Tuesday, June 24, 2025

कालोचित पुलं ! (अक्षय वाटवे)

पु. ल. देशपांडे यांचा १ २  जून हा स्मृतिदिन. त्यांना आपल्यातून जाऊन पंचवीस वर्षे उलटली आहेत, असे आजही वाटत नाही. त्यांचे साहित्य आजही कालोचित का वाटते, त्यांचे कथाकथन आजही 'व्ह्यूज' का मिळवते, याची ही कारणमीमांसा...

मराठी माणसाला दिलखुलास हसायला शिकवणारे, काळजाचा ठाव घेणाऱ्या संगीताच्या तालावर डोलायला लावणारे, दानाचे महत्त्व कृतीतून पटवून देणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. ‘कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचे हे सांगून जाईल,’ एवढ्या सोप्या भाषेत त्यांनी जगण्याचे मर्म उलगडून सांगितले.

असे बहुआयामी बहुरूपी पुलं देहरूपाने आपल्यातून जाऊन पंचवीस वर्षे लोटली. या एवढ्या काळात त्यांचे ना नवे लेखन प्रकाशित झाले; ना त्यांनी नवीन गाणे संगीतबद्ध केले; ना नाटक किंवा इतर काही. असे असले, तरी आजही सोशल मीडियावर सर्वत्र त्यांचा मुक्त संचार आहे. तरुण मंडळी त्यांची अवतरणे टी-शर्टवर मिरवत आहेत. त्यांचे चाहते ‘पु. ल. प्रेम’ नावाचा ब्लॉग चालवतात आणि त्याला लाखो व्ह्यूज मिळतात. त्यांच्या नावाने महोत्सव साजरे होतात. त्यांच्या विनोदला वंदन करून, मराठी स्टँडअप सादर केला जातो आहे. हे सगळे पुलंच्या पश्चात गेली पंचवीस वर्षे आव्यहत सुरू आहे. का? निव्वळ लोकप्रियता? नाही. निर्विष विनोदातून, मराठी माणसाच्या आयुष्यावर त्यांनी केलेल्या साखर पेरणीमुळे, सुरेल संगीतातून रोजच्या जगण्यावर त्यांनी घातलेल्या हलक्या फुंकरीमुळे (पाऊस सुरू झाल्यावर ‘नाच रे मोरा’ आठवतेच) आणि आपल्या जवळचे कोणी आपल्याशी खासगीत ऐसपैस गप्पा मारत आहे, अशा थाटात रसिकांवर प्रेम करून, त्याला सतत आनंदी राहण्याचा कानमंत्र दिल्यामुळे पुलंना ही अपार लोकप्रियता लाभली असावी. दिवसागाणिक ती वाढते आहे. हा आनंदाचा ठेवा मराठी माणसाच्या पुढच्या पिढीने खुशीने लुटावा, यासाठी अनेक मंडळी स्वयंप्रेरणेने उपक्रम राबवत आहेत. पुलं असताना आणि आज त्यांच्या मागेही त्यांच्या साहित्यावर टीका झाली नाही, असे नाही. दर काही वर्षांनी पु. ल. देशपांडे यांचे साहित्य कालबाह्य झाले, म्हणजे आधुनिक मराठीत सांगायचे तर ‘आउट डेटेड’ झाले अशी आवई उठते. त्यांनी अमुक का केले नाही किंवा तमुकच का केले, असे प्रश्न विचारण्याचा मोहही अनेकांना आवरत नाही. या सगळ्यांतून नक्की काय साध्य होते? पु. ल. देशपांडे यांचे लेखन हे ‘साहित्य’ या एवढ्या चौकटीत मर्यादित राहिलेले नाही, तर तो आता अभिजात मराठीचा एक अविभाज्य संस्कार बनला आहे.

हा कालबाह्यतेचा मुद्दा अधूनमधून वर येतो, त्याचा प्रमुख आधार म्हणजे पुलंच्या लेखनात येणारी चाळीची, गावाची वर्णने, किंवा तात्कालीन संदर्भ. त्यांच्या पात्रांची वेशभूषा, त्यांची जीवनपद्धती वगैरे घटक आज शिल्लक उरलेले नाहीत. केरसुणी, घडवंची, लुगडी, स्टोव्ह वगैरे शब्दप्रयोग आज वापरात नाहीत; कारण या वस्तूच आपल्या दैनंदिन जीवनातून नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे हे संदर्भ आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या गमतीजमतींची आजच्या पिढीला कदाचित सांगड घालता येणार नाही. हे मान्य केले, तरी त्या व्यक्तीचित्रणातील व्यक्तीरेखा, त्यांच्या स्वभावाचे कंगोरे, त्याला असलेली भावनिक किनार, त्यातला रसरशीत ताजेपणा हे सारे ठळकपणे समोर येतेच.

मराठी भाषेचा वापर व्यवहारापुरता आणि जेमतेम करणाऱ्यांना पुलंच काय, एकंदरीत मराठी भाषाही आउट डेटेड वाटू शकते. मात्र, प्रत्यक्षात पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यकृती दीपस्तंभाप्रमाणे किंवा नभांगणातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ दिशादर्शक आहेत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पुलं सर्वार्थाने ‘परफॉर्मर’ असल्यामुळे त्यांनी तत्कालीन बहुसंख्य मराठी माणसाच्या दैनंदिन जीवनात हक्काचे स्थान पटकावले होते. सुशिक्षित, मध्यमवर्गीय आणि अधिकतर शहरी मराठी माणसाचे जगणे पुलंनी आपल्या लेखनातून, नाटकातून, कथाकथनातून, एकपात्री प्रयोगांतून, चित्रपटांतून, दूरदर्शनवर सादर केलेल्या कार्यक्रमांमधून मांडले. त्यांनी निव्वळ हसवले नाही, तर या वाचक-प्रेक्षकाच्या अत्यंत समीप वर्तुळातील जिव्हाळ्याचे स्थान त्यांना मिळाले, म्हणून तर त्यांच्या निधनानंतर आपला माणूस गेल्याची भावना अनेकांच्या मनात दाटली.

त्यांच्या कथनशैलीत अभिनिवेश नव्हता, आक्रमकता नव्हती, कसलाही डांगोरा पिटलेला नव्हता. अगदी सहज; पण अत्यंत बारकाईने माणसाच्या वेषाची, स्वभावाच्या विविध पैलूंची, त्यांच्या जीवनातल्या व्यामिश्रतेची केलेली मिश्कील निरीक्षणे वाचकांना सापडली. त्या निरीक्षणातून एका आनंदयात्रीचा जीवनातली मज्जा उलगडवून दाखवणारा सोपा मार्ग सापडला. पुलंची अनेक वाक्ये आमच्या मागच्या पिढीत, आमच्या पिढीत आणि मधल्या पिढीतही रोजच्या बोलण्यात सहज येऊ लागली. बोलताबोलता टपल्या मारण्यासाठी आम्हाला नर्मविनोदाचा आदर्श पुलंनीच घालून दिला. बघण्याची दृष्टी तिरकस असेल; पण नजर बोचरी नव्हती. ज्या काळात स्टँड अप कॉमेडी नावाचा प्रकार महाराष्ट्राला माहीत नव्हता, त्या काळात पु. ल. देशपांडे या प्रकारातले ‘ग्रेट एंटरटेनर’ होते. ते कालातील असण्यासाठी ही एवढीच करणे नाहीत, तर त्यांचे विविध मार्गांनी मराठी साहित्य आणि समाजाच्या जडणघडणीमधे सहभागी असणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते.

सामाजिक कार्यात, विविध साहित्य विषयक उपक्रमांत, रंगमंचावर, दूरदर्शनवर सर्व ठिकाणी अत्यंत जिव्हाळ्याने आणि आपुलकीने सहभागी व्हायचे. हे सर्व निगुतीने निभावताना आलेल्या प्रत्येक पत्राला जातीने उत्तर देणे, चाहत्यांशी, वाचकांशी अत्यंत सहृदयतेने संवाद साधणे अशा स्वभावविशेषामुळेही त्यांना रसिक वाचकांचे हृदय सिंहासन सहज प्राप्त झाले. हे करतानाच त्यांनी स्वतःतला चोखंदळ रसिक वाचक लोप पावू दिला नाही. अनेक लेखक, कलावंतांची त्यांनी पाठराखण केली. प्रोत्साहन दिले. त्यांच्याविषयी लेखन केले. हे सारे करताना त्यांनी कोणताही बडेजाव केला नाही. एका हाताने केलेले कार्य दुसऱ्या हाताला कळणार नाही, याची खबरदारी घेतलेली असायची. त्यामुळे त्यांचे साहित्य आणि त्यांचा सामाजिक जीवनातील वावर वेगळा काढता येणार नाही, असेही वाटते. त्यांचे संवेदनशील कलाकार असणे आणि सजग माणूसपणदेखील वेगळे काढता येत नाही.

एखाद्या लेखक कलावंताविषयी अशी संपूर्ण आश्वासकता वाटावी, असे दुसरे उदाहरण सापडणे दुर्मीळ आहे. पुलंवरच्या अफाट प्रेमातूनच मराठी माणूस त्यांच्या साहित्याच्या पालखीचा भोई झाला. ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असामी’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’, ‘हसवणूक’, ‘गणगोत’ अशी सर्व प्रकाशित पुस्तके; शिवाय त्यांच्या भाषणांचा संग्रह, अनुवादित साहित्य, ध्वनीचित्रफिती वगैरे असा सगळा माणिकमोत्यांहून मूल्यवान ऐवज या प्रेमाच्या पालखीत मराठी रसिक वाचकाने सजवला. अभिजात मराठी भाषेच्या साहित्य-संस्कृती दिंडीत ही पालखी आजतागायत तो दिमाखात मिरवतो आहे; मिरवत राहील...

असा अंतर्बाह्य कला, साहित्य, संस्कृतीशी समर्पित असलेला आणि समाजाविषयी सदोदित जागरूक असणारा बहुरूपी बहुआयामी लेखक सहजासहजी विस्मरणात जाणे शक्य नाही. तसे झाल्यास तो मराठी भाषकांचा करंटेपणा किंवा दुर्दैव म्हणावे लागेल.

-अक्षय वाटवे
https://www.instagram.com/akshay_watve/
१ २ जून २ ० २ ५
महाराष्ट्र टाईम्स


0 प्रतिक्रिया: