Friday, December 13, 2019

मी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट.. - दिग्विजयसिंह ठोंबरे

दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगरवरून एका वकील मित्रासोबत घरी येत होतो. वाटेत ट्रॅफिकमुळे त्यांची व माझी चुकामुक झाली. तेव्हा ते रहात असलेल्या बिल्डिंग जवळ येऊन मी त्यांस रूमवर पोहचला का अशी फोनवर विचारणा केली असता ते "हो" म्हणाले त्यावर "या खाली चहा घेऊ" असा प्रस्ताव मी त्यांच्यापुढे ठेवताच ते म्हणाले,

" तुम्हीच या वर मी कपडे काढली आहेत "
माझ्या चहाच्या प्रस्तावाविरोधात त्यांनी मांडलेला प्रतिप्रस्ताव ऐकून मला प्रचंड हसु आल. विनोद हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक असायला हवा. असा विनोद हेरण्याची कला अवगत होण्याचं श्रेय मी पुलं च साहित्य जे माझ्या वाचनात आल त्यास देतो. पुलं चा विनोद कळण्यासाठी एक पर्याप्तता गाठावी लागते तरच पु.ल. समजतात व ती पर्याप्तता आपण गाठली आहे असा गैरसमज मी माझ्या मनात बाळगत असताना आज सकाळी एक वर्तमानपत्र वाचत होतो. त्यात आज पुलं ची पुण्य तिथी आहे असे वाचनात आले. मग काय अश्या या विनोदाच्या बादशाहावर काहीतरी लिहिण्याचा मोह आवरण कठीण झालं. त्यातच एक कल्पना सुचली, आमच्याच सोसायटीमध्ये पुलं चा सहवास लाभलेले "कैलास जीवन" या नामांकित ब्रँडची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे श्री.राम कोल्हटकर काका राहतात त्यांच ऑफिसदेखील सोसायटीच्याच दुसऱ्या मजल्यावर आहे. त्यांचीच भेट घेऊन पुलंबद्दल त्यांलाच बोलत करूयात.....

ही सुचलेली कल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी कैलास जीवनच्या ऑफिसचाच भाग असलेले बंधुतुल्य प्रशांत भागवत यांस मी सदरची कल्पना सांगितली.

त्यांनी देखील माझा भेट घेण्याचा उद्देश रामकाकांस कळवून थोड्याच वेळात माझी व राम काकांची भेट घडवून आणली.

यापूर्वी झालं का जेवण? काय चाललय? या व अश्या प्रकारचे प्रश्न विचारण्यापलिकडे अनुभव नसलेला "मी" व माझ्यासमोर बसलेले पुलं चा सहवास लाभलेले "रामकाका" अशी आमच्यात चर्चा सुरू होण्यापूर्वी माझ्या मनावर दडपण आल्यासारखं वाटू लागलं. अश्यातच मी त्यांस प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

पु.ल. नी एवढं अफाट लिखाण केल ते कसं काय?

पु.ल. मनसोक्त गप्पा मारत असत त्यामुळे त्यांचे लिखानाकडे दुर्लक्ष होत असे ही गोष्ट ज्यावेळी सुनीताबाईंच्या लक्षात आली त्यावेळी सुनीताबाई पुलं च्या लिखाणाच्या वेळी कोणासही पुलं ना भेटू देत नसत.अगदीच जवळची व्यक्ती असल्यास सुनीताबाई स्वतः त्या व्यक्तीबरोबर गप्पा मारत असायच्या. सुनिताबाई यांनीच खरेतर पुलंला लिहीत केलं.लिखाणास प्रवृत्त केलं.

पहिला प्रश्न व त्यावर काकांनी दिलेल्या उत्तरातील सहजतेने माझ्या मनावरील दडपण अलगदपणे बाजूला झालं. माझ्यातील मुलाखतकार जागा झाल्याचा मला भास होताच मी पुढील प्रश्न विचारला.

पुलं चा एखादा अप्रकाशित किस्सा तुमच्या आठवणीतील कोणता आहे?

८ नोव्हेंबर ला पुलं चा वाढदिवस असतो.येणारा वाढदिवस हा पुलं ची पंच्याहत्तरी असणारा होता.त्यामुळे पुलं च्या घरी भरपूर गर्दी होणार होती.वयोमानामुळे पुलं ना सगळ्यांना भेटणे शक्य नव्हते.त्यावर एक युक्ती काढून पुलं नी मला विचारलं राम तू कुठं राहतो ?

चंद्रमा अपार्टमेंट, प्रभात रोड, गल्ली क्र. ८ असे मी उत्तर देताच पुलं म्हणाले वाढदिवसादिवशी मी तुझ्याकडे रहायला येतो व ही गोष्ट कुणालाही कळता कामानये. स्वतः पुलं आपल्या घरी रहायला येत असल्यामुळे मला देखील आनंद झाला. ठरल्याप्रमाणे पु.ल. व सुनीताबाई आमच्याघरी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ नोव्हेंबर ला राहण्यासाठी आले. दुसऱ्या दिवशी पु.ल. पहाटे ५.३० वाजता उठून आवरून बसले.त्यामुळे आम्ही देखील लवकर उठून आवरताच मी पुलंना विचारले नाष्ट्याला काय करायचे? त्यावर पुलं म्हणाले,

उपीट सोडून दुसरे काहीही करा.

पुलंच व उपीटाच जमत नसल्यामुळे आम्ही पोहे किंवा दुसरा पदार्थ (आता नक्की आठवत नाहीये) नाष्ट्याला केला. नाष्टा व त्या ओघात गप्पा सुरु झाल्या तेवढ्यात आमच्या घरातील फोन वाजला. तो मी उचलताच,

राम सुनीताला फोन दे...!

कोण बोलतंय

फोन दे

आहो माझ्याकडे नाही आल्या सुनीताबाई

अरे तू फोन दे त्यांला

कोण बोलत आहात आपण असे मी त्यांस विचारताच

विजया राजाध्यक्ष अस उत्तर पलीकडून आलं.

सुनीताबाई फोन शेजारीच उभ्या होत्या परंतु नाईलाजाने आम्हास फोन ठेवावा लागला त्यामागील कारण म्हणजे पु.ल. आमच्या घरी आहेत हे कोणासही कळून द्यायचे नव्हते.

पुढे असेच काही फोन आले परंतु मी त्यांस पु.ल. सध्या कुठं आहेत हे मला ठाऊक नसल्याचे कळवले.

दुपारी माझी पत्नी चित्राने मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आम्ही एकत्र जेवण केले व छान गप्पा मारत बसलो. त्या दिवशी रात्री मी व पु.ल. पुलंच्या घराबाहेर नेमकी काय स्थिती आहे हे पाहण्यास गेलो असता आम्हाला दरवाज्यात दोन बुके नजरेस पडले.

त्यातील एकावर लिहिल होत

"आपल्या भेटीसाठी येऊन गेलो,गुच्छ स्वीकारावा"

शरद_पवार.


तर दुसऱ्या बुकेवर लिहिल होत

"आपला आशीर्वाद घेण्यासाठी येऊन गेलो"

बाळ_ठाकरे.


एवढ्या मोठ्या व्यक्ति पुलंबद्दल बाळगत असलेला आदर काकांच्या तोंडून ऐकून पु.ल. हे एक असामान्य व्यक्तिमत्व होत याची प्रचिती मला येत होती.मी विचारलेल्या प्रश्नांची काका मनमोकळेपणाने देत असल्याने आमची चर्चा औपचारिकतेकडून कधी अनौपचारीकतेकडे वळाली हे माझ्या लक्षातच आले नाही. मी त्यांस विचारले

पुलंच्या लोकप्रियतेचा एखादा किस्सा सांगाल काय?

एकदा पुलंच्या घरी मी गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी पु.ल. खूप आठवणी सांगत होते. "चित्रमय स्वगत" हे पुस्तक त्यावेळी ते लिहीत होते.त्यामुळे पुलंकडे असलेले फोटो बघून त्याबद्दलच्या आठवणी सांगताना पु.ल. जुन्या आठवणींमध्ये रमून जात होते. साहित्यावर बरीच चर्चा झाली व गप्पांच्या ओघात कधी रात्रीचे ११ वाजले कळलेच नाही. तेव्हा आम्ही गप्पा आवरत्या घेत मी पुलंच्या घरातून बाहेर पडलो. सोसायटीच्या खाली येताच तिथे उभी असलेली ट्रॅक्स माझ्या नजरेस पडली. साधारण १५ ते २० लोक असावेत त्या ट्रॅक्स मध्ये. त्या लोकांनी मला विचारले अहो इथे पु.ल. देशपांडे कुठे राहतात? एवढ्या रात्री अनोळखी व्यक्तींस पु.ल. याच सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर राहतात हे कसं सांगायचं असा प्रश्न मला पडला त्यावर मी सुरुवातीला त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं परंतु त्या लोकांनी

अहो आम्ही लातूरवरून आलोय

फक्त पुलंला बघायच आहे

त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं आहे

कृपया आमची भेट घडवून देता का?

त्या लोकांची पुलंला भेटण्याची ओढ पाहून मी पुन्हा पुलं च्या घरी गेलो व सुनीताबाईंला सांगितले,खाली काही लोक उभी आहेत,लातूरवरून आली आहेत त्यांला पुलं ला भेटायचं आहे फक्त,खूपच विनवणी करीत आहेत.

खूप उशीर झाला होता तरीही पुलं वर प्रेम करणाऱ्या व्यक्तींला नाराज करायचे नाही म्हणून सुनीताबाईंनी एका अटीवर त्या लोकांला पुलं ला भेटण्याची परवानगी दिली ती म्हणजे,

"पुलं बरोबर कुणीही बोलत बसायचे नाही फक्त भेटायचे"

सुनीताबाईंच्या या अटीची त्या लोकांस मी कल्पना दिली. ती त्यांनी मान्य करताच मी त्यांस पुलं सोबत भेट घडवण्यासाठी घेऊन गेलो. त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याच दिसत होतं.प्रत्येक व्यक्ती पुलंच्या पाया पडून त्यांला डोळ्यात भरभरून साठवत होती.त्यांची पुलं सोबत भेट घडवल्याचा मला देखील मनस्वी आनंद झाला.

पुलं च्या लोकप्रियतेचे अनेक किस्से आहेत परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता मी पुढील प्रश्नाकडे वळलो.

पुलंच्या बाबतीत एखादा भावनिक प्रसंग तुम्हास आठवतो का?

हो, पुलं ला महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला होता त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तर प्रमोद नवलकर सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. त्यावेळेस बाळासाहेबांनी पुलं च्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारासंदर्भात बोलण्याच्या ओघात त्यांच्या शैलीमध्ये एक वक्तव्य केले होते.त्यावेळी खूप वादंग निर्माण झाला होता. बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये ती बातमी छापून आली होती. त्यामुळे पु.ल. व बाळासाहेब यांच्यात दुरावा निर्माण झाला असावा असे लोकांस वाटत होते. या घटनेच्या साधारण वर्षभरानंतर मी ज्यावेळी पुलं च्या घरी गेलो त्यावेळी तिथे राज ठाकरे व नाट्य निर्माते मोहन वाघ आले होते राज ठाकरे पुलं ना म्हणाले,

काकांला आपणास भेटायचे आहे त्यांला आपल्याकडे घेऊन येऊ काय?

त्यावर पु.ल. उत्तरादाखल म्हणाले,

अरे कोण बाळ ना, तो कधीही माझ्याकडे येऊ शकतो. अरे तो माझा विदयार्थी आहे ओरिएंटल हायस्कुल,

मुंबईचा.

काही दिवसांनी राज ठाकरेंनी भेट ठरवली. ठरल्यादिवशी बाळासाहेब पुलं च्या घरी ४.३० वाजता येणार होते ते येत असताना पोलिसांचा फौजफाटा तसेच कार्यकर्त्यांचा लवाजमा अस काही त्यांच्यासोबत असणार नव्हतं. बाळासाहेब व पुलं च्या भेटीचा साक्षीदार होण्यासाठी मी पुलं ना विचारणा केली असता त्यांनी देखील दिलखुलासपणे त्यादिवशी उपस्थित राहण्यास मला परवानगी दिली.

आणि तो दिवस उजाडला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांस राज ठाकरे पुलं च्या घरी घेऊन आले पु.ल. वयोमानामुळे व्हील चेअरवर बसले होते.बाळासाहेबांनी पुलं ना पाहताच आपल्या गुरुचे आशीर्वाद घेतले त्यावेळी पुलं बाळासाहेबांला म्हणाले

बैस..


या घटनेचा मी स्वतः साक्षीदार होतो. हा भावनिक प्रसंग माझ्या लक्षात राहीला तो कायमचाच

साधारण तासभर त्यांच्या दोघांमध्ये दिलखुलास चर्चा झाली त्यावेळी त्यांच्या दोघांमध्ये रंगलेली चर्चा पाहून त्यांच्यात वितुष्ट कधी नव्हतेच याची खात्री पटत होती. बाळासाहेबांचं पुलं च्या घरी येण हे त्यांच्या मनाच्या मोठेपणाची प्रचिती देऊन गेलं.

जशी बाळासाहेब व पुलं यांच्यात चर्चा रंगली होती तशीच रामकाका व माझ्यात रंगलेली चर्चा वेळेची मर्यादा ओळखून मी उरकती घेतली.

रामकाकांनी भेट दिली तसेच विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली त्याबद्दल त्यांस धन्यवाद म्हणून मी ऑफिसमधून बाहेर पडलो.

दिग्विजयसिंह ठोंबरे

7 प्रतिक्रिया:

निखिल देसले said...

पुं.ल म्हणजे दैवतच..! अप्रतिम लेख..!
https://shabda-kimaya.blogspot.com/

Anonymous said...

Wah wah ...masta lekh ....khupach chan ....👌👌👌👌

Radhakrishna said...

Awsome, apratim, khup sar kahi.

Anonymous said...

Awesome, apratim, sarv kahi.

Sagar shanakar kale said...

Awesome, apratim, khup kahi.

सुरज t said...

शतकानुशतके लोकांच्या मनात राहतील असे पू.ल.

Rutuja Nale said...

Khup sundar lekh