Monday, January 24, 2022

काव्य आपल्याला जगायला कारण देतं - पु.ल. देशपांडे

मॅजेस्टिक बुक स्टॉलतर्फे प्रकाशित झालेल्या ‘पु. ल. : एक साठवण’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ १८ नोव्हेंबर १९७९ रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झाला होता. त्या समारंभात ‘पुलं’नी केलेल्या भाषणातील काही अंश.

माझ्या साहित्याबद्दल सांगताना कविवर्य बोरकर, मं. वि. राजाध्यक्ष आणि श्री. पु. भागवत या तिघांनी सांगितलं, की मला कवितेचं प्रेम आहे. माझं म्हणणंच असं आहे, की कवितेवर ज्यांचं प्रेम नाही, तो कसलाच कलावंत होऊ शकणार नाही - विनोदी तर नाहीच नाही. जो चांगला वाचक आहे, तो मनातून कवितेचा वाचक असतो. एखादी गोष्ट काव्यमय आहे असं आपण म्हणतो, त्या वेळी त्याचं यमक-प्रास-वृत्त काहीही आपण पाहत नसतो. एखाद्याचं वागणं काव्यमय आहे, असं आपण म्हणतो - एखाद्याचं दिसणं किंवा एखादीचं दिसणं काव्यमय आहे असं आपण म्हणतो - वयाबरोबर आता ‘एखादी’चं वगैरे म्हटल्यावर लोक काय म्हणतील अशी मला भीती वाटायला लागली आहे!

काव्याशिवाय आपण राहू शकत नाही याचं कारणच असं आहे, की अन्न आपल्याला जगवतं आणि काव्य आपल्याला जगायला कारण देतं. कशासाठी जगायचं? जगायचं याच्यासाठीच, की जिथे माणसामाणसांतला प्रास जुळला आहे, माणसामाणसांतलं वृत्त जुळलं आहे - ह्याच्यासाठीच तर जगायचं! म्हणूनच ‘आधी वंदू कवीश्वर। जे शब्दसृष्टीचे ईश्वर’ असं म्हटलं आहे. आता ते आपल्यालाच म्हटलेलं आहे असं काही लोक समजतात, तो भाग निराळा! हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु कवीला उगीच वंदन केलेलं नाही. गणपतीला ‘कविः कविनाम्’ म्हटलेलं आहे. ‘कवी’ ही माणसाला मिळालेली सर्वश्रेष्ठ पदवी आहे. काव्याचं आणि विनोदाचं जमत नसतं असं नाही. विनोदी लेखकाला बेसूर जास्त जाणवतो. त्यामुळे तो सुरांच्या मागे जास्त जातो. त्याला जीवनाचा बेतालपणा जास्त जाणवतो. म्हणून जीवन तालात येण्यासाठी त्यातला बेतालपणा काय आहे, हे तो लोकांना दाखवतो. राजकारणातली माणसं नीट वागत असती, तर आम्ही कशाला लिहिलं असतं? आता तर त्यांनी आमच्याशी चांगलीच स्पर्धा सुरू केली आहे यात शंकाच नाही. रोज त्यांचे विनोदी कार्यक्रम पाहिल्यावर आता आमचं कसं होणार, अशी भीतीही आमच्या मनात उत्पन्न झाली आहे; पण तो भाग निराळा! आजच्या ह्या चांगल्या प्रसंगी उगाच भलती नावं तोंडून निघून जायची.

- पु. ल. देशपांडे
पुस्तक - पाचामुखी

0 प्रतिक्रिया: