Monday, November 21, 2022

१०३ नॉट आऊट पु.ल. - मृणाल जोशी

८ नोव्हेंबर दैवताचा म्हणजे पु.ल. तुमचा १०१वा वाढदिवस... बाप्रे!!

तुमचं काय, तुम्ही सध्या चैनीत असाल म्हणा. तुमच्याच प्रमाणे रंभा तुमच्या डोक्यावर तेल थापत असेल आणि उर्वशी वारा घालत असेल नाही का?
        
पुलं, तुमचं नाव घेतलं की आपसूक तोंडावर स्मितहास्य उमलतं आणि काय काय नाही आठवत हो...

किती पिढ्या झाल्या तुमची म्हैस अजून काही म्हातारी होत नाही आणि अंतू बर्वे म्हातारा हुन काही मरत नाही, गटणे अजुनी खाकी चड्डीत दिसतो, त्रिलोकेकर याचं इंग्लिश अजुनी कानात साला इडियट म्हणून घुमत असतं, नाथा कामतचे "बाबा रे तुझं जग वेगळं माझं जग वेगळं" हे कुठूनही ऐकू येतं.
पेस्टनजी यांनी कुठली ही बाब परसेन्ट शिवाय बोललीच नाही. कुठे ही कुत्रा दिसला की 'जिम्या भाड्या'ची आठवण येते आणि माकड दिसला की लक्ष त्याच्या आचरटपणा करणाऱ्या मालकाकडे आधी जातं.
चाळीतल्या नळाचे भांडणं असोत किंवा तुमचा उपास असो, मद्राशी राम बघायची शंकऱ्याला घाई असो किंवा तुम्हाला भेटायची सव्याची अप्सव्य करणारी आपली सरोज खरे असो, आजही कुठे भांडण झालं की आम्हाला आधी आठवतं ते बाचाबाची.
कोणी घर पाहायला बोलावलं की पोटात आधी गोळा येतो.
हरितात्यामुळे आम्ही इतिहासात फिरून येतो.
तुमच्यामुळे कधी दामले तर कधी चितळे मास्तर आठवतात तसे चार्ली चॅप्लिन तर कधी पी जी वुडहाऊस किंवा रवींद्रनाथ आठवतात.
कधी तुम्ही संगीत दिलेल्या ओळी ओठांवर येतात आणि खडीसाखरे प्रमाणे तिथेच घट्ट चिकटून असतात.
किती तरी वेळ कधी मर्ढेकर कधी कवी गिरीश तर कधी बोरकर तुमच्याच मुळे आठवतात हो...

साहित्यात संगीतात आणि कलेत तुम्ही एकही शाखा नाही सोडली आणि ह्या सर्वांवर तुम्ही अमाप प्रेम केलं.
आम्हाला हे सगळं मिळालं नाही पण पुलं आम्हाला तुम्ही आणि तुमच्या कलेचा सहवास लाभला ह्याहून मोठा आनंद काय असेल?

तुम्ही कधी पुस्तकांतून, कथाकथन, संगीतातून , कोट्यातून, शब्दातून, तुमच्या आनंदातून भेटतात...
पुलं आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्ही सांभाळलं...
ही किमया तुमच्या लिखाणातील.

तुमच्या लिखाणावर आम्ही लिहून लिहून किती कागदाच्या रिमा वाया घालवणार?
तरी इथे महत्वाचं आहे ते पुलं... तुमच्या सोबत संवाद साधणे.
सर्वांना सर्व काही तोंडी पाठ आहे, मग म्हैस असो, शत्रूपक्ष असो, अंतू बर्वे, नामु परीट, नाथा कामत, नारायण, नंदा प्रधान, चाळ, वरात, असामी असामी काही ही असो, सगळ्यांना रामरक्षे प्रमाणे पाठ आहे.
तरी प्रत्येकाची आतुरता की पुलं यांच्याशी संवाद व्हावा.

आधी असं वाटायचं की व्यास, वाल्मिकी, आणि समर्थ रामदास यांनी जे लिहिलं त्यानंतर कोणी काही लिहू नये. कारण त्याच्याही पलीकडे काही असू शकेल याची शाश्वती कुणालाही वाटली नाही.
नंतर तुम्ही आला आणि त्यांच्या 'बिटविन द लायन्स' तुम्ही शोधल्या आणि लिहिल्या.
पण एक सांगतो तुम्ही सगळ्या लेखकांची सॉलिड गोची करून ठेवली आहे.
तुम्ही जे लिहिलं आणि जे ऐकवलं त्या नंतर काही उरलं असेल असं मला तरी वाटतं नाही.

तुम्ही गेला?
छे छे मला असं अजिबात वाटतं नाही.
तुम्ही कधी ऑडिओमधे समोर येतात, कधी व्हिडीओत, कधी कोणाच्या संगीतात, कधी कोणाच्या बोलण्यात, कधी ऐकण्यात.
हल्ली तुमचे ग्रुप्स सुद्धा आहेत.
तुमचे फोटो हल्लीच्या राजनैतिक वातावरणावर ट्रोल होतायत.
आता तर तुम्ही चित्रपटात झळकलायत.
पण खरं सांगू का तुम्ही मला कुठे ही भेटतात.
तुम्हीं कधी कुणाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत भेटतात, कधी कोणी लेखक पुस्तकं तुम्हाला समर्पित करतो तुम्ही तिथे भेटतात, कधी पुरचुंडीच्या दोन फडक्याच्या गाठीत भेटता, कधी चाळीच्या कुठल्या कोपऱ्यात उभे दिसतात, कधी एकाकी खांद्यावर शबनम घेऊन पांढऱ्या सदरात आणि पायजम्यात दिसतात.
कधी पेटी दिसली की त्या 'काळ्या तीन'मधे तुम्ही बोटांनी गाताना दिसतात.
कधी असामीमधल्या तुमच्या वडिलांच्या घड्याळीत वेळ बघताना दिसतात.
कधी चार्ली पहिला की तुम्ही मागून झाकून बघताय अस दिसतं.
कधी लता गाते आणि तुमचा आवाज येतो -
"पोरी औक्षवंत हो."

कधी सावरकरांवर बोलताना दिसतात तर कधी भीमसेन कधी वसंतराव यांच्या सोबत मैफल गाजवताना तर कधी पुण्यात गुलजार समवेत सुद्धा दिसतात.
कधी तुम्ही आणि सुनीताबाई दोघे ही आनंदवनात दिसतात तर कधी ग्रेस यांच्या दाराशी थांबलेले दिसतात.
कधीमधी तुम्ही 'एक शून्य मी'च्या प्रश्नचिन्हाखाली त्या टिंबात आम्हाला नवं कोडं घालतायेत असं दिसतात.

तुम्ही विनोदी म्हणून जगविख्यात आहेतच पण संवेदनशील रंगकर्मी, आणि मनाला भिडणारा लेखक म्हणून मला ज्यास्त भावतात.
तुम्ही जे जे संवेदनशील लिहिलं ते खरंच अजोड आहे, टच कण डोळ्यांतून पाणी काढणं आणि पुढच्या क्षणी हसवता हसवता रडवणे हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे.
तिथे पाहिजे जातीचे कलावंत!

विनोद बुद्धी खरंच दैवी देणगी असते.
मान्य पण आपण जे संवेदनशील लेखक म्हणून लिखाण केले त्याला तोड नाहीच.

तुम्हीच आमच्या सारख्या दुःखात असणाऱ्या, एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या आणि आपल्यालाच बघणाऱ्या नजरा असणाऱ्यांना आमच्यासारख्या लोकांना वाचायला, चांगलं ऐकायला प्रवृत्त केलं आणि आमची पिढी धन्य झाली.

तुमचं नवं कोरं पुस्तक जेंव्हा विकत घेतो न, मला त्यात तुमचा सुगंध दरवळतो!
स्वतः इंदूर इथला असल्यामुळे, त्या इतिहासाचा गंध सांगणाऱ्या वास्तू पाहिल्यात जिथे तुम्ही कुमार गंधर्व, रामुभैया दाते यांच्या समवेत मैफल सजवल्यात, रंगावल्यात आणि अर्थातच गाजवल्यात.

पुलं...
तुम्ही जे दिलं, जे आम्ही अनुभवलं त्याला तुलना नाही!

पुनःश्च धन्यवाद!

पुलं पुन्हा तुम्हाला कडकडून भेटावंस वाटतंय...

- मृणाल जोशी
०८.११.२१

0 प्रतिक्रिया: