Tuesday, July 27, 2021

पु.ल. भेटतच राहतात.. -- निखिल असवडेकर

ब्लॉगसाठी हा लेख लिहायला सुरवात तर केली पण बटाट्याच्या चाळीतल्या सोकाजीनाना त्रिलोकेकरांप्रमाणे ‘सुरवातीची beginning’ मराठीतून करावी का इंग्रजीतून असा प्रश्न पडला आणि PuLa has always been अशी सुरवात होऊन गाडी शेवटी मराठीकडे वळली.. मराठी साहित्याला ज्या व्यक्तीने अढळ स्थान प्राप्त करून दिलंय त्या व्यक्तीवर मराठीतूनच लिहूया असा विचार केला.

आज पुलंसंबंधी लिहायचं विशेष कारण काय असा प्रश्न साहजिकच मनात येईल पण फक्त जन्मदिन आणि स्मृतीदिवस यापलीकडे हा माणूस आपलं आयुष्य व्यापून राहिलाय याची गेले काही वर्ष सदैव जाणीव होती आणि आणि या जाणिवेतूनच पुढे हा विषय..

मला तर गेल्या २-३ वर्षातून एकही दिवस असा आठवत नाही ज्यादिवशी पुलंची भेट झालेली नाही.. कितीही गडबडीचा किंवा कटकटीचा दिनक्रम असो.. पु.ल. रोज येतातच.. भले अगदी ५-१० मिनिटं का असेना! आपल्या दैनंदिन जीवनात भेटणारी माणसं, आजूबाजूला घडणाऱ्या घटना यांचा जरा बारकाईने विचार केला तर “अरे, पुलंनी लिहिलेलं साहित्य आपण प्रत्यक्ष जगतोय कि काय?” असा विचार मनात येतो.

आपण सर्वजण विद्यार्थी’दशे’त नक्कीच कोणातरी ‘सखाराम गटणे’ ला भेटलो असूच.. त्याचप्रमाणे आपणही कोणत्यातरी इयत्तेत ‘दामले’ मास्तरांप्रमाणे अनिष्ट होऊन राशीला बसणाऱ्या ‘गुरूं’चा त्रास सोसला असणारच! गणपतीत आरती करताना ‘भक्तसंकटी नाना….’ म्हणताना आवाज लावणारा कुणी असला कि हरितात्यांची आठवण झालीच म्हणून समजा. मधे एकदा डाॅमिनोज् च्या पिझ्झाबाॅयकडे आधी 20$ ची नोट घेऊन जाणारा, त्याच्याकडे सुटे नाहीत हे कळल्यावर मग आम्हा सर्वांकडून 3$ सुटे जमा करून मग 20$ गेले कुठे शोधणारा एक मित्र जेव्हा पहिला तेव्हा तर खुद्द ‘बाबुकाका खरे’ पहिल्याचा साक्षात्कार झाला. साखरपुडा-लग्न अशा सोशल समारंभांमध्ये पुढे पुढे करणारे ‘नारायण’ही सर्वत्र दिसतात.. पुणेरी स्वाभिमान असो, नागपुरी खाक्या असो किंवा मुंबईची ‘आङ्ग्लोद्भव मराठी’.. “I am going out बरं का रे Macmillan!!” म्हणणाऱ्या देशपांडे श्वानसम्राज्ञीही आता मुंबईच्या ‘टाॅवर संस्कृती’त नवीन नाहीत. एकदा इथे कंपनीत काम करताना मला ऑफिस मधल्या एका मित्राने त्याला नुकतीच सुचलेली इंग्रजी कविता वाचून दाखवली. तेव्हा इथे सातासमुद्रापार ‘हापिसच्या वेळेत आणि हापिसच्या कागदावर’ साहित्य रचणारा नानू सरंजामे (गोऱ्या कातडीचा) आठवला बघा! पुलंच्या नजरेने हेरलेले हे बारकावे केवढे अचूक होते हे जसजशी आपली भटकंती वाढते आणि आजूबाजूचं मित्रमंडळ विस्तारतं तेव्हा समजायला लागतं. ‘म्हैस’ मधील मांडवकर,बगूनाना, झंप्या, बुशकोटवाले डॉक्टर, उस्मानाशेठ, पंचनाम्यासाठी आलेला ऑर्डरली त्याचप्रमाणे ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ मधील कुलकर्णी, जुने फोटो दाखवून पुलंचा वेळ कुरतडणारे ते दाम्पत्य.. सर्व पात्रे पुलंनी अप्रतिम चितारली आहेत. सतत कोकणच्या प्रगतीचा पाढा वाचणारे काशिनाथ नाडकर्णी असोत अथवा किंवा अतिमवाळ स्वभावाचे कोचरेकर गुरुजी.. या सर्वांना आपण कोणत्या ना कोणत्या प्रसंगी अजूनही भेटतच असतो.

पुलंची साहित्यिक पात्रं (शाब्दिक आणि लाक्षणिक दोन्ही अर्थानी) आपल्या आयुष्यात कधी ना कधी डोकावून गेलेली आहेत. “काय हो.. हि सगळी मंडळी खरंच जिवंत होऊन तुम्हाला भेटायला आली तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल?” असं कुणीतरी पुलंना विचारलं होतं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं – “मी त्यांना कडकडून मिठी मारेन!”. मानवी व्यक्तिरेखा ह्या काल्पनिक असल्या, तरी त्यांचे स्वभाव हे काल्पनिक नसतात.. कदाचित त्यामुळेच ह्या व्यक्तिरेखांचा भास आपल्याला अवतीभवती होत असतो. त्या पात्रांनी कधी आपल्याला हसवलंय, रडवलंय आणि आपल्या प्रतिभेने स्तीमितही केलंय. “अहो आठ आणे खाल्ले कि चौकटीचा मुकुट घालून रत्नागिरीच्या डिस्त्रीक्ट जेलात घालतात आणि लाख खाल्ले कि गांधीटोपी घालून पाठवतात असेम्बलीत.. लोकनियुक्त प्रतिनिधी!!”, “अर्रे दुष्काळ इथे पडला तर भाषणं कसली देतोस??.. तांदूळ दे! तुम्ही आपले खुळे! आले नेहरू, चालले बघावयास!!” पु.ल. आपल्याच मनातला राग व्यक्त करतायत असं वाटत. “कोकणातल्या फणसासारखी तिथली माणसं.. खूप पिकल्याखेरीज गोडवा येत नाही त्यांच्यात” हि आपल्या मनातली सुप्त भावना.. पण पुलंनी शब्दांमध्ये केवढी छान रंगवलीये. सामान्य माणसाच्या आयुष्यात येणारे सामान्य प्रसंग असामान्य पद्धतीने रंगवणं यातंच ते. बाजी मारतात. सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या विनोदाला कधीही तत्कालीन प्रसिद्ध कलाकारांची किंवा पेज-3 पुरस्कृत धुरिणांची गरज भासली नाही आणि त्यांनी अख्ख्या मराठी समाजाला वेड लावलं. पुलंची हि धुंदी कधीही उतरणारी नाही.

पुलंचं आयुष्यात अजूनही असणं हेच आपलं जीवन सुखकर बनवतं. म्हणजे आपण आनंदी असलो कि पु.ल. हसवतात पण जेव्हा कधी दु:खी, निराश असू तेव्हा आयुष्याचं तत्वज्ञान आपल्याला सांगून जातात.. “ज्या दिवशी जन्माला येणं जस्टीफाएबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.” पुलंनी त्यांचे मित्र चंदू ठाकूर यांना लिहिलेल्या सांत्वनपर आणि प्रेरणादायक पत्रातील हे काही शब्द.. आपली विचार करण्याची किंवा आपल्या कल्पनेची, सामर्थ्याची रेघा किती सीमित आहेत याची जाणीव करून देतात. ‘हसविण्याचा माझा धंदा’ याप्रमाणेच या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक म्हणूनही आपली मोठी जबाबदारी आहे याची पुलंना नितांत जाणीव होती हे यावरून लक्षात येईल. चित्रपट-मालिका- नाटकांमधून राजे महाराजे, स्वातंत्र्यसेनानी साकारत सिंहगर्जना करणारे आपल्या पिढीतले कलाकार जेव्हा राजकीय सभा-समारंभांमध्ये कोणा स्वयंघोषित पक्षप्रमुखांच्या उगाच पुढे-मागे करत त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेलं आपण पाहतो तेव्हा नक्कीच त्या प्रकारची कीव येते अन मन विषण्ण होतं. आपल्या प्रतिभेला समाजमान्यता हवी यासाठी खरंच अशा थोतांडाची गरज आहे का असा विचार साहजिकच मनात येतो. मात्र कोणत्याही संकुचित राजकीय वा जातीय-सामाजिक चक्रव्यूहात पुलंची प्रतिभा फसली नाही की लोकप्रियतेच्या लाटेत वहावत जाऊन त्यांची साहित्यसंपदा कधी भरकटली नाही . तो त्यांचा पिंडच नव्हता. अलौकिक प्रतिभामंथनातून जोपासले गेलेले विचार आणि भावना त्यांनी वेगवेगळया वेळी, वेगवेगळया प्रासंगिक निमित्तांनी आपल्या लेखांत-भाषणांत-नाटकांत सुयोग्य चेहऱ्यांचा त्यावर मुखवटा लावून, आपल्या स्वाभाविक, सहज व अतिशय बोलक्या भाषेत कथन केल्या. पुलंचा एक ‘डाय हार्ड’ फॅन आणि त्यातही एक पार्लेकर असूनही त्यांना प्रत्यक्षात कधी न भेटता आल्याची खंत कायमच सतावत राहील पण ह्या निरनिराळ्या अवतारांनी ते मला अजूनही भेटतच राहतात.. रोजंच!!

– निखिल असवडेकर

(वरील लेखात अधे-मधे आलेले इंग्रजी शब्द ‘अव्हाॅईड’ करण्याचा प्रयत्न चुकूनही केला नाही.. शेवटी मी पडलो पक्का ‘मुंबईकर’!! )

मूळ स्रोत -- > https://nikhilasawadekar.wordpress.com

Wednesday, July 21, 2021

‘पु. ल.’ नामक गुरू-किल्ली -- सतीश पाकणीकर

एखाद्याच्या व्यवसायाच्या अथवा कारकीर्दीच्या सुरुवातीला त्या व्यक्तीला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. कधी अनुभव कमी पडतो, तर कधी आर्थिक विवंचना निर्माण होतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींपुढील अडचणीही अर्थातच वेगवेगळ्या असतात. कालांतराने मग कुठे ती व्यक्ती जरा जरा स्थिरस्थावर होऊ शकते. आपला जम बसवू शकते. काही व्यक्ती याला अपवादही असू शकतात. त्यांची वाट सहज-सुलभ असते. विनासायास त्या व्यक्ती उच्चासनावर विराजमानही होतात. पण...पण अपवाद हे नेहमीच अभावाने पाहायला मिळतात. माझ्यासारख्या काही व्यक्ती या दोन्हीचा सुवर्णमध्य असतात. म्हटलं तर अडचणी असतात, पण त्याचबरोबर नशिबाची उत्तम साथही मिळत जाते. मी असं म्हणताना आज माझ्या डोळ्यांसमोर दोन प्रसंग अगदी काल घडल्यासारखे उभे राहतात.

माझं पदार्थविज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण १९८५मध्ये पूर्ण झालं. त्याच्या आधीपासूनच प्रकाशचित्रण हा मी माझा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून निवडला होता. बरोबरच भारतीय अभिजात संगीतातील कलाकारांच्या ‘भावमुद्रा’ माझ्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा छंदही लागला होता. स्टेजवरील उपलब्ध प्रकाशात फोटो टिपण्यासाठी ‘फास्ट फिल्म’चा वापर होई. त्यांची किंमत अर्थातच दुप्पट. त्यांच्या प्रोसेसिंगचा खर्चही त्याच व्यस्त प्रमाणात; पण व्यावसायिक कामांमधून मिळालेले बरेचसे पैसे मी माझ्या छंदावर खर्च करीत असे. त्यामुळे ‘कडकी’ ही नित्याचीच बाब होती; पण असे असतानाही मी माझ्या प्रकाशचित्रांच्या प्रदर्शनाचा घाट घातला. माझं पहिलंवहिलं फोटो प्रदर्शन.

१९८६च्या जून महिन्यातली बारा तारीख. स्थळ ‘बालगंधर्व रंगमंदिराचे कलादालन.’ प्रदर्शनाचे नाव ‘ स्वरचित्रांच्या काठावरती...’ अर्थातच भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या मी टिपलेल्या भावमुद्रांचे सादरीकरण. उद्घाटनाचा कार्यक्रमही प्रदर्शनाच्या विषयाला साजेसा. माझा मित्र विजय कोपरकर याचं गाणं, साथीला दुसरा मित्र रामदास पळसुले आणि त्यावेळेस नुकतेच पुण्याला परिचित झालेले सतारवादक शाहीद परवेझ यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन. गद्य भाषणाला पूर्णपणे चाट. अशा प्रकारे प्रदर्शनाचे उद्घाटन होण्याची ‘बालगंधर्व’मधील ही पहिलीच वेळ. कलादालनाच्या भिंतींवर अभिजात संगीतातील मोगुबाई कुर्डीकर, भीमसेनजी, कुमारजी, अभिषेकीबुवा, किशोरीताई, रविशंकर, विलायत खान, अमजदअली खान, झाकीर हुसैन अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भावमुद्रा अन् विजयच्या सुरेल स्वरांचा दरवळ. मैफल एकदम जमून गेली.

प्रदर्शनाचा शेवटचा दिवस. १६ जून. साडेचार वाजलेले. मी चहा पिण्यासाठी खालच्या कँटीनमध्ये गेलो. पुढ्यात चहा आला. एक–दोन घोट घेतोय, तोवर माझा मित्र प्रमोद पळत पळत आला व म्हणाला, ‘लवकर चल. वर कलादालनात पु. ल. देशपांडे व त्यांचे एक मित्र आलेत. ते तुझी चौकशी करताहेत.’

आनंदात मी हातातला कप तसाच ठेवला. धावलो. प्रदर्शनातील मधल्या पॅनेलपाशी दोघेही तन्मय होऊन फोटो पाहत होते. मी हळूच जाऊन शेजारी उभा राहिलो. ते आल्याने स्वाभाविकच त्यांच्या आजूबाजूला गर्दी झाली होती. थोड्या वेळाने ‘पुलं’चे माझ्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, ‘अरे तुलाच शोधतोय, कुठे होतास? हे माझे मित्र नंदा नारळकर.’ मी दोघांनाही नमस्कार केला. माझा विश्वास बसत नव्हता; पण समोर साक्षात अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व त्यांच्या एका जिवलग मित्रासोबत. आणि ते दोघेही माझ्या कामाचं ते तोंड भरून कौतुक करीत होते. मग पुढील जवळजवळ एक तास सर्व प्रकाशचित्रे बारकाईने पाहताना... त्यांची उपस्थिती असलेल्या मैफलींबद्दलच्या आठवणी जागवण्यात गेला. प्रदर्शन पाहून झाल्यावर ‘पुलं’नी अभिप्राय लिहिला – ‘या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात.’ करिअरच्या सुरुवातीलाच मिळालेला हा अभिप्राय माझ्यासाठी जगातील सर्वांत मोठे ‘अवॉर्ड’ होते.

... पण दरम्यान ‘पुलं’नी मला विचारले, की यात अण्णांचा म्हणजे पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांचा फोटो कुठे दिसला नाही. मी त्यांना सांगितले, की ‘मी त्यांचे फोटो काढण्यासाठी पुणे, औरंगाबाद येथील तीन-चार वेगवेगळ्या मैफलींत, अगदी मिरजेच्या दर्ग्यात त्यांचे गाणे होणार आहे असे कळल्यावरून तेथेही जाऊन आलो; पण त्या प्रत्येक मैफलीत त्यांची तब्येत बरी नसल्याने ते येऊ शकले नाहीत. व मी निराश मनाने परत आलोय.’ माझ्या या सांगण्यावर ‘पुलं’नी तेथेच मला एका खास मैफलीचे आमंत्रण दिले. ती मैफल पुढच्याच महिन्यात होणार होती. पुण्यातील प्रभात रोडवरील श्री. एम. ए. बाक्रे यांच्या घरी.

मैफलीच्या दिवशी मी सकाळपासूनच तयार होतो. ठरल्यावेळी मी बाक्रे यांच्या घरी पोहोचलो. निमंत्रित रसिक एक एक करून येत होते. माझी फारशी कोणाशीच ओळख नव्हती. स्वतः यजमान श्री. बाक्रे यांनी मला नाव विचारल्यावर मी त्यांना सांगितले, की मला पु. ल. देशपांडे यांनी आमंत्रण दिलंय. यावर बाक्रे मला थेट आत एका खोलीत घेऊन गेले. तेथे ‘पुलं’ व पं. मल्लिकार्जुन गप्पा मारीत बसले होते. मला पाहताच ‘पुलं’ म्हणाले, ‘ये रे, मी तुझी ओळख करून देतो.’ मग ते मल्लिकार्जुन यांच्याकडे बघत म्हणाले, ‘अण्णा, हा सतीश पाकणीकर. फोटोग्राफर आहे. याची आवड म्हणजे हा शास्त्रीय संगीतातील कलाकारांचे फोटो काढतो. नुकतंच त्यानं एक छान प्रदर्शन भरवलं होतं. त्यात तुमचा फोटो असावा म्हणून तो काढण्यासाठी तुमच्या काही मैफलींना हा आला होता; पण तुमच्या तब्येतीमुळे त्या मैफलींना तुम्ही आला नाहीत. म्हणून मी आज त्याला खास तुमचे फोटो काढण्यासाठी बोलावलंय.’ त्यावर मल्लिकार्जुन एकदम खळाळून हसले. जसे ते अशोक दा. रानडे यांनी टीव्हीवर घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत हसले होते तस्सेच. मग ते मला त्यांच्या कानडी ढंगात म्हणाले, ‘भाईंनी सांगितलंय. म्हणजे ऐकायलाच पाहिजे. तू माझ्या समोर बस. हवे तेवढे फोटो काढ.’

समोर ऋषितुल्य पं. मल्लिकार्जुन गानसागरात हरवून गेलेत. माझ्या शेजारी ‘पुलं’ आणि सुनीताबाई त्यांना मनापासून दाद देत आहेत आणि पं. मल्लिकार्जुन यांच्यापासून हातभर अंतरावरून मी ५० एमएमच्या लेन्समधून त्यांचे चक्क ‘क्लोज-अप’ टिपतोय. ‘गाण्यात राहणारा माणूस’ असं ज्याचं वर्णन लिहिलंय ती व्यक्ती समोर अन् ज्यांनी ते लिहिलंय ते शेजारी अशी माझी अवस्था. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता; पण अर्थातच ही होती ‘पु. ल.’ नामक एका महान गुरू-किल्लीची जादू.

दुसरा प्रसंग तर साक्षात ‘पुलं’च्या घरीच घडलेला. दिनांक होता आठ नोव्हेंबर. ‘पुलं’चा जन्मदिवस. नक्की साल आठवत नाही; पण १९८८-८९ असावे. आठ नोव्हेंबर या दिवशी ‘पुलं’च्या घराचे दरवाजे सर्वांना खुले असायचे. अगदी सकाळपासून त्यांचे सर्वसामान्य चाहते तर यायचेच; पण त्या दिवशी अनेक महनीय व्यक्तींची उपस्थिती ‘१, रूपाली, ७७७ शिवाजीनगर’ या वास्तूत असायची. मी साधारण पावणेबाराच्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचलो. चाहत्यांचा सकाळचा बहर ओसरला होता. आत गेल्यावर उजवीकडे असलेल्या सोफ्यावर पु. ल. बसले होते. त्यांना भेट म्हणून आलेले असंख्य पुष्पगुच्छ आणि त्या फुलांचा पसरलेला मंद सुगंध. फुलांचे गुच्छ सोडवून त्या फुलांची परत एकदा सुंदर रचना करून ठेवण्याची सुनीताबाईंची लगबग सुरू होती. समोरच्या सोफ्यावर एक वयस्कर गृहस्थ बसलेले. त्यांची व ‘पुलं’ची काही विषयावर चर्चा सुरू होती. मी फुलं देऊन ‘पुलं’ना नमस्कार केला. त्यांनी खुणेनेच मला बसायला सांगितले. सुनीताबाईंनी माझ्या हातावर पेढा ठेवला.

चर्चेचा विषय आधुनिक चित्रकला आहे हे मला एका क्षणातच कळले. त्या गृहस्थांची बोलण्याची व आपला मुद्दा ठामपणे मांडण्याची एक वेगळीच शैली होती. त्या बोलण्यावरून त्यांचा त्या विषयातील अधिकारही स्पष्ट जाणवत होता. अर्थातच ‘पुलं’शी चर्चा करायची तर अधिकार असणारच ना? मी मस्त आनंद घेत होतो. थोड्याच वेळाने ते गृहस्थ उठले. स्वच्छ पांढरा सदरा, तसाच स्वच्छ पायजमा, या पेहरावास शोभतील असे मागे गाठ मारलेले चंदेरी केस व टोकदार होत गेलेली लांबसडक शुभ्र पांढरी दाढी. एखाद्या चित्रातून अवतरलेला ऋषीच जणू. ते ‘पुलं’ना म्हणाले, ‘चला भाई, भेटू या परत.’ सुनीताबाईंचाही त्यांनी निरोप घेतला. पु. ल. त्यांना दरवाज्यापर्यंत सोडायला उठले. ते गृहस्थ दरवाज्यापर्यंत पोहोचले. ते पायात वहाणा घालताहेत तोवर पु. ल. त्यांना म्हणाले, ‘एक मिनिट अण्णा. हा पुण्यातला एक तरुण फोटोग्राफर आहे. सतीश पाकणीकर. शास्त्रीय संगीतातल्या कलाकारांचे यानी खूप छान फोटो काढलेत. त्याचं प्रदर्शनही भरवलं होतं यानी. आम्ही आमच्या ‘एनसीपीए’च्या संगीत विभागासाठी ते सर्व फोटो घेतलेत याच्याकडून.’ मी पुढे होऊन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं. पु. ल. पुढे माझ्याकडे बघून म्हणाले, ‘हे, चित्रकार एस. एम. पंडित.’ मी अवाक! माझ्या चेहऱ्यावर आदरयुक्त आनंदही आणि आश्चर्यही. एवढ्या मोठ्या चित्रकाराशी तितक्याच महान व्यक्तीच्या घरी झालेली ती भेट. पुन्हा एकदा पु. ल. नावाची गुरू-किल्ली. नेहमी बरोबर असणारा माझा कॅमेरा मी त्याच दिवशी का नेला नाही, याची खंत आजही मनाला अस्वस्थ करते.

एखाद्याचा छोटासाही गुण हेरून त्याला सतत प्रोत्साहित करत राहणे, हे त्या ‘पु. ल. नामक गुरू-किल्ली’चे महान वैशिष्ट्य. दोन वेगवेगळ्या कला प्रांतातील ऋषितुल्य अशा दोन ‘अण्णां’शी त्यांनी परिचय करून देण्याचे भाग्य मला एकाच जन्मात लाभणे यालाच मी नशिबाची उत्तम साथ असे म्हणतो.

आदरणीय भाई,
माझ्यासारख्या अनेक होतकरू व्यक्तींना तुमच्या परिघात स्थान मिळाले. तुमचा सहवास मिळाला. तुमच्या चिरंतन शब्दसामर्थ्याबरोबरच अशा अनेक आठवणी आजही आमची आयुष्यं फुलवून टाकत आहेत. त्यांचा जागर करणे हीच तुम्हाला तुमच्या या जन्मशताब्दी वर्षात खरी आदरांजली ठरेल!

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
(लेखन दिनांक : आठ नोव्हेंबर २०१८)

मूळ स्रोत - Bytes of India

Monday, July 19, 2021

माशी

साखरेचे खाणार त्याला देव देणार, म्हणतात. माशीतर सदैव साखरेचेच खाणार ! तिच्याइतकी गुळाची चव असलेले प्राणी क्वचित आढळतील. क्वचित ती आपल्या आहारात बदल करते. माणसासारखी माणसे नाही श्वापदांचा आहार करीत ? तिथे माशीनेच काय घोडे मारले आहे ? माणसाला जरी ही निष्कारण दुसऱ्याचे घोडे मारायची सवय असली तरी माशीचे मात्र घोडयावर फार प्रेम असते. बाकी माशीचे हे सगळे घोडयाचे, गोडाधोडाचे आणि क्वचित प्रसंगी उकिरडा फुंकण्याचे किंवा घाणीत तोंड घालण्याचे प्रेम पाहिले, की गतजन्माची राजघराण्यातली मंडळी पुढला जन्म माशीचा घेऊन येतात की काय, असे वाटते.

..माशी शिंकण्यावरून आठवले. मी काही स्वतः माशी शिंकताना ऐकली नाही. किंबहुना, मी अनेकांना हा प्रश्न विचारला. पण भुताप्रमाणे हा प्रत्यक्ष अनुभव असलेली माणसे मला आढळली नाहीत. तरीही ती शिंकत असावी. त्याखेरीज लोक उगीच बोलणार नाहीत. नेहमी उघड्यावर वावरणाऱ्या माशीला सर्दी होणे अगदी साहजिकच आहे. प्रस्तुत दिवंगत माशीलादेखील सर्दी झाली असेल. औषधाच्या कारखान्यात अन्यत्र वावरणाऱ्या एखाद्या प्रौढ माशीने तिला सांगितलेही असेल की, "स्ट्रेप्टोमायसिनमध्ये एक बुचकळी घे, आणि दोन दिवस मिठाईवर जरा बेतानं बस. एवढी-एवढी साखर खा पलीकडल्या वाण्याकडील. चांगली उघड्यावर असते. शाळेपुढं गुडदाणीवाला बसतो, त्याच्या गुडदाणीवर बसत जा पाच मिण्ट ---फारच भूक लागली तर! एरवी, थोडा खाण्यावर कंट्रोल हवा !”


...पाश्चात्य देशांतले लोक मात्र माशीला उगीचच भितात. घरात एक माशी आली की वाघ शिरल्यासारखा हल्लकल्लोळ होतो. फवारे काय मारतील, माश्या मारायचे जाळीदार थापटणे घेऊन जिथे-जिथे ती बसली असेल ती जागा बदडून काय काढतील. त्या भिण्याला काही सुमार नाही. काळ -वेळ नाही. एका इंग्रज मित्राच्या घरी मी एकदा जेवायला गेलो होतो. पहिले सूप आले.( भारतीय संस्कृतीला आणि पाश्चात्य संस्कृतीतला हा भेद चिंत्य आहे. ते सूप आले की जेवण सुरू करतात, आपण हातात सूप घेऊन गेलो की मांडवातले पाहुणे पांगतात.) माझा इंग्रज मित्र चमचा सुपात बुडवणार, इतक्यात त्याच्या बायकोने काडकन त्याच्या तोंडात वाजवली. ती बराच वेळ आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होती. पण मी तो पाश्चात्य प्रेमाचा भाग समजत होतो. आपल्याकडे चारचौघांतच नवराबायको तोंडाला तोंड देत नाहीत. त्यांच्याकडे चारचौघात अधिक देतात. त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांचे तिथे मुळीच लक्ष जात नाही. तोंडात फाडकन बसल्यावर माझा इंग्रज मित्र एकदम कावराबावरा झाला. दुसऱ्या क्षणी "सापडली !" म्हणून मड्डम ओरडली. त्यानेही सूपात नजर टाकून "डार्लिंग" म्हणून तिचे प्रेमभराने चूंबन घेतले. चौकशी अंती उघडकीला आली ती गोष्ट अशी : गेला तासभर साहेबाच्या चेहऱ्यावर माशी बसली होती.उडत नव्हती. ती माझ्याही लक्षात आली होती. किंबहुना, साहेबाच्या गालावरच्या दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या होत्या. एक म्हणजे त्याच्या उजव्या गालावर लिपस्टीकचा ठसा उमटला होता. आणि त्या लाल धनुष्यावरच माशी बसली होती.बंदुकीवर माशी असते, पण धनुष्यावर असते, ह्याचे मला नवल वाटले. मी साहेबाला सावध करणार होतो. कारण साहेब झाला, तरी तो एक हाडामासाचा नवरा होता, त्याची दुःख एक समदुःखी नवरा म्हणून मला कळत होती. कचेरीतली सेक्रेटरी मुलगी माझ्याकडे पाहून देखील हळूच गोड हसली होती.तिथे साहेब तर गोरापान ! त्याच्यावर ती निश्चीत खूष असणार. त्यामुळे ते लाल इंद्रधनुष्य पाहून माझे अंतःकरण वर्डस्वर्थसारखे नसले तरी निराळ्या अर्थाने उडाले होते. त्यामुळे त्या मुखभंगाचा मी निराळा अर्थ लावला. पण माझा रहस्यकथांचा व्यासंग मोठा, त्यामुळे कार्यकारणभाव चुकीचे लावण्याकडे ओढा अधिक ! वस्तुस्थिती अशी होती की, सकाळ पासून घरात एक माशी शिरली होती ! "ओ, दॅट हाॅरिबल थिंग !" कोकणात "चुलीवर फुरसं बसलं होतं" हे वाक्य देखील बायका सहज म्हणतात. पण मडमेने "माशी शिरली" ह्या वाक्याला भुवया वर नेल्या, ओठाचा चंबू केला, आपले सोनेरी केस उडवले, आणि दोन्ही हातांनी भरतनाटयममधल्या नर्तकी जसा शहारा आणल्याचा अभिनय करतात तसा केला. दिवसभर ती त्या माशीच्या मागे होती. (तिचा नवरा त्या सेक्रेटरी पोरी मागे असतो तशी !)


(अपूर्ण)
माशी - ह स व णू क
पु.ल. देशपांडे

Friday, July 16, 2021

माझी आवडती व्यक्तिरेखा - लखू रिसबूड

पुलंचे लेखन वाचण्याच्या, आवडण्याच्या आणि उमजण्याच्या बर्‍याच पायर्‍या असतात असं मला कायम वाटतं. अगदी सुरुवातीला शालेय वयात पुलं म्हणजे नुसती धमाल, जागच्याजागी उड्या मारायला लावेल असा विनोद आणि शुद्ध, निखळ मनोरंजन यापेक्षा जास्त काही जाणवलं नव्हतं. पण हे जे काही होतं तेच इतकं भरुन आणि भारुन टाकणारं होतं की त्याची झिंग अजूनही थोडी आहेच. मित्रांशी वाद रंगलेला असतो आणि मधेच एकदम कोणीतरी म्हणतो; 'बाबारे तुझं जग निराळं आणि माझं निराळं', आणि कसलाही संदर्भ देण्याची गरज न लागता ठसका लागेपर्यंत हसू मात्र येते, हे पुलंचा हँगओव्हर न उतरल्याचेच लक्षण! मुळात असा संदर्भ झटक्यात समजणारा तो मित्र अशीही व्याख्या करायला हरकत नाही.

विनोदाच्या या धुंदीत शाळकरी वयात तरी व्यक्ती आणि वल्लीमधल्या काही व्यक्तिरेखा समजल्याच नव्हत्या. आपल्या आजूबाजूला वावरणारे 'दोन उस्ताद' दिसले नव्हते की जनार्दन नारो शिंगणापूरकरचे दु:खही टोचले नव्हते. आज हे लेखन किंवा अगदी नारायण, हरितात्यासारखे 'व्यवच्छेदक' पुलं पुन्हा वाचताना आधी न कळलेला एखादा नवाच पैलू दिसतो. पण त्या पुस्तकातील एक व्यक्तिरेखा मात्र मी तेंव्हा 'यात काय मजा नाही' म्हणून एका पानातच सोडली ती म्हणजे 'लखू रिसबूड'. आज मात्र पुलंनी रंगवलेल्या सगळ्या गोतावळ्यातील सर्वात अस्सल माणूस हाच आहे याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही. अगदी नंदा प्रधानपेक्षाही हा माणूस जास्त खरा आहे आणि म्हणूनच कदाचित त्याच्यापेक्षा जास्त करुणही.

लखू ही एक सार्वकालिक व्यक्ति आहे. तो आदिम, पुरातन आहे. लखू खरेतर एक व्यक्ती नाहीच ती एक प्रवृत्ती आहे, एक अ‍ॅटीट्यूड, एक सिस्टीम. जगातील सर्व शारिर सुखांची हाव असलेला माणूस. कशालाच सर्व शक्तीनिशी भिडायला घाबरणारा. सतत न्यूनगंडाने पछाडलेला आणि त्यावर मात करण्यासाठी भाडोत्री विचारांची फौज गोळा करणारा. त्याला काहीच पूर्ण कळतं नाही, आवडत नाही, पचत नाही. कुठल्याच विचारसरणीचा त्याच्यावर प्रभाव नाही. त्याला कसलाही सखोल अभ्यास नको आहे. स्वतंत्र, मूलभूत आणि निखळ विचार त्याला जमू शकतो पण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे कष्ट त्याला नको आहेत. प्रत्येक ग्रेटनेसवर थुंकण्याची त्याला आवड आहे. त्याचे भोगही लाचार, त्याचे वैराग्यही ढोंगी.

पुलंनी ही व्यक्तिरेखा कधी आणि कोणाच्या संदर्भाने लिहिली ते माहिती नाही पण 'मिडीऑकर' या शब्दालाच जिवंत रुप देणारा हा माणूस त्यांच्या इतर अनेक लेखनातूनही डोकावतो. ज्याला टागोर 'पटत नाही' असा सुरेश बोचके, 'गोदूची वाट' साऱखे प्रयोग, अगदी धोंडो भिकाजी जोशीही याचेच एक स्वरुप आहे. असा'मी' मधला मी म्हणजे पुलं स्वतःच अशी समजूत करुन घेतलेल्या त्यांच्या अनेक चाहत्यांनी खर्‍या पुलंच्या मनातली अशा प्रवृत्तींविषयीची आत्यंतिक चीड सोयिस्करपणे दुर्लक्षली, त्यात मी ही एक होतो.

याच भ्रमात आयुष्य गेलेही असते, काय सांगावे सुखाचेही झाले असते, पण सुदैवाने तसे झाले नाही. पदवीच्या दुसर्‍या वर्षाला असेन, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे मतं उगवण्याचा काळ होता. एका वेगळ्याच नशेत, जगात घडणार्‍या प्रत्येक घटनेवर, सिनेमा, साहित्य, संगीत, खेळ कशावरही बेफाम टिप्पणी करीत चाललो होतो. आधी बर्‍यापैकी असलेले वाचनही बंद पडत चाललेले किंवा उगाच चर्चेत नावं भिरकावण्यापुरते. अशावेळी पहिल्यांदा, ते एक राहिलेय जरा वाचायचे अशा तोर्‍यात 'लखू रिसबूड' वाचला आणि कोणीतरी सणसणीत थोबाडीत मारल्यासारखे झाले. पार हेलपाटूनच गेलो. माझे सगळे आयुष्यच त्या झटक्याने बदलले. मी कोणत्या दिशेने चाललो आहे आणि त्याचा परिणाम काय आहे हे स्पष्ट, स्वच्छ, लख्ख कळून आले. या रिअ‍ॅलिटी चेकसाठी मी पुलंचा कायम ऋणी असेन.पाच पैशाचेही काम न करता आलेला फुकटचा सिनिक आव गळून पडला. आपल्याला खरचं काय कळतं? काय समजतं? काय आवडतं? या आणि अशा अनेक प्रश्नांनी कठोर आत्मपरिक्षणाला सुरुवात झाली जे अजूनही चालू आहे. ही दिशाहीनतेची जाणिव झाली नसती तर आपली वाट शोधण्याचा प्रयत्नही झाला नसता.

आज आयुष्यात फार काही भरीव केले आहे किंवा फार काही ज्ञान झाले आहे असे म्हणण्याचा फालतूपणा करणार नाही पण निदान उथळपणाला बांध बसला हे खरेच. समोरच्यामधला भंपकपणा पटकन जाणवायला लागला पण एका पातळीपर्यंत तो सहन करण्याची वृत्तीही आली. सर्वात महत्त्वाचे त्त्वा, आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही हे मान्य करण्याचा प्रांजळपणा आणि असे केवळ मान्य करण्याने फार काही ग्रेट साध्य झालेले नसते ही अक्कल नक्कीच आली आहे.

दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट, शाम मनोहरांच्या 'कळ' मधला 'अंधारात बसलेला मठ्ठ काळा बैल' वाचत होतो. प्रचंड आवडले ते. आसपासची अशी अनेक माणसे आठवली. आपणही असेच पोकळ झालो असतो, पण पुलंनी वाचवलं हे मनात आलं आणि त्यांच्या लखू रिसबूडला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दिले.

- आगाऊ
मूळ स्त्रोत -- > http://www.maayboli.com/node/41308

Tuesday, July 13, 2021

(पु.ल. – नक्षत्रांचे देणे) - मोहित केळकर

पुलं म्हणजे एक साठवण,पुलं कधीच न पुसली जाणारी एक चिरंतन आठवण,
पुलं म्हणजे एक पर्व,
पुलं आम्हा मराठी जनांचा गर्व ॥ १ ॥

पुलंची एक-एक अजरामर कलाकृती,
त्यांच्या साहित्यातून डोकावते आपली मराठमोळी संस्कृती,
पुलं म्हणजे जणू साहित्यातील अथांग सिंधू,
पुलं आम्हा मराठी जनांचा मानबिंदू ॥ २ ॥

विविध नमुने जे दिसती आपणां दारोदारी गल्लोगल्ली,
त्यातूनच जन्माला आल्या पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली,
पुलंच्या वल्लींच्या आपण तपशीलात जातो जेव्हा,
वाटते त्यांच्या तरल निरीक्षणशक्तीचा वाटेल शेरलॉक होम्सलाही हेवा ॥ ३ ॥

फार फार पुढे जाण्याची लागली आहे आपणां सर्वांनाच घाई,
तरी वेगाला कावलेला ‘असा मी असामी’ आहे प्रत्येकाच्या ठायी,
‘टाईम्स हॅव चेंजड्‍’ म्हटले तरी संस्कार काही बदलत नाही,
सर्व सुखसोयीसंपन्न फ्लॅटमधला देव आपण हलवत नाही ॥ ४ ॥

बटाट्याच्या चाळीतल्यांनादेखील पुलंनी दाखवली अपूर्वाई-पूर्वरंग,
इतिहासात शिरून दाखवली सर्वांना कान्होजी आंग्रेंची जंग,
तुम्हाआम्हाला घेऊन पुलंनी काढली वार्‍यावरची वरात,
धनदौलत त्यांच्यासाठी क्षुल्लक त्यांना मिळाली निरागस हास्यांची खैरात ॥ ५ ॥

आभाळापलिकडल्या या महात्म्याचे होते जमिनीवर पाय,
गोरगरीबांवर पांघरली त्यांनी नेहमीच मायेची साय,
पैसाअडक्याचा मोह नव्हता कधीच, केला सत्पात्री दानधर्म,
माणुसकी हा त्यांचा धर्म व लोकांना हसवणे हे एकच कर्म ॥ ६ ॥

असेच महात्मे धरतीवर धाडत जा परमेश्वरा,
तुझे आजन्म राहू आम्ही ऋणी,
आमचे आयुष्य सुखकर करतात,
तुझी हीच नक्षत्रांची देणी ॥ ७ ॥

-- मोहित केळकर

मूळ स्त्रोत -- > https://mitramandal-katta.blogspot.com/p/blog-page_0.html

Monday, July 5, 2021

पु. ल. न विसरता येणारे - संदेश शेटे

पु.ल. सोबतची (पुस्तकरूपी) ओळख झाली ते शाळेत असताना त्यांचा ‘उपास’ हा धडा शिकताना आणि वाटलं होतं सगळे धडे असेच का नसतात? आज पण जेव्हा कोणी डाएट बद्दल बोलतं तेंव्हा मला ‘उपास’ आठवतो. पुलं हे खूप कोणी तरी मोठे लेखक आहेत आणि त्यांच लिखाण किती महान असेल हे माझ्या सारख्या छोट्या बुद्धी असलेल्याला तेंव्हा समजलं नव्हतं.

पुढे जेव्हा थोडी वाचायची समज आल्यावर आणि त्यांची पुस्तके वाचायला सुरुवात केल्यावर कळलं अरे ह्यांची पुस्तके खूप आधीच वाचायला हवी होती. खर तर पु.ल. आपल्यातून जाऊन खूप वर्षे झाली पण त्यांची पुस्तके वाचताना , कथानक ऐकताना असं वाटतं अरे ते तर अजून अवतीभवतीच आहेत. मी पुलंच सगळं लिखाण वाचलं आहे असं नाही पण त्यांच जे काही लिखाण वाचलंय त्याला तोड नाही.पु. ल. नी जे काही लिखाण केलं ते आज सुद्धा मनाला भावतं.

पु.ल.च व्यक्ती आणि वल्ली जेंव्हा वाचलं होतं तेंव्हा आणि आज सुद्धा जेंव्हा कधी वाचतो त्या नंतर त्यातील वल्ली चा शोध कोठे ना कोठे घेऊ लागतो. जेंव्हा केंव्हा आमचा कोकण दौरा होतो तेंव्हा त्या कोकणातील नारळ आणि सुपारी च्या बागा पाहतो तेंव्हा मी ‘अंतू बर्वा’ ला आजूबाजूस शोधू लागतो. कधी त्या ठिकाणच्या छोट्या चहा च्या टपरी वर तर कधी बस स्टँड वर. जेंव्हा एखाद्या लग्न समारंभात जातो आणि निवांत बसलेला असतो तेंव्हा कोठे ‘नारायण’ नावाने कोणी हाक ऐकू येते का हे पाहत असतो. जेंव्हा कोणी नातं नसलेला पण आपुलकी असेलला कोणी ज्येष्ठ एखादी मुलगी लग्न होऊन निघताना डोळे पुसतो तेंव्हा मी त्या व्यक्तीत ‘चितळे मास्तर’ बघतो, कधी कोठे खूप अशी तळवे झिजलेली चप्पल बघतो तेंव्हा वाटत अरे ईथे चितळे मास्तर आले असतील काय असा अंदाज लावतो. कधी तरी सदाशिव पेठेत फिरत असताना ‘गटणे’ हे आडनाव कानावर पडतं तेंव्हा वाटत त्यांना जाऊन विचारावं सखाराम तुमचा कोण लागतो? रेल्वेतून जेंव्हा ही प्रवास होतो तेंव्हा वाटत आपल्या शेजारी पण ‘ पेस्तन काका’ यायला पाहिजेत म्हणजे काय धमाल येईल ना. तेंव्हा माझी नजर एखाद्या पारशी कुटुंबाला शोधत असते. कधी तरी आमचा परीट सुद्धा आमचे कपडे हरवून ठेवतो तेंव्हा मला नकळत ‘ नामू परीट’ आठवतो. मी त्याला म्हणतो तुझा नामू झाला वाटतं पण त्या बिचाऱ्याला त्यातलं काहीही कळत नाही. फिरत असताना एके ठिकाणी दोन व्यक्ती बोलताना दिसतात तेंव्हा त्यातील एकाच्या अंगावर बरेच सोन्याचे दागिने, हातात अंगठ्या दिसतात व तोंडात थोडी गुंडगिरी ची भाषा आणि दुसरी व्यक्ती एकदम साधारण असते तेंव्हा वाटत अरे हा ‘बबडू’ तर नसेल ना.
‌ जेंव्हा बस किंवा आता ट्रॅव्हल्स ने प्रवास करत असताना अचानक जर गाडी बंद पडली आणि गोंधळाचा आवाज आला तर वाटतं अरे गाडी खाली ‘म्हैस’ तर नसेल ना आली. कधी तरी नाटक पाहण्याचा योग येतो आणि तिसऱ्या घंटे नंतर जेंव्हा पडदा वर जाऊ लागतो तेंव्हा मला ‘शंकऱ्या’ ने विचारलेला प्रश्न आठवतो, आणि मी शेजारी पाजारी शंकऱ्या ला शोधू लागतो. जेंव्हा कोणी स्वतःच्या नवीन बांधत असेलेल्या घराबद्दल बोलायला लागतं तेंव्हा मला मी आणि माझा शत्रूपक्ष मधील कुलकर्णी पात्र आठवतं आणि हसायला येतं. कधी तरी कामा निमित्त पोस्टात जाणं होतं तेंव्हा मी पुलंनी वर्णन केलेल्या पोस्टाशी काही मिळतं जुळतं आहे का असं बघत असतो तेंव्हा जाणवतं अरे इथे तर अजून पण तिच स्थिती आहे.

‌ माझ्या मामाच्या घरासमोर अजून पण काही चाळी आहेत, आणि ती चाळ त्या चाळीतील घरे ,लोकं पाहिली की मी आपसुकच अरे ही तर ती ‘ बटाट्याची चाळ’ नाही ना असं स्वतःला विचारतो. कधी तरी एखाद्या अमृततुल्य ला चहा घेत असताना अचानक कानावर ‘ पुर्वीच पुणं राहीलं नाही हो आता’ असं जेंव्हा ऐकू येत तेंव्हा पुणेकर होण्यासाठी लागणाऱ्या अटींचा मी विचार करायला लागतो.

‌ पु. ल. तुम्ही कधी कोणी एके काळी केलेलं लिखाण आज सुध्दा तंतोतंत नजरेस दिसतं, पुलं तुम्ही नक्की च देवलोकी पुन्हा एकदा बटाट्याची चाळ तयार केली असणार आणि देवलोकी हास्याचे फवारे उडत असणार.

- संदेश शेटे 

मूळ स्रोत - https://sandeshshete.wordpress.com

Friday, July 2, 2021

हरितात्या

......."पुराव्यानं शाबीत करून देईन. आत्ता चल माझ्याबरोबर मावळात कृष्णा घोडीच्या टापा उमटलेल्या दाखवून देईन..."

आणि खरोखरच हरितात्यांना त्या दिसत होत्या! "अरे, असे आम्ही दरबारात उभे! अशी आली कल्याणच्या सुभेदाराची सून - काय सुंदर म्हणून सांगू- ह्या यमीपेक्षा कमीत कमी सहा पट गोरी! हां, उगीच नाही सांगत- पुरावा आहे ..." आमच्या लहानपणी यमी हे सगळ्यांचे गोरेपणाचे माप होते. आमच्या आळीतले गोखल्यांचे एकमेव कोकणस्थ कुटूंब उजळ होते. बाकी समस्त देशपांडे-कुलकर्णी मंडळी अव्वल वर्णाची. हरितात्यांचा वर्ण तर मलखांबा सारखा होता. आम्ही, यमीपेक्षा सहापट म्हणजे काय गोरी असेल याच्या विचारात पडायचे! हरितात्यांचे काही शब्द निसटून जायचे : ".... आम्ही सगळे चित्रासारखे होऊन पाहतोय - महाराज पाहताहेत-"

"महाराज कोण?" आमच्या शाळूसोबत्यांत बाबू फडणीस म्हणून मुलगा होता. इतका ढ मुलगा पुन्हा पाहिला नाही!"

"महाराज कोण?" हरितात्या कडाडले. "पुर्ष्या, त्याच्या कानफटीत मार!" मग रितसर मी बाबूच्या कानफटीत मारली. बाबू अशा वेळी हनुवटीला खांदा लावून हसायचा. येडंच ते! पण हरितात्या खवळलेले असायचे.

"महाराज कोण?" या प्रश्नाचे उत्तर आम्हाला पाठ होते- "गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज!" आम्ही मुले दरबारातले भालदार चोपदार ओरडल्यासारखे ओरडलो. आम्ही हा गजर चालवलेला असताना हरितात्या आमच्याकडे छत्रपतींच्या ऐटीने पाहायचे!

"शाबास! तर काय सांगत होतो -"
"यमीपेक्षा सहा पट गोरी-" कुणाच्या तरी दातात एवढीच माहिती अडकली होती. त्याने यमीकडे पाहात नाक उडवले.
"नाक काय उडवतोस?" यमीपेक्षा सहा पट गोरी कोण होती?
"कल्याणच्या सुभेदाराची बायको-"
"बायको? गाढवा, बायको कशी येणार? तिथे कल्याणला सुभेदाराचा मुडदा पडलेला 'या अल्ला, या अल्ला' करीत - अंगणातल्या बाकावर अक्षरशः आडवे पडून हरितात्यांनी आक्रोश सुरू केला!
"सुभेदार खल्लास! त्याची बायको तिथेच. आणि इथे महाराजांच्या पुढे आणली ती सून! गोरीपान!"
"यमीपेक्षा सहा पट"
"हो. आम्ही पाहातोय, महाराज पाहताहेत- गरूडासारखे डोळे, गरूडासारखं नाक, डौलदार दाढी, गालांवर कल्ले ..."
"डोक्याला मंदिल, कमरेला भवानी, छातीवर मोत्यांची माळ, कपाळाला गंध..." आम्ही मुलांनी कोरस सुरू केला. महाराजांची गोष्ट आली की हे वर्णन एकदा तरी यायचेच. आम्हाला ते पाठ होते आणि हरितात्यांनी डौलदार दाढी पर्यंत वर्णन आणले की पुढले सगळे आम्ही म्हणत होतो आणि हरितात्या त्या त्या ठिकाणी आपला हात नेत.
"महाराज म्हणाले, बेटा पडदा निकालो. डरनेकी कोई बात नही ..." कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची ही कथा आम्ही हरितात्यांकडून लक्ष वेळा ऐकली. पण हा संवाद नेहमी हिंदीत असे. "मग त्या सुनेने पडदा वर उचलला. महाराज म्हणाले, "वाहवा! भवानी मातेने तुला काय अप्रतिम सुंदर बनवलं आहे!" बायकांना सुंदर बनवण्याचं काम भवानी माता करते हे लहानपणी इतके मनावर ठसले होते की, कित्येक वर्षे सुंदर स्त्री पाहिली की तिचा हा मेकअप भवानीमातेने केलाय असे मनापासून वाटे. "आमच्या आईसाहेब सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर झालो असतो. अरे पुरषोत्तम काय सांगू तुला, त्या सुभेदाराच्या सुनेच्या डोळ्यातून टपटप टपटप टपटप अश्रू गळले. मग महाराजांनी तिला साडीचोळी दिली आणि परत कल्याणला पाठवलं..."

(..अपूर्ण)

हरितात्या
व्यक्ती आणि वल्ली
पु. ल. देशपांडे