Monday, November 8, 2021

‘पुलं’चं साहित्य ‘टाइमलेस’ - आदित्य सरपोतदार

महाराष्ट्राच्या मातीतला कोणताही कलाकार पु. ल. देशपांडेंबद्दल विचारलं तर अगदी भरभरूनच बोलेल. आजच्या पिढीचे कलाकारही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने आजच्या पिढीच्या काही निवडक कलावंतांकडून त्यांच्या ‘पुलं’बद्दलच्या भावना जाणून घेतल्या. त्यातील पहिला लेख आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा. ‘पुलं’चं साहित्य टाइमलेस असल्याची भावना आणि ‘पुलं’च्या ‘पुढचं पाऊल’ चित्रपटावर काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

‘पुलं’ची नाटकं, सिनेमे, साहित्य मी लहानपणापासूनच पाहिलं, वाचलं. माझ्याकडे सुरुवातीपासूनच ‘निवडक पुलं’च्या कॅसेट्स होत्या. त्या मी नेहमीच ऐकल्या. आता त्या ‘सीडी’च्या माध्यमात आहेत. त्यांचं ‘व्यक्ती आणि वल्ली,’ ‘बटाट्याची चाळ,’ ‘असा मी असामी,’ ‘वाऱ्यावरची वरात’ हे सगळंच ‘ग्रेट’ आहे. विशेषतः
त्यांचा विनोद जास्त भावतो. त्यांच्या साहित्यात आपली वाटणारी पात्रं आणि आपला वाटणारा विनोद खूप होता. ते लोकांना जास्त जवळचं वाटायचं.

आदित्य सरपोतदार, दिग्दर्शक‘पुलं’च्या लेखणीतून आलेली नाटकं अजरामर आहेत. त्या काळात फार लहान असल्याने ती प्रत्यक्ष पाहण्याचा योग कधी आला नाही. परंतु नंतर केलेलं त्याचं सादरीकरण जरूर पाहिलं. मुळात ‘पुलं’ हे कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही पिढीला भावणारे असेच आहेत. कारण त्यांचा विनोद अगदी साधा, सरळ, सोपा असायचा आणि त्यातून त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही खास आहे. इतकंच नाही, तर प्रत्येक साहित्यातली ‘पुलं’ची पात्रंही खूप इंटरेस्टिंग आहेत.

पु. ल. देशपांडे‘पुलं’ म्हणजे अशी एक व्यक्ती जी एकाच वेळी दिग्दर्शक, लेखक, संगीतकार आणि विविधरंगी भूमिका साकारणारा चांगला नट अशा सगळ्याचं मिश्रण आहे. हे सगळं एका व्यक्तीच्या अंगी असणं म्हणजे खरंच कलेचं एक खूप मोठं वरदानच आहे. जगात अशी फार कमी लोकं सापडतील, जे सगळंच इतक्या उत्तम पद्धतीनं करतात. ‘देवबाप्पा’, ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटांमधून भेटणारे ‘पुलं’ खरंच खूप वेगळे आहेत. वेगळे भासतात. नवीन पिढीला त्यांची ही ओळख होणं गरजेचं आहे, ती करून दिली गेली पाहिजे असं वाटतं. पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव असे अनेक मोठमोठे पुरस्कार मिळवलेले ‘पुलं’ हे मराठी सृष्टीतले एकमेव असले पाहिजेत. ते खरंच ते ग्रेट होते. त्यांना किंवा त्यांची निर्मिती पाहणाऱ्या आजच्या पिढीतल्या प्रत्येकालाही एक वेगळीच प्रेरणा मिळते. आपणही असं काहीतरी करावं, असं मनोमन वाटतं.

‘पुलं’च्या बाबतीत घडलेली एक चांगली गोष्ट अशी, की त्यांच्या कामाचं ‘अर्काइव्हल’ बऱ्यापैकी केलं गेलं आहे. नाटकं सगळी झाली नाहीत, ती करणं अवघडही होतं; पण त्यांचे बरेचसे चित्रपट अजूनही महोत्सवांमध्ये दाखवले जातात. असं असलं तरी हे सगळं नवीन पिढीच्या सतत समोर येत राहिलं पाहिजे. ते आजवर येत राहिलं आहे आणि पुढेही येत राहील, असं मला वाटतं. प्रत्येक पिढीतला कोणीतरी ‘पुलं’बद्दल अगदी मनापासून काही तरी करत असतो.

‘पुलं’च्या लिखाणाच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी, की त्यांच्या संपूर्ण लिखाणाचा बाज वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो बाज समजून घेऊन त्यावर कलाकृती निर्माण करणं गरजेचं आहे. त्यात थोडंसं जरी चुकलं, तर ते मग ‘पुलं’ राहत नाहीत. त्यांच्या साहित्यावर नवीन काही निर्माण करत असताना हा एक थोडासा धोका असतो.

'गुळाचा गणपती' चित्रपटात एका दृश्यातील 'पुलं'बहुतेक जणांना ‘पुलं’च्या नाटकांबद्दल जास्त वाटतं. का कोणास ठाऊक, मला मात्र त्यांच्या नाटकांपेक्षाही त्यांचे सिनेमे खूप आवडले. त्यांचे काही सिनेमे म्हणजे अगदी साधे, सरळ असे आणि सामान्य माणसाची कथा सांगणारे होते. त्यांचा कोणताही चित्रपट घेतला, तरी त्यात एका ठराविक मर्यादेपर्यंत विनोद आहे आणि एक सामाजिक संदेशही आहे. अशा त्यांच्या कोणत्याही एका सिनेमावर काम करायला मला आवडेल. तसं कामच करायचं, तर त्यांचा कोणताही एक सिनेमा निवडणं हे नक्कीच अवघड आहे. त्यांचं हे एक काम चांगलं आहे, असं म्हणणं खरंच अवघड आहे. त्यांनी अगदी निखळतेनं आणि निरागसतेनं केलेलं कोणतंही काम घ्या, ते काम बघण्याजोगं आहे आणि करण्याजोगंही आहे.

'पुढचं पाऊल' चित्रपटातील एक दृश्यत्यातल्या त्यात ‘पुलं’च्या कोणत्या साहित्यावर काम करायला आवडेल, असं मला विचारलंत, तर मी त्यांचं ‘पुढचं पाऊल’ हा चित्रपट निवडेन. या चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद या दोन बाजू भन्नाट आहेत. हा एक खूप वेगळ्या धाटणीचा सिनेमा वाटतो. ‘चिमणराव गुंड्याभाऊ’मध्येही ते भावतात. अगदी शेवटपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत ते चित्रपटासाठी काम करत होते. त्यामुळे ‘देवबाप्पा’, ‘दूधभात’, ‘मोठी माणसं’, ‘मानाचं पान’ असे त्यांचे सगळेच सिनेमे कलाकृती म्हणून अप्रतिम आहेत.

‘पुलं’च्या बाबतीत अगदी खूप कमी लोकांना ठाऊक असलेली एक बाब म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना बरंचसं सामाजिक कार्यही केलं आहे. ‘मुक्तांगण’सारख्या अनेक संस्थांशी ते जोडलेले होते. याची नोंद फारशी घेतली जात नाही असं वाटतं. ती ही घेतली गेली पाहिजे. ‘पुलं’ म्हणजे संपूर्ण पुलं पाहिले गेले पाहिजेत असं वाटतं. ‘फिल्म अर्काइव्ह्ज’ला आजही ‘पुलं’चे चित्रपट उपलब्ध आहेत आणि ते कृष्णधवल स्वरूपात आहेत. त्यांनी अशा चित्रपटांचे खास महोत्सव आयोजित केले पाहिजेत, जेणेकरून ते आजच्या पिढीसमोर येतील. त्यासाठी मीही अनेकदा त्यांच्याशी बोलून याबाबत प्रयत्न केले आहेत.

आजही मी प्रवासात असताना गाडीत ‘निवडक पुलं’ ऐकत असतो. त्यात मग सखाराम गटणे असो किंवा ‘पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर’ असो किंवा मग आणखी काही... ते सगळंच मजेशीर आहे आणि हे खरं तर ‘टाइमलेस’ आहे असं मला वाटतं. ‘पुलं’ना तुम्ही कोणत्याही एका काळात थांबवू किंवा अडकवू शकत नाही. ‘पुलं’च्या साहित्यातलं काहीही घेतलं तरी ते आजच्या पिढीला चालणारं आणि कोणत्याही पिढीला आपलंसं वाटेल असंच आहे. ते साहित्य कोणत्याही एका काळात अडकणारं असं नाही. माणसाची वृत्ती कधीच बदलत नाही आणि ‘पुलं’चं साहित्य असंच प्रत्येक माणसाच्या वृत्तीशी खेळणारं आहे. त्यामुळे ते आजही आपलंसं वाटतं. केवळ आजच असं नाही, तर पुढच्या दहा पिढ्यांतही जे कोणी ते वाचेल, त्यालाही ते तेव्हाचंच वाटेल. असं ‘टाइमलेस’ असणं हेच ‘पुलं’च्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे.

- आदित्य सरपोतदार
मूळ स्रोत -> https://www.bytesofindia.com/P/IZVOBI
(शब्दांकन : मानसी मगरे)

1 प्रतिक्रिया:

Ganesh said...

मी पण पु.ल यांचा चाहता आहे न राहनार...तुमचा लेख आवडला.. मला ही आवडेल त्यांच्या साहित्यावर काम करायला आणि पु. ल प्रेमीनी ते केले पाहिजे नवीन पिढी पु.ल समजन्यासाठी....