MusicPlaylistView Profile
Create a playlist at MixPod.com

Monday, June 6, 2011

व्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे

मी पु.लं.चा फॅन, चाहता. मला पु.लं.चं व्यक्ती आणि वल्ली पुस्तक पूर्ण पाठ. मी माझ्या वेगवेगळ्या नाटकात मग्न होतो. त्या काळात व्यक्ती आणि वल्ली रंगमंचावर आणण्याची चर्चा चालू होती. मला वाटलं त्यातल्या पु.लं.च्या भूमिकेसाठी विक्रम गोखले किंवा दिलीप प्रभावळकर यांच्यापैकी कोणाला तरी हा रोल मिळणार. मला या नाटकात रोल मिळेल असा मी विचारही केला नव्हता. आणि मला निर्मात्याचा फोन आला तू व्यक्ती आणि वल्लीमधील पु.लं.चा रोल करशील का? माझी पर्सनॅलिटी किंवा माझं बाह्य व्यक्तिमत्व तरुणपणच्या पु.लं. सारखं काहीसं तेव्हा होतं. मला विचारण्यापूर्वीच निर्मात्याने पु.लं. नाच विचारलं होतं की अतूल परचुऱ्यांना ही भूमिका द्यायची का? पु.ल. लगेच ’हो’ म्हणाले. त्यामुळे मी ही भूमिका करायला नकार देणं शक्यच नव्हतं. माझी पु.लं.शी ओळख नव्हती. आणि त्या काळात त्यांच्या आजारपणाला सुरुवात झाली होती. पण त्यांच्या विनोदबुद्धी तशीच तीव्र होती.

एकदा साहित्यसंघात ’तुझं आहे तुजपाशी’ या नाटकाचा प्रयोग होता आणि पु.ल. नाटक बघायला आले होते. मी त्यात शामची भूमिका करत होतो. माझं काम त्यांना अतिशय आवडलं, ते म्हणाले ’तुझं काम पाहताना सतीशची आठवण होते.’ या त्यांच्या कॉमेंटमुळे खूप आनंद झाला. सतीश दुभाषी आणि पु.ल. यांच्या चेहऱ्यात साम्य होतं याची मला पुन्हा जाणीव झाली. तेवढ्यात ते खुर्चीवरुन उठताना मी त्यांना हात द्यायला गेलो, त्यांचा विनोद इतका उत्स्फूर्त, ते म्हणाले ’नाही रे हल्ली थोडा वेळ लागतो. कारण स्टार्ट घ्यावा लागतो.’ नाटक संपल्यावर त्यांनी पेटीवर ’कृष्ण मुरारी’ गाणं वाजवून दाखवलं. त्यांनी माझं नाटक पाहणं, पेटीवर गाणं वाजवून दाखवणं हा मी माझा गौरव समजतो. सुपारेल कॉलेजच्या प्रांगणात चतुरंग संम्मेलनात पु.ल.ना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार होता. तीथे व्यक्ती वल्लीचा प्रयोग व्हायचा होता. चार हजार प्रेक्षक समोर बसले होते. सुरुवातीला बिरजू महाराज आणि झाकीर हुसेन यांचा कार्यक्रम होता. तो संपल्यावर रात्री अडीच वाजता नाटकाला सुरुवात झाली आणि नाटक पावणे सहाला संपले.

नंतरचा प्रयोग बालगंधर्वला होता. पु.ल. नाटकाला आले होते. पण पु.लं.ची लोकप्रियता एवढी की नाटक संपल्यावर पु.ल. मागच्या दारानं बाहेर पडणार होते तर त्यांना दर्शन घेण्यासाठी गेला. व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचे दोनशे पन्नास प्रयोग झाले. खरं तर व्यक्ती आणि वल्ली हे नाटक तर एक ललितगद्य आहे. त्यात पु.लं.नी एकुण अठरा व्यक्तींवर लिहिलं. त्यातल्या काहीच व्यक्ती आणि वल्ली आम्ही नाटकाचं रुपांतर देऊन सादर केल्या. आपल्याला दहा पंधरा माणसाचे प्रकार शोधून सापडत नाही पण पु.लं.नी व्यक्तीमधल्या निवडलेल्या वल्ली, किती ग्रेट! शब्दकळा! अजूनही व्यक्ती आणि वल्ली वाचलं किंवा ऎकलं तर फ्रेश वाटतं हीच त्याची गंमत आहे.

दुर्दवाने पु.लं.चं मराठी समजणारा प्रेक्षक आज नाही. पु.लं.ची भाषा अलंकारिक नाही. पण त्यांचा विनोद कळायला मराठी भाषेची बलस्थान ठाऊक असायला हवीत. मला प्रामाणिकपणे वाटतं इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं, जर आपण त्यांना थिएटरपर्यंत आणू शकलो तर त्यांनाही पु.लं.ची नाटकं आवडतील. पण त्यांनी व्यक्ती आणि वल्ली वाचलं असेल तर त्यांचा आनंद द्विगुणीत होईल हे नक्की.

पु.लं.नी माझं नातीगोती हे नाटक पाहिलं होतं. मला ते ओळखत होते. व्यक्ती आणि वल्लीच्या निमित्ताने त्यांच्या माझ्या भेटी झाल्या. पण हक्काने गप्पा मारायला जाऊन त्यांना त्रास द्यावा हे मला योग्य वाटलं नाही. तेव्हा आजारपणाचा त्रास चालू झाला होता.

’तुझं आहे तुजपाशी’ नाटकाचा पु.लं.च्या पंच्याहत्तरीनिमित्त पुण्यात प्रयोग होता. मी शामचं काम करत होतो आणि माझी पत्नी सोनिया गीताचं काम करत होती. पु.ल. नाटकाला आले आणि म्हणाले ’मुद्दाम आलो. त्या त्या वयातील माणसं ते ते रोल करत आहेत’ या वाक्याला अर्थ होता. कारण शामचं काम ५०-५५ वयाचा कलावंत करायचा. नाटकातल्या शामचं वय २०-२५ वर्षं होतं मी त्यावेळी २५ वर्षाचा होतो म्हणून मला ही कॉमेंट फार आवडली. व्यक्ती आणि वल्ली आम्ही झी टीव्हीसाठी मालिकेच्या स्वरुपात केलं तेथे आम्हाला नंदा प्रधान, भैय्या नागपूरकर इत्यादी व्यक्ती आणि वल्ली घेता आल्या. नंदा प्रधानची भूमिका सचिन खेडेकरने केली होती. व्यक्ती आणि वल्लीच्या (मालिकेचा आणि नाटकाचा) दिग्दर्शक होता चंद्रकांत कुलकर्णी. त्याला नाटकांची उत्तम जाण आहे. व्यक्ति आणि वल्ली हे नाटक रेव्हू फॉर्म मधे आहे. तेव्हा त्याला निवेदनाची जोड द्यायला हवी हे त्यानं जाणलं. चंद्रकांत कुलकर्णी मला म्हणाला, ’तुझ्या खांद्यावर कॅमेरा आहे. तू शूट करुन दाखवायचं.’ म्हणजेच मला दोन पातळ्यांवर काम करावं लागलं एक म्हणजे त्यातून बाजूला होऊन नाटकातलं लेखकाचं पात्र होऊन वावरणं हा एक वेगळाच आनदं होता. लोक मला विचारत पाठांतराचा त्रास होत नाही का? कसा होणार? मुळात मला व्यक्ती आणि वल्ली पाठ होतच आणि पु.लं.नी मला काम करायला सांगितलं होतं हा सगळा अत्यंत भाग्याचा आनंदाचा सुवर्णयोग होता.

ज्याला हायलाईट म्हणता येईल अशी माझ्या आयुष्यातील न पुसली जाणारी आठवण म्हणजे माझं लग्न ठरलं होतं, पहिली पत्रिका गणपतीला ठेवली. दुसरी पु.लं.ना द्यायला पुण्याला गेलो. त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना लग्नाला येणं शक्य होणार नाही माहीतही होतं त्यांना पत्रिका दिली त्यांनी मला ’युवराज’ अशी हाक मारली आणि म्हणाले, ‘प्रकृती बरी असली तर मी लग्नाला नक्की येईन.’ आणि आश्चर्य म्हणजे लग्नाच्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांचा फोन आला म्हणाले.’ मी येऊ शकणार नाही पण इथूनच म्हणतो ’नांदा सौख्यभरे’.

त्यांचं ’असा मी असामी’ हे फॅन्टास्टिक पुस्तक आहे त्यात नाटकीय प्रसंग जास्त आहेत आणि त्यातली कॅरक्टर्स गडद आहेत. त्यातलं धोंडोपंत हे पात्र पु.लं.च्या जवळ जाणारं आहे. पण ’असा मी असामी’ मला करता आलं नाही याची मला खंत आहे. पु.लं.च्या स्मृतीला प्रणाम!

अतुल परचुरे
(जीवनज्योत दिवाळी अंक २००९)

Print this post

5 प्रतिक्रिया:

महेश सावंत said...

chaan lihile aahe

स्वप्निल देमापुरे said...

Khupach Chan prayatn aahe...

Pu. L. nch ayushya ulagadanyacha...
Pu.L. preminisaathi Khupach Changala Blog...


Shubhecha
http://ransangram.blogspot.com

BABABLOG said...

Atul Great ..

BABABLOG said...

Atul Great.

महेश सावंत said...

Khupach Chan lhile aahes