Wednesday, November 25, 2009

मधुराधिपतये अखिलम मधुरम्

बालगंधर्वाच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात पुलंनी त्यांच्याविषयीच्या अतीव आदराने केलेलं हे दुर्मिळ भाषण.
मित्रहो, भाषणाच्या सुरुवातीला मी इतक्या वर्षांचा निर्ढावलेला माणूस असूनही घाबरून गेलो आहे. भाषणाला मुद्दे नाहीत म्हणून नाही, तर इतके मुद्दे आहेत की काय बोलावं ते समजत नाहीये.

बालगंधर्व या विषयावर मी काय बोलणार? उद्या जर कुणी सांगितलं की ‘चांदणं’ या विषयावर बोला. तर काय बोलणार? आपल्याला बोलता येत नाही हे न कळणारा माणूसच कदाचित बोलू शकेल.

बालगंधर्वाच्या प्रेमाने आजही इतकी माणसे एकत्र येताहेत हाच मुळी एक अद्भुत चमत्कार आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक कणा घट्ट आहे हे सिद्ध करणारी ही गोष्ट आहे. महाराष्ट्राची तीन सांस्कृतिक दैवतं आहेत. शिवाजी महाराज, लो. टिळक आणि बालगंधर्व! महाराष्ट्राने या तिघांवर भरभरून प्रेम केलं. त्यांना विभूतीमत्व दिलं. लोकप्रियता एक वेळ मिळते, पण विभूतीमत्व मिळत नाही. बालगंधर्वाविषयी अधिकारवाणीने बोलावे एवढा मला अधिकार नाहीये आणि त्याची मला जाणीव आहे ही त्यातल्या त्यात भाग्याची गोष्ट! मात्र एक सांगतो, तो अधिकार मला मिळण्याची शक्यता आहे. बालगंधर्व ज्या मार्गाने कलेकडे गेले तो मार्ग अनुसरला तर आपल्याला त्यांच्याविषयी (निदान) बोलायचा अधिकार मिळू शकतो.
बालगंधर्व हे भक्तिमार्गी कलावंत होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेकडे अगदी प्रेमात पडून पाहिलं. त्यांनी एखाद्या भूमिकेचा विचार केला, चर्चा केली असं मला वाटतच नाही. ‘एकच प्याला’तली सिंधू त्यांनी वाचली, ऐकली आणि ते सिंधू होतच गेले. मात्र त्या तन्मयतेत त्यांनी स्वत:ला वाहू दिलं नाही. ते नुसतेच प्रतिभावंत नव्हते तर उत्तम प्रज्ञावंतही होते. परिष्करणाची तर त्यांना अतिशय आवश्यकता वाटायची. त्यामुळे त्यांची भक्ती आंधळी न ठरता डोळस ठरली.

बालगंधर्वाच्या गायकीबद्दल बोलायचं तर भारतीय संगीतातल्या गायकीबद्दलच बोलायला पाहिजे. ते नाटकात गायले म्हणून ती नाटकातली गायकी असं म्हणणं चुकीचं ठरेल. बालगंधर्वाचा यमन आणि भास्करबुवांचा (बखले) यमन यांची जातकुळी वेगळी नव्हती. कारण फक्त निराळं होतं. अर्थात बालगंधर्वाना अजून एक दैवी देणगी लाभली होती. ती म्हणजे त्यांचा स्वर हा जन्मजात भिजलेला स्वर होता. त्याला अंत:करणातल्या प्रेमाच्या ओलाव्याचा स्पर्श होता. बालगंधर्वाची म्हणून एक खास गायकी होती. त्यांच्या सगळ्या भूमिका बघा. त्यातलं जे प्रेम आहे ते सुसंस्कारीत प्रेम आहे. ‘सुखविलासी सोडी न विनया’ अशा प्रकारचं प्रेमाला सुखसंवेदना स्फुरावी असं ते प्रेम आहे. त्यांनी स्त्रीभूमिका केल्या. त्यातून स्त्रीत्वातलं जे जे काही पवित्र, सुंदर, सात्त्विक अशा प्रकारचं आहे त्याचं त्यांनी आपल्या अभिनयातून दर्शन घडवलं. म्हणूनच लोकांची त्यांच्यावर भक्ती जडली.

माझ्या बाबतीत म्हणाल, तर वयाच्या ६-७ व्या वर्षांपासून बालगंधर्वाच्या संस्कारात वाढलेला मी एक मुलगा आहे. (पूर्वी मुलगा होतो- आता राहिलेलो नाही, पण बालगंधर्व म्हटलं की मला माझं मुलगेपणच आठवतं) बालगंधर्वाचं नाटक म्हणजे आमच्या घराचा एक कुळाचारच होता. कुलदैवतेला जसं दरवर्षी जातात तसं आम्ही दरवर्षी बालगंधर्वाच्या नाटकांना जायचो. त्यांची नाटक कंपनी मुंबईत आली की त्यांचं नाटक आपल्या मुलांना दाखवलंच पाहिजे हा संस्कार त्यांच्यावर झालाच पाहिजे अशी जिद्द- आवड- ओढ असलेले आई-वडील मला मिळाले हे मी माझं सगळ्यात मोठं भाग्य समजतो. घरामध्ये एखादं लग्नकार्य असावं अशा तऱ्हेने लोक नाटकाला यायचे. ती नाटकं म्हणजे एखाद्या धार्मिक संस्कारासारखा उत्सव असायचा. असा उत्सव मी परत पाहिला नाही. नाटकांची लोकप्रियता पाहिली. माझीही नाटकं काही लोकप्रिय झाली (चुकून!) पण लोकांचा असा अमाप उत्साह मी पाहिला नाही. एखाद्या लग्नकार्याला जावं तसे कपडे घालून, नटून-थटून लोक नाटक बघायला यायचे. नाटकातल्या सुभद्रेपेक्षा ते बघायला येणारी बाईच जास्त नटलेली असायची. कारण ते फक्त नाटकाला जाणं नसायचं तर एक प्रकारचा उत्तम सांस्कृतिक अनुभव घेणं असायचं. अशा वृत्तीने लोक जायचे आणि बालगंधर्वही अशा वृत्तीने जाणाऱ्या लोकांच्या पदरात पुरेपूर माप टाकायचे.

पडदा वर जायचा. रंगमंचावर लाईटस् पडायचे. ‘प्रभुपदास नमित दास’ म्हणून नांदी सुरू व्हायची आणि खरं सांगतो, ज्या क्षणी- हा क्षण भोगायला आपण जिवंत आहोत याचा अभिमान वाटतो- असा तो क्षण असायचा. असे असंख्य क्षण ज्या माणसाने आपल्याला दिले त्या माणसाचं नाव नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व! त्यांनी आम्हा सगळ्या लोकांच्या क्षणाचं, आयुष्याचं सोनं करून टाकलं!

नारायणरावांनी जे केलं ते अमूल्य होतं. बिनतोड होतं. ‘नाथ हा माझा’ मधल्या यमनाची काय किंमत ठरवणार तुम्ही? एक गोष्ट सांगतो, नारायणरावांनी जरूर नसलेलं असं काहीच केलं नाही. असं वाटायचं की ही तान इथेच पाहिजे होती. मोठय़ा कलाकारांचे हे वैशिष्टय़ आहे, त्यात दुरुस्ती सुचविता येत नाही. ताजमहालमध्ये थोडी अशी दुरुस्ती हवी होती असं नाही म्हणता येत. बालगंधर्वानी जे केलं त्याला पर्यायच नसायचा. शिवाय आपण काहीतरी विशेष करून दाखवतोय असा आविर्भावही त्यात नसायचा. हे घडतंय, हे होतंय असंच वाटायचं. त्यात एक सहज बरोबर जन्मलेला नैसर्गिक भाव असायचा. नाटकात एखादं राजाचं पात्र असतं. त्याने कुणाला शिक्षा केली तरच तो राजा ठरतो असं नाही. त्याचं वागणं बोलणं असं असलं पाहिजे हा राजा आहे. हा भाव तुमच्या मनात निर्माण झाला पाहिजे. बालगंधर्व जे काही करत होते ते सहजतेनं करत होते. तद्रूप होऊन करत होते. ते काहीही सिद्ध करण्यासाठी गात नव्हते. ते फक्त गात होते. गाण्याच्या प्रत्येक शब्दाला, अक्षराला, लयीला धरून ते गात होते.

संगीत नाटकं आल्यावर बरेचसे समीक्षक- जे संगीतातले औरंगजेब होते, ते म्हणाले, संगीत आणि नाटक यांचा गोंधळ केला. अहो, संगीताने काय गोंधळ केला, संगीत ही गोंधळ करणारी विद्या आहे का? ज्यांना गाता येत नाही ते गोंधळ करत असतील, पण तो संगीताचा दोष नव्हे. हे म्हणजे फुलांनी पूजेचा गोंधळ केला म्हणण्यासारखं आहे. या लोकांना आपली परंपरा किती माहीत नाही याचं एक उदाहरण सांगतो. एकदा एक महान समीक्षक मला म्हणाले, काय तुमचे ते बालगंधर्व! ते ‘कशी या त्यजू पदाला’ गाणं म्हणत असायचे, तेव्हा तो सिंधूचा बाप नुसता मख्खासारखा उभा! मी म्हटलं, साहेब, सगळं ऑडियन्स ‘कशी या’ गाणाऱ्या बालगंधर्वाकडे तल्लिन होऊन बघत असताना तुम्ही सिंधूच्या बापाकडे कशाला बघत बसलात? म्हणजे नाटक कसं बघावं हे ज्यांना कळत नाही, त्यांना संगीत नाटकांचा परस्परसंबंध कसा कळणार?

जेव्हा गद्य शब्दांची शक्ती संपते तेव्हा काव्य सुरू होतं. गाणं सुरू होतं. आईला जेव्हा वात्सल्याचं भरतं येतं तेव्हा ती मुलाला ‘तो एक नंबरचा चमचा घे. तोंडात घाल’ वगैरे सांगत बसत नाही. ती सरळ ‘घास घेरे तान्ह्य़ा बाळा’ असं गायला लागते. तिला जे म्हणायचं असतं ते सुरांच्या मदतीशिवाय म्हणता येत नाही. कीर्तनातही एखादा नाटय़मय प्रसंग उभा करायचा असेल तर गाण्यांचाच आधार घेतला जातो. कल्पना करा, कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतलेलं आहे, असा प्रसंग आहे. अर्जुन त्याच्यावर बाण सोडतोय. तो गद्यात कितीही वर्णन केला तरी अपुराच पडणार. पण त्याच वेळी कीर्तनकाराने उच्च रवात ‘रथचक्र उद्धरु दे, श्रुतीशास्त्र ये फळाला’ असा स्वर लावला की तो कर्ण, अर्जुन, तो एकंदर प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. प्रसंग सजीव होतो. ‘नाथ हा माझा मोही खरा’च्या प्रसंगी ते आले, त्यांना मी प्रथम पाहिले म्हटल्यावर तिला जे वाटलं, ते तिनं पद्यातच म्हटलं पाहिजे. गद्यामध्ये ती शक्ती नाहीये.

मानापमानातला ‘नाही मी बोलत नाथा’चा प्रसंग घ्या. (बायका जेव्हा ‘काहीतरी बोलू नका’ असं म्हणतात तेव्हा त्यांना ‘काहीतरी बोला’ असं म्हणायचं असतं. स्त्री जेव्हा ‘चला’ म्हणते तेव्हा उठून जायचं नसतं. बसायचं असतं. हे समीक्षकांना कळणार नाही.) ‘नाही मी बोलत नाथा’ हे बालगंधर्व किती प्रकारे सांगतात? ज्यांना गाणं कळत नाही, त्या मूर्ख लोकांनी त्याला ‘दळण घालणं’ म्हटलं. त्यांना कळलंच नाही ते. ‘नाही मी बोलत’ हे ५० वेळा नव्हे तर ५० तऱ्हांनी म्हटलेलं असायचं. एकासारखी दुसरी नाही. दुसऱ्यासारखी तिसरी नाही. उगीच नाही बालगंधर्वाची साथ करताना मी- मी म्हणवणाऱ्या तबलजींची बोटे दुखून येत. लयीतल्या सूक्ष्मातिसूक्ष्म बदलाची त्यांना जाणीव होती.

काहींनी त्यांच्या गाण्यांवर आक्षेप घेतला की तिथे नाटक थांबायचे आणि गवई गात सुटायचे. वास्तवात कुणी गातो का? आता त्यांना काय सांगावं? नाटक ही गोष्टच मुळी अंतरंगातली वास्तवता घेऊन येते. बहिरंगातली नव्हे! बहिरंगातली वास्तवता त्यात येईलच कशी? लोक तिकीट काढून नाटकाला येतात, पडदा वर जातो तिथे प्रॉम्टर असतो. त्यातला शिवाजी, शिवाजीच्या मिशा सगळं खोटंखोटंच असतं. पण हे खोटं नाटक आपल्याला जीवन किती खरं आहे, विविधांगी आहे हे सांगत असतं. नाटकातलं गाणं हे कृत्रिम वगैरे काही नाही. तो त्याचा एक भाग आहे. लंगडीच्या खेळात कुणी म्हटले, दोन पाय असून एका पायाने कशाला धावायचे, तर त्याला काय उत्तर देणार? तो खेळच तसा आहे. तसं नाटकाचं आहे. गाणं नाटक थांबवत नाही. ते नाटक बघणाऱ्याची चित्तवृत्ती अधिक प्रफुल्लित करतं आणि नाटक पुढे नेतं. बघणाऱ्याची चित्तवृत्ती अधिक प्रफुल्लित करतं एका नाटकाचा नांदीपासून भरतवाक्यापर्यंतचा प्रवास हा डेक्कनक्वीनसारखा ठराविक वेळ ठराविक स्टेशनं घेत केलेला (आखीव-रेखीव) प्रवास नसतोच मुळी! तो एका सुंदर उद्यानाचा फेरफटका आहे. त्यातली प्रत्येक सुंदर जागा बघत, सौंदर्यस्थळं निरखत रमतगमत केलेला तो एक उन्मुक्त फेरफटका आहे.
भारतीय संस्कृतीत संगीताला मोठं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आमचा तत्वज्ञानपर ग्रंथ- गीता- हा पद्यात आहे. लग्नामधल्या मंगलाष्टकांना दुसरी (उडती) चाल लावून बघा. लग्न लागण्याऐवजी मोडलं असं वाटेल.

नाटक हा एक यज्ञ आहे. त्यात सगळे कलाकार आपापला हविर्भाग अर्पण करतात. नट येतो. अभिनय करतो. गायक येतात. गातात. नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, तबलजी, सारंगिये येतात. प्रत्येक जण आपली आहुती अर्पण करतो. बालगंधर्वानी आपल्याला काय दिलं? जीवनामध्ये सौंदर्य हे एक मूल्य आहे हे मनावर ठसवलं. सुबकपणे जगणं, सुरेख रीतीने मांडणी, गाणं शिकवलं. बरं हे सर्व अगदी सहज रीतीने शिकवलं. स्त्रीत्वात जे काही मोहक, सुंदर, मधुर आहे ते त्यांनी अभिनयानं दाखवलं. म्हणूनच ५-५ पिढय़ांनी त्यांचा अभिनय बघितला. बालगंधर्व म्हातारे होऊ शकतील, पण लय म्हातारी होणार नाही. त्यांनी मात्रांचा हिशेब बोटांवर नाही घातला. अंत:करणात घातला. म्हणूनच त्यांचे संगीतशास्त्रीय प्रमाद त्यांचे गुण ठरले. त्यांनी भीमपलासात शुद्ध निषाद लावला. इतर कुणी लावला असता तर संगीताच्या रखवालदारांनी ते करणाऱ्याची जीभ कापली असती. बालगंधर्वाच्या बाबतीत हे फक्त तुम्हीच करू शकता, असं म्हणून सर्वानी त्यांचे पाय धरले. एकदा बालगंधर्वाचा षडज् ऐकताना भीमसेन (जोशी) म्हणाला होता, आपल्या तंबोऱ्याच्या भोपळ्यांची भाजी करून खावी! खरं आहे ते! बालगंधर्व फार थोडे आणि सोपे राग गायले. फार मोठे राग गाऊन आपण काही करामत करतोय असं त्यांना दाखवायचंच नव्हतं.
बालगंधर्वानी खूप वेडेपणा (अव्यवहारीपणा) केला. हजार-हजार रुपयांचे शालू घेतले. पण ते नारायणराव बालगंधर्वासाठी नव्हते. तो शालू द्रौपदीचा होता. सुभद्रेचा होता. राजा भीष्मकाच्या राजकन्येचा होता. मायबाप प्रेक्षकांच्या मनावर रुक्मिणी ठसावी म्हणून होता. ते सगळं रंगदेवतेसाठी होतं. प्रेक्षकांसाठी होतं. त्यांची तारीफ करून आम्हाला काय मिळवायचं? त्यांच्या हाती कुठली सत्ता होती? ते मंत्री नव्हते, उपमंत्री नव्हते. क्रेडीट सोसायटीचे चेअरमनही नव्हते की एखादं लोन पास करतील. पण खरं सांगायचं तर त्यांनी इतका आनंद दिला की त्यांचे ऋण फेडताच येणार नाही.
बालगंधर्वाबद्दल बोलणं संपणारच नाही. त्याचा कधी कंटाळा येणार नाही. चांदण्याचा, गंगेच्या ओघाचा, गुलाबाचा, जाईच्या सुगंधाचा कधी कंटाळा येईल का? वल्लभाचार्य म्हणतात, ‘रुपं मधुरम्, गीतं मधुरम्, वचनं मधुरम्, नयनं मधुरम्, हसितं मधुरम्, चरितम् मधुरम्, ललितं मधुरम्, मधुराधिपतये अखिलं मधुरम्.’
गदिमा म्हणाले, ‘असा बालगंधर्व आता न होणे’ ते सर्वस्वी खरं आहे. त्यांच्या शंभराव्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचं संकीर्तन करायची मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. कुणीतरी म्हणालं, बालगंधर्वाचा तीन दिवसांचा महोत्सव करावा. मी म्हणतो तुमच्या पुढच्या पूर्ण आयुष्यात सर्वकाळ बालगंधर्वाचा, कलेचा, कलाप्रेमाचा उत्सव साजरा होवो. हीच माझी शुभेच्छा!

लोकसत्ता,८ नोव्हेंबर २००९
संकलन,शब्दांकन,संक्षिप्तीकरण - प्रशांत असलेकर

Monday, November 9, 2009

आठवणींच पिंपळपान - पु.ल. आणि सुनीताबाई

काल पु.लंची जंयती आणि त्याच्या एक दिवस आधी सुनीताबाईंच्या जाण्याने अवघे साहित्यविश्व हळहळले. वरुन कडक शिस्तीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या पण आतुन मृदू स्वभावाच्या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर केवळ पुलंच्या पत्नी म्हणून नव्हे तर एक उत्तम सिद्धहस्त लेखिका म्हणून साहित्यविश्वाला समजल्या. पु.लंच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा मोठा आहे. आम्हा वाचकांना पु.ल. आणि सुनिताबाई त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणीतून उमजले, भावले. पु.ल. आणि सुनीताबाईंच्या प्रेमळ सहवासाने पावन झालेल्या थोरांनी त्यांच्याविषयी सांगितलेल्या काही आठवणी.... भाईकाकांचे एकुणच माणसांवर प्रेम होते. त्यांच्या घरी अनेक लोकांचा राबता असे. नाट्य, साहित्य, संगीत क्षेत्रातल्या व इतर मातब्बर मंडळीच्या सहभागाने मैफिली रंगायच्या. अनिल अवचटांनी म्हंटले आहे. ‘बेल दाबली की सुनिताबाई दार उघडत. प्रसन्न हसून ‘या~~’ म्हणत. मला, सुनंदाला कधीही या घराचा तुटक अनुभव आला नाही. बसायला सांगत आणि आत तोंड वळवून ‘भाई~~’ अशी हाक मारीत. आतून हसऱ्या चेहऱ्यानं पु.ल. येऊन बसत. त्यांना अलिकडेच घरच्या कपड्यात पाहिलं. पण त्या वेळी ते घरीही नेहमी खादी सिक्लचा झब्बा, पायजमा अशा स्वच्छ इस्त्रीच्या कपड्यांतच भेटले. सुनीताबाईंचा वावर स्वयंपाकघर ते हॉल अस असे. मधे दाराजवळ जरा खालच्या लेव्हलला फोन असे. आणि त्यासमोर त्याच उंचीचा, बुटका मोढा असे. फोन आला, तर सुनीताबाई त्या मोढ्यावर बसून फोन घेत. आमच्यासमोरच्या प्लेटमध्ये कधी बाकर वडी, कधी कडबोळी किंवा एका स्टीलच्या भोकं पाडलेल्या डब्यात डाळिंबाचे दाणे ठेवत. स्वयंपाकघर व्यवस्थित असे. मी कधी आत जाऊन म्हणालो की, ‘मी करतो चहा, तुम्ही बसा बाहेर,’ तर त्या म्हणत, ‘तू इथे घोटाळा करून ठेवशील. ते निस्तरण्यात माझा वेळ जाईल. तू बस जा बाहेर.’ पु.ल. घरी नसतानाही केवळ सुनीताबाईंकडेही मी व सुनंदा चक्कर टाकायचो. एकदा त्या भाज्या निवडत होत्या. पालेभाज्यांचे, भाज्यांचे ढिग पाहून म्हटलं, ‘कुणी येणार आहे?’ त्या म्हणाल्या, ‘नाही, भाई आता चार दिवस येणार आहे ना, त्याच्या आवडीच्या भाज्या, पदार्थ याची तयारी करून त्या फ्रिजमध्ये टाकून ठेवते. सकाळ, दुपार, संध्याकाळ वेगवेगळं करता येतं. हे जर आता करून ठेवलं नाही ना, तर त्या वेळी काहीच करता येत नाही. तो आला की लोकांची गडबड सुरू होते. त्यांच्याकडे बघावं लागतं. म्हणून हे.’ सुनीताबाईंचं पु.ल.वरचं प्रेम कधी शब्दात व्यक्त व्हायचं नाही. पण ते असं व्यक्त व्हायचं. दरवेळी जाताना मी नवीन काढलेली चित्रं, लाकडातील शिल्पं दाखवायला घेऊन जायचो. शिल्प समोरच्या टीपॉयवर ठेवलं, की ‘अग सुनीता~~’ अशी हाका मारायचे. त्या वेळी आलेल्यांनाही आवडीने ते दाखवायचे. त्या काळात सुनीताबाईंची भाची आणि तिचा नवरा डॉ. लोहोकरे कुटुंब पुण्यात जवळच राहायला आले. त्यांची दोन मुलं, म्हणजे पु.ल. सुनीताबाईंची नातवंडं, पु.ल.च्या घरात सतत खेळायला असत. त्यांना मी ओरिगामी देऊ लागलो. त्यांचं खेळून झाल्यावर सुनीताबाई ती ओरिगामी मॉडेल्स व्यवस्थित उचलून आत जाऊन एका ड्रॉवरमध्ये ठेवत. मी त्यांना अनेकदा म्हंटलं, ‘अहो, तुम्ही हे कशाला करता? मी परत करून देईन.’ त्या म्हणायच्या, ‘असू दे, तू गेल्यावर या मुलांनी हट्ट केला तर मी काय करू?’ नंतर मला कुणी सांगतही असे, कुणी मुलं खेळायला आली की सुनीताबाई ते ड्रॉवर बाहेर आणतात. टेबलावर सगळी मॉडेल्स मांडून ठेवतात आणि म्हणतात, याच्याशी खेळा. पण फाडायची नाहीत बरं का.’ 
व्यसनी मुलांबद्दल जेव्हा पु.ल. दापत्यांला कळलं तेव्हा त्यांनी आम्हाला घरी बोलावलं. दोघांनी सांगितल, ‘तुम्ही या मुलांसाठी काहीतरी करा. आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देणगी देणार आहोत.’ मला काय करावं हा प्रश्न पडला. पण सुनंदा धडाडीची. ती म्हणाली, ‘यांच्यासाठी सेंटर काढू.’ तिने सरकारी परवानग्या काढल्या आणि मेंटलमधल्या एका इमारतीत हे केंद्र सुरू झालं. सरकारनं बजावलं होतं, तुम्ही इथं नेमणाऱ्या सेवकवर्गाला सरकारी नोकरीवर हक्क सांगता येणार नाही. मग प्रश्न पडला. आमचा ट्रस्ट तोपर्यंत स्थापन झालेला नव्हता. सुनीताबाई म्हणाल्या. ‘ठिक आहे. पुढची सोय होईपर्यंत सेवकांचे पगार पु.ल. देशपांडे फाउंडेशनतर्फे करू. आम्ही व्यसनातून बऱ्या झालेल्या दहा-बारा तरुणांच कामावर घेतले. सगळ्यांचे पगाराचे चेक सुनीताबाई दर महिन्याला लिहून ठेवत. त्यांची आणि पु.लंची त्यावर सही असे. ‘मुक्तांगण’ या सस्थेंचा जन्म सुनीताबाईंच्या पुढाकरानेच होऊ शकला.अगदी मुख्य मंत्र्यांना फोन करून त्या ‘इतक्या चांगल्या कामांना अडचणी येऊच कश्या दिल्या जातात, शरम नाही का वाटत’ अशा शब्दांत सुनवायच्या. त्यानंतर प्रशासन धावत यायचे. 
दिनेश ठाकुर आपल्या भाईकाकांच्या आणि माईआत्तेच्या नात्याबद्दल सांगतात ‘भाईकाका व माईआते यांचा माझ्यावरचा प्रभाव मी वेगळा काढुच शकत नाही. ही दोन व्यक्तिमत्वे जरी खूप वेगळी असली, तरी त्यांचा विचार व त्यानुसार ठरलेली कृती शेवटी एकत्रच व्हायची. आजी-आजोबा किंवा पार्ल्याच्या आजी असतानाही ठाकूर आणि देशपांडे कुटुंबियाचे ते दोघेही (प्रत्यक्षात माईआतेच!) कुटुंबप्रमुख होते. माईआते आपला सल्ला ठामपणे, आग्रहीपणे मांडून तर्काने समजून सांगायला जाई(व भाईकाकांनी दिलेले ’उपदेशपांडे’ नाव सार्थ करी.) तर भाईकाका तीच गोष्ट इतक्या सौ म्यपणे, सहज किंवा विनोदाने सांगत, की हेच योग्य, याला पर्यायच नाही, असेच सगळ्यांना वाटे. भाईकाकांच्या बाबासाहेब पुरंदऱ्यांशी सहज गप्पा चालू असताना माईआतेचे भाष्य अगदी समर्पक होते... ’भाई, तू शिवाजी असतास आणि अफझलखानाला भेटायला गेला असतास तर फक्त भरपूर गप्पा रंगवून परत आला असतास.’ 
विद्या बाळ म्हणतात ’मला नेहमीच या जोडप्याकडे बघताना असं वाटत आलं आहे की पु.ल. हे एक बहुरुपी, बहुआयामी कलावंत होते यात वादच नाही. मात्र त्यांचं कलावंतपण, त्यांचं मोठेपण, त्यांचा पैसा या साऱ्याची सुनीताबाईंनी निगुतीनं जपणूक केली. तीही स्वत:साठी नाहीच तर त्यात एक विलक्षण ताकदीची समाजाभिमुखता होती. पु.लं.नी खूप काही मिळवावं आणि त्याच्या गुणवत्तेची निगराणी करत, ते सुनिताबाईंनी इतर, काहींना हे समजलं तरी एकेकदा घेता आलं नाही. काहींना मात्र हे समजलंही नाही म्हणूनच त्याबाबत कितीकांनी काय काय तारे तोडले, ते ऎकून माझ्याच मनाला भोकं पडली!’

 
’आहे मनोहर तरी..’ हे शिर्षक कसे सुचले ह्याची हकिगत विजया राज्याध्यक्ष यांनी सांगतली आहे. ‘पी.एल. व सुनीताबाई आपल्या गाडीतून चालले होते. वाटेत ‘मनोहर बेकरी’ लागली. सुनीताबाईंचे कवितांबद्दलचे स्मरण पक्के. मनाची उपस्थितही विलक्षण. त्यांना ‘मनोहर’ या शब्दातून लगेच ‘आहे मनोहर, तरी गमते उदास’ ही ओळ आठवली. पाठोपाठ वाटले, आपल्या पुस्तकाला हे शिर्षक द्यायला काय हरकत आहे? पी.एल.नाही ते आवडले. श्री.पुं.शी चर्चा झाली. दुसरे एखादे अधिक चांगले शिर्षक सुचेपर्यंत ‘आहे मनोहर, तरी...’ हे शीर्षकच मनात ठेवायचे ठरले. दुसरे शीर्षक सुचले नाही, म्हणून ‘आहे मनोहर, तरी..’च कायम झाले. अनेकांप्रमाणे मलाही या कवितेचा संदर्भ ठाऊक नव्हता. मी विचारले, तेव्हा सुनीताबाईंऎवजी पीएल्‌नीच तो संदर्भ सांगितला. इतके ते शिर्षक त्यांनी आपलेसे केले होते. इतर शिर्षकांची त्यांच्या मनातली आठवण केव्हाच पुसली गेली असावी, इतके या नियोजीत शिर्षकावर ते खूश होते, असे वाटले. त्या त्या क्षणापुरते कशावर तरी, कोणावर तरी बेहद्द खूश असणे हा त्यांचा स्वभाव आहे. इथे तर सुनीताबाईंचीच कल्पना. त्यामुळे या खूश असण्याचे प्रमाण अर्थातच काही टक्के अधिक!’  
मुकुंद टाकसाळे एका ठिकाणी म्हणतात.. ‘सुनीताबाईंनी इतक्या काटेकोरपणे पु.ल.चा व्यवहार पाहिला. उत्तम व्यवहार करुन जोडलेले हे धन त्यांनी मुक्तहस्तानं समाजालाच परत देऊन टाकलं. पु.ल. सुनीताबाईंनी स्वत:साठी एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला मिळतील एवढेच पैसे दरमहा घेतले आणि टुकीनं संसार केला. जयंवत दळवींनी मला सांगितलेली एक आठवण आहे. ‘पु.ल.: साठवण’ या ग्रथांचे संपादन करण्याची कामगिरी दळवींनी उत्साहानं स्वत:च्या शिरावर घेतलेली होती. त्या काळात कधीतरी ते एका संध्याकाळी पु.लं.कडे गेले. सुनीताबाईंनी त्यांना विचारलं, ’तुम्ही काय घेणार? चहा की कॉफी?’ ती वेळ दळवींच्या दृष्टीनं ही दोन्ही पेये घेण्याची नव्हती. त्यामुळे ते गप्प राहिले. तेव्हा सुनीताबाईच पुढे त्यांना म्हणाल्या, "दळवी, खरं तर तुम्हाला ड्रिंक्सबद्दलच विचारायला हवं. परंतु पु.ल. देशपांडे फाउंडेशनमधून आम्ही आमच्यासाठी म्हणून महिन्याची जी रक्कम घेतो, त्यातून ड्रिंक्स ऑफर करणं आम्हाला खरोखरच परवडत नाही." समजा, सुनीताबाईंनी आणखी रक्कम घेतली असती तर त्यांना कोण बोलणार होतं? पण बेचाळीसच्या चळवळीचे संस्कार घेऊन आलेल्या सुनीताबाईंना ही ‘चैन’ आवडणारीच नव्हती. आज पैशाला नको इतकी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. जिथून जे जे फुकटात मिळेल ते ते लाटण्याकडे लेखक-कलाकारांचा कल दिसतो. (उदाहरणार्थ, टेन पर्सेंटमधील फ्लॅट- एक पुण्यात आणि एक मुंबईत घेऊन ठेवणे.) या पार्श्वभूमीवर पु.ल.- सुनीताबाईंची साधी सात्विक राहणी खरोखरच ‘राजस’ वाटू लागते. आपल्या स्पष्ट आणि सडेतोड वागण्यानं वागण्यानं स्वत:बद्दल गैरसमज निर्माण करायला आणि शत्रू वाढवायला सुनीताबाईंना आवडतं. ‘पु.ल. सारखा देवमाणुस कुठल्या कजाग बाईच्या तावडीत अडकलेला आहे’ अशीच त्यांची ‘इमेज’ त्यांनी घडू दिली. ‘पु.ल. सारखा मनस्वी (आणि आळशी) माणूस गप्पांच्या मैफलीतच फक्त अडकून राहिला असता तर त्याच्या हातून एवढं लेखन घडलंच नसतं. ‘बटाट्याची चाळ’ उभी राहू शकली नसती. लोकांचे सारे शिव्याशाप स्वत:च्या अंगावर झेलून सुनीताबाईंनी पु.ल. च्या आयुष्याला शिस्त आणली. पु.लं.च्या यशामागं आणि लोकप्रियतेमागं सुनीताबाईंसारखी खंबीर बाई उभी होती, हे कुणालाच नाकारता येणार नाही.’  
सरोजिनी वैद्द सांगतात.. ‘मॅजेस्टिक पारितोषिका’च्या एका वितरण समारंभात केशवराव कोठावळे यांनी पुलंना एक सुंदर भलामोठा पुष्पगुच्छ दिला होता. समातंभानंतर तो तसाच हातात धरून, अनेकांशी गप्पा मारताना पु.लं.ची थोडी अवघडल्यासारखी स्थिती झाली होती. ती पाहून मी हात पुढं करीत सहज त्यांना म्हटलं, ‘मी सांभाळू का तुमचा हा गुच्छ? बिलकूल पळवणार नाही. घरी जाताना अगदी आठवणीनं परत देईन.’ त्यावर थोड्या वेळासाठी तो गुच्छ माझ्या हातात देत पु.ल. हळूच म्हणाले, ‘हा गुच्छ सुनीतासाठी आहे. तो घरी न्यावाच लागतो. ती यापुढेही आठ-दहा दिवस त्याचे सगळे लाड पुरवील. ह्यातलं शेवटचं फूल पूर्ण सुकेपर्यंत त्या फुलदाणीतलं पाणी वेळोवेळी बदलत राहिल...’ सुनीताबाईंविषयीच्या त्यांच्या अशा ओघाओघानं निघणाऱ्या उद्‌गारांत हळवेपणाबरोबरच आणखीही वेगवेगळे भाव असायचे. सुनीताबाईंची वागण्यातली शिस्त, त्यांचं काव्यप्रेम, त्यांनी दोघांनी बरोबर घालवलेले जगप्रवासातील गंभीर आणि गमतीदार क्षण यांबद्दलच्या त्यांच्या बोलण्यात पुष्कळ मोकळेपणा असायचा. बरेच जण समजतात तसा नात्यातील दडपणाचा भाग नसायचा. अनेक कंटाळवाण्या व्यावहारीक जबाबदाऱ्या स्वत:वर घेऊन सुनीतानं आपल्याला ‘मुक्त’ ठेवलं याची कृतज्ञ जाणीवही दिसायची. कधी कधी मधूनच खट्याळपणाही असायचा. ‘आहे मनोहर तरी’ बद्दल बोलताना एकदा गंभीरपणानं त्यांनी मला सांगितलं, हे लिहिणं ही तिची मानसिक गरजच होती. ‘मी ‘हूं’ म्हटलं; पण लगेच हलक्या सुरात मिस्किलपणे ते पुटपुटले-- तिला रॉयल्टीचा घसघशीत चेक आला तेव्हा मी तिला म्हटलं, ‘घे, माझेच पैसे आहेत, घे.’ मी नाटकी सुरात उद्गारले, ’हाच तो पुरुषी अहंकार बरं~’ त्यांच्या दोघांमधील नात्याच्या अशा लहानसहान गोष्टी पाहताना माझ्या मनात येऊन जायचं.... असं परस्पराचं स्वातंत्र्य मानणारं आणि वेळप्रसंगी त्याचा संकोचही करायला लावणारं जोडपं पाहण्याची सवय आपल्या समाजाला अजून लागायचीच आहे.’  
सुधीर सवूर ‘भाई न्युयॉर्कमध्ये आले असताना माझ्या घरी आले होते. त्यादिवशी भाईंना भेटायला काही मित्रमंडळीही आली होती. मैफलीत भाई असताना ती रंगली नाही तरच नवल. अर्थातच मैफलीचे केंद्रबिंदू फक्त भाईच. त्यांना आवडेल म्हणून गीताने गोव्याच्या पद्धतीचे माशाचे हुमण केले होते. गप्पा मारता मारता जेवण संपले. भाईंनी आपण आतापर्यंत काय काय खाल्ले आहे हे सांगायला सुरुवात केली. भाई आपल्या खाद्दजीवनाचे वर्णन करीत असताना मी काही कारणासाठी स्वयंपाकघरात गेलो. सुनीतावहीनी माझ्या पाठोपाठ आत आल्या व मला म्हणाल्या की, "हे पहा, भाईला माशाच्या जेवणानंतर ओला नारळ खायला आवडतो. त्याला एखादा तुकडा नेऊन द्या आणि तो कसा खुलेल बघा." मी एका वाटीत खोबऱ्याचे तुकडे घालून ती भाईंसमोर नेऊन ठेवली. भाईंनी चमकून माझ्याकडे पाहिले. आपली आवड याला कशी कळली याचे त्यांना आश्चर्य वाटले असावे. सुनीतावहिनींकडे नजर जाताच त्यांच्या लक्षात आले. किंचित हसून त्यांनी मैफल पुन्हा सुरू केली. सुनीतावहीनी व भाई एकमेकांच्या आवडी कशा हळुवारपणे जोपासतात याची मला मिळालेली ही पहिली झलक. यानंतर काही वर्षांनी मला भाईंनी दिनेशला लिहिलेले एक पत्र वाचायला मिळाले होते. त्यात काही ओळी सुनीता वहिंनीनी लिहिल्या होत्या. त्यात त्यांनी लिहिले होते, तुझे भाईकाका ताटातला एखादा पदार्थ आवडला की जसा माझ्यासाठी थोडासा बाजूला काढून ठेवतात तसाच त्यांनी या पत्राचा थोडासा भाग माझ्यासाठी ठेवला आहे. मला आठवलं, की न्युयॉर्कच्या या मुक्कामात सुनीतावहीनी मला म्हणाल्या होत्या की, तुमची व भाईंची व्हेवलेंग्थ जुळली. अर्थातच हे सर्टिफिकेट सुनीतावहीनींकडून मिळाल्यामुळे त्याला विशेष महत्व होते.’  
शरद पवार 
‘पुलंच्या सुदैवाने त्यांना सुनीताबाईंसारख्या सहचारीणी लाभल्या. मराठी मनात आज पुलंची जी प्रतिमा आहे ती घडवण्यात सुनीताबाईंचा मोठा वाटा आहे. त्या स्वत: कर्तबगार, प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या होत्या. चिकित्सक रसिकता व कलागुण यांची देणगीही त्यांना लाभलेली आहे आणि स्वत:चे विचार व निष्ठा त्यांनी ठामपणे जपलेल्या आहेत. पण पुलंवरील प्रेमामुळे आपले सारे कर्तुत्व पुलंच्या बालसुलभ व्यक्तिमत्वाला सांभाळण्यात व कलागुणांना फुलवण्यात त्यांनी व्यतीत केले आणि पुलंमधील आदर्शवादाला उत्तेजन दिले. त्याचबरोबर त्यांनी पुलंच्या सामाजिक बांधिलकेच्या भावनेला उत्तेजन देऊन अनेक समाजोपयोगी उपक्रमांना आधार प्राप्त करून दिला. 

निशिकांत ठकार.. 
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे। उदास विचारे वेच करी॥ हा तुकारामांचा उपदेश त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाचे बोधवाक्य म्हणून निवडला होता. (त्यांनी की सुनीताबाईंनी?) अतिशय मार्मिक वचन आणि त्याप्रमाणे आचरण. जोडोनिया धन याबरोबरच ’जन’ हा पाठभेदही नव्याने जोडता येईल. खूप माणसं जोडली. पु.लं. वर लोकांच प्रेम होतं. पु.ल. गेल्यावर ते प्रकर्षाने प्रत्ययाला आलं. महानोरांना सुनिताबाई म्हणाल्याही, "इतकं असेल. असं वाटलं नव्हतं." पु.लं.नी जगण्यातलं खूप काही वेचलं आणि अनंतहस्ते वाटून टाकलं. वाटून टाकायचं हे आधी माहित असणं म्हणजेच उदास (निरपेक्ष) विचाराने वेचणं. त्याने निराशा येत नाही, आनंद वाटतो. वाटला जातो. ’आहे मनोहर तरी...’ मध्येही ’उदास’ गमणे आहे. आत्मशोधातून येणारं ’उदास’ गाणं. म्हणून तर महानोरांना सुनीताबाई व भाई कधीच वेगळे दिसले नसावेत? पु.ल. गेले. त्यांच्या आठवणी राहिल्या. अनेकांच्या अनेक आठवणी, त्यामुळे पु.ल. गेले हे विधान खोटेच वाटायला लागते. कर्‍हाड संमेलनातून पुण्याला परत येताना महानोरांनी पु.ल. सुनीताबाईंना लोकगीतं ऎकवली. त्यातलं एक ऎकलं आणि सुनीताबाईंनी गाडी थांबवली. गेला मह्या जीव मले भिंतीशी खुळवा सोन्याचं पिंपळपान माझ्या माहेरी पाठवा पु.लं. च्या आठवणी म्हणजे पिंपळपानं आहेत. काही पुस्तकांत ठेवलेली, जाळी पडणारी. काही सोन्याची, काही आरस्पानी. वाचकांच्या माहेरी अशी आठवणींची पिंपळपानं आलेली आहेत. झाड शोधायला गेलं तर जंगल हरवतं. जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं. आठवणींचही असंच होत असावं. आठवणींत बहुवचनी माणूस पुरा सापडत नाही आणि पुऱ्या माणसाला शोधायला आठवणी पुऱ्या पडत नाहीत; पण पिंपळपान संपूर्ण भावबंधाचं प्रतीक होऊन येतं. त्याचा आकार हृदयासारखा असतो म्हणून? का भावबंधांची जाळी पारदर्शी होत जातात म्हणून? पिंपळपान सोन्याचं असलं तरी अटळ उदासी घेऊन येतात. सोन्याचं पिंपळपानं निरोप घेऊन येतं. माहेरच्या माणसांच्या काळजात कालवाकालव होते. भाई गेल्यानंतर सुनीताबाईंनी भाईंसाठी एक पत्र लिहिले त्यातला काही भाग- "बोरकरांची एक ओळ आहे, ‘चंदन होवोनि अग्नि भोगावा’- जिंवत असताना, मृतावस्थेतही, कितीही उगाळलं तरी आणि शेवटी जळून जातानादेखील, त्या चंदनासारखंच आपल्या प्रकृतीधर्माप्रमाणे मंद दरवळत राहणं सोपं नाही. ज्या महाभागाला हे जमेल, त्याला अग्निदेखील भोगता येईल. ही खरी आत्मा आणि कुडीची एकरुपता. तो चिरंजीवच. नाहं हन्ति न हन्यते! तू गेलास आणि लोक हेलावून मला म्हणाले, "वहिनी, भाई गेले, तरी तुम्ही एकट्या आहात, पोरक्या झालात असं मानू नका. काहीही लागलं, तरी संकोच न करता सांगा, कुठल्याही क्षणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत." हा खरचं त्या साऱ्यांच्या मनाचा मोठेपणा. तो त्यांनी आपापल्या परीने व्यक्त केला. कारण त्यांना कसं कळावं की, मी या क्षणीही एकटी नाही आणि पुढेही कधी एकटी नसणार. किंवा आयुष्यभर एकटीच होते आणि एकटेपणाच माझ्यासारखीचा प्राण असतो.  
तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला, त्या क्षणीच मी एक प्राण सोडला आणि दुसऱ्या स्वतत्रं जीवनात प्रवेश केला. Robert Graves ची एक कविता आहे, मूळ शब्द आज निटसे आठवत नाहीत. पण मनाच्या गाभ्यात अर्थ मात्र या क्षणी जागा झालाय तो काहीसा असा -मृत्यूतून पुनर्जन्म होणे ही मोठीशी जादू किंवा अशक्यप्राय़ गोष्ट नव्हे. जीवन बहुधा पूर्णांशाने विझलेलं नसतंच. एखाद्या समर्थ फुंकरीने वरची राख उडून जाते. आणि आतला तेजस्वी जिंवत अंगार धगधगायला लागतो... आणि हेही तितकंच खरं की ते निखारे पुन्हा फुलायला लागतात, त्या वेळी त्यांच्यावरची आपण उडवून लावलेली राख आपल्याभोवती जमून दुसऱ्या कुणाच्या तरी फुंकरीची वाट पाहत आपल्याला लपेटून गुपचुप पडून असते. अहिल्येच्या शिळेसारखी- एकटेपणा हा एकटा कधीच येत नसतो. सोबत भला मोठा आठवणींचा घोळका घेऊनच येतो. कवी खानोलकरांसारखा ‘तो येतो आणिक जातो.’ येताना कधी कळ्या घेऊन आला, तरी जाताना त्यांची फुलं झालेली हाती पडतील की निर्माल्य, हे त्याला तरी कुठे माहीत असतं? त्या क्षणी जे भाळी असेल, ते स्विकारायचं की नाकारायचं याचा निर्णय घेण्याचं तेवढं स्वातंत्र्य ज्याच्या त्याच्या हाती असतं. स्वातंत्र्य! ऍब्स्ट्रॅक्ट, कॉंक्रिट काहीही नाही-" 

लेखातील भाग ‘पु.ल. नावाचे गारुड’ `आनंदयोगी पु.ल.' आणि ‘जीवन ज्योत दिवाळी अंक २००९’ मधुन साभार..