Wednesday, May 29, 2024

मोत्या शीक रे अ आ ई

शिक्षण आणि शिक्षक या विषयावर असंख्य चर्चा, परिषदा आणि परिसंवाद, लेख, भाषणे चालूच असतात. पुष्कळदा वाटते, की या भानगडीत वेळ घालवण्याऐवजी आसपासची चार पोरे जमवून त्यांना चार अक्षरे शिकवण्यासाठी जर ही तज्ज्ञ मंडळी धडपडतील तर हा वेळ सत्कारणी लागेल. आणि म्हणूनच शिक्षण यासंबंधी कोणी काही बोलायला लागले, की मला माझ्या लहानपणी पाठ केलेल्या 'मोत्या शीक रे अ आ ई'ची आठवण होते. आपल्या मोत्याला अ आ ई शिकवायला निघालेली ती पोर अधिक प्रामाणिक होती. फक्त हा शिक्षणाचा व्यवहार एकतर्फी होता. इथे शिक्षक शिकवायला आतुर होता; शिष्य मात्र नव्हता. आपल्याही प्राथमिक शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा प्रकार बराचसा असाच आहे. कुठे शिकवायला उत्सुक असणारे शिक्षक आणि सर्वस्वी अनुत्सुक विद्यार्थी, कुठे शिक्षकही अनुत्सुक आणि विद्यार्थीही अनुत्सुक, कुठे विद्यार्थी उत्सुक, शिक्षक अनुत्सुक ! बहुतेक ठिकाणी शिकवायची इच्छा नसणारे शिक्षक आणि शिकायची इच्छा नसणारे विद्यार्थी अशीच गाठ मारलेली असते. पहिलीपासून ते अकरावी-बारावीपर्यंत आणि पुढेही ह्या गाठी कशाबशा सोडवत जायच्या आणि एकदाचे मोकळे व्हायचे.

शिक्षकाकडे शिकायला मुले पाठवतानादेखील केवळ इतके रुपये देऊन मुलाला इतके तास शिकवण्याच्या आर्थिक कराराचे या व्यवहाराला स्वरूप नसते; कारण इथे मुलांना शिकवून तयार करणे हे निर्जीव वस्तू तयार करण्यासारखे काम नव्हे. तसले काम हा एक वेळ शुद्ध आर्थिक व्यवहार असू शकेल. पण अशा निर्जीव वस्तू बनवणारा माणूसही कित्येकदा त्यात आपला जीव ओततो. 
फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे: कोल्हापूरला मी चप्पल विकत घ्यायला गेलो होतो. लहानसे दुकान होते. मी चप्पल पायात घातली आणि सहज चांभारदादांना म्हणालो, "अंगठा पक्का आहे ना? चपलेच्या अंगठ्याला भलत्या वेळी तुटायची हौस असते." चांभारदादा म्हणाले, "साहेब, तसल्या वांड सोभावाची वाण पायताणं आपल्या हातून नाही घडायची." मला त्यांचे ते 'वांड सोभावाचे पायताण' ही कल्पना फार मजेदार वाटली. मला त्याच्या त्या बोलण्याची मजा वाटलेली पाहून चांभारदादांचीही कळी खुलली, आणि चार इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगताना त्यांनी आपल्या धंद्यातली गुरुकिल्ली मला सांगितली, "हे बघा साहेब, नवी चेपली नव्या बायकूसारखी. नवराबायकू संसारात रुळेपोत्तूर चार दिवस लागत्यात. एकदा का रुळली दोघंजणं-मग? नवरा न् बायकू येकजीव. तसंच पावलाचं आणि चपलीचं असतं. चप्पल चांगली कंची? जी पायात असतानी असल्याचं भान नसावं, आन् नसली का म्हंजी पाऊल टाकताना अवघड वाटावं."

माझ्या पायांत इतक्या मायेने त्यापूर्वी कुणी चप्पल सरकवली नव्हती. जीवनात स्वीकारलेल्या कामात असा जिव्हाळा येणे हेच महत्त्वाचे. दुर्दैवाने शिक्षकाच्या कामात असा जिव्हाळा यावा याची समाजालाच आच लागलेली मला दिसत नाही. याचे मुख्य कारण शिक्षकाचे हात निर्मितीत गुंतलेले आहेत याची जाणीव कमी झाली आहे. राजकारणात आपण अमक्या पुढाऱ्याचे हात बळकट करा, तमक्या पुढाऱ्याचे हात बळकट करा हे सतत ऐकतो, पण शिक्षकाचे हात बळकट करा असे म्हणणे आपल्याला सुचत नाही. केवळ आर्थिक दृष्टीने नव्हे तर इतर अनेक दृष्टींनी शिक्षकाचे जीवन हे त्याच्या शिक्षणकार्यात त्याला आनंद वाटावा अशा प्रकारचे कसे होईल याची समाजच चिंता करत नाही, आणि उगीचच शिक्षकांकडून अनेक प्रकारच्या अपेक्षा मात्र करत राहतो. 

(अपूर्ण)
एक शून्य मी
हा लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवरून पुस्तक घरपोच मागवा.

0 प्रतिक्रिया: