Saturday, June 29, 2019

रसिकराज पु. ल. एक अद्वितीय रसायन - डॉ. विठ्ठल प्रभू



पु. ल. देशपांडे

पूर्वार्ध

हो, मीही पु. ल. देशपांडे यांना ओळखत होतो, ते महाराष्ट्राचे ‘लाडकं व्यक्तिमत्व’ होण्यापूर्वीपासूनच. मी नाटककार, लेखक, नट, गायक, वादक नसून देखील आमची ओळख झाली. कारण मी त्यांचा विद्यार्थी होतो. पुलंनी अनेक नोक-या केल्या, त्यात दादरच्या ओरीएंट हायस्कूलमधली एक नोकरी शिक्षकाची होती. हे आमचे भाग्य होते. ही नोकरी त्यांनाही लाभदायक ठरली. पुलंची पत्नी सौ. सुनीताबाई म्हणजे पूर्वाश्रमीच्या कु. सुनीता ठाकूर यांची गाठ पडली ती याच शाळेत. आम्ही त्यांना ठाकूरबाई म्हणत असू व पुलंना देशपांडे सर. ते साल होते १९४४. मी त्यावेळी इंग्रजी सहावीत ( आत्ताची दहावी ) होतो. देशपांडे सर आम्हाला इंग्रजी शिकवीत. ठाकूरबाई पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवीत. दोघेही कलासक्त. दोघांनाही नाटक, संगीताची आवड. याशिवाय ठाकूरबाईंना नृत्याची चांगली जाण होती हे विशेष.

गौरवर्ण, सरळ नाक, हसतमुख चेहरा, उंची बेताचीच असली तरी ठुसठुशीत बांधा, कोकणी हेल असला तरी लाघवी बोलणे, संपूर्ण खादीच्या वेशात त्या दिसायच्या. १९४४ साली ज्यांनी ठाकूरबाईंना पहिले असेल, त्यांना ते पटेल. पुलंना हे पटले म्हणून ते ठाकूरबाईंवर इंप्रेशन मारायला त्यांच्या अवतीभवती असायचे. ठाकूरबाईंचे मामा, पाटकर सर हे आमचे ड्रॉइंग टीचर होते. त्यांच्याच ओळखीमुळे ठाकूरबाई आमच्या शाळेत आल्या होत्या. हे पाटकर सर शाळेच्या गॅदरिंगसाठी छान नृत्यनाटिका बसवीत असत. स्वातंत्र्यापूर्वीचे ते दिवस. इंग्रज आमचा छळ करताहेत, आपण त्यांना प्रतिकार करतो आहोत, भारतमाता किंवा देव प्रसन्न होतो व आपल्याला स्वातंत्र्य मिळते, अशा प्रकारची सुखांतिका हा नृत्यनाटिकेचा विषय असायचा. या नृत्यनाटिकेत मी ‘चर्चिल’ म्हणजे खलनायक झालो होतो. ठाकूरबाई ‘पार्वती’ झाल्या होत्या. मॅट्रिकमधला एक देखणा विद्यार्थी ‘शंकर’ झाला होता. पार्श्वसंगीताची चाल देण्यासाठी पुल तालमीच्यावेळी येत असत. या चाल देण्यामागे पुलंची काय चालबाजी होती हे समजण्याचे आमचे वय नव्हते. पण दोघांनी एकमेकांकडे चोरून पाहणे, बोलण्याचा प्रयत्न करणे जाणवत असे.

या नृत्यनाटिकेचा प्रयोग गोवालिया टॅंक मैदानावर झाला. ठाकूरबाई पार्वतीच्या भूमिकेत इतक्या सुंदर दिसत होत्या की ख-या पार्वतीलाही त्यांचा हेवा वाटावा. अर्थात पुल या प्रयोगाला हजर होते. टाळ्यांच्या गजरात एक टाळी त्यांचीही होती.

या नृत्यनाटिकेच्या वाद्यवृन्दात व्हायोलिन वाजवायला श्रीकांत ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे वरच्या वर्गात होते व श्रीकांत ठाकरे खालच्या वर्गात होते. माझ्या चर्चिलच्या भूमिकेत मला चिरूट ओढायचा होता. एरव्ही तालमीच्या वेळी मी चिरूट म्हणून पेन किंवा पेन्सिल तोंडात ठेवायचा. पण प्रयोगाच्यावेळी मला कुणीतरी चिरूट आणून तो शिलगावून दिला. रंगमंचावर चिरुटाचे एकदोन झुरके घेऊन हवेत धूर सोडला. भूमिका खरीखुरी वाटली पाहिजे ना ! पण क्षणभरात रंगमंच गरागरा फिरतो आहे असा भास होऊ लागला. मी चक्कर येऊन पडणार असे वाटू लागले. कसाबसा रंगमंचाच्या दुस-या टोकाला पोचलो. उलटी झाली तेव्हा बरे वाटले. चर्चिलची ही इतकी एकच एंट्री होते म्हणून निभावले.

त्या वर्षी ओरिएंट शाळेच्या शिक्षकांनी मामा वरेरकरांचे ‘सत्तेचे गुलाम’ हे नाटक बसवले. पुल कान्होबा व ठाकूरबाई क्षमा. पुढल्या वर्षी ( १२ जून १९४६ ) त्यांचे लग्न झाले. त्यांचे कोर्टींग पाहाण्याचे थोडेफार भाग्य आम्हाला लाभले.

इतर शिक्षकांहून पुल वेगळे होते. त्यांचे वेगळेपण जाणवायचे. आजही आमच्या वर्गावरील त्यांचा पहिला तास आठवतो. चौकडीचा शर्ट,भु-या रंगाचा कोट, शर्टची कॉलर बाहेर काढून कोटाच्या कॉलरवर बसवलेली, काच्या मारलेले धोतर, पायात कोल्हापुरी चपला. पुल कधी वुलनची ढगळ पॅन्ट घालून येत. वर्गातील टारगट पोरांना लगेच शेरा मारण्याची हुक्की यायची, “सर, आज भावाची पॅन्ट घालून आलेत. ठाकूरबाईंवर इम्प्रेशन मारायला ! ” त्याकाळी बहुतेक शिक्षक धोतर नेसत आणि फार थोडे पॅन्ट घालीत. धोतरावर बूट किंवा पॅन्टवर चपला असल्यास त्यात वावगे वाटत नसे. पॅन्ट मात्र टांगेवाल्यासारखी आखुड असे.

शाळेच्या गणेशोत्सवात पुलंच्या गाण्याचा कार्यक्रम असे. त्यांचा आवाज गोड नसायचा, पण गाणे ठसक्यात होई व प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळे. आमचे ड्रिलमास्तर खूष होऊन कार्यक्रमात पुलंसाठी एक कप ‘पानी कम’ चहा मागवीत व तो सर्वांसमक्ष पुलंना प्यायला लावीत. ( ‘कटिंग’ हा शब्द त्याकाळी अस्तित्वात नव्हता. )

पुल आम्हाला इंग्रजी शिकवायचे. हे म्हणजे सोनाराने लोहाराचे काम करण्यासारखे. पण ते त्यांना जमले. ” नव्या शिक्षकाचे कपडे पाहण्याऐवजी धड्याकडे लक्ष द्या. आता सांगा बरं ‘जजमेंट’चं स्पेलिंग ? ” सगळ्यांची विकेट उडाली. ‘जजमेंट’च्या स्पेलिंगमध्ये ‘जी’ नंतर ‘ई’ नसते. ‘कोको’ च्या स्पेलिंगमध्ये शेवटी असलेले ‘ए’ अक्षर ‘कोकोनट’ लिहिताना गायब होते हे त्यांनी त्यावेळी सांगितलेले आजही आठवते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, सिनेतारका कामिनी कदम ( माणिक मुदलीयार ), ‘अमरचित्रकथा’चे अनंत पै, बॅडमिण्टनपटू बोपर्डीकर, शास्त्रज्ञ बाळ गोठोस्कर, सत्यकथेचे संपादक राम पटवर्धन, अभिनेत्री रतन किनरे, अशा पुढे प्रसिद्ध पावलेल्या अनेक व्यक्ती त्याकाळी त्यांचे विद्यार्थी होते. पोवाडेगायक शाहीर पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर, कवी प्रफुल्लदत्त, प्रो. जी. एन. नाबर हे त्याकाळी असलेले पुलंचे सहाध्यापक.

पुल पेटी छान वाजवीत. कधी सोलो तर कधी स्वतः भावगीत म्हणत पेटी वाजवायचे. दुसरे एक शिक्षक शास्त्रोक्त संगीत गात. त्यांचा आवाजही गोड होता ; गाण्याची तयारीही भरपूर होती. पण त्यांच्या पीळदार गाण्यांहून आमची पसंती असायची पुलंचे गाणे बजावणे. कारण त्यांच्या गाण्यात सहजता, माधुर्य व खुमारी असायची. ठेक्याबरोबर ठसका असायचा.

त्यावेळी पुलंचे वय सुमारे पंचवीस असावे ; पण या वयातही पुलंचे अनेक गुण प्रकर्षाने जाणवत असायचे. गायक, वादक, लेखक, नट, विनोदकार असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दिसत होते. पुढे पुल सिनेमात गेले, त्यांची नाटके गाजली, एकपात्री प्रयोग गाजले. त्याचबरोबर त्यांचा दानशूरपणाही भावला. हे सर्व नंतरचे. ‘पुरुषराज अळुरपांडे’ या नावाने त्यांचे लेख बडोद्याच्या ‘अभिरुची’मासिकात यायचे. ‘माझे घर’ , ‘वहिनी’, या नाटकात त्यांनी कामे केली. जे जे पुल करीत त्याचे आम्हाला कौतुक वाटायचे ; अभिमान वाटायचा. आजही वाटतो. अशा ग्रेट माणसाचे आपण एकेकाळी विद्यार्थी होतो हे छाती फुगवून सांगतो.

***

पुलंनी शब्दांवर, सुरांवर व माणसांवर प्रेम केले. साहित्यावरही तितकेच प्रेम केले. पुल ओरिएंट शाळेत येण्यापूर्वी तेथे नाटक किंवा साहित्यावरील कोणताही कार्यक्रम होत नसे. पुल आले आणि चैतन्य अवतरले.

आपण पुलंचा विनोद वाचून सुखावतो खरे; पण त्यांच्या व्यक्तिमत्वाला चकाकी आली ती त्यांच्या परिश्रमामुळे. त्यांचे पाठांतर जबरदस्त होते. इंग्रजी, मराठी व संस्कृत उतारे ते धडाधड म्हणून दाखवीत. आम्हालाही ते इंग्रजी उतारे पाठ करायला लावीत. त्याना वाचनाची खूप आवड असायची. ते सांगत, ” मुलानो, वाचन, पाठांतर याच वयात होतं शक्य होईल तितकं वाचा. ” आम्हाला पेलतील अशी त्यांनी काही पुस्तके सांगितली. त्यात गोरा, दि रेक, पिक्विक पेपर्स अशा अनेक सदाबहार पुस्तकांचा समावेश होता. पी. जी. वुडहाउस त्यांचे आवडते लेखक. त्यांनी दिलेली यादी लक्षात राहिली हे खरे, पण ती पुस्तके वाचून काढणे आम्हाला जमले नाही हेही तितकेच खरे.

पुलंच्या विनोदाला कारुण्याची किनार आहे. ती त्याकाळी देखील होती. त्यांना दीनदुबळ्याविषयी, गरीबांविषयी कणव होती. पण भीक मागणे हा धंदा कसा होतो हे ते सांगत. पद्धतशीर नवजात बाळाच्या डोळ्यांना शिंपले बांधून त्याला आंधळा बनवायचे किंवा मनगटाला करकचून दोरा बांधून त्याला लुळेपांगळे बनवायचे यात अशा मुलांना अधिक भीक मिळावी हा दुष्ट हेतू असतो हे त्यांनी त्याकाळी आम्हाला सांगितले होते. ‘तीन पैशांचा तमाशा’ या त्यांच्या नाटकाचा ‘जर्म’ तेव्हापासून त्यांच्या मनात घोळत असावा.

माझी व पुलंची विशेष जवळीक नव्हती. अलिबाबाला चाळीसाव्या बुधल्यात बसणा-या चोराची जितकी ओळख असेल तितकीच पुलंना माझी ओळख होती. कारण मीही वर्गातल्या चाळीस विद्यार्थ्यांतील एक होतो. नंतरच्या काळातही ओळख वाढणे शक्य नव्हते ; कारण त्यांच्या व माझ्या व्यवसायाचे नाते हे विळ्याभोपळ्यासारखे होते. पण तो काळ वेगळाच होता. आमच्यात ‘सखाराम गटणे’ संचारलेला असायचा. त्यामुळे आमच्या शिक्षकांच्या प्रत्येक कृतीचे आम्हाला कौतुक वाटत राहिले. पुलंची भाषणे, रेडियोवरील कार्यक्रम, मैफली, नाटके, एकपात्री प्रयोग, सिनेमे, त्यांनी लिहिलेली पुस्तके हे सर्वच आम्ही खूप उत्कंठतेने पाहिले, ऐकले,वाचले. ‘असा मी असा मी’ चा पहिला [प्रयोग पाटकर हॉलमध्ये पहिल्या रांगेत मधल्या सीटवर बसून पहिला. ( दहा रुपयांचे महागडे तिकीट काढून. ) त्यांनी लिहिलेली पुस्तके व नाटके इतक्या वेळा वाचली की त्यातील संवाद आपोआप पाठ झाले. त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने वाचून प्रवास केला. त्यांची सरकत्या पट्टीची संवादिनी पाहून मीही तशी एक कलकत्त्याहून आणली; पण ती न वापरल्यामुळे आता तिची सूरपेटी झाली आहे. भाता मारला की तीतून एकाच वेळी अनेक सूर बाहेर पडतात. प्रीती, भक्ती असणे योग्यच, पण म्हणून त्या व्यक्तीचे प्रत्येक बाबतीत अनुकरण केले की अशी फसगत होते.

पुलंच्या साहित्याविषयी मी लिहायचे म्हणजे फौजदाराला डी एस पी चे काम करायला लावण्यासारखे ( हा त्यांचाच जोक. ) पुलंची पुस्तके वाचतांना, नाटके पाहताना लाजवाब विनोदामुळे आपण मनसोक्त हसतो, सुखावतो हे खरे असले. तरी मध्येच त्यातून त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान दिसते; हसता हसता कुठेतरी दुःखाची खपली आढळते; अतिशयोक्तीच्या धबधब्यात कुठेतरी त्रिकालाबाधित सत्याचे तुषार दिसतात; मिश्किलतेच्या ओघात निर्मळ माणुसकीचे दर्शन घडते. त्यांनी रेखाटलेली पत्रे आपण कुठेतरी पाहिली आहेत असे वाटते. कधीकधी आपणच त्यातले एक आहोत असे जाणवते. त्यांचे चिंतनशील उतारे आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतात; आपले आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात.

पुलंची दृष्टी कलावंताची आहे. प्रवासवर्णनात टोकियो टॉवर बांधायला टन लोखंड लागते हे लिहून ते आपल्या ज्ञानात भर घालीत नाहीत. किंवा पॅरिसच्या निशागारात आपण किती धुंद झालो होतो हेही ते सांगत नाहीत. पाश्चात्य कलावंतांच्या संगतीत ते कसे धुंद झाले याचे वर्णन इतक्या रसाळपणे करतात की वाचकही त्या धुंदीत पूर्ण बुडून जातो.

पुल काही नवीन सांगतात असे नाही. नेहमीची माणसे, नेहमीचे प्रसंग शब्दात पकडून आपल्या समोर अशा रीतीने मांडतात की ते हृदयाला भिडतात. ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील नारायण आपल्याला परिचयाचा वाटतो. प्रत्येकाच्या घरी लग्नकार्याच्या वेळी असा कुणी नारायण उपटतो. लग्नसमारंभ संपल्यावर मांडवात कुडकुडत एकटाच झोपलेला नारायण, सतत अवहेलना पदरात पडलेला नानू शिंगणापूरकर, कमालीचे प्रेमळ चितळे मास्तर, विश्वेश्वराच्या अंगा-याची पुडी देणारे अंतू बर्वा मंडळी पुस्तकातून भेटतात तेव्हा ओठावर हसू फुटते व डोळ्यात पाणी उभे राहते. यावरून कळते की पुलंनी केवळ हसविण्यासाठी आपली लेखणी झिजवलेली नसून माणसातली माणुसकी दाखविण्यासाठी ती वापरली आहे.

पुलंच्या विनोदात उपहास दडलेला असतो. समाजातील दांभिकता, शोषण, फसवणूक पाहून त्यांना गप्प बसवत नाही. ‘असा मी असा मी’ मध्ये ते गुरुदेव संप्रभवानंद स्वामीवर तुटून पडतात ; ‘मी झोपतो करूनी हिमालयाची उशी’ म्हणणा-या नानू सरंजामे या नवकवीची थट्टा करतात; ‘तुझं आहे तुजपाशी’ नाटकात अतिविशाल महिला मंडळाची खिल्ली उडवतात, ‘वा-यावरची वरात’ नाटकात सामाजिक संस्थांवर कोरडे ओढतात; ‘विठ्ठल तो आला’ नाटिकेत मान्यवर व्यक्तींचा क्षुद्रपणा व ढोंगी स्वभाव दाखवतात, ‘तर तीन पैशांचा तमाशा’ या नाटकात ईश्वरी अवतारासंबंधीच्या भाबडेपणावर हल्ला करतात. हास्यरसाबरोबर पुलंनी विचारांचे टॉनिक दिले आहे.

पुल इतरांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे होते. चांगले – वाईट त्यांना चटकन कळत असे. कधी आवर घालायचा, कधी थांबायचे हेही त्यांना कळत असे. ‘राजमाता जिजाबाई’ असो, ‘वटवट’ असो की ‘वा-यावरची वरात’ असो; प्रेक्षकांना कंटाळा येईपर्यंत ते कुठेच रेंगाळत राहिले नाहीत. नाटकाचे मानधन वसूल करणा-या, कोणत्याही संस्थेला आपल्या नाटकाच्या बिदागीत सवलत न देणा-या पुलंनी अंध- अपंगांच्या संस्था, व्यसनमुक्तीच्या संस्था, कुष्ठधाम, रुग्णालये यासाठी लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या; त्या देखील कुठेही वाच्यता न करता !

पुल एखाद्या फाटक्या माणसावर प्रेमाचा वर्षाव करीत, तर साहित्य, राजकारणातील शुक्राचार्याला देखील वाग्युद्धात सपशेल लोळवीत. संतांविषयी आदर बाळगीत , पण देवदेव करणा-यांची व कर्मकांडात गुंतणा-यांची रेवडी उडवीत. आपल्या विनोदाने हसवीत व कारुण्याने डोळ्यात अश्रू उभे करीत. असे हे पुल ‘ग्रेट’ होते.

***

पुलंचे साहित्य वाचतांना पुल हे रमी, फालतू गप्पा, गाण्याच्या मैफली, नाटके, पुस्तके, सिगारेटी, चहा व मित्र यांच्यात रमणारे असे वाटत असले तरी ते ‘टास्कमास्टर’ होते याचा प्रत्यय अनेकांना आलेला आहे. नाटकाच्या तालमीला कुणी उशीरा आलेले त्यांना खपत नसे. कुणी आपल्या घराला ‘श्रमसाफल्य’ हे नाव दिले तर त्यावर विनोद करणारे पुल आपल्या प्रत्येक कृतीत साफल्य मिळण्यासाठी श्रमांची पराकाष्ठा करीत. पुल कसे ‘परफ़ेक्शनिस्ट’ होते याचा एक किस्सा आठवतो. ‘असा मी असा मी’ या एकपात्री प्रयोगाची सुरुवात तीन एक मिनिटांच्या स्वगताने होते. हे स्वगत अंधारात ऐकायला येते. याचे रेकॉर्डींग पार्ल्याला केले. ते मानासारखे झाले नव्हते म्हणून भुलाभाई ऑडीटोरियममध्ये पुन्हा केले. त्यावेळी ते मुंबईत प्रभादेवी नजीकच्या सेंच्युरी बझारच्या समोर ‘आशीर्वाद’ इमारतीत राहत होते. त्यांच्या शेजारी त्यांचे मेव्हणे डॉ. श्रद्धानंद ठाकूर राहत असत. डॉ. ठाकूर आमचे स्नेही. त्यांच्या घरी आम्ही रात्री जमलो होतो. एवढ्यात तेथे पुल व सुनीताबाई आल्या. त्यांच्याकडून कळले की ते दिवसभर वरील रेकॉर्डींग करण्यात व्यस्त होते. मी पुलंना सहज विचारले, “सर, तीन मिनिटांच्या रेकॉर्डींगला इतका का वेळ लागतो ? ” ते म्हणाले, ” अरे, बाबा, मनासारखं रेकॉर्डींग होईपर्यंत पुन्हा पुन्हा करावं लागतं. नाहीतर थेटरात जाऊन खेटरं खावी लागतील ! ” केलेले काम उत्तम व्हावे यासाठीचा त्यांचा ध्यास दिसतो, तसेच त्यांची विनोदबुद्धीही.

शाळा – कॉलेजात आम्ही नाटके बसवीत असू. पंधरावीस दिवसात नाटक बसवून होत असे. सर्व पात्रे फक्त प्रयोगाच्या दिवशी रंगमंचावर एकत्र यायची. तालमीला भेटलो की अर्धा वेळ गप्पात व अर्धा वेळ खाण्यापिण्यात जायचा. त्यामुळे नाटक अक्षरशः बसत असे. प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावलेल्या नसल्यामुळे कुणाचे स्टेजवर धोतर सुटले, मिशी पडली, संभाषणातील वाक्य विसरले गेले तर प्रेक्षक सांभाळून घेत ; शिवाय नाटकाचा प्रयोग झाल्यावर मित्रमंडळी स्टेजवर येऊन ‘छान झालं , अभिनंदन !’ वगैरे प्रोत्साहन देत. त्यातून मुली आल्या तर गुदगुल्या होत. (तसे नशीब फक्त हीरोचे असायचे. ) एके वर्षी ‘तुझं आहे तुजपाशी’ हे नाटक आम्ही बसवायला घेतले. दिग्दर्शक होते पुलंचे धाकटे बंधू रमाकांत देशपांडे. एकदा नाटकाची तालीम पाहण्यासाठी रमाकांत देशपांडे पुलंना घेऊन आले. पुलंनी शब्दावर वजन कसे असते, टायमिंग कसे सांभाळायचे, रंगमंचावर कसे वावरायचे ते सांगितले. त्यांच्या गाढ्या अभ्यासाचे कौतुक वाटले आणि आमच्यातील उणिवा जाणून आम्ही खजील झालो. एकूण, विनोदी नाटक हे गंभीरपणे घेतल्याशिवाय पर्याय नाही हे कळले.

पुलंना गुणग्राहकता होती. आमच्या मेडिकल कॉलेजातील डॉ. सुधा आगाशे व्हायोलिन वाजवीत असत. त्यांचा हात चांगला होता , पण योग्य मार्गदर्शन नव्हते, म्हणून पुलंनी पं. डी. के. दातारांना सुधाला व्हायोलिन शिकवण्याची विनंती केली. व्हायोलिन शिकता शिकता मदनाने आपली कामगिरी पार पाडली. डॉ. कु. सुधा आगाशे डॉ. सौ. सुधा दातार झाल्या. लग्नगाठ ब्रम्हदेव बांधतो म्हणतात, इथे पुलंनी बांधली. आता डॉ. सुधाच्या अफ़ाट प्रॅक्टिसमुळे त्यांचे व्हायोलिन धूळ खात पडले आहे.

पुलंचा हजरजबाबीपणा सर्वांना माहीत आहे. पुलंच्या एका सत्कार समारंभावेळी अध्यक्ष होते आचार्य अत्रे. ते म्हणाले, ” गडकरी आमचे गुरु. गडकरी वारले तेव्हा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्मदेखील झाला नव्हता. ” पुल बोलायला उभे राहिले तेव्हा म्हणाले, ” आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणाले ते खरं आहे. गडकरी वारले तेव्हा माझा झाला नव्हता. पण त्यांना माहीत नाही की गडकरी वारले त्यानंतर नऊ महिन्यांनी माझा जन्म झाला. ” श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रचंड दाद दिली.

***

कवी प्रफुल्लदत्त हेही आमचे शिक्षक होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या कविता कारावास भोगत असलेले स्वातंत्र्यसैनिक गात असत. शब्दांवर कवींचे स्वामित्व होते. ते मराठीचा तास घेत त्यावेळी विद्यार्थी मंत्रमुग्ध होत. एकदा त्यांनी निबंधासाठी आम्हाला विषय दिला ‘माई’. माईवर काय लिहायचे, ते आम्हाला सुचेना. कुणी लिहिले, ” माई एक विधवा होती. ती फार चांगली होती. ती दुस-यांना मदत करीत असे. ” वगैरे. आम्ही प्रफुल्लदत्त सरांना निबंध दाखवला. कुणाचाही निबंध त्यांना पसंत पडला नाही. ते म्हणाले, ” अरे, माई म्हणजे जिव्हाळा, माई म्हणजे त्याग, माई म्हणजे क्षणाक्षणाला कणाकणाने झिजणारी व इतरांना प्रकाश देणारी मेणबत्ती, असं काही लिहा. ” आम्हाला त्यांचे हे बोलणे भावत होते, आवडत होते; पण पंचवीस ओळी काय, पण मोजून पाच ओळी लिहिणे देखील नव्हते. आम्ही सर्वांनी पुलंना भेटून मदतीची याचना केली. पुल म्हणाले, ” अरे, माईचं वय विचारून घ्या. माई अठरा वर्षांची असेल तर ? ” योगायोग असा की सुनीताबाईंना घरी ‘माई’ असे म्हणत आणि त्यांचे वयही तेव्हा अठरा वर्षांचे होते.

गिरगावातील साहित्य संघात कवी प्रफुल्लदत्तांचे व्याख्यान होते. व्याख्यानात प्रफुल्लदत्त मानवी मूल्यावर हिरीरीने बोलत होते, ” कार्याची कळकळ असायला हवी. कळ असल्याशिवाय कळकळ निर्माण होत नाही. ” श्रोत्यांत पुल बसले होते ; ते हळूच म्हणाले, ‘ कळ ‘ले. आजूबाजूच्या श्रोत्यांत खसखस पिकली.



मैफलीत पु. ल.

डावीकडून तिसरे हार्मोनियमवर पु. ल.

माजी आरोग्यमंत्री डॉ,. ललिता राव यांच्या घरी एकदा मित्रमंडळी जमली. त्यात पुलही होते. मनोरंजनाखातर कुणी चुटके सांगितले; कुणी गाणे म्हटले. मित्रमंडळीत एक गायनेकॉलॉजिस्ट होते. ते गायला लागले. पुल माझ्या शेजारी बसले होते ; माझ्या कानात म्हणाले, ” अरे, त्यांना सांग, गायन आणि गायनेकॉलॉजी यांचा काहीएक संबंध नाही. ” माझी हसता हसता पुरेवाट झाली.

पुलंना आयत्यावेळी कधी कधी सुंदर कल्पना सुचत असत. पार्ल्याला हिराबाई बडोदेकरांचे गाणे होते. त्यांचा सत्कार करायला पुल उभे राहिले. म्हणाले, ” हिराबाईंचा आम्ही सत्कार काय करणार ? त्यांना तर देवाने गोड गळा देऊन त्यांचा सत्कार करून इथे पृथ्वीतलावर पाठवलं आहे. याहून अधिक तो कोणता सत्कार असणार ? ” श्रोत्यांनी टाळ्या वाजवून पुलंना मनसोक्त दाद दिली.

शिवाजी पार्कला डॉ. श्रद्धानंद ठाकूरांच्या घरी वसंतराव देशपांडे यांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. पेटीवर पुल होते. कार्यक्रमानंतर जेवणे झाली. गप्पा ऐन रंगात आल्या. खालून एक भिकारी मालकंसचे सूर आळवीत जातांना ऐकू आले. पुल थांबले. गोड गळ्यातील ते सूर ऐकून पुलंना राहवेना. त्यांनी त्या भिका-याला वर बोलावले; त्याच्याकडून काही गाणी गाऊन घेतली, त्याला जेवू घातले. त्याच्या खिशात नोट सरकवली आणि त्याची बोळवण केली. तो गेल्यावर पुल म्हणाले, ” तोही आपल्याप्रमाणेच सुरांवर प्रेम करणारा ; पण आपल्याला संगीताचं मार्गदर्शन लाभलं , तसं त्याला लाभलं नाही. माणसाने कुठे जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नसतं. समजा, आपला जन्म त्याच्या घरात झाला असता तर … ? ” संगीतात कोणताही भेदभाव याचे दर्शन त्या दिवशी घडले.

जीवनात कोणतेही समीकरण बांधता येत नाही अशी पुलंची धारणा असावी. डॉ. श्रद्धानंद ठाकूरांच्या मुलीचे लग्न होते. लग्नात पुल भेटले. मला त्यांनी आपल्या शेजारी बसवून घेतले व म्हणाले, ” आज दुपारी ‘अनुराधा’ मासिकातला तुझा लेख वाचत होतो. स्वास्थ्यासाठी काय करावं, काय करू नये लेख वाचत असताना एक किस्सा आठवला. एका दीर्घायुषी माणसाची मुलाखत घेणं चाललं होतं. मुलाखतकाराने त्याच्या दीर्घायुष्याचं रहस्य विचारलं. त्याने सांगितलं, ‘ मी सकाळी लवकर उठतो, व्यायाम करतो, सकस आहार घेतो; मला कोणतंच व्यसन नाही ‘ वगैरे. बाहेर गडबड गोंधळ चाललेला आवाज ऐकून मुलाखतकाराने विचारलं, ‘बाहेर काय गडबड चालली आहे ? ‘ तो माणूस म्हणाला, ‘ते माझे वडील. वय वर्षे ९०. रोज दारू पिऊन बडबड, दंगामस्ती करतात ! ”

कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या यशाचे श्रेय अंशतः त्याच्या पत्नीला जाते. इथे पुलंच्या यशाचे श्रेय पूर्णतः सुनीताबाईंना द्यायला हवे. पुलंचा विवाह सुनीताबाईंशी झाल्यावरच महाराष्ट्राला ज्ञात असलेल्या पुलंचा जन्म झाला. सुनीताबाईंचे प्रोत्साहन व सहकार्य नसते तर पुलंना इतकी उंची गाठता आली नसती. पुलंना वेठीला धरून लिहायला बसवणे, आल्या गेल्याची उठबस, नाटकाची भाषणाची तयारी, नको असलेल्या पाहुण्यांना वाटेला लावणे इथपासून प्रुफे तपासणे, मानधन घेणे वगैरे सर्व कामे शिस्तबद्ध पद्धतीने सुनीताबाईंनी पार पाडली. ‘अर्धांगी’ शब्द त्यांच्या बाबतीत थिटा वाटतो. कायम पडद्याआड राहून सर्व सूत्रे सांभाळणा-या दिग्दर्शकाप्रमाणे सुनीताबाईंनी पुलंना सांभाळले. त्यांची भूमिका ढालीप्रमाणे होती. सुनीताबाई त्यांच्या जीवनात आल्या नसत्या तर पुल ‘सुशेगात’ जीवन जगात राहिले असते. पुल व सुनीताबाई ही दोघे परस्परपूरक होती.

एकदा सुनीताबाईंच्या वाढदिवशी प्रफुल्ला डहाणूकर फुलांचा गुच्छ घेऊन सुनीताबाईंना भेटायला गेल्या. सुनीताबाईंनी दार उघडल्यावर, “शू हळू बोल. भाईने सकाळी मला विचारलं, तुला वाढदिवसाची काय भेट देऊ ? ‘ सांगितलं, ‘ तुझं आहे तुजपाशी’ नाटक लिहून पूर्ण कर. तेच माझी भेट. भाई ते लिहित बसलाय. ” पुलंनी एका बैठकीत नाटक लिहून पूर्ण केले.
उत्तरार्ध

एकेकाळी ” मी पु. य. देशपांडे नव्हे, माझं नाव पु. ल. देशपांडे आहे ” असे सांगणा-या पुलंना पुढे त्यांचे आडनाव लावण्याचीही गरज पडली नाही. ‘पुल’ ही दोन अक्षरे म्हणजे ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व’. महाराष्ट्राच्या गळ्यातील ‘ताईत’ होऊन राहिले. यात अबोल राहिलेल्या सुनीताबाईंचा सिंहाचा वाटा आहे.

पुलंचा लोकसंग्रह प्रचंड होता. त्यांनी आयुष्यभर एक नियम पाळला; त्यांना आलेल्या प्रत्येक पत्राचे आवर्जून उत्तर पाठवणे. पुलंनी अक्षरशः हजारो पत्रे लिहिली असतील. काही पत्रे त्यांच्या संबंधीच्या पुस्तकातून प्रकाशित झाली आहेत. माझ्याजवळही त्यांनी पाठवलेली पत्रे आहेत. त्यातील काही पत्रे इथे देत आहे. पत्रांवरून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. सुमारे तीस वर्षांपूर्वी मी पुलंवर एक लेख ‘अनुराधा’ मासिकात लिहिला होता व त्याची एक प्रत पुलंना पाठवली. लगेच त्यांचे पत्र आले ते असे :


(१)
१ रूपाली
पुणे ४


प्रिय प्रभू,

तुझे पत्र आणि अनुराधा मासिकात तू माझ्यावर आणि सुनीतावर लिहिलेला लेख वाचला. पैकीच्या पैकी मार्ज द्यायची मला सवय नाही हे तुला आठवत असेल ; पण तू ते उपटलेस. त्यातला गुरुगौरवाचा भाग जाऊ दे पण तुझ्या वाहत्या शैलेतले लेखन वाचून मीही ‘डॉ. प्रभू ना ? – अहो, तो माझा शागीर्द ! ‘ असे मी अभिमानाने सांगेन.

मी डॉक्टर झालो नाही आणि तू साहित्यिक झाला नाहीस. पण मी डॉ. झालो असतो तर देवी टोचण्यापलीकडे प्रगती झाली नसती. माझ्या दवाखान्याशेजारी म्युन्सिपाल्टिच्या पासाचे टेबल टाकून कारकून बसवावा लागला नसताच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही – पण तू साहित्यिक झाला असतास तर मात्र भल्या भल्या साहित्यिकांचे वांधे केले असतेस.

लिखाणाची सुरुवात तू गुरुचरित्रापासून केली आहेसच. आता लेखणी ही केवळ प्रिस्क्रीप्शन लिहिण्यासाठी असते असे न मानता – लिहित जा.

तुझे पत्र व लेख याबद्दल तुला माझे व बाईंचे धन्यवाद.
तुझा
सर



पुलंनी लेखकाला लिहिलेले पत्र क्र. १ (प्रत )

***
(२)
२६ जानेवारी १९८४

प्रिय डॉ. प्रभू,

‘निरामय कामजीवन’ आणि ‘आरोग्य : समज आणि गैरसमज’ ही तू लिहिलेली दोन्ही पुस्तके रवींद्र कोठावळे यांनी मला पाठवली. धन्यवाद.
कामजीवनावर लिहिणे सोपे नाही. हा विषय नाजूकही आहे आणि आपल्यासारख्या गतानुगतिकीच्या समाजात स्फोटकही आहे. आपल्या श्लीलाश्लीलतेच्या, नीतिअनीतीच्या योनिशुचितेच्या कल्पनांशी निगडित असल्यामुळे कामजीवनाविषयी लिहायला तज्ज्ञसुद्धा कचरतात. तुझ्या पुस्तकाची काही समीक्षणे माझ्या पाहण्यात आली होती. समाजात ह्या विषयाबद्दल माहिती करून घेण्याची इच्छा वाढीला लागते आहे हे चांगले लक्षण आहे. कामवासनेशी सदैव पापाचे नाते जुळवल्यामुळे ह्या बाबतीत एकतर रोगट कुतूहल ढोंग या दोनच प्रवृत्ती वाढीला लागल्या. त्यात पुन्हा ‘ ब्रम्हचर्य हेच जीवन’ सारख्या पुस्तकांनी प्रचंड गोंधळ घातला. जडीबुट्टीवाल्यांनीही लोकांमधले अज्ञान टिकून राहील आणि कामजीवन संपुष्टात येण्याची दहशत कायम राहील खबरदारी घेतली.

अशा या विषयावर लिहिण्याचे धाडस करणा-या र. धों. कर्व्यांसारख्या माणसाला खूप छळ सोसावा लागला. त्यांनी स्वीकारलेल्या वैद्न्यानिक दृष्टीचा पाठपुरावा करून सोप्या शब्दात आणि बोलक्या शैलीत तू हा विषय समजावून दिला आहेस. अज्ञानामुळे कामजीवनाबाबतीत निराश झालेल्यांना तुझ्या पुस्तकांतून खूप धीर लाभेल. गैरसमज दूर होतील. अशा मार्गदर्शक पुस्तकाची गरज होती. तू ही जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडल्याबद्दल तुझे अभिनंदन.
तुझा
पु. ल. देशपांडे


पुलंनी लेखकाला लिहिलेले पत्र क्र. २ (प्रत )




लैंगिकता, शिक्षणाची आजची परिस्थिती, अशा शिक्षणाची गरज, अज्ञानाचे परिणाम आणि हे ज्ञान संपादन केल्यामुळे होणारे यासंबंधी रकानेच्या रकाने लिहून जे साधले नसते ते नेमक्या शब्दात पकडून पुलंनी एका आंतर्देशीय पत्राच्या मर्यादित जागेत नेमकेपणाने मांडले. लैंगिकता हा विषय सर्वसामान्यपणे वाच्यता न करण्याजोगा आहे असे अनेकांना वाटते. पण पुलंनी भावात्मक व वैद्न्यानिक दृष्टीकोन बाळगून आपले विचार व्यक्त करण्याचा लाजवाब निर्भीडपणा दाखवला आहे. यातच पुलंचा मोठेपणा आढळतो. पुल हे केवळ विनोदी लेखकच नव्हे, तर विचारवंतही होते याचा हा पुरावा.

***
(३)
पुलंना सांधेदुखीचा खूप त्रास होतोय असे कळल्यावरून मी त्यांना सल्लाकीच्या गोळ्या घेण्याचा सल्ला पत्राने कळवला, त्याला उत्तर आले ते असे :
पुणे ४
१६ – ६ – ८४

प्रिय प्रभू,

तुझं पत्र मिळालं. मिळाल्याचं कळवायला उशीर झाल्याबद्दल दिलगीर आहे.

गेल्या तीनचार वर्षात या संधिवाताविरुद्ध इतका गोळीबार केला आणि सगळेच नेम चुकून वाया कशा जातात याचा इतका अनुभव गाठीला लावला की आता गोळी म्हटली की पोटात गोळा येतो. त्यामुळे यापुढे दोनतीन महिने – म्हणजे साधारण दसरा सण मोठा येईपर्यंत गोळी – रसायन – काढे – मिक्श्चर ( हा शब्द लिहायला इतका अवघड असतो हे आत्ताच ध्यानात आलं ) – इत्यादीपासून दूर राहून पाहायचं ठरवलं आहे. ‘काय दुखायचं तितकं दुखा लेको’ असं मीच माझ्या सांध्यांना सांगत आहे. त्यातून अतीच आखडूपणा करायला लागले तर ‘क्लोनोरिल’ मागवीन. सल्लाकीच्या गोळ्या खाऊन झाल्या. माझ्या खांद्यांनी आणि ढोपरांनी त्या उडवून लावल्या.
असो . तू इतक्या आपुलकीने औषध सुचविल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
तुझा
सर




पुलंनी लेखकाला लिहिलेले पत्र क्र. ३ (प्रत )




***


पुलंची वाटचाल मी पाहात आलो. एकदोन नव्हे, पन्नास वर्षांहून अधिक काळ. हे भाग्य आमच्या पिढीला लाभले. त्यांच्या लेखनाने केवळ मनोरंजन केले असे नसून आमच्या घडत्या बिघडत्या वयात आम्हाला एक दिशा मिळाली. आनंदाने कसे जगावे मंत्र मिळाला. खरे तर पुलसारखे व्यक्तिमत्व कधीतरी केव्हातरी एकदाच घडते. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणा-या पुलंचे अखेरचे भाषण ऐकण्याचा योगही मला लाभला. प्रसंग होता ‘चित्रमय स्वगत’ या त्यांच्या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ. जिथे पुल लहानाचे मोठे झाले त्याच पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघात हा समारंभ पार पडला. तो दिवस होता वीस मार्च एकोणीसशे शहाण्णव. माझ्या हॅण्डिकॅमवर हा समारंभ मी चित्रित केला.



‘ चित्रमय स्वगत ‘ पुस्तकाचे मुखपृष्ठ

पुल व्यासपीठावर होते. कंपवातामुळे त्यांना भाषण देणे अवघड होत असल्यामुळे त्यांचे मित्र अरुण आठल्ये यांनी पुलंचे भाषण वाचून दाखवले ते असे :

” मित्रहो, आजच्या या प्रकाशन समारंभाला आपण इतक्या आपुलकीने हजर राहिल्याबद्दल मी आपला ऋणी आहे. या ग्रथाच्या निर्मितीत अनेकांचे सहकार्य मला लाभले आहे. कसल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता माझ्यावरच्या प्रेमाने या माझ्या मित्रांनी ग्रंथनिर्मितीचा प्रचंड भार उचललेला आहे. ज्या हौसेपोटी या चित्रमय स्वगताची निर्मिती झाली त्याच हौसेने माझ्या वाचकांनी या ग्रंथाला प्रतिसाद दिला. आयुष्यभर मला रसिकांची फार मोठ्या प्रमाणात दाद मिळालेली आहे. जेव्हा जेव्हा समोर जमलेल्या रसिकांच्या गर्दीसमोर मी उभा राहतो त्यावेळी आनंदाच्या बरोबर माझ्या मनात कृतज्ञतासुद्धा दाटलेली असते. आज त्याच भावनेने मी तुमच्यासमोर हजर राहिलो आहे.

माझ्या या भावना तुमच्यापुढे बोलून दाखवाव्यात अशी माझी इच्छा होती. पण कंपवात नावाच्या वाह्यात विकारामुळे जाहीर भाषण करणे मला थोडेसे अशक्य झाले आहे. माझे हे कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण माझ्यावतीने माझा तरुण मित्र अरुण आठल्ये यालाच आपल्यासमोर दाखवायची मी विनंती केली. अरुणने माझ्या स्नेहापोटी या माझ्या भाषणाचे स्वतःच्या आवाजात डबिंग करण्याचे मान्य केल्याबद्दल मी त्याचा अतिशय आभारी आहे —

या ग्रंथाची निर्मिती करण्याचे श्रेय कुणाकुणाला म्हणून मी देऊ ? हे ‘चित्रमय स्वगत’ सुंदर स्वरूपात व्हावे एकमेव हेतू मनाशी बाळगून त्यांनी अपरंपार परिश्रम केले. त्यात कुणीही त्यातल्या श्रेयाच्या वाट्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. एखादे घरचे कार्य असावे अशा भावनेने माझी ही मित्रमंडळी राबली. लोकमान्य सेवा संघाच्या इथल्या इमारतीमध्ये लग्नसमारंभ चालू आहेत. नारायण निःस्वार्थ स्नेहभावनेने वावरत असतील, त्याच जिद्दीने आणि त्याच भावनेने माझ्या मित्रांनी या ग्रंथाच्या निर्मितीत स्वतः नारायणाची भूमिका मोठ्या खुषीत स्वीकारली आणि हे कार्य सिद्धीस नेले.

कुठल्याही नव्या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ मला पहिल्या प्रवासाला निघालेल्या जहाजासारखा वाटतो. सामाजिक जीवनात नेहमीच अनुकूल वारे मिळतात असे नाही. लोकप्रियतेच्या लाटासुद्धा समुद्राच्या लाटांसारख्या लहरी असतात. आपल्या प्रवासात सदैव अनुकूल वारे वाहावेत अशी प्रत्येक नाविकाची प्रार्थना असते. साहित्याच्या आणि एकूण सर्वच कलांच्या बाबतीत यशापयशाचे गणित मांडून भविष्य वर्तवता येत नाही. जीवनाचा हा प्रवास कधीतरी थांबवावाच लागतो. तो प्रवास सुरु करणे जसे आपल्या हाती नसते त्याचप्रमाणे त्याचा शेवट करणेही आपल्या हाती नसते. आपण फार तर या प्रवासाच्या आठवणी आपल्या डोळ्यांपुढे आणत असतो. माझ्या सुदैवाने जवळजवळ पन्नास वर्षे माझ्या जीवनातल्या प्रसंगांची, व्यक्तींची शेकडो छायाचित्रे सुनीताने जपून ठेवली होती. ती पाहता पाहता मला माझे बालपण, तारुण्य आणि वृद्धापकाळ दिसायला लागला आणि मी त्या त्या चित्रांचे मथळे आणि मजकूर लिहिला. अशा रीतीने अनेकांच्या सहकार्यातून तयार झालेला हा ग्रंथ आज प्रवासास निघत असतांना ‘शुभास्ते पंथानः सन्तु’ हा आशीर्वाद द्यायला माझ्या सुदैवाने प्रा. मेघश्याम रेगे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. माझ्या आयुष्यात ज्या ज्या वेळी माझ्या ग्रंथांची, नाटकांची, अभिनयाची वाटचाल सुरू केली त्या त्या वेळी मला हजारो रसिकांचा ‘शुभास्ते पंथानः सन्तु’ हा आशीर्वाद मला लाभलेला आहे. या आशीर्वादामुळेच माझा उत्साह वाढत राहिला आहे.

या मैफलीची आता भैरवी सुरू झाली आहे. सुरूवातीला गायिलेल्या यमनकल्याणसारखी भैरवीलाही दाद मिळत असल्याचा अनुभव मला येतो आहे. माझ्या आजच्या अवस्थेत माझ्या लोकांनी मुक्तमनाने आणि तितक्याच सद्भावनेने दिलेली ही दाद हीच माझी मोठी कमाई आहे. ज्यांनी मला, पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘ या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असे वाटायला लावले, त्यांच्या सहवासातल्या क्षणांचा हा चित्रसंग्रह आहे. हा संग्रह पाहतांना तुमच्याही आयुष्यात आनंद देऊन गेलेल्या व्यक्तींचे कृतज्ञ स्मरण तुम्हालाही होईल असा मला विश्वास वाटतो. आयुष्याची जी काही वर्षे आता उरली असतील त्या वाटचालीला माझ्या वाचकांच्या, श्रोत्यांच्या आणि रसिकांच्या आशीर्वादाचे पाथेय मला शक्ती देईल माझी श्रद्धा आहे. धन्यवाद ! ”

अरुण आठल्ये यांनी पुलंचे भाषण वाचून दाखवले. टाळ्यांचा कडकडाट झाला; पण प्रेक्षकांचे समाधान झाले नाही. पुलंनी थोडे तरी बोलावे अशी त्यांना प्रेक्षकांनी गळ घातली. पुलंच्या आवाजातच थोडेफार ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसले होते. पुलंनी कोणतेही आढेवेढे न घेता माईक आपल्या तोंडासमोर घेतला. ते म्हणाले,

” माझी इच्छा खूप आपल्याशी बोलावं अशी होती. पण संकल्प आणि सिद्धी यांच्यामध्ये पार्किन्सन्स डिसीज नावाचा एक वाह्यात रोग आलेला आहे, तो मला माझं मनोगत पूर्ण करू देत नाही. मला नेहमीच रसिकांचं पाठबळ लाभत आलेलं आहे. त्यासाठी मला काहीच खटपट करावी लागली नाही. लोकांनी मला आपण होऊन ‘आपलं माणूस’ म्हटलं. आणखी काय दुसरं लेखकाला किंवा कलावंताला लागतं ? मानसन्मान याच्यापेक्षा सुद्धा आपण निर्माण केलेलं जे काही असेल त्यामध्ये रमून गेलेला आस्वादक हेच बक्षीस असतं. असं बक्षीस मला उदंड प्रमाणात मिळालं आहे. याच्यासाठी, लोकप्रियतेसाठी म्हणून मला काही खटपट करावी लागली नाही. जे झालं ते लोकप्रिय झालं एवढंच. पण त्यामुळे माझ्या हातून जे झालं ते काही अद्वितीय झालं, असामान्य झालं, असा मी गैरसमज करून घेतलेला नाही. तेवढी मला विनोदबुद्धी आहे. आता जी सगळी मंडळी बोलत होती मराठी भाषेमध्ये फक्त सुपरलेटिव्ह नावाचीच एक डिग्री आहे असं समजून बोलत होती. ती सगळीजणं बोलली ती अत्यंत मनापासून बोलली ; प्रेमाने बोलली.


पाडगावकरांनी सांगितल्याप्रमाणे ‘शतदा प्रेम करावे’ असं वाटायला लावलं ते याच कलावंतांनी, कवींनी, चित्रकारांनी, याच गायकांनी. गायनाचं आणि माझं नातं फार जुनं आहे. मला जर कुणी विचारलं, तुमचं फर्स्ट लव्ह काय ? ‘ सुनीता इथं आहे ते सोडून द्या – मी ‘संगीत’ असं सांगीन. गाण्यानं मला जो आनंद दिला तो शब्दांत सांगणं कठीण आहे. एकतरी ओवी अनुभवावी म्हणतात तसं एक तरी सूर अनुभवावा, असं मला वाटतं. एखाद्याचा उत्तम गंधार लागला की काय होतं हे सांगणं कठीण आहे. अनिर्वचनी असं आपण म्हणतो – याला रेग्यांनी ‘परतत्वस्पर्श’ असं म्हटलेलं आहे. हा परतत्वस्पर्श मी इतक्या वेळा अनुभवला आहे, इतक्या मोठ्या व लहान कलावंतांच्या बाबतीत – त्यासाठी मी त्याचं घराणं पाहिलं नाही, त्याचा देश पाहिला नाही – तो निखळ असा आनंद देण्याची संगीतात शक्ती आहे. सगळ्यात सुंदर आनंदाचं स्वरूप हे कैवल्यस्वरूप असतं. तत्वज्ञानाचे प्राध्यापक शेजारी असल्यामुळे मला जरा कठीण शब्द यायला लागले आहेत. दुसरा शब्द सापडत नव्हता, हा कैवल्याचा जो आनंद आहे तो संगीताइतका कुणी देत नाही. कारण ते नुसतं असतं ; ते सिद्ध करावं लागत नाही.

समाज चांगला व्हायला हवा म्हणून मी रोज बांसरी वाजवतो म्हणणारा माणूस हा बांबूचा दुरुपयोग करतोय असं मला वाटतं. एका गिर्यारोहण करणा-या माणसाला विचारलं की ‘तुम्ही का हे गिर्यारोहण करता ?’ तो म्हणेल, ‘मी कुठं करतोय ? तेथे डोंगर आहेत म्हणून मी चढतो. ‘ तसं हे आहे, म्हणून मी लिहिलं. समाजाकडून मिळालं ते मी माझ्या परीने समाजाला परत केलं. हे करत असताना मला जर कुणी ‘याने काय होणार ?’ असं विचारलं तर ‘मला माहीत नाही’ असं सांगितलं असतं. ‘आनंदाशिवाय काही होणार नाही.’ ज्यावेळेस रविशंकरची सतार एखादी मींड काढते, त्यावेळी आपल्याला जो आनंद होतो तो कसा सांगणार ?तो ज्याने अनुभवला त्याला ठाऊक. ते अनुभवण्याचं भाग्य मला लहानपणापासून लाभलं हा माझा सगळ्यात मोठा नशिबाचा भाग म्हणा, योगायोग म्हणा – हा लाभला. त्यातून संगीताच्या अनुषंगाने मी गायनकलेकडे, नाटकाकडे वळलो. असाच निरनिराळ्या क्षेत्रात मी रमलो. या सगळ्या ठिकाणी मला तुमच्यासारखा समुदाय पुढे दिसत आला. आज आलेला समुदाय हे माझे आप्तस्वकीय आहेत असंच मला वाटतं. मी लिहायला बसलो तर मी आप्तस्वकीयासाठीच लिहितो अशी माझी भूमिका असते. तशा प्रकारचे आप्त मला वाचकांमध्ये पुष्कळ लाभले. त्याचा हा परिपाक आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी मला दाद दिली त्या त्या वेळेला कुणी फोटो घेतले; चित्रकारांनी, छायाचित्रकारांनी, सरवटेसारख्या व्यंगचित्रकारांनी ते समूर्त करून ठेवले. “

***


एवढे मोठे लेखक, अभिनयसम्राट, विनोदकार, संगीतकार, दानशूर असूनही आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी दाखवलेली नम्रता व प्रांजळपणा पाहून माणूस थक्क होतो. पुल दिनांक बारा जून दोन हजार रोजी गेले ते साहित्याचा, सुविचारांचा, विनोदाचा, औदार्याचा आणि सौजन्याचा प्रचंड वारसा मागे ठेवून. संगीतातील रागापासून प्रेयसीच्या अनुरागापर्यंत आणि साहित्यातील रसापासून भोजनातील आमरसापर्यंत समानतेने दाद देणारे पुल म्हणजे एक अद्वितीय रसायन होते. कुरळे केस, मिष्किल ओठ, गोल चेहरा, हनुवटीतील खळगा, सशासारखे समोरचे दोन दात, भसभशीत नाकावर काळ्या फ़्रेमचा चष्मा आणि त्या आड दडलेले दोन खोडकर डोळे ही पुलंची प्रतिमा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात कोरली गेलेली आहे; ती कायमचीच.

***

– डॉ. विठ्ठल प्रभू
२ सी, शिवसागर, पांडुरंग नाईक मार्ग, राजा बढे चौक, शिवाजीपार्क, मुंबई ४०० ०१६.
दूरध्वनी : (०२२) २४४५ २०६५, ९८ २० ६७ ५८ १५
इमेल : vithal_prabhu@hotmail.com
छायाचित्रे आणि पुलंनी लेखकाला लिहिलेली ३ पत्रे : लेखकाच्या संग्रहातून आणि गुगलवरुन साभार.
‘स्नेहबंध’ या मॅजेस्टिक प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील हा लेख मैत्री अनुदिनीमध्ये पुनःप्रसिद्ध

मुळ स्रोत -- https://maitri2012.wordpress.com/2015/06/12/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A5%81-%E0%A4%B2/

*********************************************************************************

Friday, June 28, 2019

आमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ

हा लेख ‘पु.ल. प्रेम’ ब्लॉगसाठी पाठविल्याबद्दल श्री अमोल लोखंडे ह्यांचे मनपुर्वक आभार!!

आमचे म्हणजे माझे आणि सोन्या बागलाणकराचे

“तुझं भाषाविषयक धोरण काय?”

सोन्या बागलाणकराच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाने माझ्या हातातली इडलीच्या इडली सांबारमच्या बशीत फतकन पडली. सोन्या बागलाणकर सकाळी घरातून बाहेर पडताना सदैव एक प्रश्न ओठावर घेऊन बाहेर पडतो. माणूस जिज्ञासू. दिवसभर जिज्ञासेचे बळ शोधत हिंडतो. लग्नकर्म झालेले नाही. त्यामुळे हिंडायला मोकळा. त्यातून जिज्ञासेला एक विषय नाही. व्याख्यानानंतर “कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का?” असं अध्यक्षांनी पुकारा केल्याबरोबर पटकन ज्यांना प्रश्न सुचतात आणि ते विचारायचे धैर्य ज्यांच्यात असते अशांतला सोन्या बागलाणकर आहे. आता चांगली इडली खात असताना “तुझं भाषाविषयक धोरण काय?” हा प्रश्न विचारण्याचे काही कारण नव्हते. मी बुडालेली इडली वर काढण्यात दंग असल्यासारखे दाखवले. विषय बदलणे हा सोन्या बागलाणकराच्या जिज्ञासेवर एकमेव उपाय आहे. पण तो दर वेळी लागू पडत नाही.

“आज सांबारममध्ये वांगी नाहीत -भेंडी आहे.”

‘‘माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस.” चिवटपणाने सोन्या बागलाणकर.

“कसला प्रश्न?” आपण जणू काय त्याचा प्रश्न ऐकलाच नाही, असे दाखवत मी म्हणालो.

“ऐक. तुझं भाषाविषयक धोरण काय?”

“अर्थात मातृभाषा. शिवप्रभू ज्या भाषेत बोलले ती माझी भाषा.”

“टु द पॉइंट बोल-म्हणजे मराठी.”

“अर्थात.”

“ठीक आहे. मग दोन कॉफी मागवून दाखव.”

“दो कॉफी लाव!”

“मराठीत मागवून दाखव.”

“दोन कॉफी लाव-आण!”

“शिवप्रभू कॉफी म्हणत होते?”

“त्यांच्या वेळी कॉफी होतीच कुठे?धारोष्ण दूध लेका!”

“हे बघ, भाषा हा विनोदाचा विषय नाही. आम्ही ह्या भाषेपायी काय काय गमावून बसलोय ते आमचे आम्हाला माहिती. राष्ट्रीय पातळीवरून नाही बोलत मी; वैयक्तिक पातळीवरून बोलतोय.” शिक्षा देणाऱ्या जज्जाइतक्या किंवा मुरलेल्या हेडक्लार्कइतक्या गंभीर चेहऱ्याने सोन्या बागलाणकर म्हणाला,

“वैयक्तिक पातळी?”

“जाऊ दे ते!”

सोन्या बागलाणकराने टाकलेल्या दीर्घ सुस्काऱ्यावरून वैयक्तिक पातळीपेक्षा पातळाशी ह्याचा संबंध असावा हे मी ताडले, पण मी ती जिज्ञासा आवरली. कारण सोन्या बागलाणकर हा एक चिरंतन प्रेमभग्न आहे.

“मराठीत कॉफी मागव.”

“जमणार नाही.”- मी.

“सोडा मागव.” – सो. बा.

“इडलीबरोबर सोडा?”-‘येडाच आहे!’ हे वाक्य मनातल्या मनात आवरून धरत मी.

“प्रत्यक्ष मागवू नकोस. समज, तुला सोडा मागवायचा आहे. तुझ्या मातृभाषेत. तर कसा मागवशील?”- सो. बा. हातातला चमचा माझ्यापुढे रोखत.

“एक सोडा.” - मी. ‘कटकट साली!’ हे मनात.

“ ‘सोडा’ हा शब्द मराठीत आहे? ‘सोडा’ ह्याचा मराठीत अर्थ काय?” सोन्या बागलाणकराचा सूर उलटतपासणीच्या वकिलाच्या वळणावर चालला होता.

“मराठीत ‘सोडा’ म्हणजे लीव्ह इट.”

“लीव्ह इट हे मराठी?”

“जाऊ दे ना-“

“बरोबर.” - सोन्या बागलाणकर.

“काय बरोबर?” - मी.

“सोडा-म्हणजे ‘जाऊ दे ना’-‘सोडून द्या’ असा अर्थ झाला.”

“प्यायचा सोडा हा शब्द मराठीत नाही.”

“खायचा सोडा आहे. तोही इंग्लिश. वॉशिंग सोडा.”

“वॉशिंग सोडा ह्या सोन्या बागलाणकराने खाल्ला केव्हा होता?” हा प्रश्न मी मनात दाबला.

“पण सोन्या, अस्सल मराठी खायचा सोडा असतो. सुकवलेली कोलंबी. सी. के. पी. वगैरे लोक खातात.”

“सी. के. पी!”- असे दात चावत म्हणून सोन्याने चमच्याखाली इडली चिरडली. सी. के. पी. लोकांनी याचे काय केलेय ते कळले नाही. “पण तुला प्यायचा सोडा हवा असला तर काय मागवशील?”

“सोडा.”

“'मराठीत मागव.”' टेबलावर बुक्की आपटत सोन्या बागलाणकर म्हणाला.

"का म्हणून?'

"तुझं भाषाविषयक धोरण तसं आहे म्हणून. तू मराठीवाला आहेस म्हणून.”

“मी मराठीवाला! संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तूच तर ऑफिसला दांडी मारून- ”

“ऑफिस कशाला म्हणतोस? कार्यालय म्हण.”

“कार्यालय? हे बघ सोन्या, कार्यालय म्हटलं की डोळ्यांपुढं लग्न उभं राहतं, आता बहुतेक ऑफिसात लग्नं इतकी जमताहेत की ऑफिसलाही कार्यालय म्हणायला हरकत नाही-"

"ही तुझी विषयांतराची खोड सोडून दे, तुम्हां लग्न झालेल्या लोकांच्या ट्रिका आमच्यावर नको चालवूस.'- हा सोन्या सकाळीच असा कशाने पिसाळला होता, मला कळेना. 

"ठीक आहे. मी मराठीवाला, मग तू संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कार्यालयाला दांडी मारून मिरवणुकीत जात होतास तो कशाला?"

माझा हा प्रश्न सोन्या बागलाणकराच्या जिव्हारी लागला असावा. कारण असे काही जिव्हारी लागले की तो खिशातल्या हातरुमालाने खसाखस कपाळावरचा अबीरबुक्का पुसावा तसे कपाळ पुसतो. त्यामुळे जिव्हार हा अवयव सोन्याच्या कपाळाच्या आसपास असावा, असे मला नेहमी वाटत आले आहे. व्यवस्थित कपाळ पुसून झाल्यावर, पडलेला उमेदवार विजयी उमेदवाराचे अभिनंदन करताना जसा क्षीणपणाने हसून 'अभिनंदन’ म्हणतो नेमक्या त्याच स्टाइलने हसून सोन्या बागलाणकर म्हणाला, ''ते तुला ठाऊक आहे."

"सॉरी हं सोन्या - आपलं क्षमस्व, मला तुझी खपली काढायची नव्हती."

त्याचे काय झाले, त्या वेळी सोन्या बागलाणकर हा तारा बेलसरे नामक ग्रहदशेच्या फेऱ्यात सापडला होता. तिच्या नादाने सोन्या कम्युनिस्ट होऊन आरडाओरडा करत होता. पुढे महाराष्ट्राला मुंबई मिळायची ती मिळाली. सोन्याला मात्र तारा मिळाली नाही. गड आला, पण सोन्याच्या बाबतीत काहीतरी भानगड झाली.

ताराने एका आय० ए० एस० ऑफिसरशी लग्न केले. मुंबई सोडून दिल्लीला गेली. सोन्याने कम्युनिस्ट पार्टी सोडून, सूड म्हणून जनसंघात गेला. मला तो प्रसंग आठवला. ह्याच हॉटेलात जगात खरं प्रेम असतं का?'' हा प्रश्न त्याने मला विचारला होता.

"गप्प काय बसलास?" सोन्या बागलाणकराच्या दटावणीने मी भानावर आलो.

"तारा बेलसरे तुला बनवणार हे मी तुला बजावलं होतं, सोन्या बारा पिंपळावरची--"

आणि एकदम माझ्या लक्षात आले की बारा पिंपळावरच्या मुंजासारखी बायकांसाठी मातृभाषेत म्हण नाही. मला हळूहळू मातृभाषेची कीव यायला लागली. साधा सोडा नाही ज्या भाषेत मागवता येत, त्या माझ्या मातृभाषेचे भवितव्य मला कठीण दिसायला लागले.

“मग तुझं काय म्हणणं, सोन्या-इंग्लिश भाषा राहिली पाहिजे-"

"त्याशिवाय गत्यंतर नाही."- तो.

"मग हिंदी राष्ट्रभाषा कां नको?''- मी. 

"आणि उद्या तुझी मद्रासला ट्रान्सफर झाली तर?" - तो.

"कशावरून?"

"ब्रँच निघते आहे."- तो.

"आपण नाही जाणार." - मी.

"नाही जाणार तर घरी बसा.''- तो.

"आणि खा काय?"

"मातृभाषा." शेवटली चकती पॉकेटमधे घालणारा कॅरमवाला समोरच्या कॅरमवाल्याकडे बघतो तसे माझ्याकडे पाहत सोन्या म्हणाला.

“ठीक आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे इंग्रजीतून सगळा व्यवहार सुरू झाला."

"समृद्ध भाषा आहे! यू कॅन् एक्सप्रेस व्हॉटएव्हर-'' त्या समृद्ध भाषेतला हवा तो शब्द सोन्याला मिळेना.
“समृद्ध! ठीक आहे. इंग्लिशमधून मावशीला कांद्याचे थालीपीठ करायला सांग! इंग्लिशमधून अळवाची जुडी घेऊन दाखव! इंग्लिशमधून आंघोळीचं पाणी काढलं का असं बोबलून दाखव. इंग्लिशमधून आंबाडीच्या भाजीवर झणझणीत-झणझणीत हं- तेलाची फोडणी घालून दाखव!" - मी सरबत्ती सुरू केली.

सोन्या बागलाणकर अंतर्मुख झाला. शर्टाच्या पहिल्या बटणाच्या काजापाशी हनुवटी खोचल्यानंतर 'अंतर्मुख'च म्हणतात अशी माझी समजूत आहे. नसेल तर थोडक्यात मी सोन्या बागलाणकराच्या इंग्लिशचा पतंग काटला. “सोन्यासाब बागलाणकरजी, अब तुमकू गप बैठनेकू क्या हुवा? जबान उघडो!”
जबान वगैरे हिंदी शब्द मी मवाल्यांच्या भांडणात ऐकलेले आहेत.
“तुझ्या बोलण्यात काही पॉइंट आहे."

सोन्या बागलाणकराने त्यानंतर इडलीचा तुकडा ज्या असहायपणाने तोंडात टाकला ते पाहून मला त्याची दया आली. म्हणून मग मी “सोवळ्यातले पापड कर इंग्लिश... भाजणीच्या चकल्या कर इंग्लिश.... अळिवाचे लाडू, डोक्याला बांधायची टापशी, पंचा, पदर, कासोटा, 'गपूच्या खेपेपासून किनई हे असंच होतंय' -'इश्श'- कर इंग्लिश..." - हे सगळे माझ्या भात्यातले बाण परत भात्यात टाकले. नाहीतर ‘कर ह्याचं इंग्लिश' म्हणून मी सोन्या बागलाणकराचा नि:पात किंवा पब्लिकच्या भाषेत भुसा किवा भुक्ना म्हणतात ते करणार होतो.
"बरं मग माझं राहू दे. तुझं भाषाविषयक धोरण काय?''

सोन्या बागलाणकराने संपूर्ण नांगी टाकली होती. मीदेखील मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे म्हणून त्याला माझे भाषाविषयक धोरण समजावून द्यायला लागलो.

“सुरुवातीचंषशिक्षण हे मातृभाषेतच झालं पाहिजे. म्हणजे मराठी मुलांचं मराठीत, गुजराती मुलांचं गुजरातीत, कानडी मुलांचं कानड़ीत, बंगाली मुलांचं बंगालीत, ओरिसातल्य मुलांचं-”

वास्तविक मी कानडी मुलांपर्यंतच थांबायला पाहिजे होते, पण बाजी आपली आहे हा थाटात मी उगीचच ओरिसात शिरलो. त्यांची मातृभाषा कुठली ते मला ठाऊक नव्हते. सोन्या बागलाणकरही विचारात पडला. त्यामुळे रेट्न म्हणालो, ''-ओरिसातल्या मुलांचं ओरिसीत-"

“उरियात.''- सोन्या बागलाणकराने तेवढ्यात एक मार्क मिळवला.

“तेच." -मी.

“पण मग गोव्यातल्या मुलांचं?"

“जरा थांब, वादग्रस्त मुद्यांना मग हात घालू." मी उरलेल्या इडलीला हात घालत त्याला डावलले. ''तव व्यायइक वय्यंत इहण-"

"इडली संपव आधी- आणि स्पष्ट बोल.”

"मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण--" मी थोडासा खजील झालो. खाता खाता बोलायच्या माझ्या खोडीबद्दल असे त्याने मला चापणे रुचले नव्हते.

"हं!" - सो. बा.

“तर ते शिक्षण मराठीत." - मी.

“इंग्लिश अजिबात नाही."

“आहे तर! आठवी ते अकरावी इंग्लिश,"

“समज," सोन्या पुन्हा चमचा रोखीत बोलायला लागला, "समज, 'अ' हा मुलगा मातृभाषा मराठी आणि चार वर्षं इंग्लिश, एवढ्याच भाषा जाणतो. समज, हा 'अ' पंजाबात गेला--" - सो. बा.

“पण 'अ' हा माणूस पंजाबात जाईल कशाला?" - मी.

"समज गेला." - सो. बा.

“बरं, गेला." -मी.

“गेला आणि सरदारजीच्या टॅक्सीत बसला. सरदारजीला मराठी कळणं शक्य नाहीं. इंग्लिशची खात्री नाही. देन व्हाट डझ ही डू?"

"एक सांगायचं विसरलो मी तुला, सोन्या. साइड् बाय् साइड् हिंदी शिकलंच पाहिजे."

“म्हणजे आमच्या पोरांना ताप!"

“तुला कुठं पोरं आहेत?”

“माझ्या औरस पोरांना म्हणत नाही मी."

सोन्याचे हे ऐकून मी दचकलोच. सोन्या बागलाणकराचे हे अंग (वस्त्र?) मला ठाऊक नव्हते.

“औरस?”

“म्हणजे माझ्या स्वत:च्या पोरांविषयी नाही- पण आपल्या एकूण मराठी पोरांना ताप.”

"तो कसा?"

"ऐक. हा 'अ' नावाचा मराठी मुलगा" पाण्याचा ग्लास पुढे ठेवत सोन्या बागलाणकर म्हणाला.
सोन्याला ही 'अ ब क' ची फार सवय आहे. याचं आणि ताराचं बिनसलं याचं कारण अ ब क हेच. ताराच्या बापाचा त्यांच्या लग्नाला विरोध आहे हे कळल्यावर वास्तविक सोन्या बागलाणकरापुढे दोन मार्ग होते. (अ) म्हाताऱ्याची कवळी उतरवून ठेवणे; (ब) त्याला फुकट मालीश करायला जाणे. त्याऐवजी सोन्या ताराला घेऊन हॉटेलात गेला. आणि ताराला ह्या प्रसंगातून पार कसं पडायचं हे या काळ-काम-वेगाच्या भाषेत समजावून दयायला लागला.
"बरं का तारा... हा कप. समज, हा तझा बाप. आणि ही किटली. ही समज तुझी आई."

आपल्या आईला स्वत:चा प्रियकर चक्क किटली म्हणतो हे ऐकून कुठली स्वाभिमानी मुलगी तयार होईल? तिने स्पष्ट सांगितले, "बाबांना कपबिप म्हणायचं कारण नाही. इथं तू त्या कपाचा कान धरला आहेस. पण ते तुझा कान धरून तुला बाहेर फेकून देतील. आणि माझी आई किटली काय?–तुझी आई बादली आणि बाप हौद! गुड बाय!" असे म्हणाली आणि फॅमिली रूमचे दार आपटून गेली. ही कथा स्वतः सोन्या बागलाणकरानेच मला सांगितली होती...("... काय सांगू- गेली ती गेली- इथं बाकी कम्युनिस्ट मुलगी हवीच होती कुणाला म्हणा! दोन स्पेशल चहा एकट्यानं प्यावा लागला मला - वेटर लेकाचा एक ट्रे परत नेईना..." सोन्याचे दु:ख.) तेव्हापासून चहाचा ट्रे आला की सोन्या बागलाणकराची सासुरवाडी आली म्हणतो आम्ही. सोन्याच्या गैरहजेरीत. तर हे एक विषयांतर झाले.

"पण सोन्या, अ ब कशाला?- समज,बंडू नावाचा एक मराठी मुलगा आहे." - मी.

"जरा चांगलं नाव ठेव." - सोन्या बागलाणकर.

"सुभाष म्हण." मी.

“पण हे नाव बंगाली वाटतं."

“मग बंडू हेच नाव ठेवू. शिवाय बंडू हे प्रातिनिधिक नाव आहे."

असला एखादा शब्द वापरला की सो. बा. निपचित पडतो थोडा वेळ.

"ठीक आहे. बंडू हा मराठी मुलगा. त्याला तुझ्या म्हणण्याप्रमाणे मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तीन भाषा शिकाव्या लागणार.. आणि उत्तर-हिंदुस्थानी मुलाला मात्र फक्त हिंदी आणि इंग्रजी म्हणजे दोनच. मग मराठी मुलावर हा अन्याय कां?

"त्याला उपाय आहे.'' मी सर्वांगीण विकासाचा विचार करणारे लोक असतात तसा चेहरा करून सुरुवात केली, "तर त्याला उपाय काय?... दो डोशा लाव.''

सोन्या चमकला. मग त्याच्या लक्षात आले की समोरची इडली संपली होती. आता हा नवा मद्राशी मॅनेजर आल्यापासून एक इडली आणि एक कॉफीवर दोन तास ढकलता येत नव्हते. गेल्याच आठवड्यात भारताच्या सीमारक्षणाविषयीचा आमचा वाद आम्हाला त्याच्या दटावणीमुळे आवरावा लागला होता.
“काऽना पिनिश हवा तो टॅबल काऽऽऽली करो जी-कष्टमर वेऽऽट करता ऐ. तुम शिंपली यक् कप काऽऽऽऽऽफि लेकर दो गंऽऽऽटा कालिपिली भक्भक करकू बटता ऐऽऽ, ये क्या दरमश्याला ऐ क्याऽऽ ?.

यापुढे फक्त मराठी हॉटेलात जायचे, असे ठरवून बाहेर पडलो होतो. दोन दिवसांत निश्चय बदलला. कारण पहिल्याच मराठी हॉटेलात बोर्ड होता : 'हॉटेल ही खाण्याची जागा आहे. वायफळ गप्पा मारत बसण्याची नव्हे. ग्राहकांनी ह्याची नोंद घ्यावी.' आम्ही नोंद घेतली आणि पुन्हा ती पायरी चढलो नाही. म्हणजे पुन्हा हा मद्राशाचे पाय धरणे आले.

"सादा के मसाला-"

“मसाला."

"कडक भाजना हं,'' सोन्याने वेटरला जाता जाता बजावले. बोला."

"तर मी काय म्हणत होतो? आपला बंडू-"

"बंडू?"

"उदाहरणार्थमधला--"

"तर बंडू मराठी असल्यामुळे शिकतोय तीनतीन भाषा--"

"वेट्--"

"चार!"

"चार कशा?"

"कशा काय? मातृभाषा, राष्ट्रभाषा, प्लस इंग्लिश, प्लस सेकंड लँग्वेज. व्हेअर आर यू माय फ्रेंड?" - विजयी सोन्या.

"खरंच, संस्कृत!" --पराजयी मी.

"डोसाको टायम् लगेगा साब.''

"दो उपीटम् लाव... म्हणजे आपल्या मुलांना चार आणि हिंदी मुलांना तीन."

"त्याला उपाय आहे." भाषा ह्या विषयावर माझे विचार इतके परिपक्व झाले असतील अशी मलाही कल्पना नव्हती.

"सांग उपाय."- सोन्या.

“उत्तर हिंदुस्थानातल्या मुलांना एक साउथ इंडियन लँग्वेज कंपल्सरी, कानडी, तेलगु किवा तामीळ."

"शहाणा आहेस! म्हणजे उत्तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक शाळेत तीन मद्राशी नेमावे लागतील. म्हणजे मद्राशांना आणखी जॉब्ज.'' - सोन्या बागलाणकर 'मद्राशी' हा शब्द फारच व्यापक अर्थाने वापरतो. “आणि पोरांना चारचार भाषा शिकायच्या म्हणजे क्रुएल्टी आहे. शिवाय गणित असतं." सोन्याला एखाद्याला बह्मांड आठवावे तसे शालेय जीवनातले गणित आठवते. "शिवाय इतक्या लांब मद्राशी जाईल कशाला?"

'सोन्या, मद्रासी म्हणजे मराठी नव्हे, गिरगावातून दादर ब्रँचला ट्रान्सफर झाल्यावर ठणाणा करणारे! ती धाडसी जात आहे-"

“बरं समज, उत्तर हिंदुस्थानातल्या'अ' गाववा 'ब' हा मुलगा मद्रासी भाषा शिकला." अब ही जित्याची खोड आहे म्हणून मी सोडून दिली. "तर तो ती भाषा बोलणार कोणाकडे? आणि जर बोलला नाही तर मॅट्रिक झाल्यावर विसरणार, आपण संस्कृत शिकून विसरलो नाही का?"

हा सोन्याचा मुद्दा विचारात घेण्यासारखा होता. शाळा सोडल्यानंतर लग्नात एकदा भटजी 'मम म्हणा' म्हणाले त्या वेळी मी चुकून 'मम मे अस्मान् नौ अस्माकम् न:'असे ओरडलो होतो. भटजी भेदरून लाजाहोमात पडत होते. जानव्याला धरून खेचले.

“मला वाटतं सोन्या, संस्कृत ड्रॉप करावं. आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे. कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरिन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जाते. इंग्लिश मात्र मस्ट बी कंपल्सरी... उप्पीट थंडा क्यूं लाया?"

"गरम नही साब- " वेटरने संपर्काधिकारी करतात तितक्या अलिप्तपणाने आणि उपीटाइतक्याच थंडपणाने खुलासा केला.

‘‘पण संस्कृत काढून कसं चालेल? आपलं इंडियन कल्चर संस्कृतमधे आहे. सेकड लँग्वेज पाहिजेच."

"त्याला उपाय आहे. स्स्स स्सस्स! (दाढेखाली उप्पीट, सांजा अगर पोहे खाताना खडा सापडला की होणारा आवाज यापेक्षा वेगळ्या रीतीने लिहून काढता येत नाही याबदल दिलगीर आहे. असो.).... ही मद्राशी हॉटेलं आपण पंजाब्यांना कॅप्चर करायला सांगितलं पाहिजे. तंदुरी चिकनमध्ये खडा तरी नसतो."

"सहा रुपये पडतात. इथं तीस पैसे. सहा रुपयांपेक्षा खडा बरा... मरू दे. सेकंड लँग्वेजचं बोल."

‘‘फ्रेंच ठेवावी."

"त्यापेक्षा जर्मन बरी."

"मग रशियन का नको? काय प्रोग्रेस झालाय. उद्या चंद्रावर जातील रशियन्स आपल्याला सालं डोंबिवलीला जायचं तर गर्दीत जीव हैराण! खरं म्हणजे सायन्सवर जोर पाहिजे. आर्टस् कॉलजेस बंद केली पाहिजेत. काय करायचंय संस्कृत, अर्धमागधी, लॉजिकबिजिक" - मी.

"मग मराठी तरी कशाला? सध्याचं एज सायन्सचं आहे."

"पण मातृभाषा पाहिजे." - मी. तेवढ्यात मसाला डोशा आला. मी वेटरला उपीट दाखवीत म्हटले, “इसमें खड़ा है सब.”

“कौन खडा है?" हा वेटर गेल्या जन्मी एस्किमो असावा इतका थंड आहे.

''हमारा काका खडा है!" मी उखडलो.

"उसको कॉफी पिलाव." वेटर निर्लज्जपणाने बशा उचलून घेऊन गेला.

“काय माजले आहेत. नॉनमराठी लोकांना हाकलून दिलं पाहिजे मुंबईतून. मुंबईत मराठीच बोललं पाहिजे." एवढे बोलून मी जीभ चावली. सोडा मराठीत मागवता येत नाही हे आठवले. "तर भाषाविषयक धोरणाचं काय आहे सोन्या, ती एक समस्या आहे.”

"पण ती सोडवायची कशी?"

"सेकंड लँग्वेज रशियन करावी."

"मग अमेरिकेला काय वाटेल? - आपल्या अलिप्ततेच्या धोरणाला बाधा येते. वास्तविक आपण आशियाई."
"कोण?"

"आशियाई- आशियातले. आपल्याला एक तरी आशियाई भाषा यायला नकों?" - सोन्या.

"पण आशियाई भाषा कुठली?''- मी.

"तिबेटी किंवा ब्रह्मी. शिवाय आता आफ्रो-आशिया एक होतोय. म्हणजे अरेबिक किवा पर्शियन् आलं पाहिजे."

“म्हणजे एकूण काय झालं?" - मी.

"तूच सांग" - तो.

"म्हणजे मराठी, इंग्लिश, हिंदी, रशियन-" मी.

"मला वाटतं, संस्कृत हवीच." - तो.

"ठीक आहे. मराठी, इंग्लिश, हिंदी, रशियन, संस्कृत, आफ्रो-आशियाईपैकी एक भाषा"- मी

"मद्राशी राहिली.''- तो.

“हो, मराठी, इंग्लिश, हिंदी, तामीळ, तेलगु किंवा कानडी, रशियन, संस्कृत, अरेबिक किंवा पर्शियन किंवा ब्रह्मी - थोडक्यात म्हणजे फ्रुट सॅलडच्या बाटलीबरोबरच्या कागदावर असतात तेवढ्या भाषा एका मुलाला किंवा मुलीला यायला हव्यात. मला वाटतं सोन्या, ह्यापेक्षा माझं भाषाविषयक धोरण जास्त चांगलं आहे.”

'कुठलं?"

"गप्प बसण्याचं."

"का म्हणून?" सोन्याने टेबलावर मूठ आपटली.

"सांगतो. तू मूठबीठ आपटू नकोस. तो मॅनेजर बघतोय."

"मग इथं काय फुकट घालतोय काय खायला?"

"म्हणजे काय टेबलावर मुठी हापटायच्या?- ते जाऊ दे. हे भाषाविषयक धोरण अंगाशी कसं येतं याचं उदाहरण सांगतो, तुला शांत्या दिघे ठाऊक आहे?"

'हो. सेंट्रल टेलिग्राफमधे त्याची कझिन् होती तोच ना?- लग्न झालं का रे तिचं?"

"झालं."

"कुणाशी?"

"शांत्याशीच."

"पाजी!'' समोरचा डोशा चिरडीत सोन्याने हा शब्द दाताच्या आत उच्चारला.

"कां रे?"

"मी तिच्यासाठी शांत्याला कितीतरी चांगलं स्थळ सुचवलं होतं-"

"कुणाचं?"

"शांत्या दिघ्यात तिनं माझ्यापेक्षा काय जास्त पाहिलं?"

"म्हणजे तू स्वत:चं स्थळ सुचवायचं?"

“कां नाही?'' सोन्याच्या चेहऱ्यावर अपार खिन्नता होती.

''सॉरी!.. तर हा शांत्या दिघे मराठीशिवाय बोलायचं नाही अशी प्रतिज्ञा करून बसला. कां?"

"कुमुदवर इंप्रेशन मारायला."

"कोण कुमुद?"

"तीच ती त्याची कझिन्.'

“असेल. तसं असेल. तिला घेऊन मेट्रोला गेला. आणि तिथल्या तिकिटाच्या खिडकीतल्या माणसाला म्हणाला, 'अडीच रुपये शुल्काच्या दोन प्रवेशपत्रिका द्या.' खिडकीमागल्या माणसानं दहा वेळा इंग्लिशमधून विचारले. ह्याचे आपले एकच- 'अडीच रुपये शुल्काच्या दोन प्रवेशपत्रिका द्या.' मागले लोक ओरडायला लागले. मॅनेजर आला. हा क्यू सोडायला तयार नाही. मॅनेजर म्हणाला, 'एक्सक्यूज मी सर.' शांत्या पेटलेला. तो म्हणाला, 'सर गेला खड्यात!' मॅनेजरनं पोलिसला बोलावलं. हा त्या सबइन्स्पेक्टरला म्हणतो, 'तुम्ही कोण?'

'सबइन्स्पेक्टर ऑफ पोलिस.'
'मराठीत बोला. उपपर्यवेक्षक म्हणता येत नाही तुम्हांला?' तेवढ्यात कुणीतरी म्हणालं, ‘पियेला आदमी हैं. लोक हसले. पो. स. इन्स. भडकला. 'दात क्या निकालता है? मग लोकांनी निकाललेले दात लपवले. इकडे शांत्याची कझिन घाबरली. तिने त्या सबइन्स०ला सांगितले की, टू-एट्ची दोन तिकिटं पाहिजे आहेत.' स. इ. मॅनेजरला म्हणाला, 'इसको तिकिट कायकू नय देता?'

'किसको?' - मॅनेजर.

'इसकू- और इसके इसकू-'

'हम किधर नहीं देता? वेल जंटलमन, हॅव आय रिफ्यूज्ड?'

'मराठीत बोल. आता यापुढे इये मराठीचिये नगरी इंग्रजीची ऐट नको. पौरुषासि अटक गमे जेथ दुस्सहा-’

मग त्या सबइन्स्पेक्टरच्या डोक्यात प्रकाश पडला. तो म्हणाला, 'साहेब, अस्सल मराठी असून इंग्लिश सिनेमा बघता. मग इंग्लिश सिनेमाचे तिकिट इंग्लिशमधे का नाही मागत? व्हेन इन् रोम, रोम लाइक रोमन्स रोम, अशी म्हण आहे'... शान्त्याला पटलं. तेव्हापासून शांत्या मराठी सिनेमाला मराठीत तिकिट मागतो. हिंदीला हिंदीत. सत्यजित रायचे सिनेमे बघत नाही."

"त्याला बंगालीत तिकिट मागता येत नाही. तेव्हा आपण बोध काय घ्यायचा?''

"शांत्याचं शेवटी कुमुदशीच लग्न झालं. क्क्क्याय?"

-- सोन्याने हा बोध घेतला.

“हा बोध नव्हे सोन्या. बोध असा, की भाषाविषयक धोरण कडक ठेवणे हे आपले काम नव्हे.”

"हे बाकी पटलं. माझीच गोष्ट घे."

"सोन्या, हे आपलं पंचतंत्रातल्या गोष्टीसारखं चाललंय. कोल्हा सिंहाला म्हणाला, दमनकाची गोष्ट ठाऊक आहे का?-- मग दमनकाची गोष्ट. त्याचं तात्पर्य सांगताना दमनक कर्कटकाची सांगतो. मग कर्कोटक उंदराची सांगतो. उंदीर मांजराची-"

“नाही. माझी गोष्ट लहान आहे. नंदिनी चौबळ ठाऊक आहे तुला?”

"नाही."

"खारला आठ बावनच्या लोकलला चढते ती-"

“अरे, आठ बावनच्या लोकलला खारला काय एकच बाई असते?"

"बाई काय म्हणतोस? शी इज स्वीट ट्वेन्टीसेवन!"

"ठीक आहे. तिचं काय?"

"तिचं आणि आमचं गेल्या रविवारी भाषेवरून मोडलं."

"म्हणजे?"

"तेच ऐक. गेल्या रविवारी तिला घेऊन 'तांबे आरोग्यभुवना'त गेलो.

"भट लेको तुम्ही!"

"एक्झाक्टली हेच वाक्य."

''कुणाचं?"

"नंदिनी चौबळचं- ती सी. के. पी. आहे."

"मगाशी सोन्याने सी. के. पी. म्हणून इडली का चिरडली ते आता कळले.

"मग? तिला काय इंग्लिशमधून प्रेमपत्र लिहिलंस की काय?"

"प्रेमपत्र काय लिहिता? तेच तेच लिहून कंटाळा आलाय मला. मी सरळ वधुवरसूचकमंडळातून पत्ता घेऊन भेटलो होतो. जवळजवळ सगळं ठरलं होतं. तिचा बापसुद्धा इंटरकास्ट मॅरेजला तयार होता."

"किती मुली त्याला?"

"सेवन्!"

“मग तो इंटरनॅशनल मॅरेजलासुद्धा तयार असेल."

“ऐक. तिला घेऊन 'तांबे आरोग्यभुवना'त गेलो. म्हटलं, टु नो ईच अदर ऑफ मोअर म्हणजे मोअर ऑफ..."

"समजलं. -अधिक परिचय वाढावा."

"राइट. आमचे हेच होतं. नको त्या ठिकाणी नको ती भाषा येते. तर--"

“नंदिनी चौबळ.”

“हो, तर मी म्हटलं, 'आपण दोन ताटं मागवू या.' तशी ती पिचकन हसली.”

"का?"

“मलाही कळेना. मी विचारलं, 'हसलात का मिस् चौबळ?' तर म्हणते, 'अय्या! ताट काय म्हणता?"

हे वाक्य म्हणताना सोन्या बागलाणकराने तिच्यासारखे म्हणून दाखवण्याचा जो काही अभिनय करून दाखवला आणि चेहराबिहरा फुगवला त्यावरून मिस नंदिनी चौबळ ही बागलाणकरऐवजी महाबळ व्हायला अधिक योग्य असावी, अशी माझी खात्री झाली. सोन्या बिचारा लग्नाला भलताच पिकलाय. ते एक असू दे.

“अरे पण सोन्या, ताट म्हणालास हात चूक काय आहे?”

“तूच पाहा! मी हेच विचारलं. तर मला म्हणाली, 'डिनर म्हणा.' मी म्हटले, 'आल राइट! डिनर.' वास्तविक दुपारची वेळ. म्हणायचंच तर लंच' म्हणायला हवं पण मनात म्हटलं आपली वेळ बरी नाही. मी त्या वेटरला म्हटलं, ‘दोन डिनर'– तर तो वेटर दीडशहाणा निघाला. मला म्हणतो, 'साहेब, सरळ दोन ताट म्हणा ना!' मी तिथल्या तिथं थोतरणार होतो त्याला पण म्हटलं जाऊ दे. सीन नको. वर मला विचारतो, 'साधं ताट की स्पेशल?' मग मी तडकलो. म्हटलं, स्पेशल हा काय मराठी शब्द आहे? साधं की विशेष म्हण... आज गोड काय आहे?'

'श्रीखंड.'

'मला श्रीखंड नको.' नंदिनी चौबळ म्हणाली.

'का? श्रीखंड आवडत नाही?'

'कालच आमच्या ऑफिसची पार्टी झाली होती. त्यात श्रीखंडच केला होता.'

'केला होता?- केलं होतं म्हणायचं.'

'केला होता हेच बरोबर.'

'कसं शक्य आहे? बासुंदी ती, श्रीखंड ते, लाडू तो-'

‘भटांत म्हणत असतील.' नंदिनी म्हणाली.

‘मग परभटांत काय म्हणतात?' कुठल्या मृत पूर्वजाचं रक्त माझ्या अंगात भलत्या वेळी उसळले देव जाणे. वास्तविक माझ्यात कम्यूनल स्पिरिट अजिबात नाही. मी चिकनसुद्धा खातो, 'परभट' म्हटल्यावर ती भडकली.

'आय अॅम सॉरी मिस्टर बागलाणकर, पण आपलं लग्न होणं शक्य नाही. मला संकुचित मनाच्या माणसाशी संसार करता येणार नाही. ज्यालात्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो, माझं मराठीवर प्रेम आहे.'

'अहो, पण माझंही आहे... तू काय इथं करतो आहेस?' मी वेटरला कचकावला. तो पळाला. 'मिस चौबळ माझंही मराठीवर प्रेम आहे.'

‘दिसतंय, मला परभट म्हणून-‘

'तुम्ही मला भट नाही म्हणालात?'

‘मग तुम्ही आहांतच भट!'

‘मग तुम्ही-’

'आम्ही सी. के. पी. आहोत.'

‘आम्हीसुद्धा डी. आर. बी. आहोत.'

'डी. आर. बी. – ही काय जात आहे की मोटारचा नंबर?'

'देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण-'

'आय् ॲम् सॉरी- आपलं जमणार नाही. एखादी ताट वाढणारी काकू शोधा.'

'थांबा मिस चौबळ. निदान जेवून तरी जा. मी दोन डिनर्स मागवली आहेत.'

'तुम्हीच गिळा!'- असं म्हणून गेलीसुद्धा." असे म्हणून सोन्या बागलाणकर स्तब्ध झाला आणि हातरुमालाने कपाळ घासायला लागला.

“मग तू काय केलंस?"

“काय करणार? दोन ताट पुढ्यात घेऊन जेवलो."

सोन्या बागलाणकराचे एक बरे आहे. दर प्रेमभंगाला त्याला दुप्पट जेवायलाखायला मिळते.

“तूच सांग, श्रीखंड तो, ती का ते, याच्यावर कुणाचं लग्न मोडलेलं तू ऐकलं आहेस?"

"प्रश्न श्रीखंडाचा नाही, सोन्या. मराठी माणूस तत्त्वासाठी काय वाटेल ते मोडेल. हा भाषेच्या अभिमानाचा प्रश्न आहे."

"अरे, पण मी काय कानडी आहे?"

“तेही खरंच."

“मग आता सांग, आपल्यासारख्यांनी भाषाविषयक धोरण काय ठेवायचं?"

मला वाटले होते, सोन्या इडली, उपीट आणि डोशा यानंतर मूळ प्रश्न विसरला असेल. पण नाही. भलता चिवट.

"माझं भाषाविषयक धोरण एकच आहे, सोन्या."

“कुठलं?"

“नरमाईचं."

“का म्हणून?"

“आपल्याला दुसरं कसलंही धोरण परवडत नाही म्हणून. हे बघ, आपण एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधी आहो."

“कुठला वर्ग?"

"धक्के खाणारा! सोन्या, हापिसला जाताना आपण लोकलमधे म्हण किंवा बसमधे म्हण, धक्के देणारे की खाणारे?''

“खाणारेच."

“आपण क्यू मोडून घुसणारे का?''

"कंडक्टर 'जगा नही, उतरो' हे नेमकं आपल्यालाच सांगतो की नाही?"

"आपल्यालाच."

"देवळांत चपला कुणाच्या चोरीला जातात?"

"आपल्याच. आणि कुठंही गेलं तरी छत्र्यासुद्धा आपल्याच." - सोन्या.

“सगळ्या चांगल्या पोरी कुणाचे हात धरून पवतात?" - मी.

"दुसऱ्यांचे" - तो.

"आपल्या संडासाच्या टाकीला पाणी असतं?" - मी.

“नाही." - तो.

‘‘शब्दकोडं आपल्याला फुटतं?" - मी.

"नाही.”–तो.

“मराठी शाळेपासून मॅट्रिकपर्यंत पहिले नंबर कोणाचे आले?" - मी.

"दुसऱ्यांचे." - तो.

"आपल्या सख्ख्या, चुलत अगर मातुल घराण्यांतल्या एका तरी माणसाला इंग्लंडला जायची स्कॉलरशिप मिळते?'' मी.

"नाही." - तो.

"पानवालाच घे. दोन गिऱ्हाइकं एकदम आली. त्यांपैकी एक आपण. तर पान प्रथम कोणाला देतो?"- मी.

"दुसऱ्याला." - तो.

"प्रमोशन कुणाला मिळतं?" - मी.

“दुसऱ्याला.”–तो.

"हापिसात दांड्या कोण मारतं?" मी म्हणालो.

"दुसरे." तो उत्तरला.

"म्हणजे हे जग आपलं की दुसऱ्याचं?"

"आपलं काय आहे सालं ह्या जगात?"

"मग भाषाविषयकच काय, कसलंही धोरण ठरवणारे आपण कोण सांग? आपल्या इच्छेला मान देऊन आजवर कुणी वागलंय का?"

"कोणी नाही. अरे, आम्ही रेडिओ लावतो त्या वेळी नेमका कुटुंबनियोजनावर परिसंवाद. लोकांनी लावला की मात्र ‘बोल राधा बोल संगम होगा के नही.' –तात्पर्य, जग लोकांचं."

“मोठ्यानं गाऊ नकोस."

“तर मग कॉफी मागव."

"रंड कप कॉफी." सोन्या ओरडला.

“काऽऽय?"

"मद्राशाच्या भाषेतलं एवढंच येत मला."

सोन्या बागलाणकराने भाषाविषयक धोरण बदलले होते आणि मीही!

---------

पु.ल. देशपांडे
आमचे भाषाविषयक धोरण
पुस्तक -- अघळ पघळ

Tuesday, June 11, 2019

जाल्मिकीचे लोक-रामायण (गोळाबेरीज)

हा लेख ‘पु.ल. प्रेम’ ब्लॉगसाठी पाठविल्याबद्दल श्री अमोल लोखंडे ह्यांचे मनपुर्वक आभार!!

काळ बदलतो आहे. त्याबरोबर सर्वांनी बदलले पाहिजे. एक काळ असा होता की सूर्य वेळेवर उगवत असे, हिमालयदेखील बराचसा उंच होता, हवादेखील थंड प्रदेशात थंड व उष्ण प्रदेशात उष्ण होती. काळ बदलला. एका खोलीत मनस्वी उकाडा तर दुसरीत थंडी हा चमत्कार आपण मोठमोठ्या शहरातून पाहू लागलो. हे पूर्वी नव्हते. पूर्वीच्या काव्यांतून वसंत आणि कोकिळा नियमितपणे येत-जात. हल्ली दोघांचाही पत्ता नाही. प्रत्यक्ष सूर्योदयापेक्षाही अधिक शोभिवंत सूर्योदय रंगीत चित्रपटांत दाखवून आपण निसर्गाचे नाक ठेचले. पूर्वी कविता कळत असे; हल्लीजे कळते ते काव्यच काय पण वाङ्मयच नव्हे, असा सिद्धांत आपण स्वीकारला. पूर्वी स्वप्नात राज्ये दान दिल्याचे पाहून खरोखरीच दुस-या दिवशी स्वप्नातला बोल खरा करण्याचा मूर्खपणा करणारे राजे होते. हल्ली दिवसाढवळ्या दोन्ही डोळे उघडे ठेवून दिलेला बोल खरा करणारा इसम स्वप्नातदेखील आढळणार नाही. काळ बदलतो आहे, आपण बदलले पाहिजे. सारे काही बदलवले पाहिजे- त्यातल्या त्यात जुने वाङ्ममय; कारण ते प्रतिगामी आहे. त्यात सत्याचा आग्रह न धरता खरे बोलणारे हरिश्चंद्र आहेत. ‘नॅशनल इंटरेस्ट’ न पाहता काका मामांशी लढाई करणारे कृष्णार्जुन आहेत. काळ बदलतो आहे. जुन्या काळात अफजुलखानाला हिंसात्मक पद्धतीने मारणारे शिवाजी आहेत; अहमद बंगशाला बुंदेलखंडाचे खंडदान न करता बाजीरावाच्या मदतीने पिटाळून लावणारे छत्रसाल आहेत. इंग्रजांची पाहुणे म्हणून सोय न करता भारताचा अतिथिधर्म बुडवणारे क्रांतिकारक आहेत.

तात्पर्य, काळ बदलतो आहे आणि त्याबरोबर आपण बदलले पाहिजे. याची रुखरूख सर्वाच्या मनाला सारखी लागली पाहिजे.

जाल्मिकीने सारेच बदलविले!

आपल्या सुदैवाने अशी रुखरूख लागलेली माणसे आपणांमध्ये हयात आहेत; आणि जाल्मिकीचे ‘लोक-रामायण' हा त्याचा पुरावा आमच्या हाती आला आहे. आजवर आपण वाल्मिकीचे प्रतिगामी रामायण वाचीत आलो. तुलसीदासाचे रामायण तर इथूनतिथून भक्ती नावाच्या एका प्रतिगामी रसाने भरलेले. मोरोपंतांनी (हा गृहस्थ स्वतःला कवी म्हणवीत असे) एकशेआठ रामायणे लिहिल्याची कथा आहे. तामील भाषेत कंबु-रामायण नावाचा असाच एक प्रतिगामी प्रकार आहे. ही सर्व रामायणे देशातील फुटीर प्रवृत्तीला प्रोत्साहन देणगी आहेत हे सिद्ध झाले आहे. जुन्या रामायणात आता काही राम उरला नाही. त्यात मूलभूत फरक करण्याचा काळ आता आला आहे. हे नवे रामायण लिहिणारा लोककवी आपल्यात अवतरला हे रामाचे भाग्य!

‘लोक-रामायण' ह्या अलौकिक ग्रंथाचा जनक (सीतेच्या बापाशी ह्या जनकाचा संबंध नाही.) जाल्मिकी' ह्याचा परिचय करून देणे आवश्यक आहे. जाल्मिकी'चे मूळ नाव सांगणे अवघड आहे. पाळण्यात त्याचे नाव जनार्दन असे ठेवल्याबरोबर बालकाने ‘नाव बदला’ असा आक्रोश केल्याची कथा आहे. बारा दिवसांच्या बालकाची ही कथा असल्यामुळे तिला ‘दंत'-कथा म्हणणे शक्य नाही. सुदैवाने बदलापूरला त्याचा जन्म झाल्यामुळे गावाच्या नावाखेरीज प्रत्येक गोष्ट बदला असा बाळपणापासून त्याचा आग्रह असे. आपले नाव तर त्याने नित्य बदलले. वडलांचेही बदलले. जे दिसेल ते बदलायचे हा बाळ जनार्दनाचा आग्रह असे. लहानपणी मुले विटी-दांडू खेळत तर जनार्दन (त्या दिवशी त्याचे नव जनता-जनार्दन होते) दांडविटी' खेळत असे. हुतुतूला ‘तुतुहू' म्हणत असे. आणि खोखोतला दुसरा ‘खो’ आधी म्हणून त्या खेळाचे नावही ‘खोऽखो’ असे बदलण्याचे कार्य त्याने केले. शाळेत असताना वर्ग बदलायचा, शिक्षक बदलायचा, एवढेच काय परंतु वर्गात कपडे बदलायचादेखील त्याने सपाटा चालू केला. असला असामान्य विद्यार्थी पाहून कित्येक शिक्षकांनी त्याच्या वर्गातून बाहेर पडताना बदलीचे अर्ज केले. तारुण्यात तर जनार्दनाने अनेक गोष्टी बदलल्या. त्यांचा तपशील देणे शक्य नाही; परंतु त्यांतील एका गोष्टीमुळे त्याने आपले नाव अजरामर केले आहे, त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ती म्हणजे त्याने वाल्मिकी नावाच्या कवीच्या रामायणाला पार बदलून दिलेले नवीन स्वरूप. हे कार्य करताना त्याने स्वतःचे जनार्दन हे नाव बदलून ‘जाल्मिकी’ हे नाव धारण केले आणि आपल्या नव्या रामायणाचे नाव ‘लोक-रामायण’ असे ठेवले. कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत हे ह्या रामायणाचे वैशिष्ट्य आहे. मूळ रामायणातील काडे केव्हाच पिचली आहेत हे जाल्मिकीच्या ध्यानात आले आणि लोकांना समजेल अशा भाषेत त्याने आपल्या लोक-रामायणाची रचना केली. जाल्मिकीने रामायणातील पहिल्या प्रकरणाचे नाव बालकांड असे न ठेवता ‘रुदन' ह्या बालकाच्या सहजप्रवृत्तीला साजेल असे भो-कांड हे नाव ठेवले. ‘भो-कांडा’-तील आणि इतर कांडांतील काही कथा पाहा.

‘भो-कांडा’पासून सुरुवात

शरयू नदीच्या तीरी अयोध्या नावाची लोकधानी होती. तेथे दशरथ नावाचा एक लोकपाल होता. त्याचे मुख्य काम लोक वाहनांची सोय करण्याचे होते. त्या काळी लोक रथातून प्रवास करीत. प्रस्तुत लोकपालाच्या ताब्यात दहा रथांची व्यवस्था असल्यामुळे ‘दशरथ' असा त्याला किताव होता. त्या काळात द्विभार्याप्रतिबंधक कायदा होता. परंतु त्रिभार्याप्रतिबंत्रक नव्हता. त्यामुळे लोकांच्या इच्छेला मान देऊन त्याने तीन पत्नीचा स्वीकार केला होता. एकीचे नाव कौसल्या, दुसरीचे कैकेयी आणि तिसरीचे सुमित्रा. ह्या एकमेकींशी कवीच भांडत नसत. अयोध्येत कोणीच कोणाशी भांडत नसे. तिघीही एकच स्वैपाक करीत. कौसल्येने हातसडीचे तांदूळ निवडले की, कैकेयी शरयू नदीवरून, अयोध्या-हस्तोद्योग-कार्यालयात तयार झालेल्या मडक्यातून, पाणी आणीत असे आणि सुमित्रा चूल पेटवीत असे. मग तिघी मिळून भात शिजवीत आणि मग आपल्या झोपडीच्या बाहेर अतिथीची वाट पाहात उभ्या राहात. ही सर्व मंडळी झोपडीतच राहात. त्या वेळी मोठमोठ्या महालात कोणीच राहात नसे. सारी मंडळी आश्रमात राहात म्हणूनच त्यांच्या घरांना गृहस्थाश्रम म्हणत. काही मंडळी आश्रमदेखील बांधीत नसत. कारण त्यांचा मुख्य व्यवसाय ‘अतिथी’ हाच होता. रोज अतिथीला वाढल्याखेरीज पुण्य मिळत नसे. त्यामुळे इतरांना पुण्य मिळवून देण्यासाठी गावात अतिथी असणे आवश्यक होते.

अयोध्येतील पुरुषमंडळी शेतांवर काम करीत. ‘सब भूमी गोपालकी’ ह्या तत्त्वाप्रमाणे कोणीही कुणाच्याही शेतीवर काम करीत असे व कुणीही कुणाचेही धान्य कापून आणीत असे. गावात गुन्हेच घडत नसल्यामुळे पोलीसदेखील शेतावरच काम करीत आणि कंटाळा आल्यास अतिथीचे काम करीत. दशरथाचा संसार सुखाने चालला होता. त्याला राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न असे चार पुत्र होते. काही मंडळीचे मत, हे आधी नव्हते, नंतर त्याने यज्ञ केला आणि मग मुले झाली, असे आहे. परंतु ते असत्य आहे. दशरथाच्या तीनही राण्यांत मिळून चार मुले पहिल्यापासूनच होती. ही मुलेदेखील आपापसात कधीच भांडत नसत. सकाळी उठल्याबरोबर प्रार्थना करून वसिष्ठगुरुजींच्या जीवनशिक्षण केंद्रात जात. वसिष्ठगुरूजी बेसिक पद्धतीचे शिक्षण देत असत. प्रत्येक गोष्ट समवायपद्धतीने शिकवण्याकडे त्यांचा कटाक्ष असे.

‘इश्वाकू’ घराण्याचा परिचय

लोकपाल दशरथाने वसिष्टगुरुजींची आपल्या मुलांना शिकवणी ठेवली होती. त्याबद्दल मुले गुरुजींना दर्भाच्या दहा जुड्या प्रतिमासी देत असत.

इक्ष्वाकू घराण्याची माहिती वसिष्ठगुरुजींनी खालीलप्रमाणे सांगितली.

दशरथाच्या झोपडीत येताना वसिष्ठगुरुजी हातात एक भला मोठा ऊस घेऊन आले. मुलांनी गुरुजींना दंडवत घातला.

“लोकगुरूंना अभिवादन.” मुले म्हणाली.

“लोकांचे कल्याण असो," वसिष्ठ म्हणाले. “लोकांच्या मुलांनो, मी आज येताना काय आणले आहे?” वसिष्ठांनी विचारले.

“कमंडलू!” छोटा लोकपुत्र शत्रुघ्न म्हणाला.

“योग्य! लोकपुत्रहो, दुसरे काय?”

“रजकाकडून धुतलेली छाटी!” भरत म्हणाला.

“योग्य!! लोकपुत्र लक्ष्मणा, तू का उत्तर देत नाहीस!”

“लोकगुरुजी, माझा ज्येष्ठ बंधू राम जे सांगेल तेच माझे उत्तर असणार. तेव्हा त्यालाच विचारा.” लक्ष्मणाचे बंधुप्रेम उफाळून आले.

“रामचंद्रा, तू सांग मी काय आणले आहे?”

“ऊस.” राम म्हणाला.

“ऊस!” लक्ष्मण म्हणाला.

“योग्य. परंतु ऊस हा लोकवाणीतला शव्द झाला. देववाणीत ऊसाला काय म्हणतात, लोकपुत्र भरता‌‌‌-”

“ऊसम!” भरत म्हणाला. शत्रुघ्न हसला, त्यामागून राम हसला, म्हणून लक्ष्मण हसला.

“हसू नका! हसण्याने भावना दुखावतात. रामचंद्रा, ऊसाला देववाणीत काय म्हणतात?”

“इक्षू.” राम म्हणाला.

“इक्षू.” लक्ष्मण म्हणाला.

पुढे वसिष्ठगुरुजींनी तो ऊस वाकवला व विचारले,

“लोकपुत्रहो, मी आता उसाचे काय केले?"

“वाकवून दाखवला!” चारी लोकपुत्र म्हणाले.

“इक्षू वाकल्यावर काय होते?”

“मोडतो!”

“नव्हे, न मोडता काय होते?”

“काही होत नाही.” शत्रुघ्न म्हणाला.

“परंतु इक्षू आणि वाक यांचे काय होईल?”

“इक्ष्वाक.” राम म्हणाला व मागून लगेच लक्ष्मणही तेच म्हणाला.

“धन्य धन्य! आता त्याला ऊ लावल्यावर काय होईल?”

“ऊस खराब होईल.” भरताने उत्साहाने सांगितले.

“नव्हे! ऊ हे अक्षर लावल्यास काय होईल?”

“इक्ष्वाकु!” राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न म्हणाले.

“इक्ष्वाकु!!” आपल्या दाढीवरील घाम टिपीत वसिष्ठगुरुजी उद्गारले. “धन्य!! आज आपल्याला इक्वाकू घराण्याविषयी माहिती करून घ्यावयाची आहे.” एवंगुणविशिष्ट प्रस्तावना करून समवायपद्धतीला अनुसरून वसिष्टगुरुजींनी त्या चारही लोकपुत्रांस उसाच्या मळ्यात कामाला नेले. शेती, वल्कले शिवणे इत्यादी कलांमध्ये हे लोकपुत्र पारंगत झाले. कालमानाप्रमाणे लोकपाल दशरथ थकत चालला होता. दहा रथांच्या लोकवाहकांची दगदग त्याला सोसत नव्हती.

विश्वामित्र दशरथास भेटतात

आणि एके दिवशी सायंप्रार्थना आटोपून लोकपाल दशरथ आपल्या कुटुंबियांमध्ये गाईचे दुग्धपान करीत बसला असता तेथे आचार्य विश्वामित्र आले. वसिष्ठगुरुजी लोकपुत्रांची शिकवणी करीत तेथेच बसले होते. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे जिवश्च कंठश्च मित्र असल्यामुळे त्यांनी एकमेकांना कडकडून आलिंगन दिले. विश्वामित्रांनी अयोध्येनजिकच्या अरण्यात आदिवासी शिक्षणसंस्था चालविली होती. त्यांच्या ज्ञानयज्ञात राक्षस व्यत्यय आणीत असत. आदिवासी मुलांच्या पाट्या फोडीत. पेन्सिली पळवून नेत. चरखे जळणासाठी वापरीत. चोरून दारूदेखील

गाळीत असत. लोकपाल दशरथाने शांततामय मार्गाने त्या राक्षसांचा बंदोबस्त करावा अशी त्यांची इच्छा होती. वसिष्ठ गुरुजींचा सल्ला पडला की रामचंद्राने हे विधायक कार्य हाती घ्यावे. त्याप्रमाणे रामचंद्र व त्याच्यामागून लक्ष्मण हे विश्वामित्र मुनींबरोबर आदिवासी शिक्षणसंस्थेत गेले. तेथे पाट्यांचे तुकडे झालेले, पेन्सिली मोडून टाकलेल्या, सरंजामकार्यालय उध्वस्त झालेले पाहून रामास फार वाईट वाटले. रामास वाईट वाटले म्हणून लक्ष्मणासही वाईट वाटले. त्यांनी विश्वामित्रास धीर दिला व स्वतः आदिवासी मुलांचा वर्ग घ्यावयास सुरुवात केली. नेहमीप्रमाणे राक्षस वर्ग उधळण्यासाठी आले. रामचंद्राने त्यांच्या शिष्टमंडळाची गाठ घेतली. ग्रामोद्योग आणि जीवनशिक्षण यांचे महत्त्व त्यांना पटवून दिले आणि शांततामय सहजीवनावर त्यांची ‘बौद्धिके’ घेतली. राक्षसांचे डोळे उघडले. त्यांनी आपापली मुले आणून प्राचार्य विश्वामित्रगुरुजींच्या संस्थेत दाखल केली. अशा रीतीने ब्रह्मविद्येत पारंगत झालेली मुले अजूनही ‘ब्रह्मराक्षस’ म्हणून ओळखण्यात येतात. त्यांतील काहींना हिंसात्मक पद्धतीने मानगुटीवर बसायची हुकी आली की ‘राम राम’ असे म्हटल्यावर त्यांच्यातील हिंस्र वृत्ती नष्ट होऊन जाते. हा अनुभव अनेकांनी घेतला असेल.

जानकी-राम विवाह

राम-लक्ष्मणांच्या विधायक कार्यावर प्राचार्य विश्वामित्र प्रसन्न झाले. त्याच वेळी मिथिलानामक जनराज्यात जनक नावाचा जनपाल होता. त्याची जानकी नावाची उपवर कन्या होती. जनराज्यात, निवडणुकीच्या लोकशाही पद्धतीने विवाह होत असे. उपवर कन्येला एकच मत असून एकाचीच निवड करता येत असे. निवडणुकीला उभे राहण्याचा कोणाही पुरुषाला अधिकार असे. मत मात्र अविवाहित तरुणींनाच असे. निवडणुकीत पडलेल्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होत नसे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. विश्वामित्रगुरुजी राम-लक्ष्मणांबरोबर पदयात्रा करीत मिथिला जनधानीत येऊन पोहोचले. जानकीच्या स्वयंवराला (ह्या निवडणुकीला स्वयंवर म्हणत) देशोदेशीचे लोकपाल आले होते.

जानकीला सीता असेही नाव होते. जनपाल जनक शेतात जमीन नांगरीत असताना एका पेटिकेत ही कन्या सापडली, अशी एक कथा आहे. ह्यावरून त्या वेळी शेतात काय सापडत असे याची कल्पना येईल. वास्तविक त्या काळात सर्वच मंडळी शेती करीत. त्यांतून जनक, दशरथ वगैरे मंडळी तर ‘क्षत्रिय’. खरे म्हणजे ‘क्षत्रिय’ हा ‘क्षेत्रीय’ याचा अपभ्रंश आहे. सदैव क्षेत्रात राहणारे क्षेत्रीय. क्षेत्रस्थ ब्राह्मण आपण ऐकतो. क्षेत्रस्थ म्हणजे देखील क्षेत्रात राहणारे. वैश्यांची शेती वेशीजवळ असे. म्हणजे एक डोळा शेतीवर ठेवून दुसरा डोळा दुकानावर ठेवता येत असे. ‘शूद्र’ हे ‘शूत् शूत’ असा ‘रव’ करून पाखरे हाकलीत म्हणून त्यांस शत-रवः कुर्बन्ति इति शूद्राः असे म्हटल्याचे जुन्या शास्त्रग्रंथांत नमूद केले आहे. हे जुने ग्रंथ आता नष्ट झाले हे आपले दुर्दैव. तात्पर्य, जनकाने आपल्या शेतात सापडलेल्या कन्येचे स्वयंवर मांडले. देशोदेशीचे क्षेत्रपाल, लोकपाल आणि जनपाल त्या स्वयंवराला आले होते. विश्वामित्रांनी रामचंद्र आणि लक्ष्मण ह्या लोकपुत्रांसही बरोबर नेले.

सीता-स्वयंवर

जनकाच्या झोपडीसमोरील अंगण शेणाने सारवून स्वच्छ केले होते. मिथिलेतील सरंजाम-कार्यालयाला चिपळूण येथील जंगलात विधायक कार्य करणारे आचार्य परशुराम यांनी एक कापूस पिंजण्याची प्रचंड धनुकली भेट दिली होती. तिला दोरी जोडून जास्तीत जास्त कापूस पिंजून दाखवणाऱ्याची निवड होईल असे जाहीर केले होते. दुर्दैवाने त्या स्वयंवराला आलेल्या लोकपालांत ग्रामोद्योगकेंद्रात मधुपालन, चर्मालय, तेलाची घाणी वगैरे चालवणाऱ्या लोकपालांचीच गर्दी जमली होती. बहुतेक शेती-बेसिक पाठशाळेतले विद्यार्थी होते. वसिष्ठ गुरुजींनी रामाला सूत-बेसिक पद्धतीने जीवनशिक्षण दिले होते, त्यामुळे रामाने त्या कापूस पिंजण्याच्या धनुष्याला दोरी जोडून दहा शेर कापूस पिंजून दाखवला आणि धनुष्ये मोडले. तेवढ्यात लक्ष्मणाने त्या कापसाचे पेळूही वळले होते. हे सारे हस्तकौशल्य पाहून जनक प्रसन्न झाला आणि सीता-रामांचा विवाह झाला. अर्थात लक्ष्मणाचे पेळू करण्याचे कसब पाहून ऊर्मिळा नावाच्या आपल्या दुसऱ्या कन्येशी त्याचाही विवाह जनकाने लावला. त्या स्वयंवराला रावण नावाचा एक लोकपाल आला होता. त्याला जीवनशिक्षण मिळाले नव्हते, त्यामुळे तो ह्यातील काहीच करू शकला नाही. त्यामुळे त्याला हात हलवीत परतावे लागले. परंतु जनपाल जनकाने सर्व मंडळींना आग्रहाने ठेवून घेतले आणि विवाहानिमित्त सर्वांनी सामुदायिक उपोषण करून आपली चित्ते शुद्ध करून घेतली व त्यामुळे कुणालाही हर्षखेद काहीच न होता सर्व मंडळी स्थितप्रज्ञावस्थेत परतली.

लोकपाल दशरथाची सेवानिवृत्ती

राम-लक्ष्मणांप्रमाणे भरत-शत्रुघ्नांचेही विवाह झाले. लोकपाल दशरथाला कामाची जबाबदारी आता कठीण वाटू लागली आणि त्याने सेवानिवृत्त होऊन ते काम ज्येष्ठ लोकपुत्र रामचंद्र ह्याला द्यावयाचे ठरविले. यो वार्तेने कौसल्या, कैकेयी, सुमित्रा ह्या तिन्ही राण्यांना अत्यानंद झाला; परंतु खुद्द रामचंद्राच्या मनात विश्वामित्राचा जंगलातील आश्रम पाहिल्यानंतर आदिवासींच्या कार्यासाठी जीवनदान करावे असे फार दिवस घोळत होते. त्याने कैकेयीपाशी आग्रह धरला की, “हे सापत्न लोकमाते, केवळ विधायक कार्याच्या हितासाठी तू लोकपिता दशरथापाशी हट्टाचे नाटक कर.” कैकेयी अयोध्येच्या ‘साहित्य-संगीत-नाटक केंद्रा’त सांस्कृतिक विभागातून शिकून तयार झालेली स्त्री होती. तिने भरतमुनीच्या नाट्यशास्त्राचा अभ्यास केला होता. सांस्कृतिक कार्यात भारतीय स्त्रिया पहिल्यापासून तयार होत्या. तिने व मंथरा नावाच्या तिच्या जोडीच्या कार्यकर्त्या स्त्रीने हट्टाची सुंदर संवाद बसवला. विशेषतः क्रोधाचा अभिनय करण्यात तर तिची हातखंडा होता. तिने ‘भरताला लोकपालाची जागा द्या’ ऊर्फ ‘माझा भरत’ ही एकांकिका इतक्या परिणामकारक रीतीने केली की दशरथाने खरोखरीच रामचंद्राऐवजी भरताला लोकपालाची जागा दिली. यावरून त्या काळातील स्त्रियांचे अभिनयकौशल्य दिसून येते. रामचंद्र विधायक कार्यासाठी जंगलात जावयास निघाल्यावर त्याच्या एका पावलावर पाऊल टाकून जानकी निघाली व दुसर्या पावलावर पाऊल टाकून लक्ष्मणही निघाला. वास्तविक तिघांनीही जीवनदान करावयाचे योजले होते. परंतु शेवटी बारा वर्षेच हे कार्य करावे अशी तडजोड झाली. तिघांचाही अयोध्येत जाहीर सत्कार झाला व राम, सीता आणि लक्ष्मण दंडकारण्यात पदयात्रेसाठी निघाली.

शूर्पणखेच्या नाकाचे वाढलेले हाड

जंगलात रामाने आश्रम बांधला आणि आदिवासींमध्ये आपले विधायक कार्य सुरू केले. शेतीचे नवे प्रयोग सुरू केले. जंगलात अनेक वन्य जमाती राहात, त्यांचा उद्धार केला. त्याच वेळी शूर्पणखा नावाची एक स्त्री आश्रम पाहावयास आली व सीतेकडे पाहून सारखे नाक मुरडू लागली. सुरुवातीला बऱ्याच मंडळींचा समज हिच्या मनात सीतेची अवहेलना करून रामाला मोहित करायचे असे असावे असा झाला. परंतु तिला काहीतरी नाकाची व्याधी असावी असे रामाला वाटून त्याने लक्ष्मणाला तसे सांगितले. परीक्षेनंतर तिच्या नाकाचे हाड वाढले आहे असे लक्श्मणाने निदान करून तिच्या नाकावर शस्त्रक्रिया केली. दुर्दैवाने जंगलात सगळी शस्त्रक्रियेची साधने नसल्यामुळे वाढलेले हाड कापल्यावर नाक जोडण्यासाठी आवश्यक आयुधे नव्हती व हाडाबरोबर नाक गमावून शूर्पणखा परतली. शस्त्रक्रियेत आयत्यावेळी काय होईल ते सांगणे अवघड आहे.

वानर नावाचे आदिवासी

जंगलात वानर नावाचे आदिवासी होते. त्यांची मुले आश्रमात शिकून फारच तयार झाली. हे कार्य जोरात चाढ असताना मारीच नावाच्या एका व्यापा-याने ‘हरणछाप' रेशमाचे, जरीनी भरलेले सिलोनी कटपीसेस विकायला आणले. आश्रमातील मंडळी कामात दंग होती. राम आणि लक्ष्मण कांचनमुक्तीचे प्रयोग आदिवासींना समजावून देत असतांना मारीचाची ‘कांचनमृगछाप कापऽऽड' अशी आरोळी सीतेने ऐकली. हा मारीच सिंहलद्वीपचा फिरस्ता व्यापारी होता. (हा महा-रिच-म्हणजे अत्यंत श्रीमंत व्यापारी होता असे सुप्रसिद्ध सिंहली संशोधक चिचुंदरनायके यांचे मत आहे.) सीतामाईंनी बरेच दिवस वल्कलाच्या चोळ्या वापरल्या होत्या, आणि फेरीवाल्याची हाक आली की त्याला दारात बोल वायचा, या स्त्रीसुलभ स्वभावाप्रमाणे त्यांनी आपल्या यजमानांना त्याला बोलावण्यास सांगितले. 'कांचनमृगछापकापड घ्या---' असे ओरडत मारीच दूरवर निघून गेला होता. बराच वेळ आपला पती येत नाही असे पाहून सीतामाईने लक्ष्मणास त्याच्या शोधार्थ धाडले. तेवढ्यात लंकेतील दुसरा एक गृहस्थ रावण याने सीतेस लंकेत असली पुष्कळ दुकाने आहेत व आपण दोन तासांत तुला आणून सोडतो असे सांगून तिला विमानातून लंकेत नेले. इकडे जंगलात रामचंद्राने एक युक्ती केली. धनुष्यबाणाच्या टोकाला आपल्या आश्रमाचा पत्ता लिहून त्याने तो बाण हवेत सोडला. हेतू हा की बाण मारीचाहून जलद गतीने जाऊन त्याच्यापुढे वाटेवर कुठेतरी पडेल; परंतु चुकून तो बाण मारीचास लागला व तो मेला. रामाने त्याच्याजवळ जाऊन पाहिले तर मारीचाकडे खऱ्या सोन्याच्या तारेत विणलेले कापड अजिबात नव्हते. तेव्हा राम व लक्ष्मण परतले, तो आश्रमात सीता नाही.

सीता-शोध

शेवटी राम व लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ निघाले. वाटेत त्यांना लंकेचा प्रमुख रावण याने सीतेला नेल्याची वार्ता कळली.

सीतेचा शोध करण्यासाठी आश्रमातली सारी आदिवासी मुले रामाबरोबर हिंडत होती. त्यांत हनुमान नावाचा एक चलाख मुलगा होता. तो सगळ्यात पुढे गेला आणि रामेश्वराजवळील खाडीतून पोहत जाऊन त्याने अशोकवनात सीता पहिली. वास्तविक त्याला सीतेला बरोबर आणता आली असती. परंतु लंका हे स्वतंत्र राष्ट्र होते आणि परवान्याशिवाय सीतेला पुनः स्वतःच्या देशात येता येत नव्हते. त्यामुळे त्याला काय करावे सुचेना. दुर्दैवाने त्याच वेळी लंकेत हिंसात्मक चळवळ करावी असा त्याच्या डोक्यात विचार आला आणि त्याने तेथील नारळाच्या झाडावर चढून येणाऱ्याजाणाऱ्याच्या डोक्यावर नारळ फेकून मारणे, आगी लावणे वगैरे विध्वंसक कृत्ये केली. रावणाच्या सैनिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सीतेभोवती पाहारा वाढवला. तिला लंकेच्या न्यायालयाने 'लंका सुरक्षा कायद्या'खाली अटकेत ठेवली. तिच्यावर स्त्रीपोलिसांचा पहारी होता. तुरुंगातून तिला वागणूक चांगली मिळत होती. कारण लंकेचा मुख्य दंडाधिकारी कुंभकर्ण हा काही काम न करता झोपा काढीत असे. रावणाचा भाऊ बिभीषण याला शांततेचे धोरण मान्य होते.

लंकेची नासधूस करून हनुमान परत आल्यानंतर रामाने त्याच्या दुष्कृत्यांबद्दल उपोषण केले. कांही वानर मंडळींनी लंकेवर स्वारी करावी अशी रामास सूचना केली: परंतू आंतरराष्ट्रीय संबंध बिघडतील म्हणून रामाने हिंसेच्या मार्गाने न जाता समुद्रात पूल बांधून दंडकारण्य आणि लंका यांचे संबंध जोडावयाचे ठरविले. ह्या पुलाच्या विकासयोजनेचा दोन्ही देशांना फायदा होण्यासारखा आहे हे तत्व रावणाला पटावे म्हणून खटपट केली. पुलाचे काम श्रमदानाने करावयाचे ठरले आणि सारी मंडळी सीतेचा प्रश्न विसरून पूल, धरणे वगैरे बांधण्याच्या योजनेत गढून गेली. शेवटी पुलाचे काम पुरे झाले. वाली, सुग्रीव वगैरे स्थापत्यविशारदांनी स्वयंस्फूर्तीने काम संपविले. रीस (हल्लीच्या परिभाषेत ज्याला रूस म्हणतात), शृगाल वगैरे परदेशीय मंडळीही ह्या कार्यात मदतीला आली होती. वानरांत ताम्रमुखी वानर होते. पाताळदेशातूनही या कामी बरीच मदत झाली. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर सामोपचाराने आंतरराष्ट्रीय संबंध जोडण्यासाठी राम, लक्ष्मण, वाली, सुग्रीव यांचे शिष्ट मंडळ लंकेत जाऊन रावणाला भेटले. रावणाच्या राष्ट्रात दहा मंत्री होते आणि ते दहा प्रकारची परस्परविरोधी मते मांडीत. त्यामुळे रावण दहा तोंडांनी बोलतो अशी आख्यायिका आहे. प्रत्येक वेळी सोयिस्कर रीतीने मते बदलायला रावणाची ही मंत्रिमंडळाची पद्धती रामचंद्राला फार आवडली आणि रामराज्यात आपण ह्याच पद्धतीचा अवलंब करू असे त्याने रावणाला कबूल केले. सीता हा विषय सोडून रावण अनेक अवांतर गोष्टी रामोशी आणि शिष्टमंडळाच्या इतर सभासदांशी बोलला. सिंहली लोक-नृत्याचे कार्यक्रम फारच उठावदार झाले! त्यानंतर लंका-शांति-सेनादलाचा प्रमुख बिभीषण याने रामराज्याशी परराष्ट्रीय संबंध अत्यंत प्रेमाचे ठेवले पाहिजेत असे पत्रक काढले. हनुमंत पुन्हा पुन्हा सीतेच्या मुक्ततेचा विषय काढू पाहात होता. त्याच्या शेपटावर रामाने पाय ठेवून त्यास दाबले. शेवटी लंकेतील एका नारळीवर लटकणारे नार पाडण्यासाठी रामाने तीर मारला. त्याच वेळी गवाक्षात रावण आला होता. त्याला चुकून बाण लागून तो धाडकन जमिनीवर पडला. उत्तरीय तपासणीत 'गवाक्षातून पडून' असा शेरा पडला व रामावर आरोप आला नाही आणि प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले नाही. अशा रीतीने अत्यंत शांततामय मार्गाने त्या प्रकरणाचा शेवट होऊन सीता व राम अयोध्येला परत आले. तोपर्यंत भरताने हंगामी सरकार स्थापन केले होते. राम परतल्यावर सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि राम लोकपाल झाला आणि देशात रामराज्य सुरू झाले. परंतु लोकांनी रामराज्य म्हणू नये असा लोकपाल रामचंद्राने वटहुकूम काढला आणि आपल्या राज्याला लोकराज्य म्हणावे अशी लोकांना विनंती केली आणि त्या शांतताप्रिय लोकांनी ती ऐकली. प्रथम लोक पालपदाची त्याग, नंतर पत्नीत्याग आणि सरतेशेवटी शरयूत देहत्याग केल्यामुळे कुणीही कोणाली व कशालाही सोडून जाताना “बरं आहे, राम राम मंडळी” म्हणावे, असा पुढे फतवा निघाला. फार काय, देहाचा त्याग करताना 'राम' म्हणावे असाही वटहुकूम काढला गेला. त्याची अंमलबजावणी आजतागायत चालू आहे.

सीता 'भू'दान-कार्य-निमग्न झाली

जाल्मिकीच्या लोकरामायणाचे हे थोडक्यात सार आहे. मूळ ग्रंथ पाहिल्याशिवाय खरी कल्पना येणे शक्य नाही. लेखकाची वर्णनशैली तर अद्वितीय आहे. विशेषतः राम आणि रावण यांची लंकेत निघालेली मिरवणूक सेतुबंधनप्रसंग वगैरे प्रकरणे केवळ शैलीसाठी वाचावीत अशी आमची शिफारस आहे. रावणाचा रामाच्या हातून चुकून घडलेला मृत्यू वाचताना डोळ्यांतील टिपे खळत नाहीत. सीतात्यागाच्या प्रकरणाला जाल्मिकीने दिलेली कलाटणी फारच सुंदर आहे. विचित्र कंठ्या पिकनणे हे रजकांचे काम होते हे सिद्ध केले आहे. आणि ह्या रजकांच्या गोटातून पिकणाऱ्या ‘राजकीय’ बातम्या ह्या आजतागायत कशा चालू आहेत हे पटवले आहे. अयोध्या हे शहर असल्यामुळे आपल्या उदरात असलेल्या बालकांवर संपूर्ण ग्रामीण संस्कार व्हावे म्हणून सीता खेड्यात राहावयास गेली ही जाल्मिकीची मीमांसा विचारात घेणे इष्ट आहे. पुन्हा ती अयोध्येत परत आली तीदेखील शहरी जीवनात कशी सुखी होऊ शकली नाही हे दाखवून शेवटी तिने भूमातेच्या पोटात प्रवेश केला हे खरे नसून ‘भू’दानकार्यात ती ‘निमग्न’ झाली हेच खरे, हे सिद्ध केले आहे. आजदेखील रजकवृत्तीचे प्राबल्य असलेल्या ‘राजकीय’ क्षेत्रातून काहीं मंडळी ‘भू’दानात कशी गडप होतात हे आपण पाहतो. जाल्मिकीच्या द्रष्टेपणाचे याहून अधिक चांगले उदाहरण कोणते हवे? आणि असे असून अजूनही काही लोक वाल्मिकीचेच नाव घेतात त्यांना काय म्हणावे ? राम राम !!

पुस्तक - गोळाबेरीज
पु.ल. देशपांडे