Friday, December 29, 2006

महाराष्ट्राचा व्हॅलेंटाईन

'प्रेमदिना'निमित्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख. प्रवीण टोकेकर अर्थात दस्तूरखुद्द 'ब्रिटिश नंदीं'नी लिहिलेला. पु.लं. - सुनीताबाईंचं नातं इतक्या हळुवारपणे सांगणाऱ्या त्यांच्या शब्दांना कुर्निसात!
उन्हाचा झळझळीत पट्टा इथं आतपर्य़त येतो. खूप वेळ त्याच्याकडे बघितलं,की डोळे दुखतात थोडेसे चालायचंच. समोर रस्त्यावरच्या वर्दळीकडे भाईकाका टकटक बघत राहिले. रोज सकाळी अंघोळ किंवा स्पंजीग आटोपलं, की कुणीतरी त्यांना इथं आणून बसवतं. कुणीतरी म्हणजे बहुधा माईच. या खिडकीशी बसायचं आणि चिटकुला ब्रेकफास्ट करायचा. कितीही बेचव असला, तरी भाईकाका तो ऎन्जाय करायचे. हळूहळू त्यात पाखरांची किलबिल ऎकायची. दृष्टीशेपात येणारा झाड्झाडोरा आनंदी वृत्तीन न्याहाळायचा. एखादी झकासशी टेप लावून देऊन माई आपल्या कामात बुडून जायच्या. भाईकाकांचे खरपुड्लेले पाय तबल्याच्या ठेक्यानिशी किंचित हलत, तेव्हा खुप सुंदर वाटतं.

गेली काही वर्ष तरी हेच रुटिन आहे. औषधाच्या गोळ्या आणि न बाधणारा माफक आहार. पुन्हा औषधाच्या गोळ्या ठरलेल्या वेळी झोपलंच पाहिजे हि माईची शिस्त. कधी कधी भाईकाका गमतीनं म्हणत, 'अर्धशिशीला माई ग्रेन' का म्हणतात, कळलं का तुला! बाहेरची वर्दळ बघत बसण्याचा कंटाळा आला, की भाईकाकाचं काहीही दुसऱ्याला करायला लागता कामा नये, असा त्यांचा हट्ट असे. हा हट्टच रोज भल्या पहाटे त्यांना उठवी. रात्री अंथरुणाला पाठ टेकेपर्यंत त्यांच्या मनात भाईकाकांच हवं-नको बघणं याच्याशिवाय दुसरं काही नसे. भाईकाकासुध्दा त्यातलेच. 'माई किती करतात!' आम्ही आहोत ना!' असं सांगणाऱ्या आसपासच्या मंडळीसमोर भाईकाका फक्त हसायचे. काही म्हणता काही बोलायचे नाहीत. जणू आपलं सगळं फक्त माईंनीच करावं, अशी त्याचीचं अपेक्षा असायची. 'रवी मी.. दीनानाथाच्या सुरांची लड चमकून गेली आणि भाईकाका खुशालले. खुर्चीच्या हातावर बोटांनी त्यांनी हलकेच ठेका धरला. जांभळया-लाल रंगाच्या एखादा फलकारा वेडीवाकडी वळणं घेत जावा, तशी नाटकाची घंटा त्यांच्या मनात घुमली. धुपाचा गंध दरवळलला. उघडलला जाण्यापूर्वी मखमली होणारी अस्वस्थ थरथर त्यांना स्पष्टपणे जाणवली आणी त्यांनी खुर्चीच्या पाठीवर हलकेच मान टेकून डोळे मिटले.

पाहिल्यापासून माई तशी भलतीच टणक किंबहुना तिचा हा कणखरपणा पाहूनच आपण तिच्याकडे ओढले गेलो. गॊरी गोरी पान, बारकुडी अंगकाठी, साधीसुधीच सुती साडी; पण त्या नेसण्यातही किती नेटनेटकेपण. या मुलीच्या अंगावर एकही दागिना नाही, हे सुद्धा कुणाच्या लक्षात आलं नाही कधी....कुठल्या तरी संस्थेच्या वर्धापनासाठी ही आपल्याला घ्यायला आली होती. टांग्यात मागं आपण आणि मधू मांडीवर तबला नि डग्गा घेऊन बसलेले. सुपात पेटी! टांग्येवाल्याच्या शेजारी ही बारकीशी पोर. घोड्याच्या पाठीवर वाटेल तसा चाबूक ओढणाऱ्या टांगेवाल्याला तिनं कसला झापला होता. 'चलना हे तो ठीक सें चलाव! नाही तर मी चालवते!!'टांग्यातून उतरल्यावर हिनं त्याला पैसे विचारले. "द्या आणा-दीड आणा," तो म्हणाला."आणा की दीड आणा?"मधूच्या बरोबरीनं आपण कित्येक दिवस या मुलीची नक्कल करत असू. पुढं आशाच काही सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वारंवार भेटी होऊ लागल्या. ती आली, की मधू ढोसकण्या द्यायच्या. आपण बोअर झाल्याचा आव आणायचो. अशा माईशी मी लग्न करणारे, हे कळल्यावर मधू हैराण झाला होता. म्हणायचा, 'अरे लेका, तू गाण्याबजावण्यातला माणूस. तुझं काय जमणार या इस्त्रीवालीशी?

पण, माई इस्त्रीवाली नव्हतीच. कॉलेजची सहल होती तेव्हा हे कळलं सिंहगडावर सगळे पोचल्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी कोंडाळं करून बसले. मी पाहुणा आघाडीचा आणी तरीही स्वस्तात पटलेला भावगीत गायक! पोरीबाळीसमोर भाव खात पाच-सहा पदं म्हटली. हाताच्या तळव्यावर हनुवटी रेलून शांतपणे ही ऎकत होती. मग मैत्रिणींनी आग्रह केल्यावर तिनं कविता म्हटली.
कुठली बरं?आठवलं! माधव जूलियनांची-

कोठे तरी जाऊन शीघ्र विमानी
अनात ठिकाणी...
स्वातंत्र्य जिथे, शांती जिथे,
प्रेम इमानी
तेथे चल राणी!
भाळ न इथे प्रिती धनाविण कुणाला,
ना मोल गुणाला,
लावण्य नसे जेथे जणू चीज किराणी
तेथे चल राणी!....


पेटीवर सूर धरता धरता स्पष्टपणे जाणवलं. आपण आता, या क्षणी, इथं सिंहगडावर, प्रेमात पडत आहोत.... इस्त्रीवाली पाणी खूप खोल होतं.हिच्या व्यक्तिमत्त्वातलं तो करडेपणा, खरखरीतपणा, खोटा आव आहे काय? सोर्ट ओफ डिफेन्स मेकनिझम? तिच्या ठायी खरोखर हे इतकं मार्दव आहे? वस्तुतः जूलियनांची ही कविता आपल्याला अजिबात आवडायची नाही. उगीच आपलं 'ट' ला 'ट' आणि 'राणी' ला 'पाणी'! पण माईनं ती कविता अक्षरशः उलगडून दाखवली. नुसतीच कविता नव्हे रीतीभाती पल्याडच्या तो चांद्रप्रदेशही दाखवला.

चार-आठ दिवस गेल्यावर एक पत्र लिहिलं आणि माईला आपल्या भावना कळवून टाकल्या. आता 'हो' म्हण. मी मोकळा झालो आहे.उलट टपाली पाकीट आलं. फोडलं तर आत आपणच पाठवलेलं पत्र.... साभार! त्याच कागदाच्या पाठीमागं मात्र दोनच शब्द होते : 'अर्थात होय!".

पुढं माईनं सगळाच ताबा घेतला. लग्नाची तारीख तिनंच ठरवली. नोंदणी पद्धतीनंच करायचं, हा देखील निर्णय तिचाच. घर मांडायची वेळ आली तेव्हा, तिनं आपल्याशी फारशी चर्चासूघ्दा केली नाही. आपण गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये, रेकार्डिंगमध्ये बूडालेलो आणी ही बाई भाड्याच्या घरं शोधतेय पागडीसाठी हुज्जत घालतेय. अर्थात, आपल्याला बहुधा हे जमलंही नसतं. पुढंही कधी काही करायची वेळ आली नाही, माईनं ती येऊ दिली नाही.

मित्रमंडळ मोठं होतं कामही खूप होती टाईम मेनेजमेंटच्या बाबतीत आपला मामला तसा यथातथाच. माईनं हे सगळं मोडून काढलं पार्ट्या-पत्त्यांचे अड्डे बंद झाले नाहीत, कमी मात्र झाले. आयुष्याबद्दलच्या तिच्या कल्पना खूप वेगळ्या होत्या. स्थैर्य माणसाची वाढ रोखतं, अस ती अधुनमधुन ऎकवायची भरपूर काम मिळत होती पैसा हाती खेळू लागला होत; पण माईच्या अंगावर दागिना काही कधी चढला नाही. लोकप्रियतेचा उन्माद कधी तिनं चढू दिला नाही. माईनं आपले हातपाय सतत हलते ठेवले. धाव धाव धावायचं, विश्रांतीला थोडं थांबायचं पुन्हा पळायला सुरवात करायची माईंमुळे हे सगळ सहज वाटत होत आपण धावतोय, हे तरी कुठं कळत होतं? ऎके दिवशी तिनं सहज विचारल्यासारखं विचारल्यासारखं विचारलं, " अजून किती दिवस नाटकं करणार आहेस रे?""म्हंजे, समजलो नाही!""नाही, बरेच दिवस रमलायस म्हणून विचारते!" त्या दिवशी संघ्याकाळी 'ललितरंग' च्या जांभेकराना आपण सांगून टाकलं 'पुढचा महिना प्रयोग करीन. एक तारखेपासून नाटकं बंद!' त्या दिवसापासून ग्रीजपेण्ट गालाला लावला नाही. आयुष्यही तसं उतरणीला लागलं होतं. सत्कार-समारंभाचाही कंटाळा येऊ लागला होता. वक्तृत्व कितीही चांगलं असलं, तरी भाषणं देणार किती?

आणि आता ही स्थिती. अशा विकलांग अवस्थेत एखाद्या म्हताऱ्याला वीट आला असता.असह्य अवस्थेत खितपत राहण्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटलं असतं; पण माईनं यातलं काही काही जाणवू दिलं नाही. लग्न ठरल्यापासूनच ती अशी वागत नाही का? माई हे माझ्याच व्यक्तिमत्त्वाचं एक्स्टेन्शन आहे, असं मला वाटलं. अर्थातच तिला हे वाक्य आवडणार नाही बाण्याची आहे; पण खरं सागांयच, तर तो स्वतंत्र बाणा माझाच आहे. माझंच ते तुलनेनं धड असलेलं शरीर आहे. समोर लगबगीनं मीच चालतो आहे. त्या शरीरात स्वतंत्र आत्मा आहे आणि त्याचं नाव माई आहे,
इतकंच! माई माझा स्वाभिमान आहे. आख्खं आयुष्य ती माझा 'इगो' म्हणूनच वावरली आहे.

इथं समर्पण हा शब्द समर्पक ठरणार नाही. एकमेकांचा 'इगो' होणं, येस, धिस इज दी राइट स्टेटमेण्ट!

माई माझा इगो आहे आणि तिचा मी......

"उठतोस का रे..... बरं वाटतंय ना!"

"अं?"

"अरे ती मुलं आलीत-बच्चूच्या क्लबातली. तुला 'विश' करायचं म्हणतात."

"आफकोर्स.....आफकोर्स," भाईकाका हळूहळू सावरून बसले.

आम्ही गुपचुप त्याच्यांसमोर गेलो. त्यांच्या हाती टवटवीत गुलाबांचा गुच्छ दिला.

"भाईकाका, आज व्हेलेंटाइन डे आहे ना, म्हणून आलोय!"

"काय आहे....... आज?"

"व्हेलेंटाइन डे!"

"ओह.....सो नाईस आफ यू. मी तुमचा व्हेलेंटाइन काय!"

"भाईकाका, तुम्ही आख्ख्या महाराष्टाचे व्हेलेंटाइन!"

मिस्कील नजरेनं भाईकाका हळूहळू म्हणाले. आम्ही टाळ्या वाजवल्या. भाईकाका दिलखुलास हसले. ते पाहून माई गर्रकन वळल्या आणि सरबत करण्यासाठी आत गेल्या.

झळझळीत उन्हाचा सोनेरी पट्टा थेट आतवर आला होता.

अंतू बर्वा

प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.
--------------------------------

रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरूष रहातात.देवाने ही माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिर्‍याचे, नारळ-फणसांचे,खाजर्‍या अळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणार्‍या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. रत्नागिरीच्या शितातच ही भुतावळ लपली आहे की पाण्यातच प्राणवायु नि प्राणवायूच्या जोडीला आणखी कसला वायु मिसळला आहे ते त्या रत्नांग्रीच्या विश्र्वेश्र्वरालाच ठाऊक.

अंतू बरवा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बरव्याला कुणी अंतू असे एकेरी म्हणावे असे त्याचे वय नव्हे. मी बाराचौदा वर्षांपूर्वी त्यांना प्रथम पाहिले त्या वेळीच त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोगट्या झाला होता. अण्णू गोगट्या होणे म्हणजे 'पडणे' हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. रत्नांग्रीचा अण्णू गोगटे वकील कित्येक वर्षे ओळीने मुन्शिपाल्टीच्या निवडणूकीत पडत आला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोहर्‍याचा

"'अण्णू' झाला काय रे?" म्हणून अंतू ओरडतो.

समोरासमोर अंतूला कोणी अंतू म्हणत नाही. परंतु उल्लेख मात्र सहसा एकेरी. किंबहुना, कोकणातली मंडळी एकूणच एकवचनी. पण अंतूला संबोधन 'अंतूशेट' हे आहे. ह्या चित्पावनाला ही वैश्यवृत्तीची उपाधी फार प्राचीन काळी चिकटली. अंतूच्या हातून ते पाप घडले होते. पहिल्या महायुध्दाच्या वेळी अंतूने बंदरावर कसले तरी दुकान काढले होते. ते केव्हाच बुडाले. परंतु 'अंतूशेट'व्हायला ते कारण पुरेसे होते. त्यानंतर अंतूने पोटापाण्याचा काही उद्योग केल्याचे कोणाच्या स्मरणात नाही. दोन वेळच्या भाताची त्याची कुठेतरी सोय आहे. थोडीशी जमीन आहे. नारळीची पाचपंचवीस, पोफळीची दहापंधरा आणि रातांबीची काही अशी झाडे आहेत. दोनपाच हापूस आंब्याची आहेत. कुठे फणस, चिंच उभी आहे. वाडवडिलार्जीत घराच्या वाटणीत एक पडवी आणि खोली आली आहे. विहीरीवर वहिवाटीचा हक्क आहे. ह्या सगळ्या आधारावर अंतूशेट उभे आहेत.

त्यांची आणि माझी पहिली भेट बापू हेगिष्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगरेट घ्यायला गेलो होतो आणि 'केसरी'च्या मागून अर्धा जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंतूशेटनी तडक प्रश्न केला होता, "

"वकीलसाहेबांचे जावई ना ?"

"हो!"

"झटक्यात ओळखलेंच मी! बसा! बापू, जावयबापूंना चहा मागवा"

एकदम इतक्या सलगीत आलेला म्हातारा कोण हे मला कळेना. पण अंतूशेटनीच खुलासा केला. "तुमचे सासरे दोस्त हो आमचे. सांगा त्यांना अंतू बरवा विचारीत होता म्हणून."

"ठीक आहे !"

"केव्हा आलात पुण्याहून ?"

"परवाच आलो."

"बरोबर. दिवाळसण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी! काय?"

"तुमचे दोस्त आहेत ना, तुम्हीच सांगा."

"वा! पुण्याचे तुम्ही. बोलण्यात ऐकणार काय आम्हाला! मग मुक्काम आहे की आपली फ्लाईंग व्हिजीट ?"

"दोनतीन दिवसांनी जाईन !"

"उत्तम ! थोडक्यात गोडी असते. त्या सड्यावरच्या कपोसकर वकिलाच्या जावयासारखं नका करू. त्यानं सहा महिने तळ ठोकला. शेवटी कपोसकर वकिलान् एक दिवस खळं सारवायास लावलं त्यास ! जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो. कसं ?"

"बरोबर आहे !"

"बापूशेट, ओळखलंत की नाही ? आमच्या वकिलांचे जावई ! आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार हो !"
हेगिष्ट्यांनी नमस्कार केला.

"चहा घेता ?"

"नको हो, उकडतंय फार !" मी म्हणालो.

"अहो, रत्नांग्रीस उकडायचंच. गोठ्यात निजणार्‍यान् बैलाच्या मुताची घाण येते म्हणून भागेल काय ?" शेवटला 'काय?' वरच्या पट्टीत उडवीत अंतूशेट म्हणाले, "रत्नांग्रीस थंड हवा असती तर शिमला म्हणाले नसते काय आमच्या गावाला ? पण उकाड्याचा तुमच्या सड्यावर अधिक त्रास ! दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग नि थेट या आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. पोफळीची बाग म्हणजे एअरकंडिशन हो !" मनमुराद हसत अंतूशेट म्हणाले. वर आणि "आमचा कंट्री विनोद हो जावयबापू" हेही ठेवून दिले.

"बापूशेट, पाहुणे लेखक आहेत हो. आमच्या आबा शेट्यासारखी नाटकं लिहिली आहेत. फार बोलू नका. नाहीतर तुमच्यावर लिहीतील एखादा फर्मास फार्स !"

अंतूशेट बर्व्यांपर्यंत माझी कीर्ती पोहोचल्याचे ऐकून झालेला आनंद बापूशेट हेगिष्ट्याच्या प्रश्नाने मावळला. मला नीट न्याहाळीत बापूशेट म्हणाले, "काय करतात ?"

"करतात काय म्हंजे ? खुळे की काय तुम्ही हेगिष्टे ? ती रद्दी काढा. दहा ठिकाणी फोटोखाली नाव छापलेलं आढळेल तुम्हाला. सिनेमात असतात."

"म्हणता काय ?" हेगिष्टे माझ्याकडे 'अजि म्यां ब्रह्म पाहिलें' असा चेहरा करून पाहत म्हणाले.

"काय हो जावयबापू, एक विचारू काय ?" मिस्किल प्रश्नाची नांदी चेहर्‍यावर दिसत होती.

"विचारा की ----"

"एक सिनेमा काढला की काय मिळतं हो तुम्हाला ?"
मी काही कोकणात प्रथमच आलो नव्हतो; त्यामुळे ह्या प्रश्नाला मी सरावलो होतो.

"ते सिनेमा-सिनेमावर अवलंबून आहे."

"नाही, पण आम्ही वाचलंय की एक लाख दीड लाख मिळतात ..."

"मराठी सिनेमात एवढे कुठले ?"

"समजा ! पण पाच पूज्यं नसली तरी तीन पूज्यं पडत असतीलच ..."

"पडतात... कधीकधी बुडतात ही !"

"अहो, ते चालायचंच ! धंदा म्हटला की चढणं नि बुडणं आलं. आणखी एक विचारू काय ? ...म्हणजे रागावणार नसलात तर..."

"छे, रागवायचं काय ?"

"सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही हे जे काही वाचतो ते खरं असतं की आपलं गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं ?"

"हे जे काही म्हणजे ?" मी उगीचच वेड पांघरले.

"वस्ताद हो जावयबापू ! कोर्टात नाव साक्षीदार म्हणून नाव काढाल ! अहो, हे जे काही म्हणजे तर्जनीनासिकान्याय यातला प्रकार म्हणतात ते..."

हा तर्जनीनासिकान्याय माझ्या ध्यानात आला नाही. शेवटी अंतूशेतनी आपली तर्जनी नाकपुडीला लावीत साभिनय खुलासा केला. तेवढ्यात हेगिष्ट्यांनी मागवलेला चहा आला. "घ्या" अंतूशेटनी माझ्या हातात कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला "रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे, झंप्या ?" असे म्हणून जाता जाता चहाच्या रंगावर शेरा मारला आणि बशीत चहा ओतून फुर्र फुर्र फुंकायला सुरवात केली. वास्तवीक त्या पो~याला चहात दूध कमी आहे हे त्यांना सरळ सांगता आले असते. पण अंतूशेटचेच काय, त्यांच्या सा~या आळीचे बोलणे तिरके.

(अपूर्ण)
पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


रावसाहेब

"दिल्ले दान घेतले दान पुढच्या जन्मी मुस्सलमान" असा एक आमच्या लहानपणी चिडवाचिडवीचा मंत्र होता. दिल्ले दान परत घेणा~याने मुस्सलमानच कशाला व्हायला हवे ? दानतीचे दान काही धर्मावारी वाटलेले नाही. पण 'दाना'ला मुस्सलमानातल्या 'माना'चे यमक जुळते, एवढाच त्याचा अर्थ. पण दिल्ले दान कसलाही विचार न करता परत घेणारा देवाइतका मक्ख दाता आणि घेता दुसरा कोणीही नसेल.

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये, ह्याला काही उत्तर नाही. पंधरा-पंधरा, वीस-वीस वर्षांच्या परिचयाची माणसे असतात. पण शिष्टाचारांची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्याचा आपला संबंध जातच नाही. त्यांच्या घरी जाणे-येणे होते --- भेटणे-बोलणे होते --- पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि काही माणसे क्षणभरात जन्मजन्मांतरी नाते असल्यासारखी दुवा साधून जातात. वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही. पूर्वसंस्कार, भाषा, चवी, आवडीनिवडी, --- कशाचाही आधार लागत नाही. सूत जमून जाते. गाठी पक्क्या बसतात.

बेळगावच्या कृष्णराव हरिहरांशी अशीच गाठ पडली. त्यांना सगळे लोक 'रावसाहेब' म्हणायचे. ही रावसाहेबी त्यांना सरकारने बहाल केली नव्हती. जन्माला येतानाच ती ते घेऊन आले होते. शेवटपर्यंत ती सुटली नाही. बेताची उंची, पातळ पांढरे केस मागे फिरवलेले, भाग्याची चित्रे रेखायला काढतात तसले कपाळ, परीटघडीचे दुटांगी पण लफ्फे काढल्यासारखे धोतर नेसायचे, वर रेशमी शर्ट, वुलन कोट, एका हाताच्या बोटात हिऱ्याची अंगठी आणि दुसऱ्या हाताच्या बोटांत करंगळीच्या आणि अनामिकेच्या बेचकीत सिगरेट धरलेली, तिचा चिलमीसारखा ताणून झुरका घ्यायची लकब. जिल्ह्याच्या कलेक्टरपासून ते रस्त्यातल्या भिकाऱ्यापर्यंत कुणालाही, दर तीन शब्दांमागे कचकावून एक शिवी घातल्याखेरीज गृहस्थाचे एक वाक्य पुरे होत नसे. मराठीला सणसणीत कानडी आघात आणि कानडीला इरसाल मराठी साज.

साधे कुजबुजणे फर्लांगभर ऐकू जावे इतका नाजूक आवाज ! कुठल्याही वाक्याची सुरवात 'भ'काराने सुरू होणाऱ्या शीवीशिवाय होतच नसे. मराठीवरच्या कानडी संस्कारामुळे लिंगभेदच काय पण विभक्तिप्रत्यय-कर्ता-कर्म-क्रियापदांची आदळआपट इतकी करायचे की, दादोबा पांडुरंग किंवा दामले-बिमले सगळे व्याकरणवाले झीटच येऊन पडले असते. शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजत असेल तर समजो बापडे, पण जगाच्या दृष्टिने सारी अशुद्धे केलेला हा माणूस माझ्या लेखी देवटाक्याच्या पाण्याइतका शुद्ध होता. आवेग आवरता येणे हे सभ्यपणाचे लक्षण मानले जाते. रावसाहेबांना तेवढे जमत नव्हते. तरीही रावसाहेब सभ्य होते. काही माणसांची वागण्याची तऱहाच अशी असते. की त्यांच्या हाती मद्याचा पेलादेखील खुलतो, आणि काही माणसे दूधदेखील ताडी प्याल्यासारखी पितात. रावसाहेब षोकीन होते. पण वखवखलेले नव्हते.

जीवनात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले. पण उपाशी वाघ काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्याच्या वळणावर नेईल ? सोन्याच्या थाळीतून पहिला दूधभात खाल्लेल्या धनुत्तर हुच्चराव हरिहर वकिलाच्या किटप्पाने पुढच्या आयुष्यात कधीकधी शिळ्या भाकरीचा तुकडाही मोडला होता. पण काही हस्तस्पर्शच असे असतात, की त्यांच्या हाती कण्हेरदेखील गुलाबासारखी वाटते. रावसाहेबांची घडण खानदारी खरी, पण माणूस गर्दीत रमणारा. अंतर्बाह्य ब्राँझने घडवल्यासारखा वाटे. वर्णही तसाच तांबूस-काळा होता. सिगरेटचा दमदार झुरका घेताना त्यांचा चेहरा लाल आणि काळ्याच्या मिश्रणातून होतो तसा होई. मग दहांतल्या पाच वेळा त्यांना जोरदार ठसका लागे. सिगरेट ओढतानाच काय, पण जोरात हसले तरी ठसका लागायचा. कारण ते हसणेदेखील बेंबीच्या देठापासून फुटायचे. स्मितहास्य वगैरे हास्याचे नाजून प्रकार त्या चेहऱ्याला मानवतच नसत. एकदम साताच्या वरच मजले.ह्या राजा आदमीची आणि माझी पहिली भेट कोल्हापूरच्या शालिनी स्टूडिओत पडली.

दहापंधरा वाद्यांचा ताफा पुढ्यात घेऊन मी गाणे बसवीत होतो. रेकॉर्डींगच्या आधीची साफसफाई चालली होती. विष्णुपंत जोग आपल्या पहाडी आवाजात गात होते. चाल थोडी गायकी ढंगाची होती. जोगांचा वरचा षड्ज ठ्यां लागला आणि तो वाद्यमेळ आणि जोगांचा स्वर ह्यांच्या वर चढलेल्या आवाजात कोणीतरी ओरडले --- "हा__ण तुझ्या आXX!"

ही इतकी सणसणीत दाद कोणाची गेली म्हणून मी चमकून मागे पाहिले. बाळ गजबर रावसाहेबांना घेऊन पुढे आले आणि

मला म्हणाले ---"हे बेळगावचे कृष्णराव हरिहर बरं काय ----"मी रीतसर नमस्कार ठोकला आणि रावसाहेबांनी आमची आणि त्यांची शाळूसोबत असल्यासारखा माझ्या पाठीत गुद्दा मारला.

"काय दणदणीत गाणं हो xxxxx !" रावसाहेबांच्या तोंडची वाक्ये जशीच्या तशी लिहायची म्हणजे मुष्किलच आहे. शरीराप्रमाणे मनालाही कुबड आलेली माणसे अश्लील -- अश्लील म्हणून ओरडायची. (तबीयतदार तज्ञांनी फुल्या भरून काढाव्या.)

"वा !--- पण तेवढं तुमचं ते तबलजी शिंचं कुचकुचत वाजिवतंय की हो -- त्याला एक थोडं चा पाज चा -- तबला एक थोडं छप्पर उडिवणारं वाजीव की रे म्हणा की त्या xxxxxला." इथे पाच शब्दांची एक शिवी छप्पर उडवून गेली. तसेच पुढे गेले, आणि त्या तबलजीला त्यांनी विचारलं,

"कोणाचा रे तू ?" तबलजीने वंश सांगीतला. आणि माईकपुढे नरम वाजवावे लागते वगैरे सबबी सुरू केल्या. "मग रेकार्डिंगवाल्याला ह्यें माइकचं बोंडूक वर उचलायला लावू या की. बळवंत रुकडीकराचे ऐकलं नाहीस काय रे तबला ? 'कशाला उद्याची बात'चं रेकार्ड ऐक की -- त्याच्या वाटेत तुझं हे xxxचं माइक कसं येत नव्हतं रे xx?" म्हणत आपणच माइक वगैरे वर उचलून "हाण बघू आता" म्हणत त्या रेकॉर्डिंगचा ताबा घेतला.

स्टुडियोत त्यांचा जुना राबता होता. रेकॉर्डिस्टही परिचयातलेच. थोडा वेळ इरसाल कोल्हापुरीत त्यांचा आणि ह्यांचा एक लडिवाळ संवाद झाला. "मला सांगतोस काय रे रेकार्डिंग? पी.एल. --- अहो, हे तुमचं रेकार्डिष्ट खुंटाएवढं होतं --- माझ्या धोतरावर मुतत होतं. आता मिश्या वर घेऊन मला शिकवतंय बघा --- ह्या कोल्हापुरातल्या क्राऊन शिन्माचा नारळ फुटला तो माझ्यापुढे की रे -- तू जन्म झाला होतास काय तेव्हा -- हं, तुमच्या वाजिंत्रवाल्यांना लावा पुन्हा वाजवायला -- जोर नाही एकाच्या xxx! हें असलं नाटकासारखं गाणं आणि साथ कसलं रे असलं मिळमिळीत ? थूः !

हे काय तबला वाजिवतंय की मांडी खाजिवतंय रे आपलंच ?" एवढे बोलून रावसाहेब ठसका लागेपर्यंत हसले. रावसाहेबांचा हा अवतार मला अपरिचित असला तरी आमच्या स्टुडिओतल्या मंडळींना ठाऊक असावा. कारण त्यांच्या त्या आडवळणी बोलण्यावर लोक मनसोक्त हसत होते. रेकॉर्डिस्टने त्यांना आपल्या बूथमध्ये नेले आणि रावसाहेब त्या काचेमागून माना डोलवायला लागले. त्या माणसाने पहिल्या भेटीतच मला खिशात टाकले.

त्यानंतर वर्षा-दोन वर्षांतच मी बेळगावला प्राध्यापकी करायला गेलो, आणि पहिल्या दिवशीच रावसाहेबांच्या अड्ड्यात सामील झालो. रावसाहेब सिनेमाथिएटरांच्या व्यवसायात होते. बेळगावच्या रिझ थिएटरातला बैठकीचा अड्डा हा रावसाहेबांचा दरबार होता. त्या दरबारात अनेक विसंवादी पात्रे जमत. त्या आर्चेस्ट्र्याचे रावसाहेब हे कंडक्टर होते. राजकारणातल्या माणसांना काय तो तिथे मज्जाव होता. म्हणजे कुणी मज्जाव केला नव्हता, पण त्या खुर्च्यांमध्ये मानाची खुर्ची नसल्यामुळे ती जात त्या दिशेला फिरकतच नसे. रिझ थिएटरच्या बाजूला एक ऑफिसची छोटीशी बंगली होती. तिच्या दारात संध्याकाळी खुर्च्या मांडल्या जात. पंखा चालू केल्यासारखी संध्याकाळी सहाच्या सुमारास नेमकी त्या बोळकंडीतून वाऱ्याची झुळूक सुरू व्हायची. एक तर बेळगावी लोण्याइतकीच तिथली हवाही आल्हाददायक. हळूहळू मंडळी दिवसाची कामेधामे उरकून तिथे जमू लागत. त्या बैटकीत वयाचा, ज्ञानाचा, श्रीमंतीचा, सत्तेचा -- कसलाही मुलाहिजा नव्हता. एखाद्या खिलाडू कलेक्टराचेदेखील रावसाहेब "आलं तिच्च्यायला लोकांच्यात काड्या सारून --" अशा ठोक शब्दांत स्वागत करायचे. रावसाहेबांच्या शिव्या खायला माणसे जमत. मग हळूच व्यंकटराव मुधोळकर रावसाहेबांची कळ काढीत. व्यंकटराव मुधोळकर धंद्यानं रावसाहेबांचे भागीदार. पण भावाभावांनी काय केले असेल असे प्रेम. दोघांची भांडणे ऐकत राहावी. एखाद्या शाळकरी पोरासारखे ते हळूच रावसाहेबांची कळ काढीत.

"काय रावसाहेब -- आज पावडरबिवडर जास्त लावलीय --" बस्स. एवढे पुरे होई.

"हं -- बोला काडीमास्तर --" रावसाहेब त्यांना काडीमास्तर म्हणत. ह्या दोघांची मैत्री म्हणजे एक अजब मामला होता. मुधोळकर कुटुंबवत्सल, तर रावसाहेबांच्या शिष्टमान्य संसाराची दुर्दैवाने घडीच विस्कटलेली. मुधोळकरांनी व्यवहारातली दक्षता पाळून फुकट्यांच्या भल्याची पर्वा करायची नाही तर रावसाहेबांनी विचार न करता धोतर सोडून द्यायचे आणि वर "लोकांनी काय पैसा नाही म्हणून नागवं हिंडायचं का हो !" म्हणून भांडण काढायचे. पण जोडी जमली होती. लोकांच्या तोंडी हरिहर - मुधोळकर अशी जोडनावे होती.

त्या अड्ड्यात शाळा आटपून मिस्किल नाईकमास्तर येत -- गायनक्लासातल्या पोरांना सा-रे-ग-म घोकायला लावून मनसोक्त हसायला आणि हसवायला विजापुरे मास्तर येत -- डॉ. कुलकर्णी -- डॉ. हणमशेठ यांच्यासारखे यशस्वी डॉक्टर येत -- कागलकरबुवा हजिरी लावीत -- पुरुषोत्तम वालावलकरासारखा तरबेज पेटीवाला "रावसाहेब, संगीत नाटकाचे जमवा" म्हणून भुणभुण लावी -- विष्णू केशकामतासारखा जगमित्र चक्कर टाकून जाई -- मधूनच रानकृष्णपंत जोश्यांसारखे धनिक सावकार येत -- बाळासाहेब गुडींसारखे अत्यंत सज्जन पोलीस अधिकारी येत -- मुसाबंधू येऊन चावटपणा करून जात... रात्री नऊनऊ वाजेपर्यंत नेमाने अड्डा भरायचा. पण सगळ्यांत मोठा दंगा रावसाहेबांचा. त्यांचा जिमी नावाचा एक लाडका कुत्रा होता. त्यालाही रावसाहेबांच्या शिव्या कळत असाव्या. तोदेखील "यू यू यू यू" ला जवळ न येता "जिम्या, हिकडं ये की XXच्या " म्हटलं तरच जवळ यायचा.

सिनेमाच्या व्यवसायात रावसाहेबांचे आयुष्य गेले. मॅनेजरीपासून मालकीपर्यंत सिनेमाथेटरांचे सगळे भोग त्यांनी भोगले. पण पंधरापंधरा आठवडे चाललेला सिनेमादेखील कधी आत बसून पाहिला नाही. नाटक आणि संगीत हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय.

कर्नाटकातली वैष्णव ब्राह्मणांची घरे म्हणजे अत्यंत कर्मठ. त्या एकत्र कुटुंबातल्या सोवळ्या-ओवळ्यांच्या तारेवर कसरत करीत पावले टाकायची. त्यातून रावसाहेबांचे वडील म्हणजे नामवंत वकील. वाड्याच्या त्या चौदा चौकड्यांच्या राज्यातली ती त्या काळातल्या बाप नामक रावणाची सार्वभौम सत्ता. पोरे ही मुख्यतः फोडून काढण्यासाठी जन्माला घातलेली असतात, असा एक समज असायचा. नफ्फड बापदेखील आपल्या पोराला सदवर्तनाचे धडे द्यायला हातात छडी घेऊन सदैव सज्ज. इथे तर कर्तबगार बाप. घर सोन्यानाण्याने भरलेले. असल्या ह्या कडेकोट वातावरणात विष्णुसहस्त्रनामाच्या आणि तप्तमुद्रांकित नातलगांच्या पूजापाठांच्या घोषात कृष्णरावांच्या कानी बेळगावच्या थिएटरातल्या नाटकांच्या नांद्यांचे सूर पडले कसे हेच मला नवल वाटते.

(अपुर्ण)..
पुस्तक - गणगोत 
पु.ल. देशपांडे 

संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.