Wednesday, November 8, 2023

मनोहरी आठवणी - (डॉ. वीरेंद्र ताटके)

सुनीताबाई या पुलंच्या पत्नी म्हणून सर्वाना परिचित होत्याच . मात्र त्या स्वतः सिद्धहस्त लेखिका होत्या . त्यांचे ' आहे मनोहर तरी ' हे पुस्तक मी १९९२ या वर्षी कॉलेजमध्ये शिकत असताना वाचले होते. त्यानंतर त्यांना लिहलेल्या पत्राला त्यांनी लगेच पत्राने उत्तर दिले होते .

पुलंच्या निधनानंतर सुनीताबाई मनाने आणि शरीराने खचल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःचं लिखाण आणि पुलंच्या अप्रकाशित लेखांचं प्रकाशन करण्याचे काम सुरु ठेवलं होतं. त्यानंतर पुलंच्या जन्मदिनी आणि स्मृतीदिनी पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील त्यांच्या घरी जाऊन सुनीताबाईंशी गप्पा मारण्याची अनेकदा संधी मिळाली . प्रत्येकवेळी त्यांनी हसतमुखाने स्वागतच केले.

या जगाचा निरोप घेताना देखील सुनीताबाई मनाला चटका लावून गेल्या. त्या दुर्दैवी दिवशी आकाशवाणीवरील सकाळच्या बातम्यात त्यांच्या निधनाची बातमी सांगितली गेली आणि वैकुंठ येथे सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार असल्याचे कळाले . अनेकजण वैकुंठकडे धावले, परंतु अगदी काही मिनिटं उशीर झाल्यामुळे माझ्याप्रमाणेच अनेकांना सुनीताबाईंचे अंतिम दर्शन झाले नाही .आयुष्यभर वेळेचा काटेकोरपणा पाळलेल्या सुनीताबाईंनी जातानादेखील वेळ अगदी काटेकोरपणे पाळली होती ! वैकुंठभुमीतील त्या अग्नीतून धुराचे लोट हवेत विरत होते…. त्यातील एका उंच जाणाऱ्या नादबद्ध लकेरीकडे पाहत उपस्थितांपैकी पुलंच्या एक ज्येष्ठ नातेवाईक महिला म्हणाल्या, " पोहचली आपली सुनीता पुलंकडे !" सर्वांचेच डोळे पाणावले.

आजही भांडारकर रस्त्यावरून जाताना 'मालती-माधव' इमारतीवरील नीलफलकाकडे पाहून जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात . या दांपत्याने आपल्याला दिलेल्या ' मनोहरी आठवणी ' कायम तशाच राहतील.

- डॉ. वीरेंद्र ताटके

0 प्रतिक्रिया: