Tuesday, June 28, 2022

संवेदनशील आणि कर्तबगार सुनीताबाई - गोविंद तळवलकर

सुनीताबाई देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व करारी आणि संवेदनशीलही. आथिर्क व्यवहार असोत, मुदिते तपासणे असो वा कुणासाठी मदतीचा हात पुढे करणे असो, त्यात त्यांचा काटेकोरपणा दिसून येई आणि संवेदनशीलताही..

प्रथम पु. ल. आणि आता सुनीताबाई. दोघांच्या निधनामुळे जवळपास ४० वर्षांचा संबंध संपुष्टात आला आणि त्याचबरोबर या काळातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. तसे पाहिले तर दोघांचीही व्यक्तित्व स्वतंत्र होती, पण दोघेही परस्परांवर किती अवलंबून होते, हे सतत जाणवत होते.
           
काही वेळा कृतक रागाने सुनीताबाई म्हणत, भाईमुळे आपल्याला आपले काही करता वा लिहिता-वाचता येत नाही; पण त्या पु.लं.शी इतक्या समरस झालेल्या होत्या की, त्यांच्या नंतरच्या काळात त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्या, त्यांच्या संबंधीचा आथिर्क व्यवहार इत्यादी कामात सुनीताबाई बराच काळ व्यग्र राहिल्या. नाहीतरी पु. ल. असतानाही लिखाण तयार झाल्यावर त्याच्या शुद्धलेखनाची तपासणी, प्रती तयार करणे आणि प्रकाशकाकडे हस्तलिखित देऊन मुदिते आली की, ती अनेकवार तपासणे ही जबाबदारी सुनीताबाईच आवडीने पार पाडीत असत.

मुदितांबाबत त्या नेहमीच कटाक्ष बाळगीत. यामुळेच कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' या संग्रहाच्या आवृत्तीत चुका आढळल्यावर त्यांनी दुरुस्त्या करून तात्यासाहेबांकडे पाठवल्या. इतके करूनही नव्या आवृत्तीत चुका राहिल्याच.

वेळ मिळाल्यावर त्यांनी पु.लं.च्या नंतर काही लिखाण केले, पण त्यातलेही काही दोघांच्या सहजीवनासंबंधी बरेच होते. पु.ल. व सुनीताबाई यांच्या स्वभावातही अंतर होते. पु.लं.ना सहसा कोणाला दुखवायचे नसे. यामुळे काही वेळा गोंधळ होई आणि तो निस्तरण्याचे काम सुनीताबाईंवर पडे आणि वाईटपणाच्या त्या धनी होत. पु.ल. यांच्या लिखाणावर सर्व संस्कार करण्याप्रमाणेच नाटकांच्या व एकपात्री प्रयोगांची सर्व व्यवस्था सुनीताबाई सांभाळत होत्या. काटेकोरपणा आणि व्यवस्थितपणा हा त्यांच्यापाशी जन्मजातच होता. यामुळे भाषणाचा कार्यक्रम ठरवण्यास कोणी आल्यास त्याची पूर्वपरीक्षा होत असे. पण यामुळे कार्यक्रमात कसलाही व्यत्यय येत नसे. याच त्यांच्या वृत्तीमुळे पु. ल. देशपांडे फौंडेशनतफेर् देणग्या देण्यासाठी निवड करण्यात त्यांचा बराच वेळ जाई.

आता तो काळ संपला...

'पु.ल.' फौंडेशनच्या संबंधातील प्राप्तिकराच्या संबंधात सुनीताबाईंना काही प्रश्न होते. कोणत्या रीतीने कायदा मोडला जाता कामा नये, पण नोकरशहांमुळे नियमांचा भलताच अर्थ लावला जाऊ नये, असे त्यांना वाटू लागले. मग पालखीवालांचा सल्ला घेण्याचे ठरले. पु.ल. व सुनीताबाईंनी हा विषय माझ्याकडे काढला, तेव्हा पालखीवालांशी माझे स्नेहाचे संबंध असल्यामुळे मी भेट ठरवली. आम्ही तिघे गेलो. प्रश्न काय आहे, हे सुनीताबाईंनी स्पष्ट केले व शंका सांगितल्या. पालखीवाला जेव्हा कोणतीही गोष्ट कमालीच्या एकाग्रतेने ऐकत व विचार करत तेव्हा वातानुकूलित दालनातही त्यांच्या कपाळावर घाम जमत असे. तसे झाले आणि सात-आठ मिनिटांत त्यांनी सुनीताबाईंचा विचार पूर्णत: बरोबर ठरवला. ते त्यांना म्हणाले की, तुम्ही चांगल्या वकील झाल्या असता.

पु. ल. व सुनीताबाई काही ध्येयवादामुळे भाऊसाहेब हिरे यांच्या मालेगावमधील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते आणि त्या आश्रमाचे व्यवस्थापन सुनीताबाई सांभाळत. एकदा महाराष्ट्रातील काही प्रमुख गांधीवादी तिथे राहायला आले असता, आयत्या वेळी त्यापैकी काहींनी गाईचे दूध व त्या दुधाचेच दही हवे, अशी मागणी केली. आयत्या वेळी हे जमणे शक्य नव्हते. तेव्हा सुनीताबाईंनी त्यांना नुसते गाईचे दूध नाही, असे सांगितले नाही, तर तुमचा जर इतका कडक नियम आहे तर गाईचे दूध मिळू शकते की नाही, याची आधी चौकशी करायची होती. तुमचे नियम इतरांना त्रासदायक होऊ शकतात, याचा विचार करायला हवा होता, असे खडसावले.

याच सुनीताबाई मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, कवी बोरकर, कुमार गंधर्व इत्यादींचा अतिशय आपुलकीने पाहुणचार करताना मी पाहिले आहे. मन्सूर यांचे सोवळेओवळे असे. तेही त्या कटाक्षाने सांभाळत. काव्यात रमणाऱ्या सुनीताबाई सुग्रण होत्या. त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला आणि ते दोघेही आमच्या घरी येत तेव्हा सौ. शकुंतलाच्या पदार्थांचे कौतुक करून आस्वाद घेत. मित्रपरिवारातील कोणी आजारी पडल्यास नुसती चौकशी करून न थांबता शक्य ती मदत करण्यास सुनीताबाई चुकत नसत. भाषाशास्त्रज्ञ डॉ. कालेलकर यांच्या अखेरच्या आजारात सुनीताबाईच सर्व पाहत होत्या.

अरुण लिमये हे कॅन्सरने आजारी झाले तेव्हा प्रथम अमेरिकेतून औषध आणण्याची कल्पना सुनीताबाईंची व कुमुद मेहता यांची. त्या काळात परकी चलनावर बरीच नियंत्रणे होती आणि सरकारी परवाना लागत असे. त्या दोघी माझ्याकडे आल्या आणि आम्ही तिघांनी बरीच खटपट करून औषध आणण्यात यश मिळवले. नंतर लिमये यांना उपचारासाठी परदेशी पाठवण्याच्या कामी सुनीताबाई व कुमुद मेहता यांचा पुढाकार होता.

पु. ल. यांचे एकपात्री प्रयोग व पुस्तकांची विक्रमी विक्री हे पर्व सुरू होण्यापूवीर् पु.ल. दिल्लीत आकाशवाणी खात्यातफेर् नुकत्याच सुरू झालेल्या टीव्ही विभागात काम करत होते. त्या काळात राजधानीत मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा संकल्प सुटला; पण संकल्प व सिद्धी यात पैसा या परमेश्वराची इच्छा उभी असते. संकल्प करणाऱ्यांनी याचा विचार केला नव्हता. हे पाहून पु. ल. व सुनीताबाई यांनी एक कार्यक्रम केला आणि प्राथमिक खर्चाची सोय करून दिली.

काव्य, ललित साहित्य यांची उत्तम जाण असलेल्या सुनीताबाईंना खगोलशास्त्राचे आकर्षण होते. यासंबंधी त्यांनी काही वाचन केले होते. या आवडीमुळे त्यांनी नारळीकरांच्या संस्थेला मदत केली. कवितेच्या आवडीतूनच पु. ल. व सुनीताबाई यांनी काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. प्रवासातही कवितांची उजळणी होत असे. यामुळे त्यांच्याबरोबरचा प्रवास आनंददायक होत असे.

चाळीसएक वर्षांच्या सहवासात आमचे अनेक सुखसंवाद झाले आणि काही वेळा वादही झाले; पण वाद मित्रत्वाचे व निकोप वृत्तीचे होते. तो काळ आता संपला.

गोविंद तळवलकर
अमेरिका
महाराष्ट्र टाईम्स 
१०-११-२००९

0 प्रतिक्रिया: