Tuesday, March 19, 2019

पुलंचे सादर होणे... - श्याम पेठकर

पु.ल. ऐन बहरात असताना त्यांना भेटावं, ऐकावं असं वाटण्याचं वय नव्हतं. परिस्थितीही तशी नव्हती. परिस्थितीचा अर्थ केवळ आर्थिक असा नाही. वय, वर्तमान, भूगोल आणि सांस्कृतिक पर्यावरणही यात येतं. पु.ल. मराठी लेखकांच्या पोहोचण्याच्या आणि लोकप्रियतेच्या सार्‍या मर्यादा तोडून केव्हाच बाहेर पडले होते. त्यांच्या आधी इतका उदंड स्वीकार आणि सर्वस्तरातले हवेहवेसेपण, लाडकेपण आचार्य अत्रे यांनाच मिळाले होते. पुलंनी त्याही कक्षा ओलांडल्या होत्या. त्यामुळे सांस्कृतिक समज असलेले शिक्षक असणार्‍या विद्यार्थ्यांपर्यंतही पु.ल. लेखक म्हणून पोहोचले होते.                  
पु.ल. पांढरकवड्यासारख्या आदिवासीबहुल गावातही पोहोचले होते. आताचे अत्यंत मोठे मराठी लेखकही कुणाला फारसे माहिती नसतात. पुल मात्र नावानी, चेहर्‍यानीच नाही तर लौकिकानीही पोहोचले होते. आपल्या हयातीतच एक दंतकथा होण्याचा प्रचंड रसिकाश्रय त्यांना मिळाला होता. याचे कारण होते, ते छापील पुस्तकांत अडकून पडले नाहीत. आपले साहित्य घेऊन ते थेट रसिकांपर्यंत पोहोचले. पुस्तकांच्या पोहोचण्याच्या मर्यादा अजूनही आहेत. आता तर त्याला नव्या माध्यमांचे आणखी अडथळे वाढले आहेत. डिजिटल अक्षरे पाहण्याच्या सवयीने नवी पिढीतर मुद्रित साहित्य वाचण्याची अन्‌ छापील अक्षरांशी तादात्म्य पावण्याची क्षमताच गमावून बसली आहे. त्या काळातही वाचकांची संख्या फार नव्हती अन्‌ ग्रामीण भागांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याची साखळीही नव्हती. त्यामुळेे चांगली, नवी पुस्तके नव्या सुपरहिट सिनेमांसारखीच खूप उशिराने पोहोचायची.

पुलंचे यश हे की, ते त्यांच्या पुस्तकांच्या, लेखनाच्याही आधी त्यांच्या रसिकांपर्यंत पोहोचत असत. कारण ते परफॉर्मर होते. त्यांना हे त्यांचे सादर असणे सहर्ष मान्य होते. कुठल्याही सृजनाची आपली एक कलात्मक भाषा असते. कुणी त्याला जे काय सांगायचे ते सृजनाच्या उचंबळीतून चित्रांच्या माध्यमातून सांगते, कुणी गाणे गाते, कुणी शिल्पातून व्यक्त होतं, तर कुणी लेखन करतं. त्यातही कविता, कथा, कादंबरी, नाटक अशीही मग या सृजन भाषेची अक्षरविभागणी होत राहते... पुलंना अशा खूप सार्‍या भाषा अवगत होत्या. त्यांना गाता येत होते, कविताही ते छान करत, अभिनय करत, नाटक लिहीत, विनोदी लेखक म्हणून तर ख्यातच होते. ते निर्मातेही होते. इतकी बहुमुखी प्रतिभा त्यांच्या ठायी होती, कारण ते मुळात परफॉर्मर होते. त्यांना काहीच स्वत:जवळ ठेवता येत नव्हते. जे काय आहे ते देऊन टाकायचे. प्रवाही असले तर सतत नवे काही येत राहील. त्यामुळे ते निखळ होते. समाजाकडे, माणसांच्या जगण्याकडे ते निकोप मिस्कीलपणे बघत. स्वत:ला मॅजिक आरशासारखे समाजासमोर धरीत. आपल्याच चेहर्‍याची अशी विदुषकी रूपं बघताना हसायला येई... चार्ली चॅप्लीन भारतात जन्मला असता तर तो पु. ल. देशपांडेच झाला असता, असे कधीकधी वाटून जाते. तो मूकपणे व्यंग्य करायचा आणि हे बोलता बोलता हसवत अंतर्मुख करायचे. किशोरकुमारच्या बाबतही असेच वाटते. त्याने कधी लेखन केले नाही... बाकी तीही एक बहुमुखी प्रतिभाच होती.

पुल सादरकर्तेच होते म्हणून ते विनोदी लेखक झाले, की विनोदी लेखकांचे रसिकांच्या समोर जाणे हे भागध्येयच असते? कारण आजवर जगात जितके विनोदी लेखक झाले ते परफॉर्मरच राहिले आहेत. अगदी आपल्या इकडेही द. मा. मिरासदारांपासून ते वि. आ. बुवा किंवा मग आता वर्‍हाडी कवी मिर्झा रफी अहमद बेग यांच्यापर्यंत सार्‍यांनाच सादर होणे आवश्यकच का वाटत आले असावे? रंगमंचावर उभे राहण्यासाठी त्याला स्वत:चा आपला एक आकार हवा असतो. पुलंकडे जी प्रतिभा होती तिची गरज रसिकांशी थेट संवादच साधण्याची होती.

पुल तर इतके नैसर्गिक सादरकर्ते होते की, त्यांना मग औपचारिक व्यासपीठाचीही गरज राहिली नव्हती. त्यांची साधी भेट, हादेखील त्यांचा एक विशेष आणि वेगळा परफॉर्मन्सच असायचा. त्या भेटणार्‍याची अनुभूती हीच असायची की, पुल आज भेटले तेव्हा खास माझ्यासाठी सादर झाले. मग ते कार्यक्रमानंतर कुणाकडे खास आग्रहाने जेवायला गेल्यावरही तिथेही आपला एक वेगळा परफॉर्मन्स द्यायचे आणि मग त्याची नोंद रसिकच ठेवायचे. त्यांच्या अशा अनौपचारिक सादरीकरणांची बखरच रसिकांनी लिहून काढली आणि मग त्यातून पुलंचे किस्से आणि कोट्या वेगळ्याने लिहिल्या गेल्या. प्रकाशित पुलंच्या पेक्षाही हे अप्रकाशित पुलच रसिकांना माहिती आहेत.

पुल नावाच्या लेखकाला वाचक नव्हे तर रसिकच होते. पुल पूर्ण वाचून काढले आहेत, कोळून प्यायलो आहे असे नाही, तरीही पुल पूर्ण माहिती असल्याची अनुभूती बाळगणारे आज ते गेल्यावरही इतकी वर्षे टिकून आहे. एकान्तात बसून लेखन करत राहणे, हा पुलंचा स्वभावच नव्हता. सतत लोकांमध्ये मिसळणे, गप्पा मारणे ही त्यांची गरज होती. सुनीताबाईंना त्यांचे असे लोकाभिमुख असणे, अगदी सामान्य चाहताही भेटायला आल्यावर वेळेचे भान न ठेवता बोलत राहणे आवडत नव्हते. त्यांना असे वाटे की, त्यामुळे या मनोहराचा वेळ जातो आहे. इतका वेळ असा घालविण्यापेक्षा त्यांनी लेखन केले तर याच रसिकांसाठी तो मोठा ठेवा असेल... सुनीताबाई जी. ए. कुळकर्णींच्या पठडीतल्या होत्या. शांत संध्याकाळी नदीच्या पाण्यात पाय सोडून बसलेल्या बगळ्यागत लेखकाने साधना करावी, असे त्यांचेही इतरांसारखेच मत होते. ते चूक असे काहीच नव्हते. मात्र, असे बेधूम लोकांमध्ये मिसळणे अन्‌ अनुभवत राहणे, हा पुल नावाच्या लेखकाचा रियाज होता. ते लेखक नव्हते, परफॉर्मर होते, त्यामुळे त्यांना साधना नव्हे, तर रियाजाची गरज होती. पुल नखशिखान्त सादरकर्तेच होते. त्यामुळे, एका िंहदी चित्रपटात संवाद आहे, ‘‘हम जहॉं खडे हो जाते है, लाईन वहीसे शुरू हो जाती है...’’ तसेच पुलंच्या बाबत म्हणावे लागायचे, ‘‘वो जहॉं खडे हो जाते है, मैफल वहॉं शुरू हो जाती है...’’

अनेकदा तर त्यांचे विनोदी लेख, कथा हे त्यांनी प्रत्यक्ष लिहून काढण्याच्या आधीच त्यांच्या कार्यक्रमातच तयार व्हायचे. नंतर सुनीताबाई किंवा कुणी आप्त त्यांना आठवण करून देई, तो घर दाखविण्याचा किस्सा छान रंगतोय्‌ अलीकडे तुमच्या कार्यक्रमांत. लिहून ठेवला पाहिजे तो... अनेक परफॉर्मर्सच्या बाबत हे असेच होते. वक्तादशसहस्रेषु राम शेवाळकरांच्या बाबतही हे असेच झाले आहे. सावरकरांवरचे किंवा मग कृष्ण, अर्जुन, दुर्योधनावरचे व्याख्यान खूप रंगले की, एकतर ते ध्वनिबद्ध करून ठेवलेले असायचे. श्रीमती विजयाताई शेवाळकर आयोजकांना आधीच तशा सूचना द्यायच्या आणि मग त्या ध्वनिफितीवरून ती व्याख्याने लिहून काढली गेली आहेत...

ते परफॉर्मर होते आणि लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, हा परफॉर्मरचा निसर्गभाव असतो. त्यात अडथळा आणणारे घटक त्याला अन्यायकारकच वाटत राहतात. त्यामुळे सामान्यांच्या आयुष्यातला अनमोल आनंदाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा पुलंनी त्याला विरोधच केला. मग ते आणिबाणी असो की नंतरच्या राज्यकर्त्यांची दंडेली असो.

त्यांच्यातल्या परफॉर्मरला मुक्त अवकाशच हवं होतं आणि माणासाचेही तसेच जगणे हा त्याचा अधिकार आहे, हे त्यांचे मत होते. सारी माणसे प्रत्येक क्षणाला सादरच होत असतात. पुलंच्या लेखनाची सुरुवात कशी झाली, हे माहिती नाही, मात्र ते गप्पांचे फड जमवीत. खासगी बैठका सतत होत राहत. त्यात हे असे अनेक किस्से सांगत असावेत आणि कधीतरी कुणीतरी, तू हे लिहून का नाही काढत? छान आहेत हे... असे म्हटले असावे आणि मग ते प्रकाशित झाल्यावर एक वेगळ्या लेखनाची वाट प्रशस्त झाली. शंकर बडेंच्या बाबत मी हा जिवंत अनुभव घेतला आहे. ते खासगी बैठकांत खूप किस्से रंगवून सांगत अन्‌ मग मी ते त्यांच्याकडून लिहून घेतले.

पुलंचे लेखन म्हणजेही त्यांचा एक परफॉर्मन्सच होता. त्यांची एक मुलाखत पु. बा. भावे यांनी घेतली होती. त्यात त्यांच्या लाडक्या रूपाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला अन्‌ अखेर ते संगीतकार, अभिनेते, नाटककार, लेखक की कोण... असा निष्कर्ष काढताना ते सादरकर्तेच आहेत, हेच सिद्ध झाले होते.

त्यांच्या या जन्मशताब्दी वर्षात, त्यांची होऊ न शकलेली भेट भळभळत राहतेय्‌...

श्याम पेठकर
मुळ स्रोत -->
https://m.appritam.com/Encyc/2019/3/13/presentation-of-pu-la.amp.html

Monday, March 11, 2019

चरित्रपट की विडंबनपट?

सुनीताबाई देशपांडे यांचे बंधू सर्वोत्तम ठाकूर, त्यांच्या पत्नी अंजली ठाकूर, त्यांचे चिरंजीव उमेश ठाकूर आणि पुलं-सुनीताबाईंचे मानसपुत्र दिनेश ठाकूर, पुलंचे स्नेही रामभाऊ कोल्हटकर ही पुलं-सुनीताबाईंची निकटवर्ती माणसं. त्यांचे ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चरित्रपटावरील आक्षेप..

‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या पुलंवरच्या तथाकथित ‘चरित्रपटा’चे दोन्ही भाग नुकतेच प्रदर्शित झाले.चरित्रपटातील असंख्य प्रसंगांत दाखविलेली वास्तवाशी अनावश्यक फारकत, सत्य प्रसंग वाट्टेल तसे बदलून केलेले विद्रूपीकरण, कल्पनादारिद्रय़, त्याचबरोबर चरित्रनायकाच्या आणि कलाक्षेत्रातल्या अनेक मान्यवर व्यक्तिमत्त्वांच्या तोंडी घातलेले अतिसामान्य, टुकार, न शोभणारे (uncharacteristic) संवाद, त्यांचे या चरित्रपटातील अत्यंत उथळ, बेजबाबदार व बदनामीकारक चित्रण अशा अनेक गोष्टींवर कित्येक जाणकार रसिकांकडून, चाहत्यांकडून, मान्यवरांकडून जोरदार टीकाही झाली. खरं तर पुलंचे जन्मशताब्दी वर्ष म्हणजे जगभरातील मराठी माणसांना आनंदोत्सव साजरा करायला, त्यांच्या सुंदर आठवणींत रमायला मिळालेली सुवर्णसंधी. पण याला गालबोट लागले ते या चरित्रपटाने, हे दुर्दैव.

या चरित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०१७ च्या सुमारास दिनेश यांच्याशी आपल्याला पुलंवर बायोपिक करायचा आहे; त्यासाठी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सांगा म्हणून संपर्क साधला. दिनेश यांनी त्यांना पुलंची पुस्तके, त्यांच्यावरील डॉक्युमेंटरीज् वगरे स्वाभाविक माहिती पुरवत असताना त्यांना असे उत्तर मिळाले की, ‘‘मी काही पुलंची पुस्तके वाचलेली नाहीत, डॉक्युमेंटरीज् बघितलेल्या नाहीत. मला त्याची गरजही वाटत नाही. मी त्यांच्या आयुष्यातले नव्वद प्रसंग गोळा करणार. त्यातले साठ निवडून, चित्रित करून त्यावर ८ नोव्हेंबर २०१८ ला चरित्रपट प्रदर्शित करणार.’’ यावर दिनेश यांनी पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले आकलन झाल्याशिवाय (खरं तर झाल्यानंतरही) पुलंसारखे अष्टपैलू, बहुरंगी व्यक्तिमत्त्व चरित्रपटाच्या स्वरूपात उभे करणे कठीण आहे, असे सांगून दिग्दर्शकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. उत्तम चरित्रपट काढण्यासाठी लागणारा अभ्यास, तो करायची तयारी, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, मेहनत, चरित्रनायकाबद्दल वाटणारी व्यक्तिगत आपुलकी, आस्था, आत्मीयता या सगळ्याचाच अभाव भासल्याने- केवळ पुलंच्या नावाचे चलनी नाणे जन्मशताब्दीनिमित्त खपवायचे आहे- अशी रास्त शंका आल्याने दिनेश यांनी अशा प्रकारच्या निर्मितीसाठी आपली नाराजी दाखवून यात आपण सहभागी होऊ शकणार नाही असे त्यांना सांगितले.

या पार्श्वभूमीवर हा चरित्रपट सुमार दर्जाचा असणार, हा अंदाज दुर्दैवाने खरा ठरला. तेवढेच असते तर दुर्लक्ष करून सोडूनही देता आले असते. परंतु या चरित्रपटात cinematic liberty किंवा ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ अशा मोठमोठय़ा शब्दांच्या ढालीमागे लपत, स्वत: पुलं आणि सुनीताबाईंनी वर्णन केलेल्या, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या प्रसंगांचा केलेला विपर्यास, त्यांचे केलेले बेजबाबदार विकृतीकरण यांमुळे या चरित्रपटात पुलंचे व्यक्तिमत्त्व आत्मकेंद्रित, उथळ, वेंधळे दर्शवले गेले आहे.

खरे तर चरित्रपट करताना चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण, सखोल अभ्यास केल्यावरही काही बारकाव्यांची नोंद सापडतच नसेल तेव्हा आणि फक्त तेव्हाच अत्यंत काळजीपूर्वक आणि परिपक्वतेने cinematic liberty वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरणे वावगे ठरत नाही. इकडे तर पुलंची स्वत:ची इतकी पुस्तके, त्यांच्यावरील तीन उत्तम डॉक्युमेंटरीज् (पैकी दोनांत पुलं स्वत:च त्यांच्या आयुष्याबद्दल भरभरून बोलले आहेत.), त्यांची भाषणे, रेकॉìडग्ज्, सुनीताबाईंची पुस्तके, तसेच पुलंवर आणि चरित्रपटात दाखवलेल्या त्यांच्या निकटवर्तीयांवरही इतके अमाप साहित्य, माहिती उपलब्ध असताना त्याचा काटेकोरपणे वापर न करता असे उथळ, बेपर्वाईचे आणि विसंगत चित्रण का करावे? पुलं आणि सुनीताबाईंचे एकमेकांना पूरक असलेले सुंदर भावनिक नाते आणि सांस्कृतिक श्रीमंतीचे आयुष्य तर इथे दिसतच नाही. सुनीताबाईंना आणि इंग्रजीला घाबरणारे, आत्मविश्वास नसलेले, दुसऱ्याच्या सल्ल्याने वागणारे असे पुलंचे सत्याशी विसंगत व्यक्तिमत्त्व दाखवण्यामागचा हेतू तरी काय?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा चरित्रपट संदर्भ म्हणून (जो ‘बायोपिक’चा एक महत्त्वाचा उद्देश असतो.) पुलंसारख्या महाराष्ट्राच्या मोठय़ा व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासासाठी वापरण्याच्या लायकीचा नाही. मराठी शिकणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांला पुलंवर, त्यांच्या साहित्यावर; फक्त विनोदीच नव्हे तर त्यांच्या विपुल वैचारिक साहित्यावर, विविध क्षेत्रांतल्या योगदानावर, त्यांच्या आयुष्यावर रिसर्च करायचा असल्यास पुलंवरचा हा चरित्रपट चुकूनही प्रमाण मानल्यास तो अनर्थच ठरेल. याच उद्देशाने पुलं-सुनीताबाई आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या आयुष्यातल्या वास्तव घटना आणि चरित्रपटात केलेले त्यांचे विकृतीकरण यामधील विसंगतींची नोंद होणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, चरित्रपटातील abortion चा प्रसंग.. सुनीताबाईंना दिवस गेल्याचे त्या पुलंना सांगू पाहतात- ते दुर्लक्ष करतात- त्या स्वत: एकटय़ाच निर्णय घेऊन, एकटय़ाच गर्भपात करून येतात असा दाखवलेला गडद आणि बटबटीत प्रसंग. तर हाच प्रसंग ‘आहे मनोहर तरी’ या सुनीताबाईंच्या पुस्तकात त्यांच्याच शब्दांत किती संवेदनशीलपणे आला आहे. (प्रथम आवृत्ती, पृष्ठ क्र. १९५-१९६) ‘‘डोहाळ्यांचा त्रास होऊ लागला... भाई मोठ्ठं डाळिंब घेऊन आला... आमच्यावरच्या जबाबदाऱ्या संपेपर्यंत स्वत:वर असली दुसरी कोणतीही जबाबदारी नको असा आम्ही दोघांनी विचारपूर्वक निर्णय घेतला.’’

‘अंमलदार’ प्रसंग (‘आहे मनोहर तरी’- पृष्ठ क्र. १७८)- सुनीताबाईंनी पैज जिंकल्यावर चैनीच्या गोष्टी न मागता ‘अंमलदार’ नाटक पूर्ण करून मागितले याचे केलेले सुंदर वर्णन! तर चरित्रपटात सिगारेट तोडण्याच्या दमदाटीने आणि भीतीने ‘अंमलदार’ पूर्ण झाले- हे त्याचे केवळ विचित्रीकरण.

विजया मेहता- ‘सुंदर मी होणार’ वाचनाचा प्रसंग- ‘आहे मनोहर तरी’ पृष्ठ क्र. १४५-१४६ शी ताडून पाहावा.

चरित्रपट बनवणाऱ्यांनी योग्य तो अभ्यास करूनच चरित्रपट बनवला असेल असा भाबडा विश्वास टाकणाऱ्या अनेक प्रेक्षकांचा हा विश्वासघातच नाही का?

वास्तवात आचार्य अत्र्यांचे, गडकऱ्यांचेच नव्हे, तर कुठचाही ऐकलेला चांगला विनोद मैफिलीत, गप्पांत खुलवून सांगणारे पुलं- ‘‘विनोद फक्त मी करायचे!’’ असला भिकार विनोद (?) पुन्हा पुन्हा करताना दाखवले आहेत. बरं, यावर पुलंच्या कोटय़ा लोकांना माहितीच असल्यामुळे आपल्याच कोटय़ा पुलंच्या तोंडी खपवल्याची कबुली संवादलेखकांनी दिलीच आहे. (मॅजेस्टिक गप्पा- पार्ले, १६ फेब्रुवारी २०१९) मग बायोपिकला पुलंचे नाव का?

तर अशा अनेक वास्तव घटनांची वाट्टेल तशी चिरफाड करून, तर काही न घडलेले प्रसंग कल्पनेने (की ‘कल्पनादारिद्रय़ाने’ म्हणावे?) या चरित्रपटात घुसडले आहेत. या चित्रपटातील अशा असंख्य विसंगतींची पुराव्यासकट नोंद अभ्यासूंना उपयोगी पडेल म्हणून आणि रसिकांनाही सत्य कळावे म्हणून आम्ही तयार करीत आहोत.

पुलं आणि त्यांच्याबरोबर ‘चरित्रपटा’त ये-जा करणारी इतर थोर व्यक्तिमत्त्वे आम्हाला अशीच दिसली, असे वेळोवेळी सांगून लेखक-दिग्दर्शकांनी आपल्या दृष्टिदोषाची तर कबुलीच दिली आहे. यात केवळ कमजोर आकलनशक्ती आहे, की मत्सराचा/ आकसाचा चष्माही आहे, की दारू, सिगरेटच्या मागे धावणारी बेजबाबदार, आत्मकेंद्रित व्यक्तिमत्त्वे यांना आरशात दिसली, असा प्रश्न पडतो.


१० मार्च २०१९
लोकसत्ता

https://www.loksatta.com/lokrang-news/article-about-autobiography-or-parody-movie-1854473/

Times of India Article -->