Monday, October 17, 2022

पु.लं.च्या आठवणींना पुन्हा उजाळा

मराठी वाचकांना आणि प्रेक्षकांना आपल्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहायला लावणारा, नव्याचा स्वीकार निखळपणे करायला शिकविणारा, सामान्यातील असामान्यत्व हु कणारा माणूस म्हणजे पु. ल. देशपांडे आणि अशा या भल्या माणसाच्या आनंदोत्सवात आपण सहभागी होतो, याबद्दल स्वतःचाच हेवा वाटतो, अशा शब्दांत ज्येष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता यांनी पु.लं.च्या आठवणींना उजाळा दिला.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात २०२१ साली झालेल्या 'पु.लं.च्या आठवणींना पुन्हा उजाळा' या पु.लं.च्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना विजयाबाई पु.लं.च्या आठवणींमध्ये अक्षरशः हरवून गेल्या होत्या. जबरदस्त मित्रवर्ग लाभलेला 'अवलिया' पण भला माणूस असलेल्या पु.लं.ना कायम आपला म्हणून जो अनुभव आहे, तो इतरांनाही जाणवून देण्याचा ध्यास होता. त्यामुळेच त्यांचा विनोद आणि लिखाण हे दोन्ही आयुष्यभर आपल्याकडे ठेवणीतला साठा जसा जपून ठेवावा तसे टिकून आहेत. एवढेच नव्हे तर पु.लंचे लिखाण वाचताना नकळत ते आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होतो. पु.लं.च्या सान्निध्यात असताना, “या माणसाकडे अशी कोणती जादू आहे !', याचं कायम अप्रूप वाटत असे, असं सांगताना विजयाबाईंनी भावनाविवश होत पु.लं.ची एखाद्याचं कौतुक करण्याची अगर प्रोत्साहन देण्याची हुबेहूब नक्कल करून दाखविली, त्या वेळी प्रेक्षकही गहिवरले होते.

कोणत्याही चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याच्या पु.लं.च्या स्वभावाविषयी सांगताना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, विजय तेंडुलकरांनी “घाशीराम कोतवाल'चे केलेले पहिले वाचन ऐकल्यानंतर पु.लं.नी, हे नाटक फार मोठे असून हे आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर व वेगळ्या पद्धतीने करावे लागेल, असे वारंवार बजावत प्रोत्साहन दिले. तसेच “घाशीराम...'चा प्रयोग पाहिल्यावर, मी तुझ्यासाठी नाटक लिहायला घेतोय आणि त्याचे नाव असेल 'तीन पैशांचा तमाशा', असं सांगून 'घाशीराम'साठी शाबासकी दिली. 'तीन पैशांचा तमाशा'चे पु.लं.नी पहिले वाचन केले, त्या वेळी हे नाटक मुंबईच्या वास्तवाशी जुळवून करू या, असे आपण सुचविताच, आता हे नाटक तुझे आहे, तुला हवे ते बदल कर, असं पु.लं. सहजपणे म्हणाले. त्यानंतर पु.लं. एकदाही नाटकाच्या तालमीला आले नाहीत. नाटकाचा पहिला प्रयोग बघितल्यानंतर, “आपण याला काय लिहून दिले अन्‌ याने हे काय केले ?' असे भाव पु.लं.च्या चेहऱ्यावर होते. परंतु पं. वसंतराव देशपांडे आणि सी. रामचंद्र यांनी नाटकाचा बाज आणि त्यातील जाझ संगीताचे कौतुक करून नाटक आवडल्याची पावती देताच पु.लं. खुलले... ही आठवण सांगताना जब्बार पटेलांनी, दिग्दर्शकाने केलेले बदल खुलेपणाने स्वीकारणारा नाटककार, अशी पु.लं.ची वेगळी ओळख करून दिली. 'देव नावाची गोष्ट कधी कधी मला कळत नाही', असं मार्मिक विधान करणारा अतिशय मर्मग्राही भाष्यकार म्हणूनही पु. ल. मोठे होते. आणीबाणीच्या काळात पु.लं.नी शनवारवाड्यासमोर केलेले भाषण म्हणजे त्यांचं खरं व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविणारं स्वगत आहे, असे जब्बार पटेल म्हणाले.

“मोठा कलावंत व्हायचे असेल तर तुझ्यातल्या लहान मूलाला जप“, अशी फार मोलाची शिकवण देणारे पु.ल. स्वतःही एखाद्या खट्याळ मुलाप्रमाणे होते, असे सांगताना प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांनी आपल्या आठवणींमधून, पु.लं.च्या निरागस आणि निस्पृह व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडून दाखविले. एखाद्याची अमूक एक गोष्ट वा उपक्रम आवडला की, पु.ल. त्याला अवघडायला होईल, इतकं त्याचं कौतुक करायचे, असं सांगून प्रा. केंद्रे यांनी “झुलवा'च्या पहिल्या प्रयोगानंतरची आठवण सांगितली. नाटक बघितल्यानंतर पु.ल. दोन दिवस बोलले नाहीत. मी एनसीपीएतच त्यांच्या हाताखाली काम करायचो, त्यांच्यासमोर गेलो तरी ते माझ्याशी काही बोललेच नाहीत. त्यामुळे आपलं काही तरी चुकलं, म्हणून पार गोंधळून गेलो होतो. तिसऱ्या दिवशी सकाळी एनसीपीएमध्ये गेल्यावर चौकीदारापासून जो भेटेल तो, पु.लं.नी तुम्हाला तातडीने भेटायला सांगितलं आहे, असं सांगत होता. मी पु.लं.च्या पुढ्यात दाखल होताच, 'नाटक बघितल्यानंतर बोलता येईल याचा आत्मविश्वास मला नव्हता', असं सांगितलं. त्या वेळी एखादा माणूस किती मोठा असू शकतो, याचं पु.लं.च्या रूपाने आपल्याला दर्शन झाल्याचे प्रा. केंद्रे म्हणाले. ते नेहमी म्हणायचे तु मला एखादी चांगली कथा सुचव, मी तुला चांगले नाटक लिहून देतो. त्यामुळे आपण एक रशियन कथा त्यांना वाचायला दिली. पु.लं.ना कथा कशी वाटली म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांना विचारायला गेलो तर म्हणाले, कथा छानच आहे, बरोबर चार दिवसांनी मी या कथेच्या नाटकाचे वाचन करणार. तु तयार राहा. पु.लं.नी केवळ चार दिवसांत 'एक झुंज वाऱ्याशी' या नाटकाचे वाचन केले. ही आठवण सांगताना प्रा. केंद्रे यांनी जेव्हा असं काही केवळ पु.ल.च करू शकतात, असे उद्गार काढले. पु.लं.च्या व्यक्तिमत्त्वाचा चिंतनशील भाग विषद करताना प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांनी, एनसीपीएतील कनिष्ठ कर्मचारी गफूर'भाईंना पु.ल. आपल्या वॉर्ड क्र. ५ मध्ये भेटायला आले तो प्रसंग सांगितला.

तसेच पु.ल. आणि सुनीताताई यांच्यातील काही किस्सेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात पु.लं.बरोबर 'वाऱ्यावरची वरात'मध्ये मालूची भूमिका करणाऱ्या करुणा देव, पु.लं.वर 'अमृतसिद्धी' हे पुस्तक लिहिणाऱ्या मंगला गोडबोले आणि पु.लं.च्या साहित्यावर वेबसाइट बनविणाऱ्या स्मिता मनोहर यांनी आपले अनुभव सांगितले. पु.लं.वरच्या स्मृतिपटाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण यांनी वक्‍त्यांचे स्वागत केले. तर पत्रकार अंबरीश मिश्र यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुलोत्सव 
२०२१
महाराष्ट्र टाईम्स 

0 प्रतिक्रिया: