Monday, February 20, 2023

रोज एक . . . - उरलंसुरलं

मेहेरबाण संपादक ' अणिल ' यास
संभा नाभाजी कोतमिरे याचे
प्रेमप्रूर्वक दंडवत ...

अनंतचतूर्दशीला श्री. गनरायाचे वीसर्जण केले आनी तुम्हास हे पत्र लीहावयास बसलो आहे. खरोखर त्या दाहा दीवसांत शेकेट्री म्हनून माला जे अणुभव आले ते तुम्हांला दाहा पुस्तके वाचूण सूधा येनार नाहीत. आपल्या देशात जे जे काही चालत आहे — ज्या ज्या भयंकर गोस्टी घडत आहेत त्या सर्वांचे काय कारन असावे याचा अणुभव मला त्या दाहा दीवसांत आला. फक्त कुठल्याही बाबतीत शीस्त नाही हेच खरे.

सादी गोश्ट. मंडपामधे बायकांणी कूठे बसावे व पुरसाणी कुठे बसावे ह्याचे केवढे मोठे बोरड लावून ठेवले होते. पन एकजन शीस्तीणे बसले तर शपथ. तरी बरे, मी स्वैंयसेवकाची टोळी शिकवून तालिममास्तराच्या हाताखाली तयार ठेवली होती. पन काही उपयोग नाही. सर्व गोंधळ. नऊचा कार्यक्रम आसला तर दाहापासून येक वाजेपर्यंत केव्हाही यावे, केव्हाही जावे.

भासन असो वा चांगले गाने असो यांच्या आपल्या गफ्फा चाललेल्या. मग त्या गानाराबोलना-याला आपन कीती गोंधळात टाकीत आहो याचा वीचारच नाही. बरे मधूनच एकदम उठून जाने—जाताना नीमूटपणे जावे तेही नाही. आपल्या कुठेकुठे बसलेल्या पोराबाळांना मोठमोठ्याणे हाका मारीत सर्व मंडळींचा चालू कार्यक्रमातील लक्ष्य काढूण आपल्याकडे ओढने असला आचरटपणा करन्यात आपले लोकांणा काडीचीही लाज वाटत नाही हे पाहून मी मणातल्या मणात भडकून जात असे. प्रंतु मी जबाबदारीच्या जागेवरआसलेणे आपले डोक्यावर बर्फाचा खडा आहे आशा समजुतीणेच वागन्याचे ठरिवले होते. त्यामुळे शक्य तीतके भांडनतंट्याचे प्रसंग टाळले.
प्रंतु दूर्दैवाणे एक प्रसंग मला टाळता आला नाही. स्त्रियांचा कार्यक्रम चालू असताणा काही हलकट लोक आचरटपना करन्याच्या ऊदेशाणे तेथे आलेले दीसले. त्यांच्यापैकी एक नीसटला पन् चौगेजन मात्र खात्रीणें हळदमीटाचे पलिस्तर बांदून बसले आसतील. भलता चावटपना माला खपत नाही आनी तसा दीसला तर मी तोंडाचा ऊपयोग न करता हाताचाच करतो.

आपले लोकांणा बरेच गोशटीचे शीक्षण द्यावयास पाहिजे हे मात्र खरे. ऊदाहरनार्थ रस्त्यात पाण खाऊन थूकने. परवा आमच्या मंडपात एकजन पीचकारी मारत आसताना आमच्या मेव्हन्याने त्याचे तोंड भाहेरुणही रंगिवले. माला वाटते बरेच वेळा पायातल्या वहानेला हाताशी धरल्याशिवाय सुदारना होत नाही. हा आपला माजा रांगडा न्याय आहे. पन जगात दुबळेपना सारका श्राप नाही. नम्रपना असावा पन लाचारी नसावी. आता मी यवढ्या मोठमोठ्या बंगलेवाल्यांकडे चीकी विकतो पन कदी कोनाची लाळ घोटत नाही. ऊगाच ' साहेब ' 'हुजूर ' कशाला ? माला येक गोश्ट कळते. चीकी अशी हवी की जी पाहून तोंडाला पानीच सुटले पायजे. मग ते तोंड कुनाचे आहे हा सवाल नाही. एकदा त्या वस्तूवर मण गेले की मानूस ते घेनारच. फक्त लोकांची मणे ओढन्यासाठी तुम्ही मासीकवाल्याप्रमाने बायाबापड्यांची रंगीबेरंगी अब्रू चवाठ्यावर मांडली नाही. म्हनजे झाले ! चिकीच्या वरच्या कागदावर बाईचा मुखवटा चिटकावून चीकी खपवन्याची पाळी जर मजवर आली तर खुशाल हमालाचा धंदा करीन.

माज्या म्हनन्याचे तात्पर्य हेच. धंदा असो, लीहीने छापने असो, आथवा चारचौघांत वागने असो आपल्या लोकांला जंवर शीस्तीची आवड नाही तंवर आपल्या देशाचे पाऊल कधीच फुडे पडनार न्हाई. स्वताच्या जबाबदारीची जानीवच आपनाला नाही. परवाच येका शाळेच्या दारात मी चीकी वीकत उभा होतो. पाच मास्तरांपैकी चार मास्तरांची धोत्रे कळकट दाड्या वाडलेल्या आनी चेह-यावर मुडद्याची कळा ! धोत्रे फाटकी आसती तर गरीबुमुळे आहेत म्हटले आसते पन कळकटपनाचे गरीबीशी काय नाते ? बरे साहापैशाच्या पात्यात दाहा दाढ्या होतात. आता संपादक माहाराज , तुम्हीच सांगा पोरांना वळन लावना-या मास्तरांना स्वताची शीस्त सांभाळायला नको का ?

परवाच्या ऊच्छवात असेच. दोनतीन भाषने ठेवली होती. पन भाव न देनारा एक जन वेळेवर आला आसेल तर शपत. कोन तास भर ऊशीरा तर कोनाचा येतच नाही म्हनून निरोप ! आनी हिते आपला शेकेट्री बसला आहे ताम्हनात देव बुडवून ! आनी लोक जांभया किंवा शिव्या देताहेत. आपल्याला आपल्या कामाचे, वेळेचे, जबाबदारीचे, कसलेच महत्त्व नाहि त्यामूळे आसे होते. पन ह्या सर्वांचे मूळ ती 'शीस्त' तीचा दुष्काळ ! मग सुदारना कसली नी काय कसले ?

तुमचा क्रुपाबिलाशी,
संभा नाभाजी कोतमिरे
( चीकीचे व्यापारी )
अनिल साप्ताहिक, १८/०९/१९४७

— पु. ल. देशपांडे 
संग्रह - उरलंसुरलं

ता.क. — पंतप्रधानांनी केलेले सार्वजनिक स्वच्छतेचे आवाहन अन् 'आप'च्या झाडूने राजधानीत केलेली ' राजकिय साफसफाई ' या पार्श्वभूमीवर पुलंचा १९४७ मधे लिहिलेला सार्वजनिक शिस्तीवरचा हा लेख खरोखरचं अप्रतिम !!!
उपरोक्त ता.क. नुसार फेब्रुवारी २०१५ साली प्रसृत केलीली ही पोस्ट आहे...
संग्रहक -  संजय आढाव

Tuesday, February 14, 2023

वेध सहजीवनाचा !

'आहे मनोहर तरी' या आत्मलेखनातून सुनीताबाईंनी पुलंसोबतच्या सहजीवनाचा वेध घेतला आहे. त्यांच्या लेखनशैलीचा हा एक संक्षिप्त परिचय...

भाई आणि मी. दोन क्षुल्लक जीव योगायोगाने एकत्र आलो. त्यानंतरचा आजपर्यंतचा आयुष्याचा तुकडा एकत्र चघळताना अनेक लहानमोठी सुखदुःखे भोगली. कधीतरी हे संपून जाईल. राहिलीच तर भाईची पुस्तके तेवढी, त्यांचे त्यांचे आयुष्य सरेपर्यंत त्याच्या मागे राहतील.

आजच्या काळातला एक मराठी लेखक म्हणून भाईचे निश्चितंच एक स्थान आहे, असे मला वाटते. तो अमक्या कवीपेक्षा श्रेष्ठ आहे का किंवा तमक्या कथालेखकापेक्षा अगर कादंबरीकारापेक्षा त्याचे स्थान वरचे आहे का, हा प्रश्नच अप्रस्तुत आहे. हे सगळे स्वतंत्र वाङ्मयप्रकार. त्यांची तुलना करणेच चूक; पण भाईच्या लिखाणाचेही एक खास वैशिष्ट्य आहे. ते सदैव ताजे, प्रसन्न, वाचतच राहा - वे, असे वाटण्याच्या जातीचे आहे, असे मला वाटते. स्वच्छंदी फुलपाखरासारखे. मनोहारी, आनंदी, टवटवीत. फुलपाखरांच्या लीलांकडे केव्हाही पाहा, लगेच आपला चेहरा हसराच होतो. ते आनंदाची लागण करत भिरभिरते. शेवटी सुबुद्ध, सुसंस्कृत मनाच्या वाचकांची मोजदाद केली. तर भाईला अशा वाचकांचा फार मोठा वर्ग लाभला आहे, हे कबूल करण्यावाचून गत्यंतर नाही. आता टिकाऊपणाचाच विचार करायचा झाला तर भरधाव वाहत्या काळाच्या संदर्भात एखादाच शेक्सपिअर, सोफोक्लिस किंवा व्यास यांच्यासारख्यांना फारतर टिकाऊ म्हणता येईल. आजच्या साहित्याला असा कस लावायचा झाला, तर त्यासाठी इतका काळ जावा लागेल, की त्या वेळी आपण कुणी तर नसणारच; पण आपल्या पुढल्या अनेक पिढ्याही मागे पडलेल्या असणार. त्यात आपण टिकणार नाही, केव्हाच विसरले जाणार, याची जाणीव भाईला स्वतःलाही पुरेपूर आहे. पण शेवटी तोही माणूसच. - स्वतःच्या हयातीतच विसरले गेलेले काही साहित्यिक किंवा समीक्षक जेव्हा त्याच्या लिखाणाला उथळ म्हणतात, तेव्हा तो नको तितका दुखावतो. 'गेले उडत!' म्हणण्याची ताकद त्याच्यात नाही. ती वृत्तीही नाही. 
जरादेखील असूयेचा स्पर्श न झालेल्या माझ्या पाहण्यातला हा एकमेव माणूस. त्याच्या आंतरमनातले सगळे स्वास्थ्य त्याला या दैवी गुणातून लाभले आहे; पण हे सुख तो प्रत्यक्ष भोगत असतानाही, साहित्याच्या अधूनमधून होणाऱ्या मूल्यमापनात त्याची क्वचित उपेक्षा झाली, की लगेच त्याची 'मलये भिल्लपुरंध्री' सारखी अवस्था होते आणि तो मग आपल्यातल्या इतर साहित्यबाह्य गोष्टींतल्या मोठेपणाला घट्ट पकडून ठेवू पाहतो. भूषवलेली पदे, केलेलं दान, मिळालेला मानसन्मान वगैरे. त्याचे चाहते त्याच्या या असल्या पराक्रमांचे पोवाडे गातात ते तो लहान मुलासारखा कान देऊन ऐकतो. ही एक मानवी शोकांतिकाच असावी. अशा वेळी मी फार दुःखी होते. वाटते, त्याला पंखाखाली घ्यावे आणि गोंजारून सांगावे, "नाही रे, या कशाहीपेक्षा तू मोठा आहेस. तुझी बलस्थानं ही नव्हेत. थोडं सहन करायला शिक म्हणजे तुझ्या लक्षात येईल, की साहित्यिक म्हणून या आयुष्यात तरी ताठपणे उभं राहण्याचं तुझ्या पायात बळ आहे. या कुबड्यांची तुला गरज नाही." याचा उपयोग होतोही; पण तो तात्कालिक; टिकाऊ नव्हे. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. त्याने ढळू नये. आपल्या मातीत पाय रोवून ताठ उभे राहावे वृक्षासारखं. आपल्या वाट्याचं आकाश तर हक्काचं आहे! माझ्यासारख्या वठलेल्या झाडाला हे कळतं, तर सदाबहार असा तू. तुझ्या वाट्याला गाणं घेऊन पक्षीही आले. तुला आणखी काय हवं?... हे असले सगळे मी डोळे मिटून सांगते; पण कान मिटता येत नाहीत. त्यामुळे मग देशपांडे घोरायला लागले की उपदेशपांडेही त्या वेळेपुरते प्रवचन थांबवून झोपायला निघून जातात.

अनेकदा वाटते, या माणसाकडून माझ्यावर थोडाफार अन्यायच झाला. तो त्याने जाणूनबुजून केला असता तर मग त्याची धडगत नव्हती. मी त्याचा बदला घेतलाच असता, मग त्यासाठी कितीही किंमत द्यावी लागो, कारण माझ्यात 'दयामाया' नाही असं नाही; पण त्या प्रांतावर 'न्याया'चं अधिराज्य आहे. त्यामुळे माझ्याकडून त्याला खासा न्यायच मिळाला असता; पण झाले असे, की त्याला प्रेम करताच आले नाही. ती ताकद यायला जी विशिष्ट प्रकारची प्रगल्भता लाभते ती वयाप्रमाणे वाढत जाते.

दुर्दैवाने या बाबतीत त्याचे वय वाढलेच नाही. तो मूलच राहिला आणि लहान वयालाच शोभणारा स्वार्थ म्हणा किंवा आत्मकेंद्रितता म्हणा, त्याच्या वाढत्या वयातही त्याच्यात वसतीला राहिली. इतर सर्व बाबतींतले त्याचे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व घराबाहेरच्यांना लाभले आणि हे मूलपण माझ्या वाट्याला आले.

लोकसत्ता 
संपादकीय 

Thursday, February 9, 2023

चार शब्द - पु.ल. - एक वाचनीय पुस्तक

नुकतेच पु. ल. देशपांडेंचे 'चार शब्द' हे पुस्तक वाचनात आले. पुलंनी कित्येक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्यातल्या निवडक प्रस्तावनांचा संग्रह म्हणजे 'चार शब्द' हे पुस्तक! अतिशय विचारपूर्वक, गांभीर्याने, आणि मुद्देसूद लिहिलेल्या या प्रस्तावना खरोखर वाचनीय आणि मननीय आहेत. काही प्रस्तावना आपल्या इतिहासाचं, दैनंदिन जीवनाचं, अध्यात्माचं, तत्वज्ञानाचं, आणि जीवनपद्धतीचं इतकं कठोर आणि तर्कशुद्ध परीक्षण करणार्‍या आहेत की वाचतांना आपले डोळे खाडकन उघडतात. पुलंची अशा पद्धतीचं लिखाण करण्याची हातोटी वंदनीय आहे. हे पुस्तक विनोदी नाही. चुकून कुठेतरी विनोदाचा हलकासा शिडकावा झाला असेल तर तेवढेच. हे पुस्तक मुख्यत्वेकरून गंभीर आणि विचार करायला प्रवृत्त करणारे आहे.

'विश्रब्ध शारदा' खंड २ (१९७५) या पुस्तकाची प्रस्तावना दीर्घ आहे. दिग्गजांनी कधीकाळी लिहिलेली पत्रे हा या पुस्तकाचा गाभा आहे. या प्रस्तावनेतून पुलंनी बालगंधर्वांच्या काळातील जगण्याचे संदर्भ खूप सुंदर पद्धतीने विशद केले आहेत. बालगंधर्वांचा हट्टीपणा, त्यांचे गोहरबाईंशी असलेले संबंध, त्यांचे दारिद्र्य, म्हातारपणी झालेली त्यांची अवहेलना, शून्य व्यवहारज्ञान असल्याने त्यांची झालेली दुरवस्था आणि मानहानी, मनमानी कारभारामुळे झालेली त्यांच्या परिवाराची फरफट असे बरेच पैलू या प्रस्तावनेत येतात. कितीही महान असले तरी एकूणच बालगंधर्व हे एक बेजबाबदार व्यक्तिमत्व होते हे वाचकांच्या लक्षात येते. त्याकाळचे संगीत आणि एकूण संगीतविषयक सामाजिक दृष्टी यावरदेखील पुलं प्रकाश टाकतात.

'माणूसनामा' या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारीलिखित पुस्तकाची (१९८५) प्रस्तावना नुसतीच कठोर नाही तर आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. या पुस्तकात लेखक भारतीय जीवनपद्धतीवर आणि अध्यात्मावर चिंतन करतांना खूप उपयुक्त असे महत्वाचे सल्ले देतात. या प्रस्तावनेत पुलंनी आपल्या संतपरंपरेवर, अध्यात्मावर, आणि एकूणच सामाजिक उदासीनतेवर परखड भाष्य केले आहे. तुकारामांनी आपल्या पत्नीला आणि मुलांना 'रांडापोरे' म्हटले, तुलसीदास नारीला 'ताडन की अधिकारी' म्हणतो हे कुठल्याप्रकारचे अध्यात्म आहे असा खडा सवाल पुलं करतात. आपली पत्नी आणि कोवळी मुले भुकेने तडफडत असतांना त्यांची भूक मिटवणे तर दूरच राहिले वर त्यांना 'रांडापोरे' म्हणून संबोधणे हे कुठल्या अध्यात्मात बसते असा सवाल केल्यावर आपण निरुत्तर होतो. लाखोंच्या संख्येने वारीला आणि तीर्थक्षेत्रांना जाणारी जनता असणार्‍या देशात इतका अन्याय, दारिद्र्य कसे हा प्रश्न अस्वस्थ करून जातो. मंदिरे, मस्जिदी, चर्चेस यापेक्षा आपल्याला शाळा, इस्पितळे यांची जास्त गरज आहे असे पुलं म्हणतात ते पटते. लेखक पुस्तकात म्हणतात 'आपले अध्यात्म हे जन्माविषयीच्या अज्ञानातून आणि मृत्यूविषयीच्या भितीतून उगम पावले आहे.' - थोडा विचार करता हे पटते.

'माओचे लष्करी आव्हान' (१९६३) हे दि. वि. गोखलेलिखित पुस्तक वाचायलाच हवे असे असावे. १९६२ च्या चीन युद्धात आपण कसा सपाटून मार खाल्ला, नेहरूंचा फाजील आत्मविश्वास आणि गाफीलपणा आपल्याला कसा नडला हे समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचायला हवे. चीनने हल्ला केला तेव्हा पुलं अमेरिकेत होते. त्याकाळी तिथे जॅक पार नावाचा लोकप्रिय नट होता. त्याने भारताची खिल्ली तर उडवलीच परंतु नेहरुंच्या पंतप्रधानपदाची जी लक्तरे त्याने तिथे टांगली ती बघून पुलं खूप दु:खी झाले. लहान मुलाचा आवाज काढून नेहरू कसे अमेरिकेच्या अध्यक्षाकडे मदतीची भिक मागायला आले हे त्या नटाने साभिनय करून दाखवले. भारतीय जवान किड्या-मुंगीसारखे मरत असतांना अमेरिका मनमुराद हसत होती. नेहरूंनी आपली दुर्बलता तत्वांनी झाकण्याचा प्रयत्न केला आणि फसले. तिथेच एक कृष्णवर्णीय बुट-पॉलीशवाला पुलंची आणि भारताची खिल्ली उडवतो. तो म्हणतो - भारतावर मुघलांनी राज्य केले, मग ब्रिटिशांनी केले आणि आता चीनी भारताला गुलाम बनवायला येत आहेत. भारतीय लोक स्वातंत्र्याच्या खरोखर लायकीचे आहेत का? ही प्रस्तावना वाचून संताप आल्याशिवाय राहत नाही.

'करुणेचा कलाम' (१९८४) या बाबा आमटेंच्या कवितासंग्रहाला दिलेली प्रस्तावना नुसतीच वाचनीय नाही तर त्यातून बाबा आमटेंनी त्यांचे आयुष्य दु:खी, कष्टी रोग्यांसाठी कसे सहजतेने उधळून दिले हे व्यवस्थित कळते. बाबा आमटे इंग्रजीत कविता करत असत ही नवीन माहिती या प्रस्तावनेतून मिळते. येशू ख्रिस्तावर त्यांची अपार श्रद्धा होती ही माहिती आपली उत्सुकता चाळवते.

'अस्मिता महाराष्ट्राची' (१९७१) या डॉ. भीमराव कुळकर्णीलिखित पुस्तकाची प्रस्तावना मराठी मनोवृत्तीवर कोरडे ओढते. महाराष्ट्रात उद्योग-धंदे, व्यापार-उदीम असूनदेखील महाराष्ट्रात राहणारी मराठी जनता या भरभराटीपासून दूर का असा सवाल पुलं आपल्या प्रस्तावनेतून विचारतात. शिवाजीमहाराज, टिळक, फुले, आगरकर वगैरे वंदनीय माणसे आहेत पण आपण फक्त त्यांचा जप करत राहिलो तर खोट्या अहंकाराने आंधळे होऊ असे स्पष्ट प्रतिपादन करतात. शिवाजीमहाराजांना अठराव्या शतकात डचांनी स्थापन केलेला एक छापखाना राजापूरजवळ सापडला होता. ते तंत्र आपल्या इथे प्रसिद्ध झाले असते तर भारताचा इतिहास वेगळा असू शकला असता. दुर्दैवाने छापखाना चालवू शकणारे कुशल कामगार आपल्याकडे नव्हते. शेवटी महाराजांनी तो छापखाना एका गुजराती व्यापार्‍याला विकून टाकला. मराठी प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी अशी ही प्रस्तावना आहे.

'झोंबी' (१९८७ - आनंद यादव) या कादंबरीवरील प्रस्तावना वाचूनच माझ्या अंगावर शहारे आले. हे पुस्तक मी अजून वाचलेले नाही. ही प्रस्तावना वाचून हे पुस्तक वाचायचेच असे ठरवले आहे. भयानक दारिद्र्यात आयुष्याची कशी वाताहत होते आणि कर्ता पुरुष बेजबाबदार, रानटी, दारुडा असल्यावर स्त्रियांच्या आयुष्याची कशी फरफट होते याचे हृदयस्पर्शी वर्णन या प्रस्तावनेत आहे. डॉ. आनंद यादव अशा विपरित परिस्थितीतून झेप घेऊन समाजात मानाचे स्थान मिळवतात याचे कौतुक या प्रस्तावनेतून ओसंडून वाहते.

'गदिमा - साहित्य नवनीत' (१९६९) या पुस्तकाच्या प्रस्तावनेतूनच गदिमांच्या अफाट प्रतिभेची आणि बेफाम उंचीची आपल्याला कल्पना येते. अनेक गीते, कविता, बालगीते, लावण्या, पटकथा, गीतरामायण, गीतगोपाल, गीतसुभद्रा, लघुकथा लिहून वयाच्या अवघ्या अठ्ठावन्नाव्या वर्षी जगाचा निरोप घेणारे पद्मश्री माडगुळकर एक महान प्रतिभावंत होते हे या प्रस्तावनेतून पुलं अधोरेखित करतात.

या व्यतिरिक्त 'रंग माझा वेगळा' (सुरेश भट), 'संगीतातील घराणी' (ना. र. मारुलकर), 'एक अविस्मरणीय मामा' (गंगाधर महांबरे), 'अवतीभवती' (वसंत एकबोटे), 'थोर संगीतकार' (प्रा. बी. आर. देवधर), 'मी कोण?' (राजाराम पैंगीणकर - मी नायकिणीचा मुलगा असे जगजाहीर करणारा लेखक), 'अशी ही बिकट वाट' (वि. स. माडीवाले), 'मातीची चूल' (आनंद साधले), 'मनाचिये गुंफी' (प्रकाश साठ्ये), 'प्रतिमा - रूप आणि रंग' (के. नारायण काळे) या पुस्तकांच्या प्रस्तावनादेखील अतिशय उद्बोधक, वाचनीय, उत्कंठावर्धक, आणि दर्जेदार आहेत.

चांगले, सकस, विचार करायला प्रवृत्त करणारे, मन गुंतवून ठेवणारे असे काही दर्जेदार वाचावयाचे असल्यास 'चार शब्द' हे पुस्तक आपल्याला तो आनंद खचितच देईल यात शंका नाही. नुसते इतकेच नाही तर आपली दृष्टी स्वच्छ करणारे, विचार नितळ करणारे, आणि आपल्या कृतीमध्ये चांगला विचार ओतण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करणारे असे हे पुस्तक आहे.

लेखक - समीरसूर 

हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

Tuesday, February 7, 2023

ऐसी सखी, सहचरी पुन्हा होणे नाही - मंगला गोडबोले

दिवंगत साहित्यिक सुनीताबाई देशपांडे यांच्याविषयीच्या आठवणींतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर एका लेखिकेने टाकलेला प्रकाश.

माझ्या पिढीच्या अनेक लेखकांप्रमाणे मीही माझं अगदी सुरुवातीचं एक पुस्तक पु. लं. ना अर्पण केलेलं होतं. सन १९८५ ! नाव 'झुळूक' अर्पणपत्रिकेतले शब्द 'अर्थातच पु. लं. ना ज्यांनी आयुष्यातले निरामय आनंदाचे क्षण दिले!' पुस्तकाचे प्रकाशक दिलीप माजगावकर आणि मी पुस्तक द्यायला 'रूपाली'च्या फ्लॅटमध्ये गेलो होतो. मला काही सुधरत नव्हतं. पु. लं. ना पुस्तक द्यावं, वाकून नमस्कार करावा आणि उलट पावलो घरी यावं एवढीच कल्पना होती. पु. लं. च्या घरामध्ये पाच-सहा मंडळी बसली होती. हॉल आणि स्वयंपाकघर यांच्या जोडावर सुनीताबाई बसल्या होत्या. त्या एकटक माझ्याकडे बघत होत्या. पु. लं. ना आत्यंतिक भक्तिभावानं नमस्कार करून झाल्यावर मी सुनीताबाईंसमोर नमस्काराला वाकले. त्यांनी पटकन पाय मागं घेतले. म्हणाल्या, "भाईला नमस्कार केलात की तेवढा पुरे. लेखकानं उगाच याच्या त्याच्या समोर वाकू नये." 'उगाच नव्हे, तुमच्या विषयी पण वेगळा आदर वाटतो म्हणून...,' असं काहीतरी मला बोलता आलं असतं; पण धीर झाला नाही. धारदार नजर आणि त्याहून धारदार वाक्यं यांनी माझी बोलती बंद झाली होती.

१९९२ मध्ये 'अमृतसिद्धी पु.ल. समग्रदर्शन' या ग्रंथाच्या कामाला सुरुवात केली. पु. लं. च्या जीवनकार्याचा समग्र आढावा घेण्याचा तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, त्याचा आराखडा ठरवण्यासाठी प्रा. स. ह. देशपांडे आणि मी पु. लं.कडे गेलो होतो. कसं कधी काम करायचं, कोणाकोणाची मदत घ्यायची अशी बोलणी सुरू असताना पु. लं. ना सारखी सुनीताबाईंची मदत लागत होती. 'आपला कोण ग तो... सुनीता?' 'मला आठवत नाही; पण सुनीता नक्की सांगल,' 'सुनीतानं ते कात्रण नक्की ठेवलं असेल,'
     
अशा असंख्य वाक्यांमधून पु. लं.चं त्यांच्यावरचं अवलंबित्व जाणवत होतं. कोणतंही काम त्यांच्यावर सोपवून पु. ल. किती सहजपणे अश्वस्त होतात हे वारंवार दिसत होतं. आम्ही निघताना सुनीताबाई सहज बोलून गेल्या, "बाकी सगळं तुम्ही लोक बारकाईनं करालच; पण एक लक्षात ठेवा, विशेषणं जपून वापरा. "
  
बेहिशेब विशेषणं वापरल्यानं व्यक्तिपर लेखनाचं काय होतं हे आजही कुठेकुठे दिसतं तेव्हा सुनीताबाईंचं ते वाक्य मला आठवतं. सुनीताबाईंची वाङ्मयीन जाणीव आणि साक्षेप किती लखलखीतपणे व्यक्त झाला होता त्यातून! सुनीताबाईंची प्रखर बुद्धिमत्ता, कर्तव्यकठोरता, उत्तम स्मरणशक्ती, सदैव जागा असणारा मूल्यविवेक, जे जे उत्तम उदात्त उन्नत याचं आकर्षण आणि खोटेपणाचा दंभाचा तिटकारा याचं प्रत्यंतर त्या काळात अनेकदा आलं. एवढी वर्ष एवढ्या लोकप्रियतेला तोंड देणं हे सोपं नसणार. सतत लोकांच्या नजरेत राहायचं, तरीही आपल्याला हवं ते कटाक्षानं करून घ्यायचं, कोण काय म्हणतं याच्या आहारी जायचं नाही, जनापवादांचा बाऊ करायचा नाही असं एक प्रकारे अवघड आयुष्य त्या जगल्या. त्यांची तर्ककठोरता अनेकांना तर्ककर्कशता वाटली; पण त्यांनी स्वेच्छेनं पत्करलेल्या रस्त्याला माघार नव्हती.

स्वभावातःच परफेक्शनिस्ट आदर्शवादी असल्यानं सुनीताबाई चटकन दुसऱ्याचं कौतुक करत नसत; तसंच स्वतःचंही कौतुक करत किंवा करवून घेत नसत त्या स्वतःला ललित लेखक मानत नसत. 'तेवढी प्रतिभा माझ्यात कुठली?' असं म्हणून त्यांच्या लेखनाची स्तुती उडवून लावत. घेतलेल्या आक्षेपांवर मात्र जरूर तेवढा विचार करत, चर्चा करत. संदर्भात कुठेही चूक झाली, तर वारंवार दिलगिरी व्यक्त करत. त्यांना आवडणाऱ्या माणसांवर विलक्षण माया करत. कुमार गंधवांचे पुत्र मुकुलजी यांच्या व्यसनाबद्दल काही उलटसुलट बोललं जात असताना त्या एकदम म्हणाल्या होत्या, "कुठेतरी दुखावला असणार हो तो... त्याला मी नुसती हाक मारली, तरी सुतासारखा सरळ होतो तो... लोकांना त्याला नीट वागवता येत नाही म्हणून...'

सुनीताबाईंची ती हाक नक्कीच आर्त असणार. त्यांच्या आवाजाचा पोत, हाका लांबविण्याची- हेल काढण्याची शैली आणि वाक्यं मध्येच सोडून देऊन साधलेला परिणाम माझ्या पूर्णपणे स्मरणात आहे. 'सुंदर मी होणार 'मधली त्यांची दीदीराजेची स्मरणारे जे अगदी थोडे वृद्ध लोक मला भेटले ते एकमुखानं म्हणाले, की सुनीताबाईंना दीदीराजे जशी समजली तशी कोणाला समजली नाही. नाटकात चाकाच्या खुर्चीवर बसून त्यांनी जशी कविता सादर केली तशी कोणालाही करता आली नाही. याविषयी त्या एकदा म्हणाल्या, "दीदीराजे करताना नुसतं शरीर अपंग दिसून चालत नाही. अभिनेत्रीचा चेहरापण अपंग दिसावा लागतो.' सुनीताबाईंना किती आणि काय दिसलं होतं, हे अशा वेळी दिसायचं! सुनीताबाई हे एक अदभूत रसायन होतं. पु.लं. आणि त्या ही एक विलक्षण सांगड होती. सगळी मतमतांतरं गृहीत धरूनही अशी व्यक्ती पुन्हा होणार नाही, असा गहिरा नातेसंबंध वारंवार दिसणार नाही. असंच वाटतं.

'तुझे आहे तुजपाशी' या नाटकात पु.लं.नी 'उषा'चं जे वर्णन केलं ते सुनीताबाईना बव्हंशी लागू होतं. हे वर्णन सतीशच्या तोंडी असे होते कधी गौरीसारखी अल्लड.... कधी पार्वतीसारखी निग्रही... कधी उमेसारखी प्रेमळ..... तर कधी साक्षात महिषासुरमर्दिनी... अशी अनेक रूपं धारण करणारी देवता होती; असे सांगताना तो पुढे म्हणतो, पण... जाऊ द्या. जखमेवरच्या खपल्या बेतानं काढाव्यात. . उगाच भळाभळा रक्त वाहायला लागायचं.' सुनीताबाईंना आठवताना मला हीच भीती वाटते. म्हणून इथेच थांबते.

मंगला गोडबोले
दैनिक सकाळ
९/११/२००९