Thursday, October 14, 2021

मी ब्रम्हचारी असतो तर...

ब्रम्हचर्याच्या त्या स्वतंत्र अमदानीत आम्ही आमचे बादशहा होतो. आणि आज... पूर्वेला जाण्याचा विचार सुद्धा त्या सुर्यनारायणाच्या मनात येण्यापूर्वी आमच्या गृहलक्ष्मीचा गजर होतो : "उठा! दूध आणायच आहे. उशिरा जाता आणि मग दुध संपलं म्हणून सांगत येता!" ही भुपाळी!

पूर्वीच्या बायका म्हणे सकाळी उठून सडासंमार्जन करून गाईची धार काढत होत्या. कुठं गेल्या त्या माऊल्या? आमचं कुटुंब पहाट फुटण्यापूर्वी आम्हांला धारेवर धरतं. दिवसा तिच्या एकूण अवतारामुळं तिच्या डोळ्याला डोळा देण्याचं धाडस मला होत नाही आणि रात्री तिच्या घोरण्यामुळं माझ्या डोळ्याला डोळा लागतं नाही. वर पुन्हा मीच घोरतो ही तीची तक्रार. स्वप्नातसुद्धा कधी घोरल्याचं मला आठवत नाही. आमच्या लग्नाला आता एक तप होत आलं. बारा वर्षांना एक तप कां म्हणतात हे मला आता लग्न झाल्यावर कळायला लागलं. वैवाहिक जीवनाचं हे एक तप खरोखरीच उग्र आणि खडतर आहे. काॅलेजमध्ये एक तप काढलं. शेवटच्या वर्षी म्हणजे इंटरला असताना माझ्या आराधनेला यश येण्याची संधी आली होती ; पण हुकली आणि शांत हिमकन्या गौरीची आराधना करावी आणि महिषासुरमर्दिनी प्रसन्न व्हावी असं काहीसं झालं. आपलेच दात आणि आपलेच ओठ! घरात बोलायची चोरी, बाहेर काय बोलणार?

माझ्या कुठल्याही मताला विरोध करायचं तर तिनं कंकणच बांधलय! साधी बाब, मी कधीतरी खुषीत येऊन सांगायला जातो, " अग ऐकलंस का? गेल्या महिन्यात आपल्याला ते गणपतराव भेटले होते ना?
लगेच तिचा विरोध : "गेल्या महिन्यात कुठले, परवा तर भेटले होते."

मी : (नरमाईनं) हो. परवा आपण बघ सिनेमाला चाललो होतो-

ती : परवा कुठले सिनेमाला चाललो होतो? सिनेमाला जाऊन झाले चार महिने! बंडूला दाखवायला नेलं नव्हतं का डाॅक्टरांकडे?

मी : हो हो! डाॅक्टर जोशांच्याकडे-

ती : डाॅक्टर जोशी कुठले? डॉक्टर जोशांकडे मी गेले होते-विमलच्या खेपेला! हे डाॅक्टर टेंबे-

मी : हो- म्हणजे बुधवारातले.

ती : बुधवारात केव्हा गेले ते? सदाशिव पेठेतच नाही का? हौदापाशी.

मी : तेच, म्हणजे तुझी मावशी राहते तिथंच की समोर--

ती : मावशी राहते! काय मेलं जिभेला हाड? आज वरीस झालं मावशी जाऊन! मायेच्या माणसांच्या आठवणीसुद्धा राहात नाहीत कशा त्या बरोबर! माझ्या माहेरची ना माणसं? तुम्हाला ती रीतीभाती नसलेली तुमच्याच घरची माणसं हवीत. आपल्या लग्नात मेला खण दिला होता माझ्या आईला, तोसुद्धा सुती! इथून सुरवात होते आणि शेवट कसा होतो हे सुज्ञ जाणतातच-मी कशाला सांगू? बायको काही असं वेडंवाकडं बोलायला लागली की वाटतं, की मी ब्रम्हचारी असतो तर असल्या बायकोला चांगली वठणीवर आणली असती--पण... ब्रम्हचारी असतो तर बायको तरी कुठली म्हणा! मुद्दा चुकलाच जरासा!

----------------------------------------

मोकळ्या हवेतलं फिरणं दूर राहातं आणि तासाभरानं संसाराचं ओझं घरी आणून हुश्श करत खाली बसतो, तोच ट्रिपला गेलेली अपत्यं परत येतात. त्या पैकी एकीला खोक पडलेली असते, दुसरीच्या पायाला नवा बूट लागलेला असतो. काही वेळानं तो लागणारा बूट हरवल्याचं ध्यानात येतं आणि धांदरटपणाबद्दल प्रत्येकास पारितोषिकं मिळून, हा धांदरटपणा बापाच्या वळणावर सगळी कार्टी गेल्यामूळं आला, असा मौलिक शोध लागतो! समस्त पूत्ररत्नांचा आक्रोश आटोपल्यावर आम्हाला गिळायला येण्याचा हुकूम होतो. मी निमूटपणे गिळून उठतो आणि रविवार संध्याकाळ असल्यामुळं दुपारची जेवणं उशिरा होतात ह्या सबबीखाली केलेला कागद चिकटवायच्या खळीसारखा खिचडी नामक पदार्थ खाल्ल्याचा अभिनय करून उठतो. त्या बद्दल तक्रारीचा सूर काढल्यास "चाळीतल्या सगळ्या शेजाऱ्यांच्या घरी काय खातात एकदा बघून या-" असा हुकूमनामा होतो, हे ठाऊक असल्यामुळं मी "वा! छान झाली आहे खिचडी!-- तू खा की." असा तिला आग्रह करतो. परवा असाच आग्रह केला. लाजण्याचा कठोर प्रयत्न करत ती म्हणाली, "नको."

"का?" मी ही खुशीत येऊन विचारलं.

"नको. खिचडी जात नाही मला. बंड्याच्या खेपेसदेखील खिचडी नकोशी झाली होती मला. विमल, सुमी, बिट्टया, हुप्या ह्यांच्या खेपेला बरीक तसलं काही झालं नाही!" पुढले शब्द मला ऐकू येत नाहीत. खिचडी का नकोशी झाली ह्याचं कारण कळल्यावर सारं जग माझ्या भोवती फिरू लागलं आणि मग मात्र मी आगदी कळवळून ओरडलो,
"अरे अरे, मी ब्रम्हचारी असतो तर..."

मी ब्रम्हचारी असतो तर सुर्योदय सोडा, पण सुर्यास्ता पर्यंत झोपून राहिलो असतो. धोब्याचे कपडे मांडून ठेवावे लागले नसते. सिगारेटी ओढल्याबद्दल कोणाचा उणा शब्द ऐकला नसता. आंघोळीची घाई केली नसती. वाटेल तितक भटकून रात्री बारा वाजता न भिता घरी आलो असतो. पण तो योग नव्हता. कोण्या गाफील क्षणाला मी मान वाकवली आणि माझं स्वातंत्र्य गमावून बसलो. फार कशाला, इथं रेडिओवर भाषण करण्यापूर्वी घरचा रेडाओ नादूरूस्त करून आलो असतो. शेजाऱ्याच्या रेडिओवर जाऊन ही ऐकेल ही भिती नाही. कारण चाळीतली सगळी माणसं मेली भांडखोर आहेत असं तिचं ठाम मत आहे.

तात्पर्य, माझ्या अविवाहित आणि म्हणून सुखी श्रोत्यांनो, पश्चात्तापदग्ध शुक्राचार्याच्या कळवळ्यानं मी तुम्हांला सांगतो, की लग्न करण्यापूर्वी एकदा सावधान!

- पु.ल. देशपांडे
रेडिओवरिल भाषणे आणि श्रुतिका - भाग १

1 प्रतिक्रिया:

गौरीशंकर said...

पुलं खरंच महान