Friday, November 8, 2013

गुणाकार आणि भागाकार - प्रकाश बोकील

मिरजमधल्या ‘मिरज विद्यार्थी संघा’चे एक धडपडे कार्यकर्ते वसंतराव आगाशे पुलंचे वर्गमित्र होते. एकदा एका समारंभाच्या निमित्ताने पुलं मिरजला गेले होते. त्यावेळी मिरज विद्यार्थी संघाने एक अद्ययावत सभागृह बांधायला घेतलं होतं. बांधकाम बरंच रखडलं होतं. पुलंनी वसंतरावांना विचारलं; ‘‘आतापर्यंत किती खर्च झालाय या बांधकामावर?’’ ‘‘अडीच लाख रुपये.’’ वसंतराव म्हणाले. ‘‘शिवाय अजून गिलाबा करायचाय, साऊंड सिस्टिम बसवायचीये, वरचा मजला बांधायचाय, परिसराचं सुशोभन करायचंय!’’ वसंतरावांनी बर्‍याच कामांची यादी पुलंना ऐकवली. पुलं म्हणाले; ‘‘ठीक आहे, आता माझ्याकडून किती मदत हवीये तुला तेवढं सांग!’’ पुलंच्या या जिव्हाळ्यानं वसंतराव पुरते भारावून गेले. ते म्हणाले; ‘‘भाई, एक रुपया दिलात तरी आम्ही धन्य धन्य होऊ!’’ वसंतराव आणि पुलंची ही भेट ज्या दिवशी झाली होती, तो दिवस विजयादशमीचा आदला दिवस होता. निरोप घेताना पुलं म्हणाले; ‘‘ठीक आहे वसंता; उद्या येतो शिलंगणाला!’’ दुसर्‍या दिवशी ते मिरज विद्यार्थी संघाच्या कार्यालयात पोहोचले. जाताना ते आपल्याबरोबर एक लाख रुपयांचा चेकच घेऊन गेले होते. तो चेक पाहून वसंतरावांच्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रू वाहू लागले होते.

नंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा पुलंनी पन्नास हजार रुपये दिले. एक अद्ययावत, डौलदार सभागृह उभे राहिले. त्याचं उद्घाटन पुलंच्या हस्ते झालं. समारंभाला कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी उपस्थित होते. समारंभानंतर वाटवे नावाच्या एका सद्गृहस्थांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी सव्वा लाख रुपये मिरज विद्यार्थी संघाला दिली. चिंतामणराव गोरे नावाच्या आणखी एका गृहस्थाने वीस हजार रुपये दिले. ‘दिवा दिव्याने पेटतसे’ असं म्हणतात ते खरंच आहे. वसंतराव आगाशेंच्या चेहर्‍यावरून कृतज्ञता अक्षरशः ओसंडून वाहत होती.

आपल्या भाषणात पुलं म्हणाले; ‘‘जगातला सर्वात सुंदर चेहरा म्हणजे कृतज्ञ चेहरा! खरं तर माणसांनी एकत्र येऊन आनंदाचा गुणाकार करावा आणि दुःखाचा भागाकार करून त्याची बाकी शून्य करून टाकावी!’’ आयुष्याचं जटिल गणित सोडवण्याची यापेक्षा अधिक सोपी अशी दुसरी कोणती पद्धत असेल? पुलंनी त्या विजयादशमीला जे आनंदाचं, सुखाचं, माणुसकीचं सोनं लुटलं, मिरजेत त्याचा सुगंध आजही त्या सभागृहाच्या रुपानं दरवळतो आहे.

प्रकाश बोकील
-- नवशक्ती

पुन्हा गळाभेट!

वसंतराव देशपांडे तल्लीन होऊन गात होते. पुढ्यात पु. ल. देशपांडे त्यांचं गाणं ऐकत बसले होते. तेही तेवढेच तल्लीन. ढगांचं दार लोटून सुनीताबाई कधी आत आल्या दोघांनाही कळलं नाही. समेवर पुलंनी आपला उजवा हात हवेत झटकून दाद दिली आणि डोळे उघडले तर पुढय़ात साक्षात सुनीताबाई उभ्या, कंबरेला पदर खोचून! पुलंच्या पोटात गोळा आला आणि चेहऱ्यावर अजीजीचे भाव आले.

अगं? तू आलीस? आम्ही जरा बसलो होतो, माझा बर्थ डे साजरा करत. री बर्थ झाल्या खेरीज नवी तारीख मिळणार नाही. तोपर्यंत जुन्याच तारखेला बर्थडे साजरा करायचा. बरं झालं आज नेमकी आलीस! भाईचा कितीही राग आला तरी त्यानं तोंड उघडलं की सुनीताबाईंना राग कायम ठेवणं जड जात असे. तसा याही वेळी त्यांचा राग मावळला आणि म्हणाल्या, अरे, प्रत्येक बर्थडेच्या वेळी मला वाटत होतं यावंस तुझ्याकडे, पण ९ वर्ष काढावी लागली बघ! असं म्हणत त्यांनी वसंतरावांच्या पुढय़ात ठेवलेला पाण्याचा तांब्या हाती घेतला, त्यावरचं फुलपात्र उचललं आणि तांब्यातलं पाणी हुंगलं. ते पाहून वसंतराव म्हणाले, अगं, इथं अमृताखेरीज काहीही मिळत नाही. आता तूच सांग काहीतरी युक्ती मला.

वसंतरावांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत सुनीताबाईंनी चौफेर नजर फिरवली. सगळा परिसर अस्ताव्यस्त. पायजमा खाली पडलेला, कुडता भिरकावून दिलेला, टॉवेल गुंडाळी करून पडलेला. पुढच्या मिनिटाचं आपलं भविष्य काय आहे ते पुलंना चटकन कळलं. त्यांनी शिताफीनं सुनीताबाईंचा हात धरला आणि म्हणाले, अगं आत्ताच आली आहेस नं, जरा बस दोन मिनिटं शांत आणि मग कर आवराआवर! पण सुनीताबाईंना कुठं धीर होता. त्या भाईकडं सात्त्विक रागानं पाहत म्हणाल्या, भाई, मला खरं खरं सांग, हा पायजमा इथं किती दिवसांपासून पडला आहे? त्यांच्या या प्रश्नावर वसंतराव फस्कन हसले. चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव आणण्याचा कमालीचा प्रामाणिक प्रयत्न करत पुलं म्हणाले, खरं सांगायचं तर नऊ वर्षांपूर्वी इथं स्वर्गात आलो तेव्हा पृथ्वीवरचे कपडे काढून इथले घातले, तेव्हापासून हा पायजमा असाच पडलेला आहे. तरातरा जात सुनीताबाईंनी तो पायजमा उचलला आणि म्हणाल्या, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात, पण तेही खोटंच म्हणायचं! यावर तिरकसपणे पुलं म्हणाले, ते तुला स्वत:वरूनही कळायला हरकत नाही. वसंतरावांनी मग तंबोऱ्याला गवसणी घातली आणि म्हणाले, काय म्हणतेय आपली पृथ्वी? टॉवेलची घडी घालत सुनीताबाई म्हणाल्या, पृथ्वी काय म्हणतेय ते बघायला माझे डोळे कुठं शाबूत होते? आणि काही ऐकायची इच्छाही नव्हती, आजच्या दिवसाची वाट बघत काढली नऊ वर्ष कशीतरी! दोन क्षण ओली शांतता पसरली. मग पुलंनी सूत्रं हाती घेतली आणि म्हणाले, सुनीता, इथं येऊन एकच गोष्ट लक्षात आली, स्वर्गसुख वगैरे जे काय असतं ना, ते स्थळावर अवलंबून नसतं, आपल्यासोबत कोण आहे, यावर असतं अवलंबून ते! तुझा धाक असण्यात मला जे स्वातंत्र्य होतं, त्याची सर कशालाच नाही. मग सुनीताबाईंनी भाईंचा हात प्रेमानं हाती धरला आणि म्हणाल्या, आता आलो आहोत ना आपण पुन्हा एकत्र!

सुनीताबाई आल्यामुळं पुलंच्या अंगात नवा उत्साह संचारला. घर आवरत असलेल्या सुनीताबाईंना ते म्हणाले, आपल्या पृथ्वीवर तो अमृततुल्य चहा मिळतो ना, तर ते साफ खोटं आहे. खरं तर मी आता चहातुल्य अमृत शोधतो आहे, कारण चहाची गंमत अमृतात नाही. मग ते वसंतरावांकडे पाहत म्हणाले, वसंता, चल कुठं दूध, साखर आणि चहा-पत्ती मिळते का बघू जरा. वसंतराव पुलंचा बालसुलभ उत्साह कौतुकानं पाहत होते. त्यांनी पुलंना वास्तवाची जाण करून दिली. अरे पीएल, बाहेर जागोजागी अमृताच्या टाक्या बसवल्या आहेत, चहासाठी तुला कुंपण ओलांडून नरकात जावं लागेल. ते ऐकून पुलं म्हणाले, पृथ्वीवरचा प्रत्येकजण पुण्याऐवजी पाप गाठीशी बांधण्यासाठी का धडपडत असतो, ते इथं आल्यावर कळलं. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, कारण जिवंतपणीच तो दिसला तर कोणीच तिकडे फिरकणार नाही. मग चहाचा नाद सोडून पीएलनी बैठक मारली आणि म्हणाले, अगं सुनीता, जी.ए. इथंच राहतात, दोन घरं सोडून. तुला जर त्यांना पत्र वगेरे लिहायची असतील तर मी आहे कुरियर सव्र्हिससाठी. किचनचा ओटा साफ करताकरता सुनीताबाई फणकाऱ्यानं म्हणाल्या, काही टोमणे मारायची गरज नाही भाई, मी त्यांना भेटायला जाणारच आहे.

पण पुलं कसले गप्प राहतात? त्यांनी निरागस चेहरा करत टोलेबाजी सुरूच ठेवली, तू येणार आहेस हे आधी कळलं असतं तर बरं झालं असत. अगं, जी.ए. त्यांचा गॉगल विसरले होते पृथ्वीवर. तुला सांगितलं असतं, येताना घेऊन ये म्हणून! सुनीताबाईंनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाल्या, भाई, कोण कोण भेटतं रे? बरेच जण असतील नं इथं आपल्या ओळखीचे? यावर भाईंनी दीर्घ पॉज घेतला आणि म्हणाले, मी काही फारसा बाहेर पडत नाही. अगं, पृथ्वीवर भेटलेलीच सगळी माणसं जर इथंही भेटू लागली तर मग मरून उपयोग काय? मग उत्साहानं सुनीताबाईंना म्हणाले, आज छान मुगाची खिचडी कर. इथं खाण्याचं मात्र सगळं मिळतं. पण कंटाळा म्हणून मी भानगडी तपडत नाही काही करण्याच्या! सुनीताबाईंनी तांदूळ निवडायला घेतले आणि म्हणाल्या, बघतेच आता तुझ्या कंटाळयाला, उद्यापासून लिहायला बसायचं!

वसंतराव निघाले होते; पण मुगाच्या खिचडीचं नाव ऐकून ते थांबले. ते सुनीताबाईंना म्हणाले, अगं, इथं काही लिहिता येणार नाही त्याला, इथं फक्त मौज मजा करायची असते. काम करायला बंदी आहे इथं. त्यावर पुलं म्हणाले, आता ही आली आहे ना इथं, उद्यापासून इंद्र शेतात जाऊन नांगर धरेल आणि रंभा, उर्वशी जात्यावर बसून धान्य दळतील की नाही बघ! हे ऐकून सुनीताबाईंचा पारा चढणार, हे लक्षात घेऊन मग पुलंनीच विषय बदलला आणि म्हणाले, मी इथं आल्यानंतर तू किती देणग्या दिल्यास? कोणाला दिल्यास? मुगाच्या डाळीवर पाणी ओतत सुनीताबाई म्हणाल्या, भाई, अरे देणाऱ्याला दिल्याचं सुख मिळावं असे घेणारे सापडणं मुश्कील झालंय. आपलं आयुष्य संपलं हे भाग्यच म्हणायचं.. अस्वस्थ मनानं वसंतरावांनी तंबोऱ्याची गवसणी काढून पुन्हा सूर लावला.

लोकसत्ता, लोकरंग,
रविवार, १५ नोव्हेंबर २००९