Tuesday, December 26, 2023

पुणेरी 'दुकानदार'

पुणेरी 'दुकानदार' हा अपुणेरी मंडळींच्या टीकेचा आवडता विषय आहे. आर्थिक फायदा हा मुळी पुणेकर दुकानदाराचा मूळ हेतूच नसतो. 'गिन्हाईक' हा आपला निष्कारण वेळ खायला येणारा प्राणी आहे, ह्या तत्त्वावर त्याचा अढळ विश्वास आहे. 'गि-हाइकाचं म्हणणं खरं असतं' हा जागतिक व्यापाऱ्यांचा सिद्धान्त झाला. पण पुणेकर दुकानदाराचा सिद्धान्त, 'दुकानदाराचं म्हणणंच खरं असतं' असा आहे. गि-हाईक पटवण्यापेक्षा कटवण्यातला आनंद त्याला मोलाचा बाटतो. आपण चांगला माल विकतो, ही एक सामाजिक सेवा आहे. ह्या भावनेने तो वागत असतो.

पुणेरी दुकानदाराचा हा स्पष्टवक्तेपणा पुणेकर गिऱ्हाइकालासुद्धा आवडतो. उद्या एखादा मराठी दुकानदार गि-हाइकाशी गोड बोलायला लागला, तर हा आपल्याला नक्की फसवतो आहे, असंच पुणेकर गिऱ्हाइकाला वाटणार! याउलट, 'जिलबी ताजी आहे का?' या प्रश्नाला 'इथं आम्ही शिळ्या विकायला नाही बसलो!' हा जबाब मालाची खातरी पटवून जातो. लबाडीच्या व्यवहाराला उद्धटपणा मानवत नाही. त्यामुळे, 'हॉटेलात गरम काय आहे?' हा प्रश्न वेटरला अस्सल पुणेकर कधी विचारत नाही. कारण पुणेरी हॉटेलातला सगळ्यांत 'गरम' पदार्थ 'हॉटेल मालक' हा असतो हे तो जाणून आहे.

खरं तर मराठी दुकानदारी हा एक संपूर्ण प्रबंधाचा विषय आहे. 'गिऱ्हाईक' कटवण्याचे शंभर सुलभ मार्ग, हा ग्रंथ अजून लिहिला कसा गेला नाही, कोण जाणे !

पु. ल. देशपांडे
पुणे : एक मुक्तचिंतन
पुस्तक -  गाठोडं

हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.

Tuesday, November 28, 2023

बहिणाईचे देणे

बहिणाबाईंच्या काव्याबद्दल मी अभिप्राय काय लिहिणार? जिथे 'झरा मुळचाचि खरा' याचा प्रत्यय येतो, तिथे शब्दांनी त्या अनुभूतींना प्रकट करणे अशक्य असते. 'देख ज्ञानियाच्या राजा/ आदिमाया पान्हावली सर्वाआधी रे/ मुक्ताई पान्हा पीइसनी गेली।' हे बहिणाबाईंनी मुक्ताईसंबंधी म्हटले आहे. तेच मी बहिणाबाईंच्या बाबतीत म्हणेन. 'रुक्मिणीच्या तुलसीदलाने ब्रह्म तुळीयेले' बहिणाईच्या एकेका ओवीला मराठी भावकवितेच्या संदर्भात त्या तुलसीदलाचेच मोल आहे.

कवितेचे दळण घालणारे असंख्य असतात. पण सुखदुःखाच्या जात्याचे दळण मांडून त्यातून कविता देणारी बहिणाई 'मनुष्याणाम् सहस्रेषु' अशी एखादीच. जीवनात अपरिहार्यपणाने येणारे भोग मराठी भाषेच्या इतक्या लडिवाळ स्वरूपात सांगणारी बहिणाई उत्कट वात्सल्याने आम्हाला आंजारीत गोंजारीत, खेळत, हसवत गीताईच सांगून गेली, व्यास- वाल्मिकींच्या विद्यापीठातल्या या दुहितेने त्यांच्या तत्त्वज्ञानाचे मंथन कसे आणि कधी केले, ते बहिणाबाई जाणो आणि तिचे ते जाते जाणो.

जात्यातल्या पिठाच्या भाकरीबरोबर विचारमंथनातून आलेला लोण्याचा गोळा आमच्या हाती ठेवून बहिणाबाई गेली. तो वारंवार चाखावा आणि वयाचा हिशेब विसरून बाळगोपाळ होऊन जीवनसरितेच्या काठी हुतुतु-हमामा घालावा. बहिणाईचे हे देणे आम्ही लेणे म्हणूनच वागवतो.

(पुलंच्या एका पत्रातून )
-आणखी पु.ल.


Saturday, November 18, 2023

मी आणि पु.ल. - (सई ललित)

मी आणि पु.ल आमच्यामधे एक सहृदयतेचा पुल मी दहा बारा वर्षाची असताना बांधला गेलाय.तो एवढा मजबूत आहे की मी मरेपर्यंत तो टिकेलच.पण त्या पुलावरुन माझी मुलं नातवंडं पण आरामात आवडीने जातील .याची खात्री वाटते. कदाचित पुढच्या पिढीचं वाचन कमी होईल.

कारण त्यांची त्रोटक वाचायची सवय डेव्हलप झालीय. मग त्यासाठी पुलंच्या आॕडीओ कॕसेट आहेत.व्हिडीओ आहेत.ते इतके सुंदर आहेत की आपल्याला वेगळ्या काळात खेचून न्यायचं सामर्थ्य त्यांच्या मधे आहे.

मी तर पुल वाचायच्या आधी त्यांच्या कॕसेटच (अलुरकरांच्या ) ऐकल्या होत्या . एवढा प्रसन्न खेळकर चतुर मिस्कील बावळट भासणारा विनोदी माणूस मी पहिल्यांदाच कानांनी बघत होते. मग दहावीला असताना बटाट्याची चाळ मधला एक लेख भ्रमणमंडळ धडा म्हणून अभ्यासाला आला.तो शिकवत असताना (माझी आईच दहावीला मराठी शिकवायची ) आम्ही सर्व जण वर्गात किती हसलो होतो.


माझे बाबा अत्यंत कडक शिस्तीचे होते.सार्वजनिक जीवनात ते दिलखुलास असले तरी घरी बडबड त्यांना चालायची नाही. त्यांनीच नवीन टेपरेकॉर्डर आणि ह्या कॕसेट त्या काळी आणल्या होत्या .ही गोष्ट मला महान आश्चर्याची वाटली होती.आणि बाबा त्यातले विनोद ऐकून उघडपणे हसत होते.ते बघून शोले मधला गब्बरसिंग हसल्यावर जसे बाकीचे दरोडेखोर सावकाशीने घाबरत घाबरत हसतात तसे आम्ही हसलो होतो.हे बघून आईला पण हसु आवरत नव्हतं ! मग हळुहळु भीड चेपत गेली.बाबांना पुल आवडतात म्हटल्यावर पुलं बद्दलचा आदर सहस्त्र पटीने वाढला.कारण पुलं मुळे आम्ही घरात मोठ्याने हसु शकलो.

काॕमेडीचं एक वेगळं दालन कॕसेटच्या रुपात खुलं झालं .( बाय द वे अंध मुलांच्या शाळेत या आॕडीओ कॕसेट लावल्या जातात का ? नसतील तर जरुर लावाव्यात.) अजूनही घरात काही कॕसेटी असतील.पोटात लांबलचक आतडी असलेल्या या कॕसेटी तेव्हा घरोघरी दिसायच्या.मधेच ते आतडं बाहेर पडायचं मग आम्हीच ते सर्जन होवून हिराने नीट आत ढकलायचो. आमची सर्जनशीलता अशी बहराला यायची.

पुलं बरोबरच वपु काळे होते. शिवाजीराव भोसले होते.ते पण ऐकायला आवडायचे.पण पुलंची जादू वेगळीच होती.घरेलु प्रसन्न वातावरण त्यात खेळत असायचं. एकतर त्यांना नेहमी सोताकडे कमीपणा घ्यायची सवय.त्यामुळे चला हा माणूस आपल्या सारखाच आहे.असं तेव्हा वाटायचं .आपुलकी वाढीस लागली होती.आता कळतय ते बावळट नव्हते आणि नाहीत.पण फार व्यवहाराने किंवा काटेकोरपणे जगणे त्यांच्यातल्या माणसाला अवघड जायचं . असं जगून आपण काय साधणार हा त्यांचा साधा विचार असावा.

लबाड, ढोंगी, स्वार्थी ,उथळ ,कद्रु ,दिखावू ,मत्सरी, आपलं तेवढं साधून घेणाऱ्या अति शहाण्या माणसांना ते ओळखून होते. नाही असं नाही.पण त्यांना उघडं पाडणं त्यांच्या जीवावर यायचं. या अर्थाने ते आळशी होते.कारण एकदा वैर पत्करलं की ते झक मारत जोपासत ठेवावं लागतं. डाव प्रतिडाव, शह प्रतिशह लय राबणूक असते. त्यापेक्षा साधी माणूसकी जोपासायला सोपी. हिणकसपणाची कलाकुसर करावी लागत नाही.

शिवाय आपल्या समोर कुणाचा चेहरा पडलाय..किंवा आपल्या मुळे कुणाची मानहानी झालीय , कुणी तोंड फिरवलय ही गोष्ट त्यांना अजिबात रुचायची नाही. या बाबतीत मी अगदी पु.लं.सारखीच आहे.
काही माणसांना मात्र दिवसातून चार माणसांचे तरी धडधडीत अपमान केल्याशिवाय..आणि दहा एक माणसांचे चेहरे पाडल्या शिवाय अन्नच गोड लागत नाही.आणि त्यालाच ती आपली बुध्दीमत्ता समजतात.
ज्याला ज्यात आनंद आहे ते करुदेत. आपण मात्र त्यांच्या पासून लांब राहायचे. कदाचित असल्या माणसांशी डावपेच खेळत राहण्यापेक्षा तो वेळ साहित्य ,नाटक , गाणं बजावणं यात सत्कारणी लावावा असा त्यांचा विचार असावा.
     
पुलंचं आणि माझं एक महत्वाचं साम्य म्हणजे माझे पुढचे दोन दात सेम पुलं सारखे आहेत. आम्हाला खाण्या विषयी असलेली आवड..म्हणजे केवळ पदार्थ खाण्याविषयी नाहीतर पदार्थ करण्याचं जस्ट मनात आल्या पासून ते खिलवण्या पर्यंतचे सर्व प्रकारचे सोपस्कार..वगैरे वगैरे आणि वगैरे.

पुलंना विनोदी लेखन करायला खूप आवडायचं.ते करताना त्यांच्या मनावर कसलाही ताण नसायचा.ते अगदी सहज असायचं .माझं सुध्दा अगदी सेम असं..असं म्हणण्याचा मी महाआगावूपणा करणार नाही. पुलं जबरदस्त परफाॕर्मर होते..हा गुण त्यांना इतर विनोदी लेखकांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो. मला सर्वात जास्त कौतुक वाटतं ते त्यांच्या हार्मोनियम वादनाचं संगीत प्रेमाचं आणि अभ्यासाचं.लहानपणी खूप संगीत ऐकून ऐकून आपोआप अभ्यास झाला असं ते म्हणतात .पण तो नुस्ता अभ्यास नाही..रसिला अभ्यास आहे.अभ्यास म्हटलं की एक प्रकारची रुक्षता निदान मला तरी जाणवते.ती यात दिसत नाही .एका रसिक आनंदाची निर्मळ देवाणघेवाण यात दिसते. वादक लोक न बघता पेटी वाजवतात याचं मला कमालीचं आश्चर्य वाटतं !आम्हाला दोन डोळे सताड उघडे ठेवले तरी धोंडे काय वाजवता येत नाही. त्यात पुल पट्टीचे सुरेल वाजवणारे..!संगीताची आवड ज्ञान आणि त्यांना अवगत असलेली कला यामुळे त्यांना आयुष्याचा आनंद शतपटीने घेता आला.

खरोखरच ही दैवी प्रतिभाच होती. पुलंच्या साहित्याचं जर पारायण केलं तर तत्वज्ञानाची वेगळी पुस्तकं वाचायला नकोत. पुलंची पुस्तकं एक प्रकारे मानसिक समाधान वाढवणारी आहेत. पुलं वाचलेला पचवलेला माणूस आत्महत्या करुच शकत नाही.हे त्यांच्या साहित्याचं सर्वात मोठं योगदान आहे. आणि म्हणून..मानसोपचाराचा भाग म्हणून त्यांची पुस्तकं नियमीत अभ्यासाला लावली पाहिजेत..असं माझं आपलं अभ्यासू मत आहे.

- सई ललित

Wednesday, November 8, 2023

मनोहरी आठवणी - (डॉ. वीरेंद्र ताटके)

सुनीताबाई या पुलंच्या पत्नी म्हणून सर्वाना परिचित होत्याच . मात्र त्या स्वतः सिद्धहस्त लेखिका होत्या . त्यांचे ' आहे मनोहर तरी ' हे पुस्तक मी १९९२ या वर्षी कॉलेजमध्ये शिकत असताना वाचले होते. त्यानंतर त्यांना लिहलेल्या पत्राला त्यांनी लगेच पत्राने उत्तर दिले होते .

पुलंच्या निधनानंतर सुनीताबाई मनाने आणि शरीराने खचल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःचं लिखाण आणि पुलंच्या अप्रकाशित लेखांचं प्रकाशन करण्याचे काम सुरु ठेवलं होतं. त्यानंतर पुलंच्या जन्मदिनी आणि स्मृतीदिनी पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील त्यांच्या घरी जाऊन सुनीताबाईंशी गप्पा मारण्याची अनेकदा संधी मिळाली . प्रत्येकवेळी त्यांनी हसतमुखाने स्वागतच केले.

या जगाचा निरोप घेताना देखील सुनीताबाई मनाला चटका लावून गेल्या. त्या दुर्दैवी दिवशी आकाशवाणीवरील सकाळच्या बातम्यात त्यांच्या निधनाची बातमी सांगितली गेली आणि वैकुंठ येथे सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार असल्याचे कळाले . अनेकजण वैकुंठकडे धावले, परंतु अगदी काही मिनिटं उशीर झाल्यामुळे माझ्याप्रमाणेच अनेकांना सुनीताबाईंचे अंतिम दर्शन झाले नाही .आयुष्यभर वेळेचा काटेकोरपणा पाळलेल्या सुनीताबाईंनी जातानादेखील वेळ अगदी काटेकोरपणे पाळली होती ! वैकुंठभुमीतील त्या अग्नीतून धुराचे लोट हवेत विरत होते…. त्यातील एका उंच जाणाऱ्या नादबद्ध लकेरीकडे पाहत उपस्थितांपैकी पुलंच्या एक ज्येष्ठ नातेवाईक महिला म्हणाल्या, " पोहचली आपली सुनीता पुलंकडे !" सर्वांचेच डोळे पाणावले.

आजही भांडारकर रस्त्यावरून जाताना 'मालती-माधव' इमारतीवरील नीलफलकाकडे पाहून जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात . या दांपत्याने आपल्याला दिलेल्या ' मनोहरी आठवणी ' कायम तशाच राहतील.

- डॉ. वीरेंद्र ताटके

Wednesday, November 1, 2023

वो फिर नही आते...! - (संजीवनी इतक्याल)

आपल्या आयुष्यात काही लोकांचे स्थान अतिशय जवळचे असते. त्यांचा आणि आपला जणू वेगळाच ऋणानुबंध असतो. आपण कधीही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो. आपल्या ज्या गोष्टी कोणाला सांगायला धजावणार नाही अशा गोष्टी त्यांना सांगत असतो. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत असतो. त्यांच्यावर हक्काने रागावत असतो, रुसत असतो.

आपल्याकडे एखादे कार्य असले आणि ते नाही आले तर खूप रुखरुख लागून राहते. सगळे आले आणि कार्यही सुंदर रीतीने पार पडले तरी. आणि त्यांच्याकडे एखादा कार्यक्रम असला आणि आपण नाही जाऊ शकलो तर त्यांनाही असेच वाटते.

पण कधी तरी बोलण्यातून एखादा गैरसमज होतॊ. आपण संतापून किंवा रागावून त्या व्यक्तीला असे काही बोलतो की ती व्यक्ती आपल्याला कायमची दुरावते.

मी मधू गानू यांचं 'सहवास गुणीजनांचा ' हे पुस्तक वाचत असताना "पु ल देशपांडे" यांनी "मधू गानू" यांना लिहिलेलं एक पत्र माझ्या वाचनात आलं. सहसा पु ल गंभीर लिहीत नाहीत. पण हे पत्र मात्र तशा प्रकारचं आहे. हे पत्र वाचताना पुलंच्या हळव्या आणि संवेदनाक्षम मनाचा प्रत्यय येतो. वाचता वाचता नकळत आपणही अंतर्मुख होतो.

या पत्राचं वैशिष्ट्य असं की हे पत्र पुलंनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात लिहिले आहे. त्यात निरवानिरवीची भाषा आहे. इतरांसाठी पुलंनी आणि सुनीताबाईंनी केलेल्या त्यागाचा उल्लेख आहे. त्यामुळे हे पत्र आपल्या घरातीलच कोणी वडीलधाऱ्या माणसाने आपल्याला लिहिलं आहे असं वाटतं.

या पत्राची पार्श्वभूमी थोडक्यात अशी. "मधू गानू" हे पुलंच्या अत्यंत निकटचे. जणू त्यांच्या घरातीलच एक. पण काही कारणाने मधू गानूंचा गैरसमज झाला आणि त्यांनी संतापून पुलंना नको ते लिहिले आणि जणू त्यांच्यातले संबंध तुटणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. या प्रसंगी पुलंनी त्यांना जे पत्र लिहिलं ते अप्रतिम आहे. निमित्त जरी मधू गानूंचं असलं तरी ते तुम्हा आम्हा सर्वांनाच मार्गदर्शक आहे. या पत्रात पुल म्हणतात -

'' ...माणसाने एकदा स्वतःच्या विचारशक्तीचा ताबा रागाच्या स्वाधीन केला की प्रत्येक कृती विपरीत दिसायला लागते. सहानुभूतीपूर्वक, समजूतदारपणे विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते. तू रागावलास, रुसलास, चिडलास तरी हरकत नाही. आपण कोणीच रागलोभ जिंकलेले संतमहंत नाही. पण त्याची परिणीती ' मधू मेला ' अशासारखी वाक्ये लिहिण्यात होऊ नये... तू आमच्या घरी येणार नाही असे म्हटलेस तरी तू जिथे असशील तिथे आम्हाला यावे लागेल. आयुष्यात फारतर एक किंवा दोन माणसे अशी येतात, की जिथे क्षुद्र व्यक्तिगत मानापमानाचे विचार उद्भवण्यापूर्वीच मोडून टाकावे लागतात. अशी स्नेहबंधने फार नसतात. तसे परिचित किंवा मित्रआप्त वगैरे खूप असतात. पण जिथे स्नेहबंधने एकरूपता असते अशी नाती कुठल्या तरी पूर्वयोगाने जमली असावी असे म्हणण्याइतकी दुर्मिळ असतात. सुखदुःखाच्या क्षणी त्यांनी जवळ नसणे हे दुःसह असते. अशा माणसांनी ही अशी आततायी वृत्ती धरून चालत नसते. "

पुल पुढे लिहितात, " हसून खेळून आयुष्यातली दुःखे कमी करीत जगण्याची संधी असताना आपणच आपली आयुष्ये रागाने मलीन करीत असतो. राग येणे आपल्या हाती नसेल पण तो वाढीला न लागू देणे आपल्याच हाती असते. आपल्या अडचणी किंवा दुःखे व्यक्त करायच्या जागा माणसाला फार थोड्या लाभतात. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसे याच त्या जागा... "

असे खूप काही सुंदर या पत्रात आपल्याला वाचायला मिळेल. ज्यांना इच्छा असेल त्यांनी मुळातून वाचावे. जागेच्या आणि वेळेच्या मर्यादेअभावी येथे सर्व लिहिणे शक्य नाही.

पण हे पत्र वाचल्यावर मला "किशोरकुमारने" गायलेलं

'जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम
वो फिर नही आते...'

हे 'आपकी कसम' या चित्रपटातलं गाणं आठवलं. एकदा अशी माणसं दुरावली की ती पुन्हा नाही येणार. म्हणून जपा आपल्या माणसांना जी आपल्यावर जीवापाड प्रेम करतात.

- संजीवनी इतक्याल

Thursday, September 28, 2023

अंगण हा घराचा आरसा

एकदा एका खेडयात गेलो होतो. अंगणात बसलो होतो. सिगरेट काढली. नेहमीप्रमाणे  काडी नव्हती. पाटीलबुवांनी पोराला सांगितलं, "बावच्या आज्जाच्या कोपऱ्यांतून आगपेटी आन्!" आज्जाचा कोपरा! त्या चिमण्या घरातल्या एका कोपऱ्यात वर्षानुवर्षं म्हातारा आज्जा तरट टाकून बसायचा. त्यामुळं तो कोपरा आज्जाचा होता. आता आज्जा गेल्याला धा वर्स झाली तरी तो आज्जाचा कोपरा!

धोबी आणि तलाव दोघेही गेले तरी धोबीतलाव राहिला आहे तसा! अचेतनाला अशी सचेतनाच्या आठवणींची संगत असली की, लाकूड दगड-विटाही बोलक्या होतात. म्हणून मला 'नाना पेठ' म्हणणारांपेक्षा 'नानाची पेठ' म्हणणारी माणसं आवडतात. अजूनही पुण्यात 'शाळूकर बोळ' म्हणण्याऐवजी 'शाळूकराचा बोळ म्हणणारी माणसं भेटली शिवाजीनगरला भांबुर्ड म्हणणारे भेटले किंवा मुंबईच्या पाली हिलला, 'मोतमावली' म्हटलेलं आढळलं आणि सायनला, 'शीव' म्हणणारा दिसला की, माणूस माझ्या गोत्रातला वाटतो. मामंजी जाऊन पंचवीस वर्षं झाली तरी खोली मामंजींचीच झाली पाहिजे. बाप्पांच्या ओटीला बाप्पाचे पाय लागून दहा वर्ष होऊन गेली असतील, पण ती बाप्पांची ओटी! मग त्या ओटीला इतिहास येतो. तिथल्या आरामखुर्चीवर एकदम बसवत नाही. जस्ती काड्यांचा चष्मा लावून 'बलवंतराव म्हणजे अजब बुद्धीचा माणूस' म्हणणारे आणि पंचावन्नाव्या खेपेला 'गीतारहस्या'चं पारायण करणारे बाप्पा दिसतात आणि मग त्या खुर्चीवर बसून पुष्ट नितंबांचं वर्णन करणारी कथा वाचायला मासिक उघडायचं धैर्य नाही होत. मागली भिंतदेखील जस्ती काड्यांचा चष्मा लावून, "बघू रे, काय वाचतोस ते-" असं म्हणेल की, काय अशी भीती वाटायला लागते.

मुख्य म्हणजे असल्या घरांना अंगण असतं. अंगण हा घराचा आरसा आहे. आरश्यासारखं लख्ख सावरलेलं असतं म्हणून नव्हे. घरातलं कुटुंब किती नांदतय किती गाजतंय ते अंगणात पाहून घ्यावं. वयाची अदब सांभाळत पांडवासारखे बसलेले कर्ते मुलगे, माहेरवाशिणी, एकदोन पोक्त्यपूर्वतया आणि गुढग्यावर लुटलुटत अंगणपालथं घालणाऱ्या गुंड्यापासून ते दारीच्या आंब्यावर झोके काढणाऱ्या नातवंडांच्या संख्येवरून ते सारं घर पारखता येतं. 'अस्स अंगण सुरेख बाई' म्हणतात ते हेच! हे अंगण लखलखतं ते वडीलमंडळीविषयीच्या आदरातून, लेकी सुनांच्या गळ्यातल्या मण्यातून, आजी मावशीच्या लाडांतून आणि उघड्याबंब शरीराची लाज न बाळगता बसलेल्या तगड्या मुलांच्या गप्पातून! संसारातील सारी सुखं दुःख दारच्या प्राजक्तासारखी त्या अंगणात सांडलेली असतात. ती वेचत ही बैठक बसलेली असते.

- (अपूर्ण ) 
हि घरं ती घरं (पुरचुंडी)
हा लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा .

Sunday, September 17, 2023

लोकशाहीत विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत

महाराष्ट्र शासनातर्फे पु.लं.ना 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार देण्यात आला. दिनांक २० फेब्रुवारी १९९८ रोजी ह्या पुरस्काराच्या वितरण समारंभाला पु.ल. उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांचे भाषण सौ. सुनीताबाईंनी वाचून दाखवले.
 
'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार वितरण समारंभाला आलेल्या आणि माझ्याविषयी आपुलकी बाळगणाऱ्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या प्रसंगी तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे माझे 'चार शब्द' स्वतः बोलण्याची माझी इच्छा होती, पण प्रकृतीच्या कारणाने माझ्याऐवजी सुनीता ते तुम्हांला वाचून दाखवील.

माझ्या अगणित मराठी बांधवांकडून लाभलेला हा पुरस्कार त्यांच्या मनातल्या माझ्यावरच्या प्रेमाचं एक विराट दर्शन मला घडवतो. इतक्या प्रचंड संख्येनी समाजानी मला आपला माणूस आहे म्हणणं, हा शब्दातीत गौव आहे. हा गौरव लेखन-वाचन-संगीत-नाट्य इत्यादी कलांद्वारे या उदार मनाच्या रसिकांशी माझा जो संवाद साधला गेला त्याकरता आहे, असं मी मानतो. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला माझ्यापाशी शब्द नाहीत.

गोविंदाग्रजांनी या महाराष्ट्राचं वर्णन,

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा


अशा यथार्थ शब्दांत केलं आहे. माझ्या सुदैवाने या महाराष्ट्रानी स्वतःच्या 'नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, ' या वर्णनाला साजेल असं दर्शन मला घडवलं आहे. माझ्या वाट्याला अधिक करून ही जी फुलंच येत गेली, स्वाबद्दल मी कृतज्ञ आहे.

माझ्या आयुष्याचं हे अखेरचं पर्व आहे. अशा वेळी मन काहीस निवृत्त होत जातं. जीवनग्रंथाच्या या अखेरच्या पर्वात अनुभवाला येणारी निवृत्ती ही सत्प्रवृत्तीइतकीच लोभस असते. आमचे कवी बा. भ. बोरकर यांनी आपल्या एका कवितेत म्हटलं आहे :
 
विझवून दीप सारे, मी चाललो निजाया
इथल्या अशाश्वताची, आता मला न माया


इथल्या अशाश्वताची माया बाळगू नये हे खरं, पण इथेही या अशाश्वताच्या आत दडलेल्या शाश्वताची जाणीव असली की जीवन हा आनंदोत्सव होतो. अगणित लोकांनी एकत्र येऊन केलेला माझा हा सन्मान हाही आनंदोत्सवच आहे.

या समारंभाचं आयोजन महाराष्ट्र राज्य शासनानं केलेलं आहे. अलीकडे राज्य-राजकारण-राज्यशासन-राजकीय पक्ष वगैरे शब्द भ्रष्टाचार-गुंडगिरी- खुनाखुनी-जाळपोळ यांना पर्यायी शब्द झाल्यासारखी अवस्था झाली आहे. 'बहुजन हिताय ! बहुजन सुखाय!' हे आपल्या देशाचं बोधवचन, पण प्रत्यक्षात मात्र फार विपरीत असं पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतं. उच्चार आणि आचार यांच्यात तफावत पडताना दिसली की जीवनातल्या चांगलेपणावरचा विश्वासच उडत जातो. 'निराशेचा गाव आंदण आम्हांसी' ही संत तुकोबाची ओळ पुनःपुन्हा आठवायला लागते. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा तर आनंदाचा अनुभव देणारी निर्मिती करण्यातला उत्साहच नाहीसा होतो. आपल्या मताला अनुसरून लिहिण्याच, बोलण्याचं स्वातंत्र्य ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. आपण सतत लोकशाही, जनमानस, जनतेचा कौल वगैरेबद्दल बोलत असतो. या सगळ्याच्या मुळाशी विचार, उच्चार आणि आचार या गोष्टींचं स्वातंत्र्य या कल्पना आहेत. लोकशाहीच्या राज्यात तर लोकांच्या हितासाठी मांडलेला विचार सत्ताधीशांना मानवला नाही, तरी सत्य लोकांपुढे आणलंच पाहिजे, असा आग्रह धरणारे विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत. आपल्याला न पटलेला एखादा विचार सत्ताबळाने दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगतिक करतात.

वयाच्या अखेरच्या टप्प्यात मला सर्वांत अधिक अस्वस्थ करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे योग्य मुद्द्यांनी सिद्ध करण्याची घटना गुद्द्यांनी दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीचा वाढता जोर ही आहे. विचारस्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरावा करीत आलो आहे. अशा वेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा 'लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो' वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू? 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' ही संत तुकोबाची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते.

(अपूर्ण )
पुस्तक - पाचामुखी

हे भाषण पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.

Wednesday, July 26, 2023

नारायण

प्रकाशन - मौज प्रकाशन गृह.

मुळ स्त्रोत - विकिपीडिया

नारायण
"नारायण, पानाचं तबक कुठे आहे ?"
"नारायण, मंगळसूत्र येणार आहे ना वेळेवर ---"
"नारायण, बॅण्ड्वाले अजून नाही आले ? -- काय हे?"
"नारायण, गुलाबपाण्याची बाटली फुटली ---"
"नारूकाका चड्डीची नाडी बांद ना ऽऽ ---"
"नारूभावजी, ही नथ ठेवून द्या तुमच्याजवळ. रात्री वरातीच्या वेळी घेईन मी मागून ---"
"नाऱ्या लेका, वर चहा नाही आला अजून ---व्य़ाही पेटलाय !"
"नारबा पटकन तीन टांगे सांगा ---"
पन्नास ठिकाणाहून पन्नास तऱ्हेचे हुकूम येतात आणि लग्नाच्या मांडवात हा नारायण हे हल्ले अत्यंत शिताफीने परत करीत उभा राहतॊ.
'नारायण' हा एक सार्वजनिक नमुना आहे. हा नमुना प्रत्येक कुटुंबात असतॊ. कुठल्याही समारंभाला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला हा प्रत्येकाचा कुठून-ना-कुठून-तरी नातें लागणारा नातलग घरातं कार्य निघाले की कसा वेळेवर टपकतॊ .
---ज्या दिवशी मुलगी पाह्यला म्हणून मंडळी येतात --- मंडळी म्हणजे मुलाचे आईबाप, दूरचे काका (हे काका दूरचे असून नेमके या वेळेला इतक्या जवळचे कसे होतात हे एक न सुटलेले कौटुंबिक कोडें आहे.),

नवरा मुलगा आणि मुलाचा मित्र. ह्या मंडळीत आठनऊ वर्षाची एखादी जादा चुणचुणीत मुलगीहि असते. आणि मग तिच्या हुषारीचं मुलीकडील मंडळी बरंच कौतुकहि करतात. मुलीचा बाप मुलाच्या बापाशी बोलत असतो. नवरा मुलगा गप्पच असतो. नवऱ्यामुलाकरून चा मित्र समोरच्या बिऱ्हाडातून जरासा पडदा बाजूला करून पहाणाऱ्या चेहऱ्यावर नजर ठेऊन असतो. आंतल्या भावी विहिणी आपापल्या घराण्यांची सरळ वळणे एकमेकींवर ठसवत असतात. मुलगा अगर मुलगी सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! -- कारण 'वळण' म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ?

भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे. नवरी मुलगी नम्रतेची पराकाष्ठा करीत बसलेली असते. तिच्या कपाळावरचे धर्मबिंदु टिपण्यांत तिच्या बहिणी वा मैत्रिणी दंग असतात. आणि ती आठनऊ वर्षाची 'कल्पना', 'अर्पिता' किंवा कपर्दिका असल्या चालू फ़ेशनच्या नांवाची मुलगी कपाट उघडून त्यातल्या पुस्तकात डोके खुपसून, 'अगबाई ! वाचायची इतकी का आवड आहे ?' हे कौतुक ऎकत बसलेली असते. ती चहा नको म्हणते -- बिस्कीटाला हात लावत नाही -- लाडू 'मला नाही आवडत' म्हणते; एकूण स्वत:च बरंचसं 'कौतिक' करून घेते. ' कार्टीच्या एक ठेवून द्यावी' असा एक विचार मुलीच्या आईच्या डोक्यात येतो आणि 'भारीच लाडोबा करून ठेवलेला दिसतोय' हा विचार नवऱ्यामुलीलाही शिवून जातो.

एकूण ही सर्व मंडळी निरनिराळ्या विंचारात दंग असतां एका इसमाकडे मात्र त्यावेळी कोणाचेच विषेश लक्श जात नाही. सुरवातीला मुलाच्या बापाने 'हा आमचा नारायण' एवढीच माफक ओळख करून दिलेली असते. आणि 'नारायण' संस्था ह्याहून अधिक योग्यतेची असते असेही नाही. नारायण ही काय वस्तू आहे हे मांडव उभा राहील्याशिवाय कळू शकत नाही.हे सर्व नारायण लोक खाकी सदरा दोन खिशांचा घालतात. खाली मळकट पण काचा मारलेले धोतर नेसतात. मागल्या बाजूने मुलाण्याच्या कोंबड्या ठेवायच्या पेटाऱ्यासारखा ह्यांच्या धोतराचा सायकलच्या सीट मधे अडकून-निसटून बोंगा झालेला असतो. धोतराची कमालमर्यादा गुडघ्याखाली चारपाच बोटें गेलेली असते. डोक्याला ब्राउन टोपी असते. खाकी, ब्राउन वगैरे मळखाऊ रंग 'नारायण-लोकांना' फार आवडतात. वहाण घेताना कशी होती हें सांगणे मुष्किल असते. कारण तीचा अंगठा, वादी, पट्टा, हील, सगळे काही बदलत बदलत कायापालट होत आलेला असतो. परंतु उजव्या पायाचा आंगठा उडलेला असला म्हणजे नारायणला विषेश शोभा येते. आमचा नारायण सहसा कोट घालत नाही. एकदा स्वत:च्या लग्नात, एकदा दुसऱ्यासाठी मुलगी पहायला जाताना आणि एकदा मुन्सिपाल्टीत चिकटवून घेतलेल्या सदूभाऊंना कचेरींत भेटायला गेला त्यावेळी त्याने कोट घातलेला होता. घरोघरचे नारायण, कोट असा सणासुदीलाच घालतात. कोटाच्या कॉलरला मात्र ते न चुकता सेफ्टीपिन लावतात. ही दात कोरायला अगर वेळप्रसंगी कोणाच्या पायात काटा रूतला तर काढायला उपयोगी पडते. खाकी सदऱ्याच्या मात्र दोन्ही खिशात डायऱ्या, रेल्वेचे टाईमटेबल, प्रसंगी छोटेसे पंचांग देखील असते. मुलगी पसंत झाली, हुंडा, करणी, मानपानाचें बसल्या बैठकीला जमले की मुहुर्ताची बोलणी सुरू होतात आणि गाडे पंचांगावर अडते. आणि इथे नारायण पुढे सरसावतो.
"हे पंचांग ---" नारायण कोटाच्या खिशांतून पंचांग काढीत पुढे येतो.वा !! कृतज्ञ चेहऱ्याने वधूपीता नारायणाकडे पहातो.

इथून नारायणाची किंमत लोकांना कळायला लागते. आंतल्या बायकाही प्रसंगावधानी नारायणाचे कौतुक केल्याच्या चेहऱ्याने पाहतात. नारायणाचे कुठेच लक्ष नसते. इथून त्याची चक्रे सुरू होतात. एकदा मुहूर्त ठरला की लग्न लागून वरात निघेपर्यंत नारायणाशिवाय पान हलत नाही ! आता चारी दिशांनी त्याच्यावर जबाबदाऱ्या पडत असतात आणि नारायण त्यांना तोंड देत असतो. प्रत्येक गोष्टीत "नारायणाला घ्या हो बरोबर" असा आग्रह होत असतो."मी सांगतो तुम्हाला, शालू भड्सावळ्यांच्या दुकानाइतके स्वस्त दुसरे कुठे मिळणार नाहीत." सुमारे आठनऊ निरनिराळ्या वयाच्या (आणि आकाराच्या) बायकांसह नारायण खरेदीला निघतो. सातआठ पिशव्या त्याच्याच हातात असतात. एका बाई बरोबर कापड खरेदी करणें म्हणजे मन:शांतीची कसोटी असते; पण नारायण आठ बायकांसमवेत निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्याची चढउतर अत्यंत उत्साहाने करू शकतो. त्यातून त्यांना बस मध्ये आपण क्यूच्या शेवटी राहून चढवणे-उतरवणे ही स्वतंत्र कर्तबगारी असते. पण नारायणाला त्याची पर्वा नाही. आता त्याच्या डोक्याने लग्न घेतले आहे. कचेरींत त्याचें लक्ष नाही. (तिथे क्वचितच लक्ष असतें परंतु ती उणीव हेडक्लार्कच्या घरी चक्का पुरवणें, मटार वाहून नेणे इत्यादी कामांनी भरून निघते.) एखाद्याच्या अंगात खून चढतो तसे नारायणाच्या अंगांत लग्न चढतें."काकू तुम्ही माझ ऎका, महेश्वरी लुगड्यांचा स्टॉक द्रौपदी वस्त्रभांडारात आहे. इथे फक्त तुम्ही खण निवडा." मालकाच्या तोंडासमोर ही वाक्ये बोलायचे त्याला धैर्य आहे. बोहोरी आळीपासून लोणार आळीपर्यंत पुण्यात कोठे काय मिळते याची नारायण ही खाकी शर्ट, धोतर, ब्राउन टोपी घातलेली चालती बोलती जंत्री आहे."बरं बाबा ---" काकू शरणचिठ्ठी देतात."
मामी ----- काकूंना खण पाहू दे, तोंपर्यंत नरहरशेटच्या दुकानात जाऊन मंगळसूत्राचे नमुने बघून येऊ---""हो आंगठीच ही माप आणलय जावईबुवांच्या ---"
"आंगठी नरहरशेटकडे नको, रामलाल लखनमलकडे आंगठी टाकूं. मी काल बोललोय त्याला. आज माप टाकलं की पुढल्या सोमवारी आंगठी --- सोनं पुढल्या तीन दिवसांत वाढतंय (ते ही त्याला ठाऊक आहे.) आज सोन्याची खरेदी होऊं द्या --- चला." निमूटपणे मामी आणि भाचीच्या लग्नासाठी आलेल्या बेळगावच्या मावशी नारायणामागून निघतात. गल्ली-बोळातून वाट काढीत त्यांना नरहरशेटजींच्या दुकानी नारायण नेतो."आंगठीचंही इथंच .... म्हणत होते" ----- अशी कुजबुज करण्याचा मामी प्रयत्न करतात. पण नारायण ऎकायला तयार नाही."मी सांगतो ऎका --- हं नरहरशेट, मंगळसूत्र केव्हा न्यायला येऊ ---""चारपाच दिवसात या --""हें असं अर्धवट नको -- नक्की तारीख सांगा -- मला सतरा हेलपाटे मारायला सवड नाही ---" नारायण सोनारदादांना सणसणीत दम भरतो. एरवी त्याला कुत्र्याला देखील 'हाड' म्हणायची ताकद नसते. पण इथे अपील नाही. आता लग्न उभे राहिले आहे. आणि ते यथास्थित पार पाडणे हें त्याचे कर्तव्य आहे -- त्याच्यावर जबाबदारी आहे. गेल्या चार दिवसात त्याला दाढीला सवड नाही त्याला --- चार तांबे अंगावर टाकून सटकतो तो हल्ली. मंगळसूत्राची ऑर्डर दिल्यानंतर मोर्चा परत कापडदुकानी येतो. तिथे अजून मनासारखे खण सापडलेले नाहीत --- नारायण डगमगत नाही."
काकू -- मी सांगतो --- हं हे घ्या पंचवीस -- ह्यांतले निवडा आठ -- हे चार जरीचे -- हा मुलीच्या सासूला होईल ---"
"पण गर्भरेशमी असता तर --"
"काय करायचाय म्हातारीला गर्भरेशमी ?--"
सर्व बायका शत्रुपक्षाच्या पुढारी बाईची चेष्टा ऎकून मनसोक्त हसतात.
"झालं --- हे साधे घेऊन ठेवा -- एक बारा --"
"बारा काय करायचे आहेत ?" काकू शंका काढतात."लागतात -- लग्न आहे सोमवारी.
त्या दिवशी बाजार बंद --- आयत्या वेळी खण काय, सुतळी मिळायची नाही वीतभर --
" नारायणाच्या दूरदर्शी धोरणाचें कौतुक होतें."हे बरीक खरं हो ! ---" कापडाचोपडाच्या खरेदीला आलेल्या घोळक्यांतली एक आत्या उद्गारते. "आमच्या वारूच्या लग्नात आठवतं ना रे नारू, विहीणबाई आयत्या वेळी अडून बसल्या नवऱ्या मुलाला हातरूमाल हवेत म्हणून -- सगळा बाजार बंद, मग नारायणानंच आणले बाई कुठूनसे," नारायण फुलतो."
क्यांपापर्यंत सायकल हाणत गेलो आणि डझनाचं बाक्स आणून आदळलं मी वारूच्या नवऱ्यापुढे --- पूस म्हटलं लेका किती नाक पुसतोस ह्या हातरूमालांनी तें ! हां ! तसा डरत नाही -- पण मी म्हणतो, आधीपासून तयारी हवी --- काय गुजामावशी ? "
"गुजामावशी आपलंही मत्त आगदी नारायणासारखंच आहे असं सांगतात आणि बारा खणांची आयत्या वेंळी असूं द्या म्हणून खरेदी होते ---"खरंच बाई पंचे घ्यायला हवे होते---"
"पंचांचं मी बघतो---तुम्ही ही बायकांची खरेदी पाहा----हां ! खण झाले, शालू झाले, आता अहेराची लुगडी---चला पळसुले आणि मंडळीत---"
"पळसुल्याकडे का जायचं ? मी म्हणत होतें जातांजातां सरमळकरांच्या दुकानी जाऊं----सरलच्या लग्नांत तिथनंच घेतलीं होतीं लुगडीं---"
"त्यावेळीं थोरले सरमळकर जीवंत होते मामी----चार वर्षांपूर्वी वारले ते---चिरंजीवांनी धंद्याचा चुथडा केला---आता आहे काय त्यांच्या दुकानात ? पोलक्याचीं छिटंदेखील नाहीत धड--"एकूण नारायणाला फक्त दुकानांची माहिती आहे असं नाही. त्याला दुकानदारांची आर्थिक-कौटुंबिक परिस्थितीहि ठाऊक असते."बरं अत्तरदाणी----आणि चांदीचं ताट अन वाटी---"मामींना ह्यापुढले वाक्य पुरेंहि न करू देतां नारायण ऒरडतो,"चांदीचा माल शेवटीं पाहूं---आधी कापडाचोपडाचं बघा. नमस्कार---"नमस्कार 'पळसुले आणि मंडळी, कापडाचे व्यापारी, आमचे दुकानी इंदुरी, महेश्वरी इ. इ.' यांना उद्देशून केलेला असतो."नमस्कार, या नारायणराव----"

"हं काकू, मामी, पटापट पाहून घ्या लुगडीं---"
" नारायण कंपनी कमांडरच्या थाटांत हुकूम सोडतो."अरे ह्यांना लुगडी दाखवा--"
"आमच्या मामेबहिणीचं लग्न आहे !"
"हो का ?" पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. "तुमचे मामा म्हणजे .."
"भाऊसाहेब पेंडसे----रिटायर्ड सबडिविजनल ऑफिसर---"
"बरं बरं बरं ! त्यांच्या का मुलीचं लग्न ?---" वास्तविक पळसुले आणि मंडळींच्या लक्षात कोण भाऊसाहेब काय भाऊसाहेब कांहीही आलेलें नाही, पण
"अरे माधव, त्यांना तो परवा नवा नागपुरी स्टॉक आलायं तो दाखव, " असे सांगून पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात. बायका 'ह्या नारायणाची जाईल तिथे ओळख' ह्या कौतुकित चेहेऱ्यानीं नारायणाकडे पाहतात. नारायण पळसुले आणि मंडळींकडून तपकिरीची डबी घेऊन चिमूटभर तपकीर कोंबून आपली सलगी सिद्ध करतो."हं शालूबिलूची झाली का खरेदी ?"
"होतेय" ----नारायण पलीकडल्या दुकानात शालू खरेदी केल्याची दाद लागून देत नाही.तात्पर्य खरेदी संपते आणि निमंत्रणपत्रिकांचा विचार सुरू होतो. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अथवा तीनही भाषांमधून पत्रिका काढायचे ठरतं असते.

"इंग्रजी कशाला ?" नारायणाचा देशाभिमान जागृत होतो. शिवाय इंग्रजापेक्षा इंग्रजीवर त्याचा राग विशेष आहे. ह्या इंग्रजीच्या पेपरानेच मॅट्रिकच्या परीक्षेंत त्याला सारखे धक्के दिले होते ! वधूवरांचे फोटो द्यायचे की नाही---खाली 'आपले नम्र' ह्यांत कोणाकोणाची नावे घालायची--- छापखाना कुठला, टाईप कुठला, शाई कुठली, सारें सारें काही नारायण ठरवतो आणि बाकीचे निमूट्पणे ऎकतात."उद्या संध्याकाळी प्रुफें येतील ! नीट तपासा नाहीतर त्या अण्णूच्या लग्नांत झाली तशी भानगड नको व्हायला---"
"कसली भानगड ?" स्त्रीवर्गाकडून पृच्छा होते. धोतराने टोपींतल्या पट्टीवरचा घाम पुसत नारायण प्रत्येक लग्नांत सांगितलेली विनोदी गोष्ट पुन्हा सांगतो."अहो काय सांगू काकू---" ( ह्या काकू म्हणजे कापडखरेदीला गेलेल्या काकू नव्हेत----त्या येवल्याच्या काकू---- ह्या अंतूच्या काकू !) काकू कौतुकाने कानावरचा पदर कानामागे टाकून ऎंकू लागतात. "अहो अण्णू आपला----"" म्हणजे भीमीचा भाचा ना----ठाऊक आहे कीं---धांद्रटच आहे मेलं तें एक---" काकू कारण नसताना अण्णूला धांद्रट ठरवतात."तेच ते ! अहो त्याचं तिगस्त सालीं लग्न झालं---"
"अरे जानोरीकरांची मेहुणी दिलीय त्याला---" कुणीतरी एखाद्या प्रभाताई उद्गारतात."हें तूं सांगतेस मला ? ----- मी स्वत: ठरवलं लग्न ! मुलगी काळी आहे म्हणून नको म्हणत होता अण्णू कानाला धरला आणि उभा केला बोहल्यावर ! --- तर मजा काय सांगत होतो---त्याच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका त्यांनी छापून घेतल्या गोणेश्वर प्रेसमध्ये--- मी म्हणत होतों आमच्या हरिभाऊंच्या ज्ञानमार्ग मुद्रणालयांत घ्या--- पण नाही ऎकलं माझं--- मी म्हटलं मरा---"
"अय्या !" 'अय्या'च्या वयाची कोणी तरी मुलगी 'मरा' ह्या शब्दानं दचकून ओरडली."अय्या काय ?----भितो काय मी ?" नारायणाला अवसान येते. मी त्याला वार्न केलं होतं की, गोणेश्वर छापखाना म्हणजे नाटकसिनेमाचीं तिकिटं आणि तमाशाची हँडबिल छापणारा----तो निमंत्रणपत्रिका छापणार काय डोंबल? पण नाही---आणि तुला सांगलो काकू, पत्रिका छापून आल्या नि जोड्यानं मारल्यासारखी बसली मंडळी---""म्हणजे ?""सांगतो ! " नीरगाठं-उकलीच्या तंत्राने नारायण कथा सांगतो."---पत्रिका आल्या बरं का----पोष्टांत पडल्या----मी आपली सहज पत्रिका उघडून पहातों तर पत्रिकेच्या खाली 'वडील मंडळींच्या निमंत्रणास मान देऊन अवश्य येणेचे करावें' असं असतं की नाही ? तिथं 'तिकीटविक्री चालू आहे' ही ओळ छापलेली---"सर्व बायका मनमुराद हसतात----"जळ्ळं मेल्याचं लक्षण ! अरे लग्न म्हणजे काय शिनिमा वाटला की काय तुझ्या गोणेश्वराला---"
"सारांश काय ? पत्रिका उद्या येतील त्या नीट तपासा----नाहीतर एक म्हणतां एक व्हायचं चला मी निघतो."

(अपूर्ण)
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.

Privacy Policy

Privacy Policy for पु. ल. प्रेम

At पु. ल. प्रेम , accessible from https://cooldeepak.blogspot.com, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by पु. ल. प्रेम and how we use it.

If you have additional questions or require more information about our Privacy Policy, do not hesitate to contact us.

This Privacy Policy applies only to our online activities and is valid for visitors to our website with regards to the information that they shared and/or collect in पु. ल. प्रेम . This policy is not applicable to any information collected offline or via channels other than this website.

Consent

By using our website, you hereby consent to our Privacy Policy and agree to its terms.

Information we collect

The personal information that you are asked to provide, and the reasons why you are asked to provide it, will be made clear to you at the point we ask you to provide your personal information.

If you contact us directly, we may receive additional information about you such as your name, email address, phone number, the contents of the message and/or attachments you may send us, and any other information you may choose to provide.

When you register for an Account, we may ask for your contact information, including items such as name and email address.

How we use your information

We use the information we collect in various ways, including to:

  • Provide, operate, and maintain our website
  • Improve, personalize, and expand our website
  • Understand and analyze how you use our website
  • Develop new products, services, features, and functionality
  • Communicate with you, either directly or through one of our partners, including for customer service, to provide you with updates and other information relating to the website, and for marketing and promotional purposes
  • Send you emails
  • Find and prevent fraud

Log Files

पु. ल. प्रेम follows a standard procedure of using log files. These files log visitors when they visit websites. All hosting companies do this and a part of hosting services' analytics. The information collected by log files include internet protocol (IP) addresses, browser type, Internet Service Provider (ISP), date and time stamp, referring/exit pages, and possibly the number of clicks. These are not linked to any information that is personally identifiable. The purpose of the information is for analyzing trends, administering the site, tracking users' movement on the website, and gathering demographic information.

Cookies and Web Beacons

Like any other website, पु. ल. प्रेम uses "cookies". These cookies are used to store information including visitors' preferences, and the pages on the website that the visitor accessed or visited. The information is used to optimize the users' experience by customizing our web page content based on visitors' browser type and/or other information.

Google DoubleClick DART Cookie

Google is one of a third-party vendor on our site. It also uses cookies, known as DART cookies, to serve ads to our site visitors based upon their visit to www.website.com and other sites on the internet. However, visitors may choose to decline the use of DART cookies by visiting the Google ad and content network Privacy Policy at the following URL – https://policies.google.com/technologies/ads

Advertising Partners Privacy Policies

You may consult this list to find the Privacy Policy for each of the advertising partners of पु. ल. प्रेम .

Third-party ad servers or ad networks uses technologies like cookies, JavaScript, or Web Beacons that are used in their respective advertisements and links that appear on पु. ल. प्रेम , which are sent directly to users' browser. They automatically receive your IP address when this occurs. These technologies are used to measure the effectiveness of their advertising campaigns and/or to personalize the advertising content that you see on websites that you visit.

Note that पु. ल. प्रेम has no access to or control over these cookies that are used by third-party advertisers.

Third Party Privacy Policies

पु. ल. प्रेम 's Privacy Policy does not apply to other advertisers or websites. Thus, we are advising you to consult the respective Privacy Policies of these third-party ad servers for more detailed information. It may include their practices and instructions about how to opt-out of certain options.

You can choose to disable cookies through your individual browser options. To know more detailed information about cookie management with specific web browsers, it can be found at the browsers' respective websites.

CCPA Privacy Rights (Do Not Sell My Personal Information)

Under the CCPA, among other rights, California consumers have the right to:

Request that a business that collects a consumer's personal data disclose the categories and specific pieces of personal data that a business has collected about consumers.

Request that a business delete any personal data about the consumer that a business has collected.

Request that a business that sells a consumer's personal data, not sell the consumer's personal data.

If you make a request, we have one month to respond to you. If you would like to exercise any of these rights, please contact us.

GDPR Data Protection Rights

We would like to make sure you are fully aware of all of your data protection rights. Every user is entitled to the following:

The right to access – You have the right to request copies of your personal data. We may charge you a small fee for this service.

The right to rectification – You have the right to request that we correct any information you believe is inaccurate. You also have the right to request that we complete the information you believe is incomplete.

The right to erasure – You have the right to request that we erase your personal data, under certain conditions.

The right to restrict processing – You have the right to request that we restrict the processing of your personal data, under certain conditions.

The right to object to processing – You have the right to object to our processing of your personal data, under certain conditions.

The right to data portability – You have the right to request that we transfer the data that we have collected to another organization, or directly to you, under certain conditions.

If you make a request, we have one month to respond to you. If you would like to exercise any of these rights, please contact us.

Children's Information

Another part of our priority is adding protection for children while using the internet. We encourage parents and guardians to observe, participate in, and/or monitor and guide their online activity.

पु. ल. प्रेम does not knowingly collect any Personal Identifiable Information from children under the age of 13. If you think that your child provided this kind of information on our website, we strongly encourage you to contact us immediately and we will do our best efforts to promptly remove such information from our records.

Changes to This Privacy Policy

We may update our Privacy Policy from time to time. Thus, we advise you to review this page periodically for any changes. We will notify you of any changes by posting the new Privacy Policy on this page. These changes are effective immediately, after they are posted on this page.

Our Privacy Policy was created with the help of the Privacy Policy Generator.

Contact Us

If you have any questions or suggestions about our Privacy Policy, do not hesitate to contact us at pulapremblog@gmail.com

Monday, June 12, 2023

पहिला पाऊस

उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडला ती तापलेली माती जी गंध घेऊन उठते त्याला तोड नाही. एका खोलीत बसून तो घ्यायचा नसतो. तो अनपेक्षित रीतीने यावा लागतो आणि तो वास घेताना उघड्यावर जाऊन तृप्त धरतीची तृप्तीही डोळे भरून पहावी लागते. उन्मत्त ढगातून वीज खेळायला लागल्यावर तिचा संचार तरुण शरीरातही व्हावा यात काय आश्चर्य? त्या जलधारात न्हाऊन निघालेल्या ललनांच्या स्वखुषीने प्रियकरांना दिलेल्या आलिंगनांच्या स्मरणानं चारुदत्तालाच काय पण कुणालाही, "तेचि पुरुष दैवाचे" असंच म्हणावसं वाटणार.

पहिला पाऊस आणि इंद्रधनुष्य पाहण्याची उत्सुकता कधी संपू नये. रस्त्यातून बँड वाजत निघालेला पहायची हौस संपली की बालपण संपलं असं समजावं आणि पाऊस आणि इंद्रधनुष्य पहायची हौस खतम झाली की आपण जिवंत असूनही खतम झालो असं समजावं. पाणी आणि गाणी यांचा संबंध नुसता यमकापुरता नाही. पाण्याने तहान भागते आणि गाण्याने श्रम हलके होतात. ही झाली नुसती उपयुक्तता. पण माणसाच्या जीवनाला उपयुक्ततेपलीकडचंही एक परिमाण आहे. म्हणूनच पाऊस कल्पनेच्या वेलींनाही फुले आणतो.

वर्षातला पहिला पाऊस आजही मला शाळकरी वयात घेऊन जातो. जून महिन्यातल्या पावसाच्या आठवणी जडल्या आहेत त्या नव्या छत्रीवर पडलेल्या पाण्याच्या वासाशी, नव्या क्रमिक पुस्तकांच्या वासाशी, कोवळ्या टाकळ्याच्या भाजीशी, उन्हाळ्यात फुटलेले घामोळे घालवायला पहिल्या पावसात भिजायला मिळालेल्या आईच्या परवानगीशी, रस्त्यातली गटारे तुडुंब भरून वाहू लागल्यावर त्यात लाकडाची फळकुटे टाकून त्याचा प्रवास कुठवर चालतो ते पाहत भटकण्याशी आणि आषाढात गावातल्या विहिरी काठोकाठ भरल्यावर आपापल्या आवडत्या विहिरींवर आवडत्या मित्रांबरोबर जाऊन मनसोक्त पोहण्याशी.

पाऊस हा असा बालकांना नाचायला लावणारा, तरुणांना मस्त करणारा आणि वृद्धांना पुन्हा एकदा तारुण्याच्या स्मरणाने विव्हल करणार असतो. चार महिन्यांचा हा पाहुणा, पण प्रत्येक महिन्यात त्याच्या वागणुकीत किती मजेदार बदल होत असतो. म्हणूनच की काय, वयस्कर माणसं अनुभवांचा आधार देताना, "बाबा रे, मी चार पावसाळे जास्त पाहिले आहेत" असं म्हणतात.

पु. ल. देशपांडे
पुस्तक - पुरचुंडी

Sunday, June 11, 2023

आणि मी चेअरमन झालो

आमच्या चिंचखरे ब्लॉक्सच्या "फ्रेंड्स ओन बॅडमिंटन क्लब" चे आपण अध्यक्ष व्हा असं सांगायला जेव्हा काही तरूण मंडळी आली तेव्हा मला धक्काच बसला. चिंचखरे ब्लॉक्समधे आम्ही रहायला येऊन आता बरेच दिवस झाले होते. ही अध्यक्षपदाची विनंती करायला आलेली तरुण मंडळी हां हां म्हणता तरूण झाली होती . विशेषताः गुप्तेकाकांची निमा तर भलतीच स्मार्ट दिसत होती .

“काय वडील ठीक आहेत ?" मी आपलं उगीचच हा इसम आपल्याकडे पहात राहिलाय हे लक्षात येऊ नये “डॅडी जर्मनीला गेले आहेत" निमा म्हणाली म्हणून विचारलं

हल्ली सगळयांचेच बाप डॅडी झाले आहेत हे नव्हतं मला ठाऊक.

"अस्सं केव्हा येणार परत ?”

“दोन किंवा तीन मंथ्स नंतर " “काय सहज गेले आहेत ?”

"तिथं बिझनेस कॉटॅक्टस् करायचे आहेत शिवाय फॅक्टरीसाठी मशिनरीची ऑर्डर प्लेस करायची म्हणून” गुप्ते बटणांची फॅक्टरी चालवीतात .

"बोटीने गेले का ?"

"नाही फ्लाय करून गेले"

“बोइंग !” शंक-या ओरडला. त्याला त्याही शास्त्रातलं खूप कळतं. "बोइंग सेवन ओ सेवन "

"गप रे" तो काहीतरी चुकीचं बोलला असेल म्हणून मी त्याला जालं

“हो गिरीश म्हणतो ते राईट अंकल. डॅडी सेवन ओ सेवननीच गेले ”

“आधी सुपर कॉन्स्टलेशनं जात होते” शंक-याने माझ्या ज्ञानात आणखी भर घाली .

निमाच्या मराठीवरून आमच्या घरात काही वर्षांनी सुरू मराठी गद्दाच्या नव्या अवताराची कल्पना येत होती होणा-या

“तू आता कितवीत आहेस ?” मी तिला विचारलं “मी सीनीअर बी. ए. ला आहे”

“ऑ ! बसा ना उभे का तुम्ही लोक ?”

ही फॉक घालणारी गुप्तेकाकांची मुलगी सीनीअर बी. ए. ला ?

“मग अंकल, तुम्ही चेअरमन व्हा” दुसरा एक तरूण म्हणाला “पण मला काही तुमच्या त्या बॅडमिंटनमधलं कळत नाही"

" म्हणून तर आम्ही तुम्हांला रिक्वेस्ट करायला आलो. " एक अवाज फुटतोय ना फुटतोय अश्या बेताचा तरूण म्हणाला. त्यानं कपाळावर केसांच्या बटीचा आठचा आकडा काढला होता.

“नाही तर आम्ही आंटीला सांगू -” निमा म्हणाली

"ही आंटी कोण ?"

ह्या माझ्या प्रश्नावर खोलीतली ती सगळी नवी पिढी खदखदून हसली.

“डॅडी, आंटी इज ममी” शंक-या मदतीला आला.

“ओ ! कुठे गेली तुझी आंटी ?”

पुन्हा एकदा ती पिढी खिदळली.

माझी आंटी ? डॅडी, तुम्ही सगळयांना जॉनी वॉकरसारखं लाफिंग करायला लावाल” शंक- यापुढे इलाज नाही "गप रे"

“मग अंकल, तुम्ही चेअरमन व्हा निमी म्हणाली

“मीनाकुमारी !” शंक-या पिंज-यातला पोपट जसा अकारण 'क्यर्र 'करून ओरडतो तसा ओरडला. शंक-याच्या उद्गाराला

तरूण पिढी पुन्हा हसली.

“कोण मीनाकुमारी ?”

“निमाला सगळेजण मीनाकुमारी म्हणतात आणि ह्याला

दिलीपकुमार !


”चुप रे" निमानं शंक-याचा गालगुच्चा घेतला. “ए,

चिरंजीव शंकर, आमची आंटी वगैरे मंडळींनी आसमंतात बरीच लोकप्रियता मिळवली होती. केसांचा आठ केलेला दिलीपकुमारही शंक-याचा फ्रेंड होता. "पण ज्याला बॅडमिंटनमधलं काही कळत नाही त्याचा काय उपयोग ?”


"पण म्हणून तर तुम्ही चेअरमन व्हा !”

“पूर्वी कोण होते ?"

"नरसिंगराव "

“उज्वलचे डॉडी !” पुरवणी - महिती खात्याचे प्रमुख शंकरराव म्हणाले

“मग त्यांना तर स्पोर्टस्मधे फार इटरेस्ट आहे !” हळू हळू माझं मराठीदेखील नवी वळणं घेऊ लगलं. मी नरसिंगरावला उडया मारतांना पाहिलं होतं. "पण ते स्वता:च कोर्टाचं पझेशन घेऊन बसतात.' "

"म्हणजे तुमचं प्रकरण कोर्टाबिर्टात गेलंय की काय ?” ह्या माझ्या वाक्यानंतर तर नव्या पिढीनी हसतांना टाळया वाजवल्या. पुढल्या पंधरा मिनिटांत निमा, अशुतोष पाळंधे (प्रेसवाल्या पाळंध्यांचा), जगदीश निमकर आणि अधुन मधुन चि. शंकर यांनी मला बॅडमिंटन आणि तत्सम खेळ यांविषयी भरपूर महिती दिली.

“आंम्हाला डॉबल करणारा चेअरमन नको ! तुम्हाला गेममध्ये इंटरेस्ट नाही त्यामुळे पार्शालिटी करणार नाही. मिस्टर

एन्. राव सारखे आपल्या डॉटर्सनाच चान्स दयायचे.' " "मग येवढा चान्स मिळाल्यावर ती टूर्नामेंट्समधे चॅपिअन आली तर काय वंडर !” अशुतोष

“तुम्ही नुसते फॉर द सेक ऑफ नेम राहा. क्लब आम्ही चालवतो. शिवाय तुम्ही वयोवृध्द आहांत !”

निमाला हा एकच मराठी शब्द ज्याकुठल्या दुष्टाने शिकावला होता त्याचं डोकं फोडावसं मला वाटलं. आणि अश्या त-हेने मी चिंचखरे ब्लॉक्सच्या फ्रेंड्स ओन बॅडमिंटन क्लबचा चेअरमन झालो.

"थँक्यू अंकल-" तरूण पिढी शेकहॅड करत निघाली . जाता जाता पाळंध्याच्या पोरानं एक वाक्य जिना उतरण्यापूर्वी बोलयची घाई करायला नको होती “ साला असलाच मामा आपल्याला चेअरमन पायजे होता. आता नरसिंगरावच्या गॅगला येऊ दे कोर्टवर -"

नव्या जगात हळूहळू डोकावून पहायला मी सुरूवात केली होती . फक्त एकच प्रश्न मला पडला होता, नवी पिढी सा-या जगावर रागवली आहे म्हणाला होता नानू. ती कुठली पिढी मग ? ही पिढी फक्त नरसिंगराववरच रागवली होती. आपल्याच पोरांना खेळायला देतो म्हणजे काय ? आमची पिढी देखील असल्या बापावर रागवली असती.

इतक्यात दार उघडून आमच्या मिसेस आल्या. हल्ली ती दिवसातून दहा तास सार्वजनिक कामात असावी असं वाटतं "कुठे गेली होतीस ग ?”

"कौन्सिलची इलेक्शन होती"

“रविवारी सकाळी ? तुमच्या लेडीजना काय स्वैपाकबियपाक आहे का नाही ?" “रविवारी काय फक्त पुरूषांनीच सुट्टी घ्यावी ? बायकांनी घेऊ नये ? नान् हेच म्हणाले !”

“नान् ! त्याला काय म्हणायला ? ब्रम्हचारी तो. कुठल्याही

पिंपळावर जाऊन बसेल गिळायला” "कौन्सिलची जाइंट सेकेटरी म्हणून निवडून आले मी”

“फू: '

“फू: करण्यासारखं काय त्यात " “जाइंट सेक्रेटरीच ना ? मी चेअरमन झालो. "

“काय !” झोपेत भूत पाहिल्यासारखं माझ्याकडं पहात ती म्हणाली

"हो हो चेअरमन”

“यस ममी ! डॉडी चेअरमन !” शंक-याने चोच खूपसली .

"चेअरमन चे ओ आर एम ए मन !” आपली सरोज खरे हेच

इंग्रजी शिकवते त्याला

"कसले चेअरमन”

“फ्रेंड्स ओन बॅडमिंटन क्लबचा !”

त्या क्षणी माझ्याकडे हिनं ज्या डोळयांनी पाहिलं तसं इतक्या वर्षाच्या संसारात दोनदा जरी पाहिलं असतं तर समर्थांच्या “जगी सर्व सुखी असा कोण आहे” ह्या प्रश्नाला “मी !” असं जोरात उत्तर दिलं असतं

(असा मी असामी)
हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

Wednesday, April 19, 2023

कसं काय, बरं आहे !

....साऱ्या व्यवहारात "कसं काय" या सारखा निरर्थक प्रश्न आणि "बरं आहे" यासारखं निरर्थक उत्तर नाही. ह्या शब्दाला निश्चित असा अर्थ नाही, कळा नाही, चव नाही. एखाद्या वृद्ध माणसाची आपण चौकशी करतो, "काय अण्णा साहेब, काय म्हणतेय प्रकृती?" त्यावर वय सत्तर वर्षे, 500 रुपये पेंशन, सर्व मुले कमावती, मुलींची लग्न बिनहुंड्याने झालेली असं सविस्तर उत्तर मिळतं. परंतु, "कसं काय अण्णा साहेब?" हा प्रश्ण टाका, त्याला त्यांचे उत्तर "बरं आहे" हेच येईल. लहानपणी मास्तर निबंधावर " बरा" असा शेरा देत असत ज्याचा अर्थ वाईट नाही आणि चांगलाही नाही असा असे.

परंतु ह्या सृष्टीत सर्वस्वी चांगला आणि वाईट कोणी नाही त्याप्रमाणे "बरं आहे" ह्या शब्दाला केवळ अवगुणच चिकटलेले आहेत अस नाही. उदाहरणार्थ, नुसतं पाहून घेईन' म्हणण्याऐवजी 'बरं आहे, पाहून घेईन" म्हणा आणि वाक्याला किती जोर चढतो बघा. त्याचप्रमाणे नको असलेला माणूस भेटला की "बरं आहे" चे समारोपदाखल दोन शब्द अगदी वेळेवर कामाला येतात.

बोध एवढाच घ्यायचा की व्यवहारात निरुपयोगी असे काही नाही. बिऱ्हाड बदलताना जसे स्वगृहिणी चातुर्याने केरसुणीची काडीदेखील आयडीनचा कापूस लावायला उपयोगी पडेल म्हणुन जपते तसेच "बरं आहे" ला मला संग्रही ठेवावा लागतो.... बरं आहे!
...

समजा, 'कसं काय?' म्हटल्यावर 'छान आहे' म्हणायची रूढी असती तर उत्तराला डौल आला असता. 'छान' शब्द कसा छान आहे ! चांगल्यापेक्षा देखील 'छान' शब्दाला अधिक डौल आहे. ह्या शब्दाने आपली टोपी वाकडी घातली आहे. धोतराचा सफाईदार काचा मारला आहे. सिल्कच्या झकास शर्टावर वुलन कोट घातला आहे. आणि पायात सुरेख कोल्हापुरी जरीपट्टयाचे पायताण घातले आहे. छान आहे ! 'चांगलं आहे' ह्या शब्दप्रयोगाला अधिक भारदस्तपणा आहे. ह्या शब्दाने पोषाख साधाच घातला आहे; पण गळ्याचे बटण लावले आहे, आणि टोपी नाकासमोर घातली आहे.

वास्तविक 'बरं', 'चांगलं' आणि 'छान' हे नातलगच; पण स्वभावात किती फरक ! 'बरं' हा शब्द आळशी आहे, निरुत्साही आहे. ‘चांगला' इमानी आहे कसा कुणाच्या अध्यात ना मध्यात. आणि 'छान' हे कनिष्ठ बंधू दोस्तांच्या घोळक्यात हास्यविनोद करीत उभे आहेत. ‘छान’ आणि ‘चांगल्या'चे चांगले चाललेले पाहून 'बऱ्या'ला तितकेसे बरे वाटत नाही. ह्याच मंडळीत एक 'ठीक' नावाचे गृहस्थ आहेत. 'कसं आहे? ठीक आहे.' 'ठीक आहे' मध्ये समाधान आहे. ते फारसे मोठे नसले तरी एफिशियन्सी बारमध्ये फार दिवस अडकून न राहाता बढती मिळालेल्या कारकुनाच्या समाधानासारखे ते समाधान आहे. पण 'बरं आहे' मागे मात्र कुरकूर आहे. ह्या 'आहे' मागला 'नाही'चा बदसूर मोठा कुजकट आहे. त्या दृष्टीने एकूणच 'बरे' ह्या शब्दात एक क्षुद्रपणा दडलेला आहे. वरपांगी साळसूद वाटणाऱ्या ह्या शब्दाला अगदीच स्वभाव नाही म्हणावे, तर तसे नाही. तसा स्वभाव आहे, आणि तो आपले खरे स्वरूप कधीकधी विलक्षण रीतीने उघड करून दाखवतो.

पु. ल. देशपांडे 
कसं काय, बरं आहे !
पुस्तक - खोगीरभरती

हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून पुस्तक घरपोच मागवू शकता.

Thursday, April 6, 2023

दर्शनमात्रे - सुनीता देशपांडे

आता बाबाही थकले, आम्हीही थकलो. पण एक काळ असा होता की त्या वेळी आनंदवनात वर्षातून निदान एक तरी फेरी होतच असे. प्रत्येक वेळी आम्हांला काहीतरी नवं दाखवायची योजना बाबांच्या मनात असे आणि त्या उत्साहातच 'आनंदवन - कुटुंबियांकडून स्वागत होई. हा भाग्यलाभ आमच्या भाळी लिहिला गेल्याचा पोटभर आनंद घेऊनच आम्ही परत कधी यायचं तो बेत ठरवून आनंदवनाचा निरोप घेत असू. परतताना 'कन्या सासुरासी जाये, मागे परतुनी पाहे' अशी अवस्था होत नसली तरच नवल.

या वेळी बाबांनी ठरवलं होतं, आम्हांला ताडोबाला नेऊन वाघ दाखवायचा सर्व पूर्वतयारी झाली होती. आवश्यक ते निरोप त्या-त्या ठिकाणी गेले होते. बाबांकडे त्या काळी ड्रायव्हरची सीट डावीकडे असलेली एक जुनी जीपगाडी होती. उन्हापावसासाठी वर ताडपत्रीवजा कव्हर असलेली. बाबा स्वतः उत्तम मेकॅनिक, ड्रायव्हर, सर्व काही. त्या काळी ड्रायव्हिंग तेच करत. आमचा प्रवास त्या जीपमधून सुरू झाला. बाबांच्या शेजारी साधनाताई आणि पलीकडे मी मागे भाई, विकास आणि प्रकाश हे बाबांचे दोघे मुलगे आणि त्या दोघांचा जोडीदार आनंदवनातला तरुण कार्यकर्ता शहा. असे चौघे. गाडीत प्यायचं पाणी आणि वाटेत हवं तर खायला म्हणून टोपलीभर उकडलेली रताळी साधनाताईंनी घेतली होती. बाकी जेवणखाण काहीही सोबत नव्हतं; पण बाबा आणि ताई असताना काहीतरी व्यवस्था नक्कीच केलेली असणार ही मनोमन खात्री असल्यानं मीही निश्चित होते. त्यामुळं एकही प्रश्न न विचारताच हा प्रवास सुरू झाला होता. बाबांचा उत्साह तर अवर्णनीय होता. वेगवेगळ्या अनेक विषयांवर ते बोलत होते ताडोबाच्या दिशेनं धावणाऱ्या त्या आमच्या प्रवासपट्ट्याला बाबांच्या अनुभवाच्या उन्हापावसाचे काठ लाभत होते.

जंगलाची ओळख करून घ्यायची तर प्रथम भेट रात्रीच्या वेळीच व्हायला हवी. म्हणून त्या दृष्टीनेच आम्ही निघालो होतो. ताडोबाच्या अभयारण्यात रात्री गाडी शिरली तेव्हा चांगला काळोख पडला होता. भरपूर भुका लागल्या होत्या. तिथल्या प्रथम वर्गाच्या अतिथिगृहात खोल्या राखून ठेवायची बाबांनी व्यवस्था केली होती; म्हणून गाडी प्रथम तिकडेच नेली. तर तिथं सगळी सामसूम दिसली. कुणालाही काही पत्ता नाही, पर्वाही नाही म्हणताच बाबांचा पारा चढायला सुरुवात झाली. अफगणिस्तानचा राजा की कुणीसा बडा सरकारी पाहुणा पुढल्या पंधरवड्यात येणार म्हणून त्याच्यासाठी आणि त्याच्या लवाजम्यासाठी तिथली सगळी सरकारी अतिथिगृहं साफसफाई, रंगरंगोटी, मोडतोड दुरुस्ती वगैरे पूर्वतयारीच्या दृष्टीनं अचानक बंद करण्यात आली होती.

तळहातावर भाकरी घेऊन खाताखाता त्यातलाच घास कुष्ठरोग्यांनाही भरवत त्यांची सेवा करणारा हा बाबा, पाहुण्यांना सायीचे घट्ट दही देता आलं नाही तर अत्यंत अस्वस्थ होतो. मनासारखा पाहुणचार करायला न जमणं हा त्यांना एकदम विदर्भ प्रांताचाच अपमान वाटायला लागतो. ती नामुष्की सहन करण्याची ताकद, इतक्या पारंब्यांनिशी धरणीवर भक्कम उभ्या असलेल्या या 'वटवृक्षात ' नाही.

आम्ही त्या अभयारण्यातल्या झाडावर बांधलेल्या एखाद्या मचाणावर रात्रीचा मुक्काम करायचं ठरवलं. निराशा सर्वाचीच झाली होती. पण या प्रवासाला सुरुवात केल्या क्षणापासून आम्हां साऱ्याजणांचा जो एकच एकसंध गट होता, त्याचे आता दोन गट झाले. साधनाताई, ती तीन मुलं आणि आम्ही दोघं याचा एक गट आणि बाबांचा एकट्याचा दुसरा गट. तिकडे एवढ्यातेवढ्यान अंगार धगधगत होता. कारणाशिवायच बाबा मुलांवर आणि ताईंवर डाफरत होते. त्यांना थंड करण्याचे आणि खुलवण्याचे आम्हां सर्वाचे अयशस्वी प्रयत्न चालूच होते..

प्रथम वर्गाच्या सरकारी अतिथिगृहातला त्या रात्रीचा 'डिनर दुसऱ्या दिवशीचा 'ब्रेक फास्ट आणि 'लंच सर्व काही आम्हांला त्या उकडलेल्या रताळ्यांच्या टोपलीत सापडलं आणि आरामगृहातल्या गादयागिरद्या त्या लाकडी मचाणावर..

मनात आणलं तर किती गप्प बसता येतं ते अरण्याकडून शिकावं, त्या नीरव शांततेचा भंग करण्याचं धाडस म्हणा किंवा उद्धटपणा म्हणा, आम्हां कुणातच नव्हता. अगदी जरूरच पडली तर एकमेकांशी कानगोष्टी बाबांचा वेध घेत होतो. रात्रीच्या फेरफटक्यासाठी बाहेर पडणाऱ्या वन्य चाहूल घ्यायला बाबा पंचप्राण कानात गोळा करून बसले होते. त्या प्राण्यांच्या पदरवांवरून, एकमेकांना घातलेल्या सादाप्रतिसादांवरून, कोण, कुठल्या दिशेनं कशासाठी निघाला असेल ह्याचा ते अंदाज घेत होते. वाघाचा मागोवा लागताच ताडोबाचा तो औरस रहिवासी आम्हांला दाखविण्यासाठी ते जीपमधून अरण्यदर्शनाला निघणार होते. करत आम्ही पशूंची

पण कुठल्या मुहुर्तावर हा ताडोबाचा बेत केला कोण जाणे, असं वाटावं अशीच काहीशी ग्रहदशा होती. ती रात्र वाघोबांच्या पंचांगातली 'निर्जळी एकादशीची असावी. ताडोबाच्या जंगलातले सारे वाघ ध्यानस्थ होऊन बसले होते आ आपल्या तपाचरणानं बाबा आमटे नामक नरसिंहाला अधिकाधिक त्रस्त करत होते. शेवटी बाबांनी मनाशी काहीतरी निश्चय केला आणि आम्हांला पुन्हा गाडीत घालून ते अरण्यदर्शनाला निघाले. प्रखर दिवे असलेल्या त्या जीपगाडीतून ती. अख्खी रात्र आणि पहाट, आणि मग दिवसाउजेडी सकाळी-दुपारी पायीपायीदेखील त्या जंगलात सगळीकडे आम्ही बाबांबरोबर खूप चकरा मारल्या. लहानमोठ्या अनेक रानवाटा पालथ्या घातल्या. एखादया वळणावर समोर एकदम शेकडो पणत्या पेटलेल्या दिसल्या की हरणांचा तो कळप जास्तीत जास्त जवळून पाहता यावा म्हणून बाबा गाडीच्या दिव्यांची सावध उघडझाप करत, आवाज न येईल अशी हळूहळू जीप पुढं पुढं नेत आम्हांला त्या वनवाशांशी ओळखी करून देत होते. त्या बावीसतेवीस तासांत आम्ही एकटे-दुकटे आणि कळपांनी किंवा छोट्याछोट्या गटानं फिरणारे अनेक प्राणी पाहिले; पण बाबांनी योजिलेलं व्याघ्रदर्शन काही घडलं नाही. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीची आमची शेवटली शोधयात्रा करत हळूहळू जीप जात असताना तर मला एक नवलच पहायला मिळालं. आमच्या मार्गापलीकडेच थोड्याशा मोकळ्या जागेत एक मोर आणि एक हरणाचं पाडस मिळून मजेत खेळताना दिसलं. आम्ही जागच्या जागी गाड थांबवली. पण आमची चाहूल लागताच ते दोघे पळून आडोशाला गेले. आम्ह पुढं निघून गेलो; आणि त्या सफरीमधल्या अशा अनेक लहानमोठ्या तृप्त क्षणांची बेरीज करत असताना बाबांच्या दिशेनं नजर गेली की मला धडकी भरत होती शेवटी अंधार पडू लागला आणि ताडोबाच्या जंगलातून आनंदवनाच्या दिशेन परतीचा प्रवास सुरू झाला.

शौक म्हणून शिकार करणं हे मला अत्यंत असंस्कृत मनाचं लक्षण वाटतं. पण या शौकासाठी आपल्या देशात तर बडेबडे लोक सोयीचं असेल तर अभयारण्याच्या दिशेनंही जातात; आणि अभयारण्यात जनावरं मारणं हा गुन्हा नोंदवला जाईल आणि न जाणो उद्या प्रकरण अंगावर शेकेल म्हणून त्या अरण्याच्या सीमेवर बाहेर बकऱ्या वगैरे प्राणी बांधून ठेवतात. ते प्राणी भुकेनं ओरडायला लागले की अभयारण्यातल्या वाघाबिघांनी त्या दिशेनं भक्ष्यासाठी । जंगलाची सीमा ओलांडून बाहेर यावं म्हणजे तो वाघ टिपून आयती शिकार 'साधता येते. भारतात वाघाची शिकार करण्याची कधी स्वत:ची, तर कधी पाहुण्यांची हौस भागवणाऱ्या अनेक राजकारण्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनो, अशा रीतीनं अभयारण्यातल्या आपल्या वाघांची संख्यादेखील खूप कमी केली आहे, असं मी ऐकलं होतं. ताडोबा सोडून बाहेर पडताना उगाच शंका चाटुन गेली; चोवीस तासांत इतका आटापिटा करूनही इथं एकही वाघ दिसला नाही; म्हणजे इथले सगळे वाघ असेच या लोकांनी संपवले की काय?

परतीचा तो प्रवास सुरू झाला तेव्हा पोटात भूक, डोळ्यांवर झोप, आणि डोक्यात अशा अनेक शंका होत्या. बाबा मात्र फारच अस्वस्थ होते. ताडोबा म्हणजे वाघांचा राजा. साक्षात वाघ! बाबांची आणि त्याची जुनी दोस्ती. या आपल्या मित्रानं आपल्याला असा दगा दयावा? हे दुःख, चीड असह्य होती. आम्हांला हे सगळं कळत होतं; पण 'अपराध बाबांनी केलेलाच नाही त्याबद्दल ते असा त्रागा करून घेत असलेले पाहून आम्ही सगळेच भांबावून गेलो. काल ताडोबाच्या दर्शनाला निघतानाचा बाबांचा उत्साह आणि आज तिथून परततानाचा हा मूड याचं काहीही नातं नव्हतं. बाबांना खुलवण्यासाठी आम्ही सगळेच आपापल्या परीनं त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होतो.

मी पाहुणी म्हणून असेल, बाबा माझ्यावर उखडत नव्हते, पण प्रतिसादही देत नव्हते. साधनाताई किंवा मुलांपैकी कुणी काही बोलायचा प्रयत्न केला की बाबा त्यांना एकदम फटकारू लागले, तेव्हा भाईनं ताबा घेतला आणि तो त्यांच्याशी संवाद साधू लागला. "जाऊ दे हो बाबा. ही जनावरंदेखील आपल्या राज्यात अशीच वागणार" इथून सुरुवात करून मग आमच्याऐवजी कुणी मंत्रीबिंत्री आला असता ताडोबाला तर काय घडलं असतं याचं वर्णन करायला भाईनं सुरुवात केली. मग गाणी, नकला, विनोदी किस्से, कायकाय तो करत राहिला. आम्ही सगळे सुखावून हसत होतो; पण तरीही बेताबेतानं. बाबाही मधूनच काही बोलून आपण ऐकत आहोत हे दाखवत पाहुण्यांचा आब राखत होते. पण हे काही खरं नव्हे अशी जाणीव सर्वानाच होती. ताण फारसा सैलावत नव्हता.

कालपासून या गाडीनं केलेल्या प्रवासात प्रत्येकाच्या बसायच्या जागा ठरूनच गेल्या होत्या. पुढच्या बाजूला मधे ताई, डावीकडे ड्रायव्हर, बाबा, उजवीकडे मी माझ्या ताब्यात बाबानी एक भलामोठा टॉर्च दिला होता. कुणा परदेशी 'आनंदवनाच्या मित्रानं बाबांना तो भेट दिलेला होता. गाडीच्या बॅटरीवर पेटवायचा. खूप शक्तिमान, दूरवर तेजस्वी प्रकाश पाडणारा. साधारणतः वाघाची उंची लक्षात घेऊन जनावरांच्या डोळ्यांत प्रकाशझोत गेला पाहिजे असा कोन साधून तो टॉर्च मांडीवर घेऊन बसण्याची आणि त्या दिशेनं जनावर दिसतं का पहाण्याची कामगिरी बाबांनी माझ्यावर सोपवली होती आणि काल रात्री मी ती व्यवस्थित पारही पाडली होती. आता त्या प्रकाशाच्या टप्प्यात वाघच आला नाही तर कोण काय करणार? आजही मागच्या बाजूला चाललेल्या भाईच्या कार्यक्रमाला दाद देत असतानाही मी माझं काम विसरले नव्हते.

परतीची वाट बाबांनी वेगळी निवडली होती. ताडोबाची हद्द संपली तेव्हा आमची गाडी एका अगदी चिंचोळ्या पाणंदीतून चालली होती. बैलगाड्यांसाठीची ती रानातली वाट असावी. दोन्ही बाजूंना बोरूची गर्द रानं होती. बोरूच्या काटेरी फांदया गाडीला मधूनमधून घासत होत्या. कपडे फाटू नयेत, हातापायांवर ओरखडे येऊ नयेत, म्हणून कडेला बसलेल्यांनी सावधगिरी घ्यायला हवी होती. माझ्या मागेच बसलेल्या भाईनं आपले पाय गाडीबाहेर काढले होते, ते मी त्याला 'काटे लागून पँट फाटेल' म्हणून आत घ्यायला सांगितले. 'पायाला ओरखडा येईल त्याची काळजी नाही, पँट फाटेल तिची काळजी' असा त्यावर त्यानं शेरा मारून सर्वांना हसवलं आणि पाय आत घेतले. आम्ही सगळे गप्प होतो. बाबांच्या मौनासारख्याच घट्ट काळोखातून जीप चालली होती. अचानक या वाहनाचा अडथळा मध्येच आल्यानं बावरून जागच्या जागी थबकलेला एक वाघ प्रकाशझोतात आला. मी दबलेल्या स्वरात एकदम म्हटलं वाघ!

क्षणात बाबांनी तिथंच गाडी थांबवली. पुढं मी आणि मागं भाई गाडीच्या उजव्या अंगाला होतो. आम्हांपासून तर तो वाघ फार तर हातभर अंतरावर असेल. जरा पुढं वाकले असते तर त्याच्या गळ्याला किंवा कपाळाला स्पर्श करता आला असता, इतकं जवळ उभं असलेलं ते अगदी तरुण, उंचपुरं भरलेल सुंदर उमदं जनावर दिसताच तो वाघ आहे, पुढच्या क्षणी एकच पाऊल पुढे टाकून आमच्यापैकी दोघातिघांना तो सहज ओढत कुठंही घेऊन जाऊ शकेन इतका दांडगा आहे, वगैरे कोणताही विचार किंवा कसल्याही भीतीचा लवलेशही आमच्यापैकी कुणाच्याही मनात उमटला नाही. त्याची उंची सर्वसाधारण वाघांपेक्षा थोडी अधिक होती; त्यामुळे प्रकाशाचे किरण सरळ रेषेत त्याच्या डोळ्यात घुसलेच नव्हते. तसे ते घुसावे आणि दिपून जनावर आंधळं व्हावं याची काळजी घेऊनच त्या टॉर्चचा कोन साधला होता. अशा वेळी डोळे बारीक केल्यानं कपाळाला आठ्या पडलेला वाघ पहायला मिळतो. पण इथं प्रत्यक्ष किरणांचा झोत त्यान्या गळ्यावर, छाताडावर पडला होता आणि त्याच्या त्या उत्फुल्ल - हसा तेजस्वी डोळ्यांतल त्याच्या उमदया काळजाचं ओलसर प्रतिबिंब आम्ही भरल्या डोळ्यांनी पहात होतों, जन्मजन्मांतरीचा जिवलग इतक्या प्रदीर्घ ताटातुटीनंतर अचानक कडकडून मिठीत घेता यावा अशा भरल्या आनंदात आम्ही तिथून निघालो ते थेट आनंदवनात येऊन पोचेपर्यंत मग कुणी कुणाशी फारसं बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतंच. ताडोबा सोडताना पोटात ओरडणारे ते कावळे कुठे उडून गेले ? थकव्याचं तृप्तीत रूपांतर होताना कोणती प्रक्रिया होते? त्या स्थित्यंतराला किती वेळ लागत असतो? गेले अखंड चोवीस तास आमच्यापासून सतत दूर दूर जात असलेले बाबा नेमक्या कोणत्या क्षणार्धात आमच्याशी पुन्हा एकजीव होऊन गेले? ही अशी कोणती जादू कुणी केली? आणि या सगळ्या घटनेमागचं प्रयोजन कोणतं? अलगअलग सातजणांचं आमचं ते कुटुंब एका धूलिकणाइतकं क्षुल्लक होऊन त्या वाघाच्या पावलाशी असलेल्या मातीत मिसळायला इतकं आसुसलं ते का? ही ओढ कसली ? आजच्या या क्षणी पडणारे हे असले प्रश्नदेखील त्यावेळी मूक झाले होते.

जिम कॉर्बेट हा माझा एक आवडता लेखक त्याच्याच जातीच्या इतरही विश्वमित्रांच्या साहित्यातून माझी खूप वाघांशी ओळख आहे. प्रत्यक्षातदेखील मी बंदिस्तच नव्हे, तर मुक्ता वाघही पाहिले आहेत. बाबांनी तर आयुष्यात कित्येक वाघ पाहिले, मारले आणि खेळवलेही. पण सर्वार्थानं इतकं सुंदर जनावर वाघांच्या जातीत जन्माला येऊन जगाच्या पाठीवर नांदू शकतं असं कुणी सांगितलं असतं तर त्या क्षणापर्यंत आमच्यापैकी कुणालाही ते खोटंच वाटलं असतं. आपल्या जाणिवेच्या कक्षेबाहेरचा विश्वाचा पसारा, स्वतःच्या सामर्थ्याची झलक ही अशी मधूनच कधी तरी दाखवतो. अशा वेळी एक दैवदुर्लभ साक्षात्कार घडल्याचा अलौकिक अनुभव लाभतो. माझ्या बाबतीत तो वाघ आज असंख्य अज्ञात विश्वबांधवांचं एक प्रतीक होऊन बसला आहे. दर भाऊबीजेला तरी त्याला आठवणीनं मनातल्या मनात ओवाळाव वाटतं. लीन होऊन त्याच्या हाती राखी बांधावी वाटते' आपलं माहेर खऱ्या अर्थानं श्रीमंत असल्याचाच हा साक्षात्कार. हसतहसत सारा निसर्गच आपल्या आनंदात सहभागी झाल्याचा साक्षात्कार !

('हंस', दिवाळी १९९१ )

हा लेख उपलब्ध करून देण्यासाठी श्री आमोद घांग्रेकर ह्यांचे मनापासून आभार. 

Tuesday, March 14, 2023

यक्षाचं तळं

प्रत्येक सुखाला, दुःखाला संदर्भ असतात. या धामापूरच्या तलावालाही माझ्या जीवनात, स्मृतीत संदर्भ आहेत. प्रत्यक्षात मी त्या तलावाच्या पोटात गेले तर मृत्युनंतर तरंगत वर येणाऱ्या माझ्या ऐहिक मेंदूबरोबर ते संदर्भ नाहीसे होतील की त्या जलाशयाच्या गर्भाशयात पुनर्जन्मासाठी, पुनर्निर्मितीसाठी, दुगदुगत राहतील? तिथे त्यांना पोसणारी नाळ कोणती? 

असंख्य दुःखतांनी सासुरवाशिणींनी, चोचीतच दुखावलेल्या राजबंशी पाखरांनी शेवटच्या क्षणी विहिरीचा आसरा घेतला आहे. ज्या पाण्याची त्यांना अखेरीला ओढ लागली. त्याच्या पृष्ठभागापर्यंतचा त्या जीवांचा प्रवास गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने, गतीने झाला, हे मान्य आहे. पण त्या पृष्ठभागाला त्यांचा स्पर्श झाल्या क्षणापासून प्राण जाईपर्यंत क्षणापर्यंत त्या पाण्याच्या पोटात काय घडले? सोबत आणलेले ते सगळे दुःख, तो जिवंतपणा तो लाख मोलाचा प्राप्त ती ताटातुटीची हुरहूर, क्वचित त्या हतबल क्षणींचा पश्चाताप सगळे सगळे संचित त्या पाण्याच्या पोटात जपून ठेवायला त्याच्या स्वाधीन केले गेले असणार. अशी किती जणांची, युगानुयुगांची या तलावाच्या पाण्याला पहिला मानवी स्पर्श झाला तेव्हापासूनची किती संचिते इथे गोळा झाली असणार! ती वाचायला मला प्रत्यक्षच तिथे जायला हवे? एक्स-रे रेसारखा एखादा नवा किरण ती टिपून उजेडात आणू शकणार नाही का? त्या पाण्यातले सनातन दगड, सूर्यकिरण, मासे, इतर जलचर, तिथे वाढणाऱ्या वनस्पत्ती, काठावरच्या झाडांची पाळेमुळे, पण्याचा तळाचा भूभाग, यांना कुणाला या साऱ्याची पुसटशी तरी कल्पना असेल का? हा धामापुरचा तलाव म्हटला की त्याच्या अंतरंगात शिरून तिथल्या कविता वाचाव्या.

अशीच जबरदस्त ओढ मला लागते खरी. या तलावाच्या तिन्ही बाजूंना झाडाझुडपांनी भरलेल्या टेकड्या पुरातन काळापासून तशाच आहेत. चवथ्या बाजुच्या टेकडीवर ही भगवती केव्हा वस्तीला आली मला माहीत नाही. पण कोणे एके काळी ज्या कुणी या टेकडीवर हे भगवतीचे देऊळ बांधले, त्यानेच बहुधा त्या टेकडीवरून तलावाच्या काठापर्यंतच नव्हे तर पाण्यातही अगदी आतपर्यंत बऱ्याच पायऱ्याही बांधून काढल्या आहेत. एके काळी म्हणे गावातल्या जनसामान्यांपैकी कुणाकडे लग्नकार्य असले आणि दागदागिने कमी पडत असले तर हाच तलाव गरजू गावकऱ्यांना सोन्यारुप्याचे, हिऱ्यामोत्यांचे दागिने पुरवत असे. आपल्याला हवे ते दागिने कळ्या फुलांचे करायचे आणि ती परडी संध्याकाळी तळ्याकाळी पायरीवर येऊन ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी खऱ्या दागिन्यांनी भरलेली ती परडी घेऊन जायची आणि कार्यसिध्दीनंतर ते दागिने तलावाला परत करायचे. गावावर अशी माया करणारा, पाखर घालणारा हा तलाव. काम झाल्यावरही दागिने परत न करण्याची दुर्बुध्दी झालेल्या कुण्या गावकऱ्याला ज्या दिवशी धामापुराने सामावून घेतले त्या दिवशी त्या तलावाच्या मनाता केवढा हलकल्लोळ उडाला असेल! मायेचे मोल न उमजणाऱ्या लेकरांना तो अजूनही पाणी देतो; पण केवळ कर्तव्यबुध्दीने.
      
आणि त्या टेकड्या? भोवतालच्या जीवसृष्टीतले किती जन्म आणि किती मरणे त्यांनी तटस्थतेने पाहिली असतील!  इथले हे प्रचंड दगड युगानुयुगे कुणाची वाट पाहत इथे उभे असतील? शांत, थंड, पण शक्तीशाली दगड! या दगडदगडांतही किती जाती, पोटजाती आहेत! कलावंताच्या अपयशाने अशा दगडांच्या काळजाच्या ठिकऱ्या उडतात. पण यशाने मात्र त्यांची छाती फुगत नाही, उलट एक सात्विक, नम्र भाव त्यांच्या रोमारोमांतून प्रगट होतो.

ऐकून तिच्या पाठिवरून हात फिरवायला आणि आडोसा करायला धावून आलेले ढग नक्की निळेसावळेच ; असणार. माझा हा तलावही एरवी सदैव मला निळासावळाच दिसतो. माझा तलाव, या पुरातनाच्या संदर्भात मी कोण, कुठली, आणि कितपत ? हे सगळे प्रश्न | खरेच आहेत. पण त्याचबरोबर त्या तलावाशी माझे काहीतरी नाते आहे, हेही एक शाश्वत सत्य आहे. । त्याशिवाय का ही भरती ओहटीसारखी ओढ चालू राहील.

आज या सुंदर काळ्याभोर रात्री काळी वस्त्रे लेऊन आणि काळी घागर घेऊन मी गुपचूप तुझ्यापाशी आले आहे. मला आज तुझ्या पोटात शिरून तिथले वैभव एकदा डोळे भरून पहायचे आहे. तुझ्या काठाशी पायरीवर बसून तुझ्यापाशी आले आहे. मला आज तुझ्या पोटात शिरुन तिथले वैभव एकदा डोळे भरून पहायचे आहे. तुझ्या काठाशी पायरीवर बसून तुझ्या त्वचेला मी आजवर अनेकदा स्पर्श केला. पण या क्षणी तुझ्या पोटात शिरताच लक्षात आले ते सुर्यप्रकाशात दिसणारे छोट्या छोट्या माशांचे विभ्रम तो पावलांना आणि हातांच्या बोटांना जाणवणारा गारवा, हे सगळे तुझे वरवरचे रुप आहे. हा आतला ओलावा या जिवंत ऊर्मी, या आजीच्या आई- आप्पांच्या स्पर्शासारख्या रेशमी आहेत. उन्हात उडणारी पाखरे आपल्या पंखांनी निळ्या हवेचा वारा घेतात ना तशी माझ्या हातांनी मी हे तुझ्या पण्याचे काळे झुळझुळीत रेशमी शेले पांघरत आत आत शिरते आहे. द्रौपदीनेही एकटेपणाच्या त्या अंतिम क्षणी असेच कृष्णाच्या मायेचे अनंत रेशमी शेले पांघरले नव्हते का? मीही आता तशीच निर्धास्तपणे कुठल्याही यमाच्या राजदरबारात जाऊ शर्केन.

आजवरची सगळी धावपळ कधीच मागे पडली आहे. तुझ्या अंतरंगातल्या या प्रवासाचा मार्ग आखीव नाही. त्यामुळे किती मोकळे वाटते आहे! निवृत्त होऊन या जगात स्थिर होण्यापेक्षा मृत्युच्या दिशेने नेणारी का होईना पण गती किती सुंदर, विलोभनीय असते! जिवंत पाण्याने भरलेला हा आसमंत. खऱ्याखुऱ्या शांतीचा साक्षात्कार आज प्रथम होतो आहे. श्वासाचीही हालचाल. नसलेली, केवळ जाणिवेतली शांती. तुझे सगळे वैभव पाहायला पाहुणीसारखी आज कसल्या तरी अनाकलनीय ओढीने ही माहेशवाशीण तुझ्या राज्यात प्रवशे करतेय.

तुझ्या आसऱ्याला आलेल्या साऱ्या दुःखितांना तू तुझ्या लौकिकाला साजेसाच निरोप दिला असशील. सतीला शृंगारतात तसे दागदागिने घालून, शेवाळी शालू नेसवून, ओटी भरून, जलचरांची सोबत देऊन किंवा कसाही, पण तुझ्या परिने भरभरून. पण मी त्या अर्थी दुःखजडीत होऊन इथे आलेली नाही. तशी मी संपन्न आहे. मला काही म्हणता काही कमी नाही हे तूही जाणतोसच ना ? पण माझ्या भाळी सुखाची व्याख्या लिहिताना नियतीने एक वेगळीच अदृश्य शाई वापरली आहे. ती व्याख्या, ते सुख तुलादेखील वाचताही येणार नाही आणि पुसताही येणार नाही. म्हणून सांगते, इथून परतताना मी मोकळ्या हातीच माघारी येणार आहे. माझी ही भरली घागरही मी तिथेच ठेवून येणार आहे.

तुझ्याकंडे यायला निघाले तेव्हा मी पाण्याला म्हणून इथे आले खरी, पण आता ती तहानही निवाली आहे. परतीच्या प्रवासात शिदोरी म्हणून मला एकच निश्वास सोबतीला हवा आहे. हा तुझा, माझा आणि आपल्या जातीच्या साऱ्यांचा अटळ एकटेपणा आहे ना, त्याच्या वेणा आतून जेव्हा जेव्हा टाहो फोडू लागतील. त्या त्या क्षणापुरती तरी तुझी ही मौनाचीच भाषा माझ्या ओठी नांदेल, असा आशीर्वाद मला देशील का?

सुनीता देशपांडे 
साभार : सोयरे सकळ
लोकसत्ता २०११

हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

Wednesday, March 1, 2023

आठवणीतील पु.ल. - मंगेश पाठक

पुलंच्या निधनानंतर साहित्य किंवा चित्रपटसृष्टी- प्रमाणेच आणखी एक मैफल सुनी झाली. ती साहित्यिक गप्पांशी किंवा वाङमयीन वैशिष्ट्यांशी संबंधित नाही, पुलंच्या धमाल विनोदी नाटकांशीही संबंधित नाही. ही मैफल आहे कायमस्वरुपी स्मरणात राहणाऱ्या पुलंच्या फिरक्यांची ! वेळोवेळी संधी मिळेल तिथे पुलं हास्याची कारंजी फुलवायचे. त्यांच्या धमाल विनोदांमुळे आणि कोट्यांमुळे छोट्या वाटणाऱ्या अनेक गाठीभेटीही अविस्मरणीय झाल्या. प्र. के. अत्रे एकदा एका अंत्ययात्रेला गेले तेव्हा तिथले गंभीर वातावरणही बदलले. तशा वेळी अवघड परिस्थितीतही हास्यतुषार उडू लागले अशी आठवण सांगतात. पुलंबाबत असं घडल्याचं ऐकीवात नसलं तरी त्यांच्या मृत्युच्या बातमीनंतरही त्यांचे सुहृद अशा किस्स्यांबाबत आवर्जून बोलले. दुःखावेग आवरत त्यांनी अशा किस्स्यांना वाट मोकळी करुन दिली. कारण हे केवळ किस्से नव्हते तर त्यात अस्खलित विनोदबुध्दी आणि उच्च श्रेणीचा हजरजबाबीपणा यांचा मिलाफ होता. कदाचित म्हणूनच एका डोळ्यातून आसवं वाहताना दुसरा डोळा ठराविक प्रसंग समोर उभा करून विनोदात रमताना दिसत होता.

पुलंबाबत एक आठवण सांगितली जाते. आयुष्यातलं पहिलंच भाषण करताना बाल्यावस्थेतील पुलं नेमक्या क्षणी अडखळून बसले. त्यांचं भाषण पुढे सरेना. परिणामी बोबडी बंद झाली. पण वेळ मारुन न्यायचे आणि हजरजबाबीपणाचे बाळकडू त्यापूर्वीच त्यांना मिळाले असावे. म्हणून तर 'आता माझी दूध घ्यायची वेळ झाली' असा बहाणा करत पुलं तिथून निघून गेले. पुलंच्या व्यक्तिमत्वापासून तसूभरही दूर न करता येण्याजोग्या अशा किस्स्यांची कमतरता त्यांच्या साहित्यिक मित्रांना कधीच जाणवणार नाही. ज्येष्ठ समीक्षक बापू वाटवे यांनी असाच किस्सा कथन केला होता. बापूंचा पुलंशी जवळचा परिचय होता. त्यांना पुलंच्या घरी जाण्यासाठी कधीच परवानगी लागायची नाही. एकदा बापू असेच गणांगण रंगवण्यासाठी पुलंच्या घरी पोहोचले. पुलं झोपले असतील किंवा विश्रांती घेत असतील असा त्यांचा अंदाज होता. कारण त्या सुमारास त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची चर्चाही सुरु होती. बापूंनी दबकतच त्यांच्या घरी पाऊल ठेवलं आणि पाहतात तो काय, पुलं एका हातात पेटीचा भाता ओढत गायन- वादनात रमले होते. हे दृश्य पाहून बापूही चक्रावले. विनाविलंब पुलंच्या मैफलीत सहभागी होत त्यांनी कौतुक सुरू केलं. शेजारीच भरपूर उकडलेल्या शेंगा होत्या. त्या रसरशीत शेंगांची चव चाखत बापूंनी संगीताला दाद द्यायला सुरूवात केली. बराच वेळ ती मैफल रमली. मैफल संपताच बापू म्हणाले, 'वा भाई, छानच पेटी वाजवली. या वादनाचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर लोकांना पैसे मोजावे लागतात. मी तर फुकटातच आनंद घेतला'. बापूंचं बोलणं ऐकून शांत बसतील ते पुलं कसले ? एक क्षणही न गमवता त्यांनी विचारलं, 'फार वाईट वाटतंय का ? तसं असेल तर पाच-पंचवीस रुपये देऊन टाक!' पुलंच्या या मल्लिनाथीनंतर उपस्थित हास्यसागरात बुडून गेले.

असाच आणखी एक किस्सा बापूंनी रंगवला होता. पुलंच्या आजाराविषयी सर्वत्र चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली. जवळचे मित्र अनेक डॉक्टरांची आणि उपचारपध्दतींची माहिती देऊ लागले. पण दूरदूरचे काही हितचिंतकही पुलंकडे गर्दी करु लागले. त्यांना नव्या आणि वेगळया उपचारपध्दतींविषयी माहिती देऊ लागले. अशाच एक बाई पुलंना भेटायला आल्या. त्या सुमारास 'रेकी'ची बरीच चर्चा होती. या उपचारपध्दतीचा पुलंना फायदा होईल असं वाटल्याने ती "बिचारी बाई लांबून आली होती. पुलंकडे बराच वेळ थांबून त्या बाईने रेकीची माहिती सांगितली. बराच वेळ ती बाई या उपचारपध्दतीचा फायदा पुलंनी घ्यावा असं सुचवत होती. पुलंच्या लेखी तिचं समजावणं आणि मागे लागणं थोडसं अतीच होत होतं. पण ते काही बोलले नाहीत. थोडया वेळाने त्या बाई निघून गेल्या. बापू त्यावेळी तिथेच होते. त्या बाई निघून जाताच पुलंनी दार लावून घ्यायला सांगितलं. दार लावून घेताच बारीक नजरेने तिथे पहात ते बापूंना म्हणाले, 'काय रे ती 'अति-रेकी' गेली का ?' पुलंनी केलेली ही कोटी त्यावेळी चांगलीच दाद मिळवून गेली. बघता बघता दोघेही जोरजोरात हसू लागले.

पुलंना ज्या प्रयाग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथल्या मंडळींनाही पुलंनी सोडलं नाही. डॉ. शिरीष प्रयाग यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह जुळला होता. १९८६ मध्ये डॉ. प्रयाग यांच्या रुग्णालयाचं उद्घाटन पुलंनीच केलं होतं. या उद्घाटनप्रसंगी पुलंनी डॉ. प्रयाग यांची फिरकी घेतली. त्यांनी भाषणाला सुरूवात केली आणि संपूर्ण रुग्णालयावर एक नजर टाकली. आजूबाजूला डोकावून पाहिल्यानंतर ते उत्तरले, 'शिरीषकडे येणारे रुग्ण अत्यवस्थ असू शकतात. शक्यतो लोकांना त्याच्याकडे यायची गरज पडू नये. पण अशी गरज पडलीच तर हे रुग्णालय सर्व बाबतीत सुसज्ज आहे'.पुलंचं हे म्हणणं ऐकून उपस्थित मंडळींमध्ये चांगलीच खसखस पिकली होती.

एखाद वेळी स्वत: एखाद्या कामासाठी जवळच्या स्नेह्याला फोन केला तरी पुलंची विनोदबुध्दी जागृत असायची. आपलं काम आहे म्हणून ते समोरच्याची फिरकी टाळायचे नाहीत. त्यांच्यासंदर्भातला असाच एक किस्सा इथे सांगण्याजोगा. एकदा पुलंना 'धर्मात्मा'चं बुकलेट हवं होतं. त्या बुकलेटवरील बालगंधर्वांचा फोटो ते शोधत होते. एका मित्राला त्यांनी फोन केला आणि म्हणाले, 'काय रे, तुझ्याकडे 'धर्मात्मा'चं बुकलेट आहे का ? मला ते हवं आहे.' पलिकडून मित्र म्हणाला, 'हो, माझ्याकडे ते बुकलेट आहे.' यावर पुलंनी विचारलं, 'काय रे, तुझ्याकडे हे बुकलेट कुठून आलं? तू तर 'धर्मात्मा'मध्ये कामही केलं नव्हतस.' मित्र उत्तरला, 'अरे मी काम केलं असतं तर तो चित्रपट चालला असता ना !' मित्राच्या या विधानावर पुलंची प्रतिक्रिया आली नाही. हे लक्षात येताच त्याने पुन्हा विचारलं, 'काय पीएल, दुसऱ्याच्या विनोदांना हसायचा रिवाज तुमच्याकडे नाही का? का आम्हीच तुमच्या विनोदांना दाद द्यायची?'

मित्राच्या या प्रश्नावर पुलं शांतपणे उत्तरले, 'अरे मित्रा, विनोदाला दाद देण्याचा रिवाज आमच्याकडे अवश्य आहे. पण त्यासाठी मुळात विनोद घडायला हवा ना.' पुलंचा हा शेरास सव्वाशेर प्रतिसाद ऐकल्यानंतर मात्र मित्राची आणखी काही प्रश्न विचारायची हिम्मत झाली नाही. पुलंनी परिचित, स्नेही, मित्रमंडळी सर्वांनाच आपल्या फिरकीचं लक्ष्य बनवलं. मात्र, स्वत: वरील विनोदही नाकारले नाहीत. प्रयाग हॉस्पिटलबाहेर चित्रपट निर्माते राम गबाले, जब्बार पटेल, दिलीप माजगावकर आणि इतर अनेकजण पुलंबद्दल भरभरुन बोलत होते. त्याच वेळी आणखी एक आठवण पुढे आली. शेवटी पुलंना पायावर जोर देऊन उभं राहता यायचं नाही. ते व्हिलचेअरवरच असायचे. अशाही परिस्थितीत मित्रमंडळींना बोलावणं, त्यांच्याशी गप्पा मारणं कमी केलं नव्हतं. मित्रमंडळीही चलाख. पुलंबरोबर गप्पा मारायची संधी मिळाली की त्यांची थोडीशी टर खेचायची संधी तेही सोडायचे नाहीत. पुलं व्हिलचेअरवर बसून गप्पा मारताना त्यांना पाय टेकवून उभं राहता येत नाही हे एका मित्राच्या लक्षात आलं. त्याने लगेच मल्लिनाथी केली, 'आता पीएलचे पाय जमिनीला लागत नाहीत पहा.' त्याचं हे विधान ऐकून एक समयोचित सुंदर विनोद घडल्याचं पाहून सारे जण हसू लागले. पुलंनीही समरसून त्यांना दाद दिली. पुलंच्या अशा असंख्य आठवर्णीना अजूनही उजाळा दिला जातो. त्यांच्या शाब्दिक कोट्या, प्रसंगनिष्ठ विनोद आणि हजरजबाबीपणा यावर आवर्जून बोलले, लिहिले जाते. खंत एकच आहे, ती म्हणजे आता अशा कोट्या फारशा ऐकायला मिळत नाहीत आणि प्रसंगनिष्ठ विनोदातली ती नजाकत दुर्मिळ झाली आहे.

मंगेश पाठक
दैनिक महानगर

Monday, February 20, 2023

रोज एक . . . - उरलंसुरलं

मेहेरबाण संपादक ' अणिल ' यास
संभा नाभाजी कोतमिरे याचे
प्रेमप्रूर्वक दंडवत ...

अनंतचतूर्दशीला श्री. गनरायाचे वीसर्जण केले आनी तुम्हास हे पत्र लीहावयास बसलो आहे. खरोखर त्या दाहा दीवसांत शेकेट्री म्हनून माला जे अणुभव आले ते तुम्हांला दाहा पुस्तके वाचूण सूधा येनार नाहीत. आपल्या देशात जे जे काही चालत आहे — ज्या ज्या भयंकर गोस्टी घडत आहेत त्या सर्वांचे काय कारन असावे याचा अणुभव मला त्या दाहा दीवसांत आला. फक्त कुठल्याही बाबतीत शीस्त नाही हेच खरे.

सादी गोश्ट. मंडपामधे बायकांणी कूठे बसावे व पुरसाणी कुठे बसावे ह्याचे केवढे मोठे बोरड लावून ठेवले होते. पन एकजन शीस्तीणे बसले तर शपथ. तरी बरे, मी स्वैंयसेवकाची टोळी शिकवून तालिममास्तराच्या हाताखाली तयार ठेवली होती. पन काही उपयोग नाही. सर्व गोंधळ. नऊचा कार्यक्रम आसला तर दाहापासून येक वाजेपर्यंत केव्हाही यावे, केव्हाही जावे.

भासन असो वा चांगले गाने असो यांच्या आपल्या गफ्फा चाललेल्या. मग त्या गानाराबोलना-याला आपन कीती गोंधळात टाकीत आहो याचा वीचारच नाही. बरे मधूनच एकदम उठून जाने—जाताना नीमूटपणे जावे तेही नाही. आपल्या कुठेकुठे बसलेल्या पोराबाळांना मोठमोठ्याणे हाका मारीत सर्व मंडळींचा चालू कार्यक्रमातील लक्ष्य काढूण आपल्याकडे ओढने असला आचरटपणा करन्यात आपले लोकांणा काडीचीही लाज वाटत नाही हे पाहून मी मणातल्या मणात भडकून जात असे. प्रंतु मी जबाबदारीच्या जागेवरआसलेणे आपले डोक्यावर बर्फाचा खडा आहे आशा समजुतीणेच वागन्याचे ठरिवले होते. त्यामुळे शक्य तीतके भांडनतंट्याचे प्रसंग टाळले.
प्रंतु दूर्दैवाणे एक प्रसंग मला टाळता आला नाही. स्त्रियांचा कार्यक्रम चालू असताणा काही हलकट लोक आचरटपना करन्याच्या ऊदेशाणे तेथे आलेले दीसले. त्यांच्यापैकी एक नीसटला पन् चौगेजन मात्र खात्रीणें हळदमीटाचे पलिस्तर बांदून बसले आसतील. भलता चावटपना माला खपत नाही आनी तसा दीसला तर मी तोंडाचा ऊपयोग न करता हाताचाच करतो.

आपले लोकांणा बरेच गोशटीचे शीक्षण द्यावयास पाहिजे हे मात्र खरे. ऊदाहरनार्थ रस्त्यात पाण खाऊन थूकने. परवा आमच्या मंडपात एकजन पीचकारी मारत आसताना आमच्या मेव्हन्याने त्याचे तोंड भाहेरुणही रंगिवले. माला वाटते बरेच वेळा पायातल्या वहानेला हाताशी धरल्याशिवाय सुदारना होत नाही. हा आपला माजा रांगडा न्याय आहे. पन जगात दुबळेपना सारका श्राप नाही. नम्रपना असावा पन लाचारी नसावी. आता मी यवढ्या मोठमोठ्या बंगलेवाल्यांकडे चीकी विकतो पन कदी कोनाची लाळ घोटत नाही. ऊगाच ' साहेब ' 'हुजूर ' कशाला ? माला येक गोश्ट कळते. चीकी अशी हवी की जी पाहून तोंडाला पानीच सुटले पायजे. मग ते तोंड कुनाचे आहे हा सवाल नाही. एकदा त्या वस्तूवर मण गेले की मानूस ते घेनारच. फक्त लोकांची मणे ओढन्यासाठी तुम्ही मासीकवाल्याप्रमाने बायाबापड्यांची रंगीबेरंगी अब्रू चवाठ्यावर मांडली नाही. म्हनजे झाले ! चिकीच्या वरच्या कागदावर बाईचा मुखवटा चिटकावून चीकी खपवन्याची पाळी जर मजवर आली तर खुशाल हमालाचा धंदा करीन.

माज्या म्हनन्याचे तात्पर्य हेच. धंदा असो, लीहीने छापने असो, आथवा चारचौघांत वागने असो आपल्या लोकांला जंवर शीस्तीची आवड नाही तंवर आपल्या देशाचे पाऊल कधीच फुडे पडनार न्हाई. स्वताच्या जबाबदारीची जानीवच आपनाला नाही. परवाच येका शाळेच्या दारात मी चीकी वीकत उभा होतो. पाच मास्तरांपैकी चार मास्तरांची धोत्रे कळकट दाड्या वाडलेल्या आनी चेह-यावर मुडद्याची कळा ! धोत्रे फाटकी आसती तर गरीबुमुळे आहेत म्हटले आसते पन कळकटपनाचे गरीबीशी काय नाते ? बरे साहापैशाच्या पात्यात दाहा दाढ्या होतात. आता संपादक माहाराज , तुम्हीच सांगा पोरांना वळन लावना-या मास्तरांना स्वताची शीस्त सांभाळायला नको का ?

परवाच्या ऊच्छवात असेच. दोनतीन भाषने ठेवली होती. पन भाव न देनारा एक जन वेळेवर आला आसेल तर शपत. कोन तास भर ऊशीरा तर कोनाचा येतच नाही म्हनून निरोप ! आनी हिते आपला शेकेट्री बसला आहे ताम्हनात देव बुडवून ! आनी लोक जांभया किंवा शिव्या देताहेत. आपल्याला आपल्या कामाचे, वेळेचे, जबाबदारीचे, कसलेच महत्त्व नाहि त्यामूळे आसे होते. पन ह्या सर्वांचे मूळ ती 'शीस्त' तीचा दुष्काळ ! मग सुदारना कसली नी काय कसले ?

तुमचा क्रुपाबिलाशी,
संभा नाभाजी कोतमिरे
( चीकीचे व्यापारी )
अनिल साप्ताहिक, १८/०९/१९४७

— पु. ल. देशपांडे 
संग्रह - उरलंसुरलं

ता.क. — पंतप्रधानांनी केलेले सार्वजनिक स्वच्छतेचे आवाहन अन् 'आप'च्या झाडूने राजधानीत केलेली ' राजकिय साफसफाई ' या पार्श्वभूमीवर पुलंचा १९४७ मधे लिहिलेला सार्वजनिक शिस्तीवरचा हा लेख खरोखरचं अप्रतिम !!!
उपरोक्त ता.क. नुसार फेब्रुवारी २०१५ साली प्रसृत केलीली ही पोस्ट आहे...
संग्रहक -  संजय आढाव