Tuesday, June 21, 2011

पाठीवरचा तो हात!

"आले, आले बरं का!" गर्दीत कोणीतरी म्हणाले.
"कुठे आहेत, कुठे आहेत?" बरेच आवाज.
"ते काय, अँबेसिडर मधून उतरताहेत."
गुरुशर्टावर बिल्ले लावलेली काही स्वयंसेवक मंडळी पुढे सरसावत, "तुम्ही जरा बाजूला सरका हो, त्यांना यायला सुध्दा रस्ता नाहीये! नाहीतर असं करा ना, तुम्ही सगळे आत का नाही जाऊन बसत? ते तिथंच येणार आहेत."
कोणीही फारसं मनावर घेतलं नाही. ते स्वाभाविकच होतं.
सगळ्या गर्दीच्या टाचा उंच झाल्या! मिळेल तिथून पुढे घुसून, मान ताणून लोकांची त्यांना बघण्याची धडपड सुरु होती.
मलाही उत्सुकता होतीच पण हे सगळे लोक इतके पराकोटीचे उत्सुक होते की मी जरा भांबावलोच.
मी "बाबा, मलाही थोडं उंच करा ना!"
बाबांनी मला दोन्ही हातांना धरुन थोडं उचललं आणि ते मला दिसले! मंडळी, ते माझं पुलंचं साक्षात पहिलं दर्शन!!
१९८० चा सुमार असेल, मी आठवीत असावा. अहमदनगरच्या 'महावीर कलादालना'च्या उद् घाटन सोहळ्यासाठी पुलं आलेले होते.
नुकतीच त्यांची साठी झाली होती. 'पुलं एक साठवण' हे प्रकाशनपूर्व नोंदणी वगैरे करुन घरपोच आलेलं मला आठवत होतं.
(पोस्टातून घरपोच आलेल्या पार्सलातून कोरे पुस्तक बाहेर काढून, त्याच्या पानांचा छान वास घेत घेत आपण आधी न वाचताच ते घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून प्रथम आजोबांना द्यावे लागले होते हे ही लक्षात होते:)
तशी 'व्यक्ती आणि वल्ली', 'पूर्वरंग', 'अपूर्वाई' ह्या पुस्तकांची मोहिनी मनावर आरुढ होतच होती पण हे विख्यात साहित्यिक आहेत वगैरे कल्पनांना डोक्यात अजून स्थान नव्हते.

असो. तर उभ्या महाराष्ट्राच्या मनावर गारुड करणार्‍या ह्या वल्लीचं पहिलं दर्शन कसं होतं?
अहो, ते पांढरेशुभ्र केस, जणू त्यांच्या कर्तृत्वाची हिमालयाच्या उंचीची साक्ष देणारे (असं अर्थात मला नंतर वाटू लागलं, पण ते केस त्यावेळीही मला भावले होते) हे पांढरे केस फार थोड्या लोकांना खर्‍या अर्थाने शोभून दिसतात बरं का, त्यातले एक भाईकाका होते; अंगात साधा खादीचा झब्बा, फार इस्त्री बिस्त्री असली भानगड नव्हती, त्यावर फिकट हिरवं-पिवळसर जाकीट तेही खादीचंच आणि पांढरा पायजमा असा वेष; चेहर्‍यावर आताच फर्मास कोटी करुन आल्यासारखे मिश्किल भाव, त्यांचा तो खास भाईकाका ष्टाईल चष्मा आणि त्यामागचे ते, लहान मुलाची अपार उत्सुकता आणि जिज्ञासा यांनी भरलेले, डोळे! ते अजूनही माझ्या मनात घर करून आहेत. तुम्हाला सांगतो ह्या मोठ्या माणसांच्या डोळ्यात अशी काही एक वेगळीच चमक असते की बस! ते डोळे तुम्हाला पहात नसून तुमच्या आत कुठेतरी बघताहेत असे तुम्हाला जाणवते! मी अनिमिष नेत्रांनी त्यांना बघत होतो. ते चालत आत सभागृहात गेले आणि सगळी गर्दी हिप्नॉटाईज झाल्यासारखी मागोमाग गेली!

आत छोट्या स्टेजवर सगळी मंडळी स्थानापन्न झाली. हारतुरे प्रास्ताविक झालं. बोलणार्‍या मंडळींपेक्षा माझं (आणि बहुदा सर्वांचंच;) सारं लक्ष पुलं कडेच होतं! ते मधूनच असे काही मिश्किल भाव चेहर्‍यावर दाखवायचे की मला मोठी गंमत वाटत होती (त्यावेळी कदाचित ते वक्त्याच्या बोलण्यातल्या अशा काही जागा हेरुन ठेवत असावेत की त्याचा वापर ते त्यांच्या भाषणात करुन लोकांना हसवतील असे आपले मला वाटले.) झालं पुलं बोलायला उभे राहिले. तोपर्यंत कानोकानी खबर पसरुन गर्दी इतकी वाढली की लोकांना जागा पुरेना, सभागृहाचे दरवाजे बंद करु का म्हणून विचारणा झाली. आणि इथे भाईकाका खरंच का मोठे ते मला समजलं! अहो माणूसवेडाच आसामी तो, ते संयोजकांना म्हणाले "अहो असं करुयात का, आपणच सगळे बाहेर हिरवळीवर जाऊयात का? लोकांना हिरवळीवर बसायला चालत असेल तर मी तिथे व्हरांड्यात उभा राहून बोलेन. माझी काहीच हरकत नाही!" क्या बात है!! (अहो हिरवळीवरच काय काट्याकुट्यात बसून ऐका म्हणले असते तरी सर्व लोक बसले असते!Smile लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात हिरवळीवर धाव घेतली! मिळेल तिथे जागा पकडून लोक बसले. आतली टेबलं खुर्च्या व्हरांड्यात आल्या. पुलं बोलायला लागले.

त्यावेळी ते काय बोलले ते मला फारसं आठवत नाहीये कारण माझ्या मनात त्या वेळी वेगळ्याच विचारांनी थैमान घातलं होतं. मला पुलंचं रेखाचित्र काढायचं होतं त्यामुळे मी सोयिस्कर जागा शोधत होतो की जिथून मला ते नीट दिसू शकतील! शेवटी महत्प्रयासाने व्हरांड्याशेजारच्या जिन्यात जागा मिळाली. हातातल्या कागदावर माझं चितारणं सुरु होतं. पुलं बोलत असल्यामुळे सहाजिकच हालत होते त्यामुळे त्यांचे विशिष्ठ कोनातले भाव चित्रात पकडताना माझी तारांबळ होत होती. शेवटी एकदाचं ते पूर्ण झालं! पुलंचं भाषण संपताच त्याच्या भोवती स्वाक्षर्‍यांसाठी गराडा पडला. एकेकाला ते हसून स्वाक्षरी देत होते. मी भीत भीतच सामोरा गेलो. मला जवळ बोलावून, पाठीवरुन हात फिरवून, डोळे मोठे करुन माझ्या हातातल्या चित्राकडे बघून म्हणाले "वा, छान काढलं आहेस रे! मला ठाऊक नव्हतं मी एवढा चांगला दिसत असेन!:)". आणि त्यांनी चित्रावर स्वाक्षरी केली!
महाराजा, त्यावेळी काय वर्णावी माझ्या मनाची अवस्था! 'अवघेचि झाले देह ब्रम्ह' म्हणजे काय असते त्याचा प्रत्यय आला! मी तरंगतच घरी आलो. एरवी ज्या गोष्टी करायला मी साफ नकार देत असे त्या सहजा सहजी ऐकताना पाहून माझे आई-बाबा गोंधळून गेले! ही काय जादू झाली?
आल्या गेलेल्याला पुलंची ती स्वाक्षरी पुढचे कितीतरी दिवस मी दाखवीत असे. तो माझा आनंदाचा ठेवा मी नीट जपून ठेवलाय!
अशीच अनेक वर्षे गेली. पुलं नंतर भेटतच गेले, पुस्तकातून , कथाकथनातून, संवादिनीतून, चित्रपटातून, नाटकातून, लेखांमधून आयुष्य समृध्द करत गेले. नंतरही पुण्यात वसंतव्याख्यान मालेच्या निमित्ताने म्हणा कुठल्याशा भाषणाच्या निमित्तने म्हणा बर्‍याचदा त्यांना प्रत्यक्ष पहाण्याचा योग आला. पण पहिली भेट ती पहिली भेट त्याचा ठसा अमिट असतो हेच खरे!

असाच काही कामाने हैद्राबादला गेलो होतो. पुलं पुण्यात 'प्रयाग' मधे अतिदक्षता विभागात आहेत हे माहीत होतेच. हैद्राबादला जाताना मनात शंकेची पाल चुकचुकली होती.
१२ जून २०००. माझं काम संपवून मी हॉटेलवर आलो. दूरदर्शवर संध्याकाळच्या बातम्या लावल्या पुलं गेले एवढंच कळलं. पुढच्या बातम्या ऐकू आल्या नाहीत. कितीतरी वेळ सुन्न बसून होतो.
छातीत खूप खूप जड वाटत होतं. दु:खावेग अति झाल्यावर डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरु झाल्या. मनाच्या आत खोल कुठेतरी काहीतरी ओरबाडल्यासारखी घायाळ अवस्था झाली होती.
माझ्या पाठीवरुन प्रेमाने फिरलेला तो हात परमेश्वराने त्याच्या हातात धरला होता आणि मी पोरका झालो होतो!

लेखक - चतुरंग
मूळ स्त्रोत - www.misalpav.com/node/1268
(लेखकाच्या पुर्वपरवानगीने हा लेख इथे टाकण्यात आला आहे)

Monday, June 6, 2011

व्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे

मी पु.लं.चा फॅन, चाहता. मला पु.लं.चं व्यक्ती आणि वल्ली पुस्तक पूर्ण पाठ. मी माझ्या वेगवेगळ्या नाटकात मग्न होतो. त्या काळात व्यक्ती आणि वल्ली रंगमंचावर आणण्याची चर्चा चालू होती. मला वाटलं त्यातल्या पु.लं.च्या भूमिकेसाठी विक्रम गोखले किंवा दिलीप प्रभावळकर यांच्यापैकी कोणाला तरी हा रोल मिळणार. मला या नाटकात रोल मिळेल असा मी विचारही केला नव्हता. आणि मला निर्मात्याचा फोन आला तू व्यक्ती आणि वल्लीमधील पु.लं.चा रोल करशील का? माझी पर्सनॅलिटी किंवा माझं बाह्य व्यक्तिमत्व तरुणपणच्या पु.लं. सारखं काहीसं तेव्हा होतं. मला विचारण्यापूर्वीच निर्मात्याने पु.लं. नाच विचारलं होतं की अतूल परचुऱ्यांना ही भूमिका द्यायची का? पु.ल. लगेच ’हो’ म्हणाले. त्यामुळे मी ही भूमिका करायला नकार देणं शक्यच नव्हतं. माझी पु.लं.शी ओळख नव्हती. आणि त्या काळात त्यांच्या आजारपणाला सुरुवात झाली होती. पण त्यांच्या विनोदबुद्धी तशीच तीव्र होती.

एकदा साहित्यसंघात ’तुझं आहे तुजपाशी’ या नाटकाचा प्रयोग होता आणि पु.ल. नाटक बघायला आले होते. मी त्यात शामची भूमिका करत होतो. माझं काम त्यांना अतिशय आवडलं, ते म्हणाले ’तुझं काम पाहताना सतीशची आठवण होते.’ या त्यांच्या कॉमेंटमुळे खूप आनंद झाला. सतीश दुभाषी आणि पु.ल. यांच्या चेहऱ्यात साम्य होतं याची मला पुन्हा जाणीव झाली. तेवढ्यात ते खुर्चीवरुन उठताना मी त्यांना हात द्यायला गेलो, त्यांचा विनोद इतका उत्स्फूर्त, ते म्हणाले ’नाही रे हल्ली थोडा वेळ लागतो. कारण स्टार्ट घ्यावा लागतो.’ नाटक संपल्यावर त्यांनी पेटीवर ’कृष्ण मुरारी’ गाणं वाजवून दाखवलं. त्यांनी माझं नाटक पाहणं, पेटीवर गाणं वाजवून दाखवणं हा मी माझा गौरव समजतो. सुपारेल कॉलेजच्या प्रांगणात चतुरंग संम्मेलनात पु.ल.ना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार होता. तीथे व्यक्ती वल्लीचा प्रयोग व्हायचा होता. चार हजार प्रेक्षक समोर बसले होते. सुरुवातीला बिरजू महाराज आणि झाकीर हुसेन यांचा कार्यक्रम होता. तो संपल्यावर रात्री अडीच वाजता नाटकाला सुरुवात झाली आणि नाटक पावणे सहाला संपले.

नंतरचा प्रयोग बालगंधर्वला होता. पु.ल. नाटकाला आले होते. पण पु.लं.ची लोकप्रियता एवढी की नाटक संपल्यावर पु.ल. मागच्या दारानं बाहेर पडणार होते तर त्यांना दर्शन घेण्यासाठी गेला. व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचे दोनशे पन्नास प्रयोग झाले. खरं तर व्यक्ती आणि वल्ली हे नाटक तर एक ललितगद्य आहे. त्यात पु.लं.नी एकुण अठरा व्यक्तींवर लिहिलं. त्यातल्या काहीच व्यक्ती आणि वल्ली आम्ही नाटकाचं रुपांतर देऊन सादर केल्या. आपल्याला दहा पंधरा माणसाचे प्रकार शोधून सापडत नाही पण पु.लं.नी व्यक्तीमधल्या निवडलेल्या वल्ली, किती ग्रेट! शब्दकळा! अजूनही व्यक्ती आणि वल्ली वाचलं किंवा ऎकलं तर फ्रेश वाटतं हीच त्याची गंमत आहे.
दुर्दवाने पु.लं.चं मराठी समजणारा प्रेक्षक आज नाही. पु.लं.ची भाषा अलंकारिक नाही. पण त्यांचा विनोद कळायला मराठी भाषेची बलस्थान ठाऊक असायला हवीत. मला प्रामाणिकपणे वाटतं इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं, जर आपण त्यांना थिएटरपर्यंत आणू शकलो तर त्यांनाही पु.लं.ची नाटकं आवडतील. पण त्यांनी व्यक्ती आणि वल्ली वाचलं असेल तर त्यांचा आनंद द्विगुणीत होईल हे नक्की.

पु.लं.नी माझं नातीगोती हे नाटक पाहिलं होतं. मला ते ओळखत होते. व्यक्ती आणि वल्लीच्या निमित्ताने त्यांच्या माझ्या भेटी झाल्या. पण हक्काने गप्पा मारायला जाऊन त्यांना त्रास द्यावा हे मला योग्य वाटलं नाही. तेव्हा आजारपणाचा त्रास चालू झाला होता.

’तुझं आहे तुजपाशी’ नाटकाचा पु.लं.च्या पंच्याहत्तरीनिमित्त पुण्यात प्रयोग होता. मी शामचं काम करत होतो आणि माझी पत्नी सोनिया गीताचं काम करत होती. पु.ल. नाटकाला आले आणि म्हणाले ’मुद्दाम आलो. त्या त्या वयातील माणसं ते ते रोल करत आहेत’ या वाक्याला अर्थ होता. कारण शामचं काम ५०-५५ वयाचा कलावंत करायचा. नाटकातल्या शामचं वय २०-२५ वर्षं होतं मी त्यावेळी २५ वर्षाचा होतो म्हणून मला ही कॉमेंट फार आवडली. व्यक्ती आणि वल्ली आम्ही झी टीव्हीसाठी मालिकेच्या स्वरुपात केलं तेथे आम्हाला नंदा प्रधान, भैय्या नागपूरकर इत्यादी व्यक्ती आणि वल्ली घेता आल्या. नंदा प्रधानची भूमिका सचिन खेडेकरने केली होती. व्यक्ती आणि वल्लीच्या (मालिकेचा आणि नाटकाचा) दिग्दर्शक होता चंद्रकांत कुलकर्णी. त्याला नाटकांची उत्तम जाण आहे. व्यक्ति आणि वल्ली हे नाटक रेव्हू फॉर्म मधे आहे. तेव्हा त्याला निवेदनाची जोड द्यायला हवी हे त्यानं जाणलं. चंद्रकांत कुलकर्णी मला म्हणाला, ’तुझ्या खांद्यावर कॅमेरा आहे. तू शूट करुन दाखवायचं.’ म्हणजेच मला दोन पातळ्यांवर काम करावं लागलं एक म्हणजे त्यातून बाजूला होऊन नाटकातलं लेखकाचं पात्र होऊन वावरणं हा एक वेगळाच आनदं होता. लोक मला विचारत पाठांतराचा त्रास होत नाही का? कसा होणार? मुळात मला व्यक्ती आणि वल्ली पाठ होतच आणि पु.लं.नी मला काम करायला सांगितलं होतं हा सगळा अत्यंत भाग्याचा आनंदाचा सुवर्णयोग होता.

ज्याला हायलाईट म्हणता येईल अशी माझ्या आयुष्यातील न पुसली जाणारी आठवण म्हणजे माझं लग्न ठरलं होतं, पहिली पत्रिका गणपतीला ठेवली. दुसरी पु.लं.ना द्यायला पुण्याला गेलो. त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना लग्नाला येणं शक्य होणार नाही माहीतही होतं त्यांना पत्रिका दिली त्यांनी मला ’युवराज’ अशी हाक मारली आणि म्हणाले, ‘प्रकृती बरी असली तर मी लग्नाला नक्की येईन.’ आणि आश्चर्य म्हणजे लग्नाच्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांचा फोन आला म्हणाले.’ मी येऊ शकणार नाही पण इथूनच म्हणतो ’नांदा सौख्यभरे’.

त्यांचं ’असा मी असामी’ हे फॅन्टास्टिक पुस्तक आहे त्यात नाटकीय प्रसंग जास्त आहेत आणि त्यातली कॅरक्टर्स गडद आहेत. त्यातलं धोंडोपंत हे पात्र पु.लं.च्या जवळ जाणारं आहे. पण ’असा मी असामी’ मला करता आलं नाही याची मला खंत आहे. पु.लं.च्या स्मृतीला प्रणाम!

अतुल परचुरे
(जीवनज्योत दिवाळी अंक २००९)