Saturday, June 4, 2022

इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्णमहोत्सवी साहित्य सम्मेलनात केलेले अध्यक्षीय भाषण

पुलंनी इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्णमहोत्सवी साहित्य संमेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणातला काही भाग, पूर्ण भाषण 'मित्रहो' पुस्तकात वाचता येईल .

साहित्यप्रेमी बंधू आणि भगिनींनो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ह्या सुवर्णमहोत्सवाच्या प्रसंगी मला आपण अध्यक्षाच्या जागी आणून बसवल्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. मराठी साहित्याच्या प्रांतात गेली तीस-एक वर्षे मी जी काही 'चावटी” केली,त्याबद्दल अतिशय प्रेमाने मला हा मान दिलात याची मला कृतज्ञ जाणीव आहे. तसा मी भाग्यवान माणूस आहे. लेखक म्हणून माझ्या उत्साहाचा भंग व्हावा असं माझ्याबाबतीत वाचकांनी काही केलेलं नाही. समीक्षकांनीदेखील, लिहितोय बिचारा तर लिहू दे, म्हणून सोडून दिलं आहे. बरं, मी तसा बंडखोर लेखक वगैरे नाही. बंड वगैरे मला जमणाऱ्या गोष्टी नाहीत. महात्मा गांधींच्या चळवळीतदेखील, पोलिसांचा लाठीहल्ला सुरू झाला की, माझं धावण्याच्या शर्यतीतलं कसब पाहून माझं मलाच आश्चर्य वाटायचं! मी त्या कलेचा अभ्यास वाढवला नाही, त्यामुळे भारत एका मराठी मिल्खासिंगला मुकला असं माझं नम्र मत आहे.

मी एक ज्याला मध्यमवर्गीय म्हणतात असा माणूस आहे. तरीही जीवनाच्या वाळवंटातला 'प्रवासी कमनशिबी मी” असं म्हणण्यासारखे क्षण माझ्या वाट्याला फार कमी आले. जे आले ते मी माझ्या लिखाणातून सांगितले आणि वाचकांनी 'ते वाचून आम्ही पोट धरधरून हसलो.' हे आम्हाला ऐकविले! आयुष्यातले काही संकल्प सिद्धीला गेले नाहीत याचं मला दुःख आहे. उदाहरणार्थ, गीतारहस्य, ज्ञानेश्वरी, दास कापितालचे मराठी भाषांतर, आणि भारतीय दंडविधान असले ग्रंथ संपूर्ण वाचायचे संकल्प अजूनही सिद्धीला गेलेले नाहीत! मला काहीही पाहण्याचा कंटाळा नाही. वाचण्याचा तर मुळीच नाही. गप्पा मारण्यात माझ्या आयुष्याचा सर्वांत अधिक काळ गेला आहे. आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मी हे बोलणं वरं दिसणार नाही, पण मला तसा बराचसा लिहिण्याचाच आळस आहे! अलीकडे तर मी प्रस्तावनालेखक म्हणूनच अधिक प्रसिद्ध आहे! माझी लेखक म्हणून भूमिका अगदी साधी आहे. आयुष्यात मला चांगल्या साहित्यातून, जीवनातून जे जे चटका लावून गेलं - ज्या आनंदाचे क्षण मी भोगले, जी सुसंगती किंवा विसंगती जाणवली, ते मी माझ्या स्वभावधर्माला स्मरून सांगितलं! कथा, कादंबरी, कविता ह्या मातबर साहित्यप्रकारांत माझ्या खात्यावर एकाही महान निर्मितीची नोंद नाही. 'नाटक? हा मी विशुद्ध साहित्यप्रकार मानत नाही. मी जी काही नाटकं लिहिली, ती रंगमंचावरून करण्यासाठी लिहिली. नुसतं कथा-कादंबरी-कविता यासारखं एकांतात वाचण्यासाठी नाटक ही कल्पना मला रुचत नाही. नाटकाचं पुस्तक वाचायचा मला कंटाळा आहे. नाटकाच्या यशात नट-नटींचा आणि इतर अनेकांचा वाटा असतो. अपयशाचा स्वामी फक्त नाटककार! यामुळे फार तर चार विनोदी पुस्तके, काही प्रवासवर्णने, काही व्यक्तिचित्रे, एवढीच माझी साहित्यनिर्मिती ! माझ्यापासून कुठला कालखंड सुरू झाला नाही की संपला नाही!

माझ्या आधीच्या अध्यक्षांची नावे वाचून माझी छातीच दडपली. शेवटी मी हे अध्यक्षपद स्वीकारताना मनात मर्ढेकरांचा मंत्र म्हटला की, 'विदूषका वाली हास्यरस!' पूर्वीच्या महान अध्यक्षांनी दिलेले संदेश मी वाचले. सावरकरांनी तर आपल्या तरुण पिढीने आता लेखणी मोडून टाकावी आणि बंदूक उचलावी, साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक -- असा संदेश दिला होता! आता मला हे थोडंसं एखाद्याच्या लग्नाला जाऊन बोहल्यावर त्याला “आधी विमा उतरवा आणि मग मुंडावळ्या बांधा”. हे सांगितल्यासारखं वाटलं हा माझा दोष असेल! कुणी साहित्यातून लोकजागृती घडवायला सांगितलं, तर कुणी राष्ट्रभक्त व्हा असा संदेश दिला. तसा त्यांना अधिकार होता. पण हेदेखील थोडंसं ललित साहित्याकडे एक विशुद्ध आनंद देणारी, जगताना जीवनातील जाणिवा तजेलदार करायला लावणारी कला आहे असे न पाहता, साहित्य म्हणजे कथा-कवितेची शर्करावगुंठित औषधाची गोळी किंवा फावल्या वेळी घालायची 'शीळ' आहे असे मानण्यामुळे झाले आहे असे माझे नम्र मत आहे. हे सारं सांगणं त्या अध्यक्षांना शोभून दिसलं. पण. आपण माझं साहित्य वाचल्यानंतरही मला अध्यक्ष केलंत, ते मोरोपंतांच्या शब्दांत, कधीतरी 'रखिवडिचा स्वाद का न चाखावा' अशाच उद्देशानं असावं! त्यातून विनोदी लेखक हा रेवड्या उडविणारा अशीही एक कल्पना आहे. पण ती बरोबर नाही. तो रेवड्या करणारा असेल. रेवडीत तीळ आणि गूळ असतो. तैलबुद्धी आणि गोडवा यांचा साक्षात्कार जर विनोदातून झाला नाही, तर ते हास्यं पौराणिक नाटकातल्या राक्षस पार्ट्यांसारखे विकट हास्य होईल. असो! तर संस्कृत नाटकातल्या 'धीरोद्धतां नमयतीव गतिर्धरित्रीम॑', अशा ह्या मोठमोठ्या नायकांचा प्रवेश संपल्यावर ह्या मंचावरचा माझा प्रवेश हा 'तत:प्रविशति विदूषक:' यासारखा आहे! हे माझं मलाच वाटायला लागलं आहे.

इचलकरंजीच्या लोकांनी ह्या संमेलनाच्या कार्याचा भार उचलला, त्यांचेही आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. बाळकृष्णवुवा इचलकरंजीकरांचं गाव म्हणूनही ह्या गावाशी मला माझा ऋणानुबंध वाटतो. काशीची गंगा रामेश्वरी न्यावी, तसं बुवांनी ग्वाल्हेरचं हिंदुस्थानी अभिजात संगीत ह्या महाराष्ट्राला आणून देऊन आमच्यावर अनंत उपकार केळे आहेत. आज महाराष्ट्रात अभिजात संगीताविषयी जे एवढं प्रेम आढळतं, त्या संगीताची जी इमारत इथे फळा आली, त्याचा बाळकृष्णवुवा इचलकरंजीकरांनी रचिला पाया असेच म्हणायला हवे. तेव्हा मी इचलकरंजीला येताना बाळकृष्णबुवांच्या गावाला येतो आहे हीही भावना मनात आहे.

हे पन्नासावं साहित्य संमेलन आहे. पण माझं भाषण हे कृपा करून गेल्या एकोणपन्नास संमेलनांच्या काळातल्या मराठी साहित्याचं समालोचन आहे असं आपण मानू नये. ज्या मराठी ललित साहित्याच्या प्रदेशात मी हिंडलो, जिथे मीही चार रोपटी लावायचा प्रयत्न केला, त्या प्रदेशाचं हे एक प्रवासवर्णन आहे असं आपण फार तर समजा. अगदी लहान वय सोडलं तरी लिहिता वाचता यायला लागल्यापासून गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षं, मी ह्या पुस्तकांच्या दुनियेत हिंडतो आहे. साहित्य-संगीत आणि नाटक ह्या तीन गोष्टींनी माझं जीवन कृतार्थ झालं आहे. मी लिहिलेल्या साहित्यामुळे किंवा मी रचलेल्या संगीतामुळे किंवा नाटकामुळे नव्हे, तर मला ह्या तिन्ही कलांतून जो अनुभव मिळाला -- जी जीवनदृष्टी मिळाली - मनावर चढणारी काजळी जी वेळोवेळी पुसली गेली, त्याचं कारण, माझा ह्या कलांशी जडलेला संग! आणि जे मला लाभलं ते इतरांनाही लाभावं ह्या एका हेतूने मी ही निर्मिती करायला लागलो. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणतात तसं जे मला तिळ तिळ लाभत गेलं ते मी वाटलं! तिळापासून होतं ते तेल. तेलाला स्नेह म्हणतात. ह्या वाटपातून तुमचा-आम्रचा जो स्नेह जडला, ती माझी कमाई! आणि ही केवळ माझीच्‌ कमाई नाही, ह्या जगात कलांच्या रूपाने आनंद देणारे आणि आनंद घेणारे जे जे कोणी आहेत, त्या साऱ्यांची खरी कमाई ही एवढीच आहे.

(अपूर्ण)
पु.ल. देशपांडे
(२६-१२-१९७४)

0 प्रतिक्रिया: