Showing posts with label bhaai. Show all posts
Showing posts with label bhaai. Show all posts

Monday, June 15, 2020

तरुणाईचे लाडके पु.ल.

पुलंना जाऊन (१२ जून रोजी ) आता वीस वर्ष लोटलीत. परंतु त्यांचं मराठी जनमानसावरील अधिराज्य अजूनही कायम आहे. तरुणाईच्या मनांवरही ते तितकंच गडद, गहिरं आहे. याचाच हा वानवळा..
                     
जीवनात एक वेळ अशी येते की जिथे आपल्याला आपली वाट गवसते किंवा चुकते. मला माझी वाट २००० साली गवसली. महाराष्ट्र त्यावेळी एका मोठय़ा धक्क्य़ातून सावरत होता. पु. ल. देशपांडे निवर्तले होते. दुसऱ्या दिवशी सगळ्या मराठी वर्तमानपत्रांतून पुलं गेल्याची बातमी छापून आली होती. जवळजवळ अख्खा पेपर ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे’ या नावाशी संबंधित लेखांनी भरलेला पाहिला. तत्पूर्वी पु. ल. देशपांडे नावाचे एक थोर साहित्यिक आपल्या महाराष्ट्रात आहेत, एवढंच जुजबी ज्ञान माझ्या बालमेंदूत शिक्षण खात्यानं घुसवलेलं. त्यामुळे प्रत्यक्षात पु. ल. देशपांडे ही काय चीज आहे मला माहीत नव्हतं. मग मी ‘पुलं कोण होते’ याचा शोध घेण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. कॅसेट हाऊसमधून पुलंच्या ‘रावसाहेब’, ‘नारायण’ व ‘सखाराम गटणे’ या कथाकथनाची कॅसेट आणली आणि प्लेयरवर लावली.

‘एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही..’ हे पुलंचं पहिलं वाक्य कानावर पडलं आणि माझी त्यांच्याशी त्याच दिवशी वेव्हलेंग्थ जुळली. त्यानंतर पुलंच्या विचाराशिवाय एकही दिवस गेला नाही. पुलंच्या ऑडियो क्लिप्स ऐकून आणि त्यांची पुस्तकं वाचून झालेलं तृप्तीचं समाधान अतुलनीय आहे. एखादा विचार व्यक्त करत असताना योग्य शब्द निवडण्याचं कसब पुलंना सहजी अवगत होतं. शाळकरी मुलापासून ते नव्वदीत पोचलेल्या वृद्धांपर्यंत वाचकांची मोठी रेंज लाभणं- यातून पुलंच्या साहित्याचा समाजावरील गहिरा प्रभाव दिसून येतो. पुलंच्या समकालीन किंवा सद्य:कालीन अन्य कुणा लेखकाला हे भाग्य लाभलेलं दिसत नाही. पुलंनी दैनंदिन जीवनातील घडामोडींचं सूक्ष्म निरीक्षण करून त्याला अनुपमेय शब्दरूप दिलं आणि समाजाला जीवनाकडे सौंदर्यदृष्टीने पाहण्याची दृष्टी दिली. ती देताना त्यांची भाषा कुठेही प्रचारकी नव्हती. आजची पिढी पुलंची वाक्यं एखाद्या संदर्भात वापरते त्यावरून खात्रीनं वाटतं, की पुलं हेच मराठी साहित्यातील सर्वात जास्त लोकप्रिय लेखक आहेत. उदाहरणादाखल सांगायचं तर पुलंची जन्मशताब्दी साजरी झाली त्यानिमित्ताने ‘मालती-माधव’मधल्या पुलंच्या घरी त्यांचा सहवास लाभलेले कित्येक स्नेहीसोबती जमले होते. या कार्यक्रमाला पुलंवरच्या प्रेमापोटी आम्ही तरुणांनी बनवलेल्या ‘आम्ही असू ‘पुलं’कित’ या ग्रुपच्या सदस्यांना ठाकूर दाम्पत्याने मोठय़ा आपुलकीनं बोलावलं होतं. मुंबई, पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर ते पार बेळगावहून मंडळी जमली होती ती केवळ पुलंवरील प्रेमामुळेच. वाटावं- हे एकच कुटुंब आहे! डॉ. जब्बार पटेल, बाबासाहेब पुरंदरे, जयंत नारळीकर, श्रीकांत मोघे, अरुणा ढेरे, माधव वझे, सुधीर गाडगीळ यांसारखी कलाक्षेत्रातील मंडळी त्या दिवशी जमली होती. त्यांच्यासमवेत वयाचा, ज्ञानाचा, कर्तृत्वाचा कसलाही भेद न बाळगता आम्हा मुलांना ‘मालती-माधव‘मध्ये काही तास घालवता आले ही कदाचित आमची पूर्वजन्मीची पुण्याईच! दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात एकमेकांशी बोलताना आम्हा मुलांच्या तोंडी फक्त पुलंचीच वाक्यं होती. जसं की आमच्यातला मृणाल ‘सर, हे पेढे!’ म्हणत गटण्याच्या भूमिकेत शिरून सर्वाना पेढे वाटत होता. मी बाबासाहेब पुरंदरे, जब्बार पटेल, माधव वझे यांच्याशी बोलताना एकच वाक्य म्हणायचो- ‘आपल्याशी एकदा (पुलं) या विषयावर बोलायचंय!’ डोंबिवलीहून आलेल्या आनंद मोरेंची ओळख करून दिली तर ते एकदम ‘म्हैस’मधल्या बाबासाहेब मोरे या पुढाऱ्याच्या भूमिकेत शिरून म्हणाले, ‘(मंत्रालयात) मालती-माधवमध्ये मीटिंग आहे..’ दुपारी जेवताना आम्ही एकमेकांना ‘अरे, घ्या.. घ्या, लाजताय काय च्यायला स्वत:च्या घरी असल्यासारखे!’ अशी टपली मारत होतो. पुलंच्या लोकप्रियतेचा मला आलेला एक अनुभव सांगतो. २०१५ साली मी मित्रांसमवेत तोरणा किल्ल्यावर अभ्यासासाठी गेलो होतो. चालून थकल्यामुळे दुपारच्या वेळी गडावर सावलीत निवांत झोपलो होतो. अचानक दुरून बारीक आवाजात ‘गोदाक्का, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ बघू?’ हे चितळे मास्तरांचं वाक्य कानावर पडलं. कुठल्याशा कॉलेजात शिकणारी मुलं सुट्टीत गडावर फिरायला आली होती. त्यातल्याच एकाच्या खिशातून ‘चितळे मास्तर’ ऐकू येत होते. गड चढताना कष्ट जाणवू नयेत म्हणून त्याने मोबाइलवर चितळे मास्तरांची क्लिप लावलेली आणि बाकीचे मन लावून ते ऐकत ऐकत गड चढत होते. वयोगट साधारणत: २०-२१ वर्षे. असं काही अनुभवलं की वाटतं, जगात आपल्यासारखे ‘पुलंयेडे’ बरेच आहेत.

मला वाटतं, पुलंना केवळ ‘विनोदी लेखक’ म्हणून जी ओळख मिळाली ती जरा अन्यायकारकच आहे. खरे पुलं त्यांच्या भाषणांतून आणि वैचारिक लेखांतून समजतात. पुलंच्या एकूण साहित्यसंपदेपैकी विनोदी साहित्याचं प्रमाण हे वैचारिक साहित्यापेक्षा कमीच असावं. पुलंची गोळी कडू नसे. त्यामुळं ती घेणाऱ्याचं तोंड कधीही कडवट झालं नाही. परिणाम मात्र योग्य तो व्हायचाच. पुलं वाचताना आपण उगाच काहीतरी गहन वाचतोय असं निदान मला तरी कधी वाटलं नाही. हो, अंतर्मुख जरूर झालो. अगदी पुलंचं विनोदी साहित्यही वाचूनही. पुलं वाचताना नेहमी मला संवादाचा भास होतो. माझं आपलं असं कुणीतरी माझ्याशी गप्पा मारतंय असं वाटत राहतं. ‘हा माणूस आपला आहे’ असं वाटणं ही भावना वाचकाचं लेखकाशी अदृश्य नातं जोडते. यामुळंच पुलं प्रत्येक पिढीशी आपलं नातं जोडून आहेत.

पुलं एक कमाल आस्वादक होते. जीवनाचा आनंद त्यांनी स्वत: तर घेतलाच आणि तो इतरांनाही वाटला. समाजातलं उत्तम ते- ते पाहावं, आस्वादावं आणि आयुष्य आनंदानं जगावं ही मूलभूत शिकवण पुलंनी आपल्याला दिली. पुलंमुळे मी पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे यांचं गाणं ऐकणं शिकलो. चार्ली चॅप्लिन समजला. व्यक्त होणं शिकलो. उत्तम मैत्र जोडणं शिकलो. कला, साहित्य, संगीत, नाटक यांत मनापासून काम करणाऱ्या मंडळींशी गट्टी जमवून आपली सांस्कृतिक भूक भागवणं शिकलो. रवींद्रनाथ टागोर समजावेत म्हणून वयाच्या पन्नाशीत पुलं शांतिनिकेतनमध्ये बंगाली भाषा शिकायला गेले होते, ही गोष्ट खूप काही सांगून जाते. त्यांनी रवींद्रनाथांचं भाषांतरित साहित्य वाचलं असतं तरी चाललं असतं, पण पुलंनी ते टाळलं. जीवनाचा सर्वार्थाने आनंद घेणं ते हेच.

मी मुद्दाम कुणाला ‘पुलं’ ऐकवण्यापेक्षा माझ्यासाठी त्यांची ऑडियो क्लीप लावतो. तो आवाज ज्या- ज्या माणसांच्या कानांवर पडेल, त्यांतून ज्याला जे भावेल तो पुलंचा झाला असं साधं-सरळ समीकरण आहे. समाधानाची बाब ही, की पुलंच्या लिखाणाला काळाचं बंधन नसल्यामुळे ज्याला मराठी भाषेचा सेन्स आहे अशा प्रत्येकाला पुलं भावतात. त्यामुळं ‘आजच्या पिढीला पुलं समजायला हवेत’, ‘इतरभाषिकांना पुलं समजायला हवेत’ वगैरे कल्पना वांझोटय़ा आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. अभिजात गोष्टी शाश्वतच असतात. कदाचित दृश्य किंवा वस्तूरूपात त्यांचं अस्तित्व नष्ट होईलही; परंतु परिणामस्वरूपात त्या काळावर मात करतात. पुलंचं कलेतलं योगदान शाश्वत आहे. ते बरोब्बर जिथं पोचायचं तिथं पोचणारं आणि चिरंतन टिकणारं आहे. त्यासाठी आपण वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज नाही.

अमोल लोखंडे
amolslokhande1984@gmail.com
लोकसत्ता
१२ जून २०२०

Monday, March 11, 2019

चरित्रपट की विडंबनपट?

सुनीताबाई देशपांडे यांचे बंधू सर्वोत्तम ठाकूर, त्यांच्या पत्नी अंजली ठाकूर, त्यांचे चिरंजीव उमेश ठाकूर आणि पुलं-सुनीताबाईंचे मानसपुत्र दिनेश ठाकूर, पुलंचे स्नेही रामभाऊ कोल्हटकर ही पुलं-सुनीताबाईंची निकटवर्ती माणसं. त्यांचे ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चरित्रपटावरील आक्षेप..

‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या पुलंवरच्या तथाकथित ‘चरित्रपटा’चे दोन्ही भाग नुकतेच प्रदर्शित झाले.चरित्रपटातील असंख्य प्रसंगांत दाखविलेली वास्तवाशी अनावश्यक फारकत, सत्य प्रसंग वाट्टेल तसे बदलून केलेले विद्रूपीकरण, कल्पनादारिद्रय़, त्याचबरोबर चरित्रनायकाच्या आणि कलाक्षेत्रातल्या अनेक मान्यवर व्यक्तिमत्त्वांच्या तोंडी घातलेले अतिसामान्य, टुकार, न शोभणारे (uncharacteristic) संवाद, त्यांचे या चरित्रपटातील अत्यंत उथळ, बेजबाबदार व बदनामीकारक चित्रण अशा अनेक गोष्टींवर कित्येक जाणकार रसिकांकडून, चाहत्यांकडून, मान्यवरांकडून जोरदार टीकाही झाली. खरं तर पुलंचे जन्मशताब्दी वर्ष म्हणजे जगभरातील मराठी माणसांना आनंदोत्सव साजरा करायला, त्यांच्या सुंदर आठवणींत रमायला मिळालेली सुवर्णसंधी. पण याला गालबोट लागले ते या चरित्रपटाने, हे दुर्दैव.

या चरित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०१७ च्या सुमारास दिनेश यांच्याशी आपल्याला पुलंवर बायोपिक करायचा आहे; त्यासाठी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सांगा म्हणून संपर्क साधला. दिनेश यांनी त्यांना पुलंची पुस्तके, त्यांच्यावरील डॉक्युमेंटरीज् वगरे स्वाभाविक माहिती पुरवत असताना त्यांना असे उत्तर मिळाले की, ‘‘मी काही पुलंची पुस्तके वाचलेली नाहीत, डॉक्युमेंटरीज् बघितलेल्या नाहीत. मला त्याची गरजही वाटत नाही. मी त्यांच्या आयुष्यातले नव्वद प्रसंग गोळा करणार. त्यातले साठ निवडून, चित्रित करून त्यावर ८ नोव्हेंबर २०१८ ला चरित्रपट प्रदर्शित करणार.’’ यावर दिनेश यांनी पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले आकलन झाल्याशिवाय (खरं तर झाल्यानंतरही) पुलंसारखे अष्टपैलू, बहुरंगी व्यक्तिमत्त्व चरित्रपटाच्या स्वरूपात उभे करणे कठीण आहे, असे सांगून दिग्दर्शकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. उत्तम चरित्रपट काढण्यासाठी लागणारा अभ्यास, तो करायची तयारी, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, मेहनत, चरित्रनायकाबद्दल वाटणारी व्यक्तिगत आपुलकी, आस्था, आत्मीयता या सगळ्याचाच अभाव भासल्याने- केवळ पुलंच्या नावाचे चलनी नाणे जन्मशताब्दीनिमित्त खपवायचे आहे- अशी रास्त शंका आल्याने दिनेश यांनी अशा प्रकारच्या निर्मितीसाठी आपली नाराजी दाखवून यात आपण सहभागी होऊ शकणार नाही असे त्यांना सांगितले.

या पार्श्वभूमीवर हा चरित्रपट सुमार दर्जाचा असणार, हा अंदाज दुर्दैवाने खरा ठरला. तेवढेच असते तर दुर्लक्ष करून सोडूनही देता आले असते. परंतु या चरित्रपटात cinematic liberty किंवा ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ अशा मोठमोठय़ा शब्दांच्या ढालीमागे लपत, स्वत: पुलं आणि सुनीताबाईंनी वर्णन केलेल्या, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या प्रसंगांचा केलेला विपर्यास, त्यांचे केलेले बेजबाबदार विकृतीकरण यांमुळे या चरित्रपटात पुलंचे व्यक्तिमत्त्व आत्मकेंद्रित, उथळ, वेंधळे दर्शवले गेले आहे.

खरे तर चरित्रपट करताना चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण, सखोल अभ्यास केल्यावरही काही बारकाव्यांची नोंद सापडतच नसेल तेव्हा आणि फक्त तेव्हाच अत्यंत काळजीपूर्वक आणि परिपक्वतेने cinematic liberty वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरणे वावगे ठरत नाही. इकडे तर पुलंची स्वत:ची इतकी पुस्तके, त्यांच्यावरील तीन उत्तम डॉक्युमेंटरीज् (पैकी दोनांत पुलं स्वत:च त्यांच्या आयुष्याबद्दल भरभरून बोलले आहेत.), त्यांची भाषणे, रेकॉìडग्ज्, सुनीताबाईंची पुस्तके, तसेच पुलंवर आणि चरित्रपटात दाखवलेल्या त्यांच्या निकटवर्तीयांवरही इतके अमाप साहित्य, माहिती उपलब्ध असताना त्याचा काटेकोरपणे वापर न करता असे उथळ, बेपर्वाईचे आणि विसंगत चित्रण का करावे? पुलं आणि सुनीताबाईंचे एकमेकांना पूरक असलेले सुंदर भावनिक नाते आणि सांस्कृतिक श्रीमंतीचे आयुष्य तर इथे दिसतच नाही. सुनीताबाईंना आणि इंग्रजीला घाबरणारे, आत्मविश्वास नसलेले, दुसऱ्याच्या सल्ल्याने वागणारे असे पुलंचे सत्याशी विसंगत व्यक्तिमत्त्व दाखवण्यामागचा हेतू तरी काय?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा चरित्रपट संदर्भ म्हणून (जो ‘बायोपिक’चा एक महत्त्वाचा उद्देश असतो.) पुलंसारख्या महाराष्ट्राच्या मोठय़ा व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासासाठी वापरण्याच्या लायकीचा नाही. मराठी शिकणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांला पुलंवर, त्यांच्या साहित्यावर; फक्त विनोदीच नव्हे तर त्यांच्या विपुल वैचारिक साहित्यावर, विविध क्षेत्रांतल्या योगदानावर, त्यांच्या आयुष्यावर रिसर्च करायचा असल्यास पुलंवरचा हा चरित्रपट चुकूनही प्रमाण मानल्यास तो अनर्थच ठरेल. याच उद्देशाने पुलं-सुनीताबाई आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या आयुष्यातल्या वास्तव घटना आणि चरित्रपटात केलेले त्यांचे विकृतीकरण यामधील विसंगतींची नोंद होणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, चरित्रपटातील abortion चा प्रसंग.. सुनीताबाईंना दिवस गेल्याचे त्या पुलंना सांगू पाहतात- ते दुर्लक्ष करतात- त्या स्वत: एकटय़ाच निर्णय घेऊन, एकटय़ाच गर्भपात करून येतात असा दाखवलेला गडद आणि बटबटीत प्रसंग. तर हाच प्रसंग ‘आहे मनोहर तरी’ या सुनीताबाईंच्या पुस्तकात त्यांच्याच शब्दांत किती संवेदनशीलपणे आला आहे. (प्रथम आवृत्ती, पृष्ठ क्र. १९५-१९६) ‘‘डोहाळ्यांचा त्रास होऊ लागला... भाई मोठ्ठं डाळिंब घेऊन आला... आमच्यावरच्या जबाबदाऱ्या संपेपर्यंत स्वत:वर असली दुसरी कोणतीही जबाबदारी नको असा आम्ही दोघांनी विचारपूर्वक निर्णय घेतला.’’

‘अंमलदार’ प्रसंग (‘आहे मनोहर तरी’- पृष्ठ क्र. १७८)- सुनीताबाईंनी पैज जिंकल्यावर चैनीच्या गोष्टी न मागता ‘अंमलदार’ नाटक पूर्ण करून मागितले याचे केलेले सुंदर वर्णन! तर चरित्रपटात सिगारेट तोडण्याच्या दमदाटीने आणि भीतीने ‘अंमलदार’ पूर्ण झाले- हे त्याचे केवळ विचित्रीकरण.

विजया मेहता- ‘सुंदर मी होणार’ वाचनाचा प्रसंग- ‘आहे मनोहर तरी’ पृष्ठ क्र. १४५-१४६ शी ताडून पाहावा.

चरित्रपट बनवणाऱ्यांनी योग्य तो अभ्यास करूनच चरित्रपट बनवला असेल असा भाबडा विश्वास टाकणाऱ्या अनेक प्रेक्षकांचा हा विश्वासघातच नाही का?

वास्तवात आचार्य अत्र्यांचे, गडकऱ्यांचेच नव्हे, तर कुठचाही ऐकलेला चांगला विनोद मैफिलीत, गप्पांत खुलवून सांगणारे पुलं- ‘‘विनोद फक्त मी करायचे!’’ असला भिकार विनोद (?) पुन्हा पुन्हा करताना दाखवले आहेत. बरं, यावर पुलंच्या कोटय़ा लोकांना माहितीच असल्यामुळे आपल्याच कोटय़ा पुलंच्या तोंडी खपवल्याची कबुली संवादलेखकांनी दिलीच आहे. (मॅजेस्टिक गप्पा- पार्ले, १६ फेब्रुवारी २०१९) मग बायोपिकला पुलंचे नाव का?

तर अशा अनेक वास्तव घटनांची वाट्टेल तशी चिरफाड करून, तर काही न घडलेले प्रसंग कल्पनेने (की ‘कल्पनादारिद्रय़ाने’ म्हणावे?) या चरित्रपटात घुसडले आहेत. या चित्रपटातील अशा असंख्य विसंगतींची पुराव्यासकट नोंद अभ्यासूंना उपयोगी पडेल म्हणून आणि रसिकांनाही सत्य कळावे म्हणून आम्ही तयार करीत आहोत.

पुलं आणि त्यांच्याबरोबर ‘चरित्रपटा’त ये-जा करणारी इतर थोर व्यक्तिमत्त्वे आम्हाला अशीच दिसली, असे वेळोवेळी सांगून लेखक-दिग्दर्शकांनी आपल्या दृष्टिदोषाची तर कबुलीच दिली आहे. यात केवळ कमजोर आकलनशक्ती आहे, की मत्सराचा/ आकसाचा चष्माही आहे, की दारू, सिगरेटच्या मागे धावणारी बेजबाबदार, आत्मकेंद्रित व्यक्तिमत्त्वे यांना आरशात दिसली, असा प्रश्न पडतो.


१० मार्च २०१९
लोकसत्ता

https://www.loksatta.com/lokrang-news/article-about-autobiography-or-parody-movie-1854473/

Times of India Article -->
a