Thursday, September 15, 2016

प्रिय पु.ल.

प्रिय पु.ल,

बरेच दिवसापासून तुम्हाला एक आदरतिथ्य पत्र लिहावं म्हणत होतो. पण काय करणार ? आत्तापर्यंत जेवढी पत्र मी माझ्या प्रेयसी ला लिहिली नसतील तेवढी तुम्हाला लिहिली आहेत. भाई हे तुम्ही सुद्धा मान्य कराल.

तसं पाहता बरेच दिवस झाले आपला स्नेह आहे. दिवस काय वर्ष म्हणा हवं तर, आणि दिवसेंदिवस तो वाढतच चाललाय. पण भाई.. काहीही म्हणा, आपल्या नात्यामध्ये पण निराळीच मजा आहे.आपलं नातं हे स्वीकृत असल्यामुळे कदाचित ते आत्तापर्यंत टिकत आलंय.पण भाई रक्ताच्या नात्यापेक्षा स्वीकृत नातं केंव्हाही चांगलंच बरं का, असं एकदा तुम्हीच म्हणाला होता.

वास्तविक भाई, एक गोष्ट मला सतत खुणावत असते… ती म्हणजे दुर्दैवाने आपली भेट होऊ शकली नाही. पण कधी नं कधी ती कुठे तरी होईलच अशी आशा वाटते. असो, पण काहीही म्हणा, तुमच्याशी बोलताना निराळीच उर्जा मनामध्ये सामावलेली असते. त्या उर्जेच्या आधारावरच मी आत्तापर्यंतची सगळी पत्रं लिहिली आहेत.

अगदी प्रांजळपणे कबुल करतो, मी खरोखरच ऋणी आहे त्या क्षणाचा त्यामुळेच कदाचित आपली ‘नाती-गोती’ इतरांपेक्षा जरा वेगळी आहेत.
भाई पण एक मात्र नक्की… ! तुम्ही म्हणजे खरोखरच एक प्रकारचा खजिना आहात बघा. असा खजिना, जो कितीही लुटला तरी संपायला तयार होत नाही, जो इतरांना सतत काही नं काही पुरवण्यात व्यग्र असतो असा खजिना. माझं भाग्यच, मला तुमच्या सारख्या हिऱ्याची साथ लाभली.

भाई, तुम्हाला वाटत असेल कि आजकाल हा ‘गटण्या’ सारखाच लिहायला लागलाय.

पण मी हे मान्य करायला कदापि तयार नाहीये, कारण ‘गटण्या’ सारखं माझ अफाट वाचन नाहीये. जेवढं काही आहे… तेवढ केवळ तुमच्यामुळेच आहे. हां… पण साहित्याची रुची मला लावली ती तुम्हीच. तुमच्या मुळेच मला सारख्या दिग्गजांचा सहवास लाभला. या बद्दल तर मी तुमचा ऋणी आहेच.

आजकाल लोक आयुष्य खूप गांभीर्याने घेतात, पण जेंव्हा पासून माझी हरितात्या, रावसाहेब, बबडू यांच्या सारख्या मस्त मौलांची ओळख तुम्ही करून दिलीत… तेंव्हापासून आयुष्य सुद्धा एकदम मस्तमौला झालंय. त्याबद्दल आभार तर आहेतच पण त्यांची साथ आहे हे फार बरं आहे बघा…. !
त्यात एक खुपणारी गोष्ट म्हणजे, आजकाल लोकांना चांगल्या दर्जाचा विनोद सुद्धा कळत नाही. विनोदाची व्याख्याच मुळात बदलत चाललीये.
असो, पण कुठेतरी कसा का असेना विनोद टिकून आहे याचा आनंद देखील वाटतो.

तसं पाहता, हे आभार पत्र मी ८ नोव्हेंबर… म्हणजे आपल्या जन्मदिवसादिवशीच लिहिणार होतो. पण तितकीशी वाट बघायला मन तयार होईना. शेवटी काही झालं तरी भावना महत्वाच्या.

‘तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहू द्या’ तेवढाच आधार वाटतो हो भाई…!

तुमचाच लाडका,
अक्षय. .!

--अक्षय चिक्षे

2 प्रतिक्रिया:

अमोल केळकर said...

खूपच छान भावना उतरल्यात या पत्रात
अगदी मनातलं चित्र , अक्षय उमटलय

Akshaye Chikshe said...

Thanks..