Tuesday, October 12, 2021

पुलं वाचतची गेलो, तेथे पुलं होवूनिया ठेलो..! - नितीन साळुंखे

पुलस्पर्श होताच दु:खे पळाली
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली..

नैराश्येतुनी माणसे मुक्त झाली
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली..!
– कविवर्य मंगेश पाडगावकर

पुलंच्या साहित्याचा माझ्या किंवा समाजाच्या जडणघडणीवर झालेला परिणाम, पुलंच्या लिखाणाचा समाजावर काय परिणाम झाला याचे मूल्यमापन करण्याइतका काही मी मोठा नाही, परंतु माझ्या स्वत:च्या वैचारिक जडणघडणीवर पुलंच्या साहित्याचा नि:संशय परिणाम झाला आहे. आज मी जे काही चार वेडेवाकडे शब्द लिहू शकतो, त्यामागे पुलंच्या साहित्याचा सिंहाचा वाटा आहे.
मला पुलं पहिल्यांदा भेटले ते ‘बटाट्याच्या चाळी’त. कुतूहल जागं असणार्‍या शाळकरी वयातच मला पुलं भेटले हे माझं भाग्य. लहान वयातच मला वाचनाची सवय लागण्यामागे जसा रोजचा पेपर, चांदोबा, किशोर, चंपक यांचा मोलाचा वाटा होता, तेवढाच मोठा वाटा पुलंचा होता. पुढे जसजशी मला पुस्तकं उपलब्ध होत गेली, तसतसा पुलंची पुस्तकं वाचायचा मी सपाटा लावला. पुलंच्या पुस्तकांचं पहिलं वाचन मी आधाशासारखं केलं. त्या वाचनामागे निश्चित असा काही विचार नव्हता. पोटभर हसता यावं याच एका उद्देशाने मी पुलंच्या साहित्याचा अक्षरक्ष: फडशा पाडता झालो.

पुढे जसजशी समज येत गेली, तसतसे पुलं मी सावकाशीनं वाचत गेलो आणि दरवेळी पुलं मला नव्याने उलगडत गेले. पुलंवर खरंतर विनोदी लेखक म्हणून शिक्का मारून आपण त्यांच्यावर अन्याय केला आहे असं मला वाटतं. पुलं तत्त्वचिंतक होते. विचारवंत होते. तत्त्वज्ञानासारखा निरस, रुक्ष विषय पुलंनी आपल्याला विनोदाच्या माध्यमातून हसत खेळत शिकवला. आपण मात्र पुलंच्या सांगण्याकडे विनोद यापलीकडे पाहिलं नाही. त्यांचं साहित्य आपण डोक्यावर घेतलं, पण त्यातल्या विचाराकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्षच केलं. रोजच्या जगण्यातून नेमकी विसंगती पकडायची आणि ती न दुखावता विनोदाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवायची कशी हे पुलंनीच दाखवून दिलं. खरंतर विनोदाच्या माध्यमातून पुलंनी तत्त्वज्ञानाचे जहाल डोस समाजाला पाजले असं मी समजतो. हेच जर त्यांनी जड शब्दांतून आणि उपदेश करायच्या आवेशाने शिकवलं असतं, तर पुलं हे ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ कधीच होऊ शकले नसते. तसं झालं असतं तर महाराष्ट्रातले एक विचारवंत म्हणून त्यांची पुस्तकं वाचनालयात वाचकांची वाट पाहत बसली असती. तसं झालं नाही हे महाराष्ट्राचं सुदैव आणि पुलंनी साध्या सोप्या शब्दांतून सांगितलेला विचार महाराष्ट्राने फारसा मनावर घेतला नाही हे मात्र महाराष्ट्राचं दुर्दैवं..!

पुलंची बहुतेक सर्व पुस्तकं मी वाचली आहेत. पुन्हा पुन्हा वाचली आहेत. जेवढ्यांदा ही पुस्तकं मी वाचली, तेवढ्यांदा त्यातून नवीन काहीतरी सापडत गेलं. गव्हापासूनच पोळ्यांचं पीठ, करंज्यांचा मैदा आणि गोडाच्या किंवा तिखटाच्या शिर्‍यासाठी रवा सापडावा तसं. लिखाण एकच, पण दरवेळी नवीन, अधिक रसदार आणि विचाराच्या तब्येतीला मानवणारं असं काहीतरी सापडतंच सापडतं. पुलंचं लेखन विचार करायला भाग पाडतं. उदाहरणच द्यायचं तर मी पुलंच्या ‘एक शून्य मी’ या लेखसंग्रहाचं देईन. पुलंचा हा लेखसंग्रह माझ्यासाठी गीता, कुराण, बायबल काय म्हणाल ते आहे. जीवनातील प्रत्येक समस्येवर उत्तर आणि जीवनातले आनंदाचे क्षण कसे साजरे करावेत यावरचं उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात मला सापडते. जेव्हा जेव्हा मी अस्वस्थ असतो, तेव्हा तेव्हा मी हे पुस्तक काढून त्यातला जो समोर येईल तो लेख काढून वाचत बसतो आणि माझ्या अस्वस्थपणावर त्यात ‘उतारा’ हमखास सापडतो आणि माझ्यातला तो अस्वस्थपणा शब्दांतून कागदावर उतरत जातो आणि मन मोकळं मोकळं होत जातं. हा लेख लिहितानाही मला पुलंवर काय लिहावं आणि काय नको ते कळत नव्हतं. पुलं माझं दैवत आहे. नको नको, दैवत म्हटलेलं पुलंना आवडणार नाही. पुलं मला माझे मित्र वाटतात. चांगल्यासाठी पाठीवर हाताने थाप मारणारे आणि चुकीच्या गोष्टीसाठी त्याच हाताने कान पिळणारे. अशा मित्रावर काय आणि किती लिहावं हेच मला समजत नव्हतं. अशा अवस्थेत मी सवयीप्रमाणे ‘एक शून्य मी’ उघडलं आणि पुढचं सर्व आपोआप शब्दबद्ध होत गेलं.

समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेची एखाद्या कुशल शल्यविशारदाच्या नजाकतीने शल्यक्रिया कशी करावी, हे पुलंनी फार उत्तम रितीने दाखवलंय. ‘एक शून्य मी’ या पुस्तकातल्या त्याच नावाच्या लेखात पुलंनी म्हटलंय, मुंबईतील वांद्य्राच्या एका देवीची ‘दुखरे अवयव बरी करणारी देवी’ म्हणून ख्याती आहे. आपला जो अवयव दुखत असेल त्या अवयवाची मेणाची प्रतिकृती करून देवीच्या चरणी वाहिली की त्या अवयवाचं दुखणं नाहीसं होतं अशी सर्वच भाविकांची श्रद्धा. यापेक्षा पुलंनी विनोदी अंगाने शंका विचारली, की त्यांच्या शेजारच्यांना मूळव्याध आहे, तर त्यांनी कोणता अवयव देवीला अर्पण करावा. यावर उत्तर नव्हतं. लोकांनी हसून वेळ मारून नेली, परंतु पुलंच्या प्रश्नातलं मर्म त्यांना बरोबर समजलं होतं. हेच जर ’ह्या तुमच्या सार्‍या अंधश्रद्धा आहेत’ असं जर पुलंनी एखाद्या तत्त्ववेत्याचा आव आणून सांगितलं असतं, तर धार्मिक भावना दुखावल्या म्हणून समाजात बरंच काही विपरीत घडलं असतं. पुलं पुढे म्हणतात की, देवी जर खरंच असे दुखरे अवयव दुरुस्त करत असेल, तर तिला सर्वांनी आपापल्या मेंदूची प्रतिकृती अर्पण करायला हवी, जेणेकरून लोकांचे मेंदू दुरुस्त होतील, पण तसं घडणार नाही, असा विश्वासही पुलं व्यक्त करतात. कारण खरोखर तसं झाल्यास सर्वात पहिली देवळं, मशिदी नि चर्चेस इत्यादी दुकानं बंद होतील. देवालाही स्वत:च्या भवितव्याची चिंता आहेच की. लोकांनी मेंदू जागृत ठेवून वागावे हे पुलंनी विनोदाच्या आधाराने सांगितलं. माझेही देव आणि दैव यांच्यावरचे विचार काहीसे असेच असून, पुलंच्या पुस्तकांच्या वाचनाने त्यांना बळ मिळालं आहे. पुलंनी समाजातील अंधश्रद्धा आणि राजकारण यावर बरंच काही लिहिलंय. माझेही हे दोन चिंतेचे विषय. मी माझ्या कुवतीने लिखाणाच्या माध्यमातून समाजात वाढीला लागलेल्या बुवाबाजी, अंधश्रद्धा आणि हल्लीच स्वार्थांध राजकारणावर लिहायचा जो प्रयत्न करत असतो, त्यामागे पुलंची प्रेरणा आहे.

पुलंच्या निरीक्षणाबद्दल मी काय बोलावं? अगदी साध्या साध्या गोष्टीतून पुलंनी जे चिंतन केलंय त्याला तोड नाही. साधी विरामचिन्ह घ्या. रोजच्या वापरातल्या प्रश्नचिन्हावर लिहिताना पुलं म्हणतात, प्रश्नातून या जगातल्या कुणाचीच सुटका नाही. मग जगणे म्हणजे नुसते श्वासोश्वास घेणे की वेळोवेळी पडत असलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. त्या प्रश्नाचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकृतीखालीच टिंब म्हणजे शून्य हे त्याचे उत्तर असते. वर वर पाहताना हे वाचायला छान वाटते, पण या छोट्या वाक्यांतून पुलंनी आपल्याला आपलं रोजचं आयुष्य जगताना पडणार्‍या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायला हवा, असा संदेश दिला आहे. ती उत्तर शोधताना कदाचित हाती काहीच लागणार नाही, परंतु ती उत्तरे शोधताना काहीतरी दुसरं, अनपेक्षित आणि मनाला उभारी देणारं काहीतरी नक्की सापडेल, असाही संदेश पुलंनी दिला आहे, असं मी मानतो. कुठे काही काळ थांबायचं, हल्ली कुठे पूर्ण थांबायचं, कुठे वळायचं आणि कुठे काय बोलायचं, याचं कुणाला फार भान असेल असं वाटत नाही. अलीकडे

विरामचिन्हेही कुणी वापरताना दिसत नाही. मग ती योग्य त्या ठिकाणी असावीत याची काळजी करण्याचं कुणाला काही कारणच उरत नाही. आपल्या आजच्या जगण्याचं प्रतिबिंब असं विरामचिन्हांतून दिसत असतं. पुलंचा हा उपदेश आता माझ्या जगण्याचा पाया झाला आहे. मीही अनेक प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात भटकत असतो. त्या भटकण्यातून माझ्या हाती बरचंस ठोस असं काहीतरी सापडत असत. त्या सापडलेल्यातून पुन्हा नवे प्रश्न उभे राहत असतात आणि पुन्हा त्यांची उत्तरं शोधण्याच्या मागे मी जात असतो. निखळ आनंदाचा खेळ आहे हा. पुलंचा माझ्या वैचारिक जडणघडणीवर झालेला हा सर्वात सुंदर परिणाम आहे. पुलंनी विनोदाच्या माध्यमातून माणसाने माणूस म्हणून कसे वागावे आणि कसे नाही हे फार सुंदर रीतीने दाखवून दिले आहे आणि मी तसं जगण्याचा प्रयत्न करत असतो. मी पुलं व्हायचा प्रयत्न करतोय, सातत्याने करतोय.

वारकरी साहित्यात देव पाहायला गेलेला भक्त हा देवच होतो अशी मान्यता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देव

पाहावया गेलो। तेथे देवची होवूनी ठेलो। पुलंबद्दल माझी नेमकी अशीच भावना आहे. मी तुकाराम महाराजांसारखा थोर भक्त नाही किंवा पुलंसारखा थोर विचारवंत लेखकही नाही, परंतु तुकाराम महाराज जसे नेहमी पांडुरंगाच्या वाटेवर चालत राहिले, तशीच काहीशी माझीही भावना पुलंच्या साहित्याचं वाचन करताना असते. म्हणून म्हणालो, पुलं वाचतची गेलो, तेथे पुलं होवूनिया ठेलो..!’

-नितीन साळुंखे (मो. क्र. 9321811091)
https://ramprahar.com/15462/


0 प्रतिक्रिया: