकच भक्कम लोखंडी दरवाजा . त्यात एक जेवणाची थाळी सरकवायला झडप . आणि बाहेरच्या पहारेकऱ्याला आतले रहिवाशी शाबूत आहेत की नाहीत ते पाहण्यासाठी त्या दाराला बाहेरून झाकण लावलेलं भोक . त्या कोठडीत फक्त एक खाट आणि तिच्यावर अंथरूण होतं . त्या भिंतीच्या वरच्या अंगाला एक खिडकी होती . दुसऱ्या भिंतीशी एक लहानसं टेबल. त्यालाच साखळीनं बांधलेली तीन - साडेतीन वीत उंचीची खुर्ची . कोपऱ्यात नळ होता . त्याच्याखाली बशीएवढे वॉश बेसिन . एक लाकडी शेल्फ आणि भिंतीत एक लाकडी खुंटी . एकूण सजावट कडकडीत मॉडर्न स्टाइलची . चुना फासलेल्या भिंतीवरची जी काही चित्रं होती . ती वेळोवेळी त्या कोठडीत नांदलेल्या फ्रेंच केद्यांनी काढली होती हे लक्षात यायचं . त्यांनी पेन्सिलीने ठसठशीतपणानं काढलेल्या चित्रांवरून त्या फ्रेंच केद्यांच्या चित्रकलेच्या बाबतीतल्या विचारधारेत कुठं उच्चभ्रूपण वगेरे नव्हता . चारी बाजूला ती ` तसली ' चित्रं असल्यामुळं ` पॅरिसमधील रंगीला रसूल ' सारख्या ग्रंथाच्या पानात आपण सापडलो आहो असा परिणाम व्हायचा . आम्हां तिघांत कार्मेल वयाने वडील . त्याला आम्ही खाट दिली . आणि आम्ही जमिनिवर पसरलो . दगडी फरशीवर शयन करायचा माझा पहिलाच प्रसंग . पण दिवसभराच्या मुर्दुमकीनं थकून गेल्यामुळं पापण्या मिटायला फार वेळ नाही लागला . झोप लागण्यापूर्वीचा माझा एकच विचार मला आठवतो : उतारवयात सभ्य माणसावर प्रसंग गुदरणं हे भयंकर आहे खरं . पण त्यातही लेकाची गंमत होती आणि आपल्या वाटयाला उद्या काय येणार याची मी उत्सुकतेने वाट पाहत होतो . "" ह्या बंदिवासांतल्या जेवणाखाण्याच्या हालाचे वर्णनही वुडहाऊस मजेत करतो आणि असे ते मजेत केल्यामुळेच वुडहाऊस त्या स्थानबध्दतेत फार मजेत राहत होता असा अपप्रचार करायची संधी त्याच्या विरोधकांना लाभली होती . हे म्हणजे उपास घडलेल्या एखाद्याने ` तुरूंगात आम्ही थंडा फराळ केला ' म्हणावे आणि विरोधकांनी त्यांना तुरूंगात कुल्फीमलई फ्रीजमधले दहीवडे वगेरे देतात असा प्रचार करावा यासारखे झाले . बंदिवासात न्याहारी म्हणून तिघांना तीन पेले सूप आणि तीन लहान पाव मिळायचे . वुडहाऊस म्हणतो , "" सूप ठीक होतं . त्याच्याशी कसंतरी जमवता येत होतं . पहिला घुटका घेतल्यावर जी चव लागली ती खरोखरीच तशी होती की काय याचा अंदाज घ्यायला दुसरा घुटका घेईपर्यंत ते संपलं . पण सुरीशिवाय पाव कसा कापायचा ? तुकडयातुकडयांनी कुरतडावा म्हटलं तर माझ्या कोठडी - बंधूंचे दात त्यांच्या पोरवयातच निकामी झालेले . बरं , त्या टेबलावर पाव आदळावा म्टलं तर तेही शक्य नव्हतं - टेबलाच्या लाकडाच्या कपच्या उडायच्या . पण संकटातून वाट निघाल्याशिवाय राहत नाही . माझ्याकडे ` पाव - तोडयाची ' ( लाकूडतोडयासारखी ) सार्वजनिक जबाबदारी आली आणि मला वाटतं , मी ते कार्य समाधानकारक रीतीनं पार पाडलं . कसं का असेना , मी तो पदार्थ विभागू शकलो . त्याची ट्रिक अशी आहे : मानेचा काटकोन करायचा आणि वरच्या दंतपंक्तीवर हे टणक कार्य सोपवून द्यायचं . "" एकदा ते तसले अमृततुल्य सूप उकळणाऱ्या स्वेपाकीबुवांची आणि वुडहाऊसची त्या बंदिवासात गाठ पडली . वुडहाऊसने डायरीत लिहिलं आहे : "" आज स्वेपाकीबुवांची गाठ पडली . सूपाबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं . स्थानबध्दांनी ` सूप कमी पडतं ' अशा तक्रारी केल्यामुळं त्यांचा व्यावसायिक अहंकार दुखावला होता .` मला काय पाणी घालून सूप वाढवता आलं नसतं ? - पण ते माझ्या कलेशी व्यभिचार केल्यासारखं झालं असतं . ' स्वेपाकीबुवा . मीम्टलं , ` बरोबर आहे . आमच्या व्यवसायातही तेच आहे . कथा म्हणजे कथा . तिला फुगवून कादंबरी करा . - स्वादच जाईल . ' "" ह्या कोठडीतून स्थानबध्दांना ` मोकळी हवा , करमणूक आणि व्यायम ' याच्यासाठी सकाळी साडेआठ वाजता बाहेर काढीत आणि चारी बाजूंना उंच भिंती आणि आकाशाच्या दिशेला थोडेफार उघडे असणाऱ्या एका कोंडवाडयात नेऊन अर्धा तास उभे करीत . "" तो कोंडवाडा
कलकत्त्याचं ब्लॅक होल पाहिलेल्या आणि त्याचं अमाप कौतुक वाटणाऱ्या आर्किटेक्टने रचलेला असावा . "" इति "" वुडहाऊस . कोठडीत भोगाव्या लागणाऱ्या प्रत्येक हालाची त्याने अशी खिल्ली उडवली आहे . जर्मनांच्या ताब्यातल्या त्या फ्रेंच तुरूंगातल्या कोठडीतल्या घाणीचे वर्णन करताना वुडहाऊस म्हणतो , "" आमच्या 44 नंबरच्या कोठडीतली घाण कशी तगडया , रूंद खांद्याच्या होतकरू जवानासारखी होती . आम्हांला त्या घाणीचा लळा लागला - अभिमान वाटायला लागला .
इतर घाणीच्या तुलनेने तिची ताकद आणि दर्जा ह्या गुणांच्या श्रेष्ठतेविषयी इतर केद्यांबरोबर आम्ही पेजा घ्यायला लागलो आणि पहिला जर्मन ऑफिसर जेव्हा आम्चाय गाभाऱ्यात शिरला आणि त्या घाणीमुळं दाणकन मागं सरकला त्या वेळी तर आम्हांला आमचा वेयक्तिक सन्मान झाल्यासारखं वाटलं . "" त्या कोंडवाडयातील ती अर्ध्या तासाची मोकळी हवा वगेरे सोडली तर त्या कोठडीत ह्या तिघांना दिवसाचे उरलेले साडेतेवीस तास घालवावे लागत . त्याही अनुभवाची वुडहाऊस विनोदानेच वासलात लावतो : "" समग्र शेक्सपिअरमुळं माझं एक ठीक होतं . पण बारचालवणाऱ्या आल्जीच्या हाताशी कॉकटेल्स करायला दारू नव्हती आणि कार्मेलजवळ ट्यूनिंग करायला पियानो नव्हते . बाकी जवळपास पियानो नसणाऱ्या ट्यूनरची अवस्था वेद्यकिय सल्लावरून शाकाहारावर ठेवलेल्या वाघासारखीच म्हणायला हवी . काही दिवस त्या स्थानबध्दतेत काढल्यानंतर एक दिवशी कमांडर आला आणि म्हणाला की , ` तुमचे कागदपत्र तपासून झाल्यावर इथून हलवलं जाणार आहे तेव्हा तयार राहा . जे साठीच्या पुढले असतील त्यांची सुटका करून त्यांना घरी पाठवण्यात येणार होतं . बिल कार्मेल आणि त्यांच्या वयाच्या इतरांनी एका बाजूला रांग धरली . माझ्या वयाला पावणे एकुणसाठ वर्षे झाल्याच्या जोरावर मीही तिकडे सरकलो . पण मला ` पीछे हटो ' केलं पावणेएकुणसाठ वगेरे चांगलं आहे , पण जितकं चांगलं असायला हवं तितकं नाही , अशी मला समज देण्यात आली . "" दुसऱ्या दिवशी 11 वाजता सूप पाजून सगळ्या स्थानबध्दांना एक व्हॅनमध्ये कोंबले आणि एका रेल्वेस्टेशनात आणले . वुडहाऊस म्हणतो : "" एकूण तिथली धांदल आणि गडबड पाहिल्यावर गाडी साडेअकराला सुटणार असाच एखाद्याने अंदाज केला असता . पण तसं काही नव्हतं . आमचा हा कमांडर गडी भलताच सावध दिसला . मला वाटतं , कधीतरी त्याची गाडी चुकली असावी . आणि त्या घटनेचा त्याच्या मनावर खोल परिणाम होऊन त्याच्यात गंड निर्माण झाला असावा .


सकाळी11 - 40 ला त्यानं आम्हांला स्टेशनात पोचवलं आणि गाडी आठ वाजता हलली . आम्हांला पोचवणारा सार्जंट परतल्यावर त्याचा आणि त्या कमांडरसाहेबाचा जो काही संवाद झाला असेल त्याची कल्पना करता येईल .

` - काय ? गाडी नीट पकडता आली ना ? ' कमांडर
` होय साहेब . आठ तास वीस मिनिटांनी - ' सार्जंट
` बापरे ! थोडक्यात मिळाली . यापुढे इतक्या कटोकटी जाऊन चालणार नाही '
सकाळी नुसते पेलाभर सूप पाजून स्टेशनात त्या स्थानबध्दांना आठ - आठ तास रखडत ठेवणाऱ्या दुष्ट कमांडरची वुडहाऊस ह्या थाटात चेष्टा करतो . लूस तुरूंगातून पुन्हा या मंडळीची उचलबांगडी झाली . वुडहाऊस ह्या थाटात चेष्टा करतो . लूस तुरूंगातून पुन्हा या मंडळीची उचलबांगडी झाली . वुडहाऊस म्हणतो : "" त्या तुरूंगाचा निरोप घेताना माझ्या डोळ्यांत अश्रूबिश्रू काही आले नाही . पण वॉर्डरने आमच्या व्हॅनचा दरवाजा बंद करून ` हौ टु ' ने सुरू होणारी अमेरिकेत बरीच रंगारी लोकप्रिय पुस्तके आहेत . ` हो टु विन फ्रेंडस , ' ` हौ टु बी ए मिलिओनर ' - अशी झटपट रंगारी बनवणारी पुस्तके . वुडहाऊसने आपल्या भाषणांना ` पूर्वशिक्षण नसूनही फावल्या वेळात स्थानबध्द कसे व्हावे ? ' असे नाव दिले आहे . लूस तुरूंगानंतरचा ह्या चव्वेचाळीस स्थानबध्दांचा आगगाडीचा प्रवास चक्कगुरे न्यायच्या डब्यातून झाला . त्या चेंगराचेंगरीचे वर्णन करताना वुडहाऊस म्हणतो : "" लहान वयात विडया वगेरे ओढायची सवय लागल्यामुळं वाढ खुंटलेल्या घोडयांच्या शिंगरांतली जेमतेम आठ शिंगरे त्या डब्यात मावतील एवढया जागेत चाळीस माणसं कोंबली तर ती अवघडणारच . आम्ही पन्नास होतो रात्री जरा पाय ताणावा म्हटलं तर दुसऱ्या उतारूला लाथ बसायची . त्यालाही असंच काही वाटलं तर आपल्याला . डब्याच्या खालच्या फळ्यांना भोकं होती . त्यांतून बर्फासारखा गार वारा आमच्या तंगडयांशी रूंजी घालायच्या . वरच्या छतावरून येणारा तसलाच वारा आमच्या डोक्याशी खेळायचा . आम्ही सर्व जण चाळिशी - पन्नाशीपलिकडले होतो , पण कुणालाही न्युमोनिया झाला नाही . गुडघे धरणं नाही , पाठ धरणं काही नाही . मला वाटतं , स्थानबध्दांची काळजी घेणारा एक स्पेशल परमेश्वर असावा . "" शेवटी ही दिंडी बेल्जममधल्या लीज गावी आली आणि नाझी सेनिकांनी ह्या लोकांना एका डोंगरी गडावर पिदवत नेले आणि तिथल्या बराकीत बंद केले . "" तिथंल वातावरण उत्सावाची तयारी होण्यापूर्वी असतं तसं होतं . पार्टीत पाहुणेमंडळी वेळेच्या आधीच पोहोचल्यावर होईल त्या थाटाचं . सगळा गोंधळ . मुख्यतः जेवणाचा . एखाद्या विसरभोळ्या कवीवर ही व्यवस्था सोपवली असावी आणि स्थानबध्दांना जेवण लागतं ही गोष्ट तो विसरला असावा . ` खरंच ! ताटवाटया वगेरे लागतात नाही का ? का हो ? थेट उकलत्या हंडयात तोंड घालून सूप मटकावता येणं त्यांना जमण्यासारखं नसेल - नाही का ? ' असंही तो म्हणाला असेल . शेवटी आम्ही डोकी लढवून तो प्रश्न सोडवला . "" डोकी लढवून प्रश्न सोडवला म्हणजे काय केले ? त्या बराकीच्या मागल्या बाजूला जुन्या
डब्यांचा , बाटल्यांचा , किटल्यांचा आणि मोटारीच्या तेलाच्या डबडयांचा बेल्जियम सोल्जरांनी टाकून दिलेला ढिगारा साठला होता , तो उपसून ह्या स्थानबध्दांनी आपल्या पेल्यांची सोय केली . वुडहाऊसच्या वाटयाला "" मोटारीच्या तेलाचं रिकामं डबडं आलं होतं . त्यामुळे माझ्या सूपला इतरांना न लाभलेली एक चव आली होती . "" त्या बरकीत प्रचंड घाण होती . स्थानबध्दांनाच ती साफ करावी लागली . तिथले संडास ही तर खास गोष्ट होती . शिवाय , रोज तीनतीन वेळा यार्डात आठशे स्थानबध्दांची ` गिनती ' करायला तासतास त्यांना उभे करायचे . पाचा - पाचांच्या रांगा धरायला लावायचे . त्या धड कधी लागायच्या नाहीत . दरवेळी निराळी बेरीज व्हायची . कॉर्पोरेलसाहेब पुन्हा मोजायला लागायचे .
"" एकूण आम्हांला पाच वेळा मोजून काढावं लागे . स्थानबध्द सॅण्डी यूल , ह्या मोजणी - परेडच्या वेळी आम्ही पाचांच्या रांगेत सातव्या आणि आठव्या नंबराला उभे होतो तेव्हा म्हणाला , ` युध्द संपल्यावर , माझ्यापाशी जर भरपूर पेसे साठले तर मी एक जर्मन सोल्जर विकत घेऊन बागेत उभा करणार आहे आणि दिवसातून सहा वेळा त्याला मोजून काढणार आहे . '
थोडक्यात म्हणजे तासन््तास ही आठशेएक स्थानबध्द मंडळी उभी आणि कॉर्पोरेल , वॉर्डर सार्जंट आपले मोजताहेत . एकदा तर चक्क आठ लोक कमी भरले . मग धावाधाव . ( जर्मन सार्जंटने तेवढयात कुणीतरी रांग सोडली म्हणून जर्मन भाषेतून शिव्या दिल्या . फ्रेंच दुभाष्याने त्या शिव्यांचे फ्रेंचमधून भाषांतर केले . ) शेवटी सगळ्यांना पुन्हा बराकीत कोंबून
कोठडी बाय कोठडी मोजले , तरीही आठ कमी . सगळे लष्करी अधिकारी चिंतेत . शेवटी फ्रेंच दुभाष्याला आठवलें . तो म्हणाला , ` साहेब , हॉस्पिटलमधल्या स्थानबध्दांचं काय ? ' अधिकारीगण हॉस्पिटलात धावला . तिथल्या आडव्या झालेल्या स्थानबध्दांची संख्या आठ भरली . ताळेबंद जमला . "" एकदा स्थानबध्द म्हटला की माणसाचा फक्त ` क्रमांक ' होतो . वुडहाऊस हा एक असामान्य साहित्यिक होता . कुणाविषयी आकस न ठेवता , कुणालाही माणसांतून उठवण्याचा प्रयत्न न करता आपल्या निर्मळ विनोदाने त्याने लक्षावधी लोकांना आनंद दिला होता . पण स्थानबध्द
झाल्यावर त्याचाही नुसता केदी नंबर सातशे शहाण्णव झाला . जर्मन अधिकाऱ्याने त्याला लीजच्या बराकीत संडास साफ करण्याचे काम दिले . रेडिओ - वरच्या भाषणात त्याने हा अनुभव सांगतानादेखील कुणाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न
केला नाही . तीच विनोदी धाटणी : "" लीजच्या बराकी साफ करायला आम्हांला फार दिवस लागले . मला कुणाचा अपमान करायचा नाही ; पण एक सांगतो - तुम्ही जोपर्यंत बेल्जियम सेनिकांनी वापरलेला संडास साफ करण्यास हातभार लावला नाही , तोपर्यंत मी म्हणेन की तुम्ही काहीच पाहिलेलं नाही . काही वर्षांनंतर मला जर कुणी येऊन विचारलं की , ` का हो ? ह्या महायुध्दात तुम्ही काय केलतं ? ' तर मी सांगेन , ` लीजच्या बराकीतले संडास साफ केले . ' आणि मला प्रश्न विचारणारा माणूस चटकन ` वाटलंच मला . ' असं म्हणणं अशक्य नाही . कारण वारा अनुकूल असला तर अजूनही माझ्या दिशेने तो परिमळ दरवळतो . कुणीसं म्टलंय ना , तुम्ही काचेची फुलदाणी कितीही फोडलीत तरी तिला चिकटलेला गुलाबाचा वास कसा जाणार ? "" मला राहून राहून नवल वाटते की , वुडहाऊसच त्या बर्लिन ब्रॉडकास्टमध्ये जर्मनांची सतत टोपी उडवतोय हे कोणाच्याच लक्षात कसे आले नाही ? आपल्या आवडत्या लेखकाला शत्रूने
असे सक्तीने संडास साफ करायला लावले हे ऐकून चीड यायला हवी होती . पण झाले भलतेच . बी . बी . सी . वरून विल्यम कॉनर नावाच्या लेखकाने तर ` हिटलरची स्तुती करण्याच्या कबुलीवर वुडहाऊसने स्वतःची मुक्तता मिळवली ' इथपर्यंत गरळ ओकले . त्याच्या त्या टीकेत वुडहाऊस काय बोलला याविषयी अक्षरही नव्हते . त्यामुळे लोकांची समजूत , वुडहाऊस ` नाझी प्रचाराची भाषणं करतो आहे ' हीच झाली . बी . बी . च्या गव्हर्निग बॉडीनेदेखील हे असत्य आहे म्हणून असल्या खोटेपणाला स्थान द्यायचे नाही असे ठरवले . पण प्रचार # खात्याच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर सक्ती करून कॉनरचा वुडहाऊसविरोधी अपप्रचार चालू ठेवला . लीजवरून वुडहाऊस आणि इतर नेहमीचे यशस्वी सातशे नव्याण्णव स्थानबध्द ह्यांची उचलबांगडी ह्यू नावाच्या एका गडावर असलेल्या कॉन्सेन्ट्रेशन कँपमध्ये झाली . जीवघेणी थंडी . अंथरूण - पांघरूण नाही . वुडहाऊस म्हणतो : "" प्रेवशद्वारातून शिरल्यावर उजव्या बाजूला एक देखणा संडास होता . "" ह्या स्थानबध्द शिबिराच्या प्रमुख संचालकांना एकच माहिती होते : "" कुठलाही स्थानबध्द काहीही करीत असला की , त्याला ते कारयाची मानई करायची . "" पावाचा तुकडा , कॉफी असावी असा संशय उत्पन्न करणारे एक पेय आणि सुकवलेल्या भाज्या उकळून केलेले सूप . ह्या उपासमारिचे वर्णनही वुडहाऊस गंमतीतच करतो : "" ह्या अपुऱ्या आहाराला पूरक अन्न म्हणून आम्ही निरनिराळे प्रयोग सुरू केले . माझी आगपेटीतल्या काडया चघळण्यावर श्रध्दा जडली . पुढल्या दातांनी चावून चावून त्याचा लगदा झाला की त्या गिळायच्या . पोट भरत नव्हतं . पण भुकेला आधार म्हणून वाईट नव्हतं . कधीमधी कँटीन उघडलं तर आम्हांला अर्धा इंच रूंद , अर्धा इंच लांब आणि पाव इंच जाड चीज मिळायचं . ते खाण्याची कृती अशी : शेक्सपिअरचं सुनीत छापलेलं किंवा टेनिसच्या एखाद्या बऱ्यापेकी कवितेचं पान घ्यावं , त्यात ते गुंडाळावं . . चवीला आगपेटीतल्या चार काडया टाकाव्या . . . पदार्थ खायला चांगला लागतो . "" ह्यूच्या किल्ल्यातल्या मुक्कामात भोगाव्या लागणाऱ्या ह्या हालांबद्दल वुडहाऊस असा थटटेने बोलत होता . तिथून मग उत्तर सायलेशियातल्या टोस्ट नावाच्या गावी नेऊन तिथे त्यांना एका इमारतीत डांबले . तिथे पूर्वी वेडयांचे इस्पितळ होते . तीन दिवस आणि तीन रात्री एका जागी बसून आगगाडीचा प्रवास . त्या अवधीत अर्धे सॉसेज , अर्धा पाव आणि थोडे सूप ही मेजवाणी . पहारा , मागे , पुढे संगिनी घेतलेले नाझी सोल्जर्स उभे . अशा अवस्थेत ह्या पठठयाने चक्क एक विनोदी कादंबरी लिहिली . इथे वुडहाऊसचा मुक्काम बेचाळीस आठवडे होता . स्थानबध्द मंडळीत रोज एखादी आशादायक अफवा उठायची . ती कधीही खरी ठरत नसे . पण वुडहाऊस मात्र ` अँन अँपल ए डे कीप्स द डॉक्टर अवे ' ह्या चालीवर म्हणतो : "" ए रूमर ए डे कीप्स द डिप्रेशन अवे . "" रोजची नवी अफवा मनाचा थकवा दूर सारायची . स्थानबध्दांत प्रोफेसर होते , गायकवादक होते , भाषांपंडित होते , व्याख्याते होते . कधीकधी एकमेकांत मिसळायचे क्षण मिळायचे . आलिया भोगासी म्हणत सारे जगत होते . त्यांचे मनोधेर्य विलक्षण होते . वुडहाऊस म्हणतो : "" इतका आनंदी जमाव यापूर्वी मला कधी भेटला नव्हता . त्यांच्यावर माझं भावासरखं प्रेम जडलं होतं . "" स्थानबध्देत अनुभवलेल्या सगळ्या हालांचे वर्णन विनोदात गुंडाळून लोकांपर्यंत पोचवणाऱ्या वुडहाऊसच्या ह्या भाषणांचा शेवट मात्र ह््द्य आहे . शेवटपर्यंत त्याची कल्पना अशी की , भाषणे अमेरिकन कंपनीने अमेरिकेतल्या श्रोत्यांसाठी ध्वनिमुद्रित केली आहेत . त्याची इंग्लंडमध्ये अशी विपरीत प्रतिक्रिया होत आहे हे त्याच्या श्वप्नातही नव्हते . बंदिवासात रेडिओ कुठून ऐकणार ? ह्या भाषणांमुळे अमेरिकतेल्या आपल्या शेकडो वाचकांना आपण जिंवत आहोत आणि स्थानबध्दतेतल्या हालांना पुरून उरलो आहोत हे कळावे ही इच्छा . म्हणून इंग्रज नागरी स्थानबध्द क्रंमाक 796 ह्या भूमिकेतून तो शेवटी म्हणतो : "" मी स्थानबध्दतेत असताना अमेरिकतेल्या ज्या दयाळू लोकांनी मलापत्रं पाठवली त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो . अशा पत्रांचं , विशेषतः मला ज्या प्रकारची पत्रं आली तशा पत्रांचं स्थानबध्दाला वाटणारं मोल , ज्याला कधी तुरूंगवास घडला नाही त्याला कळणार नाही .""


महायुध् संपले . वुडहाऊसवर झालेल्या अन्याबद्दल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये वादविवाद झाला . संपूर्ण चौकशी झाली . वुडहाऊस निर्दोषी होता हे ठरले . मरणापूर्वी वर्ष - दीड वर्षे आधी ब्रिटिश राणीने त्याला ` सर पेल्हॅम ' केले . पण बूंद से गयी वह हौद से नहीं आती . त्याला एकच समाधान होते : ज्या पिढीने आयुष्यात कधी हाडामासाचा बटलर किंवा लॉर्ड पाहिला नाही , विसाव्या शतकाच्या आरंभकाळातले इंग्लंड पाहिले नाही , ती नवी पिढीसुध्दा सत्तर वर्षांपूर्वीच्या त्याच्या वाचकांसारखी लक्षावधींच्या संख्येने त्याची पुस्तके वाचून मनमुराद हसत होती . त्र्याण्णव वर्षांचा वुडहाऊस . त्याची एकोणनव्वद वर्षांची बायको एथेल . तिच्याविषयी विल्यम टाऊनएडला लिहिलेल्या पत्रात वुडहाऊस म्हणतो : "" बायका काय वंडरफुल असतात नाही ? एथेलनं हे सारं कसलीही तक्रार न करता सहन केलं . किती विलक्षण , सुरेख होतं तिचं वागणं ! गेली तीस वर्षे आपल्या प्रेमातून आणि कौतुकातून ती मला स्फूर्ती देत आली . त्याचा ह्या काळात तिनं नवा उच्चांक गाठला . ""


संध्याकाळची वेळ . बंगलीच्या ओसरीवर हे वृध्द जोडपे शरी पीत बसले होते . ` न्यूयॉर्कर ' चा लेखक हर्बर्ट वॉरन विंड पाहुणा म्हणून आला होता . वृध्द एथेल आपला नवरा टी . व्ही . वर त्याला अजिबात न कळणारा अमेरिकन फूटबॉलचा खेळ पाहत बसतो म्हणून थटटा करीत होती . आयुष्यभर अमेरिकेत राहिलेला प्लम हा मनाने इंग्रजच राहिला . क्रिकेट
हाच त्याला कळणारा खेळ आणि गोल्फ . त्यातला तर तो उस्ताद होता . पण अमेरिकन फूटबॉल ? खेळता खेळता खेळाडू एकत्र येऊन गोल कोंडाळे काय करतात , रेटा देऊन बॉल काय पळवतात , त्यात वुडहाऊसला काही कळत नसे . मग वुडहाऊसला सांगायला लागला, "" अग मला अमेरिकन फूटबॉल कळतो असं नाही . पण मजा काय ती ठाऊक आहे तुला ? ते भिडू धावपळ सुरू करतात , आणि मध्येच एकत्र जमून कोंडाळं करून क्रिडाविषयक चर्चा करतात . "" थोडा वेळ स्तब्धता होते . बंगलीपुढच्या हिरवळीकडे आणि काठावरच्या उंच वृक्षांच्या रांगेकडे दोघेही शांतपणाने पाहतात . मग वुडहाऊस म्हणतो , "" किती छान दिसतात नाही हिरवळीवर उतरलेली ही संध्याकाळची उन्हं . . . "" जीवनाच्या संध्याकाळीही त्याच्या मनात तशीच हिरवळ होती . तशीच उन्हे होती . स्थानबध्दतेतही हाल आणि त्याहूनही त्याच्या लाडक्या इंग्लंडने त्याचा कोणताही अपराध नसताना केले त्याचे ह्दयशून्य चारित्र्यहनन त्या अंतर्मनातल्या हिरवळीचा हिरवेपणा आणि प्रकाश नष्ट करू शकले नव्हते . जर्मनीने इतके हाल करूनही "" प्लम , तुला जर्मन लोकांचा तिटकारा येत नाही का ? "" ह्या प्रश्नाला उत्तर देताना प्लम म्हणाला होता , "" गडयांनो , मी असा घाऊक तिटकारा कधी करीत नाही ."" त्या दिवशी आगगाडीत मी वुडहाऊसचे पुस्तक उघडले . पहिल्या परिच्छेदातच हसू फुटले ,पण हसता हसता डोळ्यांत पाणी आले ते केवळ हसण्यामुळे आले असे नाही वाटले !

------------------------------------

सखे सोबती गेले पुढती

मैत्र

सखे सोबती गेले पुढती

चादरीखाली झाकलेला देह डोळ्यापुढे दिसत होता . शांत झोप लागल्यासारखा . ह्या झोपेतून आता जाग नाही हे कळत होते . असल्या झोपेकडे सगळ्यांचा प्रवास असतो , हा वेदान्तही माहिती होता . घणाघाती घाव पडावा अशी सुन्न झालेली माणसे पायाखालची जमीन खचल्यासारखी उभी होती . हलली तरी छायांसारखी हलत होती . बांध फोडून बाहेर
हुंदके कानांवर येत होते . सारे काही संपलेले आहे या जाणिवेने देहमन बधिरले होते . त्या घरात गेल्यावर कधी आतल्या कोचावर बेठक मारून हातातल्या आडकित्याने सुपारी कातरीत बसलेल्या थाटात , तर कधी आतल्या खोलीतून बाहेर प्रवेश करीत "" या "" अशा मोकळ्या मनाने स्वागत करणारा तो आवाज आता पुन्हा कानी पडणे नाही हे समजत होते . आतल्या खोलीतून बाहेरच्या दिवाणखान्यात तो मृत देह उचलून आणताना , असाही एक प्रसंग आपल्या आयुष्यात येणार आहे असे कधीही वाटले नव्हते . पाचसहा दिवसांपूर्वीच गोष्टी झाल्या होत्या . माडगूळकरांना आणि विद्याबाईंना आम्ही सांगत होतो , "" तुम्ही जिमखान्यावर राहायला या . सगळे जुने स्नेहीसोबती तिथेच आसपास राहतात . भेटीसाठी सोप्या होतील . आता ` पंचवटी ' तली ही जागाही अपुरी पडत असेल . पूर्वीपेक्षा वर्दळही खूपच वाढली आहे . मोटांरीचा धुरळा , पेट्रोलचे भपकारे . . . अधिक मोकळ्या हवेत या . . . "" आणि त्याआधी , आठदहा दिवसांपूर्वीच , गीताचे दान मागायला गेलो होतो . बाबा आमटयांच्या आनंदवना - तल्या वृक्षारोपण - समारंभासाठी . असा हा गीत मागायला जायचा परिपाठ गेल्या तीस - पस्तीस वर्षांचा . रिक्त हस्ताने आल्याचे स्मरत ही .चित्रपटव्यवसायात असताना तर नित्यकर्माचाच तो एक भाग होता . आताशा नेमित्तिक . पुण्याला ` बालगंधर्व ' थिएटर उभे राहत होते . गोपाल देऊसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणाऱ्या चार ओळी पाहिजे होत्या . ` पंचवटी ' गाठली .माडगूळकरांना म्हणालो , "" स्वामी , चार ओळी हव्या आहेत . . . बालगंधर्वाच्या पोर्ट्रेटपाशी . "" मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले , "" असा बालगंधर्व आता न होणे . "" तेवढ्यात कुणीतरी आले . गप्पागोष्टी सुरू झाल्या . मी समस्यापूर्तीची वाट पाहत होतो . तासाभरात निघायचे होते . त्या श्लोकाला चाल लावायची होती . उद््घाटन - समारंभाच्या प्रसंगी गाण्याच्या गीतांच्या तालमी चालल्या होत्या . त्यांत माडगूळकरांचेच ` असे आमचे पुणे ' होतेच . तालमीच्या ठिकाणी बाळ चितळे श्लोक घेऊन आला . सुरेख , वळणदार अक्षरात लिहिलेला . बकुळ पंडितला मी चाल सांगितली . रंगमंदिराच्या उद््घाटनाच्या वेळी रसिकांनी तुडुंब भरलेल्या प्रेक्षागारातले दिवे मंदावले . रंगमंचावर मांडलेल्या बालगंधर्वांच्या ` नारायण श्रीपाद राजहंस ' आणि ` स्वयंवरातली रूक्मिणी ' अशी दोन दर्शने घडवणाऱ्या त्या अप्रतिम चित्रांवरचे पडदे दोन युवतींनी बाजूला केले , आणि लगेच माडगूळकरांच्या गीताचे गायन सुरू झाल्यावर रसिकांना कळेना , की त्या रंगशिल्पाला दाद द्यावी की गीतातल्या शब्दशिल्पाला . प्रेक्षागारात पुन्हा प्रकाश आला त्या वेळी त्या ` रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्् ' ह्या अनुभूतीचे पर्युत्सुक झालेल्या रसिकांच्या खिशांतले शेकडो हातरूमाल अश्रू पुसत होते .
पुणे विद्यार्थीगृहासाठी ` मुक्तांगण ' उभे करताना अशीच ` मुक्तांगणा ' च्या गाण्याची मागणी घेऊन आलो होतो . ` मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी ' असे मर्ढेकर म्हणून गेले आहेत . माडगूळकरांच्यापाशी गीते मागताना हे किती खरे होते . आम्हां मागणाऱ्यांचीच ताकद अपुरी पडली . शेकडो गीते त्यांनी दिली . आणखी शेकडो मिळाली असती . दोन वर्षांपूर्वी झालेल्या त्या भंयकर आजाराने त्यांच्या शरीरावर आघात केला होता ; - पण गीतप्रतिभेचा झरा मात्र अखंड वाहत होता . ` मुक्तांगणा ' च्या गाण्याच्या वेळचीच गोष्ट . मी माडगूळकरांना ` मुक्तांगणा ' चा हेतू सांगितला . वृक्षरोपणाने कार्यारंभाची मुहूर्तपेढ रोवली जाणार होती . त्या कार्याच्या वेळी मला गीत हवे होते ते माडगूळकरांच्याच प्रतिभेतून फुललेले . गप्पागोष्टी चालल्या असतानाच माडगूळकरांनी हातातल्या कागदावर दोन ओळी लिहिल्या :

`आनंदसाधकांनो , या रे मिळून सारे !
मुक्तांगणांत या रे , मुक्तांगणांत या रे ! ! '

त्यानंतर मग इकडच्यातिकडच्या गप्पागोष्टी झाल्या . घरी परतल्यानंतर तासाभरातच फोन वाजला . पलीकडून माडगूळकरांचा आवाज आला : "" घ्या , तुमचं गाणं तयार आहे . कागद - पेन्सिल घ्या .

`आनंदसाधकांनो , या रे मिळून सारे !
मुक्तांगणांत या रे ! !
वयवंशधर्मभाषा यांना न ठाव कांही
क्रीडांगणीं कलांच्या हा भेदभाव नाही
मनममोकळेपणे घ्या इथले पिऊन वारे
मुक्तांगणांत या रे . . . . . . . ' ""

गीतांच्या जन्मकाळाशी गुंतलेल्या अशा किती आठवणी . डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यातून जाताना एका विजेच्या खांबापाशी आलो की आठवते : रात्रीचे चित्रिकरण आटपून चालत चालत आम्ही दोघे येत होतो . पहाट होत होती . रस्त्यातले दिवे मालवले . त्या खांबापाशी क्षणभर थांबून माडगूळकर उद््गारले ,

"" विझले रत्नदीप नगरांत !
आता जागे व्हा यदुनाथ . . . ""

लकडी पुलाजवळ जिथे टिळक रोड सुरू होतो तिथेच पंतांचा गोट होता . आता तिथे सिमेंटकॉक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत . त्या पंतांच्या गोटात एका दहा गुणिले दहा क्षेत्रफळाच्या खोलीत आमचा तळ असे . किती गीतांचा आणि पटकथांचा जन्म त्या खोलीत झाला आहे हे सांगायला आता ती खोलीही उरली नाही . किती चर्चा , किती नकला किती गाणीबजावणी , किती थट्टामस्करी . . . वाढत्या वयाबरोबर वारंवार आठवणारी गडकऱ्यांची एकच ओळ : ` कृष्णाकाठी कुंडल आतां पहिले उरलें नाही . ' साहित्यकलांच्या नव्या निर्मितीत बेहोश होण्याऱ्यांची तिथे मेफिल जमायची . मला वाटते , यापूर्वी मी कुठेसे म्हटले आहे तेच पुन्हा म्हणतो : ` स्वरवेल थरथरे फूल उमललें ओठीं . . . ' हे माडगूळकरांच्या गीतांच्या बाबतीत सर्वार्थांने खरे आहे . जणू काय लक्ष गीतांची उतरंड त्यांच्या मनात विधात्याने त्यांना जन्माला घालतानाच रचलेली होती . मागणाऱ्याने मागावे आणि एखाद्या फुलमाळ्याने भरल्या
टोपलीतून फूल काढून दिल्यासारखे माडगूळकरांनी अलगद टपोरे गीत काढून द्यावे .

` संसारीं मी केला तुळशीचा मळा ! करदा सावळा पांडुरंग ' आशा ओळींनी सुरूवात होणारा त्यांचा एक अभंग आहे . माणसाला अचंब्यात टाकणाऱ्या माडगूळकरांच्या प्रतिभेने वास्तविक आपल्या मळ्यात नाना प्रकारच्या फुलांची बाग फुलवली होती . ही केवळ चतुर कारागिरी नव्हतीं ; त्यांना नुसतेच एक गीतकार म्हणून कमी लेखणाऱ्यांना नाना प्रकारच्या भाववृतींशी समसर होणारे माडगूळकर ठाऊक नव्हते . गेल्या जवळजवळ तीन तपांच्या सहवासात मला अनेक प्रकारचे माडगूळकर पाहायला मिळालेले आहेत . प्रौढांच्या मेळाव्यात बसलेले माडगूळकर त्यात एखादे पोर आले की एका क्षणात किती देखणा पोरकटपणा करू शकत ! एखाद्या ग्रामीण पटकथेतले संवाद लिहिताना त्यांचा तो माणदेशी शेतकऱ्याचा अवतार
पाहण्यासारखा असे . ते शीघ्रकवी होते तितकेच शीघ्रकोपीही होते . आणि त्या कोपाचा अवसर उतरल्यावर विलक्षण मवाळही होऊन जात . ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या ओळीवर निरूपण करताना त्यांच्यातला रसाळ पुराणिक दिसायला लागे ; आणि ` एक पाय तुमच्या गावांत ! दुसरा तुरूंगांत किंवा स्वर्गात ! तमा नाहि त्याचि शाहिराला . . . ' असा पवाडा स्फुरायला लागला की अगिनदास - तुळशीदासांच्या वंशाचा दिवा पेटता असल्याची साक्ष पटे . केवळ साहित्यिकां -
साठी साहित्य आणि कवींसाठी कविता लिहिणारा हा कवी नव्हता . कवितेच्या याचकाची जातकुळी किंवा हेतू न पाहता , गीतदान हा जणू आपला कुलधर्म आहे आणि त्याला आपण जागलेच पाहिजे अशा भावनेने त्यांनी कविता लिहिल्या .


हा कवी आपल्या व्यक्तिमत्वात भाववृत्तींच्या इंद्रधनुष्याचे किती खेळ खेळवीत जगत होता . प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळीत असतानाही चटकन कविता , कथा , कादंबरी , पटकथा अशा नाना प्रकारच्या निर्मितीच्या कार्यात तन्मय होऊन जात होता . त्यांच्या गीतांना चाली लावण्याचा योग मला लाभला , ते गीत घडत असताना त्यांचे ध्यान पाहत बसणे हा ते गीत
वाचण्याइतकाच आनंदाचा भाग असे . माडगूळकर उत्तम अभिनेते होते . एखादे कडवे लिहिताना तो भाव सूक्ष्म रूपाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसे . चित्रपटातला प्रसंग सांगितला की पटकन पहिली ओळ त्यांच्या मुखातून बाहेर पडायची , आणि पेळूतून सूत निघाल्यासारखे कवितेच्या ओळींचे सूत्र प्रकट व्हायला लागायचे . यमकप्रासांसाठी अडून राहिलेले मी त्यांना कधी पाहिले नाही . त्यांची गीते गाताना किंवा वाचताना जर मन कुठल्या एका गुणाने थक्क होत असेल तर त्यांतल्या सादगुणाने . कविह्दयातून रसिकह्दयापर्यंतची कवितेची वाटचाल कशी सहज पण म्हणून काही ती नुसतीच सुबोध नसे . अनेक प्रतिमांचा सुंदर मिलाफ तीत

असायचा ` दूर कुठे राउळांत दरवळतो पूरिया ' असे एक गाणे त्यांनी लिहिले होते . सुरांच्या शाहिरांचा त्यांना वरदहस्त लाभला होता . माडगूळकर महाराष्ट्रातल्या घराघरातच नव्हे , तर झोपडीझोपडीत गेले . ती वाट मराठी मुलखात कविप्रतिभेच्या ह्या त्रेगुण्यात्मक शेलीने घडवली होती यात शंका नाही . सर्व अंगानी आणि सर्व गुणांनी त्यांनी मराठी भाषा पचवली होती . त्यांच्या गद्य किंवा पद्य भाषेला अमराठी वळण ठाऊकच नव्हते . ज्या ग्रामीण वातावरणात ते वाढले तिथल्या पारावर पवाडा असतो , देवळात पंतवाङ्मयाचा विदग्ध स्वरूपातला शब्दश्रीमंतीचा खजिना मोकळा करीत कथेकरीबुवा येत असतात , आणि जत्रेच्या रात्री कड्या - ढोलकीच्या साथीत पायांतल्या घुंगरांशी स्पर्धा करीत श्रृंगारिक शब्दांचेही ता थे तक्् थे चाललेले असते . सुगीच्या दिवसांत पाखरांच्या थव्यांबरोबर लोकगीते गाणारे भटके कलावंतही भाषेचा एक न्यारा रांगडेपणा घेऊन येत असतात . सारे गाव ह्या संस्कारांत वाढत असते . माडगूळकरांच्या बालपणी हा असर अधिक होता . पण तो रस साठवणारे पात्र सर्वांच्याच अंतःकरणात नसते . जीवनातल्या अनेक अंगांचे नाना प्रकारांनी दर्शन घडवणाऱ्या संत - पंत - शाहीर - लोककलावंत असणाऱ्या गुरूजींनी ह्या देशात शतकानुशतके ही खुली विद्यापीठे चालवली आहेत . मात्र त्या
विद्यापीठांना माडगूळकरांसारखा एखादाच त्या परंपरेला अधिक समृध्द करणारा विद्यार्थी लाभतो . आपल्या गीतांना त्यांनी आपल्या आईच्या ओव्यांची दुहिता म्हटले आहे . ह्या ` आई ' शब्दात ग्यानोबा - तुकोबा ही माउलीपदाला पोचलेली मराठी संतमंडळी आहेत इतकेच नव्हे , तर ` तुलसी - मीरा - सूर - कबीर ' ही आहेत . म्हणूनच त्यांच्या कवितेतला प्रसाद सर्वांच्यपर्यंत पोचतो आणि तिचे नाते मानवतेच्या प्रेमाने ओथंबलेल्या प्राचीन आणि सुंदर परंपरांशी जुळताना आढळते . हे केवळ त्यांच्या अभंग किंवा भक्तिपर रचनेतच होते असे नाही . एका चित्रपटात त्यांनी एक धनगरी गीत लिहिले आहे :



"" आसुसली माती
पिकवाया मोती
आभाळाच्या हत्ति आता
पाऊस पाड गा
पाऊस पा ड ""



ही कविता लिहून झाली त्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो होतो . सुधीर फडक्यांनी त्या गीताला सुंदर चाल दिली आहे . "" ध्येसपांडेगुर्जी , ऐका . . . "" म्हणून त्यांनी ते गाणे वाचायला सुरूवात केली . सुरांचा संबंध नव्हता . छंदातच वाचन चालले होते . आवेश मात्र धनगराचा . अशा वेळी त्यांच्यातल्या त्या अभिनयगुणाचे आश्यर्य वाटायचे . क्षणार्धात त्या कवितेतल्या धनगरांतले ते धनगर होऊन गेले . त्या गाण्यातल्या ` पाऊस पाड गा ' मधले ` गा ' हे संबोधन ऐकल्यावर ` गा ' , ` वा ' , ह्या साऱ्या संबोधनांतले मऱ्हाटीपण डोळ्यांपुढे नाचायला लागले . त्या एका नेमक्या ठिकाणी पडलेल्या ` गा ' मुळे ` एकनाथ - धाम ' नावाच्या प्रभात रस्त्यावरच्या घरातली ती चिमुकली खोली माणदोशातला उजाड माळ होऊ नगेली . योग्य ठिकाणी पडलेल्या नेमक्या शब्दाला मंत्रसामर्थ्य प्राप्त होत असते . मर्ढेकरांच्या ` फलाटदादा ' तल्या ` सांगा वे तुमि फलटदादा ' मधल्या ` वो ' ने जसे त्या रेल्वेच्या फलाटाला मुंडासे बांधून खांद्यावर कांबळे टाकून उभे केले , तेच ह्या ` गा ' ने केले होते . भाषेचे प्रभुत्व हे शब्दसंग्रहावरून किंवा शब्दांचे नुसतेच खुळखुळे वाजवण्याच्या करामतीतून जोखायचे नसते . मुळचाचि खरा असणारा झरा हा असा एखाद्या चिमुकल्या शब्दाने अवचित भेटत असतो .


गीतभावनेशी तादात्म्य पावण्याच्या त्यांच्यामधल्या गुणांच्या असंख्य खुणा त्यांच्या गीतांतून आढळतात . शब्दयोजनेतले त्यांचे अवधान सुटत नाही . अशी शेकडो गीते त्यांनी रचली . चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिल्यामुळे आमच्या` आर्डरी ' ही विचित्र असायच्या ` आर्डरी ' हा त्यांचाच शब्द . कधीकधी चाल सुचलेली असायची .

"" स्वामी , असं वळण हवं . ""
"" फूल्देस्पांडे , तुम्ही बाजा वाजवीत राहावे . ""

मित्रांच्या नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा . मग मधुकर कुळकर्ण्याला ` पेटीस्वारी ' , राम गबालेला ` रॅम्् ग्लाबल , ' वामनराव कुळकर्ण्यांना ` रावराव ' . . कुणाला काय , कुणाला काय असे नाव मिळायचे . चाल पेटीवर वाजवत बसल्यावर चटकन त्या चालीचे वजन त्यांच्या ध्यानात येई . मग त्या तालावर झुलायला सुरूवात . बेठकीवर उगीचच लोळपाटणे , पोटाशी गिरदी धरून त्याच्यावर चिमट्यात अडकवलेल्या कागदाचे फळकूट पुढ्यात ठेवून सुपारी कातरायला सुरूवात . मग आडकित्याची चिपळी करून ताल . . . नाना तऱ्हा . एखाद्या अचानक तिथे आलेल्या नवख्याला वाटावे , इथे गीत आकाराला येते आहे , की नुसताच पोरकटपणा चाललाय ! एखादे दांडगे मूल पाहावे तसे वाटत असे . त्यांच्यातला नकलावर जागा झाला की मग तो मूलपणा पाहावा . खरे तर मानमरातबाची सारी महावस्त्रे फेकून शेशवात शिरलेल्या माणसाचे ते दर्शन असायचे . ह्या स्वभावगत मूलपणाने त्यांना खूप तारलेले होते . प्रापंचिक जबाबदाऱ्या फार लवकर त्यांच्या अंगावर पडल्यामुळे विशीतच फार मोठे प्रौढपण त्यांच्यावर लादले गेले होते , त्यातून ही मूलपणाकडची धाव असायची की काय , ते आता कोणी सांगावे ? गडकरी गेले त्या वेळी रसिक महाराष्ट्र असाच सुन्न झाला होता म्हणतात . माडगूळकरांना गडकऱ्यांविषयी अतोनात प्रेम . आम्ही जोडीने केलेल्या प्रवासात गडकऱ्यांच्या कलितांचेच नव्हे तर , नाटकांतील उताऱ्यांचे पठण हा आमचा आवडता छंद असायचा . हरिभाऊ आपटे , नव्हे , तर नाथमाधव , गडकरी , बालकवी , केशवसुत , फडके , खांदेकर , अत्रे ह्या आधुनिक काळातल्या साहित्यकारांते मार्ग पुसेतु आम्ही ह्या साहित्यांच्या प्रांतात आलो . मी मुंबईत वाढलो आणि माडकूळकर माडगुळ्यात वाढले , तरी आमच्या साहित्यप्रेमाचे पोषण एकाच पध्दतीने चाललेले होते . गडकऱ्यांच्या निधनानंतर वर्षभराच्या आतच आमचा जन्म , माडगूळकर माझ्यापेक्षा फक्त एक महिन्याने मोठे . बालपणातले आमचे इतर वातावरण मात्र निराळे होते . ` त्या तिथे ,
पलिकडे , तिकडे , माझिया प्रियेचे झोपंडे ' ही कविता प्रथम त्यांच्या तोंडून ऐकल्यावर मी म्हणालो होतो , "" महाकवि , तुम्ही लकी ! ( माडगूळकर मात्र स्वतःला ` महाकाय कवी ' म्हणत . ) तुमच्या प्रियेच्या झोपड्याकडे वळताना त्या वळणावर आंब्याचं वाकडं झाड होतं . आम्ही वाढलो त्या वातावरणातल्या वळणावर जळाऊ लाकडांची वखार ! "" पण सुदेवाने मी मुंबईत वाढूनही तसा मुंबईकर नव्हतो . शाळकरी वयातल्या माझ्या खूप सुट्या कोल्हापुराजवळच्याच एका खेड्यात माझ्या आत्याच्या गावी मी घालवल्या . शिवाय माझ्या लहानपणीचे पार्लेही एक खेडेवजाच गाव होते . माझ्या घराच्या मागल्या बाजूला पावसाळ्यात भातशेती चालायची . ज्याला हल्ली ` प्लॉट््स ' म्हणतात ती सारी भाताची खाचरे किंवा दोडक्यांचे , पडवळांचे आणि काकड्यांचे मळे होते . फर्लांगभर अंतरावरच्या विहिरीवर मोट चालायची . आजच्यासारखे चारी बांजूना सिंमेट - कॉक्रीटचे जंगल उभे राहिले नव्हते . आमच्या शनिवार - रविवारच्या सुट्या आंब्याच्या मोसमात बागवानांच्या नजरा चुकवून केऱ्या पाडणे , गाभळलेल्या चिंचाच्या शोधात भटकणे , घरामागल्या आज भुईसपाट झालेल्या टेकडीवर काजू तोडायला जाणे , विहिरीत मनसोक्त पोहणे , असल्या मुंबईकर मुलांच्या नशिबात नसलेल्या गावंढ्या उद्योगांतच जायच्या . पण आपल्याला आमचे म्हणून सांगण्यासारखे खेडे नाही याची मात्र मनाला खूप खंत वाटे .पण मुंबईकर असूनही आमचे कुटुंब तसे घाटीच होते . त्यामुळे माडगूळकरांच्या ग्रामीण प्रकृतीने मला चटकन आपलेसे करून टाकले . कोल्हापूर भागातली ग्रामीण बोली फार बाळ - पणापासून माझ्या जिभेवर चढली आहे . एवढेच नव्हे , एकूणच बोलीभाषांतल्या गोडव्याचा मी आजही भक्त आहे . आजही माणसे वऱ्हाडी , सातारी वगेरे भाषांत बोलत असली तर गाणे ऐकल्यासारखे मी त्यांचे बोलणे ऐकतो . किंबहुना अडाणीपणा दाखवण्यासाठी त्या बोलीचा उपयोग केलेला मला रूचत नाही . कोकणी बोलणाऱ्यांशी मी कोकणीतच बोलतो . ह्या बोलींना लेखीच्या कृत्रिम बंधनात जखडू नये , श्वासाश्वासातूनच त्यांचा व्यवहार चालावा , असे मला वाटते . माडगूळकरांना केवळ सातारी - कोल्हापुरीच नव्हे , तर त्या भागातल्या निरनिराळ्या बोलींतल्या सूक्ष्म छटाही अवगत होत्या . शब्दांचे रंगढंग ते क्षणात कंठगत करीत . एक काळ असा होता की तासन््तास आमचे संभाषण सातारी बोलीतच चाले . कधी कोकणी ढंगात . प्रथम ज्या बोलीतून सुरूवात व्हायची त्याच बोलीत संवाद चालू .


"" कवा आलायसा म्हमयस्नं ? "" म्हटले की , "" येरवाळीच आलु न्हवं का रातच्या
पाशिंदरनं . ""
"" काय च्या ह्ये जहालं का न्हाई ? "" ह्या थाटात फाजिलपणा सुरू .

` पुढचं पाऊल ' चित्रपटाच्या वेळी आम्ही संवाद लिहित होतो . माडगूळकरांनी एक पार्ट घ्यायचा , मी दुसरा , प्रभाकर मुझुमदार संवाद टिपून घ्यायचा . आम्ही दोघेही नकलावर असल्यामुळे सोंगे वठवायला वेळच लागत नसे . त्या चित्रपटाचे शूटिंग हा तर दोनअडीच महिने त्या स्टुडिओत चाललेला सांस्कृतिक महोत्सवच होता . प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी
आयत्यावेळचे इतके संवाद बोलले जायचे , की शेवटी रेकॉर्डिस्ट शंकरराव दामले म्हणायचे , "" रिहर्सलच्या वेळी बोललेलंच येणार आहे की शेवटी गाववाले ? "" त्या वेळी ` काय गाववाले ' हे कुणीही कुणालाही हाक मारण्याचे सार्वजनिक संबोधन होते . गेल्या कित्येक वर्षांत मी चित्रपटांच्या स्टुडिओत गेलो नाही . ते गाव एके दिवशी सोडले ते सोडलेच . त्यानंतर त्या दिशेने अनेक आमंत्रणे आली . - पण नाही जावेसे वाटले . आता तिथे काय आहे , मला ठाऊक नाही . पण पंचवीसेक वर्षांपूर्वी पुण्यातल्या ` प्रभात ' , ` नवयुग ' , ` डेक्कन ' वगेरे स्टुडिओत
चित्रपटनिर्मिती होत होती त्या वेळी स्टूडिओ हे जणी साहित्या - संगीत कलांचे मीलनक्षेत्र होते . मी आणि माडगूळकर ज्या काळी पुण्यात आलो तो काळ ह्या क्षेत्रात आर्थिक दृष्टीने मुळीच लाभदायक नव्हता . ` प्रभात ' चा संसार कोलमडला होता . ` नवयुग ' स्टुडिओचेही तेच . पलीकडे ` डेक्कन ' स्टुडिओ होता . आता त्या ठिकाणी तेलाच्या गिरण्या वगेरे आल्या आहेत . पेशाच्या दृष्टीने ते दिवस ओढगस्तीतेच . निर्मातेमंडळीत तर चित्रपट म्हणजे कलानिर्मितीचे क्षेत्र मानून धडपडणाऱ्या आमच्यासारख्या येडपटांना पेशात बनवायची चढाओढच लागलेली होती . दिवसावारी येणाऱ्या एक्स्ट्रांपासून ते लेखक , संगीतदिग्दर्शक , नट वगेरेंना ` बुडपणे ' हा मुळी नियमच होता . ठरलेले पेसे देणे हा अपवाद . इतके असूनही त्या स्टुडिओची ओढ जबरदस्त . प्रसिध्दीच्या झगमगाटापेक्षा तिथले वातावरण अधिक आकर्षक असायचे . शिवाय
मराठी चित्रपटात प्रसिध्दीचा तरी कसला कर्माचा झगमगाट ! एक रंगीत पोस्टर करायचे म्हणजे निर्मात्याने त्यापूर्वी ज्याचे पेसे बुडवले नसतील असा होतकरू पेंटर पकडून त्याला चान्स द्यायचा ! पण माडगूळकरांच्या सहवासातल्या तिथल्या मेफिलीत लाभणाऱ्या आनंदाला तोंड नव्हती . मला तर नेहमी वाटते की , माडगूळकरांच्या तोंडून चित्रपटकथा ऐकताना
होणारा आनंद ती पडद्यावर पाहताना मिळाला असे क्वचितच घडले . नाना प्रकारच्या अनुभवांच्या पुड्या तिथे सोडल्या जायच्या . वादविवाद रंगायचे . नव्या कवितांचे वाचन चालायचे . सिनेमावाले असलो तरी मनांची पाळेमुळे साहित्यात , अभिजात संगीतात , उत्तम नाटकांत रूजलेली . तशी सगळीच हुन्नरी मंडळी . आजही डोळ्यांपुढे त्या मेफिली उभ्या राहतात . राजाभाऊ परांजपे , राम गबाले , वसंत सबनीस , ऑफिसला मारलेली टांग सायकली -
वर टाकून आलेले वसंतराव देशंपाडे , हळूच एखादी कोटी करून आपण त्यातला नव्हेच असा चेहरा करून बसलेले बाळ चितळे , अप्पा काळे , ग . रा . कामत , गोविंदराव घाणेकर , सुधीर फडके , बहुगुणी वसंत पवार , अस्सल कोल्हापूरी साज भाषेला चढवून बोलणारे वामनराव कुलकर्णी , गुपचूप बोलल्यासारखे बोलणारे विष्णुपंत चव्हाण , सातमजली हसणारे काका मोडक , खास ठेवणीतून टाकल्यासारखे एखादेच मार्मिक वाक्य टोकणारे शंकरराव दामले ,
कथेतल्या कच्च्या दुव्यावर नेमके बोट ठेवणारे राजा ठाकूर . . . .


पुण्यातला चित्रपटव्यवसाय विसकटला . काहींना काळाने ओढून नेले . माणसे पांगली कायमची हरवली . मेफिली संपल्या . आता तर त्या मेफिलींचा बादशहाच गेला . त्या मेफिलींची ओढ विलक्षण होती . एक तर आमच्या दरिद्री स्टुडिओतली कॅमेऱ्यापासून ते रेकॉर्डिंग मशिनपर्यंतची सारी यंत्रसामुग्री चालण्यापेक्षा मोडून पडण्याचच अधिक तत्पर . अशा वेळी सारे स्थिरस्थावर होईपर्यंत करायचे काय ? अपरात्र झालेली असायची . दरिद्री स्टुडिओचा दरिद्री कँटीन . तिथून येणारा चहा ही जास्तीत जास्त चेन . पण मेफिलीचा रंग असा गहिरा , कडूगोड अनुभवांच्या पोतड्या तुडुंब भरलेल्या . माडगूळकरांनी गावाकडल्या गोष्टी सुरू कराव्या आणि मेफिलीने त्या अवाक होऊन गोष्टी ऐकाव्या . असेच एकदा ते औंध संस्थानातल्या गरीब विद्यार्थ्यांच्या छात्रालयातल्या गोष्टी सांगत होते . घटकेत मुलांची बौध्दिक आणि शारीरिक सुदृढता तपासणारे , त्यांच्या हिताची काळजी करणारे औंधकरमहाराज त्यांनी डोळ्यांपुढे उभे केले होते .

माडगूळकरांचे माडगूळ्याइतकेच औंधावर प्रेम . त्या चिमूटभर संस्थानात विद्यार्थिदशे - तल्या माडगूळकरांना फार मोठा सांस्कृतिक धनलाभ झाला होता . तिथे नुसतेच अन्नछत्र नव्हते ; ज्ञानछत्रही होते . फार मोठ्या अंतःकरणाच्या , त्या वरपांगी करड्या वाटणाऱ्या राजाच्या हाताची दणकट थाप त्यांच्या पाठीवर पडली होती . ती ऊब त्यांनी आयुष्यभर जिवापाड जपली होती . किंबहुना सिनेमात नशीब काढायला माडगूळकर आले त्या वेळी त्यांना ` औंझकर ' असेच म्हणत . बेचाळिसच्या सुमाराला त्यांची - माझी पहिली भेट झाली त्या वेळी औंधकराचे माडगूळकर झाले होते .` नाट्यनिकेतना ' त वल्लेमामा म्हणून तबलजी होते . त्यांचे वास्तव्य कोल्हापुरात असे . मी आणि माडगूळकर फिरायला चाललो असताना वाटेत एकदा वल्लेमामा भेटले . त्यांनी माडगूळकरांना "" कसं काय औधंकर ? "" म्दटल्यावर मी
जरासा चपापलोच . मग मलामाडगूळकरांनी ` औंधकर ' नावाची कथा सांगितली . औंधकर - काळातले त्यांचे चित्रपटसृष्टीतले अनुभव त्यांनी लिहिले आहेत . काही व्यक्तींचे आणि स्थळांचे स्मरण त्यांना चटकन भूतकाळात घेऊन जाई . मात्र त्या प्रतिकूल काळाचे त्यांनी चुकूनसुध्दा गहिवर काढून भांडवल केले नाही . साऱ्या कडू अनुभवांना त्यांनी थट्टेत घोळून टाकले , आणि वेळोवेळी स्नेहाचा हात पुढे केलेल्या लोकांचे स्मरणही ठेवले . एक मात्र खरे की , गरिबीच्या काळात भोगाव्या लागलेल्या गोष्टींचा त्यांच्या मनावर कुठेही ओरखडा होता . ज्या वयात जे लाभायला हवे होते ते न लाभलेल्यांना नंतर कितीही ऐश्वर्य लाभले तरी कसलेतरी अबोध औदासीन्य मनावर मळभ आणीत असते . सगळ्याच चांगल्या कलावंतांत किंवा भारतीय विचारवंतांतही कलेच्या आणि व्यवहाराच्या क्षेत्रांत व्यवहारिक पातळीवरून सर्व तऱ्हेच्या धडपडी , नाना प्रकारच्या तडजोडी करताना मनाच्या खोल कप्प्यात एक विरक्त दडलेला असतो असे मला वाटते . माडगूळकरही याला अपवाद नव्हते . कधीकाळी बाळझोपेतून जागे होताना कानांवर पडलेली एकतारी त्यांच्या मनात सतत वाजत होती . ते काही कुणी षड्रिपू जिंकलेले किंवा सहजपणाने ` मी ' पण गळलेले संत नव्हते . प्रतिभावंत होते . सर्वस्वी मुक्त असा कोणीही नसतो . माडगूळकांनाही रागलोभद्वेषमत्सर सर्व काही होते . फक्त कुठला रिपू कुठल्या जोमाने उभा
आहे हेच माणसाच्या स्वभावाचे लक्षण शोधताना पाहायचे असते . रामदासांसारखा समर्थ माणूसदेखील ` अचपळ मन माझें नावरे आवरीतां ' असे असहायपणाने म्हणतो . तुकोबाही ` काय करूं मन अनावर ' म्हणताना भेटतात . पण हे सारे असूनही माणसात एक ` अंतर्यामी ' म्हणून असतोच . माडगूळकरांच्या आणि माझ्या सहवासात आम्ही ऐन उमेदीच्या आणि हौसेच्या काळात अविदितगतयामा अशा रात्री घालवल्या आहेत . मनाच्या खोल अज्ञात घळीतल्या अंतर्यामी अशा वेळी बोलत असतो . हा खरे तर आपुला संवाद आपणासी असाच असतो . त्या संवादातून माडगूळकरांचा एकतारी सूर प्रकट व्हायचा . कदाचित ती खुंटी पिळणारे हात ज्ञानदेव - एकनाथ - तुकोरामांचे असतील . कुणी त्या क्षणांना तो त्या वेळचा त्यांचा ` मूड ' असेल असेही म्हणून विश्लेषण केल्याचे समाधान मानील . काही का असेना , त्या ` मूड ' मझले माडगूळकरांचे दर्शन खूप परिणामकारक असे .

"" श्रीधर कविचे नजिक नाझरें नदी माणगंगा !
नित्य नांदते खेंडे माझें धरूनि संतगंगा ! ! ""


अशी त्यांची एक कविता आहे . माडगूळकरांचे खेडे संतसंगाला धरून नांदत असायचे की नाही याला महत्व नाही : माडगूळकरांच्या मनात मात्र संतसंगाला धरून नांदणारा गाव वसला होता यात शंका नाही . श्रीधर कवीचे त्यांच्या मनात कायमचे अधिष्ठान होते . माणगंगेच्या तीरी आपला जन्म होण्यात काही योगायोगा असावा , असेही त्यांच्या भाविक वृत्तीला वाटत असावे . त्यामुळे व्यावहारिक जगात वावणाऱ्या माडगूळकरांची आणि श्रीधर कवीला संगे ` मूड ' मधले माडगूळकरांचे दर्शन खूप परिणामकारक असे .


` श्रीधर कविचें नजिक नदी माणगंगा !
नित्य मांदते खेडें माझे धरूनि संतगंगा ! ! ""


अशीं त्यांची एक कविता आहे . माडगूळरांचे खेडे संतसंगाला धरून नांदत असायेच की नाही याला महत्व नाही ;माडगूळकरांचे मनात मात्र संतसंगाला धरून नांदणारा गाव वसला होता यात शंका नाही . ह्या श्रीधर कवीचे त्यांच्या मनात कायमचे अधिष्ठान होते . माणगंगेच्या तीरी आपला जन्म होण्यात काही योगायोग असावा , असेही त्यांच्या भाविक वृत्तीला वाटत असावे . त्यामुळे व्यवहारिक जगात वागणाऱ्या माडगूळकरांची आणि श्रीधर कवीला संगे घेऊन वागणाऱ्या माडगूळकांची रस्सीखेचही चाललेली दिसायची . जीवनातल्या श्रेयस आणि प्रेयस वृत्तींचा हा सनातन झगडा आहे . ह्या रस्सीखेचीतमाणूस कधी प्रेयसाच्या किंवा ऐहिक लाभाच्या दिशेला ओढला गेला तर त्याला तेवढ्यासाठी बाद ठरवण्याची गरज नाही . माणूस संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे . पण निर्मितिक्षम कलावंताचे अंतर्मन सतत कुठे ओढ घेत असते ते त्याच्या कलाकृतीतून प्रकट झाल्यावाचून राहत नाही . कलावंताच्या निर्मितीची त्याच्या व्यवहारिक आचरणाशी नेहमीच सांगड घालता येत नाही . खरे तर ती घालण्याचा प्रयत्नही करू नये . कवितेत तारूण्यसुलभ भावनांचा रसरसीत अविष्कार करणाऱ्या माडगूळकरांना अकाली पोक्तपणा आला होता , नव्हे , परिस्थितीने तो त्यांच्यावर लादला होता . चित्रपटाशी माझा संबंध तुटला . भेटीगाठींमध्ये महिन्यामहिन्याचे अंतर पडू लागले . मात्र ` फार दिवस झाले , माडगूळकरांची गाठ पडली नाही . एकदा भेटायला हवं , ' असे सतत वाटायचे . आणि मग गाठ पडली की मधला न भेटण्याचा काळ हा काठी मारल्यामुळे वेगळ्या झालेल्या पाण्यासारखा वाटायचा . असाच एकदा खूप दिवसांच्या अंतरानंतर त्यांच्या घरी गेलो होतो माडगूळकरांच्या मातुःश्रींना ओळख लागली नाही . मग अण्णांनी त्यांना ओळख पटवून दिली . आई म्हणाल्या , "" हे काय बरं ? अधूनमधून दिसत असावं बाबा ! "" त्यांचे ते ` दिसतं असावं ' मनाला एकदम स्पर्श करून गेले . जिथे या ना त्या कारणाने ऋणानुबंध जुळलेले असतात तिथे नुसते ` असणे ' याला महत्व नसते ; अशा माणसांनी एकमेकांना ` दिसत असायला ' हवे . अशा अहेतुक दिसण्याला माणसामाणसांच्या संबंधात फार महत्व असते .
आपली माणसे ` आहेत ' एवढेच गृहित धरून चालत नाही . काळ त्यांना ` न दिसणारी ' केव्हा करून टाकील ते सांगता येत नाही ! पुन्हा कधीही न दिसण्याच्या महायात्रेला माडगूळकर असे चटकन निघून जातील असा स्वप्नात , सुध्दा विचार आला नव्हता . चारपाच दिवसांपूर्वीच ह्या आनंदवनातल्या वृक्षारोपणा - साठी ` कोवळ्या रोपट्या आज तूं पाहुणा ' ह्या त्यांनी लिहिलेल्या गाण्याची चाल मी त्यांना फोनवरून ऐकवली होती . "" तिथं जायला हवं . "" असे त्यांनी म्हटल्यावर "" चलता का ? बरोबर जाऊ या "" असे मी त्यांना म्हणालो होतो . बरोबर कुठले जाणे ? ते गाणे बरोबर घेऊन जाताना त्या संध्याकाळी दर्शन घडले ते चिरनिद्रित माडगूळकरांचे . चौतीसएक वर्षापूर्वींची अशीच एक संध्याकाळ . ह्याच पुण्यात ` भानुविलास ' हे नाटकाचे थिएटर असताना आवारात एक लहानसे औटहाऊस होते . ` युध्दाच्या सावल्या ' हे माडगूळकरांचे नाटक चिंतामणराव कोल्हटकरांनी बसवले होते . त्या औटहाऊसमध्येच चिंतामणरावांनी माझी आणि माडगूळकरांची गाठ घालून दिली होती . त्याच्या कितीतरी वर्षे आधी कोल्हापुरातल्या सोळंकुरमास्तरांच्या ` यशवंत संगीत विद्यालया ' त शाळकरी वयाच्या विद्याबाईकडून ` वद यमुने कुठे असे घनश्याम माझा ' हे गाणे ऐकताना प्रथम माडगूळकर हे नाव ऐकले होते . त्यानंतर ` ललकारी राया माझा गे मोटेवरी ' , ` नको बघूस येड्यावाणी ग , तुझ्या डोळ्यांचं न्यारं पानी ' अशी कितीतरी त्यांची गाणी पुरूषोत्तम सोळंकुरकरांकडून मी शिकलो होतो . ` भानुविलास , ' मधल्या त्या औटहाऊसमध्ये आम्ही प्रथम भेटलो तेच जुन्या
ओळखीचे मित्र भेटल्यासारखे . पुण्यातल्या अनोळखी रस्त्यांतून हिंडत हिंडत आमच्या गप्पा चालल्या होत्या . मेफिल सुरू झाली होती - ती गेली इतकी वर्षे चालूच होती . ` पहिल्या पाळण्या ' तला त्यांचा बापाचा अभिनय पाहून माडगूळकर हे कुणीतरी साठीतले गृहस्थ असावेत असा समज झाला होता . ` ब्रम्हचारी ' त तर त्यांनी लहानसहान कितीतरी भूमिका केलेल्या आहेत . अनेक वर्षांनी पुन्हा ` ब्रम्हचारी ' पाहताना त्यात निरनिराळ्या सोगांत सजलेले माडगूळकर शोधून काढीत होतो . . . त्यानंतरच्या काळात आमच्या किती मेफिली रंगल्या त्याचा हिशेब नाही . जीवनात वाट्याला येणाऱ्या मळ्यांच्या आणि माळांच्या वाटा कितीतरी वर्षे जोडीने तुडवल्या . कधी दूरदूरच्या बांधांवरून हाका देत तुडवल्या . आता सारे संपले . आता उरले माडगूळकर नसलेल्या जगात जगणे . त्यांच्याविषयी भूतकालवाचक क्रियापदात बोलणे . ज्या ओळींनी अंगावर आनंदाचे रोमांच उभे केले त्या ओळीच्या स्मरणाने व्याकुळ होणे . ज्या थट्टाविनोदांनी पोट धरधरून हसलो त्यांच्या आठवणींनी फुटणाऱ्या हसण्याला शोकाची चौकट येणे . आमच्यांत कित्येक बाबतीत मतभिन्नता होती . सुरूवातीच्या काळात कॉलेजचे शिक्षण झालेल्या स्त्रीपुरूषांच्या एकत्र मेळाव्यात वागताना ते काहीसे परकेपणाने वागत . अशा समुदायाविषयी त्यांचे काही प्रतिकूल पूर्वग्रह असत . मग त्यांचा धाकटा भाऊ अंबादास याच्या
कॉलेजमधल्या मित्रांबरोबर येणाऱ्या मेत्रिणीही त्यांचा वडीलभावासारखा सहजपणाने मान राखू लागलेल्या पाहिल्यावर त्यांच्या मतात खूप फरक पडला होता . त्यांची मुले - मुली कॉलेजात जाऊ लागली . कॉलेजची पायरी न चढलेल्या माडगूळकरांना कॉलेजच्या संमेलनाला अध्यक्ष होण्याची आग्रहाची निमंत्रणे येऊ लागली . मर्ढेकरांच्या कविता प्रथम प्रसिध्द झाल्या होत्या ,
त्या काळातही त्या कवितेविषयी आमचे खूप वादविवाद व्हायचे . खुद्द मर्ढेकरांनी त्यांची ` जत्रेच्या रात्री ' ही कविता वाचल्यावर त्यांचे मनापासून कौतुक केले होते . पण माणसा - माणसांच्या जीवनातल्या तारा मतभिन्नतेला ओलांडून जुळून येणाऱ्या असतात . हा नेमका काय चमत्कार असतो हे कविकुलगुरूंनाही उमगले नाही . म्हणून तर त्या जुळण्यामागल्या अंतरीच्या हेतूला ` को पि ' म्हणजे ` कसलासा हेतू ' म्हणून त्यांनी हात टेकले . असल्या ह्या सौहार्दाने जुळलेले आमचे धागे . त्यांत केवळ माडगूळकरांच्या कविताप्रतिभेचे आकर्षण नव्हते . आणखीही खूप काही होते . नित्य भेटीच्या आवश्यकतेच्या पलिकडले .


महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत . इतर काहीही देणाऱ्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणाऱ्या माणसाचे उपकार फार मोठे असतात . ` Song has the lognest life ' अशी एक म्हण आहे . एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते . एवढेच कशाला ? माणसाच्या मनाचे लहानमोठे , रागद्वेष घटकेत घालवून
टाकण्याचे गाण्याइतके दुसऱ्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते . हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते . एक विशाल ह्दय ते गाणे गात असते . माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली . चित्रपटांना दिली , तमाशाच्या फडात , देवळात , शाळेत , तरूणांच्या मेळाव्यात, माजघरात , देवघरात , शेतामळ्यांत , विद्वज्जनपरिषदेत . . . त्यांच्या गाण्यांचा संचार नाही कुठे ? माडगूळकरांचे चिरंजीवित्व त्यांच्या गाण्यांनी सिध्दच झाले आहे . व्यक्तिशः मला तर माडगूळकरांचे स्मरण करणे म्हणजे माझ्या पंचविशिपासून ते आता साठीकडे वळलेल्या माझ्याच आयुष्याकडे पुन्हा वळून पाहण्यासारखे वाटते . आम्ही काम केलेला एकादा जुना चित्रपटच पुन्हा पाहण्यासारखे त्यातली माडगूळकरांची भूमिका आणखी खूप पाहायला मिळणार अशी आशा होती . कवितेच्या त्या जिंवत झऱ्यातून अजून कितीतरी ओंजळी भरभरून प्यायला मिळणार आहेत अशी खात्री होती . प्राणान्तिक संकटातून ते वाचले होते . इडापीडा टळली असा भाबड्या मनाला धीर होता . आणि अचानक चित्रपटगृहातल्या अंधारात ती बाहेर पडायच्या दरवाजावरची ` एक्झिट ' ची लाल अक्षरे पेटावी , आणि ` म्हणजे एवढ्यात संपला चित्रपट ? ' असे म्हणता म्हणता ` समाप्त ' अशी प़डद्यावर पाटी यावी , असेच काहीसे घडले . त्या अज्ञात ऑपरेटरने कुणाच्या जीवनकथेची ` समाप्त ' ही अक्षरे कुठल्या रिळाच्या शेवटी लिहिली आहेत हे कुणाला कळले आहे ?

मी चित्रपटव्यवसाय सोडून बेळगावला गेल्यावर माडगूळकर मला म्हणाले होते , "" मित्रा ,अशी मेफिल अर्ध्यावर टाकून जाणं बरं नव्हे . "" आम्ही आता काय म्हणावे ? आणि कुणाला म्हणावे ?
शब्द : - 5127
-----------------------------------