Friday, April 17, 2020

आनंदयात्री पु. ल.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कॅनव्हासवर चमकत राहणारं एक महत्वपूर्ण नाव

पु. ल. देशपांडे...

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे...आपणा सर्वांचे लाडके भाई.

साहित्य, संगित , नाट्य क्षेत्रात केवळ स्वत:च्या आनंदासाठी स्वैर संचार करणारं व्यक्तिमत्व..

पु.ल सांगतात,उत्तम साहित्याचं वाचन, सुस्राव्य गायनाचं श्रवण आणि उत्तम नाट्याचं दर्शन या गोष्टी त्यांना चोरून कराव्या लागल्या नाहीत. त्या त्यांना सहजपणे प्राप्त झाल्या. केवळ स्वानंदासाठी ते त्यात रममाण झाले.मातुल घराणं दुभाषींच. आई, आजी , आजोबा सर्वच गायन वादन कलाप्रेमी. बालपणीच ग्रंथालयात जाऊन भाईंनी अनेक पुस्तके वाचली. ग.दि. माडगुळकर ,सुधिर फडके ( बाबुजी), यांच्या सोबत महाराष्ट्राच्या पवित्र भुमीत परमेश्वारानं आणखी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जन्माला घातलं. संतांच्या या भुमीला पावन केलं. तो दिवस होता ८ नोव्हेंबर १९१९. मराठी महिना कार्तिक. वेळ दुपारी अडीच. पु.लं.च्या आई सांगतात ,जन्मल्यावर काही सेकंद ते रडलेच नाहीत. सुईणीनं त्यांच्या हातावर , कपाळावर टोचलं. मग ते मोठ्यांदा रडले. ..जगाला हसविण्यासाठी जन्माला आलेलं मूल रडणार कसं?..वैद्यक शास्त्राच्या समाधानासाठी नवजात अर्भकाला रडवावं लागलं. रडलंही ते. आता हा जो निष्कर्ष मी काढला त्याची पु.लं नी हयात असते तर खिल्ली उडवली असती. मला थेट ‘ सखाराम गटणेच्या ‘ पंगतीत बसवलंअसतं. आपण काही ‘साहित्य साधना ‘ केल्याचं पु. ल. ना मंजूर नव्हतं. जे काही घडलं ती आनंदातातून आनंदासाठी आपोआप घडलेली क्रिया. पु.लं. चं म्हणणं, ब्रम्हदेवानं, आनंद निर्मितीसाठी मला पृथ्वीवर पाठवलं. स्वर्गारोहण झालंच आणि ब्रम्हदेवांनी विचारलं “ तू काय केलंस पृथ्वीवर ? आहे काही पुरावा?”..
तर सांगेन “ मी अनेकांना खळखळून हसवलं. ते आनंददायी हास्य हाच त्यासाठींचा पुरावा”. अशा या अद्वितीय व्यक्तीच्या जन्मशताब्धीचं हे वर्ष. नोव्हेंबर १९७९ ला पु. लं. ना साठ वर्षे पुरी झाली.त्यावेळी प्रसारीत झालेल्या ध्वनीफितीत ही माहिती उपलब्ध आहे.

केवळ हास्य आणि आनंद निर्मितीसाठी भाईंनी विविध कलांच्या क्षेत्रात मुशाफिरी केली. दिग्गजांनी त्यांच्या गुणांना हेरलं. त्यांचं स्वागत केलं. मी तर म्हणेन हा ईश्वर निर्मित योगायोग. तरूण वयात सुरांचे गंधर्व, बालगंधर्व, यांचे शेजारी बसून पेटी वाजविण्याचं भाग्य भाईंना लाभलं. बालगंधर्वांनी मान डोलवून पेटी वादनाला उत्स्फुर्त दाद दिली.आचार्य अत्रे हे पुलंचे आवडते वक्ते. श्रोत्यांशी भाषणातून संवाद साधण्याचं आचार्य अत्र्यांचं तंत्र आपल्याला भावल, असं पु.ल.नी आवर्जून नमूद केलंय. कवितांना चाली लावण्यातला चिरतरूण मनाचे कवी बा. भ. बोरकर यांचा काव्यअविष्कार भाईंना अतिशय आवडला. खुद्द बोरकरांच्या तोंडून कवितांना लावलेल्या चाली ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. चार्ली चापलीन आणि रविंद्रनाथ टागोर यांना पु.ल. आदर्श स्थानी मानीत. महाराष्ट्राच्या या प्रतिभासंपन्न साहित्यिकाच्या साहित्याची ओळख करून घेताना त्या मागची मानसिकता नीट लक्षात यावी या साठी वरील गोष्टी नमूद केल्या आहेत.


पु.ल. देशपांडेचं साहित्य काल होतं, आजही तितकंच टवटवीत आहे. येथून पुढेही ते तसंच, त्याच दिमाखात पुढच्या पिढीसाठी कायम टिकून राहणार . अशा साहित्याला ‘ ‘वांग.मय ‘ म्हणतात. सुप्रसिद्ध प्रवचनकार , विद्या वाचस्पती, शंकर अभ्यंकर यांनी या संदर्भात उदबोधक खुलासा केला आहे. साहित्य निर्माण होतं. काही काळ टिकतं. कालौघात विराम पावतं. नष्ट होतं. जे साहित्य भूत, वर्तमान आणि भविष्य काळातही टिकून राहतं, त्यालाच वाग.मय संज्ञा दिली जाते.

असो आता पु. लं. च्या साहित्यातील सौंदर्य स्थळ शोधण्याचा हा एक स्वल्प प्रयत्न....
सखाराम गटणे, चितळे मास्तर , हरी तात्या, नामू परीट ही सारी व्यक्तिचित्र पु. ल.नी वाचकांसमोर उत्तम प्रकारे सादर केली .मी तर म्हणेन त्या व्यक्तिचित्रात्मक कथाच आहेत. एक प्रमूख व्यक्ती आणि तिच्या सहवासात प्रसंगोपात येत रहणारी इतर माणसं या सर्वांना एका सुत्रात गुफंत प्रमूख व्यक्तीचं चित्र खुलवणं हाच प्रधान हेतू. वाचकांची पराकोटीची समरसता त्या पात्राला अजरामर करते. आजही पु.ल. म्हटलं की अंतू बर्वा , चितळे मास्तर इत्यादींची पटकन आठवण येते.

पु.ल. चं भाषा सौष्टव अप्रतिम.

ज्या प्रांतातील, प्रदेशातील कथानायक असेल तेथे बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचा अगदी परिणामकारक वापर त्या पात्राच्या मुखातून ऐकताना वेगळीच अनुभुती येते. कथेतून विनोदाची मुद्दाम निर्मिती केल्यासारखी वाटत नाही. मात्र विसंगती अवतरते तेंव्हा ती प्रभावीप्रमाणे श्रोत्यांपर्यंत/ वाचकांपर्यंत पोहचल्याने ते खळखळून हसतात. पु.ल.नी रेखाटलेला कोणताही नायक मला विदुषकी थाटाचा वाटत नाही. मग सखाराम गटणे असो, हरीतात्या असो वा चितळे मास्तर असो. कुणीही आचरटपणा वा विदुषकी चाळे करून उगाचच हसविण्याचा लटका प्रयत्न करत नाही. विसंगती हेरून ती दाखविण्याचं पु.लं. च कसब फारच छान. त्या व्यक्तिमत्वाचं यथार्थ दर्शन घडविण्यासाठी त्याची अंगीभूत विकृती दाखवली जाईल. ती हसण्यासाठी नसते तर वाचकाच्या / श्रोत्याच्या मनात ती कारूण्य भावच निर्माण करील. पु.ल. म्हणूनच तुम्ही ग्रेट आणि वेगळे वाटता. वर बऱ्याचदा मी ‘ वाचक/ श्रोता ‘ असा शब्द वापरलाय. मी पु.ल.चं साहित्य वाचलं. ते मला आनंद , समाधान देऊन गेलं. अगदी मनापासून सागतो माझा आनंद शेकडो प्रतीनं वृदिंगत झाला, जेंव्हा याच कथा त्यांच्या आवाजात कथाकथनातून ऐकल्या.पु.ल. तुम्ही उत्तम कथाकथनकार आहात..प्रत्येक कथाकथन हा एकपात्री प्रयोग.तुमच्या कथाकथानाच्या कॅसेट/सीडीज दिव्याऔषधीच .आलेला थकवा निघून जातो. गालातल्या गालात हसताना मन आनंदाने डोलू लागते.

हे सारं का घडतं?....कारण स्पष्ट आहे. लेखक तर तुम्ही आहातच. पण त्याचबरोबर तुम्ही उत्तम नट आहात. आवाजातील चढउतार, सुयोग्य फेरफार यांच्या द्वारे कथा समर्थपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवता.‘ हरातात्या ‘ कथा ही याचे उत्तम उदाहरण.मुलांच्या डोक्यावर विकायच्या छत्र्यांचे ओझे. त्यांना घेऊन निघालेले गोष्टी वेल्हाळ हरीतात्या . रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर ही संतमंडळी. तसेच शिवाजी, संभाजी, इत्यादी इतिहासातील मंडळी.यासर्वांचं व्यक्ती दर्शन घडवताना हरीतात्यांच्या मुखातून पु. ल. जे बोलले ते वर्णन करून सांगणं मलाही अवघड वाटतंय.
तुम्ही ती सीडी ऐकाच. एका नटश्रेष्टाचं तुम्हाला दर्शन घडेल. पु. लं.ची गाजलेली ‘ म्हैस ‘ कथा.

या कथेत पु.लं. नी निर्माण केलेली वातावरण निर्मिती इतकीप्रत्ययकारी आहे की असं वाटावं की जणू काही आपण रस्त्यावर उभे आहोत आणि मधोमध आडव्या पडलेल्या बहुचर्चित म्हशीला पहात आहोत. असे आपले सर्वांचे लाडके पु. ल. साहित्य रुपात आपल्यात आहेत...चिरकाल रहातील. खरं सांगू का. पु. ल.नी ब्रम्हदेवाला आता काही पुरावा देण्याची गरज नाही. प्रत्येक साहित्य रसिक स्वर्गात पोहोचला तर भाटासारखा सांगत सुटेल.. पु.लं. नी आम्हाला हास,हास,हसवलंय. पुरावा गोळा करण्यासाठी तूच आम्हाला पृथ्वीवर घेऊन चल.....


पु.लं. च्या स्मृतींना शतश: वंदन
--सुरेश त्र्यंबक पाठक

0 प्रतिक्रिया: