Monday, November 28, 2016

पुलंचं लिखाण 'पाहिलं' तेव्हा..

आज पुलंचा वाढदिवस.

पुलंनी लिहिलेली अनेक वाक्य आपल्याला तोंडपाठ आहेत. पण तीच वाक्य मूळ स्वरूपात - पुलं च्याच हस्ताक्षरात लिहिलेली मी जेव्हा पाहिली तेव्हाची ही गोष्ट.


२००७
प्रोजेक्ट मॅनेजर ला "मी घरी चाललोय" असं डायरेक्ट तोंडावर सांगून असुरी आनंदानं ऑफिस मधून बाहेर पडलो आणि फोर्ट च्या दिशेने निघालो. 'एशियाटिक सोसायटी' आत्तापर्यंत सिनेमात पहिली होती आणि एक दोनदा बाहेरून. अर्थात मी उड्या मारत पोहोचलो तरी 'तिथे आपल्याला आत सोडतील का?' हा एक प्रश्न डोक्यात होताच. तिथे कोणी आपल्याला उगाच ओरडेल अशी भीती वाटत होती. पण तसं कोणी ओरडलं नाही. एका छोट्याश्या हॉलकडे जाणाऱ्या बाजूला बोर्डवर माहिती लिहिली होती. मी आत गेलो कोणी अडवल नाही...
संपूर्ण हॉल मध्ये भिंती कडेला काचेच्या काउंटर मांडले होते आणि त्याखाली होती ती सोनेरी पानं. पुलं नी लिहिलेली महत्वाची ओळ आणि ओळ. लिखाण करताना मध्ये काही भागावर खुणा, सुधारणा, भाषणाचे मुद्दे बहुदा ते स्टेज वर बसल्या बसल्या लिहिलेले, अतिशय त्रोटक नुसत्या विषयांची सुरुवात करणारे, गरुड छाप, गरुड छाप , गरुड छाप ... त्यांच्या नाटकाच्या संहिता, वह्या डायऱ्या. वेड्यासारख्या पुन्हा पुन्हा पाहत होतो. बरंच लिखाण भाषणं ओळखीची पण मूळ स्वरूपात जेव्हा आणि ज्या ठिकाणी ती पहिल्यांदा उमटली, त्या स्वरूपात पाहणं हा अनुभव मला साठवून ठेवायचा होता.

त्या वेळेस काही कार्यक्रम होते. आता सगळ्यांची नावं आठवत नाहीत. पण एका काकांनी हिंदी मधलं 'पानवाला' वाचून दाखवलं.
भारत दाभोळकर, विजू खोटे आणि किशोर प्रधान यांनी "तुज आहे तुजपाशी" चे इंग्लिश व्हर्जन सादर केलं. अशोक रानडे यांनी पुलं दुसऱ्याचे गाणं कसं ऐकायचे, श्रोता म्हणून ते कसे होते याबददल सांगितलं. पुलंच्या लिखाणाच्या मध्ये बसून ३०-४० लोकांसमोर ते कार्यक्रम झाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळॆ कार्यक्रम संपले तेव्हा पुन्हा एकदा मी सगळं लिखाण पाहत पाहत हॉल मधून फिरत होतो. एका डायरीच्या पानावर 'म्हैस' होती आणि त्या काउंटरची काच खालच्या बाजूने फुटलेली होती. हळूच थोडा हात आत घालून त्या पानांवर बोटं टेकवली आणि स्वतःच्या वेडेपणावर हसलो.

बाहेर यायला लागलो तर एका मुलानं हाक मारली.

हॅलो, एक नवीन न्यूज चॅनेल येतोय 'IBN लोकमत' नावाचा, त्यासाठी आम्ही बाइट्स घेतोय.
मी म्हटले "अहो पण मी काय बोलू?" आणि बाकी बरेच मोठे लोक आहेत त्यांचे घ्या बाइट्स.
(आमच्या पलीकडे अभिनेत्री इला भाटे होत्या त्यांच्याकडे मी हात केला.)
नाही ते आम्ही घेऊच पण आम्हाला यंग ऑडियन्स हवाय, (आणि त्या हॉल मध्ये सु किंवा दुर्दैवाने मी एकटाच यंग होतो )

"तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगू शकता का? तुम्हाला जे वाटतं ते बोला."

माझा जसा न्यूज बाईट देण्याचा पहिलाच अनुभव होता तसा त्या दोघांचंही असावा.
कारण इकडून लाईट येत नाहीये तिकडे उभे राहू, तुम्हाला ही बॅकग्राऊंड हवी असेल तर मी इथे उभा राहतो वगैरे एकमेकांच्या साहाय्याने तो बाईट दिला.

"लहानपणी पुण्यातच मी पहिल्यांदा म्हैस ची कॅसेट ऐकली तेव्हा काही समजलं काही नाही पण पुढे मात्र जितके मिळत गेलं तितके वाचत ऐकत गेलो, पुण्यात शिकायला आलो तेव्हा मालती माधव समोरून बरेचदा चालत गेलो पण आत जायची हिम्मत झाली नाही. ज्या दिवशी पुल गेले त्यादिवशी मेस मध्ये जाऊन मी नुसताच टीव्ही पाहत बसलो होतो. तेव्हाही प्रत्यक्ष जायला नको वाटलं होतं. पण आज ही अशी भेट झाली वगैरे वगैरे..."

आजही कोणाला हे लिखाण पाहायचे असेल तर एशियाटिक सोसायटीशी संपर्क करून पाहू शकता.
कदाचित अधिक माहिती त्यांच्या वेब साईट वर मिळेल.

८ नोव्हेंबर २०१६
हर्षद गोडबोले

Wednesday, October 26, 2016

वन डॉटर शो - अर्थात एकपुत्री नाटक (नसती उठाठेव)

श्री. दामोदर सहस्रबुद्धे ह्यांनी पुलंचे अफलातून नाटक टाईप करुन पु.ल. प्रेम ब्लॉगसाठी पाठवले. त्यांचे शतश: आभार. !


पु. ल. देशपांडे यांच्या नस्ती उठाठेव पुस्तकातून -

वन डॉटर शो - अर्थात एकपुत्री नाटक.
(संपूर्ण पुरुष पात्र विलागीत आवाज नाट्य )
निवेदक: 
प्रस्तुत नाट्यातील प्रमुख पात्र बेबी हे आहे. हे पात्र हळूहळू एखाद्या नदीच्या  पात्रासारखे वाढत जाते, हे कळेलच. दुसरे पात्र म्हणजे बेबी ची आई - तथा 'ममी'. ह्या 'आवाज नाट्यात' हे सर्वात जास्त आवाज करणारे पात्र आहे. ह्या नाटकातील अत्यंत गौण पात्र म्हणजे बेबीचा बाप उर्फ ड्याडी. हे पात्र सदैव आतल्या आवाजात बोलते.
ह्याखेरीज नाटकात अनेक पात्रे येतात व बहुदा हाय खाऊनच जातात.

खोताच्या वाडीत जर न चुकता हिंडू शकलात, डॉक्टर फान्सेस्का यांच्या म्याटरनिटी होम मधल्या एका स्पेशल रूममध्ये ममी मच्छरदाणीच्या पडद्या आड झोपल्या आहेत. - गाढ झोपल्या आहेत. ममीच्या  व्यक्तिरेखेचा (त्यांना प्रत्यक्ष पाहिलेली मानसं व्याक्तीपट्टा म्हणतील)  फक्त स्थूल मानानेच अभ्यास करता येईल. हल्ली नाटकात काम करणारी मानसं अभ्यास करतात. पूर्वी अभ्यास न करणारी नाटकात पळून जात. काळ बदलला.

[घड्याळाचे ठोके, घड्याळाच्या काट्याने जागा बदलली, तशी ममी ने कुशी बदलली.]
पाळण्यात बेबी रडत होती.
बेबी: ट्यंआहां ..ट्यंआहां 
निवेदक: बेबीच्या वन डॉटर शो ला इथून प्रारंभ झाला. ती एकटी रडत होती. दुसऱ्या कोणाची मदत न घेता. ममी गाढ झोपली होती. - आणि इथे तिचे ड्याडी बेबीला उगी करावे कि म्मो ला जागी करावे या विचारात फेऱ्या घालीत होते. ड्याडी आणि ममी यांचे भौगोलिक प्रमाण लोटयास घागर असल्याने  फान्सेस्का डॉक्टर च्या सूतिकागृहात ह्या क्षणी अत्यंत गर्भगळीत अवस्थेत जर कुणी असतील तर तिचे ड्याडी. त्यांना काय करावे ते सुचत नाही.  हेम्लेट चे नव्हते का झाले - कि त्याची काकू कि जी त्याची आई - तसेच ड्याडी चे आहे. ते बेबीचे ड्याडी, पण ममी चे गडी ! - मनुष्य अस्वस्थ असला कि तो फेऱ्या घालतो. फेऱ्या घालता घालता ते थांबले आणि हेम्लेट सारखे मनात म्हणू लागले -

ड्याडी: एकच प्रश्न !
उगी करू कि जागी करू?
आणि समजा जर हिला -
म्हणजे
मच्छरदाणीत सांडलेल्या 
बेबीच्या ममीला 
माझ्या लाग्नजात वैरीणीला 
केले जागे 
आणि ती जर भरली रागे 
पाळण्यातल्या नवजात बेबिदेखत 
आपल्या सुपुत्रीचा 
एकापुत्री खेळ थांबवाल्याबद्दल 
मध्येच -
तर??
आणि तशात यावी ती दाई 
ती परीसारखी शुभ्रवसना परिचारिका -
जिच्याकडे सहज गेला होता माझा डोळा 
ममीचा डोळा लागला आहे 
अशा गैरसमजानी  
अगे अगे दाई 
केवढी हि घाई 
केली होतीस येण्याची 
बेबीची आई निद्रेच्या घोर अरण्यात 
शिरण्यापूर्वी 
हे बरे नाही -
मनातल्या मनात रडलो होतो.
दाई दाई ...

बेबी: ट्यंआहां ..ट्यंआहां 

ड्याडी: ह्या कार्टीने -
आई ग 
जीभ चावली माझी मीच -
दाताना सवय झाली आहे 
जीभ चावण्याची 
भलतसलत तोंडातून जाण्यापूर्वीच -
त्या वाग्दत्त वधूच्या -
हो -- तिने मला वाक् खेरीच 
काहीच दिले नव्हते -
तिचे तोंड बंद करण्याचे 
सर्व नाजूक प्रयत्न 
विफल झाले होते -
ओठाबाहेराचे ते पहारेकरी दात ......
जाऊ दे -
तर सांगत होतो काय 
तुझ्या ममीच्या डरकाळ्यांची 
झाली होती इतकी सवय 
कानांच्या कमावलेल्या पडद्यांना -
कि गर्जत असताना 
चहू बाजूनी सावधान, सावधान -
त्या गर्जना, ते  ताशे, तो ब्यांड 
इतरेजनांचा कलकलाट 
सारा गोंगाट वाटला
जरासा डास  कानाशी गुजागुजाल्यासारखा 
मग दूर झाला अंतरपाट -
समोर उभी होती 
जी आता तिथे आडवी पडली आहे 
तुझी ममी -
वाजत होती अवती भवती रणवाद्ये 
आणि ती वरमाला ...
ह्या ममीच्या वळणावर गेलेल्या सुपुत्रीने तर 
डोक्यावर घेतली ही  खोली 
ट्यंआहां ..ट्यंआहां करून -

परमेश्वरा !!!
ही देखील जाणार की काय
तिच्या आईच्याच आडवळणावर ?
अर्थात शंकाच कशाला ?
जाड वळणावर? आणि -
गा गा गाणार की काय ?
ना ना नाचणार की काय?
बो बो बोलणार की काय ?
छ छ छळणार की  काय ?
माझ्या भावी जावयाला ?
कुठे बर वाढत असेल तो जीव ?
माझ्याच कुंडलीची कापी काढून जन्मास आलेला !!!

बेबी: (पट्टी वाढवून ) ट्यंआहां ..ट्यंआहां ट्यंआहां ..ट्यंआहां 

ड्याडी: परमेश्वरा - ह्या वयात आवाजाची ही तयारी ?

[करूण वाद्यसंगीत..]
आठवतो तो दिवस 
ज्या दिवशी गाफिलपणाने मला कोंडीत गाठून 
मच्छरदाणीच्या आत पसरलेली ही  गासडी 
शिकवणी हून 
महिना ५ रुपयात माझ्या लग्नपूर्व शिष्याला -
आणि लग्नोत्तर धाकट्या मेव्हण्याला -
गणित, संस्कृत आणि भूगोल पढवून 
रात्री ९ वाजता 
परतता परतता 
जिन्यात अडवून म्हणाली होती -
भेंडे मास्तर माझ प्रेम जडलय तुमच्यावर -

बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..

ड्याडी: होय बाळे होय ! [पाळणा हलवीत गाऊ लागतात]
रात्रीच्या वेळी ।
जी बसली । कायमची दातखिळी ।
मनी तेव्हा बाणे ।
जे गाणे । स्फोटक भेसुरावाणे ।
गाणे भेदक ते ।
भणभणते । तुझिया नरड्याभवते ।
घणघणले आधी ।
संवादी । तुझीया जन्माआधी ।
बाले ते बोल ।
नच बोल । सर्वांगी खोल ।
रुतले झणझणले ।
टणटणले  । विना ऐकता घुसले ।
कानाच्या पाळ्या ।
तै झाल्या । तापुनी हिरव्या पिवळ्या । 

बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..

ड्याडी: (पाळण्याची दोरी चटका बसल्यासारखी सोडून )
हीच अवाजाची जात !
'भेंडे मास्तर माझ प्रेम जडलय तुमच्यावर -'
त्या जिन्यात या पूर्वी हे वाक्य 
ह्या आवाजात कुणी म्हणाले नसेल.
कुणीही कुणालाही 
आणि असलेच म्हटले तर?
म्हटले असेल एखाद्या घुशीनी 
एखाद्या वाट चुकलेल्या झुरळाला -
उतरली असेल त्याची मिशी !
एका झटक्यात घुसाल्यासारखी 
गोळी डाम्बाराची !
जशी माझी उतरली कायमची -
त्या स्वप्नातील स्वरांच्या वेगाने 
आणि धसक्याने 
घरंगळला तो जीवघेणा  'हो !'
त्यानंतर वाजले ताशे लग्नाचे -
कड कड कड कड
तडम तडम तडतडतड
वाजवला एक पिटली ब्यांड 
कंत्राटी मनापमानामधल्या 
धेइर्यधरासारख्या दिसणाऱ्या 
चाळीस एक ब्यांड वाल्यांनी -
पण पाळण्यातले बाळे,
तोपर्यंत ममीपदास न पोहोचलेल्या 
तिला वरमाला  का म्हणतात ,
ते तेव्हा कळल मला -
तुझी ममी इतकी उंच आणि धिप्पाड -
इतक्या वर हात उंचावून 
तिच्या गर्दानी मध्ये टांगावी लागली होती ती वरमाला -
कि मंगलाष्टके म्हणणारा भटजी 
(हिंगाष्टक खाउन ढेकरा दिल्यासारखा ओरडणारा )
त्याने चटकन देवकाचा चौरंग हळूच सरकवला पायाखाली 
तेव्हाच गेली ती वरमाला वधूच्या गळ्यात
आणि माझा मात्र गुंतला गळा कायमचा -

बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..
ड्याडी: थांक्यु -
कळली का तुला तुझ्या पित्याची व्यथा ?
बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..
ड्याडी: (मनाचा धडा करून पालीच्या तावडीमध्ये सापडलेला किटाणू ज्या पट्टी मध्ये बोलू शकेल त्या आवाजात ) बेबी रडत्येय 
ममी: (मच्छरदाणीचा पडदा हलवून  )
तेच ऐइकत पडलीय मी.!
सगळ्या हस्पिटलातून या हिंडून -
आणि माज्या बेबी इतक सुंदर कोणी 
रडताय का ते या पाहून !
एइकलि आहेत मी रडणी 
काल रात्री तर नर्स कौतुकानं सांगत होती
सबंध रात्र सबंध होस्पिटलात 
फक्त एकटी बेबी रडत होती.
बाकीच्यांच्या बेब्या नुसत्या ऐकत होत्या 
माझी बेबी काय कोरस मध्ये गाणारी नाही !
बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..म्या भ्या 
ममी: इतकी व्हरायटी सापडते का कुणाच्या रडण्यात ?
बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..म्या भ्या 
ममी: ऐका जर नीट 
किती ओरिगिनल रडणं आहे माझ्या बेबीच 
दुसर् या कोणाचा ऐकून रडत नाही ती.
सगळ तिच स्वतः च आहे.
शेजारच्या खोलीतली पोरे देखील 
हीचे ऐकून हिच्या सारखी रडायला लागली आहेत 
मेली रडतील रडतील आणि पडतील गप्प
बेबी: ट्यंआहां ट्यंआहां ..म्या भ्या 

निवेदक: 
बेबीच्या वन डॉटर शो च्या पहिला प्रयोग ती जन्माला आली त्याच दिवसापासून सुरु झाला.
दिवसांवर दिवस चालले होते. बेबी चा पहिला वाढदिवस आला. तिच्यात आणि तिच्या ममीत स्थूलमानानेच फरक पडत होता. ड्याडी मात्र गरम पाण्याचा पिश्विनाडले पाणी हळूहळू ओतले म्हणजे जी अवस्था होते तसे दिसू लागले होते. वाढदिवस हा बेबी आणि ममीने त्यातल्या 'वाढ' ह्या शब्दाला धरून सार्थ केला होता. जमलेली मंडळी बेबीचा नवा वन  डॉटर शो पाहत होती. - करतील काय बिचारी.

ममी: अहो (पहिला वाढदिवस आहे हे विसरून) अश्शी बोलते  - डाले काय उडवते नाचते , गाते  - तरी अजून वर्ष पुरं झाला नाही तिला. 
ड्याडी: (चूक लक्षात आणून द्यायला खाकरतात) 
ममी: खोकला झालाय तुम्हाला. मफलर घट्ट बांधून घ्या गळ्याभोवती. 
ड्याडी: (मफलर घट्ट आवळून - आवळलेल्या आवाजात )
या गळयापट्ट्याचा गळफास करून घट्ट 
आवळून टाकू का गळा? ...माझा!
पहिल्या दिवशीच्या त्या ट्यंआहां पासून 
माझ्या सुपुत्रीचा सुरु झाला आहे 
एकपुत्री खेळ 
आणि सुमता वाजवतेच आहे 
ढोलके तोंडाचे - बडा बडा बडा बडा करीत -
गेले वर्ष -
हाय आठवतो आहे प्रत्येक दिवस 
जेवा आपटला पहिला पाय 
माझ्या या अद्वितीय कन्येने -
(अजून भावंड नाही तिच्या पाठी )
तेवा हि तिची माता 
झोपेतून उठून म्हणाली होती मला -
आहो उठा, घोरता काय?
(देवा काय हा घोर अन्याय !!!
मी कधी घोरतो का रे ?
तुलाच कान आहेत बाबा -)
(एक पूर्वस्मृती व्यक्त करणारे संगीत. - म्हणजे कोणत्याही तंतू वाद्या ची तुण तुण )
ममी: बघा बेबी करतेय भरतनाट्यम 
फक्त एका पायाने, पाळण्यातल्या पाळण्यात.
आता गोपुरांच्या देशात नुपूर बांधणाऱ्या 
सगळ्या ए तो झेड शिष्टर्स न म्हणव 
डान्सिंग सोडा अन टायपिंग शिका. 
कल कल बेबया कर तिल्लाणा 
ता थिंगा -तक थुंगा 
ता आआ थुंगा  
तक्क थुंगा  -
अहो डुलक्या घेऊ नका -
जर झांज वाजवा 
त्या यम यल यन  कुम्भकोणमं शिष्टर्सचा नवरा वाजवतो तशी -
ता थुंगा -तक तक  थुंगा 
अहो वाजवा झांज  - किती छान करतीय तिल्लाणा -
ड्याडी: (स्वगत) बेबीचा तिल्लाणा, ममी चा धिंगाणा 
ह्यात झांज वाजवायची तरी कोणाच्या तालावर ?
बेबी: ट्यंआहां
ममी: अय्यो बेबी बघा पदम म्हणतीय - म्हण म्हण बेबी 
यंटु पुट्टुंगा चन्नम 
यळ्ळाकु तळ्ळाकु सुब्र्हमण्या
रीगरी सारी सरिसा 

[घाबऱ्या घाबऱ्या शेजारी धावत येतात]   

पहिला: काय झाला हो?
दुसरा: डॉक्टर न बोलावू या का ?
ममी: यंटु पुट्टुंगा चन्नम 
यळ्ळाकु तळ्ळाकु सुब्र्हमण्या
ता धिक्का - ताक्का धिक्का 
गुडगुम, गुडगुम 
तिसरी: अशी वेळी हळकुंड जाळून धूर द्यावा म्हणतात.  लगेच भूत उतरतं.
चौथी: औसे पुनवेला वाढतं म्हणतात 
ममी: अहो वाजवा ना झांज -
तिकडे काय बघत आहात - ग्यालरीत?
अगं बाई या या या -
बेबी पहिलीत का
अजून सहा महिन्यांची झाली नाही 
तोच तिल्लाणा करतीय 
तुम्ही यायच्या आधी पदम म्हणत होती.
म्हणत बेबे 
ता पुंगा तिक्का पुंगा 
इडली पुंगा 
च्यवन येटीगोळी पवन चेट्टीयली 
आय्यान्गारू बिडू चन्न बसप्पा 
पाचवी शेजारीण: मद्राशी मुंजा होता म्हणतात त्या कढीलिंबाच्या झाडावर -
मधून मधून केळीच्या पानावर बसायचा म्हणे -
ममी: (तारस्वरात) पुंगरू टींगरु कुंभकोनम 
शेजारी: (एकसाथ) पळा पळा

ड्याडी: आठवतो प्रसंग आणखी एक -
लिहित होतो चटई वर बसून ,
बाबांना पत्र.
बिचारे तीर्थरूप,
कोकणात करतात भिक्षूकी 
आणि उरल्या वेळा हरी हरी 
तशी त्यांना माझी माया आहे 
पण ह्या महामायेचा 
अवतार एकदाच पाहून 
विजयदुर्ग लाइनिचि बोट गाठून 
देवळात बसले जेठा मारून 
उर्ध्वयै दिशे ब्रह्मणे नमः म्हणत !
आणि मी?
इथे त्या माझ्या स्वमिनीच्या 
अधरयै दिशे पाहण्याची हिम्मत न झालेला -
पती कि पतित? 
एकच होते समाधान 
बाबांना पत्र लिहून 
मनाची व्यथा उघडी करण्याचे 
पण तेवढ्यात या सुकन्येने 
उपडी केली दौत
 सांडली शाई 
तीर्थरूप चरणी वाहिलेल्या 
शिरसाष्टांग नमस्कारावर 
वाहिली निळी काळी शाई 
उगारीत होतो हात, ,तेवढ्यात 
तिची ममी कार्डावर सांडलेली शी पाहत म्हणाली 
अय्या वंडरफुल !
आपली बेबी होणार मॉडर्न आर्टीस्ट !
पाठवूया बेबीचं  हे पहिलं चित्र ,
वय महिने सहा च्या गटात 
जगातली पहिली इन्फटार्टीस म्हणून 
व्यंकट्स विकली ला 
आणि हर हर !!
त्या व्यंकटाने बेबीला दिले पहिले बक्षीस 
ते व्यंकटाची खळी सांडो ....
[एकदम लहान मुले पाळण्यात झोपेत अंग काढतात तसे दचकून ]
बाप रे ! झाला - पुन्हा सुरु झाला -
हिचा आडदांड तोंडपट्टा !
ममी: अहो एकदा सांगितला कि पाठ !
बेबुल्या ती , लाजाची गोट्ट थांग 
एक शेजारीण: (व्याकूळ होऊन) 
हिच्या एवढी जेव्हा होती 
माझी बेबी अशीच छोटी 
सांगत होती अशाच गोष्टी 
नुकती झाली बी ए बी टी 
ममी: (उसळून) असेल सांगत हिचेच ऐकून -
बेबी तुमची अशाच गोष्टी -
गोट्ट थांग - लाजाची 
एक होता ?
बेबी: क्यां 
ममी: क्यां म्हणजे राजा बरका!
हं पुन्हा सांग, एक होता ?
बेबी: च्यां !
ममी: च्यां म्हणजे देखील राजाच बरका!
हं, आणि एक होती  ?
बेबी: क्यां 
ममी: इथे क्यां म्हणजे राणी बरका, मग काय झालं ?
बेबी: क्यां 
[समोरच्या शेजारणीचे चेहरे सरबत समजून लाल रंगाचे रिकामे ग्लास पीत बसावे असे होतात.]
ममी: बलोबल ! म्हणजे शिकारीला गेली दोघजणं बरका ! मग तिथे आला 
बेबी: [फुर् कन लाळ  उडवते ]
[प्रेक्षक 'लाळ म्हणजे काय?' हा प्रश्न चेहऱ्यावर घेऊन ममी कडे पाहतात]
ममी: हं  तिकडून आला वाघ ! बरोबर मग राजाने काय केले ?
बेबी: क्यां -
ममी: बलोबल , शिकार! आणि गोष्ट आमची ?
[प्रेक्षकांच्या ओठावर भिकार असे येते. तेवढ्यात ड्याडीनी  आतून कॉफी चा ट्रे भरून आणल्यामुळे स्वताला आवरतात]
बेबी: च्यां !
ममी: शाबास ! गोष्ट आमची झकास !
[प्रेक्षक 'शिकार' शी 'झकास' चा यमक पुन्हा जुळवून बघतात. जुळत नाही. तरीदेखील गोष्ट संपली म्हणून टाळ्या वाजवतात ]

ड्याडी: (मनात) हे स्वर्गस्थ देवतानो,
का दिली बुद्धी यांनी तल्या वाजवण्याची ?
मी तर बोलून चालून नवरा!
बोलून चालून कसला?  न बोलून नवरा !
रोज मुक्याने ताटातले आंबोण 
ताटाखालच्या मांजरासारखा 
घशाखाली उतरवणारा -
घरजावई !
पण ह्या पाहुण्यात नाही का एखादा समर्थ 
कि जो हिला समजावून देईल,
नव्या मुर्खांची लक्षणे -
आल्या गेल्या पाहुण्यांना कवडी मोल ठरवून 
त्यांच्या पुढे सदैव आपले एकपुत्री खेळ दाखवणारी 
नाच रे मोरा नि गोरीगोरी पान 
बा बा ब्ल्याक शिप नि ज्याक and जिल 
लहान माझी भावली 
आणि नवकवींची नाकी नाव आणणारी पोरगीते -
कि जी पोरानाही वाटतात पोरकट !!
ती ऐकून टाळ्या देता ?
कि ज्यांना पोरेही नाही लावत तोंड !
बोगा आता आपल्या कर्माची फळं !
ममी: आता गानं म्हणायचं हं बेबी -
प्रेक्षक: (एकसाथ )चला निघूया 
चालला उशीर झाला 
मग बस करते उभी तासान तास 
ममी: अहो बस कशाला ?
बसा ! हे सोडतील गाडीतन 
- अहो - ऐकला का ?
ड्याडी:  (मनात ) का हे वाक्य बोलून पुन्हा पुन्हा विटम्बना करतेस त्या वाक्याची ?
अहो - ऐकला का ?हो - ऐकला का ?
ऐकण्याशिवाय काय केलय मी?
गेल्या इतक्या वर्षात 
एकदा तरी ऐकण्या ऐवजी 
ऐकवण्याचा यत्न केलेले आठवतंय का तुला?
 ऐकला का ? ऐकला का ?
हो. ऐकल?
ऐकत आलोय आणि किती ऐकायचा राहिलंय ते तोच जाणे !
ममी: ऐकला का ? 
बेबी म्हनातीय गाणं कानडी 
तोवर तुम्ही काढा गाडी 
पाव्हाण्याना सोडायला ग्यारेज मधून 
ड्याडी:  (मनात ) वा  पाव्हाण्याना सोडा
मेव्हण्याना मरीन ड्राइव वर फिरवून आणा 
सासुबाईना महलक्ष्मि ला नेउन आणा 
सासऱ्याना हिंडवा 
हर हर !! चांडाळणी 
लग्नात मला वरलस ते वर म्हणून कि ड्रायवर म्हणून ?
ममी: अहो बघताय काय ? आणि दात कशाला चावताय?
ड्याडी: अरे बाप रे. मनातली शिवी कानात गेली काय हिच्या  ?
- (प्रकट ), हो काढतो गाडी 
ममी: पुसून घ्या आधी -
हं बेब्या म्हण गाणं 
नि तुमची सिनेमातली हाही कहो म्हणत 
'भूषण सौसारा ...

निवेदक: 
ह्या प्रसंगाला ३ -४ वर्षे झाली. यापुढील प्रसंगात बेबी हाजीर नसूनही वजीर आहे. हा प्रसंग मम्मीच रंगवतात. ह्यांच्या हाती 'पणती', 'दिवली', 'बलखजूर', 'अनसूया', 'भागीरथी' वगैरे स्त्रिया व मुले या समबुद्धीच्या  वाचकां साठी निघणारी मासिके आहेत. समोर त्यांच्या जाळ्यात फसलेली एक म(व)शी आहे.
ममी: ऐका हं, जस्स बेबी बोल्ली  तस्स लिहिलय 
आणि माझ्या बेबी चे चिमखडे बोल 
आपल्या बेबीचे म्हणून अनसूया मासिकात दुसर्याच बाईने गेल्या वर्षी छापले 
चोरट्या मेल्या !!
ऐका हं आमच्या बेबीचा ओरिजिनल बोल -
एकदा आमच्या घरी कारंजा केल्या होत्या. आमची चिमखडी बेबी (वय वर्षे पावणे चार) सैपाकीण बाई  ना करंज्या तळताना पाहून म्हणाली -
'अय्या काळ्या काळ्या होड्या'
करंज्या करपल्या होत्या. त्या दिवशी आम्ही सैपाकीण बाईना कामावरून काढून टाकले. 
त्यामुळे सर्वांची हसून हसून मुरकुंडी वळली. त्यांना बेबीचे चिमखडे बोल सांगितल्यावर कोट टोपी जागेवर ठेवून, लांड्रीतून आणलेली माझी पतातले आणि बेबीचे फ्राक कपाटात ठेवून ते देखील मुरकुंडी वळवीत हसले व म्हणाले 'सैपाकणीला काढलस ते बरं केलस'. अशी आहे आमची बेबी उर्फ कामिनी उर्फ द्रौपदी. द्रौपदी हे तिच्या पणजीच नाव  ठेवलं आहे! कित्ती चं आहे नाही भगिनींनो तिचा चिमखडा बोल? आवडला का तुम्हाला? 
मावशी: मग हल्ली स्वयंपाक कोण करतं ?
ममी: हल्ली हे रजेवर आहेत म्हैनाभर !!

आता दुसरा बोल आइका.
एकदा बेबीचे ड्याडी मोरीत धोतर धूत होते. आमची बेबी तिथे लुटूलुटू गेली आणि ड्याडीला म्हणाली :
'ए ड्याडी, ए ड्याडी,
तू ड्याडी, कि गडी?'
मग आम्ही पोट धरधरून हसलो. धोतर वळत घातल्यावर बेबीचे ड्याडीपण पोट धरधरून हसले.
ड्याडी: (कोचामागे पडल्या पडल्या) मी आणि पोट धरून ?
धरायला पोट आहे का मला? 
खपाटीला गेलेला पोट धरता आलं असतं तर काय पाहिजे होतं ?

निवेदक: वर्षामागून वर्ष गेली आणि बेबी सहा वर्षांची झाली, शेजार्यांवर दुसर्याच्या मुलांच्या वाढदिवसाचा भीषण प्रसंग गुदरला ! 
ड्याडी  दिवसेंदिवस जुन्या टूथब्रश सारखे झाडत होते आणि ममी प्रत्येक दिवस वाढदिवस असल्यासारखी वाढत होती. शरीर चारही दिशांनी उसवत होते. 
वाढदिवासात सापडलेले पाहून हवालदिल होऊन बेबीच्या नव्या 'वन डॉटर शो' ला मन देण्यासाठी सिद्ध झाले होते.
ममी: वास्तविक शाळेच्या ग्यादरिंग मध्ये करून दाखवणार होती बेबी हे नाटक, पण तिच्या त्या मास्तरांनी ने दुसर्याच मुलीला घेतले ! मी त्यांना लगेच पाठवलं शाळेत आणि बेबीचं नाव काढलं. रेडिओ वाले देखील असाच करतात.आम्ही आता हिला सिलोन रेडिओत घालणार आहोत. बनाक्का गीत्मालेत. हं करून दाखव बेबी झाशीची राणी - हं  म्हणा -
बेबी: झाशीची राणी -
ममी: हं.. झाशीची राणी म्हणताना अंगविक्षेप कसे करायचे ? झाशीची राणी शूर होती - मुठी वळवून हात वर. ती घोड्यावर बसून दौड करीत असे. [ममी जगाच्या जागी ढुप्प ढुप्प उड्या मारते]
खालच्या मजल्यावरून आवाज: धावा धावा, धरण फुटले.!!
ममी: हं..म्हणा -
बेबी: करीत असे. (उड्या मारते)
ममी: तिच्या पुढे गोडार्ड साहेब उभा राहिला - हं..म्हण-
बेबी: पण ड्याडी कुठे पुढे उभे राहिले?
ममी: अहो राहा कि उभे. अशी यंट्री विसरता कशी ?
त्याशिवाय बेबी 
मै मेरी झाशी तुमको नाही देऊंगा 
मरेंग तरी नाही देन्गा - कसा म्हणणार ?
बेबी: अलकाचे ड्याडी तिच्या डान्सला गळ्यात धोलकं बांधतात 
ममी: ऐका ! नाहीतर तुम्ही ! मेली हौसच नाही. 
बेबी: ममी आपण अल्काचे ड्याडी आपल्या घरी ठेवूयात. ह्या ड्याडीला काढून टाक. रामाला काढला तसा. 
ममी: शानी माझी बेबी. काढूया हं -
[ड्याडी मुकाट्याने खांद्यावर बंदुकीसारखी छत्री धरून गोडार्ड साहेब उभे राहतात व मनात म्हणतात -]
ड्याडी: जग ही रंगभूमी आहे !
म्हणून गेला आहे तो शेक्सपीयर नावाचा शहाणा इंग्रज 
पण वेड्या विल्यमा ठाऊक होता का तुला 
एकाच माणसाला करायला लागणारी सोंगं ?
फुटक्या नाटक कंपनीच्या आचाऱ्याला  व्हावं लागत होतं 
खुदबक्ष, चौथा मनुष्य आणि पडद्याची शिटी वाजवणारा !
मी बाप? कसला बाप? 
नावाचा ड्याडी एरवी घरगडी 
ड्रायवर आणि धोबी 
आणि कुटुंबाचा आचारी 
घरजावयाची लाचारी  
पत्करून तुकडे गीळणारा 
सासऱ्याचा  हुजरा, सासूचा शोफर 
मेव्हणीच्या नाटकाची तिकिटे विकत हिंडणारा फेरीवाला -
आणि आता या अडीच फुटी झाशीच्या राणी पुढे 
आणि तिच्या अडीचशे घनफूट ममी पुढे -
बेबीच्या आगगाडीच्या गाण्यातला गार्ड 
आणि नाटकातला गोडार्ड होऊन -
बेबी: ममी, ड्याडी खांद्यावर बंदूक नित नाय धरत.
ममी: अहो, लक्ष कुठे तुमचं?
खांद्यावर धरा छत्री 
आणि नजर का भित्री? 
छाती काढा ताठ !
ड्याडी: (मनात) माझी छाती ताठ? तुझ्यापुढे ?
खाटकापुढे बकऱ्याची ?
हे म्हणजे सशाने सिंव्हीणीला डोळा मारण्या इतके बिकट !
अथवा उंदराने मांजरीची जीवघेणी नखे 
क्युटेक्सने रंगवण्याचे स्वप्न पाहण्यैतके असंभव !
किंवा प्राथमिक शाळा मास्तर ने 
लोकल बोर्डाच्या प्रेसिडेंट पुढे शीळ घालण्या इतके अलौकिक !
छाती कसली काढू?
होती मलाही छाती, कोणे एके काळी.
जेव्हा थानाकावीत होतो हॉटेलातल्या पोऱ्याला इराण्याच्या देखील !
माझ्या ब्रह्मचारी खोलीच्या ग्यालरीतून -
चाय ठंडा क्योन लाया ?
दुसरा कप लवकर लाव बेवकूफ !

आणि आज गोडार्ड साहेबाचे ते नाटकी वाक्य -
टुम टुमारी झाशी सोडेगा ? -
सुटत नाही ओठातून 
एवढ्याशा झाशीच्या बाल राणी पुढे 
- आता उरलीय ती छाती जी फक्त धडधडते -
बाकीचे आवाज बंद झाले तरी तेवढा आवाज चालू आहे !
बेबी: म्हणा न ड्याडी 
टुम टुमारी झाशी...
ममी: बघा तिला सगळा नाटक पाठ.
अहो पुस्तकाच्या पुस्तक म्हणते घडाघड
आणि ह्यांना एक ओळ येत नाही 
ड्याडी: (मनात) काय म्हणू ? कसे म्हणू ? 
उद्या सुसरीच्या तोंडात गेलेल्या वासराला 
मारता मारता सांगशील म्हणायला इना मीना डिका 
बेबी: ममी ड्याडीनी  बघ बंदूक काखेत धरली -
ममी: आणा ती छत्री. मीच होते गोडार्ड -
ड्याडी: (मनात) सुटलो -
झाशीच्या राणी पुढे उभा राहिलेला 
तो खराखुरा गोडार्ड 
असता जर खरोखरी हिच्या मापाचा 
तर काय टाप होती 
राणीच्या घोड्याची एक खूर पुढे टाकण्याची -
ममी(गगन भेदी आवाजात ) 
टुम टुमारी झाशी देएंगा? 
बेबी: मै मेरी झाशी नय देएंगा-नय देएंगा-नय देएंगा
ममीपाहिलातं खऱ्या राणीत तरी एवढा फोर्स आहे का? 
आता बेबी ते इंग्लिश गाणं म्हण -
बेबी: मी नाय जा!
प्रेक्षक: राहू दे, दमली असेल ती (दाबल्या आवाजात) आणि आम्हीही !
बेबी: नाय - मी इंग्लिश नाय मद्राशी म्हणणार- आणि मग बंगाली -
ममीअहो सगळा टागोरनाथ पाठ आहे तिला. 
ड्याडी: गुरुदेव क्षमा करा !
यंदाच भरली म्हणतात तुमची शंभर वर्ष -
परवा भो वाणीत कुणीसं  पिळत होतं 
तुमचा बंगाली गाणं  कानडी करून. 
मेलेल्यांना मारू नये हे काळात नाही गुरुदेव लोकांना -
बेबी: मम्मी, ड्याडी बाग अजून गप्प! मी मद्राशी गण म्हणणार म्हटलं  तरी -
ड्याडी: अरेच्या विसरलो !
(मनात) हिच्या त्या तमिळ गाण्याला सादरा काढून बसायचं 
उघडा बंब- 
गुंडाळून लुंगी आणि उघड्या पोटी 
घेऊन घटम नावाचा मडकं !
बेबी: तिरुपती वेन्कटरमण पोंगळू  
ममीपेरीनायाकाम पाळयम कोइमतुरम माटुंगम -
[ड्याडी घटम वाजवतात आणि आणि ममी स्वताच्याच मांडीवर (सुदैवाने) उलाट्यासुलाट्या थापट्या मारून गातात - ममीच्या  थापट्या पुढे घटम ऐकू येत नाही. ]

निवेदक: 
वर्षावर वर्ष लोटली. पुन्हा आपण जेथून निघालो तेथेच आलो आहोत.  डॉक्टर फान्सेस्काचे म्याटरनिटी होम !
बेबी गेली ५-७ वर्षे २० वर्षाची आहे. मध्यंतरीच्या काळात तिचे संगीत, नाट्य, नृत्य, चित्रकला, ,भरतकाम, आगीतून चालणे, तोंडातून आग फेकणे, (इतरांवर) जळत राहणे, चीनी कुस्त्या, जपानी-कबुली-पठाणी नृत्य, बलुची  सुऱ्याचा नाच, मारवाडी नितंबनृत्य अशा अनेक विद्यात अफाट प्रगती केली आहे. मच्छरदाणीत डोकावल्यास ममीचाच भास होईल. पण ती बेबी आहे. आणि बेबीच्या बेबीचा आता पाळण्यात वन डॉटर शो सुरु आहे. 
[बेबीच्या बेबीचे ड्याडी अस्वस्थ फेऱ्या घालीत आहेत. ]
बेबीच्या बेबीचे ड्याडी: एकच प्रश्न ! उगी करू कि जागी करू?
बेबीची बेबी:ट्यंआहां ..ट्यंआहां 
निवेदक: आणि जगाच्या रंगभूमी वर आणखी एक वन डॉटर शो सुरु झाला.

पु.ल. 
नसती उठाठेव

Monday, September 19, 2016

पु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान - डॉ. शरद सालफळे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ पुल देशपांडे हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र सारस्वताला परमेश्‍वराने दिलेले वरदान आहे. पुल देशपांडे हे साहित्याच्या सर्वच क्षेत्रांत वावरलेत. विपुल लेखन केले. नाटके लिहिलीत. एकपात्री प्रयोग केलेत. चित्रपटांची निर्मिती केली. भावगीतांना व गाण्यांना सुंदर चाली लावल्यात. पुल सुंदर अभिनय करीत, सुरेल पेटी वाजवीत. या सार्‍या गुणांवरही ताण म्हणजे पुल एक उत्तम रसिक होते. चांगल्या गाण्याला, चांगल्या संगीताला, चांगल्या लिहिण्याला आणि चांगल्या बोलण्याला पुल मनमोकळी दाद देत. असल्या बहुशृत कलाकारास महाराष्ट्र कधी विसरूच शकणार नाही. सार्‍या महाराष्ट्राला आणि बृहन्महाराष्ट्राला पुल कायमचे स्मरणात रहातील, ते त्यांच्या विनोदबुद्धीमुळे. पुलंना विनोदाची निसर्गदत्त देणगी होती. पुल शाब्दिक कोट्या करीत, त्यावर सारा रसिकवर्ग खळाळून हसायचा.

पुलंचे समाजमनाचे व समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे कमालीचे सूक्ष्मतम निरीक्षण असायचे. त्यांना भेटलेल्या व्यक्तींचे, त्यांच्या स्वभावाचे, गुणदोषांचे निरीक्षण करायचे. त्याला विनोदाची मखर देऊन त्या व्यक्तीविषयीचे अभ्यासपूर्ण लेखन करायचे. त्यातूनच त्यांचे विनोदी लेखन झाले. पुलंचे लिखाण केवळ विनोदासाठी विनोद असे नसून, ते आपल्या लेखनातून समाजातील दोषांना उघडे करून दाखवीत. व्यक्तींचे स्वभाव त्यांच्या गुणदोषांसह वाचकांसमोर येत. त्यांच्या स्वभावाला पुल विनोदाचे पांघरूण घालीत, पण दोष मात्र उघडे पाडीत.

पुलंच्या लिखाणातून जीवनाचे सुंदर दर्शन होते. वाचताना आपल्या लक्षात येते की, या गोष्टी, या घटना प्रत्यही आपल्या सभोवती घडत असतात. आपल्या लक्षात कशा येत नाहीत? साधी ‘म्हैस’ घ्या. बसने झालेल्या अपघातात म्हैस जखमी होते. इतरांना वैताग येतो, पण पुलंना त्यात ‘सुबक ठेंगणी’ दिसते. इंप्रेशन मारणार्‍या हिरोची पुढे पुढे करण्याची वृत्ती दिसते. पंचनामा करणारा शिपाई दिसतो.

पुल आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण रसिकतेने जगले. छोट्या छोट्या व्यक्तींमध्ये त्यांना लिहिण्यासारखं सापडायचं. लेट झालेल्या गाडीने आपण वैतागतो. पुल तोच वेळ प्लॅटफॉर्मवरील विविध व्यक्ती, त्यांचे खाणेपिणे, इतरांवर खेकसून बोलणे इत्यादींचा अभ्यास करून त्याची नोंद करतात.

पानवाल्याच्या पानाबरोबरच पुलंना त्याच्या लादीचं आणि स्मरणशक्तीचं कौतुक आहे. रावसाहेबांची शिवराळ भाषा व त्यामागची कळकळ केवळ पुलंनाच कळली. नामू परिटाचा शर्ट हा आपलाच आहे, हे कळल्यावर संतापून न जाता नामूही त्यात जास्त खुलून दिसतो, असे सांगून पुल आपली खेळकर वृत्ती दाखवितात. पाळीव प्राण्यांपैकी एकालाही न दुखविता त्या प्राण्यांच्या मालकाची अशी खिल्ली उडविली आहे की, ते प्राणीही खुष व्हावेत.

आवाजाच्या दुनियेचा पुलंनी घेतलेला कानोसा मजेदारच आहे. दररोज दारावर वस्तीतून हिंडणारे विक्रेते यांचा पुलंचा अभ्यास कमालीचा आहे. शेंगावाला, भाजीवाला, कुल्फीवाला, कल्हईवाला या सर्वांच्या आवाजाचे पृथ:करण करून त्यांच्या पोटापाण्याला तेच आवाज कसे पोषक असतात, ते पुलंनी सप्रमाण दाखविले आहे.

प्राण्यांच्या ध्वनिविश्‍वातली व्यंजनं शोधण्याचे महाकठीण काम पुलंनी केलं आहे. पुलंना बहुधा तमाम प्राणिमात्रांची भाषा समजत असावी. कुत्र्यांच्या सभेतलं भाषण माणसांना समजावं, असं त्यांनी भाषांतरित केलेलं आहे.

स्वत:ला लेखक-कवी म्हणविणार्‍या तथाकथित साहित्यिकांची पुलंनी मस्त खिल्ली उडविली आहे. या सार्‍यांचीच नोंद मराठी वाङ्‌मयाच्या गाळीव इतिहासात आली आहे. चोरलेल्या कवितांचे व लेखांचे साहित्यिकाच्या परिचयासह या इतिहासात उल्लेख आहेत.

पुलंच्या विनोदास कधी चावटपणा चाटून जातो, तर कधी ते वाचकांना वात्रट वाटतात. प्रसंगी त्या विनोदास कारुण्याची किनार असते. समाजातील विषमता, विसंगती त्यांच्या लेखनातून डोकावते. उपरोधाने लिहिलेले मान्यवरांवरील लेख त्यांना त्यांना कळले तर पुल त्यांना मानधन द्यायला तयार असायचे. गरिबीची आणि गरिबाची पुलंनी कधी खिल्ली उडविली नाही, पण अंधश्रद्धा आणि ढोंगीपणावर त्यांनी विनोदाचे आसूड उगारले. उगाच मोठेपणा मिरविणार्‍या उच्चभ्रू समाजातल्या बायांना आणि श्रीमंतीची ऐट दाखविणार्‍या स्त्रियांना त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीने बोचकारले आहे. ज्ञानेश्‍वरीचा उपयोग ती डोक्यावर घेऊन सरळ चालण्याच्या व्यायामप्रकारात मोडतो म्हणणार्‍या बाया किंवा अध्यात्मावरील भाषणे हे फॅशन शोचे एक माध्यम मानणार्‍या बाया पुलंना भेटल्या. ‘तुझे आहे तुजपाशी’ मधल्या अतिविशाल महिलांचं मंडळ आचार्यांना असल्याच संदर्भात भेटायला येतं. आचार्यांचा क्रोध आणि विशाल महिलांचे निर्विकार पण व्यवहारी बोलणे यांचा संवाद रंजक वाटतो.

पुलंचे विडंबनकाव्य अत्र्यांच्या ‘झेंडूची फुले’ वर मात करते. मनाच्या श्‍लोकांची पुलंनी केलेली मनमानी मौजेची आहे. मुंबईकर जेव्हा ट्राम व बसने जायचे त्यावेळी बटाट्याच्या चाळीतले द्वारकानाथ गुप्ते म्हणतात, ‘मना सज्जना ट्राम पंथेची जावे

| तरी वाचतो एक आणा स्वभावे॥ बशीला कशाला उगा दोन आणे| उशिरा सदाचे हफीसांत जाणे॥ पुलंच्या कविताही मिस्कील. त्यात अगम्य दुर्बोध असे काहीच नसे. वाचताना खुदकन हसू यावे अशा वात्रटिका त्यांनी लिहिल्यात. ‘हसविण्याचा माझा धंदा’ मध्ये ते लिहितात-‘गाळणे घेऊन गाळतो घाम चाळणे घेऊन चालतो दाम. चालीबाहेर दुकान माझे | विकतो तेथे हसणे ताजे| खुदकन् हसूचे पैसे आठ | खो खो खो चे पैसे साठ| हसविण्याचा करतो धंदा| कुणी निंदा कुणी वंदा॥

पुलंच्या विनोदावर खळाळून हसणारा मराठी वाचक श्रोता किंवा प्रेक्षक हा बहुशृत असला की, त्याला त्यांच्या विनोदाचे मर्म कळायचे. संदर्भ माहीत असलेत की विनोदाची खुमारी वाढते. दुसर्‍या बाजीरावाबद्दल गाळीव इतिहासात पुल लिहितात, दुसरे बाजीराव हे दानशूर होते. कुठल्याही कलावंतास ते १०० रुपये देत त्यावरून त्यांना दोन शून्य बाजीराव म्हणत. एक शून्य बाजीराव हे त्या काळात गाजलेले नाटक. त्याचा संदर्भ घेऊन ही शाब्दिक कोटी पुलंनी केली.

पुल हे दानशूर लक्षाधीश होते, पण शाब्दिक कोट्यधीश होते. त्यांच्या कोट्या पराकोटीच्या असत. मर्ढेकरांचं काव्यवाचन करायला सुनीताबाई व पुल सातार्‍याला गेलेत. यजमानांनी खूप खाण्याचा आग्रह केला तेव्हा पुल म्हणाले, ‘अहो श्रोत्यांना मर्ढेकर ऐकवायचे आहेत ढेकर नव्हेत.’ जुन्या काळातल्या अभिनेत्री दुर्गाबाई खोटे यांचा संमेलनात परिचय करून देताना पुल म्हणाले, ‘याचे एक आडनाव सोडले तर बाकीचे यांचे सारे खरेच आहे.’ सौ. सुनीताबाई पुलंना सारखा औषधाचा व खाण्यापिण्याचा सल्ला देत तेव्हा पुल त्यांना जाहीरपणे ‘उपदेश पांडे’ म्हणायचे.

पुल देशपांडे यांच्या विनोदी लेखनाने मराठी साहित्यात विनोदाचा व हास्याचा प्रचंड धबधबा आणि दबदबाही निर्माण केला आहे. त्यातले केवळ तुषारही आपल्या अंगावर उडालेत तरी आनंद होतो. जे त्या धबधब्याखाली ओलचिंब होतात किंवा झाले ते धन्य होत.

सर्व प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे माणसाला हसता येते. पुलंनी याबद्दल ब्रह्मदेवाचे आभार मानले आहेत. पुलंनी माणसाला हसायला शिकविले यासाठीच पुलंनी एवढ्या लेखन प्रपंचाचा अट्टहास केला. आपल्या अवतीभवती एवढे सौंदर्य असते, आनंद देणारी निसर्गाची किमयागारे असतात, पण आपण इतके करंटे की आपणास त्यांची ओळख नसते. पुलंनी अवतीभवतीचा सारा आनंद माणसास दाखवून ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ हे खरे करून दाखविले. पुलंची विनोदबुद्धी शाब्दिक कोट्या करविते. प्रसंगोपात घडलेल्या विनोदाचं दर्शन घडविते. व्यक्तीमधल्या स्वभावविशेषाने घडणारे विनोदाचे साक्षात्कार दाखविते. अवतीभवतीच्या सार्‍या घटनांचे आपणही साक्षीदार असतो, पण त्यातल्या विसंगती नजरेला आणून देतात ते पुल. त्यातून आनंद घ्यायला शिकवितात ते पुल. ते म्हणतात, दुसर्‍याला हसू नका दुसर्‍याला सोबत घेऊन हसा. सर्वांनी एकत्रपणे हसण्यासाठीच विनोदाची निर्मिती असते.

पुलंचे विनोद निर्मळ असत. त्यात अश्‍लीलता नसायची. कधी त्याला सेन्सॉरची कात्री लावावी लागत नसे. शाळकरी मुलांनाही समजेल असे पुलंचे साधे लेखन असायचे. अशा मराठी जगतास सार्‍या चिंतांसह, सार्‍या अडचणींसह हसायला शिकविणारा हा पुरुषोत्तम मराठी सारस्वताचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलवतो, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

-- डॉ. शरद सालफळे
६/१२/२०१२
तरुण भारत

Friday, September 16, 2016

माझी आवडती व्यक्तिरेखा - ल़खू रिसबूड

पुलंचे लेखन वाचण्याच्या, आवडण्याच्या आणि उमजण्याच्या बर्‍याच पायर्‍या असतात असं मला कायम वाटतं. अगदी सुरुवातीला शालेय वयात पुलं म्हणजे नुसती धमाल, जागच्याजागी उड्या मारायला लावेल असा विनोद आणि शुद्ध, निखळ मनोरंजन यापेक्षा जास्त काही जाणवलं नव्हतं. पण हे जे काही होतं तेच इतकं भरुन आणि भारुन टाकणारं होतं की त्याची झिंग अजूनही थोडी आहेच. मित्रांशी वाद रंगलेला असतो आणि मधेच एकदम कोणीतरी म्हणतो; 'बाबारे तुझं जग निराळं आणि माझं निराळं', आणि कसलाही संदर्भ देण्याची गरज न लागता ठसका लागेपर्यंत हसू मात्र येते, हे पुलंचा हँगओव्हर न उतरल्याचेच लक्षण! मुळात असा संदर्भ झटक्यात समजणारा तो मित्र अशीही व्याख्या करायला हरकत नाही.

विनोदाच्या या धुंदीत शाळकरी वयात तरी व्यक्ती आणि वल्लीमधल्या काही व्यक्तिरेखा समजल्याच नव्हत्या. आपल्या आजूबाजूला वावरणारे 'दोन उस्ताद' दिसले नव्हते की जनार्दन नारो शिंगणापूरकरचे दु:खही टोचले नव्हते. आज हे लेखन किंवा अगदी नारायण, हरितात्यासारखे 'व्यवच्छेदक' पुलं पुन्हा वाचताना आधी न कळलेला एखादा नवाच पैलू दिसतो. पण त्या पुस्तकातील एक व्यक्तिरेखा मात्र मी तेंव्हा 'यात काय मजा नाही' म्हणून एका पानातच सोडली ती म्हणजे 'लखू रिसबूड'. आज मात्र पुलंनी रंगवलेल्या सगळ्या गोतावळ्यातील सर्वात अस्सल माणूस हाच आहे याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही. अगदी नंदा प्रधानपेक्षाही हा माणूस जास्त खरा आहे आणि म्हणूनच कदाचित त्याच्यापेक्षा जास्त करुणही.

लखू ही एक सार्वकालिक व्यक्ति आहे. तो आदिम, पुरातन आहे. लखू खरेतर एक व्यक्ती नाहीच ती एक प्रवृत्ती आहे, एक अ‍ॅटीट्यूड, एक सिस्टीम. जगातील सर्व शारिर सुखांची हाव असलेला माणूस. कशालाच सर्व शक्तीनिशी भिडायला घाबरणारा. सतत न्यूनगंडाने पछाडलेला आणि त्यावर मात करण्यासाठी भाडोत्री विचारांची फौज गोळा करणारा. त्याला काहीच पूर्ण कळतं नाही, आवडत नाही, पचत नाही. कुठल्याच विचारसरणीचा त्याच्यावर प्रभाव नाही. त्याला कसलाही सखोल अभ्यास नको आहे. स्वतंत्र, मूलभूत आणि निखळ विचार त्याला जमू शकतो पण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे कष्ट त्याला नको आहेत. प्रत्येक ग्रेटनेसवर थुंकण्याची त्याला आवड आहे. त्याचे भोगही लाचार, त्याचे वैराग्यही ढोंगी.

पुलंनी ही व्यक्तिरेखा कधी आणि कोणाच्या संदर्भाने लिहिली ते माहिती नाही पण 'मिडीऑकर' या शब्दालाच जिवंत रुप देणारा हा माणूस त्यांच्या इतर अनेक लेखनातूनही डोकावतो. ज्याला टागोर 'पटत नाही' असा सुरेश बोचके, 'गोदूची वाट' साऱखे प्रयोग, अगदी धोंडो भिकाजी जोशीही याचेच एक स्वरुप आहे. असा'मी' मधला मी म्हणजे पुलं स्वतःच अशी समजूत करुन घेतलेल्या त्यांच्या अनेक चाहत्यांनी खर्‍या पुलंच्या मनातली अशा प्रवृत्तींविषयीची आत्यंतिक चीड सोयिस्करपणे दुर्लक्षली, त्यात मी ही एक होतो.

याच भ्रमात आयुष्य गेलेही असते, काय सांगावे सुखाचेही झाले असते, पण सुदैवाने तसे झाले नाही. पदवीच्या दुसर्‍या वर्षाला असेन, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे मतं उगवण्याचा काळ होता. एका वेगळ्याच नशेत, जगात घडणार्‍या प्रत्येक घटनेवर, सिनेमा, साहित्य, संगीत, खेळ कशावरही बेफाम टिप्पणी करीत चाललो होतो. आधी बर्‍यापैकी असलेले वाचनही बंद पडत चाललेले किंवा उगाच चर्चेत नावं भिरकावण्यापुरते. अशावेळी पहिल्यांदा, ते एक राहिलेय जरा वाचायचे अशा तोर्‍यात 'लखू रिसबूड' वाचला आणि कोणीतरी सणसणीत थोबाडीत मारल्यासारखे झाले. पार हेलपाटूनच गेलो. माझे सगळे आयुष्यच त्या झटक्याने बदलले. मी कोणत्या दिशेने चाललो आहे आणि त्याचा परिणाम काय आहे हे स्पष्ट, स्वच्छ, लख्ख कळून आले. या रिअ‍ॅलिटी चेकसाठी मी पुलंचा कायम ऋणी असेन.पाच पैशाचेही काम न करता आलेला फुकटचा सिनिक आव गळून पडला. आपल्याला खरचं काय कळतं? काय समजतं? काय आवडतं? या आणि अशा अनेक प्रश्नांनी कठोर आत्मपरिक्षणाला सुरुवात झाली जे अजूनही चालू आहे. ही दिशाहीनतेची जाणिव झाली नसती तर आपली वाट शोधण्याचा प्रयत्नही झाला नसता.

आज आयुष्यात फार काही भरीव केले आहे किंवा फार काही ज्ञान झाले आहे असे म्हणण्याचा फालतूपणा करणार नाही पण निदान उथळपणाला बांध बसला हे खरेच. समोरच्यामधला भंपकपणा पटकन जाणवायला लागला पण एका पातळीपर्यंत तो सहन करण्याची वृत्तीही आली. सर्वात महत्त्वाचे त्त्वा, आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही हे मान्य करण्याचा प्रांजळपणा आणि असे केवळ मान्य करण्याने फार काही ग्रेट साध्य झालेले नसते ही अक्कल नक्कीच आली आहे.

दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट, शाम मनोहरांच्या 'कळ' मधला 'अंधारात बसलेला मठ्ठ काळा बैल' वाचत होतो. प्रचंड आवडले ते. आसपासची अशी अनेक माणसे आठवली. आपणही असेच पोकळ झालो असतो, पण पुलंनी वाचवलं हे मनात आलं आणि त्यांच्या लखू रिसबूडला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दिले.

- आगाऊ
मुळ स्रोत --> http://www.maayboli.com/node/41308

Thursday, September 15, 2016

प्रिय पु.ल.

प्रिय पु.ल,

बरेच दिवसापासून तुम्हाला एक आदरतिथ्य पत्र लिहावं म्हणत होतो. पण काय करणार ? आत्तापर्यंत जेवढी पत्र मी माझ्या प्रेयसी ला लिहिली नसतील तेवढी तुम्हाला लिहिली आहेत. भाई हे तुम्ही सुद्धा मान्य कराल.

तसं पाहता बरेच दिवस झाले आपला स्नेह आहे. दिवस काय वर्ष म्हणा हवं तर, आणि दिवसेंदिवस तो वाढतच चाललाय. पण भाई.. काहीही म्हणा, आपल्या नात्यामध्ये पण निराळीच मजा आहे.आपलं नातं हे स्वीकृत असल्यामुळे कदाचित ते आत्तापर्यंत टिकत आलंय.पण भाई रक्ताच्या नात्यापेक्षा स्वीकृत नातं केंव्हाही चांगलंच बरं का, असं एकदा तुम्हीच म्हणाला होता.

वास्तविक भाई, एक गोष्ट मला सतत खुणावत असते… ती म्हणजे दुर्दैवाने आपली भेट होऊ शकली नाही. पण कधी नं कधी ती कुठे तरी होईलच अशी आशा वाटते. असो, पण काहीही म्हणा, तुमच्याशी बोलताना निराळीच उर्जा मनामध्ये सामावलेली असते. त्या उर्जेच्या आधारावरच मी आत्तापर्यंतची सगळी पत्रं लिहिली आहेत.

अगदी प्रांजळपणे कबुल करतो, मी खरोखरच ऋणी आहे त्या क्षणाचा त्यामुळेच कदाचित आपली ‘नाती-गोती’ इतरांपेक्षा जरा वेगळी आहेत.
भाई पण एक मात्र नक्की… ! तुम्ही म्हणजे खरोखरच एक प्रकारचा खजिना आहात बघा. असा खजिना, जो कितीही लुटला तरी संपायला तयार होत नाही, जो इतरांना सतत काही नं काही पुरवण्यात व्यग्र असतो असा खजिना. माझं भाग्यच, मला तुमच्या सारख्या हिऱ्याची साथ लाभली.

भाई, तुम्हाला वाटत असेल कि आजकाल हा ‘गटण्या’ सारखाच लिहायला लागलाय.

पण मी हे मान्य करायला कदापि तयार नाहीये, कारण ‘गटण्या’ सारखं माझ अफाट वाचन नाहीये. जेवढं काही आहे… तेवढ केवळ तुमच्यामुळेच आहे. हां… पण साहित्याची रुची मला लावली ती तुम्हीच. तुमच्या मुळेच मला सारख्या दिग्गजांचा सहवास लाभला. या बद्दल तर मी तुमचा ऋणी आहेच.

आजकाल लोक आयुष्य खूप गांभीर्याने घेतात, पण जेंव्हा पासून माझी हरितात्या, रावसाहेब, बबडू यांच्या सारख्या मस्त मौलांची ओळख तुम्ही करून दिलीत… तेंव्हापासून आयुष्य सुद्धा एकदम मस्तमौला झालंय. त्याबद्दल आभार तर आहेतच पण त्यांची साथ आहे हे फार बरं आहे बघा…. !
त्यात एक खुपणारी गोष्ट म्हणजे, आजकाल लोकांना चांगल्या दर्जाचा विनोद सुद्धा कळत नाही. विनोदाची व्याख्याच मुळात बदलत चाललीये.
असो, पण कुठेतरी कसा का असेना विनोद टिकून आहे याचा आनंद देखील वाटतो.

तसं पाहता, हे आभार पत्र मी ८ नोव्हेंबर… म्हणजे आपल्या जन्मदिवसादिवशीच लिहिणार होतो. पण तितकीशी वाट बघायला मन तयार होईना. शेवटी काही झालं तरी भावना महत्वाच्या.

‘तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहू द्या’ तेवढाच आधार वाटतो हो भाई…!

तुमचाच लाडका,
अक्षय. .!

--अक्षय चिक्षे

Tuesday, September 13, 2016

मला भेटलेले पु.ल. - कौशल इनामदार

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांची नुकतीच (१२ जून रोजी) पुण्यतिथी झाली. २००० साली पुलंचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. त्याच्या काही काळ आधीच आजच्या काळातील प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांची पुलंशी झालेल्या भेटीची आठवण त्यांनी शेअर केली आहे...
मी २७ वर्षांचा होतो. ताजा फडफडीत संगीतकार! ईन मीन तीन कॅसेटी बाजारात आल्या होत्या. आणि एकाचं ध्वनिमुद्रण झालं होतं. लग्न एका महिन्यावर आलं होतं. 
एके दिवशी सकाळी सकाळी फोन आला. समोरचा माणूस म्हणाला- "मी पु.ल.देशपांडेंचा असिस्टंट बोलतोय. भाई आत्ता जांभूळपाड्याला आहेत आणि गेले दोन दिवस फक्त तुमचीच गाणी ऐकताएत. त्यांना तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. तुम्ही उद्या जांभूळपाड्याला याल का?"

मी काही या असल्या फोनला भुलणारा नव्हतो. आम्ही कॉलेजमधे असे अनेक फोन केले होते! माझी खात्री होती की आमचाच कोणी मित्र आवाज बदलून फोन करतोय. एक - पुलं आपली गाणी कुठून ऐकणार? आणि 'फक्त' आपली?? बरं बोलवलंय कुठे? तर जांभूळपाडा?!!!
मी म्हटलं आपणही खेळू हा खेळ!

"मला ऐकून आनंद झाला. पण माझं १५ दिवसात लग्न आहे तर तुम्ही पुलंना सांगाल का की मला वेळ नाही?"
माझं बोलणं ऐकून तो इसम म्हणाला - "अरेरे, नाही का वेळ? भाईंची खूप इच्छा होती हो तुम्हाला भेटायची!"
या वाक्याने तर माझी खात्रीच पटली की हे सगळं सोंग आहे!
दिवसभरात मी हा फोन विसरलो आणि माझ्या कामात गुंतलो.
दुपारी ४ वा. पुन्हा फोन वाजला. मी फोन उचलला तर पुन्हा तोच आवाज.
"एक मिनीट हं. भाई बोलताएत तुमच्याशी!"
समोरून "हॅलो" ऐकू आलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण पु.लं. देशपांडेंचा आवाज तर मी ओळखत होतो.

"मी तुमची गाणी ऐकली आणि आवडली ती मला. तुम्ही आला असता जांभूळपाड्याला तर आनंद झाला असता मला. तुमचं लग्नगाठ आहे आत्ता असंही कळलं! दोघे आलात तर आशीर्वादही देईन!"
इतकं ओशाळल्यासारखं मला आयुष्यात झालं नव्हतं!

दुसऱ्या दिवशी मी, सुचित्रा आणि आमचा मित्र परीक्षित असे तिघे जांभुळपाड्याच्या वृद्धाश्रमात पोहोचलो. पुलंची तब्येत बरी नव्हती आणि ते विश्रांतीसाठी तिथे आले होते. त्यांनीच दिलेल्या देणगीतून हा वृद्धाश्रम उभा राहिल्याचं मला माहित होतं.

त्यांच्या असिस्टंटने आम्हाला त्यांच्या खोलीत नेलं. खरोखर त्यांच्या उशाला माझ्याच कॅसेट्स होत्या. मला किती भरून आलं असेल याची कल्पना आली का तुम्हाला?

त्यानंतर तासभर पुलंनी माझं एक-एक गाणं माझ्यासोबत ऐकून त्या त्या गाण्यात त्यांना काय काय आवडलं ते तपशीलवार सांगितलं. त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय मार्मिक होत्या.
झाल्यावर त्यांनी खूप चौकशी केली. किती कार्यक्रम झाले? लोक येतात का? पैसे देतात का? कवितांना चाली द्याव्याशा का वाटलं? त्यांच्या प्रश्नांमध्ये आत्मीयता होती. त्यांच्या एका प्रश्नाला मी उत्साहाच्या भरात म्हटलं -
"मला काहीतरी वेगळं करायचं होतं"

त्यावर त्यांनी अलगद माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले-
"तुम्ही चांगलं करा. वेगळं आपोआप होईल."
**
मला एका क्षणात अख्ख्या आयुष्याकडे बघायची एक नवी दृष्टी मिळाली आणि ती पुलंनी दिली यात शंका नाही.
**
त्यांचं लिखाण चिरंतन असेल किंवा नसेल. पण एखादा नवा गीतकार होऊ पाहणारा मुलगा भेटायला येतो आणि त्याच्या दातांत मला छापखान्यातले खिळे दिसू लागतात. माझ्या कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळी अखंड काम करणाऱ्या मंदार गोगटेकडे पाहून 'नारायण' आठवतो. पार्ल्यात गेलं आणि श्रद्धानंद रोडची पाटी पाहिली की रस्त्यात महाराष्ट्राच्या भूगोलात शिरलेला तो 'थेरडा' आठवतो. वरच्या फ्लॅटमधून ठोकण्याचे आवाज आले की 'कुटील शेजारी' आठवतात. पुण्यातल्या दुकानात शिरलं की 'सर्वात दुर्लक्ष करण्यासारख्या' गोष्टीसारखं वाटू लागतं. असं बरंच. अचानक पाणी गेलं की आपल्या कुंडलीत जलःश्रृंखला योग आहे का अशी शंका येते.
'पुलं' माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात त्यांचं एक तरी वाक्य आठवतं आणि प्रसंगी तारूनही नेतं. हे भावनिक नाही, अनुभवातून आहे.
शेवटी एकच. माणसाचं काम चिरंतन आहे की नाही हे काळ ठरवतो. माणूस नाही.⁠⁠⁠⁠

कौशल इनामदार
लोकमत
१४ जून २०१६